मंगळवार, जून 17, 2025
Home Blog Page 1445

शेगाव विकास आराखड्यातील कामे प्रशंसनीय – विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे

बुलडाणा, दि. १८ : शेगाव विकास आराखड्यातील कामे उत्कृष्टरित्या पूर्ण करण्यात आली आहे. इतर आराखडे राबविताना याचा निश्चित लाभ होणार आहे, असे मत विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी व्यक्त केले.
शेगाव येथील विश्रामगृहात विकास आराखड्यातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपूते, जिल्हा नियोजन अधिकारी सूनय लाड आदी उपस्थित होते.
डॉ. पांडे यांनी शेगावच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामाचा आढावा घेताना न्यायालयाच्या निर्देशानुसार कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. चौदा क्रमांकाचा रस्ता विकासासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. हे काम कोणत्याही परिस्थितीत एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावे. वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देताना ज्या आठ कुटुंबांच्या घराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मंदिर प्रशासनासोबत समन्वय साधून घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
विकास आराखड्यासोबतच शेगाव येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठा नियोजन, नो पार्किंग झोन, अतिक्रमणाबाबतचा आढावा घेतला.
जिल्ह्याचा आढावा घेताना डॉ. पांडे यांनी संपकाळात करण्यात आलेल्या उपययोजना, तसेच परिक्षा सुरळीत सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संसर्गजन्य आजाराची स्थिती असल्याने तसेच संपाचा आरोग्य यंत्रणेवर परिणाम होणार असल्याने याबाबत योग्य उपाययोजना करावी. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान आणि जनावरांची हानी होणार असल्याने यंत्रणांनी सतर्क राहावे. याबाबत तत्काळ माहिती देण्यात यावी.
महसूल उत्पन्न आणि विविध योजनेमध्ये देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. याचा दररोज आढावा घेण्यात यावा. प्रामुख्याने पूनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. जिल्ह्यासाठी जिगाव प्रकल्प महत्वाचा आह आहे. यातील सर्व कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करावे.
यावेळी डॉ. पांडे यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पाचा आढावा घेतला. सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जल पुनर्भरण, रुग्णालय आदी उपक्रमाची माहिती घेतली. तसेच वाहनतळामुळे घरांचा प्रश्न निर्माण झालेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. याबाबत म्हाडाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याची सूचना डॉ. पांडे यांनी केली.
०००

शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि. १८ – अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या  चित्ररथाचे  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रसिद्धी उपक्रमांची माहिती दिली.

अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनावर आधारित विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. एलईडी स्क्रीन असलेले दोन चित्ररथ जिल्ह्यातील सुमारे 150 गावातून फिरणार आहे. चित्रफितीच्या माध्यमातून शासकीय योजनांवर आधारित यशकथा आणि योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. वाहनावरही योजनांची माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे सहकार्य लाभले आहे.

संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याची गरज – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १८ : शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती निर्माण होते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाद्वारे स्वावलंबी करण्यासाठी  प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या बोऱ्हाडेवाडी येथे महिलांसाठी असलेल्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीच्या वसतिगृह आणि महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सचिव डॉ. निवेदिता एकबोटे, प्राचार्य शशिकांत ढोले, माजी महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आज संपूर्ण जग आपल्या देशात होणाऱ्या वेगवेगवेगळ्या संशोधनाकडे लक्ष ठेवून आहे. गेल्या दोन वर्षात देशात  संरक्षण क्षेत्रातील उत्पादन वाढले  आहे. कारण आपण त्याप्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील  उत्पादनावर होणारा खर्च टाळण्यासाठी या क्षेत्राशी संबंधित संशोधनावर भर देण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी अशा  शैक्षणिक सुविधा निर्माण करून त्यांच्यात संशोधनवृत्ती निर्माण करावी. या संशोधनामुळे देश समृद्ध होण्यास मदत होईल.

नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक महिलांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचादृष्टीने महिला शिक्षणाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थीनीच्या जीवनात वसतिगृहाचे महत्वपूर्ण स्थान आहे. मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने  ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या वसतिगृहाची उभारणी केली आहे. येथील विद्यार्थीनी शैक्षणिक जीवनात  वसतिगृह जीवनाचासुद्धा आनंद घेतील. येत्या काळात येथे लवकरच ‘फार्माडी’ अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात येईल.

नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके मराठीत करण्यात येणार आहे. इंग्रजी विषयाचे ज्ञान रूपांतरित स्वरूपात मराठीत मिळण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.

आमदार लांडगे म्हणाले, मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम येथे राबविण्यात येत आहेत. या संस्थेत शिक्षण घेऊन चांगले विद्यार्थी घडावे, त्यांचे आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी संस्था कार्य करीत आहे.

कार्याध्यक्ष डॉ. एकबोटे म्हणाले, महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाची 2004 साली स्थापना करण्यात आली. महाविद्यालयात राज्यासोबतच परराज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज 5 मजली वसतिगृहाचे उद्धाटन करण्यात आले असून यामध्ये प्रत्येक मजल्यावर 38 खोल्या आहेत. या ठिकाणी संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक शिक्षण देण्यावर नेहमी भर देण्यात येत आहे.

सहकार्यवाह डॉ. एकबोटे यांनी प्रास्ताविक केले.

समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.18 : पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या किमान गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत,असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी येथील 24×7 समान पाणीपुरवठा योजना व सुस, म्हाळुंगे येथील नवीन पाणीपुरवठ्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी  सफा बँक्वेट बाणेर येथे आयोजित बैठकीत  ते बोलत होते.

यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे  मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, 24×7 योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी,  उपअभियंता विनोद क्षीरसागर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पुणे शहर हे राहण्यासाठी सर्वोत्तम शहर ठरत असल्याने लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. नागरिकांच्या किमान गरजांना प्राधान्य क्रम राहिला पाहिजे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्र्यांनी बाणेर-बालेवाडी पाणी पुरवठा जलवाहिनी आणि पंपिंगच्या कामाची माहिती घेतली. त्यांनी पाणी साठवण टाकीच्या कामाचीही पाहणी केली.

पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

सध्या बदलत्या वातावरणामुळे उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. आगामी काळात सर्वांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी गाडी धुणे, बांधकाम यांसारख्या तत्सम कामांसाठी वापरणे कटाक्षाने टाळावे.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

खेळण्या-बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे दुख:द – राज्यपाल रमेश बैस

मुंबई ,दि.१८ : जे वय खेळण्या-बागडण्याचे आहे, अभ्यास करण्याचे आहे. त्या वयात मुलांना कर्क रोगासाठी उपचार घेताना पाहणे क्लेशदायक आहे. अशा स्थितीत लहान मुलांची व त्यांच्या  पालकांची मानसिक स्थिती काय होत असेल याचा अंदाज देखील बांधता येत नाही. मुलांना त्यांचे  बालपण मिळत नाही. या पार्श्वभूमीवर कर्क रुग्ण मुलांना तसेच त्यांच्या पालकांना टाटा मेमोरियल सेंटर तसेच अशासकीय संस्थांतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त मुलांनी शनिवारी  दि. 18 आपल्या पालकांसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  लहान मुलांच्या राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरियल सेंटर – इम्पॅक्ट फाऊंडेशन व क्रिश फाऊंडेशन या संस्थांनी केले होते.

योग्य व वेळेवर उपचार केल्यास लहान मुले कर्क रोगावर पूर्णपणे मात करू शकतात व त्यानंतर  ते  चांगले जीवन जगू शकतात असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी मुलांना भेटवस्तूंचे वाटप केले तसेच त्यांना  उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  राज्यपालांनी टाटा मेमोरियल सेंटरच्या इम्पॅक्ट फाऊंडेशन व क्रिश फाऊंडेशनला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. राज्यपालांशी भेट झाल्यानंतर मुलांनी राजभवनाला भेट दिली.

यावेळी इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी शालिनी जटिया, क्रिश फाऊंडेशनचे संस्थापक नवीन शेट्टी, वंदना शेट्टी, लहान मुलांचे कर्क रोग तज्ज्ञ डॉ. वेंकट राम मोहन व लहर बच्छावत आदी उपस्थित होते.

000

         Child Cancer Patients visit Raj Bhavan; meet Governor

Mumbai ; Maharashtra Governor Ramesh Bais interacted with child cancer patients undergoing treatment at the Tata Memorial Hospital at Raj Bhavan Mumbai.  The Governor witnessed a Magic Show with the children and distributed gifts.  The Governor announced a donation of Rs.5 lakh to the organisations providing support to the cancer affected children and their parents.  The children later visited the Raj Bhavan.

The visit of the cancer affected paediatric patients to Raj Bhavan was organised by the Impacct Foundation of the Tata Memorial Centre in association with Krish Foundation.

Shalini Jatia, Chief Officer of the Impacct Foundation of TMC, Navin Shetty, Founder of the Krish Foundation, Vandana Shetty, President of the Foundation, Dr Venkata Rama Mohan, Paediatric Oncologist were present.

                                                                                           ०००

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरापगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. १८ मार्च २०२३ (विमाका वृत्तसेवा) : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. आपल्या कामामुळे ते लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर, येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रीतम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे,  आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर,  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदी उपस्थित होते.

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासन भरपाई देणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार शेतकरी, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत भरघोस तरतूद केली आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतिगृह उभारण्यात येतील. ऊसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देऊन स्व.गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ- नितीन गडकरी

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णा खोरे, तापी पाटबंधारे, विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. मानवता, एकता आणि समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथराव मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतक-यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी अन्नदाताबरोबरच ऊर्जा दाता बनला पाहिजे. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हीलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती- राधाकृष्ण विखे पाटील

महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करण्यात येईल. राजकारण व काम एकत्र न आणता काम करणारे स्व. गोपीनाथराव मुंडे सर्वपक्षात लोकप्रियतेत आघाडीवर होते, असे माजी मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले. माजी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, की बहुजनांना एकत्र आणण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी केले. ओबीसींची गणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. माजी मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांची भक्ती, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आचरणात आणणारे, गोरगरीब जनतेसाठी झटणारे गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभे राहत आहेत याचा अभिमान आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह, औरंगाबाद येथे दवाखाना उभारावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  उदय सांगळे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार श्री. वाजे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १७ (जिमाका) : अंबरनाथ शहराची वाढ होत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे ७७५ कोटींचा निधी दिला आहे. या शहराकडे माझे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असून येथील विकासासाठी सढळ हस्ते मदत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अंबरनाथ शिवमंदिर येथे डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, नरेंद्र पवार, गोपाळ लांडगे, सुनील चौधरी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी शिव मंदिरात जाऊन श्री महादेवाचे पूजन करून दर्शन घेतले.

यावेळी प्राचीन शिवमंदिरवरच्या गाण्याचे सादरीकरण कलाकारांनी केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्मिती केलेल्या अंबरनाथच्या विकासावरील लघुपटाचे सादरीकरण झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराला यापूर्वीही भेट दिली आहे. मात्र आता शिव मंदिर परिसर बदलत असून येथे विकास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर 138 कोटी रुपये शिवमंदिर परिसराच्या विकासासाठी दिले. त्याशिवाय या शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी घनकचरा प्रकल्पासाठी १५० कोटी, रस्त्यांच्या कामासाठी २२२ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेतून १०७ कोटी, दलित वस्तीमधून 32 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण मधून ७८ कोटी, इतर कामासाठी दिले ४८ कोटी निधी दिला आहे.

अंबरनाथ वाढतंय, या वाढत्या शहराच्या गरजाही मोठ्या आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि निधी मिळविला. त्याचबरोबर या शहराची सांस्कृतिक गरज देखील भागवली पाहिजे म्हणून अशा प्रकारचा मोठा शिवमंदिर फेस्टिवल त्यांनी सुरू केला आणि म्हणून हजारो लोक या ठिकाणी त्याचा आनंद घेतायत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

हे राज्य सर्व सामान्य लोकांच्या मनातलं राज्य आहे. आपल्या अर्थसंकल्पमध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, मुली, विद्यार्थी अश्या सगळ्यांचा विचार केला आहे. त्याच बरोबर प्राचीन मंदिर व गडकिल्ल्यांचे संवर्धन जतन देखील करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छामुळे या राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरावती येथे मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, अंबरनाथ शहराचा विकास करताना प्रशासनाने चांगली साथ दिली. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने या शहराचा विकास होत आहे. ज्या सोयीसुविधा महानगरपालिका देते त्याच प्रकारच्या सोयी अंबरनाथ नगरपरिषदेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. यामध्ये मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांचा मोठे सहकार्य आहे. या ठिकाणी प्रशासन आणि शासन एकत्र काम करत आहे. त्याचबरोबर सगळ्या लोकप्रतिनिधीचे मार्गदर्शन या अंबरनाथच्या विकासासाठी लाभत आहे.

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी उपाय योजावेत – आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार

मुंबई, दि. १७ : राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी दि. १४ मार्च २०२३ पासून संप पुकारलेला असून, या संपामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत काही कर्मचारीही सहभागी झालेले आहेत. मात्र, आरोग्य सेवा अत्यावश्यक व संवेदनशील सेवा असल्यामुळे राज्यातील रुग्ण सेवेत कुठेही बाधा येऊ नये व विना अडथळा सार्वजनिक आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात यासाठी पर्यायी तसेच कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करावे, अशा सूचना राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

संपाच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असणारी आरोग्य सेवा सुरु रहावी यासाठी व क्षेत्रीय यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधावा. तसेच विशेषतः अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, लेबर रूम या संवेदनशील विभागांची सेवा अविरत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. पर्यायी मनुष्यबळाबाबत आवश्यक उपाययोजना आखून कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील रुग्ण सेवा बाधित होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशाही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत.

रुग्णसेवेत बाधा येऊ नये यासाठी अपघात विभाग, आपत्कालीन कक्ष, रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात याव्यात, जेणेकरुन कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवा अंखंडित सुरु राहील, क्षेत्रीय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी नियुक्त करावे, आवश्यकतेनुसार दैनंदिन तत्वावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सकस्तरावर आवश्यतेनुसार दैनंदिन तत्वावर मनुष्यबळ नियुक्त करण्यात यावेत, असे त्यांनी नमूद केले आहे.

दैनंदिन तत्वावरील कर्मचाऱ्यांची नेमणूक सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत अथवा दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत जे अगोदर होईल तोपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर दैनंदिन तत्वावर नेमेलेले मनुष्यबळ कार्यरत ठेवायचे असल्यास त्याबाबत स्वतंत्र सूचना आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणार आहेत.

सरकारी व खासगी नर्सिंग महाविद्यायालये, वैद्यकीय महाविद्यालये, औषधनिर्माता महाविद्यालये यांच्याशी समन्वय साधून त्यांच्यामार्फत आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करुन घेण्याची कार्यवाही करावी आणि संपकाळात या महाविद्यालयांमार्फत उपलब्ध प्रशिक्षणार्थीच्या नेमणुका रुग्णालयांमध्ये कराव्यात असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक रुग्णालयात समन्वयकाची नेमणूक करण्यात करण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कार्यरत आरोग्य मित्र यांच्या नेमणुकादेखील करता येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

संपामध्ये सहभागी कर्मचारी, आरोग्य संस्थांमध्ये उपस्थित कर्मचारी, बाधित रुग्ण याबाबतची दैनंदिन माहिती मुख्यमंत्री कार्यालय तसेच आरोग्य मंत्री कार्यालयास उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून यासाठी राज्यस्तर, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे तसेच जिल्हा शल्य चिकित्सकस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत कळविण्यात आले आहे .

००००

रवींद्र राऊत/विसंअ/

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. १७ : सर्वांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावर ग्रामविकास विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये  विभागावर चर्चा झाली.

यावर ग्राम विकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तरे दिली.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सुपर स्पेशलिटी रुग्णालये स्थापन करणे आणि त्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतच्या कामांना येणाऱ्या काळात अधिक गती देण्यात येणार आहे.

यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत या अर्थसंकल्पात केलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली व मंत्री श्री.चव्हाण यांनी अन्न व नागरी ग्राहक संरक्षण विभागाकडून या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची माहिती दिली.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. १७ :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीस महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा अथर मिर्झा, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्य समीर गुलाम नबी काझी, शेख हसनैन शाकीर, मौलाना हाफिज सय्यद अथहर अली, डॉ. मुदस्सीर लांबे, अल्पसंख्याक विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी मो. बा. ताशीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जुनैद सय्यद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. आवश्यक बाबींमध्ये विधी आणि न्याय विभागाकडून अभिप्राय, मार्गदर्शन आणि सूचना मागविण्यात येतील व त्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

अध्यक्ष वजाहत मिर्झा अथर मिर्झा म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विविध मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रस्तावही सादर करण्यात येतील.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासाठी सहायक अनुदान, सहायक अनुदान खर्च करण्यासंदर्भात धोरण निश्चित करणे, वक्फ जमिनींच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भात धोरण निश्चित करणे, मुख्यालयासाठी जागा, वक्फ जमिनींच्या मालकी हक्कात बदल न करणे तसेच पदभरती या विषयांबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी एकरकमी सहायक अनुदानाची आवश्यकता असून हे अनुदान खर्च करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याचीही आवश्यकता आहे. वक्फ जमिनींच्या भूसंपादनाबाबत महसूल विभागाकडून कार्यवाही होण्याची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

—–000—–

केशव करंदीकर/विसंअ/

ताज्या बातम्या

उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी –  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना उपस्थिती  जि.प.शाळा बामणोली, मनपा शाळा क्र. ७ शाळेत उत्साह  विद्यार्थ्यांना पुष्प देऊन केले स्वागत सांगली, दि. १६, (जिमाका): शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये...

पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत

0
छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका): शाळेत पडणारे पहिले पाऊल हे ज्ञानाकडे पडते. ज्ञानाकडे पडलेल्या पहिल्या पावलाचे आज जिल्हाभरात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. हे स्वागत करण्यासाठी...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा

0
सातारा दि. १६: चालू शैक्षणिक वर्ष  शाळा प्रवेशोत्सवच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी ता. माण येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे...

शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवतील – मंत्री मकरंद जाधव...

0
सातारा, दि. १६:  शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत....

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
वर्गखोल्या बांधकामे, दुरूस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देश प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्रासाठी राज्य स्तरावर बैठक घेणार सांगली, दि. १६ (जिमाका): जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी...