रविवार, जून 15, 2025
Home Blog Page 1449

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे

मुंबई, दि. १३ : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही- वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने आज १३ मार्च २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे, असेही सचिव श्री. भांगे यांनी म्हटले आहे.

०००

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान – चंद्रकांत पाटील

नागपूर,दि. 13 : देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जे नेतृत्च लागते ते तयार करण्याची जबाबदारी राष्टीय सेवा योजनेमार्फत करण्यात येते. या योजनेच्या स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यासाठी स्वयंसेवकात आत्मविश्वास निर्माण करुन नेतृत्च गुणांचा विकास  गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या वतीने नागपूर विद्यापीठातील सभागृहात पाच दिवसीय राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले.

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दूधे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सोपानदेव पिसे, राज्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्राँड ॲम्बेसिडर नेहा पाठक तर दूरदृष्यप्राणालीद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी रामेश्वर कोठावळे यावेळी उपस्थित होते.

नेतृत्च गुणविकास याविषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. सुभाष चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी काय करावे, याबाबत संपूर्ण माहिती राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतच आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महात्मा गांधीच्या विचारानूसार ग्रामोद्योगावर भर देवून गाम विकास करा हा संदेश ग्रामीण भागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी देवून त्याचा प्रसार व प्रचार करण्याची नितांन गरजे आहे. मुल्य कमी करण्यासाठी गावातच वस्तु तयार झाल्यास त्याचा फायदा देशास होईल. त्यामुळे देशाचे दरडोई उत्पन्न वाढून देशाच्या प्रगतीस हातभार लागेल. नागपूर विद्यापीठाद्वारे ग्राम अभियान सुरु करण्यात आले असून त्याद्वारे  वनाकडे, गावाकडे वळा, गावाचा सर्वांगिण विकास करा, हा विचार समाजापर्यंत स्वयंसेवकांद्वारे पोहचविला जाणार आहे. या स्वयंसेवकाची नोंद त्यांच्या गुणपत्रिकेत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरामुळे स्वच्छता, व्यक्तीमत्व विकास, नेतृत्व विकास, व्यवहारीक शिक्षण, जी-20 चे नेतृत्व, जगाचे नेतृत्व, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक बांधीलकीची शिकवण स्वयंसेवकांना मिळणार असल्याचे रामेश्वर कोठावळे यांनी सांगितले.  वसुधैव कुटुंबकम शाश्वत विकासासाठी तारक आहे. सेंद्रीय शेतीकडे वळा, ग्राम विकास व पर्यावरण शुध्दीकरणावर भर देण्यासाठी स्वयंसेवकांनी कार्य करावे असे आवाहन प्र-कुलगुरु संजय दुधे यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनोद खेडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकाश शुक्ला यांनी मानले. या कार्यक्रमास राज्यातील विविध महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.

विधानसभा लक्षवेधी

वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३ :वीज निर्मितीकरिता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत. वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला, तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.            याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज वितरण परवानाधारक कंपनीस  आपल्या कंपनीच्या कार्यक्षेत्रातील ठराविक भागांचा वीज वितरण कारभार सांभाळण्यासाठी फ्रेंन्चाइझी नियुक्ती करण्याची तरतूद आहे. ज्या विभागांत वीज गळतीचे प्रमाण जास्त आहे, वीज बिल वसुलीचे प्रमाण कमी आहे तसेच वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशा व इतर सर्वसमावेशक बाबींचा विचार करुन असे विभाग फ्रेंन्चाइझी तत्वावर खाजगी कंपनीस ठराविक कालावधीकरिता देण्याचा धोरणात्मक निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या भिवंडी मंडळांतर्गतची विद्युत वितरण व देखभाल व्यवस्था मे. टोरंट पॉवर कंपनी लिमिटेडला वितरण फ्रेंन्चाइझी म्हणून हस्तांतरित करण्यात आलेली आहे.

वीज मीटर रीडिंग घेणारे कंत्राटदार कर्मचारी यांना ड्रेस कोड ,ओळखपत्र देण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात येतील.कंत्राटदार कर्मचारी जबरदस्ती करीत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच रमजान सणाला लोडशेडिंग करण्यात येऊ नये अशा सूचनाही देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य अबू आझमी,मुक्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिफ,अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

000000

राजू धोत्रे/विंसअ

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण होईल

– सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १३ : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्याने कामाला विलंब होत होता. परंतु हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच शासनाची भूमिका आहे. येत्या ९ महिन्यांत या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य आदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, महामार्गाचे पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर हे सुमारे ८४ किमीचे रखडलेले काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. भूसंपादन, विविध खात्याची परवानगी मिळवणे, परवानग्या घेऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणे यासाठी बराच कालावधी उलटून गेला आहे. या कामासाठी वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील अडचणी प्रत्यक्षात समजून घेऊन जलद गतीने काम करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अमित साटम, सुनील प्रभू, वैभव नाईक यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३ : राज्यात सायबर सुरक्षा अतिशय महत्त्वाची असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, धुळे शहरात मोबाईल वरून शहरातील मुलींचे छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.

छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढण्याविषयी तसेच इतर विविध गुन्ह्यांविषयी सायबर कायदे जुने असून माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्याची सूचना केंद्राला पाठविण्यात येणार आहे.राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य रईस शेख, प्रा.वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.

000

राजू धोत्रे/विसंअ

राज्यासाठी लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू

धोरण – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरता लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे तडवळ येथे अवैध पद्धतीने स्टोन क्रशर सुरु असून या माध्यमातून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यासंदर्भात सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशाला आळा घालण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत असतात. परंतु, असे असतानाही राज्यात नियमबाह्य उत्खनन होत असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल, असे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करुन स्टोन क्रशर चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ

 

राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरिता जन-सुविधा केंद्राची

उभारणी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रमांतर्गत राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता जन-सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या जनसुविधा केंद्रात पुरुष-महिला स्वच्छतागृह, शिशू काळजी केंद्र, अल्पोपहार केंद्र इत्यादी सोयीसुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य संग्राम थोपटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील ३८७ स्मारकांच्या ठिकाणी क्यूआर कोडसह त्या-त्या स्मारकाची पूर्ण माहिती असणारे फलक लावण्यात येणार आहेत. जेणेकरून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना त्या स्मारकाची माहिती मिळेल. गड किल्ल्याचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पावित्र्य भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर स्मारकांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांची माहिती सांगणाऱ्यांना बक्षीस देखील देण्यात येणार आहे.

केंद्र संरक्षित शिवनेरी, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांसाठी सर्वंकष स्थळ विकास आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी राज्य शासनामार्फत सादर करण्यात आला आहे. किल्ल्यांच्या ठिकाणी राज्य पुरातत्व विभागास जतन व संवर्धनाचे काम तसेच पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम करण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.येत्या काळात महावारसा योजना राबविण्यात येणार असून सामाजिक उत्तरदायित्व निधी, ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे मत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर ,सुभाष धोटे यांनी सहभाग घेतला.

000

राजू धोत्रे/विसंअ

 

शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचा अंतिम आराखडा दोन महिन्यांत करणार

– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मारकाबाबत शासन पुढाकार घेवून काम करीत आहे. या स्मारकाबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखड्याच्या किंमतीत आता वाढ झाली आहे.या स्मारकाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींची समिती तयार करण्यात येईल. त्यात आमदारांच्या सूचनांचा अंतर्भाव करून दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य दिलीप मोहिते-पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) येथे शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, स्मारकासाठी यापूर्वीही निधी देण्यात आला होता. पर्यटन विभागानेही ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. राजगुरुनगर हे ऊर्जेचे, पराक्रमाचे, वीरतेचे केंद्र व्हावे, असे काम शासन करेल, असेही मंत्री  श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.

000

शैलजा पाटील/विसंअ

कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीसाठी नगर विकास विभागासोबत

संयुक्त बैठक -सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई वडाळा येथील बीपीटीतील जागेवर कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीच्या बाबतीत नगर विकास विभाग, महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी वडाळा येथील बीपीटीच्या जागेवर कर्करोग उपचार रुग्णालय उभारण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा दिल्या जातात. महात्मा जोतिराव फुले योजनेअंतर्गत मागील तीन वर्षात एकूण 6.54 लाख कर्करोग रुग्णांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळाला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक साहाय्य म्हणून 793.96 कोटी इतका निधी देण्यात आला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर मध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना अंतर्गत एकूण 28 रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती, मंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात आठ परिमंडळ स्तरावर संबंधित जिल्ह्यात कर्क रोगाचे प्राथमिक टप्प्यात निदानाकरिता आठ कर्क रोग तपासणी वाहन खरेदी करण्यात येणार असून यामुळे गाव पातळीवर लवकर निदान करणे सोयीचे होईल. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस सन 2023-24 पासून देण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील 9 ते 14 वर्षे या वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री ॲड. आशिष शेलार, राजेश टोपे, योगेश सागर, अमित देशमुख, डॉ.जितेंद्र आव्हाड, सदस्या वर्षा गायकवाड, यामिनी जाधव यांनी सहभाग घेतला.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

 

‘प्रसाद’ योजनेंतर्गत वैजनाथ ज्योतिर्लिंगचा प्रस्ताव केंद्रास पाठविणार

– पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी ‘प्रसाद’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य धनंजय मुंडे यांनी परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी केंद्रीय पर्यटन विभागाच्या ‘प्रसाद’ योजनेत समावेश केला जावा, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पर्यटन संचालनालयामार्फत जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडून मागविण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ‘प्रसाद’ योजनेमधील तरतुदी निकषानुसार तपासून उचित कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुभाष देशमुख यांनी सहभाग घेतला.

०००

शैलजा पाटील/विसंअ

विधानसभा प्रश्नोत्तरे

वरवेली येथील उत्खननामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत

चौकशी करुन कार्यवाही करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबई, दि. 13 : रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल समुद्रामध्ये कोकण एलएनजीमार्फत ब्रेक वॉटरच्या कामाकरीता संरक्षण भिंत उभारली जात आहे. त्यासाठी वरवेली येथील गौण खनिज उत्खनन केले जाते आहे.

यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने याबाबत चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत वरवेली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील गावातील घरांना व विहिरींच्या बांधकामाला तडे गेल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात सुरुंग लावण्यात येतो. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या घरांच्या बांधकामांना व इतर बांधकामांना मोठ्या प्रमाणात तडे जात आहेत.

तसेच शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल यांचे सुरुंगामुळे पाणी कमी होणे,आंबा, काजू बागायतदार यांचे धुळीमुळे नुकसान, ध्वनी प्रदूषण याबाबत तक्रारी आहेत. या सर्व बाबींची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात येतील.

तसेच अवैध उत्खनन होत आहे का याबाबतही चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नावेळी विधानसभा सदस्य आशिष शेलार यांनी सहभाग घेतला होता.

000

काशीबाई थोरात/विसंअ/13.03.2023

 

वाळू उत्खनाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सामान्य माणसाला दिलासा मिळेल आणि कमी दरात वाळू उपलब्ध होईल, असे सर्वसमावेशक धोरण तयार करुन लवकरच महसूल विभागामार्फत जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

नरपड (ता.डहाणू, जि.पालघर) येथील समुद्रकिनाऱ्यावरुन अवैध वाळू उत्खनन होत असल्याबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री अस्लम शेख, नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी प्रश्न मांडला होता.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, वाळूचे दर याबरोबरच वाहतूक आणि अवैध वाहतूक याबाबतच्या सर्व अडचणी लक्षात घेऊन वाळू उपलब्धता आणि अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण राहण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येत आहे. सध्या काही जिल्ह्यात शासकीय कामकाजासाठी आणि घरकुल योजनेसाठी वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना वाळू उपलब्धतेबाबत सूचना देण्यात येतील.

डहाणू तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूकीला आळा घालण्यासाठी ग्रामदक्षता समिती, महसूल अधिकारी व कर्मचारी यांची पथके तसेच परिवहन व पोलीस यांच्या संयुक्त पथकामार्फत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहेत. सन 2021-22 आणि 2022-23 या कालावधीत अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 34 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महसूलमंत्री श्री. विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/13.03.2023

जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान

मुंबई दि 13 :- जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी संस्थानचे ट्रस्टी महेश कुलकर्णी, रोहित जोगळेकर, राजप्रसाद इनामदार, नरेंद्र पुराणिक व मान्यवर उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्री समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील चोरीस गेलेल्या मूर्तींच्या तपासाकामी वेळोवेळी पाठपुरावा करून मूर्तींच्या शोधकार्यात अमूल्य योगदान दिल्याबद्दल तसेच विशेष प्रयत्नाने चोरीचा तपास जलद गतीने पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संस्थानच्या वतीने कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थानच्या वतीनेही यावेळी आभार मानण्यात आले.

हा तमाम पोलिस बंधू, भगिनींचा हृद्य गौरव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हा केवळ माझा नाही, तर माझ्या तमाम पोलिस बंधू, भगिनींचा हृद्य सत्कार आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

रामदासी सांप्रदायाचा अमूल्य ठेवा जांब समर्थमध्ये पुन्हा संस्थापित

श्री भूषण स्वामी म्हणाले, जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील शेकडो वर्षापासून चालत आलेली श्री रामोपासना आणि सुर्योपासना आजही अविरतपणे याठिकाणी सुरू आहे. अशा मंदिरातील मूर्ती पुन्हा जांब समर्थ येथे संस्थापित होणे ही महाराष्ट्रातील सर्व भक्ती सांप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भक्तांच्या मनातील हा अभिमान जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य याव्दारे घडले आहे. रामदासी सांप्रदायाचा अमूल्य ठेवा जांब समर्थमध्ये पुन्हा संस्थापित झाला असल्याने सर्व श्रीरामभक्त, समर्थभक्त आणि रामदासी सांप्रदायिक परिवार अत्यंत कृतज्ञतापूर्वक ऋणी असल्याचे भूषण स्वामी यांनी सांगितले.

—–000—–

महानुभाव पंथाच्या शिष्टमंडळाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

मुंबई दि १३ :- अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याबद्दल महानुभाव पंथाचे महंत व शिष्टमंडळाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

महानुभाव पंथाचे महंत व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महानुभाव पंथाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी महंत मोहनराज दादा अमृते, महंत विद्वांस बाबाजी, महंत चिरडे बाबाजी, महंत कापूसतळणीकर बाबाजी, माजी आमदार बाळासाहेब सानप, गटनेते दिनकर अण्णा पाटील, प्रकाश ननावरे, ज्ञानेश्वर आंधळे,
प्रभाकर भोजणे,नंदू हांडे व ज्ञानेश्वर निमसे व मान्यवर उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात या ठिकाणाचे महत्त्वाचे योगदान आहे. रिद्धपूरचे हे महत्व लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने सर्वच स्तरातून आनंद व्यक्त होत असल्याची भावना शिष्टमंडळातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.

—-000—–

तैवान येथील पाऊ चेन ग्रुपच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई दि 13 :- तैवान येथील पाऊ चेन ग्रुपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी उपाध्यक्ष यांग हसियो तुंग, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उद्योग विकास आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य असून विविध क्षेत्रात उद्योगात आणि विस्तारासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी आहेत. उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून देत पूर्ण सहकार्य करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

उद्योग विकास आयुक्त डॉ हर्षदीप कांबळे यांनी उद्योगांसाठी देण्यात येत असलेल्या विविध सोयी-सुविधांबाबत शिष्टमंडळास सविस्तर माहिती दिली. पादत्राणे निर्मिती उद्योगांसाठी राज्यात इको-सिस्टम तयार असून या पार्श्वभूमीवर उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेता येईल असे सांगितले.

क्रीडा क्षेत्रात फुटवेअरमधील उत्पादनांसाठी प्रसिद्ध

पॉउ चेन कॉर्पोरेशन कॅनव्हास आणि रबर फुटवेअरमधील उत्पादनांसाठी प्रसिद्ध असून क्रीडा क्षेत्रातील फूटवेअर आणि अॅक्सेसरीज निर्मितीमध्येही अग्रेसर आहे. अॅथलेटिक आणि कॅज्युअल पादत्राणे उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून
भारतात व्यवसाय वृद्धीसाठी ग्रुप उत्सुक आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार

निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता

यावं हे तत्व म्हणून मान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन

मुंबई, दि. १३ : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

विधीमंडळातील मुख्यमंत्री समिती कक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन संघटना, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्याच्या विकासात कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीच्या मागे जे तत्व आहे त्या विरोधात सरकार नाही. यातून मार्ग काढण्याची मानसिकता सरकारची आहे. अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांची सामाजिक सुरक्षा जोपासण्यासाठी चर्चेतून मार्ग काढला जाईल. यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांची समिती नेमली जाईल. ही समिती कालबद्धरित्या अहवाल सादर करेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ज्या राज्यांनी ही जुनी निवृत्ती योजना लागू केली आहे, त्याबाबत त्यांचा रोडमॅप अद्यापही तयार नाही. या योजनेबाबत राज्य शासन जे धोरण स्वीकारेल त्यात याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होवू देणार नाही. राज्य शासन कोणतीही अडेल भूमिका घेणार नाही आणि कर्मचाऱ्यांनीही घेवू नये, असे सांगत कर्मचारी संघटनांनी चर्चेत मार्ग काढण्यासाठी सहकार्य देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. यावेळी श्री. काटकर यांनी संपाबाबत आणि जुन्या निवृत्ती योजनेबाबत मुद्दे मांडले.

०००

विधानपरिषद लक्षवेधी

राज्यासाठी लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

मुंबई, दि. १३ :- राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरता लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे तडवळ येथे अवैध पद्धतीने स्टोन क्रशर सुरु असून या माध्यमातून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यासंदर्भात सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशाला आळा घालण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत असतात. परंतु, असे असतानाही राज्यात नियमबाह्य उत्खनन होत असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल, असे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करुन स्टोन क्रशर चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ

नवीन शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यासाठी आराखडा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १३ – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येणार आहे. यासाठी अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात सदस्य निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण अशा चार टप्प्यांचा आराखडा आहे. हे धोरण राज्यात राबविताना त्यात अनुरूप बदल करण्यात येऊन राज्याचा आराखडा तयार झाल्यानंतर त्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येत आहे. या समितीचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण राबविण्यात येईल. या अंतर्गत बोलीभाषा संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्री श्री. केसरकर म्हणाले. हे काम पारदर्शकपणे करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

नंदुरबारला पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ५० उपकेंद्रांचे काम लवकरच सुरु करणार – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. १३ : दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देणारी केंद्रे उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नंदूरबार जिल्ह्यात २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५० उपकेंद्रे आदिवासी आरोग्य योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. या केंद्रांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) नकाशे तयार झाले असून, एका आठवड्यात पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.

नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भागात आरोग्य संस्थांची पुनर्बांधणी करणेबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी मांडली होती. यास उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात आरोग्य सेवांबाबत दौरा करण्यात येईल. वस्तुस्थितीनुसार तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. सद्यस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात एक जिल्हा रूग्णालय, एक स्त्री रूग्णालय, दोन उपजिल्हा रूग्णालये, १२ ग्रामीण रूग्णालये तसेच ६१ प्राथमिक आरोग्य केंद्र, सात आयुर्वेदीक दवाखाने, आठ प्राथमिक आरोग्य पथके, चार आश्रमशाळा पथके व २९० उपकेंद्रे कार्यरत असून यामार्फत ग्रामीण जनतेस आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

सन २०१८ -२०२२ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्राची पुनर्बांधणी डीपीडीसी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध निधीतुन करण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रे इमारती व २ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी निवासस्थान इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट जिल्हा परिषदेमार्फत करण्याची कार्यवाही सुरू आहे. सन २०१५-२०२० या कालावधीत ग्रामपंचायतीच्या जागेत अथवा इतर ठिकाणी इमारतीमध्ये कार्यरत असलेले १३ प्राथमिक आरेाग्य केंद्रास शासकीय जागा प्राप्त करून नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असल्याची माहिती, मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य एकनाथ खडसे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

आपत्कालीन कोविड प्रतिसाद कार्यक्रमांतर्गत कामे पारदर्शक पद्धतीने सुरू – आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत

मुंबई दि. 13 – आपत्कालीन कोविड प्रतिसाद कार्यक्रमाअंतर्गत बांधकामाची 75 टक्के कामे प्रगतीपथावर आहेत. या कामाच्या निविदा ई-टेंडर पद्धतीने करण्यात येत असून, पारदर्शक पद्धतीने कामे झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.

आपत्कालीन कोविड प्रतिसाद कार्यक्रमाअंतर्गत होणाऱ्या कामांना विलंब झाला असल्याप्रकरणी लक्षवेधी सूचना सदस्य महादेव जानकर यांनी मांडली. यास उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. सावंत बोलत होते.

मंत्री श्री. सावंत म्हणाले की, फिल्ड हॉस्पिटल बांधकामासाठी ई-निविदा काढण्यात आल्या असून, गुणवत्ता आणि संरचनात्मक डिझाईन करण्यासाठी व्हीजेटीआय व व्हीएनआयटी सारख्या त्रयस्थ शैक्षणिक संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय पुढील कामाला मंजुरी दिली जात नसल्याने सर्व कामे पारदर्शक पद्धतीने होत असल्याची माहिती यांनी मंत्री प्रा.सामंत यांनी दिली. तसेच फिल्ड हॉस्पिटलसाठी जागेची उपलब्धता न झाल्यामुळे कामास विलंब झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 2020-21 मध्ये 13 (मदर ॲण्ड चाइल्ड हेल्थ केअर) एमसीएच विंग तयार करण्यात येणार असून, त्यांची किंमत 272 कोटी होती. या कामाचे नकाशे मंजूर झाले आहेत. ई- टेंडरिंग पूर्ण होऊन त्याचीही कामे सुरू झाली आहेत. सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या बांधकामाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाचा स्वतंत्र बांधकाम कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही मंत्री प्रा. सामंत यांनी सांगितले.

0000

श्रध्दा मेश्राम/स.सं

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि.१३ : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासंदर्भात सदस्य मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी  सूचना मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना गर्दीचे व्यवस्थापन, मंदिर परिसराचा विकास आणि त्यास भव्य स्वरूप देण्यासाठी प्रमुख देवस्थानाचा अभ्यास प्रशासनाने केला आहे. या विकास आराखड्याचे स्वरूप भाविकांना , नागरिकांना अभिप्रेत असेच असेल. शहरातील पुरातन वास्तूंना धोका न पोहचवता हा विकास प्रस्तावित करण्यात येत आहे.  हा आराखडा सध्या प्राथमिक स्तरावर आहे.  अंतिम स्वरूप देताना येथील व्यावसायिक , दुकानदारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

भाविकांना द्यावयाच्या सोयी सुविधा, मंदिर व मंदिर परिसर विकास, घाट बांधकाम, दर्शन रांग व आपत्ती व्यवस्थापन, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात करावयाची पायाभूत कामे जतन व संवर्धन, स्काय वॉक, दर्शन मंडप ब. पंढरपूर शहरात करावयाची पायाभूत कामे , ९ वाहन तळांचा विकास, ३९ रस्त्यांची सुधारणा.  २८ एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा व १० एमएलडी क्षमतेची मलनिस्सारण योजना, ११ ठिकाणी शौचालये, ३ उद्यानांचा विकास,  दोन्ही तीरावरील घाटांचा विकास, विश्रामगृह, पूल इ., विद्युत व्यवस्थेतची पायाभूत कामे.  ९ पालखी तळांचे भूसंपादन व १८ पालखी तळांच्या ठिकाणी विकास कामे. वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसिध्दीच्या अनुषंगाने संत विद्यापीठ उभारणे, संत चोखामेळा स्मारक, संत नामदेव स्मारक इ. प्रस्तावित कामे, सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय उभारणे इत्यादी बाबींचा समावेश या आराखड्यात असल्याचे मंत्री  श्री .सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, सचिन अहिर, अमोल मिटकरी, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

०००००

श्रध्दा मेश्राम/स.सं

महानंदला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. 13 –  महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला (महानंद)उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल,  असे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या. या शासकीय संस्थेतील अनियमितता, ढासळलेली स्थिती आणि कामगारांच्या समस्या या अनुषंगाने सदस्य विजय गिरकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देतांना ते बोलत होते.

दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले की महानंदच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहेत. यानंतर संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. यासाठी शासनाने अर्थ सहाय्य केले आहे. महासंघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असून उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली. महासंघाचे व्यवस्थापन राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे देण्यासदर्भात विचार विनिमय सुरु आहे. त्यांनी केलेल्या मागणी नुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांबाबत धोरण स्वीकारले जाणार असल्याचेही मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

000

कोंढाणे धरण प्रकल्पासाठीच्या जमिनीबाबत आदिवासींचे हक्क अबाधित राखणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 13 :- रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण प्रकल्पासाठी मौजे कोंढाणे व चोची येथील खासगी जमीन थेट खरेदीबाबतचा प्रस्ताव सिडकोकडून जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. या परिसरातील आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्यासंदर्भात तक्रारी असून जिल्हाधिकारीस्तरावर याबाबत एका महिन्यात सविस्तर चौकशी करण्यात येऊन जो दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सरकार आदिवासी बांधवांच्या पाठिशी आहे, हा संदेश जाणे गरजेचे असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेताना सांगितले.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, येथील आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्यासंबंधीच्या तक्रारींसंदर्भात तहसीलदार स्तरावर सुनावण्या सुरू आहेत. अद्याप जमीन हस्तांतरणाची कार्यवाही झालेली नाही. तथापि, या सुनावण्या तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी घेणे योग्य आहे किंवा कसे, याबाबतही चौकशी केली जाईल. आदिवासींचे हक्क अबाधित राखले जातील. त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास शासन बांधिल असून कोणालाही बेदखल करणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पारदर्शकपणे चौकशी केली जाईल तसेच यात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

00000

श्रद्धा मेश्राम/स.सं

राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदे भरण्याची कार्यवाही सुरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 13 : पुण्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गात सहयोगी प्राध्यापक , सहायक प्राध्यापक तसेच क व ड संवर्गातील १२१ पदे भरण्यात आली आहेत. तसेच इतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुविधांबाबत सदस्य डॉ. वजाहत मिर्ज़ा यांनी लक्षवेधी मांडली होती. यास उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, पुण्यातील ससून रूग्णालयात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विविध आजारांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे. अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदांच्या २ व सहायक प्राध्यापक पदांची ७ पदे मंजूर आहेत. त्याचप्रमाणे गट-क व गट-ड संवर्गात १२१ पदे भरण्यात आली आहेत.

अतिविशेषोपचार विषयातील रुग्णसेवेची निकड तसेच पदव्यत्तर विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर येथील विशेषोपचार विषयातील काही अध्यापकीय पदांचे स्थानांतरण व रुपांतरण तसेच काही पदे समर्पित करून ही पदे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर या संस्थेकरिता गट-अ ते गट-ड मधील एकूण १३५ पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनांतर्गत राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर ४ अतिविशेषोपचार रुग्णालयांकरिता एकूण १८४७ पदे आवश्यक असून प्रथम टप्याकरिता आवश्यक असलेली गट-अ ते गट-ड संवर्गात एकूण ८८८ पदे निर्माण करण्यात आली आहे. उर्वरित द्वितीय व तृतीय टप्प्यासाठी आवश्यक असलेली अनुक्रमे ५५३ व ४०६ तसेच तांत्रिक संवर्गातील गट-क व गट-ड मधील अतिरिक्त २४८ अशी एकूण १२०७ पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

अतिविशेषोपचार विषयातील अध्यापकीय वर्गातील प्राध्यापक-९, सहयोगी प्राध्यापक- १३ व सहायक प्राध्यापक-५९ इतक्या उमेदवारांना विविध अतिविशेषोपचार रुग्णालयात नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असल्याची माहितीही मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य सचिन अहिर, अभिजित वंजारी, जयंत पाटील, किरण सरनाईक, भाई जगताप यांनी यावेळी चर्चेत सहभाग  घेतला.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं

घाटन देवी सहकारी औद्योगिक वसाहत प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करणार – सहकारमंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 13 :- नाशिक जिल्ह्यातील घाटन देवी सहकारी औद्योगिक वसाहतीचे गृहनिर्माण सहकारी संस्थेत बेकायदेशीर रूपांतर करण्यात आले आहे. तसेच 8 मजूर बांधकाम सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रात बदल आणि अन्य अनुषंगाने संबंधित तत्कालीन सहाय्यक निबंधकांना सक्तीच्या रजेवर पाठवून सात दिवसांच्या आत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

सदस्य नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री.सावे बोलत होते.

मंत्री श्री.सावे यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याची सहकार आयुक्तामार्फत चौकशी सुरु आहे. याबाबत सात दिवसांच्या आत अहवाल प्राप्त करून पुढील कारवाई केली जाईल. सदर अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, भाई जगताप, जयंत पाटील, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ

विधान परिषद प्रश्नोत्तरे

मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू

-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 13 :  मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जावे याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील किमान वेतन देण्याबाबत अंतरिम आदेश दिल्यानंतर त्यांना किमान वेतन दिले जात असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

सदस्य विलास पोतनीस यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

मुंबई विद्यापीठातील या कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच इतर आर्थिक लाभ दिले जावेत या उपप्रश्नाबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले की, हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना विद्यापीठामार्फत वेतन दिले जाते. तथापि याबाबत विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच याबाबत शहानिशा करून त्यानुसार आवश्यक सूचना दिल्या जातील.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.

000

बी.सी.झंवर/विसंअ

रिक्त पदांचा आढावा घेऊन शिक्षक पदभरतीची

कार्यवाही सुरू – मंत्री दीपक केसरकर

शाळांची संचमान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असते. त्यामुळे एकूण विद्यार्थी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तरीही सध्याची रिक्त पदे लक्षात घेता शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.

प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्यात शिक्षक पद भरती करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. एकूण मान्यतेच्या 50 टक्के शिक्षक पद भरती केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. शिक्षकभरती नंतर शिक्षकेतर भरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पदभरतीनंतर रिक्त पदांचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. तसेच  शाळांमध्ये नियमित कामकाज सुरळीत होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असल्याने आधार जोडणीचे काम सुरू आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्या कळू शकेल आणि शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सुधाकर अडबाले, आमशा पाडवी, अभिजित वंजारी, जयंत पाटील, कपिल पाटील, अरुण लाड आदींनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/वि.स.अ

शालेय पोषण आहार योजनेतील तक्रारींची

चौकशी करणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि.13: राज्यात शालेय पोषण आहार योजनेची  अंमलबजावणी करताना महिला बचत गटांना त्यांच्या  कामाचे पैसे वेळेत मिळण्यात ज्या अडचणी आहेत, त्या दूर केल्या जातील.  या प्रकरणी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की,  राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबविली जात आहे. त्यामध्ये काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीसांचे जानेवारी 2023 पर्यंतचे मानधन देण्यात आले आहे. मात्र, पोषण आहाराचे काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या  कामाचे पैसे बाकी आहेत, त्यांना ते लवकरात लवकर मिळण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. वेळेवर ही बिले मिळत नसल्या बाबत ज्या काही तक्रारी असतात त्यांची चौकशी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती करीत असते. त्यामुळे या प्रकरणी  सदस्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल.

तसेच, शालेय पोषण आहार योजनेत काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीसांचे यांचे मानधनही पंधराशे रुपयांवरून 2 हजार 500 रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

शाळेतील सर्व मुलांना पौष्टिक आणि सकस अन्न मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरात परसबाग विकसित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यासाठी कृषी विभागाबरोबर एकत्रितपणे काम केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप, जयंत पाटील, निरंजन डावखरे, अमोल मिटकरी, भाई गिरकर, सतेज पाटील, उमा खापरे यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/वि.स.अ

प्राथमिक शाळांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी दक्षता घेणार – दीपक केसरकर

मुंबई, दि. 13 : प्राथमिक शाळांनी वीज देयक भरण्यासाठी पुरेश्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या शाळांची वीज जोडणी तोडली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच या शाळांची वीज जोडणी तोडू नये, याबाबत वीज वितरण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा झाली असून त्यांच्यासोबत लवकरच बैठक देखील घेतली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, प्राथमिक शाळांसाठी आकारले  जाणारे विजेचे दर हे घरगुती दरापेक्षा कमी असावेत याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या सवलतीच्या दरांमुळे यापुढे देयक प्रलंबित राहणार नाही, अशी अपेक्षा आहे. तथापि, शाळांची वीज तोडण्यात येऊ नये याबाबत व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत करार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याचप्रमाणे शाळांमध्ये सोलरद्वारे वीज पुरवठा करण्याबाबतही प्रायोगिक तत्त्वावर टप्प्या टप्प्याने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे आदींनी सहभाग घेतला.

000

बि.सी.झंवर /वि.सं.अ

शासनाने नेमलेल्या समितीच्या शिफारशीवरील सूचनांनुसार गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्ता देणार – दीपक केसरकर

 

राज्यातील नक्षलग्रस्त भागात सेवारत शासकीय अधिकारी  कर्मचाऱ्यांना सुधारित सवलती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत समिती गठित करण्यात आली आहे. त्या समितीच्या अहवालातील शिफारशींचा विचार करून निर्गमित होणाऱ्या सूचनांनुसार गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित नक्षलग्रस्त भत्ता लागू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सदस्य किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, नगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना असा भत्ता मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यास तशा सूचना देण्यात येतील. गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील, असा भत्ता मिळण्याबाबत तपासून निर्णय घेतला जाईल. तसेच याबाबत अधिवेशन संपल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, अभिजित वंजारी, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.

000

बि.सी.झंवर /वि.सं.अ

 

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई  देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे

0
नांदेड, दि. १४ जून :- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारा सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे....

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील  साजूर, तांबवे, किरपे  शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे...

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री...

रोजगार हमी योजनेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री संजय राठोड

0
रोहयो कामे, पीएम आवास, स्मार्ट पीएचसीचा आढावा विहिरीचे आदेश पंचायत समितीतून थेट लाभार्थ्यांना द्या यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून नाट्यगृहाची पाहणी

0
यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची आज पाहणी केली....