सोमवार, जून 16, 2025
Home Blog Page 1446

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस सुरूवात

 मुंबईदि. १६ : राज्य शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या एकूण २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहेअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मान्यता घेण्यात आली असून या शासकीय रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँकफोर्टमुंबईद्वारे दि. १६ मे २०१९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक २१ मार्च२०२३ रोजी त्यांच्या फोर्टमुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बीडस् दिनांक २१ मार्च२०२३ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकमुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 23 मार्च2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून दिनांक 23 मार्च2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी 11 वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 23 मार्च2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 23 मार्च2034 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 23 सप्टेंबर व 23 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाच्या 16 मार्च2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

पीक विम्याची रक्कम ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचे

विमा कंपन्यांना निर्देश – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. १६ :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप – २०२२ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई रक्कमेचे ३१ मे, २०२३ पर्यंत वाटप करण्यात येईल. याबाबत कार्यवाही करण्यास कसूर करणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.

यावेळी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात भारतीय कृषि विमा कंपनी, एचडीएफसी अर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाच विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचना, नुकसानभरपाई लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्या याचा वेळोवेळी आढावा मंत्रालयीन स्तरावर या विमा कंपन्यांकडून घेण्यात येतो. त्याचबरोबर, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि कृषि अधिकारी हे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचा नियमित आढावा घेत असतात. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठीचे अर्ज विविध कारणे दाखवून फेटाळल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या १५ दिवसांत या विमा कंपन्यांनी या प्रकरणी फेटाळलेल्या अर्जांची पुन:तपासणी करुन कार्यवाही करण्यास संबंधित कंपन्यांना निर्देश दिले जातील, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही शेतकऱ्याने पीक नुकसानीबाबतची माहिती दिली असेल तर त्यांना निश्चितपणे नुकसानभरपाई दिली जाईल, असे सांगून मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, सर्व विमा कंपन्यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, हे निश्चितपणे पाहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी पीक विमा योजनेसंदर्भात आकडेवारी सभागृहासमोर मांडली. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२२ मध्ये राज्यातील एकूण ५७ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले. एकूण ६३ लाख ४० हजार लाभार्थ्यांना २ हजार ८२२ कोटी ३२ लाख रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली असून त्यापैकी २ हजार ३०५ कोटी रुपये ५४ लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. उर्वरित नुकसानभरपाई वाटप सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

याशिवाय, या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीपोटी आतापर्यंत १ हजार ६७४ कोटी ७९ लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

यावेळी सदस्य एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, सुरेश धस, नीलय नाईक, राजेश राठोड, प्रवीण पोटे पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

दीपक चव्हाण/विसंअ/

०००

बोगस खते, बी-बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध

कडक कारवाई – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

बोगस खते, बियाणे आणि किटकनाशके यांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आणि विक्रेत्यांविरुद्ध कडक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणात कोणाचाही सहभाग असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,  अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, राज्यात विविध ठिकाणी आठशेहून अधिक खत विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली.  तेथील ५१ हजार ८४४ नमुने तपासण्यात आले. याप्रकरणात ९६२ दावे दाखल करण्यात आले असून ७७ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तपासणीत ७६ परवाने रद्द करण्यात आले तर ५३ दुकानांना विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्यात या तपासणीत ६ कोटी ३३ लाख रुपयांचा बोगस खते, बी-बियाणे यांचा २ हजार ३६५ मेट्रीक टन साठा जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

परभणी येथे बोगस खत विक्री प्रकरणी संबंधीत गुजरातमधील कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. याशिवाय, जिल्ह्यात एकूण ७८ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोषी आढळलेल्या ८ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिली.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

दीपक चव्हाण/विसंअ/

000

प्रत्येक गावात पतसंस्था सुरू करणार – सहकार मंत्री अतुल सावे

सहकार आयुक्तालयांतर्गतच्या पतसंस्था गावोगावी उभारण्यासाठी नवीन निकष तयार करण्यात येत आहेत. यासंदर्भातील नियमावली अंतिम झाल्यावर निकषांत बसणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती, सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.

पतसंस्थांच्या कार्यक्षेत्रात वाढ व शाखा विस्तार प्रस्तावांच्या अनुषंगाने सदस्य जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलत होते.

मंत्री श्री.सावे म्हणाले, पतसंस्थांची नोंदणी, कार्यक्षेत्र वाढ आणि शाखा विस्तार याबाबत नवीन निकष निश्चित करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक गावात पतसंस्था करण्यासाठी निकषांचे पालन करणाऱ्या संस्थांना परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

मल्टीस्टेट बॅंकेत गैरव्यवहार झाला असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करणार. याचबरोबर अडचणीत पतसंस्था गेल्यास ठेवीदारांचे नुकसान होऊ नये यासाठी विमा काढण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आल्याचे मंत्री श्री.सावे यांनी उपप्रश्नास उत्तर देताना सांगितले. यावेळी सदस्य एकनाथ खडसे, प्रा. राम शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

विधानपरिषद लक्षवेधी

शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन नोंदणीसाठी

मुदतवाढ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नॅक मुल्यांकनबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परीस स्पर्श योजना

मुंबई दि. १६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक संस्थांना नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नॅक मुल्यांकन करुन घेण्यासाठीची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन प्रक्रियेतील अडीअडचणी सोडविण्यासाठी परिस स्पर्श योजना प्रस्तावित असल्याचेहीमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले

सदस्य कपिल पाटील यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.  पाटील यांनी माहिती देतांना सांगितलेराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांनी नॅक मानांकन व मूल्यांकनाच्या प्रक्रियेत आपली गुणवत्ता राखणेगुणवत्ता वाढ करणे अपेक्षित आहे. यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी मदत व प्रोत्साहन देण्यात येत आहे. तथापि सन 2010 पासुन वारंवार शासन स्तरावरून सूचना देऊनही शैक्षणिक संस्था याबाबत उदासीन दिसून येत आहेत. नुकतेच शासनाने पुढील सहा महिन्यात नॅक मूल्यांकन करून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच वेळोवेळी विविध कार्यशाळा घेऊन नॅक मूल्यांकन नोंदणीसाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहेअसे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या जात आहेत. यासाठी परिस स्पर्श योजना प्रस्तावित असून 175 नॅक पात्र महाविद्यालयांना मेंटोर म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या महाविद्यालयांद्वारे प्रत्येकी पाच महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

उच्च शिक्षण विभागाचे संचालक यांनी नॅक मूल्यांकनासंदर्भात महाविद्यालयांना दिलेल्या सूचनामुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता घेण्यात येईल असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

या चर्चेत सदस्य विक्रम काळेअभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ/

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर

पूर्ण करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

नागपूर येथे १०० खाटांचे कॅन्सर रूग्णालय उभारण्याचा निर्णय ६ मार्च २०१९ रोजी घेण्यात आला होता. विविध कारणांनी हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हे काम करण्यात येत असून येत्या दीड ते दोन वर्षात रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, कॅन्सर रूग्णालयाच्या कामासाठी २०२१ साली निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तथापि विविध कारणांनी काम होऊ शकले नाही. यानंतर यासंदर्भात नऊ सदस्यीय समिती नेमण्यात येऊन त्यांच्या अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत काम हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय तंत्रविज्ञान संस्थेमार्फत (एनआयटी) रूग्णालयाचे बांधकाम करण्यात येऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच यंत्रसामग्री देखील तत्काळ खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

सरपंच, उपसरपंच यांना संगणक प्रणालीद्वारे विहित

वेळेत मानधन – मंत्री गिरीष महाजन

राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना संगणक प्रणालीद्वारे मानधन वितरित करण्यात येत आहे. यामध्ये सुसूत्रता आणि सुस्पष्टता असून मानधन वेळेत देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या ग्रामपंचायत खाते आयसीआयसीआय (ICICI) बँकेत आहे. ही खाती इंडियन पोस्टल पेमेंट बँक मध्ये हस्तांतरीत करण्याची मागणी होत आहे. याबाबत योग्य ते सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले. कोरोना कालावधीत कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सरपंच व उपसरपंच यांना मदत देण्याबाबत शासन सर्व माहिती घेऊन उचित कार्यवाही करेल असेही त्यांनी सांगितले.

नवी मुंबई मध्ये सरपंच भवन उभारण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागातील घरकुलांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना सुद्धा २ लाख ५० हजार अनुदान मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही, श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रीमती मनीषा पिंगळे/ व.स.सं.

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई, दि. १६ :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स आणि संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली. मराठा समाज आरक्षणाशी संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाज आरक्षणातील २०१८ पासून ते ५ मे २०२१ पर्यंतचे टप्पे विस्ताराने मांडले. आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची समीक्षा करण्यासाठी न्या. दिलीप भोसले यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने शिफारस केल्याप्रमाणे पुढची पावले टाकली जात आहेत. यात पुनर्विचार याचिका दाखल करणे, निष्कर्षाला आव्हान आणि एसईबीसी सवलतीबाबत आयोग नियुक्त करणे तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडेही दाद मागणे अशा अनेक गोष्टीवर कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी मराठा समाज आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असल्याबाबतची माहितीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात दिली.

दरम्यान, मराठा समाज आरक्षणाच्या अनुषंगाने एका व्यापक शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर आर्थिक स्वरुपाच्या अशा सुविधा देण्यात कुठलीही कमतरता ठेवली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती, परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती यासोबतच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पतपुरवठ्याची मर्यादाही १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. महामंडळाच्या भागभांडवलाच्या अटीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्याकडेही पाठपुरावा केला जात आहे. या महामंडळासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी अर्थसंकल्पाताही भरीव तरतूद केली आहे. मराठा समाजातील तरुणांना सोयी सुविधा मिळाव्यात, रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवीन योजना सुरु केल्या आहेत. यात कुणबी मराठा दाखले मिळावेत यासाठी समिती स्थापन केली आहे. विशेषतः मराठवाडा व विदर्भातील निजामशाहीतील सनदा आणि करार आदी राष्ट्रीय दस्तावेजांचाही अभ्यास केला जात आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातूनही निर्वाहभत्ता देण्यात येत आहे. सारथी संस्थेस आतापर्यंत ३८९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना, छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण, राजमाता जिजाऊ सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण, श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो-जर्मन टूल रुम अंतर्गत प्रशिक्षण यावरही भर देण्यात येत आहे. सुमारे एक लाख मराठी युवकांना रोजगार-स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. मराठा समाज आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांच्या कुटुंबातील २० व्यक्तींंना राज्य परिवहन महामंडळात सेवेत दाखल करून घेतले आहे. यात कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. कोपर्डी खून खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यानी नमूद केले.

सर्वोच्च न्यायायालयाने आरक्षण रद्द करण्यापूर्वी निवड झालेल्या पण नियुक्ती न झालेल्या १ हजार ५५३ उमेदवारांना अधिसंख्य म्हणून नियुक्ती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत त्यांना ओबीसीच्या सर्व सवलती, लाभ दिले जातील. यात ओबीसीं बांधवांच्या सवलती, लाभांमध्ये कुठेही तडजोड केली जाणार नाही. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, ही काळजी घेतली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा समाज आरक्षणासाठी या विषयातील ज्येष्ठ , अनुभवी विधीज्ज्ञांचा टास्क फोर्स गठीत केला आहे. त्यामध्ये अॅड. हरिष साळवे यांच्यासह, अॅड. रोहतगी, पटवालिया, अॅड. विजयसिंह थोरात, अॅड. अक्षय शिंदे यांचा समावेश आहे. मराठा समाज आरक्षणाचा न्यायालयीन लढा जिंकूच. त्यासाठी वकीलांची फौज, आरक्षणासाठी प्रय़त्नशील अशा सर्वांना विश्वासात घेऊन हा लढा पूर्णपणे ताकदीने लढू, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

000

ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, दि १६ :- ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी ह्युंदाई मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉसिक थाॅमस किम, जनरल मोटर्सचे कॉर्पोरेट विकास संचालक जोसेफ उर्सो, जनरल मोटर्सचे ग्लोबल पब्लिक पॉलिसी संचालक, श्री. थॉमस कारगिल, जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष, (मॅन्युफॅक्चरिंग), श्री असिफहुसेन खत्री,
कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. उद्योगांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे. सर्व संबंधित विभाग आणि यंत्रणांमार्फत उद्योगांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ह्युंदाईचे कार्यकारी अध्यक्ष डॉसिक थाॅमस किम म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था बळकट असून महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी तसेच विस्तारासाठी मोठ्या संधी आहेत. सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रात भारतात कंपनीमार्फत भरीव काम करण्यात येत असून आगामी प्रकल्प नवीन तंत्रज्ञानावर आधारित असतील असे किम यांनी सांगितले.

जनरल मोटर्सचे कॉर्पोरेट विकास संचालक जोसेफ उर्सो म्हणाले, महाराष्ट्रात उद्योग उभारणीचा आणि उद्योग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अतिशय सुखद आहे. उद्योग उभारणी आणि विस्तार करताना कामगारांच्या हिताचा पूर्णपणे विचार करण्यात येईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे उद्या व्याख्यान

मुंबईदि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सामाजिक कार्य या विषयावर ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲप वर शुक्रवारदि. १७ व शनिवार दि. १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सामाजिक सुधारणेत मोठे योगदान आहे. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची सुरुवात बडोदा संस्थानातून झाली होती. सामाजिक क्षेत्रातील महाराजांच्या अभूतपूर्व कार्याबद्दल दिलखुलास‘ कार्यक्रमातून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या व्याख्यांनातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

000

विधानसभा लक्षवेधी

गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी कृती आराखडा तयार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईदि. १६ : नाशिक महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांटचे आधुनिकीकरण अमृत योजनेच्या माध्यमातून करण्यात येईल. नांदेड ते त्र्यंबकेश्वर पर्यंत गोदावरी नदी शुद्धीकरण करण्यासाठी शासनाने कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

सदस्य हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील गोदावरी नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीत्र्यंबकेश्वर शहराची सन 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून संपूर्ण शहरासाठी 4.5 एम.एल.डी. क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह भुयारी गटार योजनेस शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार आहे.

उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. याच पद्धतीने जलपर्णी नष्ट करण्यासाठी हर्बल फवारणी पद्धतीचा वापर याबाबतची योजना नगर विकास विभागामार्फत तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य छगन भुजबळसरोज अहिरे यांनी सहभाग घेतला.

०००

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट ३४ गावांच्या

पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासनाने पुण्याच्या हद्दीलगतची २३ गावे सन २०२१ मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली आहेत. पायाभूत सुविधा व नियोजनबद्ध विकास व्हावायासाठी या गावांचा महानगरपालिकेत समावेश केला आहे. या 34 गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाहीअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सुनील टिंगरे यांनी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 23 गावांच्या पायाभूत सोयी सुविधांच्या गैरसोयीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 34 गावांपैकी 11 गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच 23 गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत तयार करण्यात येत आहे. 1200 कोटींचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन योजना व इतर सर्व योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या गावांना सर्व मूलभूत सोयी देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिकेत आहे.

लोकसंख्येचा विचार करून नगरसेवकांची संख्या ठरवण्यात येते. फेररचनेमध्ये नगरसेवकांच्या संख्येबाबत सर्वंकष विचार करण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवारसदस्य संजय जगतापअशोक पवार यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्यासाठी

समिती गठित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये शासनाला सकारात्मक सूचना मिळाव्यात आणि येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढता यावा यासाठी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील निवडक सदस्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सदस्य अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण च्या पात्रतेबाबत परिशिष्ट दोन मधील यादी सात दिवसांच्या आत संकेतस्थळावर देण्यात येते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत झोपडपट्टी मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आधार पडताळणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहेत्यामुळे अपात्र लोक यात येणार नाहीतअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्विकास तसेच पुनर्वसनाबाबत प्रधानमंत्री महोदयांच्या सल्लागार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सुद्धा सक्तवसुली संचालनालयाकडून पुनर्वसन प्रकल्पांबाबत परवानगी मिळण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने विनंती करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

शांती डेव्हलपर्स आणि सर्वधर्मीय सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे पुनर्वसन होत असलेल्या सहा हजार धारकांना घर भाडे मिळवून देणार असून म्हाडाच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातही स्वयंपुनर्विकास पथदर्शी स्तरावर प्रकल्प करण्यात येईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकरअस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत व्यवस्था उभारणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईदि. 16 : वाघ आणि बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जंगल कमी वेगाने वाढत आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करून व्यवस्था उभी करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सदस्य जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात बिबट्यांमुळे सर्वसामान्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीविभागीयवनपरिक्षेत्र व परिमंडळ स्तरावर वन्यजीव बचाव पथकाची स्थापना करण्यात आली. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून गस्ती पथकाद्वारे नियमित गस्त घालणे तसेच जनजागृतीद्वारे प्रबोधन करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिल बाबरसंजय कुटे यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

भोगवटादार रुपांतरणासाठीच्या अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस

मुदतवाढ – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने दिलेल्या शासकीय जमिनीच्या भोगवटादार वर्ग १ मधील रुपांतरणासाठी आकारावयाच्या अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार आहे. ही मुदतवाढ ७ मार्च २०२४ पर्यंत असून लवकरच मुदतवाढीबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्ट‌याने प्रदान केलेल्या जमिनींना भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरित करण्याबाबतची  तसेच वर्गवारीनुसार बाजार मूल्याच्या १० ते १५ टक्के रक्कम आकारणे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी उत्तर दिले.

श्री. विखे- पाटील म्हणाले की, शासनाने यापूर्वी वेळोवेळी भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनींना भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरित करण्याबाबतचे नियम प्रसिध्द केले आहेत. शासनाने कब्जेहक्काने/भोगवटादार वर्ग २ च्या धारणाधिकारावर अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीच्या धारणाधिकाराचे सवलतीच्या दराने अधिमूल्याची रक्कम भरुन भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरण करण्याचा कालावधी ७ मार्च २०२२ रोजी संपला आहे. सन २०२० ते २०२२ पर्यंत कोविड पार्श्वभूमीवर सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ मिळण्यासाठी प्रारुप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करुन हरकती  आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. आता मात्र अधिमूल्यांच्या वरील सवलतीच्या दरांना 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून लवकरच याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. अधिमूल्याच्या दरामध्ये नियम प्रसिध्द केल्यापासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7 मार्च 2022 पर्यंत सवलतीचे दर 10 ते 25 टक्क्यांपर्यत आकारण्याची तरतूद होती. आता हे सवलतीचे दर किती असतील याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील.

 

वर्षा आंधळे/वि.सं.अ

०००

नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत कामांसंदर्भात बैठक घ्यावी-विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट

मुंबई, दि. १६ : ग्रामविकास विभागाने नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेंतर्गत करण्यात आलेल्या कामांबाबत लोक प्रतिनिधींसमवेत बैठक घ्यावी, अशा सूचना विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिल्या.

सुनील केदार यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये नागपूर जिल्हापरिषदेतील कामांबाबतची  लक्षवेधी सूचना मांडली होती. याला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उत्तर दिले.

श्री. महाजन म्हणाले की, नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत जलसंधारण विभाग, बांधकाम विभाग आणि लघुसिंचन विभागातील वर्ग केलेली सर्व कामे रितसर ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब करुन देण्यात आलेली आहे. दरम्यान काम देण्यात आलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर ग्रामविकास विभागाने या कंपनीविरोधात दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केली आहे. दरम्यान सदर कंपनी मा.उच्च न्यायालयात गेल्याने आणि या प्रकरणात स्थगिती मिळाल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

00000

वीज बिल भरण्यासाठी ठराविक टप्पे देण्याचा विचार- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १६ : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गावात पाणी पुरवठ्यासाठी प्रादेशिक योजना सुरु केल्या जातात. योजनांचे काम पूर्ण झाल्यावर त्या संबंधित जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतीकडे वर्ग होतात मात्र सदर पाणीपुरवठ्याचे विद्युत देयक अनेक ग्रामपंचायती भरत नसल्याने वीज खंडित केली जाते. येणाऱ्या काळात वीज बिल भरण्यासाठी ठराविक टप्पे देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

सदस्य समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी उत्तर दिले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील भोसे आणि 39 गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत 11 जुलै 2014 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ही योजना जून 2017 मध्ये पूर्ण करण्यात येऊन जून 2017 ते फेब्रुवारी 2020 या काळात सर्व गावांना सुरळीत पाणी पुरवठा करीत होती. नंतरच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली.  ही योजना सुरळीत सुरु होती, मात्र विद्युत देयके अदा न केल्याने ही योजना बंद पडली. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विद्युत देयक भरल्यास योजना सुरु करण्यात येणार आहे.

00000 

पदोन्नतीतील आरक्षणाबाबत १७ जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी- मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १६ : आरक्षणासंदर्भातील नियम काय असावेत तसेच ते कोणत्या निकषाद्वारे देण्यात यावे याबाबत महाराष्ट्रासह 11 राज्ये न्यायालयात दाद मागत आहेत. राज्य शासनामार्फत आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबतची सुनावणी 17 जुलै 2023 पासून नियमित होणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

बळवंत वानखेडे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पदोन्नतीतील आरक्षण याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की,  महाराष्ट्रात देण्यात येणारे आरक्षण आणि त्याबाबतचे नेमके धोरण काय असेल याबाबतची विस्तृत मांडणी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कपिल सिब्बल, ॲड. अभिषेक मनू संघवी, ॲड. परमजितसिंह पटवालिया आणि ॲड. राकेश राठोड करणार आहेत. राज्य शासनाने त्यांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती केलेली आहे. पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालानुसार राज्यामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

00000

वर्षा आंधळे/विसंअ

पुणे महानगर प्राधिकरणातील बांधकामांमधील अनियमितता

तपासण्यासाठी लवकरच समिती – उद्योग मंत्री उदय सामंत

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासक बांधकामांचे नियम धाब्यावर बसवून काम करीत आहे अशा तक्रारी येत आहे. त्यामुळे या कामांमध्ये अनियमितता तपासण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समिती स्थापन करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत होत असलेल्या अनियमित कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.

श्री. सामंत म्हणाले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना 2015 मध्ये झाली. प्राधिकरणामार्फत विकासकांना बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात येते, मात्र या कामात अनियमितता असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ही अनियमितता तपासण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या स्तरावर अधिवेशन संपल्यानंतर आठ दिवसांच्या आता समिती स्थापन करण्यात येईल. या समितीमध्ये विभागीय आयुक्तांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश असेल. याशिवाय समिती स्थापन झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात याबाबतचा अहवाल घेण्यात येईल.

 

वर्षा आंधळे/वि.सं.अ/

000

 

मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक   मंत्री दीपक केसरकर

राज्यातील विशेषत: मुंबईतील हवाप्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवाय ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

सदस्य मिहीर कोटेचा, सुनील राणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये मुंबईतील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवेतील गुणवत्ता कमी होत असल्याबाबतची  लक्षवेधी सूचना मांडली होती. याला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले.

श्री. केसरकर म्हणाले की, सध्या मुंबई आणि मुंबई परिसरात पायाभूत सुविधांची अनेक कामे सुरु असल्याने हवेतील प्रदूषण वाढत आहे. मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी नेमके काय करता येईल याबाबत एक बैठक तातडीने येत्या रविवारी म्हणजेच 19 मार्च रेाजी घेण्यात येणार आहे. या बैठकीला या विषयातील तज्ज्ञांबरोबरच सर्व समिती सदस्य तसेच मुंबईच्या सर्व आमदारांना बोलविण्यात येणार आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत प्रकल्पांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, बांधकामाच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सभोवताली बॅरिअर्स, पत्रे लावणे असे काही उपाय सुचविण्यात आले आहेत.

राज्यातील जनतेला शुद्ध हवा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे ठाणे, चंद्रपूर येथील हवेचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच राज्यातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

 

जलजीवन मिशन अंतर्गत ३८ हजार गावांमध्ये

दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर

 

जलजीवन मिशनमध्ये पूर्वीचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. या मिशनअंतर्गत ३८ हजार गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी २२ हजार गावांमध्ये कामे सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, या योजना ३० वर्षांसाठीच्या कालावधीसाठी असून जेथे शक्य आहे तेथे या योजना सौर ऊर्जेवर सुरू करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योजनेच्या पायाभूत सुविधांच्या भांडवली किंमतीच्या १० टक्के एवढी लोकवर्गणी गोळा करण्यात येते व ती ग्रामपंचायतीच्या खात्यात राहते. तर डोंगराळ / वन भागामध्ये व अनुसूचित जाती/ जमातीची लोकसंख्या असलेल्या क्षेत्रासाठी किमान पाच टक्के लोकवर्गणी गोळा करण्यात येते. या लोकवर्गणीची रक्कम आर्थिक, वस्तुरूपात किंवा श्रमदानाच्या स्वरूपात अदा करायची आहे. तथापि लोकवर्गणी न भरल्यामुळे कोणतेही काम थांबवले नाही, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या संदर्भातील चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, जयंत पाटील, नरेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

विधानसभा प्रश्नोत्तरे

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच

पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १६ : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी १२०० मीटर रस्त्याचे, तर डिसेंबरपर्यंत ४.५ किमी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

सदस्य संजय जगताप, छगन भुजबळ, चंद्रकांत भिंगारे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे ९६२ ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याच्या कामाबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, येथील स्थानिक रहिवाशांनी या रस्त्याच्या कामाला हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. सध्या या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून वाहनांची या रस्त्यावरुन ये जा करण्याची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पण तात्पुरते काम न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात १२०० मीटर रस्त्याचे काम तर डिसेंबरपर्यंत ४.५ किमी रस्त्याच्या पॅचचे काम, पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या २५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात येईल. १२०० मीटर लांबीमध्ये ७ मीटर रुंदीचे काँक्रिटीकरणाचे काम मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/वि.सं.अ./

 

लाकडी साकवासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी लवकरच

बैठक – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

ज्या ठिकाणी पूल नसतात, त्या ठिकाणी लाकडी साकवाचा वापर केला जातो. लाकडी साकवासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठक घेण्यासंदर्भात विनंती करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य राजन साळवी, भरत गोगावले, वैभव नाईक, ॲड.आशिष शेलार, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, शेखर निकम, विश्वजित कदम आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी लाकडी साकवासंदर्भातील प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता, त्यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी उत्तरात ही माहिती दिली.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की,  कोकणात असे जवळपास चौदाशेपेक्षा हून अधिक साकव नादुरुस्त असून त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्ती ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेच्या निधीतून करण्यात येते. मात्र हे न झाल्याने बऱ्याच साकवांची दुरुस्ती राहिली आहे. साधारणपणे एका साकवासाठी 30 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. याबाबत काही निश्चित धोरण ठरविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल.

०००

वर्षा आंधळे/वि.सं.अ./

नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र

पोर्टलवर – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे- पाटील, धनंजय मुंडे, रोहित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. देवराव होळी, हरिभाऊ बागडे यांनी टीईटी परीक्षा घेऊन शिक्षण भरती करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३० हजार शिक्षक भरती करणार आहे. विशेष म्हणजे शिक्षकांचा पदभरतीसाठी टीईटी परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणार आहे.

२०१७ नंतर आता २०२३ मध्ये टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या वेळी १२ हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करीत असून ७ हजार ९३० शिक्षकांची भरती करण्यात आली होती. आता शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी मिळाल्याने ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. टीईटी परीक्षेत दोषी असलेल्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

000

वर्षा आंधळे/वि.सं.अ./

 

लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

बंद नाहीउद्योग मंत्री उदय सामंत

 

लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) प्रकल्प बंद नसल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य रवींद्र वायकर, आदिती तटकरे, संग्राम थोपटे यांनी लोटे येथील औद्योगिक वसाहतीतील सामूहिक सांडपाणी प्रकल्पाच्या साठवण टाकीतील गाळ काढण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की,  लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) च्या साठवण टाकीतील गाळ काढण्याचे काम जानेवारीमध्ये मे.लोटे परशुराम प्रायव्हेट एनव्हायरमेंट को – ऑप सोसायटीमार्फत सुरु करण्यात आले. काही कारणांमुळे गाळ काढण्याचे काम मंदावले असले तरी आता गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या सांडपाणी प्रक्रिया करण्याचे काम सुरुळीत सुरु आहे. येणाऱ्या काळात राज्यातील सर्व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा आढावा घेण्यात येईल.

000

वर्षा आंधळे/वि.सं.अ./

केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार – मंत्री रवींद्र चव्हाण

आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील  केशरी शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य संतोष दानवे, अतुल भातखळकर आणि सुलभा खोडके यांनी राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्यांऐवजी थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

श्री. चव्हाण म्हणाले की, राज्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे. गेल्या काही काळापासून केंद्र शासनामार्फत राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारा गहू आणि तांदूळ देण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता प्रति माह प्रति लाभार्थी १५० रुपये इतकी रक्क्म लाभार्थींच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

000

वर्षा आंधळे/वि.सं.अ./

विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ कार्यक्रमातून गायक मुकेश यांना आदरांजली

मुंबई, दि. १५ : हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक मुकेश यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ या गीतांवर आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे पुत्र नितीन मुकेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गीते गायिली.

गायक मुकेश यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीत मैफलीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यासाठी कै. मुकेश यांचे गायक सुपुत्र नितीन मुकेश यांचा ‘शतायु मुकेश’ हा कार्यक्रम आज सायंकाळी विधान भवन प्रांगणातील हिरवळीवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, गायक मुकेश यांचे यंदाचे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम होत आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कार्यक्रम आयोजित केला होता. गायक मुकेश यांची गीते आजही ऐकली जातात. त्यांची गाणी अवीट गोडीची आणि अविस्मरणीय आहेत. गायक मुकेश यांनी आपल्या गीतातून वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन केले. त्यांचा गौरव करण्याची संधी विधिमंडळाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली आहे.

गायक नितीन मुकेश म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधान मंडळाच्या प्रांगणात गायनाची संधी मिळाली हा माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण आहे. मी जन्माने मुंबईकर आहे. या शहराशिवाय जगू शकत नाही. मराठीत बोलताना आपुलकी वाटते, असे सांगत त्यांनी वडील मुकेश यांच्या आठवणींना उजाळा दिला. नितीन मुकेश यांनी मेरा नाम जोकरमधील ‘जीना यहा- मरना यहा’, एक दिन बिक जायेगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘कही दूर जब दिन ढल जाये’, ‘चाँद आहें भरेगा- फूल दिल थाम लेंगे’, ‘जो तुमको हो पसंद, वही बात करेंगे’ यासह गायक मुकेश यांनी गायिलेली अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली.

०००

गोपाळ साळुंखे/स.सं.

वाराणसीच्या धर्तीवर नाशकात गोदा आरती सुरू करणार ! – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

मुंबई, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू झाला आहे.  या पर्वात वाराणशीच्या धर्तीवर नाशिक येथे भव्यदिव्य स्वरूपात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

आज मंत्रालयात यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेतली. या उपक्रमसाठी विशेष समिती गठीत करुन याबाबत  विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी डी. गंगाधारन यांच्यासह नाशिक महापालिकेचे उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विविध विभागांचे अधिकारी, पुरोहित संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले, हा उपक्रम अतिशय भक्तीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे यामध्ये लोकसहभाग वाढवून सर्वसामान्य जनतेकडून सूचना मागविण्यात याव्यात. आरती ज्या ठिकाणी प्रारंभ करायची आहे तो परिसर तसेच नदी स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी. स्वच्छता केंद्र, आकर्षक रोषणाई, पुरेशी वाहन पार्किंग व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, भाविकांना उभे राहण्याची किंवा बसण्याची प्रशस्त सोय तसेच स्थानिक छोटे व्यावसायिक व रहिवाशी यांना विश्वासात घेऊन शिस्तबद्ध रित्या नियोजन करण्यात यावे.

या बैठकीत उपस्थित आमदार तसेच पुरोहित संघाच्या वतीने महत्वपूर्ण सूचना मांडण्यात आल्या त्याची दखल श्री.मुनगंटीवार यांनी घेतली.

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनो देश व राज्याचा नावलौकीक वाढवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
सातारा, दि. १६:  शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती...

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित

0
मुंबई, दि.१६ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स मोटर्सचे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांना अलीकडेच अरुत्चेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्काराने...

माजी सैनिकांच्या मागण्यांचा सुधारित प्रस्ताव सादर करा – मंत्री शंभूराज देसाई

0
मुंबई, दि.१६ : माजी सैनिकांच्या विविध मागण्या लक्षात घेता सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना माजी सैनिक कल्याण मंत्री...

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

0
पुणे, दि.१६ : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद...

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक,दि.१५: शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत, अशा...