सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 137

कांदिवलीत उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मुंबई, दि. ११ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने उद्या १२ एप्रिल, २०२५ रोजी भुरामाई हॉल, शांतीलाल मोदी रोड, ईराणी वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या मेळाव्यामध्ये मुंबईतील नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदासह उपस्थित राहून त्याच ठिकाणी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत व प्राथमिक निवड केली जाणार आहे. यावेळी शासनाच्या विविध महामंडळामार्फत सवलतीच्या कर्जाची माहिती दिली जाणार आहे. तसेच उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण संस्था हजर राहणार आहेत.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इन्टर्न योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय / विविध शाखेचे पदवीधर उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी या महारोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

०००

गजानन पाटील/ससं/

 

 

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

oplus_0

नवी दिल्ली, ११ : भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ तसेच कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितीत कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

0000

 

 

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई दि. ११ :-  जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा  विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिल्या.

जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजीव टाटू उपस्थित होते. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर  अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे या पद्धतीने  जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे.

जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या जागांची ७/१२ वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि क्षेत्रीस्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात.

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

थोरियम अणुभट्टी विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ११ : थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय कंपनी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर विथ थोरियम फ्युएल यांच्यामध्ये सहकार्य पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.

महाराष्ट्रात थोरियम रिॲक्टरचे संयुक्त विकास करणे, अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) च्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिॲक्टरचे व्यावसायिकीकरण करणे, “मेक इन महाराष्ट्र” उपक्रमांतर्गत थोरियम रिॲक्टरसाठी असेंब्ली लाईनची स्थापना करणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर विथ थोरियम फ्युएलच्या संयुक्त विकासाला धोरणात्मक पाठबळ मिळणार आहे. भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे सर्व काम होणार आहे.

या प्रकल्पासाठी परस्पर समन्वयातून व अभ्यासातून संयुक्त कार्यगट काम करणार आहे. या कामासाठी  सहकार्य पत्रावर स्वाक्षरी झालेल्या संस्थांचे प्रतिनिधी, महाजेनको, रोसातोम एनर्जी प्रोजेक्ट, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी अलायन्स या संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. या कराराची अंमलबजावणी करताना अणुऊर्जेचा वापर, विकास याबाबतीत सर्व कायदेशीर तरतुदी व भारत सरकारने ठरवलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक आहे.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, प्रभारी अपर मुख्य सचिव ऊर्जा संजय खंदारे, रशियाचे प्रतिनिधी मुंबईचे रशियन फेडरेशनचे महावाणिज्यदूत इव्हान वाय. फेटिसोव्ह, भारत व रोसातोमचे भारतातील प्रतिनिधी काउन्सेलर रशियन दूतावासचे युरी ए. लायसेन्को, संचालक, प्रकल्प विभाग (दक्षिण आणि दक्षिण-आशिया क्षेत्र) अलेक्झांद्रे वोल्गिन, आरईपीचे प्रकल्प व्यवस्थापक दिमित्री गुमेन्निकोव्ह, संचालक(प्रकल्प) अभय हरणे, मुख्य अभियंता अतुल सोनजे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, अमन मित्तल, मित्राचे सहसचिव प्रमोद शिंदे, अणुऊर्जा विभागाचे सहसचिव नितीन जावळे, ग्लोबल टेक्नॉलॉजी अ‍ॅक्शनचे किशोर मुंदर्गी यावेळी उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई-ट्रान्सीट सुरू करण्याविषयी हेस-एजी (HESS-AG) कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंपनीने त्यांची उत्पादने भारतात तयार करावीत, जेणेकरुन उत्पादन खर्च कमी होऊन प्रकल्प खर्चातही बचत होईल. कमी किंमतीमध्ये एक चांगली शहर वाहतूक व्यवस्था कंपनीने उपलब्ध करून दिल्यास राज्यातील किमान १० शहरांसाठी असे प्रकल्प उभारता येतील. त्यासाठी कंपनीने त्यांच्या ई-ट्रान्सीट बसेसचे उत्पादन देशातच सुरू करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करण्याविषयी सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या वापरत असलेल्या ई-बस, मेट्रो आणि ई-ट्रान्सीट यांच्या आर्थिक आणि इतर सर्व बाजू एकत्र विचारात घेऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करावा. एक चांगला आणि व्यवहार्य प्रस्ताव कंपनीने द्यावा. मेट्रो सोबत आणखी एक पर्याय सध्या शहरांसाठी गरजेचा आहे. तो या ई-ट्रान्सीट सुविधेतून उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागतच आहे.

यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यासह हेस-एजी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो, बस रॅपीड ट्रान्सीट (बीआरटी) यांना एकत्र करून एक हाय कपॅसिटी मास ट्रान्सीट रुट (एचसीएमटीआर) अशा वेगवान नागरी वाहतूक सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत आज ई-ट्रान्सीट सुविधा या पर्यायावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. 11 : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Oplus_131072

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवी, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने, कक्ष अधिकारी प्रदीप टिबे, विजय काळे यांचेसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.११ : महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे आदींसह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई, दि. ११ : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आदींनीही महात्मा फुले यांना अभिवादन केले.

जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

 ड्रेनेज लाईन कामकाजासाठी दोन कोटीचा निधी देणार

सोलापूर दि.10 – सोलापूर महापालिका हद्दीतील जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल चिंता व्यक्त करून महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन येथील मिटींग हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार देवेन्द्र कोठे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, उपआयुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीष पंडित, सह. नगर रचना संचालक मनिष भीष्णूकर, नगर अभियंता सारिका आकूलवार, सर्वाजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे, आरोग्य अधिकारी राखी माने तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.गोरे म्हणाले, महापालिकेने या भागातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी. आणि आवश्यक असल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे. शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याबाबत हलगर्जी करू नये असे निर्देशित करून ड्रेनेज लाईनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या समस्येवरील उपाय योजनेसाठी तातडीने 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून मृत विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेशही पालकमंत्री गोरे यांनी दिले. याशिवाय, जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये 15 ते 20 दिवस आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. या ठिकाणी कायमस्वरूपी दवाखाना सुरू करण्याबाबतही निर्देश दिले गेले.

बैठकीच्या प्रारंभी महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जगजीवन राम झोपडपट्टी येथे सुरू असलेल्या सर्वेक्षणाबद्दल माहिती दिली. या सर्वेक्षणात पाणी तपासणी, फवारणी, दुरावणी यांचा समावेश आहे. तसेच, बाधीत क्षेत्रांमध्ये फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे, तसेच पाण्याच्या पुरवठ्यासाठी असलेल्या पाईपलाईन काही ठिकाणी ड्रेनेज लाईनमधून जात आहेत, ज्यामुळे दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून संबंधित विभागाला पाईपलाईन बदलण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

पालकमंत्री गोरे यांच्याकडून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जगजीवन राम झोपडपट्टीतील दुर्दैवी घटना घडलेल्या विद्यार्थिनींच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी महापालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी समवेत झोपडपट्टीची पाहणी करून आरोग्य तपासणी करणे या ठिकाणी दवाखाना उभारणे याबाबत सूचना देऊन ड्रेनेज लाईन कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.

‘सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे  

परभणी, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव कार्यतत्पर असून, रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर- साकोरे यांनी आज सेलू येथे दिली. तीन दिवसीय सेवा संकल्प शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या व्यासपीठावरून बोलत होत्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी संगिता सानप, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, कार्यकारी संचालक महावितरण (प्रकल्प) धनंजय औंढेकर, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम आदी उपस्थित होते.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरीता दि. 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेवा संकल्प शिबिराचे आयोजन सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.

सद्यस्थितीत या सेवा संकल्प शिबिरामध्ये तब्बल सहा हजारावर रुग्णांनी नावनोंदणी केली असून, येथे आलेल्या प्रत्येक‍ रुग्णाच्या आजाराचे निदान करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. रोगाचे निदान करताना एकही रुग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही. मोतीबिंदू तसेच कर्करोगाचे निदान वेळीच करून घ्यावे. त्यासाठी वेळीच प्राथमिक चाचणी करून घ्यावी. सर्वांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळावे, असे आवाहन करत पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की,  रुग्णांनी कर्करोगाची वेळेवर चाचणी, निदान व उपचार केल्यास सर्व नागरिक सदृढ राहतील, कोणतीही जीवितहानी होणार नाही. ती टाळता येईल, यासाठी आपण सर्वजण काम करूयात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात रुग्णांना डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असून, त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व केंद्रांवर डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे उत्कृष्ट सेवा पुरवतील. बोरी आणि जिंतूर येथील 30 बेडच्या रुग्णालयाला 100 बेडचे रुग्णालय करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्‍ते उद्घाटन करण्यात येणार असून, येथे कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याचा मानसही पालकमंत्र्यांनी बोलून दाखविला. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी सेवा संकल्प शिबिर कार्यक्रम ठिकाणी विविध स्टॉल्सना भेटी दिल्या. तसेच आरोग्य शिबिराच्या ठिकाणी भेट देत रुग्णांची विचारपूस केली. तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी-नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यकारी संचालक महावितरण (प्रकल्प) धनंजय औंढेकर यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, वीजबिल कमी येण्यासाठी व स्वच्छ पर्यावरणाकरीता सूर्यघर योजना अतिशय चांगली आहे. विशेषत: या योजनेसाठी सबसिडी दिली जाते. प्रत्येकाने आपल्या घरावर या योजनेच्या माध्यमातून सोलार पॅनल लावून सौर ऊर्जेचा वापर करावा. घरातील सर्व उपकरणे या ऊर्जेवर चालतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन अवश्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सेवा संकल्प शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी बचतगटांच्या महिलांसह शहर व ग्रामीण भागातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल या ठिकाणी असून त्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांची माहिती नागरिकांनी दिली जात आहे. तसेच बचतगटाचे स्टॉलही येथे आहेत. सर्वच स्टॉलवर माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दुधगाव सौर उर्जा प्रकल्पाचे ई-लोकार्पण सोहळा

जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे महावितरणकडून 4 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पद्वारे तयार होणारी हरित ऊर्जा  33/11 केव्ही दुधगाव उपकेंद्रशी जोडली गेली आहे. त्यामुळे उपकेंद्रातून दुधगाव, आसेगाव आणि कौडगाव या गावातील एकूण 394 कृषी ग्राहकांना दिवसा 8 तास  दर्जेदार व योग्य दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. या प्रकल्पाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते आज ई-लोकार्पण करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी संस्थाकडून चार हजार दिनदर्शिका आणि सुंदर माझी अंगणवाडीला चार हजार वह्यांचे यावेळी वाटप करण्यात आले. तर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाचा मोठ्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये राज्यातूर द्वितीय क्रमांक आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

सेलूला राज्यातील प्रथम सौर सिटी बनविणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे 

सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्येक घरी लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना शहराला राज्यातील पहिले सौर सिटी बनवणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते आज नव्याने कार्यान्वीत झालेल्या महावितरण सेलू विभागाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यकारी संचालक प्रकल्प धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ राजाराम माने, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय रुपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता (सेलू) उमेश धोंगडे, अभियंता मंदार वग्यानी उपस्थित होते.

ग्राहकांच्या सेवा तसेच प्रशासकिय सोयीकरिता परभणी विभाग क्र.1 व 2 ची पुनर्रचना करून परभणी विभाग व सेलू विभाग असे बदल करण्यात आले व परभणी विभाग क्र.2 चे मुख्यालय सेलू येथे स्थलांतरीत करून नव्याने सेलू विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

सेलू येथे १३२ केव्ही मंजूर झाले होते पण येथील अधिका-यांनी १३२ केव्हीची आवश्यकता नसल्याचा अहवाल पाठवला होता. असा अहवाल पाठविणारावर कारवाई होणार असल्याचे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर -साकोरे यांनी सांगितले. सेलू येथून कापसाच्या गाठीसह इतर वस्तूंचा व्यापार होतो. त्यामुळे येथे १३२ केव्हीची आवश्यकता आहे. गतिमान सरकारच्या टँगलाईननुसार वीज देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे. ते काम तत्परतेने झाले पाहीजे. सेलू शहर राज्यातील पहिले सौर शहर बनवायचे आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घरोघरी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मतदारसंघात ५० हजारावर नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे. सर्वांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केले.

ताज्या बातम्या

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघगर्जनेसह पाऊस

0
मुंबई, दि ९ : गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. त्यामुळे १४...

छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९ - भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव...

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...