सोमवार, जून 16, 2025
Home Blog Page 1447

विधानपरिषद लक्षवेधी

तलावाच्या बॅकवॉटरमुळे बाधित जमिनीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मोबदला देणार – मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

मुंबई, दि. 15 : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरातील तलाववाडी शिवारातील तलाव पूर्णपणे पाण्याने भरल्यानंतर बॅक वॉटर मुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होते. याबाबत एक महिन्याच्या आत सर्वेक्षण, जमिनीची मोजणी आणि आवश्यकता असल्यास अतिरिक्त भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच तीन महिन्यांच्या आत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल, असे मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरातील तलाववाडी शिवारात 133 एकर क्षेत्रात असलेल्या शिवकालीन तलावाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत आणि बाधित क्षेत्राच्या भूसंपादनाबाबत सदस्य सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना प्रा.डॉ. सावंत बोलत होते.

यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, हा तलाव पुरातन असून पूर्ण रितीने भरल्यानंतर किमान 50 शेतकऱ्यांचे क्षेत्र बाधित होत आहे. या बाधित क्षेत्राची मोजणी उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक असलेल्या अतिरिक्त भू संपादनाची कार्यवाही पूर्ण करून संबंधितांना मोबदला अदा करण्यात येईल, असेही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.

00000

मनिषा पिंगळे/विसंअ

 

‘बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 15 : अनुसूचित जाती प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत फेलोशिप देऊन संशोधनास चालना देण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातून 200 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सर्व बाबी तपासून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

‘बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी या अनुषंगाने सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री.राठोड यांनी ही माहिती दिली.

मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले की ‘बार्टी’ने 2013 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती सुरु केली आहे. याबरोबरच विविध योजना आणि कार्यक्रम ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येत आहेत. सारथी आणि महाज्योती या संस्थांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना एम फिल व पी एच डी करीता अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. याचधर्तीवर ‘बार्टी’ ने सर्व पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी होत आहे. या बाबत बार्टीने शासनास प्रस्ताव सादर केला आहे.

याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

अधिछात्रवृत्ती पात्र विद्यार्थ्यांकडून प्रबंध अप्राप्त असल्याचे लक्षात आले आहे. या अनुषंगाने ऑनलाईन निरीक्षण (मॉनिटरिंग) करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

–0000000—

मनिषा पिंगळे/विसंअ

 

लिपिकवर्गीय संवर्गातील भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम देण्याची मुभा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सात हजार 34 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रमानुसार एक किंवा अनेक नियुक्ती प्राधिकारी देण्याची मुभा असणार आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘ब’ व ‘क’ संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील गट ‘क’ च्या भरती अनुषंगाने सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, राज्य शासकीय कार्यालयातील गट- ‘क’ मधील लिपिकवर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामधील प्रथम टप्प्यात लिपिक-टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अराजपत्रित गट-‘ब’ व गट-‘क’ संवर्गातील एकूण ८ हजार १६९ पदभरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ८ हजार १६९ पदांमध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गाची ७ हजार ३४ पदे अंतर्भूत आहेत. प्रस्तूत जाहिरातीस अनुसरुन एकूण ४ लाख ६६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी एकूण २८१ नियुक्ती प्राधिकारी निश्चित केले आहेत.

उमेदवारांना अर्ज सादर करतांना पसंतीक्रम देण्याची मुभा आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल भागातील उमेदवारांनासुद्धा त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या पसंतीच्या कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.  या तरतुदीमुळे कोणताही उमेदवार अपात्र ठरणार नाही असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

००००

मनिषा पिंगळे/विसंअ

 

कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १५ : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी १२०० कोटी रूपये खर्च करून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर कोणते अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत याबाबत स्थानिकांचे मत विचारात घेऊन एक, दोन, तीन महिन्यांचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कमी लोकसंख्येच्या गावात ५०० कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत. नोंदणीकृत बेरोजगारांपेक्षा नोंदणी न केलेल्यांची संख्या अधिक असून कौशल्य विकास केंद्रांचा त्यांना लाभ होईल असे मंत्री श्री.लोढा म्हणाले. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तसेच विविध आस्थापनांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून ४२ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यापुढे नवीन ॲप विकसित करून त्यावर रिक्त जागांची माहिती ठेवण्याची सूचना कंपन्यांना करण्यात येईल.

राज्यात २०० कोटी रुपयांचा नाविन्यता निधी तयार करण्यात आला असून यातील २० टक्के निधी आयटीआयसाठी, तर २० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

या संदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दटके, अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

 

मुंबईतील स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशिन्स बसविणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १५ : मुंबई शहरात असलेल्या ८ हजार १७३ स्वच्छतागृहांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पाच हजार स्वच्छतागृहांवर आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि डेटा एनालिटीक्स आधारित कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि इन्सिनेरेटर मशीन बसविण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. संबंधित पुरवठादारांशी संबंधित सर्व बाबी निविदा समितीने तपासल्या असून या कामी अनियमितता झाली नसल्याचे ते म्हणाले.

सदस्य ॲड. अनिल परब यांनी या मशीन बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री.देसाई म्हणाले, शहरातील सर्व महिलांची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यादृष्टीने स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकीन बसविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ पर्यंत प्राप्त होतील, अशा रितीने निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यास केवळ दोन निविदाधारकांचा प्रतिसाद मिळाल्याने त्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर प्राप्त निविदांमधून लघुत्तम निविदाकाराचा ७६,५२८ हा रास्त व वाजवी दर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतागृहांच्या व्यतिरिक्त इतर स्वच्छतागृहांमध्ये सुद्धा अशा मशिन्स बसविण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी एका उप प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

बृहन्मुंबईतील स्वच्छतागृहांच्या संख्येबाबत विसंगती दिसून येत असल्याने महानगरपालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत २० तारखेला बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले. त्यावर अशी बैठक घेण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

“देशाचे भविष्य कृषी क्षेत्रात आहे ; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत” – राज्यपाल रमेश बैस

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी  विद्यापीठाचा ४१ वा दीक्षान्‍त समारोह 

मुंबई, दि. १५ : देशाचे भवितव्य कृषी विकासात आहे.  देश कृषी प्रधान असल्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात देखील देशाला त्याची झळ बसली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कधीही विकू नये. आगामी काळात ज्यांच्याकडे शेती असेल त्यांच्याकडे पैसा असेल. कृषीच्या माध्यमातून देशाला फार पुढे नेता येईल. त्यामुळे कृषी स्नातकांनी शेतीकडे वळावे व कृषी विकासात मोठे योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत समारोह आज झाला. त्यावेळी स्नातकांना संबोधित करताना ते बोलत होते.

महाराष्ट्रात राज्यपाल झाल्यावर आपला पहिला सार्वजनिक कार्यक्रम देश विकासात योगदान देणाऱ्या एका कृषी विद्यापीठात होत आहे याचा आनंद आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

पूर्वी लोक पैसे मिळाले, तर दोन-चार एकर जमीन घेत. परंतु आजकाल जमिनीला चांगला मोबदला मिळाला, तर लोक शेतजमीन विकून टाकतात. त्या पैशातून घर, गाडी घेतात. अशा प्रकारे अनेक गावातील लोकांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत आणि एकेकाळी शेतमालक असेलेले लोक आज शेतमजूर झाले आहेत.  पूर्वी लोक जमीन कधीही विकत नसत, असे सांगून शेतकऱ्यांनी जमीन जपली पाहिजे आणि त्यासोबतच पाण्याचे देखील योग्य नियोजन केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

कृषी स्नातकांनी शिक्षण प्राप्त केल्यानंतर गावात जाऊन अनुकरणीय शेती करावी. तसेच शेतीला उद्योगाची जोड द्यावी, असे सांगताना देशासाठी व्यापक हिताचे काम केल्यास लोक लक्षात ठेवतात, असे राज्यपालांनी सांगितले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून शासनाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध निर्णयांची व योजनांची माहिती दिली.  कृषी स्नातकांना शेतीसाठी मदत करण्यासाठी आपण नेहमी खंबीरपणे पाठिशी उभे राहू, असे त्यांनी सांगितले.

“कृषी विद्यापीठे ही अन्नब्रह्म मंदिरे”: भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ एस अय्यप्पन

देशातील कृषी विद्यापीठांच्या योगदानामुळे आज भारत अन्नधान्याच्या उत्पादनात केवळ स्वयंपूर्णच नाही, तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधनातून निर्माण केलेल्या वाणांमुळे हे शक्य झाले आहे, असे सांगताना देशातील ७५ कृषी विद्यापीठे ही अन्नब्रह्माची मंदिरेच आहेत, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. एस.अय्यप्पन यांनी आपल्या दीक्षांत भाषणात केले.

हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, पाणी व ऊर्जेची वाढीव गरज ही कृषी क्षेत्रापुढील आव्हाने असून देशातील १६० कोटी जनतेला अन्नसुरक्षा देण्याकरिता सन २०४७ पर्यंत अन्नधान्य उत्पादन दुप्पट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील कृषी विद्यापीठांमधून दरवर्षी १ लक्ष कृषी स्नातक तयार होत असून त्यांनी कार्यक्षम कृषी, स्मार्ट फार्मिंग व ज्ञानाधिष्ठित कृषी तसेच कृषी स्टार्टअप सुरु केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभाला रत्नागिरीचे पालकमंत्री तसेच उद्योग मंत्री उदय सामंत, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय सावंत, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, शिक्षक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांनी  कृषी प्रदर्शनाला भेट दिली.

०००

Maharashtra Governor presides over 41st

Convocation of Kokan Krishi Vidyapeeth

Maharashtra Governor and Chancellor of public Universities in the State Ramesh Bais presided over the 41st Annual Convocation of the Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth (DBSKKV) at Dapoli in Ratnagiri District.

Pro Chancellor of the University and Maharashtra’s Agriculture Minister Abdul Sattar, Guardian Minister of Ratnagiri Uday Samant, former Director General of IACR and Vice Chancellor of Central Agriculture University Imphal Dr S. Ayyappan, Vice Chancellor of DBSKKV Dr Sanjay Sawant, Members of the Executive Council, Dean of various faculties and graduating students were present.

Gold Medals were presented to meritorious students for excellent performance.  Earlier the Governor visited the Agricultural Exhibition organised by the University.

०००

‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत – सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत

मुंबई, दि. १५ : राज्यात इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, दिरंगाई करु नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.

मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा एच३एन२ ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लुएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१एन१ एच३एन२ इ. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येतात. इन्फ्लुएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३ मार्च २०२३ अखेर एच१एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात इन्फ्लुएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर  जिल्ह्यातील शहरी भागात दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणे तसेच उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांवर आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत असून आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे श्री.सावंत यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

सर्व घटकांना न्याय, शेतकरी व महिलाशक्तीचा गौरव करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करून सर्व घटकांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प असून सर्व घटकांचा सन्मान आणि  शेतकरी व महिला शक्तीचा गौरव करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सन २०२३-२४ चा अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ४९ सदस्यांनी सहभाग घेत चर्चा केली.

जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर

देशातील एकूण जीएसटी (‘वस्तू आणि सेवा करा’चे) संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.  राज्याचा जीएसटी कमी झाला नाही, तर फेब्रुवारी अखेरपर्यंत सन २०२०-२१ मध्ये  ६५,०३८ कोटी रुपये, २०२१-२२ मध्ये  ८६,४७८ कोटी रुपये, २०२२-२३ मध्ये १,१८,०२० कोटी रुपये जीएसटी संकलन महाराष्ट्राने केले आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून गुजरात दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांचा सन्मान..

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी”ही योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये  जमा केले जातात. राज्य शासनाकडून सहा हजार रुपये प्रति शेतकऱ्यांना देण्यात येणार असून यासाठी यावर्षी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्राचे सहा हजार रुपयांवर राज्याचे सहा हजार रुपये, असे आता शेतकऱ्याला १२ हजार रुपये मिळतील. तसेच थेट अनुदानामुळे विदर्भ, मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये केंद्राची शेतकरी सन्मान योजना, राज्याची ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ व ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना’ असे मिळून  जवळपास २१ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. शेतकऱ्यांसाठी १ रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ३ हजार ३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मराठवाडा वॉटरग्रीडची जबाबदारी केंद्र शासनावर टाकलेली नाही.”हर घर जल” योजनेअंतर्गत मराठवाडा वॉटरग्रीडचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.

विकास दर कमी झालेला नाही…

विकास दर कोरोनाच्या काळात नकारात्मक झाला होता. उणे १०% वर गेला होता. नंतरच्या काळात तो अचानक वाढला आणि आता तो स्थिरावतो आहे. त्यामुळे विकास दर कमी झालेला नाही. जिल्हा विकास योजनांचा, आदिवासी उपयोजना, असा सर्व खर्च वाढवत नेला आहे. कुठलाही खर्च कमी केला नाही. जिल्हा नियोजन निधी जवळपास ९९ टक्के खर्च होतो. वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती, अकोला या जिल्ह्यात सरासरी ६० ते ७० टक्के खर्च झाला आहे.

संप मागे घेण्याचे आवाहन

राज्य शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात नाही. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित, सन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतीत करता यावे, याकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. संपामुळे नागरिकांच्या ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील त्या सेवांवर परिणाम होऊ नये, आरोग्य विभागातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

प्रधानमंत्री आवास योजनेतील १ लाख १७, हजार  घरांचा निधी केंद्र शासनाला परत गेला नाही, आता राज्यशासनाने युटिलायझेशन सर्टिफिकेट केंद्र शासनाकडे पाठविले असून जवळपास १ हजार ७०० कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आहेत. सारथीचे नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतिगृहांसाठी ५० कोटी देण्यात आले आहे. वेगवेगळ्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व  प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या महामंडळांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. आशा सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेच्या तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

स्मारकाच्या कामासाठी भरीव तरतूद

छत्रपती संभाजीनगर येथे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे स्मारक व्हावे यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. स्मारकासाठी निविदा प्रक्रिया यापूर्वीच राबविली आहे. आता आवश्यक त्या परवानग्या घेऊन काम सुरु करण्यात येईल. इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच भेटीत तीन दिवसात मार्ग काढून असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले आणि केंद्र शासनाने राज्य शासनाला स्मारकासाठी जागा हस्तांतरित केली. प्रस्तावित स्मारक उभारणीसाठी समिती गठित करण्यात आली असून यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्मारकासाठी राज्य शासनामार्फत निधीची कमतरता पडू देणार नाही. प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाच्या कामासंदर्भात न्यायालयीन स्थगिती उठल्यानंतर राज्य शासनमार्फत स्मारकाच्या कामाला गती देण्यात येईल. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २७० कोटी रुपयांचा विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.

वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात तयार

केंद्र शासनाचे उद्योग विदर्भ आणि मराठवाड्यात आणले जावे, अशी मागणी असताना मराठवाडयातील लातूर येथे रेल्वे कोच फॅक्टरी सुरु करण्यात आली आहे. लातूर येथे आता वंदे भारत ट्र्रेन तयार होत आहेत. वांद्रे -कुर्ला संकुलातील मोठी जागा मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी देण्यात आली आहे, असे काही सदस्यांनी यावेळी नमूद केले होते. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील १.५२ हेक्टर जागा रेल्वेकरिता देण्यात आली असून याचा मोबदला जवळपास ५ हजार कोटी रुपयांची इक्विटी आहे. या प्रकल्पात केंद्र शासन १० हजार कोटी रुपयांची, महाराष्ट्र ५ हजार कोटी रुपयांची आणि गुजरातची ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे.

यावर्षीचा अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. अर्थसंकल्पात विकासला केंद्रीत करुन राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

०००

काशीबाई थोरात / विसंअ

‘पीएमएफएमई’चा मिळाला आधार, व्यवसायाचे स्वप्न झाले साकार

नशीब हे तळहाताच्या रेषांवर नाही तर मनगटाच्या ताकदीवर अवलंबून असते या उक्तीनुसार पलूस तालुक्यातील कुंडल येथील दिपाली बाबासाहेब पवार यांनी ज्योतिर्लिंग महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये उद्योजक होण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ग्रामीण उत्पादने Local For Vocal या योजनेप्रमाणे नवीन उत्पादन निर्मितीचा ध्यास घेऊन कृषी विभागाच्या  पीएमएफएमई योजनेचा लाभ घेऊन स्वाद मसाले या उद्योगाची उभारणी केली.

स्वाद मसाले या आपल्या उद्योग व्यवसायाबाबत माहिती देताना दिपाली पवार यांनी सांगितले, ग्रामीण भागातील महिला मोलमजुरीवर आपली उपजीविका चालवितात. मोलमजुरीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न यामध्ये त्यांची आर्थिक ओढाताण होते. या महिला सक्षम व्हाव्यात, त्यांना रोजगार मिळावा हा ध्यास घेऊन आसपासच्या महिलांना एकत्र करून ज्योतिर्लिंग महिला बचत गटाची स्थापना केली. या महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज घेऊन गाई-म्हैशी विकत घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. शेळीपालन, पिठाची गिरणी, उन्हाळी पदार्थ बनविण्याचे काम सुरू केले. महिला बचत गटामार्फत तयार केलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी आम्ही सर्व महिलांनी 2016 साली स्वाद मसाले या उद्योगाची उभारणी केली.

यामध्ये सन 2016 पासून आत्तापर्यंत साधारण 300 महिला काम करीत असून स्वत:चे  उत्पादन करून आपल्या संसाराला हातभार लावतात. या महिलांच्या उत्पादनाला देश पातळीवर व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा ध्येय असून यासाठी महिलांना ग्राहकाबद्दल त्याच्या आवडीबद्दल जागृती केली जाते. आपल्या उत्पादनाबद्दल प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम स्वाद मसाले सातत्याने करत आहे. त्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवणे व स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा करणे हेही काम सातत्याने सुरू आहे.

या उद्योगामध्ये शेतकऱ्यांकडून मिरची व हळद हा कच्चा माल घेवून त्यापासून मिरची पावडर व हळद पावडर बनविण्यासाठी प्रोसेस मशिनरी व पॅकेजिंग मशिनरी इत्यादीचा प्रस्ताव कृषी  विभागाकडे सादर केला. या व्यवसायाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, सांगली यांनी पीएमएफएमई योजनेतून मदत केल्याने स्वाद मसाले मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होवू लागले. या उद्योग व्यवसायातील 300 महिलांना त्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 12 जानेवारी 2023 रोजी दुबई येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये भाग घेऊन आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी एक पाऊल टाकले. उत्पादनातील दर्जेदारपणा व गुणवत्ता या जोरावर या उद्योग व्यवसायाने विविध पुरस्कारही मिळविले असून उद्योगाची  वार्षिक ५ कोटी रूपयांची उलाढाल आहे. यामधून महिलांना चांगला फायदा मिळत असल्याचे श्रीमती पवार यांनी  सांगितले.

ज्योतिर्लिंग महिला बचत गटामार्फत महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी  उद्योग समूह मुख्य  भूमिका बजावत असून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काम करीत आहे, याचा मनस्वी आनंदही होतो, असे मत दिपाली पवार यांनी या उद्योगाची माहिती देताना व्यक्त केले.

 

जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

सर्वांगीण विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प

मराठी भाषेतील आद्यग्रंथ असलेल्या लीळाचरित्राची रचना ज्या भूमीत झाली त्या रिद्धपूरपासून ते राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेडराजापर्यंत विस्तार असलेल्या वऱ्हाडभूमीचे महाराष्ट्रीय संस्कृतीचे अनन्यसाधारण स्थान आहे. गोदावरी आणि तापी नदीच्या उपनद्या या प्रदेशातून वाहतात. कापूस, सोयाबीन, तूर अशा पीकांबरोबरच संत्रा, सीताफळासारख्या फळपीकांचे हबही या भूमीत विकसित झाले आहेत.

या विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांची वैशिष्ट्ये, आवश्यकता लक्षात घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने अर्थसंकल्पाद्वारे अनेक योजना व उपक्रमांना चालना देऊन सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे.

 मराठी भाषेचे गौरवस्थळ मानल्या जाणाऱ्या रिद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थसंकल्पाद्वारे झाला आहे. अमरावती येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाचवेळी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ आणि दोन मोठ्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणे ही घटना अमरावतीच्या शिक्षणपरंपरेला दृढ करणारी आहे.

विदर्भाचा कॅलिफोर्निया मानल्या जाणाऱ्या मोर्शी जिल्ह्यात, तसेच बुलडाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. या परिसरातील संत्रा उत्पादन मोठे आहे. प्रक्रिया केंद्रे निर्माण झाल्याने येथील फळ उत्पादक शेतक-यांना त्याचा लाभ होईल. विदर्भ, मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतक-यांना अन्नधान्याऐवजी प्रतिवर्ष 1800 रूपये रोख देण्यात येणार आहे. हा निर्णय गरीब शेतकरी बांधवांना दिलासा देणारा आहे.

वैनगंगा-नळगंगा- पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर विभागातील नागपूर व वर्धा जिल्ह्यासह वऱ्हाडातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांना पाणी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वऱ्हाडातील मोठ्या भूभागाला या प्रकल्पाद्वारे पाणी मिळून त्या परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होणार आहे.

पायाभूत सुविधांमध्ये अमरावती विभागाला भरभरून मिळाले आहे. अकोला व अमरावती येथील विमानतळाचा विस्तार करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. उद्योगवाढीसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तार योजनेत सिंदखेडराजा नाेड ते शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे दत्तस्थान या मार्गावर येणार आहे. या निर्णयांमुळे परिसरात विकासाला चालना मिळेल.

अमरावती व बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, ती आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरेल. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शासनाकडून संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना राबविण्यात येणार असून, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील बंजारा तांड्यांना त्याचा फायदा होईल.

वऱ्हाड ही संतांची आणि महापुरूषांची भूमी आहे.वऱ्हाडभूमीतील थोर संत गाडगेबाबा यांचे अमरावती येथील समाधीस्थळ, तसेच त्यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन तीर्थक्षेत्राच्या विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात 25 कोटी रू. चा निधी जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज दृकश्राव्य माध्यम उद्यान निर्माण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवनगाथा या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक प्रदेशाचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आला आहे. वऱ्हाडाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देणारा हा अर्थसंकल्प आहे.

 

– हर्षवर्धन पवार,

प्र. उपसंचालक, अमरावती विभाग

बजेटात मॉप पैशे राखून ठेयले; ६५ हजार मे.टन काजू प्रक्रिया उत्पादनाक वाव

‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्याच्या विकासाची पाऊले टाकायला सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोकण विकासासाठी जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे काजू प्रक्रिया उद्योगाला निश्चितच बळ मिळणार असून, जिल्ह्यातून अतिरिक्त 65 हजार मेट्रीक टन काजू प्रक्रिया उत्पादनाला वाव मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 72 हजार हेक्टर हे काजू लागवडीचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात यामधून 59 हजार हेक्टर क्षेत्रातून फळे निघतात 1.60 मेट्रीक टन हेक्टरी काजूचे उत्पादन आहे. म्हणजेच 95 हजार मे.टन काजू उत्पादन सध्या मिळत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत  97 मोठे तर, 224 छोटे काजू प्रक्रिया उद्योग अस्तित्वात आहेत. यामधून 10 हजार 584 मे.टन प्रक्रिया केलेले काजू उत्पादन मिळते. याचबरोबर मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमध्ये 10 मोठ्या काजू प्रक्रिया उत्पादकांना मान्यता आहे. त्यामधून 20 हजार मे.टन प्रक्रिया काजू उत्पादन मिळत आहे.

9 मार्च रोजी झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणात विकासाला चालना देण्यासाठी  जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. काजू बोर्ड स्थापनेसाठी 200 कोटींची तरतूद केली आहे. जिल्ह्यात काजू पीक मोठ्या प्रमाणात होत असून, या पिकावरील पूरक उद्योगांना चालना मिळणार आहे. म्हणजेच जिल्ह्यात नवी काजू क्रांती होईल. त्याशिवाय फणस,आंबा आणि मत्स्यव्यवसाय यांनाही मोठा फायदा मिळणार आहे.

जिल्ह्यातील एकूण उत्पादन मिळणाऱ्या 95 हजार मे.टन काजू पैकी सद्या 30 हजार मे.टन इतकेच प्रक्रिया काजूचे उत्पादन मिळत आहे. म्हणजेच अद्यापही उर्वरीत 65 हजार मे.टन काजूवर प्रक्रिया करुन चांगले उत्पादन घेण्यास जिल्ह्याला वाव मिळणार आहे.

मोपा हे आंतरराष्ट्रीय आणि बॅ.नाथ पै अशा दोन विमानतळांमुळे पर्यटन जिल्ह्यातील पर्यटनवाढी बरोबरच येथील शेती-मत्स्य उत्पादनाची निर्यात होण्यासही भविष्यात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे निश्चितच छोट्या-मोठ्या रोजगारांबरोबरच उद्योग-व्यवसायांची देखील वाढ होणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींचा हा बुस्टर डोस जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला लाभदायक ठरणार आहे. यामुळे ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतीमान’ हे शासनाचे ब्रीद वास्तवात उतरत आहे. यावर‘बजेटात आमच्या जिल्ह्यासाठी मॉप पैशे राखून ठेयले…. जिल्ह्याचा कल्याण झाला….!’ अशी कोकणवासियांची प्रतिक्रिया उमटत आहे.

– प्रशांत सातपुते,

जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग

शाळा – महाविद्यालयातून जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मतदार याद्या १०० टक्के अचूक होणे आवश्यक

चंद्रपूर, दि. 15 : आगामी काळात निवडणुका असल्यामुळे प्रशासनासाठी पुढील सहा-सात महिने तयारीचे राहणार आहे. या काळात अचूक मतदार यादी, नव मतदार नोंदणी, ईव्हीएम करीता गोडावून व्यवस्थापन आदी बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. 18 वर्षावरील कोणताही नागरीक मतदार नोंदणीपासून वंचित राहता कामा नये. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नव मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी आपापल्या परिसरातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांशी नियमित संपर्क करून मतदार नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या.

नियोजन सभागृह येथे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सहायक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पल्लवी घाटगे, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, नायब तहसीलदार, केंद्रस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते.

मतदार नोंदणी व अचूक मतदार यादी हा मुख्य अजेंडा लक्षात ठेवून प्रशासनाने आतापासून तयारी करावी, असे सांगून मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, नवमतदार नोंदणीकरीता शाळा – महाविद्यालयांमध्ये अतिशय नियोजन पध्दतीने विशेष मोहीम घेऊन जनजागृती करावी. यासाठी संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्यांसोबत सतत संपर्कात रहा. नवमतदारांची ऑनलाईन सुविधेसोबतच ऑफलाईन नोंदणीसुध्दा करा. संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या 100 टक्के अचूक होणे अपेक्षित आहे. यात मयत / स्थलांतरीत नागरिकांची नावे वगळणे, नाव, पत्ता व इतर काही दुरुस्ती असल्यास करून घ्यावी.

निवडणूक विभागाने महिला, दिव्यांग व तृतीयपंथी मतदारांना विशेष प्राधान्य दिले आहे. दिव्यांग मतदारांची 100 टक्के नोंदणी होणे आवश्यक आहे. जे दिव्यांग मतदार जागेवरून हालचाल करू शकत नाही, अशा मतदारांना पोस्टल बॅलेट देण्याचे नियोजन आहे. 40 टक्क्यांच्या वर दिव्यांग असलेल्या व्यक्तिच्या प्रमाणपत्राकरीता जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. याबाबत वरील अधिका-यांची बैठक घेण्यात यावी. 80 वर्षावरील मतदारांची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घ्यावी. यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगर पालिका स्तरावरील याद्या प्राप्त करून घ्याव्या. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची त्वरीत पडताळणी करा. मतदान केंद्र असलेल्या शासकीय शाळा व इतर इमारतींची दुरुस्ती असल्यास त्याचे नियोजन आतापासूनच करा. फॉर्म नं 6,7 आणि 8 मधील नागरिकांचे दावे व हरकती प्रलंबित ठेवू नका. मतदान यंत्रे (ईव्हीएम / व्हीव्हीपॅट) ठेवण्यासाठी गोडाऊन व्यवस्थापन व्यवस्थित करून घ्या, अशा सुचना मुख्य निवडणूक अधिका-यांनी दिल्या. यावेळी त्यांनी निवडणूक यंत्रणेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी व डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या समस्या जाणून घेतल्या.

जिल्ह्यातील निवडणूक संदर्भात माहिती : 5 जानेवारी 2023 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 18 लक्ष 2 हजार 811 आहे. यात पुरुष मतदार 9 लक्ष 25 हजार 150, स्त्री मतदार 8 लक्ष 77 हजार 609 तर इतर मतदार 52 आहेत. लोकसंख्येशी मतदारांचे प्रमाण 68.02 आहे. जिल्ह्यात सेनादलातील पुरुष मतदार 1736, स्त्री मतदार 63 असे एकूण 1799 मतदार आहेत. दिव्यांग मतदार 6891 आहेत. जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रे 2023 आहे. मतदार यादीतील फोटोची तसेच फोटो ओळखपत्राची टक्केवारी 100 आहे.

०००००००

‘अद्रका’ची शेती दोन एकरावर, उत्पन्न मिळाले १० लाखांवर

अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पावणे दोन एकरात आले (अद्रक) शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई, जितेंद्र पाटलांनी करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पारंपरिक शेतीमध्ये अनेकदा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पांरपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी विविध प्रयोग करत असतात. काही शेतकऱ्यांनी तर मिश्र शेतीकडे मोर्चा वळवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने मिरचीच्या शेतीला प्राधान्य देतात. हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेपासून जवळ असल्यानं शेतकऱ्यांना देखील तेथील बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचं दिसून येतं. नंदुरबार जिल्ह्यातील जितेंद्र पाटील या शेतकऱ्यानं आले शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय. पाटील यांनी दोन एकरात १६ टन आल्याचं उत्पन्न घेतलं आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रासह, गुजरात, मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्यांकडून जागेवरच त्यांच्याकडून चाळीस रुपये प्रति किलोनं हे आले खरेदी केली जात आहे.

शेती हा बिनभरवशाचा व्यवसाय आहे. मात्र, शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते हे जितेंद्र पाटील यांनी दाखवून दिले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी आले (अद्रक) शेती करत शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.

जितेंद्र पाटील यांच्याकडे एकूण १४ एकर जमीन असून त्यांची काही जमीन त्यांच्या गावाजवळ आहे. गावाजवळ असलेल्या जमिनीत पाळीव, जंगली प्राणी आणि अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यासारख्या कारणांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. त्यामुळे त्यांनी पावणे दोन एकर जमिनीत काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले. पाटील यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत कृषी विभाग व नंदुरबार येथे नव्याने निर्मित शासकीय कृषी महाविद्यालयातील तज्ञांच्या मदतीने आले शेती करण्याचे नियोजन केले

श्री. पाटील यांनी आले बियाणे नाशिक येथून वीस रुपये किलोने खरेदी केले होते. आता त्यांनी आपल्या शेतातून आले काढण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश मधील व्यापारी जागेवर चाळीस रुपये किलो दराने त्यांच्याकडून आले खरेदी करत आहेत. पाटील यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत दोन लाख रुपयांचा खर्च केला आहे. दोन एकरात दहा लाखापर्यंतचं उत्पन्न मिळालं आहे. खर्च वजा जाता आठ लाख रुपये निव्वळ नफा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारपेठेचा अंदाज पाहून शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शाश्वत उत्पादनाचा मार्ग खुला होत असतो, असं जितेंद्र पाटील म्हणाले, बाजारपेठेत ‘आले’ म्हणजेच अद्रकला चांगली मागणी असते, हे लक्षात घेवून पारंपरिक पिकांना फाटा देत जितेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श उभा केला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

* पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वाटचाल.

* क्षेत्र पावणेदोन एकर, खर्च ₹ २ लाख, उत्पन्न ₹ १० लाख.

* कृषी विभाग व शासकीय कृषी महाविद्यालयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन.

* महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून जागेवरच खरेदी.

* शेतीच्या नव्या प्रयोगातून गवसला शाश्वत शेतीचा मूलमंत्र.

 

रणजितसिंह राजपूत,
जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची

सुधारणासह स्वच्छता करणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. भुसे म्हणाले की,  एस. टी.च्या वाहक आणि चालकांना रात्री बस मुक्कामी गेल्यानंतर तेथे विश्रांतीसाठी असणारी सुविधा अतिशय अपुरी आहे, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील आणि तातडीने तिथे सुधारणा करण्यात येईल.

सध्याच्या परिस्थितीत वाहक आणि चालकांना मिळणाऱ्या रात्रीच्या वस्ती भत्त्यात  सन 2018 मध्ये वाढ करण्यात आली आहे.  गावपातळीवर 75 रुपये, जिल्हा पातळीवर 90 रुपये आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात रात्रीचा वस्ती भत्ता 100 रुपये इतका देण्यात येत आहे. अधिकृत संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा करून त्यात जसे ठरेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सध्या एस. टी.च्या वतीने 75 वर्षे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत, महिलांना बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बसस्थानकांचे नूतनीकरण करताना त्याठिकाणी चालक आणि वाहक यांना निवासाची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

विविध विभागांकडून एस. टी.ला विविध सवलतीपोटी देण्यात  येणारी रक्कम वेळेत मिळण्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांच्यासह श्रीमती मनीषा कायंदे, श्रीमती उमा खापरे यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/15.03.2023

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा लवकरच

भरणार – मंत्री गुलाबराव पाटील

अनुसूचित जमाती प्रवर्गातून नेमणूक होऊन  शासकीय अधिकारी,कर्मचारी अनेक वर्षे कार्यरत होते. मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना अधिसंख्य पदावर नेमण्यात आले आहे. या नेमणुकीनंतर रिक्त झालेल्या जागा लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

 

राज्यातील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना अधिसंख्य पदाचा

पदभार दिल्यासंबंधी सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यातील अनुसूचित जमातीच्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
यावेळी सदस्य विक्रम काळे, जयंत पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये आवश्यक

सोयी-सुविधा देणार – मंत्री संजय राठोड

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, ग्रंथालय, संगणक कक्ष, जेवण, स्वच्छता गृह, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा असणे अपेक्षित आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राज्यातील ४४१ शासकीय वसतिगृहांची तत्काळ तपासणी करण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री संजय राठोड यांनी आज विधान परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात कसूर केल्याप्रकरणी आतापर्यंत ४९ वसतिगृहांतील गृहपालांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय वसतिगृहांमध्ये अनियमितता झाल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहात ३ हजार ३५८ विद्यार्थी असून, त्यांना विविध सोयी सुविधा देण्यात येतात. मात्र, प्राप्त तक्रारीनुसार ५४ वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९ वसतिगृहांत तक्रारीत तथ्य आढळून आले. सर्व गृहपालांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. २८ गृहपालांवर विभागीय चौकशी सुरू आहे, तर पाच गृहपालांना निलंबित करण्यात आले आहे. या वसतीगृहांतील भोजन ठेकेदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य इत्यादी अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

ज्या तालुक्यात वसतिगृहांची आवश्यकता आहे तेथे नव्याने वसतिगृह उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना असून, याअंतर्गत वसतिगृहाप्रमाणेच सोयी सुविधा देण्यात येत असल्याची माहितीही मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, अनिकेत तटकरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं

 मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा बृहत आराखडा

लवकरच अंतिम करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी प्राप्त सूचना व सुधारणा यांचा विचार करून सल्लागारामार्फत संकल्पनात्मक बृहद आराखडा प्राधिकरणास दोन पर्यायासह सादर करण्यात आला आहे. लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई विद्यापीठामार्फत संकल्पचित्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा आराखडा तयार करण्यास विलंब होत असल्याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत डीडीएफ मेसर्स यांना सल्लागार म्हणून नेमले होते. १ कोटी १२ लक्ष ७० हजार इतक्या रकमेच्या कामाचा करारनामा केला आहे. अद्यापपर्यंत पाच लक्ष रूपयेच अदा करण्यात आले आहेत. ॲकॅडमिक ब्लॉकसाठी ३० टक्के, प्रशासकीय ब्लॉकसाठी १० टक्के, खेळासाठी १८ टक्के, विद्यार्थी निवासी करिता १० टक्के, संशोधनाकरिता १२ टक्के,  शिक्षक निवासासाठी ५ टक्के, रस्ते आणि इतर वापराकरता १५ टक्के असा एकूण १०० टक्के विनियोग दाखविण्यात आला आहे. मात्र, सल्लागारामार्फत दिलेल्या दोन पर्यायांपैकी एका पर्यायास विद्यापीठाने अद्याप संमती दिली नसल्याने विलंब झाला आहे. मात्र, लवकरच यासंदर्भात मंत्री स्तरावर बैठक घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मंजुरीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

 

चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार – मंत्री दीपक केसरकर

 

चंद्रपूर शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्राचा कृती आराखडा चंद्रपूर महानगरपालिकेने तयार केला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

येत्या रविवारी मुंबईतील प्रदूषणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात चंद्रपूर शहराच्या विषयावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोळसा वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण खूप होते.  त्यामुळे बंदिस्त कंटेनरमधून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. याशिवाय चंद्रपूर शहराच्या लगत एमआयडीसी, सिमेंट कारखाने आणि इतर औद्योगिक क्षेत्र आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्रांचा एकत्रित कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य सचिन अहिर आणि सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला.

०००

दीपक चव्हाण/वि.सं.अ

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक,दि.१५: शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत, अशा...

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनआढावा

0
सातारा दि. १५ (जिमाका): नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष...

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

0
पुणे, दि. १५: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन...

महिला सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि.१५: महाराष्ट्राने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला आहे. राज्य नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन...

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहवेदना

0
मुंबई, दि. १५: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच...