मंगळवार, जून 17, 2025
Home Blog Page 1444

एनसीपीएमध्ये उद्या रविवारी अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांचा ‘गंगा’ नृत्याविष्कार; राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन

मुंबई, दि.१८ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आलेल्या ‘चला जाणू या नदीला’ या अभियानाचा एक भाग म्हणून अभिनेत्री, नृत्यांगना आणि खासदार हेमामालिनी यांचा नाट्यविहार प्रस्तूत ‘गंगा’ हा नृत्याविष्कार कार्यक्रम रविवार १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून या संगीत सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या कार्यक्रमास राज्यपाल रमेशसिंह बैस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, सांस्कृतिक कार्य विभागाचे  प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, व्यवसाय उद्योग क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जमशेद भाभा सभागृह एन. सी. पी. ए. येथे सायंकाळी ६.३० वाजता आयोजित या कार्यक्रमातून गंगा मिशन, जल संवर्धन, नदी स्वच्छता यासंदर्भात लोकसहभाग वाढविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असून राज्यात यासाठी गेल्या वर्षी महात्मा गांधी जयंतीपासून व्यापक प्रयत्न सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत, असे श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

जलसंवर्धन आणि नदी जोड प्रकल्पासाठी आपण सातत्याने पुढाकार घेतला आहे; या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक व्यापक पद्धतीने हा विचार आपण पुढे नेऊ असा विश्वास आहे,  असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

०००

इन्फ्लूएंझाची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करावेत ! – इन्फ्लूएंझाची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करावेत

मुंबई, दि. १८ :  इन्फ्ल्यूएंझा एच१एन१ आणि एच३एन२ टाईप-ए चे उपप्रकार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. यावर प्रभावी औषधी उपलब्ध आहे. सर्दी, ताप, खोकला होताच जवळच्या सरकारी किंवा खासगी दवाखान्यात त्वरीत दाखवून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यामधील नमूद केलेली माहिती पुढीलप्रमाणे :

इन्फ्ल्यूएंझा टाळण्यासाठी हे करा

वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.पौष्टिक आहार घ्यावा. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्यावे.

इन्फ्ल्यूएंझा टाळण्याकरता हे करू नका

हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. लक्षणे असतील, तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. वृध्द व दुर्धर आजारी लोकांनी गर्दीत जाणे टाळावे.

इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची घरगुती काळजी

बहुतांश इन्फ्ल्यूएंझा रुग्ण सौम्य स्वरुपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, हे माहीत असणे आवश्यक आहे.रुग्णाकरीता वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने शक्यतो कुटूंबियांशी संपर्क टाळावा.

रुग्णाने नाकावर साधा रुमाल बांधावा. रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी.

रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील, तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये. घरात ब्लिच द्रावण तयार करावे याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील, असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा.

रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्ततः टाकू नयेत. रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत. रुग्णाचे अंथरूण पांघरुण टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. भरपूर विश्रांती घ्यावी आणि द्रव पदार्थ घ्यावेत.

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ- हळद टाकून गुळण्या कराव्यात तसेच गरम पाण्यात निलगिरी तेल टाकून त्याची वाफ घ्यावी. ताप आणि इन्फ्ल्यूएंझाची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान २४ तासापर्यंत घरी रहावे. धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलट्या अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.

अतिजोखमीच्या व्यक्ती

इन्फल्यूएंझा ए एच१एन१ आजार खालील अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरूप धारण करु शकतो :

पाच वर्षाखालील मुले (विशेष करून १ वर्षाखालील बालके), ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग, मधुमेह, स्थूलत्व, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या व्यक्ती चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती प्रतिकार शक्तीचा -हास झालेली व्यक्ती दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती.

०००

नागपूर जिल्ह्यातील २३५ कोटी खर्चाच्या ३७२ पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

नागपूर, दि. १८ : जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत नागपूर जिल्ह्यातील २३५ कोटी खर्चाच्या ३७२ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, सुनिल केदार, आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, सहपोलिस आयुक्त अश्वथी दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले,  शेतकऱ्यांना दिवसा विज देण्याकरिता सोलर फिडरची योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘हर घर जल’ योजनेद्वारे गावातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर एकूण १३२२ पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्रशासनाने आतापर्यंत ५७८ कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचवून ‘हंडामुक्त’ समाज करण्याचा प्रयत्न ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नागपूरचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला प्रगतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदारद्वय चंद्रशेखर बावनकुळे व समीर मेघे,  यांनी देखील उपस्थिताना संबोधित केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नागपूर जिल्ह्यातील ९४ टक्के नळजोडण्या पूर्ण झाल्या आहेत. आज भूमीपूजन करण्यात आलेल्या एकूण ३७२ पाणीपुरवठा योजनांमध्ये पंचायत समिती काटोल ३९, नरखेड १९, रामटेक ४५, पारशिवनी ४०, कळमेश्वर ३३, सावनेर ५५, भिवापूर २१, उमरेड १९, कुही २५, मौदा २७, हिंगणा २९, कामठी २ आणि नागपूर ग्रामीणच्या १८ योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांची अंदाजपत्रकीय किंमत एकूण २३५ कोटी ३४ लक्ष असल्याची माहिती सौम्या शर्मा यांनी दिली.

तत्पूर्वी दूरदृष्यप्रणालीद्वारे श्री. फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय सर्व योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी जलजीवन ॲपचे उद्घाटनही केले.

कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी, स्थानिक नागरिक तसेच सर्व पंचायत समितीचे सदस्य दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

000

लातूर जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने पाहणी

▪️शेतकऱ्यांच्या बांधावर जावून घेतली नुकसानीची माहिती

▪️राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; भरीव मदतची ग्वाही

लातूर, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे दिले. लातूर जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज तातडीने लातूर येथे येवून नुकसानीचा आढावा घेतला. तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच या अस्मानी संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तातडीने मदत देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

पालकमंत्री श्री. महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुसिंग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच व्ही. वडगावे यावेळी उपस्थित होते.

अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात ज्वारी, हरभरा सारख्या पिकांसह आंबा, द्राक्षेसारख्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरु करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. महाजन यांनी आढावा बैठकीत दिल्या.

लातूर जिल्ह्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा उल्लेख करून लातूर शहरात नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत खासदार सुधाकर शृंगारे यांनी सूचना केल्या.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचमाने करताना ते अधिकाधिक वस्तुनिष्ठ व अचूक होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार रमेश कराड यांनी केल्या.

औसा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला असून द्राक्षे बागा, ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचमाने तातडीने सुरु करावेत, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात 17 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने देवणी तालुक्यात सुमारे एक हजार 67 हेक्टर, अहमदपूर तालुक्यात सुमारे आठ हेक्टर आणि जळकोट तालुक्यात सव्वाचार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच 18 मार्च रोजी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमधील शेतपिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचा संप सुरु असला तरी शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कर्मचारी सहकार्य करणार आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

अवकाळी पावसाच्या नुकसानीची बांधावर जावून पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर

जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीष महाजन यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. रेणापूर तालुक्यातील रामवाडी येथील पंढरी उगिले यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे गारपिटीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री श्री. महाजन यांनी पाहणी केली. तसेच पानगाव फाटा येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून याबाबत अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल. या नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांची पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी शेतकऱ्यांना दिली.

कर्मचारी संप, जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

राज्य कर्मचारी बेमुदत संप आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचाही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्यातील 17 हजार 782 कर्मचाऱ्यांपैकी 7 हजार 859 कर्मचारी संपत सहभागी असून 9 हजार 346 कर्मचारी कर्तव्यावर हजार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी संपकालीन परिस्थितीत आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा, टंचाईची स्थिती नाही

जिल्ह्यातील जलाशयांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठ्याचा पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नसल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी 72 पाणीसाठा असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी 55 टक्के पाणीसाठा असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत योजनेतील कामांसाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

नागपुरातील सी-२० परिषदेच्या मंथनातून मोलाचे विचार बाहेर येतील – डॉ. सुस शेरपा डॉ. स्वदेश सिंह

‘नागपूर व्हॉईस’द्वारे जवळपास ४० संस्थांच्या सूचना प्राप्त

नागपूर, दि. १८ : नागपूर शहराला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. याच शहरात जी-२० परिषदेअंतर्गत २० ते २२ मार्च २०२३ दरम्यान आयोजित होणाऱ्या सिव्हील सोसायटी अर्थात सी-२० परिषदेच्या मंथनातून महत्वाचे विचार बाहेर येतील, असा विश्वास सी-२० आयोजन समीतीचे  सूस शेरपा डॉ. स्वदेश सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यकत्‍ केला. या परिषदेत नागपूर व विदर्भातील २५ संस्थाही  सहभागी होणार असून ‘नागपूर व्हॉईस’ उपक्रमाद्वारे जवळपास ४० संस्थांकडून सूचना प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

जी-२० परिषदेचे यजमानपद असणाऱ्या भारत देशात वर्षभर विविध एंगेजमेंट गृपच्या परिषदांचे आयोजन होत आहे. यापैकी एक असलेल्या सी-२० गृपच्या प्रारंभिक परिषदेचे आयोजन नागपुरात होणार आहे. या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी प्रेस क्लब येथे डॉ सिंह यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. सी-२० अयोजन समीतीचे सुस शेरपा किरण के. एम., समन्वयक पंकज गौतम, माध्यम समन्वयक डॉ. परिणीता फुके, पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरीक्त महासंचालक स्मिता शर्मा, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल आदी यावेळी  उपस्थित होते.

सिव्हिल सोसायटीच्या आयोजन समितीद्वारे मागील चार महिन्यांपासून देश-विदेशातील नागरी संस्थांसोबत विविध मंचांद्वारे समन्वय साधून आरोग्य, रोजगार, कला, मानवाधिकार, सेवा आदि चौदा विषय भारतातील सी -२० परिषदेच्या चर्चेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. सी-२० ची प्रारंभिक बैठक नागपुरात होत आहे. या परिषदेतून महत्वाचे विचार बाहेर येतील आणि ३० व ३१ जुलै २०२३ रोजी जयपूर येथे होणाऱ्या सी-२० परिषदेच्या शिखर परिषदेत सादर होणाऱ्या अंतिम प्रस्तावात  हे विचार अंतर्भूत होतील, असा विश्वास डॉ. सिंह यांनी व्यक्त केला.

जी-२० देशांच्या नागरी संस्थांचे जवळपास ६० प्रतिनिधी आणि भारतातील विविध नागरी संस्था व आमंत्रित देशांचे असे जवळपास ३०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपूर व विदर्भातील जवळपास १००० संस्थांनी अर्ज केले होते. यापैकी २५ संस्थांची या परिषदेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

‘नागपूर व्हॉईस’ उपक्रमाद्वारे जवळपास ४० संस्थांकडून सूचना प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली. सी-२० परिषदेच्या आयोजनादरम्यान नागपूर व विदर्भात विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नागरी संस्थांना या उपक्रमांतर्गत सूचना व मते मागविण्यात आली होती.  संस्थांकडून प्राप्त सूचना सी-२० च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्याकडे निवेदन स्वरुपात सुपूर्द करण्यात येणार असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

शहरातील रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सी-२० चे आयोजन करण्यात आले असून २० मार्च रोजी दुपारी ३ वा. या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जी-२० साठी भारताचे शेरपा डॉ. अमिताभ कांत, संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रतिनिधी शैामी शाह, इंडोनेशिया आणि ब्राझीलचे जी-२० शेरपा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रसार माध्यमांसाठी मिडीया लाऊंज

सी-२० या जागतिक परिषदेचे वृत्तांकण करण्यासाठी रॅडिसन ब्लु हॉटेल परिसरात मिडीया लाऊंज उभारण्यात आला आहे. याठिकाणी माध्यमांना वेळोवेळी माहिती व फोटो व्हिडीयो पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.

उद्घाटनानंतर सलग दोन दिवस सी-२० साठी तयार करण्यात आलेल्या अजेंड्यावर चर्चा व मंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे. सी – २० परिषदेत सहभागी होणाऱ्या  प्रतिनिधींसाठी २० मार्च रोजी सायंकाळी फुटाळा येथे फाऊंटन शोचे आणि तेलनखेडी गार्डन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी हे प्रतिनिधी पेंच व्याघ्र प्रकल्प आणि देवलापार गौ-संशोधन केंद्र, सेवाग्राम आणि पवनार येथे भेट देणार असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

000

महिला बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी जिल्ह्यात व्यापारी संकुल उभे करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून महिला बचत गटांची मोठी शक्ती आज जिल्ह्यात उभी झाली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळावेयासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र या बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी ग्राहक मिळावायासाठी जिल्ह्यात सुंदरअप्रतिम आणि आकर्षक असे व्यापारी संकुल उभे करणार असल्याची ग्वाही राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चांदा क्लब ग्राउंड येथे विभागीय सरस व हिराई महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रतिभा धानोरकरकिशोर जोरगेवारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनसहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवारउपायुक्त कमलकिशोर फुटाणेविवेक इलमे आदी उपस्थित होते.

राज्याचा अर्थमंत्री असताना सन 2018 – 19 मध्ये अर्थसंकल्पात महिला बचत गटांसाठी जिल्हास्तरावर व्यापारी संकुलाची संकल्पना आपण मांडली होतीअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेकृषी विभाग किंवा जुबली हायस्कूलच्या संभावित जागेवर बचत गटाच्या उत्पादित माल विक्रीसाठी व्यापारी संकुल तयार करण्यात येईल. जबरदस्तीने कोणतीही वस्तू आपण ग्राहकांवर थोपवू शकत नाहीहा बाजाराचा स्वभाव आहे. आपल्या वस्तूमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असले तरच ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. उत्पादन निर्मितीचे हे वैशिष्ट्ये आणि कौशल्य विकसित करण्यासाठीच चंद्रपुरात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र आपण उभे करीत आहो. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांना वस्तू निर्माण करण्याचे चांगले तंत्रज्ञान मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने कालच महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे एसटी बसमध्ये सर्व महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. महिलांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अद्भुत गुण असतात. आपल्या समाजात स्त्री शक्तीचा नेहमी सन्मान केला जातो. स्त्रियांमध्ये सहजभाव व प्रेमभाव ठासून भरलेला असतो. सोबतच आपल्यावर कोणाचीही कर्ज राहू नयेअसा स्वाभिमान महिलांमध्ये आढळतो. त्यामुळेच महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण 99 टक्के आहे. उद्योगव्यापारव्यवसायाचा पराक्रम दाखविण्याची संधी या महोत्सवातून महिलांना मिळणार असून चंद्रपूरचा गौरव वाढवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून 75 मैदाने विकसित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी खेलो चांदा अभियानाचे‘ सुद्धा उद्घाटन झालेअसे त्यांनी सुरुवातीला घोषित केले. येथे सादर करण्यात आलेले लेझीम नृत्यआदिवासी नृत्य अतिशय उत्कृष्ट होते. महिलांना नाविन्यपूर्ण कार्य करण्याची शक्ती देवाने दिली आहे. उमेदच्या महिलांच्या मानधनासंदर्भात मुंबईत सचिव स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईलअशी ग्वाही सुद्धा पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्याउमेद या शब्दातच एक आशा आहे. ग्रामीण भागात उमेद काम करीत असून महिलांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यावर त्यांचा जोर असतो. उमेद मध्ये 75 टक्के वाटा केंद्राचा तर 25 टक्के वाटा राज्याचा आहे. बचत गटाचे आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शक असून उमेदच्या उत्पादन विक्रीसाठी व्यापारी संकुल तसेच महिला बचत भवन उभे केले पाहिजेअशी मागणी आमदार श्रीमती धानोरकर यांनी केली.

आमदार किशोर जोरगेवार म्हणालेसकाळी पावसाने हजेरी लावली आणि काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा सुद्धा संप आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेने या हिराई महोत्सवाचे अतिशय उत्कृष्ट आयोजन केले आहे. आशा व अंगणवाडी सेविकांच्या मानधनाप्रमाणेच उमेदच्या महिलांचे मानधन वाढवावे. उमेदमुळे ग्रामीण भागात परिवर्तन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणालेमहिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी एक बाजारपेठ मिळावीत्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आर्थिक सक्षम झाली झाली तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. उमेदच्या माध्यमातून आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटांना मिळवून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार म्हणालेजिल्ह्यात उमेदचे 20 हजार महिला बचत गट कार्यरत असून 1048 गावात महिलांचे ग्रामसंघ तयार झाले आहे. 55 प्रभाग संघ 674 उत्पादक संघ महिलांचे आहेत. एवढेच नाही तर महिलांच्या 10 उत्पादक कंपन्या जिल्ह्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते खेलो चांदा अभियानाच्या‘ लोगोचे अनावरण आणि नवरत्न स्पर्धा पुरस्काराचे वाटपही करण्यात आले. यात आदेश बनसोड (कथाकथान स्पर्धा)वेदांत निमगडे (वादविवाद)गुंजन गडपल्ले (स्मरणशक्ती)वैष्णवी फुंडे (सुंदर हस्ताक्षर)रहितखान पठान आणि परशुराम डाहुले (बुद्धिमापन) आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रामू वाढईनिखिल उकडेविलास वन्नेवार आणि बापूजी अडबाले यांना ई – रिक्षा वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार आणि सूर्यकांत भडके यांनी केले. आभार गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारीकर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा व आरोग्य सुविधाचा आढावा घेतला

सातारा दि.-18 :- सातारा जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 31 मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च करावा अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करून आरोग्य विभागाचाही आढावा घेतला.
पालकमंत्री श्री देसाई यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश
 जयवंशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व विभाग प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी 100% खर्च करावा अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निधी 100% खर्च करावा. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 100% खर्च करण्यासाठी 31 मार्चपर्यंत नियोजनबद्ध काम करावे.
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे या संपाचा आरोग्य विभागावर परिणाम होऊन देऊ नका. शासकीय आरोग्य यंत्रणाकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा द्यावी. यासाठी बाह्य यंत्रणे कडून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती द्यावी. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांना भेटी द्यावीत. संप काळात एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केल्या.

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील- अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि१८ मार्च :- शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून शासनाने  यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात अल्पकालीन व दिर्घकालीन योजनांचा  समावेश असुन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आणि  गावात समृद्धी यावी यासाठी शासन काम करीत असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
आत्मा प्रकल्प कार्यालय, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित यवतमाळ जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते समता मैदान येथे आज पार पडले.  यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शंकरराव गडाख, पोलीस अधीक्षक डॉ. पवन कुमार बनसोड, विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. उंदीरवाडे, सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर प्रमोद यादगिरवार, डॉक्टर एन डी पार्लावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, आत्मा नियामक मंडळ सदस्य रेणुताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात शासनाने शेतकऱ्यांना पीक विम्यात सवलत देण्याचा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना यापुढे पीक विमा काढता येईल. शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम शासन भरणार आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे आजपर्यंत कोणत्याही सरकारने नुकसान भरपाई दिली नव्हती. यावर्षी पहिल्यांदाच राज्यात ७०० कोटी रुपये तर जिल्ह्यात ५१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनाने दिली आहे. ठिंबक सिंचनसाठी आतापर्यंत केंद्र सरकारचे अनुदान होते, ते कमी असल्यामुळे आता राज्याने सुद्धा आपला वाटा त्यामध्ये देऊन सदर अनुदान ८० टक्के केले आहे.   आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने धान्य योजनेमध्ये समाविष्ट केले होते. आता त्याऐवजी  वार्षिक प्रतिव्यक्ती १८०० रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या जिल्ह्यातील सिंचनाचे सर्व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर विजेच्या पायाभूत सुविधांचा सुद्धा  विकास करायचा आहे असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्व योजनांची तसेच  कृषी पूरक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी कृषी महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात कृषि विभागाच्या विविध योजना तसेच अनेक कृषितज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.याचा शेतक-यांनी लाभ करुन घ्यावा असे आवाहन पालकमंत्री यांनी याप्रसंगी केले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या महत्त्वाच्या कृषी उत्पादनातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर फळबाग व फुल शेती करणारे शेतकरी सुद्धा आपल्याकडे आहेत.  अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे आपण एक रिसोर्स बँक तयार केलेली आहे. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती संपन्न करणाऱ्या शेतक-यांचा शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केलेला आहे .यामध्ये जवळपास १०० च्या आसपास शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्रगत तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी जिल्हाभर पोचविण्याचे काम करायचे आहे. या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहोत. सोबतच शेतकऱ्यांना या माध्यमातून एकमेकांचे प्रयोग जाणून घेण्याची, एकमेकांची अनुभव समजून घेण्याची संधी उपलब्ध होते आहे असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भरडधान्य पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात तर महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी धनादेशाचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते कृषी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉल्सला भेट देऊन पाहणे केली.
     000

संपात सहभागी न झालेल्यांना कामावर येण्यास अडथळा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे, दि. १८ (जिमाका) : शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा ठाणे जिल्ह्यातील शासकीय कामांवर परिणाम होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास अडथळा आणणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. तसेच जिल्हा नियोजनाचा निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. देसाई यांनी यावेळी केली.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ खर्चाचा आढावा तसेच राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या अनुषंगाने आरोग्य सुविधा व अत्यावश्यक सुविधावर झालेला परिणाम यासंदर्भात आज श्री. शंभूराज देसाई यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीस जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचा जिल्हयाचा संक्षिप्त आढावा सादर केला.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्याच्या संप कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे बाह्ययंत्रणेव्दारे कर्मचारी नेमून रुग्णसेवा सुरू ठेवण्यात यावी. रुग्णालयातील बाहय रुग्णच्या तपासणीवर परिणाम होणार नाही व नागरिकांची गैरसोय होणार नाही यांची काळजी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घ्यावी. एनआरएचएचे कर्मचारी संपात सहभागी असल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्याच्या जागी बाहय यंत्रणेव्दारे कर्मचारी नियुक्ती करण्यात यावेत.

तसेच जे कर्मचारी संपात सहभागी नाहीत व कार्यालयात रुग्णालयात उपस्थित असतात परंतु कर्मचारी संघटनातील कर्मचारी त्यांना कामावर येण्यास अडथळा निर्माण करत असतील, तर अशा अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुध्द संबंधित विभागप्रमुखानी
तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा / रुग्णालये सुरळीत सुरु राहण्यासाठी फिरते दौरे करावेत. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी सनियंत्रण करावे, अश्या सूचनाही पालकमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनांचा निधी १०० टक्के खर्च करा : पालकमंत्री
जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण, विशेष घटक व अनुसूचित जमाती उपयोजनेच्या खर्चाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चाच्या टक्केवारीवर समाधान व्यक्त करून पालकमंत्र्यांनी ३१ मार्च अखेर खर्चाचे प्रमाण १०० टक्के होईल याची काळजी घेण्याची सूचना प्रशासनास केली. तसेच आलेल्या निधीचा योग्य नियोजन करून कोणताही निधी अखर्चिक राहणार नाही, याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. ज्या योजनेत खर्च होत नसेल त्या योजनेचा निधी पुनर्विनियोजनाव्दारे इतर योजनेला देण्यात यावा, असे निर्देशही यावेळी दिले.

साकव योजनेचा खर्च न होणारा निधी जिल्हा परिषद रस्त्यासाठी पुनर्विनियोजन करण्यात यावा. जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) ७८ टक्के, अदिवासी उपयोजना ८० टक्के व विशेष घटक योजना ९७ टक्के खर्च झाला असल्याने उर्वरित निधी खर्च करण्याबाबत संबंधितानी कार्यवाही करण्याची सूचना यावेळी केली.
तसेच जे विभाग निधी खर्च करणार नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केली.

000

सरपंचांच्या सहकार्याने कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पौष्टिक तृणधान्य अभियान यशस्वी होईल – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

बीड, दि.१८ :- आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य अभियान 2023 राबविण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्याचा समाजाच्या सर्व स्तरात आहारात वापर वाढताना पौष्टिक तृणधान्याला बाजारपेठ मिळावी यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना देखील सदर तृणधान्य पीकं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्याची व त्यातून उत्पन्न वाढवण्याची संधी आहे.  सरपंचांच्या सहकार्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून ज्वारी, बाजरी, वरई, नाचणी, राजगिरा अशा तृणधान्य  पीक उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे यातून अभियान यशस्वी होईल असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य योजने अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व सरपंच परिषदेचे उद्घाटन कृषिमंत्री श्री सत्तार यांच्या हस्ते झाले या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेसाठी व्यासपीठावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी कुंडलिक खांडे, श्री.चंद्रकांत नवले, जिल्ह्यातील विविध गावांचे सरपंच आणि कृषी क्षेत्रातील व्यक्ती, विविध विभागांचे अधिकारी यांची  प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या सुरुवातीस महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित झालेल्या बीड जिल्ह्यातील महिला सरपंच शेख मुन्नाबी मुजफ्फर पटेल यांचा आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित झालेले बीड गटविकास अधिकारी श्री सानप, तालुका कृषी अधिकारी श्री गंडे आदींचा सत्कार कृषी मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे सूरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे प्रसारण सभागृहातील स्क्रीनवर करण्यात आले.
नंतर कृषिमंत्री श्री सत्तार यांनी उपस्थित सरपंचानी तृणधान्य अभियानाबाबत आपल्या संकल्पना मांडाव्यात, असे आवाहन केले. यावेळी वंजारवाडी गावचे सरपंच वैजनाथ भगवान तांदळे, ताडसोन्नाचे बाळासाहेब नागटिळक, खडकी चे संतोष थोरात , पंजाबराव चौरे यासह  शेतकरींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी माहिती देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य अभियानची सुरुवात एक जानेवारी रोजी झाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या अभियानाचे अंमलबजावणी होण्यात भारताचा मोठा वाटा आहे. या अभियानाअंतर्गत सरपंच परिषद व कार्यशाळा घेणारा बीड हा पहिला जिल्हा आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे कार्यशाळा होत आहे यातून ते देशभरातील साडेसात लाख शेतकऱ्यांशी संवाद साधून पौष्टिक तृणधान्य अभियानाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी बीड येथे होणारी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरत आहे.
 अन्नधान्याचे कमतरता असल्याने पूर्वी रासायनिक खतांचा वापर झाला व उत्पादनात क्रांती झाली पण याचा काही दुष्परिणाम देखील समोर येऊ लागला आहे. पंजाब हरियाणा राज्यातून दिल्ली येथे जाणारी कॅन्सर एक्सप्रेस चिंतेची बाब आहे.  लोकांमधील आजारांचे प्रमाण कमी होण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढणे गरजेचे दिसून येत आहे 75 लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याचे उत्पादन घेण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले आहे असे मार्गदर्शन कृषिमंत्री श्री सत्तार यांनी केले
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे म्हणाल्या , पौष्टिक  तृणधान्याचा आहार कमी असल्यामुळे कर्करोग, स्थूलपणा आदी आजारांचे प्रमाण वाढते आहे . ते रोखण्यासाठी तृणधान्याचा वापर आहारात वाढणे गरजेचे आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीतून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील असून कृषिमंत्री महोदय यांच्या प्रोत्साहनमुळे या कामा गती येईल असे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, तृणधान्य आधारित पदार्थ विक्री मुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीची संधी असून जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये त्यांना यासाठी स्टॉल व कॅन्टीन सुरू करण्याबाबत सुविधा देण्यात येतील . बाजरी या धान्याच्या राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणास देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठी मागणी असून निर्यात करण्याकडे कल वाढत आहेत.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित सरपंच आणि शेतकरी यांचे समवेत मुक्त संवाद साधला सरपंचांच्या सूचना ऐकून घेतल्या तर त्यांच्या भाषणादरम्यान शेतकरी व उपस्थितांकडून लेखी चिठ्यांद्वारे मांडण्यात येत असलेल्या अडचणी प्रश्न व मुद्द्यांचा अनुषंगाने सरकारी पातळीवर होत असलेली कार्यवाही व योजनांच्या अनुषंगाने उपलब्ध असलेले संधी आदींची माहिती दिली .महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या संबंधित शासनाने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णय व योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेसाठी सादर असून त्याची घोषणा केली जाईल असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना एक रुपया मध्ये पिक विमा , राज्य सरकारने  देखील शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपये सन्माननिधी देण्याचा निर्णय म्हणजे केंद्राच्या योजनेसह  एकून 12 हजार रुपये मिळतील , जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य शासकीय कर्मचारी संघटनांचा संप,राज्याची आर्थिक स्थिती, शेतकरी अपघात विमा योजने बाबत असलेल्या अडचणी दूर करून तातडीने दोन लाखापर्यंत मदतसाठीचा निर्णय, शेतकरी जोडधंदा देशी गाई साठी मदत असे विविध बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले .
000

ताज्या बातम्या

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

0
मुंबई, दि. १७ : मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करून शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न मार्गी लावावेत अशा...

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४...

सागरी सुरक्षेला शासनाचे नेहमीच प्राधान्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १७ : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून त्यास राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य आहे. सागरी सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या दिशेने आज आणखी...

उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी –  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना उपस्थिती  जि.प.शाळा बामणोली, मनपा शाळा क्र. ७ शाळेत उत्साह  विद्यार्थ्यांना पुष्प देऊन केले स्वागत सांगली, दि. १६, (जिमाका): शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये...

पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत

0
छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका): शाळेत पडणारे पहिले पाऊल हे ज्ञानाकडे पडते. ज्ञानाकडे पडलेल्या पहिल्या पावलाचे आज जिल्हाभरात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. हे स्वागत करण्यासाठी...