सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1144

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.१७: महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलासंदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने सर्व जिल्ह्यांमध्ये दि. २ ऑक्टोबर, २०२३ ते दि. १ ऑक्टोबर, २०२४  या कालावधीत राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विभागाचे सचिव, यांच्या माध्यमातून संनियंत्रण होणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरती जिल्हाधिकारी तर शहरी भागाकरिता जिल्हा सहआयुक्त (नगर प्रशासन) या सर्व योजनेचे संनियंत्रण करतील.

या अभियानाचे संनियंत्रण व मासिक आढावा घेवून त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात येईल, विभागाचे सचिव हे राज्याचे समन्वय नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्य स्तरावर एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल.

या अभियानात राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना आणि महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्तावित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे, योजनांचे लाभ घेण्यासाठी संबंधितांकडून अर्ज भरून घेणे, ही प्रक्रिया करुन प्रत्येक  जिल्ह्यामध्ये किमान अडीच लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्यात येणार तालुकास्तरावर तीस हजार व प्रत्येक गावात २०० महिला अभियानात जोडल्या जातील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर शहरी भागातील याच प्रकारे काम करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ, महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, विविध सरकारी विभाग व महामंडळाच्या योजनांचे स्टॉल, बचत गटांची नोंदणी, सखी किटचे वाटप, शक्ती गटांची महिला बचत गटांची जोडणी, सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून महिलांना वैयक्तिक लाभ देणे, उद्योग उभारणीस अर्थसहाय्य करणे, महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, प्रोत्साहन पर पारितोषिक वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी आणि माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांचे प्रशासकीय मान्यतेचे अधिकार यापूर्वी रु. ५० लाखापर्यंत होते ते २ कोटी रुपयांनी  वाढविण्यात आले आहेत.या धोरणामुळे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत  मा.आमदार यांच्या स्वेच्छाधिकारात २० लाख रुपयांचा निधी महिला विकासाच्या योजनांसाठी उपलब्ध करुन  देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२३-२४ अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणासाठी जिल्ह्याच्या नियतव्ययात १ टक्का निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच शासनाच्या सध्या कार्यरत असलेल्या योजना देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.महिला सक्षमीकरणासाठी केंद्र राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजना अधिक लोकाभिमुख करून महिलांना संघटित करून, प्रशिक्षण देऊन, आर्थिक सक्षमीकरण करणे,   महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना एकत्रितपणे एकाच छत्राखाली राबविण्यात यावेत यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. अशी माहिती  मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

०००

सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार

मुंबई, दि. 16 : राज्यात आजपासून 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत सेवा महिना राबविण्यात येणार असून ’सेवा महिना’ अंतर्गत  विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे, नागरिकांना विविध योजनांचा  लाभ घेता यावा यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी महिनाभर सेवा महिना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.

यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

0000

वि.सं.अ/राजु धोत्रे

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2023/09/202309151813001007.pdf”]

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

जालना, दि. 17 (जिमाका)- मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. जिल्ह्यातील हजारो थोर  व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते, त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. या आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी काल पार पडलेले मंत्रिमंडळ बैठकीत विविध लोककल्याणकारी निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जालना जिल्हयासाठीही अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत, जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण श्री. सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.


प्रारंभी टाऊन हॉल परिसरात असणाऱ्या मान्यवरांनी  लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली. या कार्यक्रमानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देताना श्री. सत्तार म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद संस्थानातील या मराठवाडयात त्यावेळी पारतंत्र्य होते. त्या काळात मराठवाड्याच्या मुक्तीसाठी थोरामोठयांनी फार मोठी कामगिरी बजावली. मराठवाडयाने शौर्याची परंपरा कायम राखली. तळहातावर जीव घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा देणारी मंडळी आपले घरदार, संपत्ती यांचा तिळमात्र विचार न करता स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सहभागी झाली होती. सर्व स्तरावर निजामाशी मुकाबला करुन पारतंत्र्याचे जोखड झुगारुन मराठवाडयाला स्वातंत्र्य  मिळवून देण्यात त्यावेळच्या स्वातंत्र्यसैनिकांनी खंबीरपणे जबाबदारी पार पाडली, म्हणून आज तुम्ही-आम्ही ही स्वातंत्र्याची फळं चाखत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी  हैद्राबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले.  मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो थोर  व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी  झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्युलाही कवटाळले. जात, धर्म विरहित अनेक समूहांनी आपल्या प्राणांची त्यासाठी बाजी लावली.  अनेकांनी आपले प्राण अर्पण केले. या  शूरवीरांना विनम्र अभिवादन.


श्री. सत्तार पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह संपूर्ण जालना जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने काल  छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत  अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले. मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46  हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. जालना जिल्हयाच्या प्रगतीसाठीही अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  जालना जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई शेळके यांचे धोपटेश्वरे येथे स्मारक उभारण्यासाठी रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण या वर्षी करण्यात येणार आहे.  याशिवाय जालना आयटीआयमध्ये महत्त्वाचे इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाला असून यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सेंटरमुळे शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या नवसंकल्पनांना मूर्त रुप येण्यास मदत होणार आहे. अंबड येथील मत्स्योदरीदेवी संस्थानाच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.  जालना शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 35 एमएलडी क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र आणि 15 एमएलडी क्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्रासाठी रुपये 56 कोटीचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.  तर जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेकरीता 47 कोटी 98 लाख निधीची तरतुद करण्यात येणार आहे. अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्पासाठी  16 कोटी 56 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परतूर येथे शेतकरी एमआयडीसीसाठी 25 कोटी देण्यात येणार आहे. तर  जलसंपदासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे  जिल्हयाला  सिंचनाकरीता मोठा फायदा होणार आहे. अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसाठीही भरीव तरतूद करण्यात येणार आहे.  जालना जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.


कार्यक्रमाच्या शेवटी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह त्यांच्या वारसांची श्री. सत्तार यांनी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांचा यथोचित सत्कार केला. यानंतर टाऊन हॉल परिसरात महानगरपालिकेच्यावतीने ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत भव्य अमृत कलश यात्रा चित्ररथाचे श्री. सत्तार यांच्या  हस्ते उदघाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अर्पिता वाघिणीच्या बछड्यांचे नामकरण

छत्रपती संभाजीनगर, दि.17 (जिमाका)-  सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले.

अर्पिता वाघिणीने दोन नर व एक मादी बछड्याला जन्म दिला होता. त्यांची नावे चिठ्ठी निवडून देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. बछड्यांची नावे घोषित होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शानदार सोहळ्यात मुक्तिसंग्राम दिन साजरा; बीडला आता बळ मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

जिमाका, बीड दि.17 :  छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास, सिंचनाची व्यवस्था, ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना, या सर्व माध्यमातून बीडला बळ देण्याचे काम केलेले आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.
येथील पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी श्री मुंडे बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर स्वातंत्र्यसैनिक समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर समाजसेवक आणि बीडकर जनता मोठ्या संख्येने आजच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित होती. तत्पूर्वी हुतात्मा चौक येथे स्मारकास 21 तोफांची सलामी देण्यात आली. कृषिमंत्री श्री मुंडे यांनी या ठिकाणी पुष्पचक्राची मानवंदना देऊन अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिक, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही या ठिकाणी मानवंदना देऊन अभिवादन केले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात बोलताना श्री मुंडे म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत.  या संग्रामाच्या इतिहासात अमर होऊन देशासाठी हुतात्मा झालेल्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकास श्रद्धांजली अर्पण करून  उपस्थित असलेले या संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू- भगीनी आणि सर्व नागरिकांना  मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री मुंडे पुढे म्हणाले,  देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजाम राजवटीखालील मराठवाडा स्वतंत्र होण्यास 13 महिने अधिकचा काळ लागला. हैदराबाद राज्यात असलेल्या मराठवाड्याच्या जनतेने या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण , भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे तसेच अनेकांनी योगदान दिले. या जिल्ह्याचे भूमिपुत्र विठ्ठलराव काटकर तसेच काशिनाथराव जाधव यांचे नाव घेताना अभिमान वाटतो असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा  इतिहास नव्या पिढीपर्यंत नव्याने पोहोचला पाहिजे यासाठी येणाऱ्या काळात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांना ही त्यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.  सर्वांना प्रेरणादायी ठरेल असा हा संग्रामाचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन जिल्ह्याचे आणि मराठवाड्याचे नाव आणखी उंचीवर न्यावे अशी अपेक्षा त्यांनी  याप्रसंगी  व्यक्त केली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजीत पवार हे या भागाच्या विकासासाठी कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले व विकासाची दिशा ठरविणारे सुमारे ४६ हजार कोटी रूपयांचे प्रकल्प त्यांनी मराठवाड्यास दिले याबद्दल त्यांचे ही आभार श्री मुंडे यांनी मानले.
यंदा पावसाने ओढ दिली त्यामुळे पाण्याअभावी पिके संकटात आली. शेतकऱ्यांची व्यथा जाणणाऱ्या या सरकारने या आधी एक रुपयात “पिक विमा योजना’ राबवली त्यामुळे आपण शेतकऱ्यांना विमा संरक्षणातून जिल्ह्यात 86 मंडळांमध्ये नुकसान लक्षात घेता 25 टक्के अग्रीम मंजूर करण्याची कार्यवाही केली असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले.
संपूर्ण बीड जिल्हयाचा कायापालट व्हावा या दृष्टीकोणातून काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले, त्यातदेखील शेतकरी केंद्रस्थानी मानून निर्णय घेण्यात आले आहेत, असे श्री मुंडे यावेळी म्हणाले.
बीड मधील कृषी विभागाच्या कार्यालयासाठी १४ कोटी ९० लाख रुपये यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले आहेत.
कालच्या बैठकीत बीड येथे सिताफळ व इतर फळांच्या प्रक्रिया उद्योग उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. मुलभूत सुविधा विस्तारात अंबाजोगाई येथील शासकीय कृषी विद्यालयात मुले आणि मुलींच्या वसतीगृहास मान्यता दिली आहे. या सर्वांसाठी ११० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात कृषी विभागामार्फत परळी तालुक्यातील उपलब्ध जागेत एक शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि त्याचबरोबर सोयाबीन संशोधन, प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच चांगले दिवस येतील, असा विश्वास श्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
जायकवाडी टप्पा 2 अंतर्गत पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणणे व पुढे ते पाणी माजलगाव उजव्या कालव्यातून पुढे सुमारे 150 किलोमीटर पर्यंत घेऊन जाणे, या उद्देशाने 561 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, याद्वारे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील सुमारे 85 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे हे सांगताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात ऊसतोडीसाठी जिल्हयाबाहेर जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे अशा कामगांरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांची विनंती लक्षात घेऊन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेत ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्यातील १६०० मुलींना मिळणार आहे यामुळे यापुढे मुलींचे शिक्षण थांबणार नाही असा असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काळानुरूप कार्यालयांचे स्वरूप बदलावे यासाठी बीड येथे बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत उभारणीसाठी ६३ कोटीहून अधिक खर्चाचा आराखडा कालच मंजूर केला सोबतच पाटोदा तसेच बीड येथील प्रशासकीय भवन देखील आता नव्याने उभारण्यात येईल यामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, असेही श्री मुंडे यावेळी म्हणाले.
जिल्हावासियांचे दैवत अर्थात परळी मधील श्री वैद्यनाथ ज्योतीर्लिंग. या ठिकाणी विकास करण्यासाठी २८६ कोटी ६८ लाखांचा आराखडा मंजूर केला आहे तर, अंबाजोगाई येथील स्थळविकास कामांना देखील मान्यता दिली आहे. असे सांगताना विशेष आनंद वाटत असल्याचे, ते या प्रसंगी म्हणाले.
जिल्हयाचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी शासन स्तरावरून निधी कमी पडणार नाही आणि आपण सारे मिळून नवा बीड घडवू अशी प्रतिज्ञा या मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवात घेऊ या.
मराठा आरक्षण मागणीचा सकारात्मक पद्धतीने शासनाने विचार केला आहे व टिकेल असे आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असा आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केला.
विकास कामांवर भर देताना जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामांची दखल देखील या प्रसंगी त्यांनी घेतली, ऑनलाईन व पारदर्शीपणे ६००रु ब्रास ने वाळू उपलब्ध करून सर्वसामान्यांना त्यांच्या घराचे स्वप्न आकारास आणण्याचा मार्ग राक्षसभुवन येथील जिल्यातील पहिल्या वाळू डेपोच्या लोकार्पणाने मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत महोत्सवी वर्षात अमृत काळ म्हणून ७५ हजार नोकऱ्या शासन देणार आहे. आरोग्य खात्याची मेगा भरती सुरु झाली आहे, जिल्ह्यात २०१५ नंतर प्रथमच कोतवाल भरती झाली. आज नियुक्ती पत्रे देण्यात . या सर्वांचे अभिनंदन याप्रसंगी त्यांनी केले.
75 वर्षांपूर्वी मुक्त झालेला मराठवाडा आपली ओळख बदलतोय. मागासलेला मराठवाडा आणि मागासलेला जिल्हा बीड हे आता इतिहासजमा होतील. नवा प्रगत बीड जिल्हा अशी ओळख समोर येईल  अशा सदीच्छा त्यांनी याप्रसंगी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच इतर महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेतल्या.

प्रशासकीय भवन येथील ध्वजारोहण

प्रशासकीय भवन येथे अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी तहसीलदार सुहास हजारे तसेच या इमारतीत असणाऱ्या सर्व कार्यालयांचे प्रमुख यांची उपस्थिती होती.
*****

• मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त झालेल्या परेड संचलनाच्या परेड कमांडर पोलीस उपाधीक्षक श्वेता खाडे या होत्या. तर सेकंड इन परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक पी.पी दलाई हे होते.

• येथील स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम च्या माध्यमातून मराठवाडा गौरव गीत सादर केले.

• मुख्य शासकीय कार्यक्रमात काही स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये  कचारवाडी येथील जानू वनवे  पाटोदा तालुक्यातील रामभाऊ बडगे, बीड तालुक्यातील मिठू गायके यांचा सन्मान कृषिमंत्री श्री मुंडे यांनी स्वातंत्र्यसैनिक जिथे बसलेले होते त्यांच्या जवळ स्वतः जाऊन केला.

• यावेळी शेतकऱ्यासाठी उपयोगी असणाऱ्या आरोग्य वाहीकेला कृषिमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला.

000

मराठवाडा मुक्ती संग्राम गौरव गाथा चित्ररथ बीड जिल्ह्याच्या शंभर गावात फिरणार

मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरव गाथा सांगणारे 2 चित्ररथांना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथ रवाना केले. हे चित्ररथ बीड जिल्ह्यातील शंभर गावात फिरून मराठवाडा मुक्ती संग्राम गौरव गाथेची माहिती देतील.

पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथांच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवगाथा सांगण्यात आली आहे.
या चित्ररथांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी कृषिमंत्री श्री मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून याचा शुभारंभ केला.

याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी कृषिमंत्री श्री मुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

मुंबई, दि. १७: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्र-काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठक, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अभिवादन आदी कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी काश्मिरकडे प्रयाण केले. त्यांच्या समवेत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित आहेत.

पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या ‘हम सब एक है’ या विशेष कार्यक्रमासह महाराष्ट्र काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात म्हणून काश्मिर मधील ७३ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी श्रीनगर येथे हा कार्यक्रम होत आहे. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे काश्मीर मधील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेत.

कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन

सोमवार दि. १८ सप्टेंबरला कारगिल येथे सकाळी सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉ. अली इराणी तसेच फिजिओथेरपी डॉक्टरांद्वारे कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त आयोजित वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. छानीगुंड येथे सरहद संस्थेच्या माध्यमातून भारतीय लष्करासाठीच्या ७२ फुटी तिरंगा झेंड्याचे अनावरण देखील मुख्यमंत्री करणार आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे द्रास येथील युद्ध स्मारकाला देखील भेट देणार असून यावेळी ते लष्कराचे अधिकारी आणि जवानांशी संवाद साधणार आहेत. जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन देखील मुख्यमंत्री करणार आहेत. या दोन दिवसांच्या या काश्मीर दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र- काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

०००

रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

  •  हिंगोली येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता.

  • श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी ६० कोटी ३५ लाख रुपयाच्या आराखड्यास मान्यता.

  • हिंगोली  जिल्ह्यातील  पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा या तीन प्रकल्पाच्या ३ हजार ८४ कोटी ८३ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता.

  • मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान काफी टेब्ल बुकचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विमोचन.

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद या संस्थानांनमुळे भारतीय संघराज्य पुर्णत्वास गेले नव्हते. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला. या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कै. अण्णासाहेब टाकळगव्हाणकर उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी  श्री. भुमरे बोलत होते.  यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर,  आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 75 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, चित्ररथ, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्या ठिकाणापर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मरणार्थ कळमनुरी तालुक्यातील दाती व वसमत तालुक्यातील वापटी येथे असे एकूण दोन स्मृतीस्तंभ उभारण्यात येत असलयाचे शुभेच्छा संदेशात सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळ्याच्या निमित्त आणि आपल्या देशाच्या मातृभूमीविषयी आणि  वीरांनी  दिलेल्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून, देशात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ हे अभियान जिल्ह्यात उत्साहात राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. भुमरे पुढे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कालच छत्रपती  संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांची  विकास  कामे करण्याचा संकल्प  जाहीर केला आहे. या बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयास 430 खाटांचे रुग्णालय संलग्नित असेल. यासाठी अंदाजे 485 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी 60 कोटी 35 लाख रुपयाच्या आराखड्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले.

मराठवाड्यातील दहा सिंचन प्रकल्पामध्ये हिंगोली  जिल्ह्यातील  पोटा उच्च पातळी बंधारा, जोडपरळी उच्च पातळी बंधारा, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा यांचा समावेश आहे. या तीन प्रकल्पाच्या 3 हजार 84 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचा  हिंगोली जिल्ह्यातील 4 हजार 219 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे, असेही श्री. भुमरे यांनी सांगितले.

वसमत येथे मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी जागा, वसमत एमआयडीसी स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली असून वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी 33 कोटी 3 लाख रुपये, हिंगोली  शहरासाठी  104 कोटी 28 लाख किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प, औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या पाणीपुरवठा  प्रकल्पासाठी 36 कोटी 44 लाख रुपये, औंढा नागनाथ शहराच्या विकास आराखड्यासाठी  50 कोटी  रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये प्रामुख्याने हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. या हळद संशोधन केंद्रासाठी  100 कोटी रुपयाच्या निधीस मान्यता दिली असून हळद संशोधनास आता वेग येणार असल्याची माहिती श्री. भुमरे यांनी यावेळी दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये गोवंश वर्गीय जनावरांना लम्पी या विषाणूजन्य आजाराची लागण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत  2 हजार 674 जनावरे बाधित आढळून आलेली आहेत. सद्यस्थितीत 846 सक्रीय पशु रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सर्व पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेऊन तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क करावा व आपल्या जनावराला लम्पी आजारापासून वाचवावे, असे आवाहन श्री. भुमरे यांनी यावेळी केले.

राज्य शासनाने सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकीय आरोग्य संस्थामधून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निशुल्क करुन मोफत उपचाराची सोय केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील  सर्वसामान्य जनतेला होत आहे. तसेच देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकंल्पनेतून साकारलेल्या आयुष्यमान भव: मोहिमेची सुरुवात राज्यभर दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी करण्यात आली आहे. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य व्हावे यासाठी आयुष्यमान भव: ही महत्वकांक्षी मोहिम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंत राबविली जाणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये 18 लाख 34 हजार 770 मनुष्य दिन निर्मिती करत   118 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सन 2023-24 मध्ये मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट 15 लाख       95 हजार असताना आतापर्यंत 14 लाख 34 हजार 786 मनुष्य दिन निर्मिती करुन 90 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मंजूर करण्यात आलेल्या 16 हजार 386 वैयक्तीक सिंचन विहिरीपैकी 5 हजार 765 विहिरीचे कामे सुरु करण्यात आली आहेत. तर 6 हजार 647 विहिरींची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. हिंगोली जिल्ह्यात मातोश्री शेत पाणंद रस्त्याच्या 419 कामांना मंजुरी देण्यात आली असून 184 कामे सुरु झालेली आहेत व 13 कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच 3 हजार 92 गाय गोठ्यांना मंजुरी देण्यात आली असून 2 हजार 147 कामे सुरु झालेली आहेत. तर 330 कामे पूर्ण झालेली आहेत, असे सांगून आपल्या जिल्ह्याची आणि महाराष्ट्र राज्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

प्रारंभी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी श्री. भुमरे यांनी  ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर, माधव हरण, गंगाबाई कावरखे, रुक्मिनीबाई देवकते, मालतीबाई पैठणकर, वच्छलाबाई नाईक यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. तसेच श्री. भुमरे यांनी  लोकप्रतिनिधी,  अधिकारी,   पदाधिकारी,  नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मराठवाडा मुक्ती दिनाची व अवयव दानाची शपथ घेण्यात आली. तसेच यावेळी कृषि विभागामार्फत खरीप हंगाम व रब्बी हंगामामधील जिल्हास्तरीय पिक स्पर्धेतील विजेत्यांना रोजगार हमी  योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या क्रार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. यावेळी   तहसीलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, यांच्यासह  पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान कॉफीटेबल बुकचे

रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विमोचन

यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान या काफी टेब्ल बुकचे विमोचन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, संजय टाकळगव्हाणकर, वामनराव टाकळगव्हाणकर, विठ्ठल सोळंके उपस्थित होते. तसेच यावेळी श्री. भुमरे यांच्या हस्ते शिक्षकाची यशोगाथा या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.

परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

परभणी दि. 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करताना परभणी जिल्ह्याचे योगदान अनन्यसाधारण असून, राज्य शासन जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याला भरघोस निधी देण्यात आल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या राजगोपालचारी उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार संजय जाधव, आमदार  डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या पिढीला मुक्त‍िसंग्रामाचा लढा कळावा म्हणून, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून हे अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करण्यात येत आहे. देशाला 15 ऑगस्ट, 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी देशातील 565 संस्थानांपैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. परंतु हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने सामील होण्यास तयार नव्हती. त्यामुळे निजामाविरोधात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभारला होता. त्यानंतर 13 महिन्यांनी हा भाग मुक्त झाल्याचे श्री. सावे म्हणाले.

मराठवाडा मुक्तीसंग्रामात परभणीकरांनी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे. कारण निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्ध प्रत्यक्ष संघर्षाची मुहूर्तमेढ ही परभणी जिल्ह्यातच रोवली गेली होती. मराठवाडा मुक्तिसंग्रामात महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे योगदान आहे.  या लढ्यात परभणी जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान दिले. या सशस्त्र लढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान राहिले आहे. या लढ्याचा मुख्य हेतू हा राष्ट्रीयता, निधर्मीपणा व लोकशाहीची भावना वाढविणे हा होता, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्त‍िसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा विभागाचा कायापालट घडविण्यासाठी तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांची विकास कामे करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. या बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 91 कोटी 80 लाख, जिल्ह्यातील सोनपेठ आणि पालम तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू करुन 400 मुलींना शिक्षण घेण्यासाठी 20 कोटी 73 लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाची जागा व क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरणासाठी 15 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

परभणी शहराची वाढती लोकसंख्या पाहता समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 157 कोटी 11 लाख रुपये तसेच शहरासाठी मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 408 कोटी 83 लाख मंजूर करण्यात येणार आहेत. परभणी येथील नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता महानगरपालिकेस 11 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. सेलू तालूक्यातील निम्न दुधना प्रकल्प आणि पुर्णा तालूक्यातील ममदापूर उच्च पातळी बंधारा आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या कामास 728 कोटी 85 लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाद्वारे परभणी व जालना या दोन जिल्ह्यातील एकूण 34 हजार 438  हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तर ममदापूर उच्च पातळी बंधाऱ्यासाठी 271 कोटी 87 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील 1  हजार 375 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच मराठवाड्यातील पुरातन मंदिरांच्या विकासकामांसाठी तब्बल 253 कोटी 70 लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील महादेव मंदिर, धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिरासह चारठाणा मंदिर समूहाचे संवर्धन आणि विकास करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात जिल्ह्यातील 8 लाख 75 हजार लाभार्थ्यांना 1 हजार 464 कोटी रुपयांचे विविध प्रकारचे लाभ दिल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे अभियान देशभर राबविले जात आहे. आता ‘आयुष्मान भव’ ही योजना राबविण्यात येत असून, राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले आहे. या योजने अंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान व आरोग्य मेळावे, रक्तदान शिबिर, अवयव दान जनजागृती, आयुष्यमान ग्राम सभा, अंगणवाडी – प्राथमिक शालेय मुलांची आणि 18 वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी असे विविध आरोग्य विषयक कार्यक्रम या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, वारस यांची भेट घेतली. तसेच विष्णू रामभाऊ वैरागड यांनी दिव्यांगाच्या पुनर्वसन क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, माजी खासदार सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, तहसीलदार यांच्यासह पत्रकार, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

प्रारंभी सहकार मंत्री अतुल सावे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने शोक धून वाजवत तसेच हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी श्री. सावे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 120 फूट उंच ध्वजस्तंभाचे अनावरण

महानगरपालिकेने राजगोपालचारी उद्यानात उभारलेल्या 120 फूट उंच स्तंभाचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. परभणी मनपाने प्रथमच 120 फूट उंच राष्ट्रध्वजासाठी हा स्तंभ उभारला आहे. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांची प्रमुख उपस्थिती होती.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन

राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन करण्यात आले.

येथील राजगोपालचारी उद्यानात आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती रश्मी खांडेकर, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रिटीश कालावधीत प्रथम परभणी जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी) आवृत्ती सन 1967 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. याच गॅझेटिअरची पुरवणी सन 1989 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या ग्रंथाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून त्याचे पुनर्मुद्रणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सन 1988 मध्ये प्रकाशित झालेल्या परभणी जिल्हा मराठी गॅझेटिअरला 32 वर्ष झाल्याने याच जिल्हा गॅझेटिअरची पुरवणी काढून अमुलाग्र बदलांची संक्षिप्ताने नोंद घेवून मागील तीन दशकात लोककल्याणकारी गतिमान शासनाने जिल्ह्यात राबविलेल्या विविध योजना व केलेल्या कामांचा आढावा घेणारी पुरवणी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये विशेष कामांची जाणीवपूर्वक नोंद घेण्यात आली आहे. ही पुरवणी म्हणजे नवीन ग्रंथ नसुन सांख्यीकीय तक्त्यांच्या आधारे मूळ ग्रंथातील नोंदीनंतरचा टप्पा नोंदविण्यात आला आहे.

परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीसाठी दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या मार्गदर्शनात सहसंपादक श्रीमती सा.प्र. पिंपळे, संशोधन अधिकारी दि. वि. भगत, सहायक संशोधन अधिकारी श्रीमती स.सु. गोसावी आणि लघुलेखक वि. प. गुळगुळे यांनी मर्यादित वेळेत काम करुन ही आवृत्ती प्रकाशित केली आहे.

यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

‘मराठवाड्याची मुक्तिगाथा’ चित्रप्रदर्शनीला मंत्री श्री. सावे यांची भेट

 मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर येथे परभणी शहरातील जिजाऊ आयटीआयच्या वतीने ‘मराठवाड्याची मुक्तिगाथा’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाला भेट देत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. या ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील ४० हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.,मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे, माजी खासदार सुरेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या चित्रप्रदर्शनामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे नाव, मराठवाडा मुक्तिसंग्रामात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी हे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे गृहनिर्माण, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांना जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे सचिव प्रा. नितीन लोहट, कार्यक्रम समन्वयक सिद्धेश्वर जाधव उपसि्थत होते.

कुरुंदकर स्मारकाच्या कामाला गती देऊ – पालकमंत्री गिरीष महाजन

नांदेड (जिमाका) दि. १७ :- महाराष्ट्राच्या विचारवंतात प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचे नांव आजही आदराचे आहे. महाराष्ट्राला त्यांनी पूर्वग्रहमुक्त व असांप्रदायिक विचार पध्दती दिली.

साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, सौंदर्यशास्त्र, संगीत अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी केलेले तत्त्वचिंतन मोलाचे आहे. त्यांच्या स्मारकाच्या पुढील टप्यातील कामासाठी आम्ही सकारात्मक असून मंत्रालय पातळीवर तात्काळ त्याला गती देऊन प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठाणला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार  प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. दत्ता भगत, श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, लक्ष्मण संगेवार आदि मान्यवर उपस्थित होते.

नरहर कुरुंदकर यांच्या जीवन कार्याला अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी येथील ग्रंथालय व इतर सोयीसुविधांना भक्कम केले पाहीजे. याचबरोबर वर्षातून एकवेळा अखिल भारतीय पातळीवरील परिसंवाद व इतर उपक्रम हाती घेता येऊ शकतील असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविले. यावेळी छोटेखानी समारंभात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समयोचित भाषण झाले.

 

000

मराठवाडा मुक्तिसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अनमोल – पालकमंत्री गिरीष महाजन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम हा भारताच्या अखंड सार्वभौमत्वाला सिद्ध करणारा आहे. निझामाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान संपूर्ण भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अत्यंत अनमोल असल्याचे, प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठवाडा मुक्तिदिन समारंभात माता गुजरीजी विसावा उद्यान येथे  हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते  मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीने, मराठवाडा मुक्तिसंग्रामाने लोकशाहीच्या मूल्यांसह जो समृध्द वारसा दिला आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहचावा यादृष्टीने आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासह मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करीत आहोत. हा समृध्द वारसा पुढे नेण्यासह भारतातील शेती, शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेवून विकासाला गती दिली आहे. जी-20 परिषदेचे अत्यंत समर्थपणे आयोजन करून जगातील सर्व देश प्रमुखांनी भारताला प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वरुपात एका समर्थ नेतृत्वाची अनुभूती घेतल्याचे त्यांनी सांगितले.   

मराठवाडा मुक्ती दिनाच्या औचित्याने विविध विकास कामाचे लोकार्पण

मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज विसावा उद्यान येथील मुख्य शासकीय समारोहात प्रातिनिधीक स्वरुपात लोकार्पण करण्यात आले. यात अर्धापूर आणि भोकर येथील पोलीस स्टेशनच्या नुतन इमारत, नांदेड जिल्हा रुग्णालय येथील डायलेसीस सेंटर, आयपीएचएल प्रयोगशाळा, नांदेड येथील कोषागार कार्यालय सुरक्षा कक्ष नुतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहिर केले. याचबरोबर क्रिडांगण व डिजीटल क्लासरुमचे भूमीपूजन,  इंडियन स्वच्छता लिग 2.0 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत पंडित दिनदयाल उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहिर केले.

 

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या विशेष कॉफीटेबल बुक व स्मृतिदर्शिकेचे प्रकाशन

 मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विशेष कॉफीटेबल बुक व स्मृतिदर्शिकेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाबाबत आधारित या विशेष कॉफीटेबल बुकचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, डॉ. सुरेश सावंत, संजीव कुळकर्णी व शंतनु डोईफोडे यांनी केले आहे. यात माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव, ज्येष्ठ संपादक निशिकांत भालेराव, जयप्रकाश दगडे, डॉ. महेश जोशी, डॉ. संपदा कुलकर्णी यांचे लेख आहेत. स्मृतिदर्शिकेत नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील महत्वपूर्ण घटनांवर प्रख्यात चित्रकार राजु बाविस्कर यांच्या रेखाटनासह संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक मदत

 गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांच्या मदतीला शासन खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. सुमारे 8.89 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 472 कोटी रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. या खरीप हंगामासाठी 1 हजार 812.14 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी 420 कोटी रुपये लवकरच देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती

योजना 2019 अंतर्गत 15 सप्टेंबर 2023 अखेरपर्यत 31 हजार 181 शेतकऱ्यांना 117.61 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ शासनामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. मार्च व एप्रिल 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या 42 हजार 793 बाधित शेतकऱ्यांना 34 कोटी 21 लाख 68 हजार 863 रुपये  इतका निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्‍यावर वितरीत करण्‍यात आला. पी.एम.किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 32 हजार 587 इतके पात्र शेतकरी असून त्‍यांना आजपर्यत एकूण रूपये 1 हजार 147 कोटी 1 लाख इतकी मदत वितरीत झाली आहे असेही पालकमंत्री महाजन यांनी यावेळी नमूद केले.

केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी आपण विविध योजना राबवित आहोत. याला राज्य शासनानेही जोड दिली आहे. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक विहीर योजनेवर जिल्हा परिषदेने विशेष भर दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील बालकांच्या सुपोषणासाठी आयआयटी पवई यांच्या विद्यमानातून विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा दत्तक योजनाबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. देणगीच्या माध्यमातून ही दत्तक योजना कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्याच्या सुविधेत नवीन भर

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी 4 ठिकाणी सिटी स्कॅन यंत्रणा, 6 ठिकाणी डायलेसीस यंत्रणा, 15 ठिकाणी मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष, टुडी ईको तपासणी, 16 ठिकाणी ब्लड स्टोरेज युनिट या सर्व सुविधा आरोग्याच्यादृष्टिने जिल्ह्यात वाढविल्या आहेत. राज्यातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी “तीर्थक्षेत्र विकास योजना” राबविण्याचा मानस असून त्या योजनेच्या माध्यमातून माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे 7 कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. याव्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यातील इतर पर्यटन क्षेत्राचाही विकास करण्यात येणार असल्याचे म्हणाले.

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी  1 हजार 76  कोटींची वाढीव तरतूद

उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी  1 हजार 76  कोटींची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 लाख 8 हजार  स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून साधारण 60 लाखापेक्षा जास्त महिलांना या कार्यक्रमात सामावून घेतलेले आहे.  यापैकी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 1 लाख 24 हजार स्वयंसहाय्यता गटांमध्ये साधारणपणे 12 लाख 23 हजार  महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी कटिबध्द

महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी कटिबध्द आहे. मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. सर्व पातळीवर आरक्षणाचा निर्णय टिकलाच पाहिजे यादृष्टिने शासनाची भूमिका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील अंतवरली येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. त्यांच्यासह संपूर्ण समाजाला त्यांनी विश्वास दिला आहे.

 

छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत नांदेडसाठी भरीव तरतूद

सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथील मध्यम प्रकल्पासाठी 771 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे 1 हजार 600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील उनकेश्वर (ता. किनवट) येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्पाच्या 232 कोटी 71 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यातून किनवट   तालुक्यातील   1 हजार 90  हेक्टर आणि यवतमाळ  जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 370 हेक्टर असे एकूण 1 हजार 460 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी 14 हजार 40 कोटीची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील विविध स्मारके व मंदिराच्या विकास कार्यक्रमात होट्टल मंदिराचाही समावेश केलेला आहे. मराठवाड्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वत:च्या कार्यालयासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात 180 कोटी रुपये दिले जाणार आहेत. निझामकालीन शाळांची दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी 20 टक्के लोकसहभागाची अट शिथील केली आहे. नांदेड शहरात सुरक्षिततेच्यादृष्टिने 100 कोटी रुपयांचे सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 329 कोटी 16 लाख रुपये, माहूर नगरपरिषदेसाठी 24 कोटी 62 लाख रुपये, माहूर येथे वनविश्रामगृह, साबरमती घाटाप्रमाणे नांदेडच्या गोदावरी घाटाचे सौंदर्यीकरण, रिव्हर फंडसाठी 100 कोटी रुपयांचे सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नांदेड येथे स्वयंमचलित चाचणी पथप्रकल्प, घनकचरा प्रकल्पासाठी 8 कोटी 7 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

या विशेष समारंभात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मराठवाडा गौरव गीताचे गीतकार लक्ष्मीकांत तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक दिव्यांग बॅडमिंटन खेळाडू लता उमरेकर यांना 2 लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. याचबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत, व मराठवाडा गीत सादर केले. पालकमंत्री यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणाच्या अगोदर प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...