रविवार, जून 15, 2025
Home Blog Page 1448

असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी वाढवावी – निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत

मुंबई, दि. १४ : राज्यात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेत प्रथम क्रमांकावर गोंदिया, तर दुसऱ्या क्रमांकावर पालघर जिल्हा आहे. मुंबई शहर जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ई- श्रम पोर्टलवरील असंघटित कामगारांची नोंदणी वाढवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुंबई शहर जिल्हास्तरीय असंघटित कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विनोद सिंह, उपमुख्य अभियंता एम. बी. असवाल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुलभा शेलार, नागरी सुविधा केंद्राचे जिल्हा समन्वयक मनवेल वळवी,  समाज कल्याण विभागाचे सहायक निरीक्षक एस.ए. सावंत, सहायक कामगार आयुक्त प्रवीण कावळे, कामगार अधिकारी स्वरा गुरव, सर्व श्रमिक संघटनेचे प्रतिनिधी संतोष विभुते उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत म्हणाले की, असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल विकसित केले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांनी यावर नोंदणी केल्यास कामगारांना भारतमान्य ई-श्रम कार्ड मिळणार आहे. या ई-  श्रम कार्डच्या माध्यमातून शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार आहे. तसेच या पोर्टलवर नोंदणी केल्याने स्थलांतरीत कामगारांची माहिती ठेवणे सुलभ होणार आहे. प्राप्त माहितीचा वापर असंघटित कामगारांच्या हितासाठीच्या योजना बनविण्यासाठी होणार आहे. त्या अनुषंगाने अद्यापही ज्या कामगारांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा कामगारांनी  ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असेही आवाहन  निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी केले.

000

जयश्री कोल्हे/स.सं

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती; २०२५ पर्यंत ५० टक्के फिडरचे काम करण्याचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा नियम २९३ चे उत्तर 

मुंबई, दि. 14 : शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले असून, सन 2025 पर्यंत 50 टक्के सौरऊर्जा फीडर प्रकल्पाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नियम 293 अन्वये यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना 50 टक्के दिवसा आणि 50 टक्के रात्री वीज उपलब्ध करुन देण्यात येते. विजेचे दर 7 रुपये प्रती युनिट असून शेतकऱ्यांना दीड रुपये प्रती युनिट प्रमाणे देण्यात येते. सन 2017 मध्ये सौरऊर्जा फीडर योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे आणि दिवसाही वीज मिळेल.

शेतकऱ्यांना वीज उपलब्धतेसाठी सौर ऊर्जेवरील प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. आजच्या स्थितीत एकूण 548 मे. वॅ.चे प्रकल्प कार्यरत असून 1083 इतकी स्थापित क्षमता निर्माण झाली आहे. आतापर्यंत सौर उर्जितीकरण झालेल्या रोहित्रांची संख्या 9 हजार 217 असून याचा लाभ 90 हजार शेतकऱ्यांना होत आहे. अजून 8 हजार मे.व्हॅट वीज शेतकऱ्यांना द्यावयाची आहे. यासाठी जवळपास 13 हजार मे.व्हॅट वीज प्रकल्प क्षमता वाढवावी लागणार आहे. यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली असून 3 किलोमीटर अंतराच्या आत जमीन उपलब्ध होणे आवश्यक आहे. शासनाची जमीन नसेल तर शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या 6 टक्के किंवा प्रति हेक्टर 75 हजार रुपये आणि प्रत्येक वर्षी 2 टक्के वाढ असा जो दर अधिक असेल तो देऊन भूसंपादन प्रक्रिया करण्यात येत आहे. यामध्ये वीजेची वसुली होत नाही अशा अडचणी होत्या परंतु ती जबाबदारी शासनाने घेतली आहे. तसेच केंद्र सरकारच्या कुसुम योजनेतून अनुदान मिळणार आहे. या अनुदानामुळे कमी दरात वीज उपलब्ध होईल.

कृषीपंचाचेही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. यावर्षी दीड लाख कृषी पंप देण्याचा प्रयत्न आहे. कृषी विभागाची थकबाकी 48 हजार 689 कोटीवर गेली आहे. यामध्ये 15 लाख 23 हजार 426 ग्राहकांनी आतापर्यंत एकही वीज बील भरले नाही. त्यांना थकीत बील भरा अशा सूचना नाही तर चालू बील भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

पैनगंगा-वैनगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून 62 टीएमसी पाणी मिळणार आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे. आता त्यात वाशीम जिल्ह्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाहून जाणारे पाणी गोदावरी, तापी खोऱ्यात आणण्यासाठी दमणगंगा पिंजाळ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून 31.60 टीएमसी पाणीसाठी उपलब्ध होणार आहे. यातून मुंबईला पाणीपुरवठा होईलच पण मराठवाड्याला मोठा लाभ होणार आहे. नारपार गोदावरी, गिरणा, तापी जल पुनर्भरण, मराठवाडा स्थिरीकरण असे अनेक प्रकल्प आहेत.

जिगाव प्रकल्पाला यावर्षी निधी देण्यात आला आहे. भूसंपादनाची कामे करण्यासाठी सुद्धा निधी देण्यात आला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. समांतर पर्याय म्हणून वर्ल्ड बँकेकडेसुद्धा प्रस्ताव दिला आहे. एकूणच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सुमारे 7 ते 8 वर्षात हे प्रकल्प पूर्ण होतील. यामुळे पाण्याचे संघर्ष संपतील. शासन यासाठी निधी उभारणी करेल.

पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून लम्पी आजाराच्या औषध उपचारांसाठीचा 100 टक्के खर्च राज्य सरकारने केला आहे. लम्पी आजारामुळे 4 लाख 69 हजार पशुधन बाधित झाले होते. त्यापैकी चार लाख 27 हजार पशुधन बरे झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे लम्पी आजारामुळे पशुधन दगावलेल्या पशुपालकांच्या खात्यावर 70 कोटी रुपयांची मदत राज्य शासनाने केली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दुग्ध उत्पादकांना आधार देणारी महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ बंद करून चालणार नाही, यासाठी दुग्धविकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्याचा अहवाल प्राप्त झाला असून महानंद चालविण्याबाबत एनडीडीबीला विनंती केली. राज्यात गोसेवा आयोगाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली असून राज्यात गोशाळांना अनुदान वितरणाची जबाबदारी गोसेवा आयोगाच्या माध्यमातून केली जाईल.

शेतकरी हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

शेतकरी हितासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 ही केंद्र पुरस्कृत योजना असून सन 2022-23 साठी केंद्र हिस्सा 50 कोटी 8 लक्ष व राज्य हिस्सा ३० कोटी ३९ लक्ष असा एकूण 83 कोटी 47 लक्ष निधी प्राप्त झाला असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

जून, जुलै व ऑगस्ट 2022 मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या कामात जुलै व ऑगस्ट 2022 पासून कृषी विभागाची संपूर्ण यंत्रणा नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. ग्रॉस डोमेस्टीक क्लायमेट रिक्स या संस्थेच्या अहवालात महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यामुळे बदलणाऱ्या हवामानामुळे शेतीपिकावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होऊ नये यासाठी कृषी विद्यापीठांना वेगवेगळ्या पिकांचे नवीन वाण निर्मितीवर संशोधन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वातावरणाचे शेतीपिकांवर होणारे अकाली अतिवृष्टी, वादळ यांसारखे संभाव्य धोके याचा अचूक अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने देखील प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. राज्यात ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ सुरू केले आहे. पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत आतापर्यंत 150 तृणधान्य आधारित प्रकल्प सुरू करण्यांत आलेले आहेत. 6 हजार प्रक्रिया केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे. पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यात कांद्याच्या बाजारभावामध्ये सातत्याने घसरण होत आल्याने त्यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 300 रूपये अनुदान जाहीर केले आहे. नाफेड कडून 8 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि फेडरेशन मार्फत 42 खरेदी केंद्रावर कांद्याची खरेदी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच कापूस खरेदी करिता राज्यात 65 केंद्रे तसेच कापूस पणन महासंघाने सीसीआयकडून 50 केंद्रे सुरु केले आहेत. हमीभावाने हरभरा खरेदीसाठी 552 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आलेली असून 510 खरेदी केंद्रे कार्यान्वित केले आहे. आतापर्यंत एकूण 2 लक्ष 17 हजार 156 शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा 2 टक्के विमा हप्ता राज्य सरकार मार्फत भरण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन प्रधानमंत्री पिकविम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. यासाठी 3 हजार 312 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमित पीककर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यांत आला आहे. आतापर्यंत 12 लक्ष 84 हजार पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4 हजार 683 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा मध्यवर्ती बँकांकडूनच होते व राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती बँकापैकी 21 बँका नफ्यामध्ये व 10 बँका तोट्यामध्ये आहेत. तोट्यामध्ये असणाऱ्या 10 बँकापैकी वर्धा जिल्हा बँक वगळता इतर सर्व मध्यवर्ती बँकानी त्यांना दिलेले खरीप 2022 च्या हंगामातील पीक कर्जाचे उद्दिष्ट साध्य केलेले आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पतपुरवठा या विषयावर विधानसभेत सदस्य सर्वश्री संजय कुटे, नाना पटोले, सुनील प्रभू, अनिल देशमुख, राम सातपुते, लहू कानडे, संजय गायकवाड, दिलीप मोहिते पाटील, समीर कुमावत, डॉ. विश्वजीत कदम, भास्कर जाधव आदींनी सहभाग घेतला होता.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

उद्योग गुंतवणुकीच्या विदर्भातील संधी

जी-२० परिषदेंतर्गत नागपूर येथे नागरीसंस्थाची सी-20 परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेला विविध देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. परिषदेच्या निमित्ताने नागरी समुहाच्या उत्थासाठी विविध विषयांसह औद्योगीक गुंतवणूक व विकासाच्या संधीवर देखील विचारमंथन होणार आहे. नागपुरात होणारी ही परिषद विदर्भाच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे. येथील कृषी, मत्सव्यवसाय, खनिज संपत्ती, वस्रोद्योग, वनसंपदा व पर्यटनआदी क्षेत्रात उद्योगाच्यादृष्टीने महत्वाच्या बलस्थानांचा मागोवा घेणारा लेख.

पूर्व व पश्चिम अशा दोन भौगोलिक भागात विस्तारलेल्या विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कृषी हा कणा आहे. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत येथे सरासरी पर्जन्यमान समाधानकारक आहे. पश्चिम विदर्भात कापूस, तूर, सोयाबीन आदि पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात तसेच फळपिकांचे क्षेत्रही वाढत आहे. त्यामुळे कापसावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगांना आणि फळप्रक्रीया उद्योगांना येथे मोठ्या संधी आहेत. पूर्व विदर्भात भाताचे मोठे उत्पादन होत असल्याने भातावर आधारित कृषी उद्योगाला येथे चालना मिळत आहे. सोयाबिनचे प्रक्रीया उद्योगालाही येथे मोठा वाव आहे. तब्बल २ लाख ५० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पामुळे तसेच इतर सिंचन प्रकल्पामुळे या भागातील कृषी क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विदर्भात वैविध्यपूर्ण फळे, भाजीपाला, पशुखाद्य व दुग्धव्यवसायाची क्षमता चांगली आहे. एकंदरित कडधान्य, दुग्धशाळा, बीजप्रक्रीया, सोयाबीन प्रक्रिया, तांदुळ, वनउपज, रेशीम उत्पादन, सोयाबीन व कापूसावरील  प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

पूर्व विदर्भात वैनगंगा, वर्धा, कन्हान, पेंच, आदि मोठ्या नद्या तसेच ‘माजी मालगुजारी तलाव’ मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जलसाठ्यांचा वापर मत्स्यव्यवसायासाठी उपयुक्त ठरत आहे. भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात झिंगे उत्पादन होत आहे. दळणवळणाच्या सोयी उपलब्ध असल्यामुळे देशाच्या सर्वच भागात मत्स्यउत्पादन पाठवणे सुलभ होत आहे. हा व्यवसाय विदर्भातील व्यावसायिकांसाठी व मत्स्यउत्पादकांसाठी संधी ठरत आहे.

खनिज संपत्ती

महाराष्ट्राच्या एकूण खनिजधारण क्षेत्रात नागपूर विभागात ६० टक्के तर अमरावती विभागात १० टक्के असा एकूण ७० टक्के वाटा आहे. विदर्भाचा समावेश असणाऱ्या मध्य भारताचा खनिज पट्टा भारतातील दुसरा मोठा खनिज पट्टा आहे. या भागात मॅंगनीज, बॉक्साईट, युरेनियम, चुनखडी, संगमरवर, कोळसा, हिरे, अभ्रक आणि ग्राफाईट इत्यादी खनिजे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. पर्यावरणाचा योग्य मेळ घालून या खनिज संपत्तीचा वापर उद्योगांसाठी करता येऊ शकतो.

वस्रोद्योग

विदर्भात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून प्रक्रिया उद्योगासाठी शासनाने प्रोत्साहन दिले आहे. अमरावती येथे स्वतंत्र टेक्स्टाईल पार्क सुरू झाला असून येथे रेमंडसह इतर उद्योगांचे उत्पादने सुरू झाली आहेत. नागपूर, यवतमाळ, अकोला आदि जिल्ह्यांतही कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना मिळत आहे. वस्त्रनिर्मिती उद्योगाच्या संधी वाढत असल्यामुळे उद्योजकही आकर्षित होत आहेत. नागपूर येथे इंडोरामाचा मोठा प्रकल्प सुरू असून यावर आधारित छोट्या उद्योगांनाही प्रोत्साहन मिळत आहे.

वस्र निर्मिैतीसाठी आवश्यक लांब धाग्याच्या कापसाचा सर्वात मोठा उत्पादक प्रदेश विदर्भ आहे. विदर्भातील यवतमाळच्या कळंब तालुक्यात गृत्समद ऋषींनी कापसाचा शोध लावल्याचे सांगितले जाते. येथील कापसाची उत्पादकता पाहून 1877 मध्ये जमशेदजी टाटा यांनी भारतातील पहिली कापड गिरणी ‘सेंट्रल इंडिया स्पिनींग अॅण्ड विविंग कंपनी लिमिटेड’ या नावाने नागपूर येथे सुरू केली होती. याचवेळी राणी व्हिक्टोरिया यांना भारताची एम्रेस अर्थात सम्राज्ञी घोषित करण्यात आले, त्यामुळे ही कापड गिरणी ‘एम्प्रेस मिल’ या नावानेही ओळखली जाते. ‘वऱ्हाड अन् सोन्याची कऱ्हाड’ म्हणून ख्याती असलेल्या या भागातील कापसाचे उत्पादन व उपयोगिता पाहता इंग्रजांनी 1903 मध्ये विदर्भात रेल्वे मार्ग (शकुंतला रेल्वे) जोडून येथील कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरपर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली होती.राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे मुख्यालय नागपूरात आहे. या भागात कापूस ते कापड ही संकल्पना साकार होत असून याअंतर्गत विणकाम, रंगकाम, तयार कपडे आदीं उद्योग उभारणीलाही मोठा संधी आहे.

पर्यटन उद्योगाच्या संधी

नागपूरच्या जवळ २५० किलोमीटच्या परिसरात विदर्भ व मध्यप्रदेशात मिळून एकूण ८ व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामुळे नागपूला ‘टायगर कॅपिटल’ ही ओळख मिळाली आहे. वनपर्यटनाच्या बाबतीत जागतिक नकाशावर ताडोबा ने जागा पटकावली आहे. मागील काही वर्षात विदर्भातील जंगलात वाघांचे विशेष संवर्धन करण्यात आल्याने वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हमखास व्याघ्र दर्शनासाठी विदर्भाकडे पाहिल्या जाते. देश-विदेशातील पर्यटकांची येथे नियमित रेलचेल असते. यासोबतच विदर्भातिल गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे, पुरातन वास्तू व धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे येथे देखील हौशी पर्यटक व भाविकांचा ओघ असतो. येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्थीत सोय व आदरातिथ्य आधारित उद्योगांना देखील येथे मोठ्या संधी आहेत.

विदर्भात ग्रामीण, शहरे व राज्यांना जोडणारे चांगल्या रस्त्यांचे आणि रेल्वे मार्गांचे संपर्क जाळे आहे. यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानप्रवास व मालवाहतूकीची सुविधा उपलब्ध आहे. उद्योगांना चालना देणारी संपर्क यंत्रणा, रस्ते, वीज, कुशल मनुष्यबळ इ. पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहे. विदर्भ हा भारताच्या मध्य भागात येत असल्याने कोणत्याही दिशेने आपले उत्पादन व सेवा पोहचविण्यासाठी कमी वेळ आणि कमी खर्च लागतो. विदर्भाचे भौगोलिक स्थान व उपलब्ध पायाभूत सुविधा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उपयुक्त असल्याने विदर्भात उपरोक्त क्षेत्रात उद्योग गुंतवणूकीसाठी मोठ्या संधी आहेत.

– गजानन जाधव,

माहिती अधिकारी,

माहिती व जनसंपर्क, नागपूर.

स्तन कर्करोगाचे जागवू भान, योग्य उपचार व वेळेत निदान

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील वर्षभर दर बुधवारी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या शिबिरामुळे स्तन कर्करोगाचे शीघ्र निदान करता येईल. तसेच रोग निदान झालेल्या रूग्णांना तात्काळ पुढील सर्वसमावेशक उपचार तातडीने देता येतील व यातून होणाऱ्या जीवितहानीस प्रतिबंध करता येईल. या शिबिराच्या निमित्ताने स्तन कर्करोग व या मोहिमेचा आढावा घेणारा विशेष लेख.

स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. मात्र, स्तनाच्या कर्करोगाचा धोका केवळ महिलांमध्येच नाही तर काही प्रमाणात पुरुषांमध्येही असतो. स्तनाचा कर्करोग हा शरीराच्या इतर भागात झपाट्याने पसरतो, म्हणुन याचे निदान व उपचार लवकरात लवकर करणे गरजेचे आहे.

आकडेवारी – ग्लोबोकॉनच्या २०२० चा आकडेवारीनुसार, स्तनाच्या कर्करोगाचे जागतिक स्तरावर २२,६१,४१९ नवीन रुग्ण आढळले व ६,८४,९९६ रुग्णांचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यु झाला. तसेच भारतात महिलांमध्ये निदान झालेल्या एकुण ६,७८,३८३ कर्करोगाच्या रुग्णांपैकी १,७८,३६१ (२६.३%) रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे होते. तसेच २०२० मध्ये भारतात, महिलांमध्ये कर्करोगाच्या ४,१३,३८१ मृतांपैकी ९०,४०८ (२१.९%) मृत्यु हे स्तनाच्या कर्करोगाचे होते. स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास रुग्णास कमी हानी होते असे दिसुन येते. त्या करिता खालील प्रमाणे काही त्रास असल्यास, तज्ज्ञ डॉक्टरांकडुन योग्य ती तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे – स्तनाच्या कोणत्याही भागात गाठ तयार होणे, अथवा वेदना होणे, स्तनावर सुज येणे, जळजळणे अथवा डाग पडणे, स्तनग्रातुन रक्त येणे, लालसर होणे, वेदना होणे आत खेचले जाणे, स्तनांच्या आकारात बदल दिसणे. या सर्व लक्षणांवर, लक्ष देण्याकरिता सर्व महिलांनी स्वतःची स्तन तपासणी करणे गरजेचे आहे व योग्य वेळी डॉक्टरांकडुन स्तन तपासणी व गरज पडल्यास मॅमोग्राफी केल्यास स्तनाचा कर्करोग लवकरात लवकर निदान होण्यास मदत होते.

स्तन कर्करोग : जनजागृती व उपचार अभियान – दिनांक ०८ मार्च २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीष महाजन यांच्याहस्ते, कामा व आल्बेस हॉस्पिटल मुंबई येथे स्तनाच्या कर्करोगाची जन जागृती व उपचार मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत बाह्यरूग्ण विभाग सेवा प्रत्येक आठवड्यात एके दिवशी (दर बुधवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत) महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची तपासणी साठी बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आले आहेत. या सुविधा देण्यासाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागाकडे नोडल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चिकित्सालयीन व सामाजिक स्तरावरील सुविधा देण्यात येतील.

रेडिओथेरपी, स्त्री रोग विभाग, विकृतीशास्त्र विभाग, क्ष किरण विभाग जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग, नर्सिंग, भौतिकोपचार विभाग, समाजसेवा विभाग व इतर विभागाच्या संलग्न हा बाह्यरुग्ण विभाग चालवण्यात यईल. स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेमध्ये निदान होण्यासाठी मॅमोग्राफी व इतर अद्ययावत उपकरणांचा उपयोग केला जाणार आहे. या बाह्य रुग्ण विभागात कार्यरत शल्यचिकित्सकाचे कौशल्य विकसित होण्यासाठी यांना आवश्यक प्रशिक्षण टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे देण्यात येईल तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबाद येथे ही प्रशिक्षण देण्यात येईल. रुग्णांना आवश्यक असल्यास केमोथेरपी व रेडीओथेरपी देण्यात येईल. रुग्णांसाठी समुपदेशन व पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात येईल.

सोलापूरमध्ये या शिबिराचे उद्‌घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. उपअधिष्ठाता डॉ. आर. डी. जयकर हे या मोहिमेचे मुख्य नोडल अधिकारी आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर येथील बाह्यरूग्ण विभागातील ओपीडी नं 27 येथे दर बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्तन रोग निदान व उपचार शिबिर पुढील वर्षभर घेण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्या बुधवारी दि. 8 मार्च रोजी 80 महिलांची तपासणी करण्यात आली. सोलापूर शहरातील रेल्वे विभाग, बँकिंग, शैक्षणिक व अन्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

000

अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन

अकोला दि.१४(जिमाका) – प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि.१४ ते शनिवार दि. १८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

या कालावधीत विजांचा कडकडाट,अतिवृष्टी तसेच दि.१६ ते १८ दरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षीत ठिकाणी साठवावा.  बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षीत ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही;याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केल्या आहेत. यासुचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

शाहू, फुले, आंबेडकर आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १४ : शाहू , फुले, आंबेडकर आश्रमशाळांना अनुदान देण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. या आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य नीलेश लंके यांनी राज्यातील १६५ केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला- मुलींसाठीच्या निवासी आणि अनिवासी प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी सहाय्यक अनुदाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातून केंद्रीय अनुदानासाठी ३२२ आश्रमशाळांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ३४ आश्रमशाळांना केंद्र शासनाने मानधन स्वरूपात अनुदान मंजूर केले आहे. २८८ आश्रमशाळांना केंद्र शासनाने अनुदान मंजूर न केल्यामुळे या आश्रम शाळांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर शाहू, फुले, आंबेडकर निवासी/अनिवासी शाळा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत १६५ आश्रम शाळांना तपासणीच्या अधीन राहून सन २०१९-२० या वर्षापासून २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे -पाटील यांनी सहभाग घेतला होता.

0000

शैलजा पाटील/विसंअ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची १५ व १६ मार्च रोजी मुलाखत

मुंबई,दि.14: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 15 व गुरुवार दि.16 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब तसेच महिलांचे बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आणि महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता गटांच्या व सर्व रोजगारीच्या उत्पादनांची प्रसिद्धी व विक्री मोठ्या प्रमाणावर व्हावी, यासाठी 8 ते 19 मार्च 2023 या कालावधीत महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे स्वरूप, बचत गटांना यामध्ये सहभाग घेण्याची प्रक्रिया तसेच या प्रदर्शनाचे नियोजन कशाप्रकारे करण्यात येते याबाबतची सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

जयश्री कोल्हे/स.सं

विधानसभा प्रश्नोत्तरे

ठाणे महापालिकेने केलेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया नियमानुसार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई दि. 14:- ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरांतर्गत विविध विकास कामांची निविदा काढली. या अंतर्गत होणाऱ्या विकास कामांची गुणवत्ता तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आली असून शहरातील विकास कामांची निविदा प्रक्रिया ही नियमानुसारच करण्यात आली असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य कालिदास कोळंबकर यांनी ठाणे शहरातील विकास कामे आणि सुशोभिकरणाच्या कामांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, ठाणे महापालिकेने ठाणे शहरांतर्गत सुरू करण्यात आलेली विकास कामे निविदेतील विहित अटी व शर्तीनुसार योग्य गुणवत्ता राखून पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात येईल. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीतील मुद्यांची शहानिशा करण्याबाबत आयुक्त ठाणे महापालिका यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार व सदस्य सर्वश्री संजय केळकर, रवींद्र वायकर यांनी सहभाग घेतला.

००००

ठाणे येथील फ्लेमिंगो पार्कच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. 14 : ठाणे येथील ‘फ्लेमिंगो पार्क’च्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडा समितीमध्ये निरी संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश करुन हा आराखडा लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.

सदस्य आशिष शेलार यांनी ठाणे येथील खाडीला रामसर दर्जा प्राप्त झालेला असताना खाडीतील प्रदूषणात वाढ होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, ठाणे खाडीतील प्रदूषण प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ठाणे येथील खाडीत सोडण्यात येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे खाडीतील माशांच्या पुनरुत्पादनावर परिणाम झाल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. ठाणे खाडीतील प्रदूषणाबाबत मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक बोलावून याबाबत चर्चा, उपाययोजना करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

शाहूफुलेआंबेडकर निवासी शाळेच्या शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १४ : शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जातीच्या मुलामुलींच्या निवासी शाळांना अनुदान देण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. या शाळेतील शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य नीलेश लंके यांनी राज्यातील १६५ केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला- मुलींसाठीच्या निवासी आणि अनिवासी प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी सहाय्यक अनुदाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातून केंद्रीय अनुदानासाठी ३२२ आश्रमशाळांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ३४ आश्रमशाळांना केंद्र शासनाने मानधन स्वरूपात अनुदान मंजूर केले आहे. २८८ आश्रम शाळांना केंद्र शासनाने अनुदान मंजूर न केल्यामुळे या आश्रम शाळांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर शाहू, फुले, आंबेडकर निवासी/अनिवासी शाळा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत १६५ आश्रम शाळांना तपासणीच्या अधीन राहून सन २०१९-२० या वर्षापासून २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे -पाटील यांनी सहभाग घेतला होता.

0000

शैलजा पाटील/विसंअ

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन

प्रयत्नशील – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरी महाजन

मुंबई, दि. १४ :  दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी राज्यात नव्याने १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये
उभारण्यात येत असून, त्यासंदर्भातील कामे गतीने सुरू आहेत. तसेच निवासी डॉक्टरांची सोय व्हावी यासाठी वसतिगृह बांधणे आणि जुन्या वसतिगृहांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी १४६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या 10 हजार खोल्या अपुऱ्या पडत असून, पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नव्याने खोल्या बांधण्यात येणार आहे. मोडकळीस आलेले जे वैद्यकीय वसतीगृह महानगरपालिकेच्या अखत्यारित असतील अशा वसतीगृहांबाबत संबंधित संस्थाना निर्देश देण्यात येतील. तसेच राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढणार असल्याने, वसतीगृहांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. यासंबंधीत कामे गतीने पूर्ण करण्यास शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री  श्री.महाजन यांनी सांगितले.

अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. याचबरोबर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वेतनही वाढविण्यात येणार असल्याची माहिती श्री.महाजन यांनी यावेळी दिली.

०००

श्रद्धा मेश्राम,स.सं

अकोला जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच

भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

अकोला जिल्हा रुग्णालयातील गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात मनुष्यबळ कमी पडणार नाही, अशी दक्षता शासन घेणार असल्याची माहिती,  वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

अकोला शासकीय रुग्णालयात मंजूर ४७६ खाटा आहेत. प्रत्यक्षात सद्यस्थितीत दुप्पट क्षमतेने हे रुग्णालय कार्यरत असून, येथील रुग्णांना याची मदत होत आहे. या रूग्णालयात गट ‘अ’ व ‘ब’ वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर गट ‘क’ वर्गातील ९० पदे टीसीएसमार्फत आणि बाह्यस्त्रोताद्वारे ५ हजार ५६ पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात मनुष्यबळ कमी पडणार नाही यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती, मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी दिली.

०००

श्रद्धा मेश्राम,स.सं

गंगापूर तालुक्यातील वैयक्तिक स्वच्छतागृह अनुदान वाटप

अनियमितता प्रकरणी चौकशी – मंत्री गुलाबराव पाटील

 

गंगापूर तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाच्या टप्पा – २ अंतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामात अनियमितता झाल्याचे दिसून येत असून, याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मात्र, या प्रकरणात  अनुदान संबंधितांना प्रदान करण्यात आले असल्याने अपहार झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेत सदस्य सतिश चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत पंचायत समिती गंगापूर मधील १३४६ लाभार्थ्यींनी वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ११४९ अर्जदारांनी वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्याच्या नोंदीही घेण्यात आल्या असून आज अखेर ९५० लाभार्थ्यींच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

या अनुदान वाटपासंबंधी विविध बाबींची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ५ सदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने प्रोत्साहन अनुदानाचा अपहार अथवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल दिला असल्याची माहितीही मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

000

दीपक चव्हाण/वि.सं.अ

 

जल जीवन मिशनच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या

कंत्राटदारावर कारवाई करणार – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दिनांक 14: जल जीवन मिशन योजनेची रायगड जिल्ह्यात विविध कामे सुरू आहेत. या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या आणि मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत 1430 योजना मंजूर आहेत. एकूण 1259 कोटी रुपयांची ही कामे आहेत. नुकतेच यातील बहुतांशी कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तसेच कामांची संख्या जास्त आणि कंत्राटदार संख्या कमी अशी स्थिती असल्याने एकच कंत्राटदाराला अनेक कामे दिल्याचे रायगडसह इतर जिल्ह्यांतही दिसते. मात्र कार्यारंभ आदेश असूनही कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/वि.सं.अ

 

 

विधानसभा लक्षवेधी

आदिवासींना जमिनींचा मोबदला देताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी कॅम्प घेऊन वितरण – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. १४ : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, वसई, पालघर व वाडा या पाच तालुक्यातील ७१ गावांमधून जात असून यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या ७१ गावांमध्ये आदिवासींच्या जमिनी असून त्यांना मोबदला देताना आदिवासींची होत असलेली फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी शासकीय स्तरावर कॅम्प घेण्यात येऊन मोबदला आणि इतर कागदपत्रे त्यांना वितरित करण्यात येतील, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य विनोद निकोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

महसूल मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, आदिवासी बांधवांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह एक बैठक बोलविण्यात येऊन आदिवासी बांधवांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. नियमांचे उल्लंघन झाले असेल तर चौकशी करण्यासाठी आवश्यकता असल्यास एस आय टी मार्फत चौकशी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

या चर्चेत विधानसभा सदस्य नाना पटोले, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

 

बाधित होणाऱ्या मच्छिमार व्यावसायिकांना नुकसान भरपाई देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १४ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शिवडी ते न्हावाशेवा या २२ कि.मी. लांबीचा मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेतला आहे. सदर मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या समुद्रातील सुमारे १६ कि.मी. लांबीच्या बांधकामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूकडील अंदाजे ७५० मी. अंतरापर्यंतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे जायका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रकल्प अभ्यासातून निदर्शनास आले. त्यानुषंगाने बाधित होणाऱ्या मच्छिमार व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण ठरविण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य महेश बालदी यांनी लक्षवेधी मांडली होती.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, पात्र अर्जांपैकी 6525 पात्र लाभार्थींना नुकसान भरपाई देण्याकरता एमएमआरडीएद्वारे 190.60 कोटी इतकी रक्कम पात्र लाभार्थींना 60:20:20 या प्रमाणात वितरित करावयाची आहे त्यानुसार 4116 लाभार्थींना शंभर टक्के तर १७५७ लाभार्थींना पहिल्या टप्प्यात ६० % अशा एकूण 5873 लाभार्थींना बँक खात्यात डीबीटी द्वारे 172.41 कोटी इतकी रक्कम वितरित केली असून उर्वरित रक्कम वितरित करावयाची कार्यवाही चालू असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.

एम एम आर डी ए व सिडको यांच्या ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज बांधकामामुळे प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांमध्ये विकास कामे हाती घेण्याबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत गव्हाण व न्हावा गावातील ग्रामस्थांना जिल्हा परिषदेमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सुविधा व्यतिरिक्त ग्रामपंचायतीला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी पाच कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तो सात कोटी देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री सामंत यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य अस्लम शेख,अजय चौधरी, प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

00000

राजू धोत्रे/विसंअ

वर्षभरात एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणार उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि 14 : औद्योगिक वसाहतीत आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी कार्यरत असते. तेथे अग्निशमन यंत्रणा सक्षम करीत असताना येत्या वर्षभरात एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभारले जातील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये सोलापूर औद्योगिक वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच औद्योगिक वसाहतीजवळ अग्निशमन केंद्र उभारले जाण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी उत्तर दिले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, राज्यातील औद्योगिक वसाहतीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. आगीसंदर्भात घटना घडल्यास तत्काळ परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी उद्योग विभाग पुढाकार घेईल. अग्निशमन केंद्र नेमके कोठे उभारायचे याबाबत एमआयडीसी आणि संबंधित महानगरपालिकेमार्फत ठरविण्यात येईल. याबाबत ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सोलापूर दौऱ्यादरम्यान सोलापूर येथील औद्योगिक संघटनांनी कायमस्वरुपी अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे. या केंद्रासाठी अंदाजे ४००० चौ. मी. जागा लागणार असून सदर जागा एमआयडीसी क्षेत्रात मुख्य रस्त्यालगत मिळावी असा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२३ रेाजी एमआयडीसी मुख्यालयात आला असून याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

सोलापूर महानगरपालिकेची सन १९९२ मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर तेथील अक्कलकोट रोड औद्योगिक क्षेत्र पायाभूत सुविधा आणि देखभाल दुरुस्तीसाठी सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाले आहे. या एमआयडीसीकरिता पायाभूत सुविधा सोलापूर महानगरपालिकेकडून देण्यात येत आहेत. सोलापूर एमआयडीसी क्षेत्रात नोव्हेंबर २०२२ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये ४ कारखान्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येत्या काळात सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडून पाण्याच्या टाकीजवळ तात्पुरते पत्राशेड करुन एक अग्निबंब आणि एक फोम टेंडर अग्निबंब असे दोन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

याशिवाय असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून असंघटित कामगार मंडळामार्फत कामगारांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

0000

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांचा विस्थापन व घरभाडे भत्ता २० ऐवजी २५ हजार करण्यात येणार – उद्योग मंत्री उदय सामंत

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना राहण्याच्या व्यवस्थेकरिता १४ हजार रुपये इतका विस्थापन भत्ता अधिक सहा ते सात हजार इतका घरभाडे भत्ता अशी एकूण २० हजार रुपये प्रत्येक महिन्याला सध्या अतिरिक्त रक्कम देण्यात येत आहे. या रकमेत वाढ करून २५ हजार रुपये करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.सामंत म्हणाले,बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुमारे २७,९०० सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे ५५९२ सफाई कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत. सदर सेवानिवासस्थाने बरीच जुनी असल्यामुळे तसेच इतर सफाई कामगारांना देखील सेवानिवास्थाने प्राप्त होण्याकरिता, सद्य:स्थितीत सेवानिवासस्थाने असलेल्या वसाहतींचा महानगरपालिकेच्या निधीतून “आश्रय” योजनेंतर्गत पुनर्विकास करुन सफाई कामगारांसाठी सेवासदनिका बांधण्याचे महानगरपालिकेचे धोरण आहे. सद्य:स्थितीत सफाई कामगारांची सेवानिवासस्थाने असलेल्या ३० वसाहतींचा ४.०० चटई क्षेत्र निर्देशांक वापरून आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. याअंतर्गत अंदाजे १२ हजार सेवा सदनिका उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू असल्यामुळे एखादा कर्मचारी सेवानिवृत्त / स्वेच्छानिवृत्त / मृत / सेवेसाठी असमर्थ ठरल्यास त्यांच्या पात्र वारसाला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी दिली जाते. तसेच माजी कर्मचाऱ्याच्या नावावर असणारे सेवा निवासस्थान हस्तांतरीत करण्यात येते. अशा रितीने सफाई कामगारांचे सेवा निवासस्थान साखळी पध्दतीने पिढी दरपिढी हस्तांतरीत केले जात असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य संजय केळकर,अमित साटम, कालीदास कोळंबकर, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, सदा सरवणकर  आणि तमिल सेल्वन यांनी सहभाग घेतला.

००००

राजू धोत्रे/विसंअ

परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार –  दादाजी भुसे

मुंबई, दि. 14 : पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर आज बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सिद्धार्थ शिरोळे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये  पुणे शिवाजीनगर येथील कामांसंदर्भात तसेच वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. याला आज मंत्री श्री. भुसे यांनी उत्तर दिले.

श्री. भुसे म्हणाले की, शिवाजीनगर येथील एसटीचे बसस्थानक मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे मुंबई रस्त्यालगत वाकडेवाडी येथील शासकीय दुग्ध योजनेच्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. शिवाजीनगर बसस्थानकाची जागा मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत महामेट्रोला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली असून यासाठी महामंडळ आणि महामेट्रो यामध्ये करार झाला आहे. येथील स्थानिक रहिवाशांसाठी वाकडेवाडी येथून डिसेंबर 2019 पासून बसस्थानक आणि आगार सुरळीत चालू असून जुन्या पुणे मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या बसेस सुरु आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी ‘जुने शिवाजीनगर’ बसस्थानकाच्या जागी नवीन बसस्थानक तयार करण्यासाठी एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात 3 फेब्रुवारी 2023 रोजी बैठक झाली असून आता पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार असल्याचे, मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/वि.सं.अ

 

श्रीष्टी येथील पुलाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करणार  मंत्री शंभुराज देसाई

शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गावरील जालना जिल्ह्यातील श्रीष्टी येथील पुलाचे काम येत्या आठ दिवसात सुरुवात करुन तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर हा पूल वापरासाठी उपलब्ध करण्यात येईल असे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य बबनराव लोणीकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, श्रीष्टी पुलाच्या कामात दिरंगाई झाली असल्यास ती कशामुळे झाली याची एका महिन्याच्या आत चौकशी करण्यात येईल. याबाबत कोणी दोषीं आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

सावंगीगंगा किनारा येथील भूसंपादनाचा निवाडा मंजुरीकरिता केंद्रीय सडक परिवहन मंत्रालय यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. परतुर ते माजलगाव पॅकेज मध्ये अंदाजपत्रकात भूसंपादनासाठी अंदाजे 3.75 कोटी रुपये इतकी रक्कम गृहीत धरण्यात आली होती. मात्र यात प्रत्यक्षात वाढ होऊन 6.34 कोटी रुपये  इतकी लागत असल्याने सदर भूसंपादन निवाडे मंजुरी करता केंद्रीय सडक परिवहन मंत्रालय दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात आले असून याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य हरिभाऊ बागडे यांनी सहभाग घेतला.

0000000

राजू धोत्रे/विसंअ

 

मद्य विक्रीची अनुज्ञप्ती विहीत कार्यपद्धती अनुसरुन बंद करण्यात येणार  मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. १४ : एखाद्या वॉर्डमध्ये स्थानिकांना दारुबंदी करावयाची असल्यास नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रातील एखाद्या वॉर्डातील २५% पेक्षा अधिक महिला मतदार किंवा एकूण मतदार यांनी लेखी निवेदन देऊन संबंधित वॉर्डातील मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याची मागणी केल्यास, अशा अर्जाची पडताळणी करण्यात येईल. यानंतर विहीत कार्यपद्धती अनुसरुन गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. संबंधित वॉर्डातील एकूण मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या किमान ५० % पेक्षा अधिक अनुक्रमे एकूण मतदार किंवा महिला मतदार यांनी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याच्या बाजूने मतदान केल्यास त्या क्षेत्रात मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.देसाई म्हणाले, महानगरपालिकेच्या ठरावाद्वारे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद करण्याची तरतूद सदर आदेश व अधिसुचनेमध्ये नाही. तसेच, परवाना कक्ष अनुज्ञप्ती मंजूर करतेवेळी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील ना-हरकत घेण्याची तरतूद प्रचलित नियमात नसल्याने पूर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायतीमध्ये हद्दीमध्ये दारुबंदी नियमानुसार करण्यात येणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ

शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना सूचना सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई दि 14 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना देण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य दिलीप मोहिते पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, डॉ.देवराव होळी, वैभव नाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आणि प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतची सद्यस्थिती याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

श्री.सावे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या 12 लाख 84 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 4683.2 कोटी रुपये 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने थेट वितरित करण्यात आले आहेत. तर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु असून 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी 1,014 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे. तसेच ही कार्यवाही 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त स्तरावरुन सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 32 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 20,425.12 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

०००

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जिल्ह्यात राबविण्यासंदर्भात प्रस्ताव मागविण्यात येणार सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 14 : ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुभाष धोटे, देवराव होळी, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

श्री. सावे म्हणाले की, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पन्नस्त्रोत वाढून त्यांना स्थिरता मिळावी, त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात येता यावे यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, कोरपना, राजुरा, चंद्रपूर, वरोरा आणि गोंडपिंपरी या तालुक्यातील 7 हजार 258 वैयक्तिक घरकुल लाभार्थींचा प्रस्ताव शासनास सादर झाल्यानंतर 8 फेब्रुवारी 2023 अखेर एकूण 2 हजार 803 वैयक्तिक घरकुल लाभार्थींच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता देण्यात असून यासाठी 34 कोटी 98 लाख 14 हजार 400 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सध्या यासाठी दोन कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 5 हजार 219 वैयक्तिक घरकुल लाभार्थींच्या प्रस्तावास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

०००

वर्षा आंधळे/वि.सं.अ

 

ताज्या बातम्या

जखमी शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्या – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक,दि.१५:अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडून जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक...

शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेऊन जबाबदारी पार पाडावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. १५: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २६ जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून ३० जून रोजी पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात...

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त

0
मुंबई, दि.१५: पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ जणांचा...

कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीने मदत व बचावकार्याला सुरुवात दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार मुंबई, दि. १५ : मावळ तालुक्यातील...

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट

0
मुंबई, दि. १५:   भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट,...