मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 1142

संस्कार आणि ज्ञान सोबत मिळणे आवश्यक – मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 20 : शिक्षण, संस्कार आणि संस्कृतीहे महर्षी विद्या मंदिरचे ब्रीद वाक्य आहे. गुरुकुल शिक्षण  मंडळाच्या या शाळेला कॉन्व्हेंट न म्हणता मंदिर म्हटले जाते आणि मंदिरात शिकणारे विद्यार्थी हे संस्कारी असतात. शिक्षण संस्कारी नसेल तर आपण फक्त साक्षर असू, मात्र सुसंस्कृत असणार नाही. त्यामुळे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी व्हायचे असेल तर संस्कार आणि शिक्षण सोबत मिळणे अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महर्षी विद्या मंदिर पोचमार्गावरील ब्रिज कम बंधारा बांधकामाचे भूमिपूजन केल्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना ते बोलत होते. यावेळी सा.बा. कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, देवराव भोंगळे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, गुरूकुल विद्या मंडळाचे अध्यक्ष गिरीश चांडक, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, उपाध्यक्ष वसुधा कंचर्लावार, संस्थेचे सदस्य उमेश चांडक, अल्का चांडक, वीरेंद्र जयस्वाल, प्राचार्य लक्ष्मी मूर्ती, उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, दाताळाच्या सरपंच सुनिता देशकर, उपसरपंच विजयालक्ष्मी नायर आदी उपस्थित होते.

स्वत:सोबतच समाजासाठी आणि देशासाठी शिकणारे विद्यार्थी घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महर्षी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले छायाचित्र तसेच पुष्पगुच्छाने माझे स्वागत करण्यात आले, याचा मला अतिशय आनंद आहे. जीवनाच्या प्रत्येक लढाईत महर्षी विद्या मंदिरचे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील. मात्र त्यासाठी परिश्रमाची गरज आहे. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, शिक्षणात वाघासारखाच पराक्रम करा. आपल्या भविष्यासाठी राबणा-या आई-वडीलांचा नेहमी सन्मान करा. चांगले आणि संस्कारी विद्यार्थी घडले तरच समाज घडेल आणि देशाची प्रगतीपथावर वाटचाल होईल, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

विद्यार्थ्यांचा सत्कार : शालेय शिक्षण, विविध खेळ तसेच ऑलंपियाड मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात सायन्स ऑलंपियाडमध्ये सुवर्णपदकप्राप्त तेजस उत्तरवार यांच्यासह इतर क्रिडा प्रकारात तसेच शालेय शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणारे रिया खंडारे, श्रेया बुटले, आरोही दखने, इशिका मंडल, आदिती मेश्राम, चैतन्य राऊत, दिपीका साधू आदींचा सत्कार करण्यात आला.

डीजीटल लँग्युस्टीक मेंटॉरचे उद्घाटन : विद्यार्थ्यांकडून होणारा इंग्लिश भाषेचा चुकीचा उच्चार आता डीजीटल लँग्युस्टीक मेंटॉरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे म्हणता येणार आहे. 20 संगणक असलेल्या या कक्षाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पोचमार्गावरील पुलाचे भुमिपूजन : महर्षी विद्या मंदिर येथे जाण्यासाठी असलेला पुल हा अतिशय रुंद असल्यामुळे येथे पुलाची सर्वांची मागणी होती. 2 कोटी 36 लक्ष 68 हजार निधीतून आता नवीन ब्रिज येथे तयार होणार आहे, याचा आनंद आहे. 6 महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होईल, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. प्रशासकीय मान्यतेनुसार अस्तित्वातील पुलाची दुरुस्ती, जुन्या पुलापेक्षा 30 से.मी. उंच आणि 30 मीटर लांब नवीन पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे संरक्षण भिंतीसह नालीचे बांधकाम आदींचा यात समावेश आहे.

मागेल त्याला मिळेल घर; कला-कौशल्यावर गुजराण करणाऱ्यांना देणार पूरक साहित्य डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक 20 (जिमाका वृत्तसेवा)आदिवासी बांधवांसह जिल्ह्यातील प्रत्येक बांधवाला घरकुल देताना ‘मागेल त्याला मिळेल घर’ हे धोरण अवलंबले जाणार असून ग्रमीण आणि शहरी वाड्या, वस्त्यांमधील आपल्यातील विवध कला-कौशल्याच्या आधारावर गुजराण करणाऱ्या विविध पथकांना व्यवसायोपयोगी साहित्य देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते आज शहादा येथील मीराप्रताप लॉन्स येथे आयोजित तालुक्यातील विविध वाड्यावस्तांमधील नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, माजी नगरसेवक प्रशांत निकम, विजय पाटील, शशिकांत पाटील हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आधार कार्ड, शिधा पत्रिका, बँक पासबुक काढण्यासाठी येणार खर्च आदिवासी विभाग करणार असून पुढील महिन्यात महिला बचत गटांच्या  सभा घेऊन त्यांना व्यवसायासाठी प्रशिक्षणाबरोबर अनुदान देऊन त्यांना व्यवसाय उभा करून त्याला बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार आहे. युवकांनाही व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायासाठी अनुदान दिले जाईल, बँड पथक, भजनी मंडळ, सोंगाड्या पार्टी आदींच्या कलाकौशल्याच्या उभारी देवून त्यांना व्यवसायासाठी पूरक साहित्य दिले जाईल. रोजगारासोबत आदिवासी परंपरा व संकृतीचेही  जतन व्हावे, हा या निमित्ताने प्रयत्न राहील, शहराच्या प्रत्येक वॉर्डात सोयी, सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील विविध वस्त्यांमधून आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक व सामूहिक समस्या मंत्री डॉ. गावित यांनी ऐकून घेऊन ज्या समस्यांचे जागेवरच निराकरण करता येणाऱ्या होत्या त्यांचे लगेच निराकरण पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात आले.

‘आयुष्मान भव:’ मोहिमेतून होणार आरोग्य सेवांचा जागर

केंद्र शासन देशभर 17 सप्टेंबरपासून आयुष्मान भव: मोहीम राबवित आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविधस्तरावर आरोग्य विषयक सेवा देण्यात येत आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. देशभर मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी करण्यात आला. राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे मुंबईतही 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले.  ही मोहीम 31 डिसेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. आयुष्मान भव: शब्दाप्रमाणे सर्वांना सुदृढ आरोग्य मिळावे, या हेतूने शासन काम असून मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा जागर करण्यात येत आहे.

आयुष्मान भव: हा आशीर्वादरूपी शब्द आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. या शब्दाच्या अर्थावरच ही मोहीम आधारित आहे. मोहिमेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबरपासून झाला आहे. राज्यातही राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत मोहिमेचा कार्यारंभ करण्यात आला. मोहिमेदरम्यान क्षयरोग मुक्त भारत अभियान जोरकसपणे राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त निक्षय मित्र बनवून क्षयरोग मुक्त भारत अभियानाला बळ देण्यात येत आहे. देशभरात मोहिमेदरम्यान घेतलेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळही विकसित केले आहे. मोहिमेची संपूर्ण माहिती डॅश बोर्ड स्वरूपात

https://ayushmanbhav.mohfw.gov.in/public/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर देशातील कुठल्याही जिल्ह्यातील माहिती उपलब्ध आहे.

मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा,  अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आयुष्मान आपल्या दारी 3.0 :

‘आयुष्मान आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आजपर्यंत संपूर्ण देशात 25 कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. या अनुषंगाने या उपक्रमामधून सर्व जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप  करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काळजी घेण्यात येत आहे. वैयक्तिकस्तरावर आयुष्मान कार्ड संपृक्तता प्राप्त करणे, आयुष्मान कार्डची छपाई आणि वितरण अशाप्रकारे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष्मान कार्ड वितरण मोहीम सुरू झालेली आहे.

आयुष्मान सभा :

हा उपक्रम गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व व्हीएचएसएनसी (व्हिलेज हेल्थ, सॅनिटेशन अॅण्ड न्युट्रीशन कमिटी) यांच्यामार्फत राबविण्यात येतो. या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आयुष्मान कार्ड व आभा कार्डबाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य आजार, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग आदीबाबत जनजागृती करणे, तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर  मिळणाऱ्या सेवा सुविधांचे मूल्यमापन करणे हा आहे. या सभेद्वारे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणे, प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची व प्रत्यक्षात लाभ घेतेलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे, संलग्न रुग्णालयांची यादी प्रसिद्धी देणे, असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, आयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांची जनजागृती करण्यात येत आहे. आयुष्मान भव: मोहिमेमध्ये ‘निरोगी गावे’ आणि ‘निरोगी ग्रामपंचायती’ निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. ज्या पंचायती आरोग्य योजना यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांना ‘आयुष्मान ग्रामपंचायत’ किंवा ‘आयुष्मान अर्बन वॉर्ड’ म्हणून सन्मान देण्यात येणार आहे, जे त्यांच्या न्याय आरोग्य सेवेच्या तरतुदीच्या समर्पणाचे प्रतीक आहे.

आयुष्मान मेळावा :

        आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवारला संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजारांविषयी तपासणी, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग आणि अन्य संसर्गजन्य आजारांची तपासणी, तिसऱ्या आठवड्यात माता व बाल आरोग्य, पोषण आहार व लसीकरण, चौथ्या आठवड्यात डोळ्यांची तपासणी व डोळ्यांचे आरोग्य ही संकल्पना असणार आहे. या मेळाव्यादरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करण्यात येणार आहे. सर्व समावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार व उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सल्टेशन सेवा देण्यात येत आहेत.

सामुदायिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत आठवड्याला किमान एक आरोग्य मेळाव्याचे आयोजनही करण्यात येणार आहे. या मेळाव्यात तज्ज्ञ सेवांपासून वंचित रुग्णांना सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच ज्या तालुक्यांमध्ये तज्ज्ञ सेवांचा अभाव आहे, अशा तालुक्यांमध्ये रुग्णांना तज्ज्ञ सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.

अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी

या उपक्रमांतर्गत सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मुलांची 32 सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार मुलांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मोहिमेत रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. अशाप्रकारे राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आयुष्मान भव : मोहिमेतून 31 डिसेंबरपर्यंत आरोग्यविषयक सेवांचा जागर सुरू आहे.

००००००

नीले तायडे,

विभागीय संपर्क अधिकारी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ : आरोग्यदायी राळा पीक

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका  तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. सप्टेंबर महिना ‘राळा’ या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. राळ्याला पारंपरिक महत्त्व आहे.  या महिन्यात धार्मिक कार्य केले जातात. यासाठी ‘राळा’ अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राळा या तृणधान्याला महत्त्व आहे.

‘राळा’ पिकाचे महत्त्व :

राळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. राळ्याचा अँटिऑक्सिडण्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवून मेंदूची कार्यक्षमता वाढवते. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. मधुमेह आणि पोटाच्या आजारांवर ‘राळा’ हे पौष्टिक अन्न म्हणून उपयुक्त आहे.

राळा (Foxtail millet) : पिकाची ओळख, महत्त्व व सुधारित लागवड तंत्रज्ञान

राळा (Foxtail millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून या पिकाचे शास्त्रीय नाव [Setaria italica (L). Beauv] असे आहे. या पिकाची धान्य व तसेच चारा म्हणून आशिया, आफ्रिका व अमेरिका खंडात लागवड केली जाते. या पिकाचे स्वपरागीभवन, कमी पक्वता कालावधी व C4 वर्गीय तृणधान्य हे प्रमुख गुणधर्म आहेत. भारतात या पिकाची आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात लागवड केली जाते.

पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्त्व :

कमी  पक्वता कालावधी असणारी पिके, हलक्या व जमिनीत उत्तम वाढ होते. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात,सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिक आहेत. बदलत्या हवामानात तग धरणारी पिक व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर. भविष्यात मागणी वाढणारी पीक आहे.

राळा पिकाचे पौष्टिक गुणधर्म :

अ) प्रथिने व खनिज पदार्थ:  ‘राळा’ आहाराच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पौष्टिक तृणधान्य आहे. पौष्टिक घटकांबरोबरच चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय पदार्थ असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. राळा या पिकाच्या धान्यामध्ये सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण  व स्निग्ध पदार्थ आहेत. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक  आणि लोह  या खनिजाचे प्रमाण जास्त आहे.  ब) जीवनसत्वे:भरडधान्य पिकांचा आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. राळा धान्यामध्ये थायमिन  बी-१, रायबोफ्लेवीन बी-२, नियासिन (बी-३)  व फॉलिक असिड  याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

‘राळा’ पिकाच्या धान्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने अन्न पचन होण्यास मदत होते, पचनाशी निगडीत व्याधी कमी केले जाऊ शकतात. नित्य सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्यांवरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. धान्यापासून भाकरी, माल्ट, नुडल्स, पापड, इडली, बिस्कीटे यासारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात. तसेच गरोदर माता व लहान मुलांच्या खाद्यामघ्ये वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

सुधारित लागवड तंत्रज्ञान :

जमीन व हवामान : या पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. महाराष्ट्रात या पिकाची लागवड अत्यल्प क्षेत्रावर केली जाते. दक्षिणेकडील आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात लागवड क्षेत्र अधिक आहे. तसेच या पिकाची लागवड  ५०० ते ७०० मि.मी. वार्षिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी करता येऊ शकते.

पूर्वमशागत :

जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.

सुधारीत वाण :

राज्यात लागवड केले जाणारे सुधारित वाण महाराष्ट्रात राळा या पिकाचा ‘पी.डी.के.व्ही. यशश्री’ (BFTM 82) वाण लागवडीसाठी सन २०२३ मध्ये शिफारसित करण्यात आलेला आहे. हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि संशोधन केंद्र, बुलढाणा येथून विकसित करण्यात आलेला आहे.

पी.डी.के.व्ही. यशश्रीवाणाची ठळक वैशिष्ट्ये :

धान्य उत्पादन क्षमता (२३२४ कि./हे.), कडबा उत्पादन क्षमता (४४८९ कि./हे.), या वाणाचे दाणे  मध्यम टपोरे  असून  रंग आकर्षक  फिक्कट  पिवळसर आहे. हा  वाण ८१-८५ दिवसात पक्व होतो. या वाणाचे कणीस घट्ट असतात. हा  वाण करपा आणि तांबेरा रोगास सहनशील  आहे.

बियाणे व पेरणीची पध्दत पेरणीची/लावणीची वेळ :

या पिकाचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. रोपांची लागण रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यावर जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात मुख्य शेतात ओळीमध्ये करावी.

बियाणे प्रमाण :

पेरणीद्वारे पिक लागवड करायची असल्यास ओळीमध्ये पेरणी करावी. त्यासाठी ८ ते १० किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे. धान्याचा आकार लहान असल्याने त्यामध्ये २ ते ४ पट माती एकत्र करून पेरणी करावी म्हणजे पेरणी दाट होणार नाही. बियाणे १ ते १.५ से. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उगवण चांगली होते.

पेरणी अंतर :

पेरणी करताना दोन ओळीमधील अंतर ३० से.मी. (एक फुट) व दोन रोपामंधील अंतर १० से.मी. ठेवावे.

खत व्यवस्थापन :

पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेणखत अथवा कंपोष्ट खत ५ ते १० टन प्रतिहेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे. राळा पिकासाठी रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे. अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व संपूर्ण स्फुरद मात्रा पेरणी करताना द्यावी व उरलेले अर्धे नत्र पेरणी नंतर एक महिन्याने द्यावे.

पाणी व्यवस्थापन :

या पिकाची लागवड कमी पावसाच्या भागात परंतु पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी करता येते. पावसाळी हंगामात पावसाचा जास्त दिवस खंड पडल्यास  पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. पहिले पाणी फुटवे अवस्थेत, दुसरे फुलोरा येताना व तिसरे पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत देणे आवश्यक आहे. त्यामुळे दाणे चांगले भरून उत्पादनात वाढ होते.

 

पीक संरक्षण (किड व रोग व्यवस्थापन):

करपा (Blast) रोग :

‘राळा’ या पिकामध्ये कणसातील करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये पानांवर दंडगोलाकार पांढरे ठिपके येतात व नंतर त्याचा आकार वाढून संपूर्ण पानावर, खोडावर पसरतात. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम किंवा कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची २ ग्रॅम/ किलो बियाणे याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी अथवा ०.१ % प्रमाणे फवारणी करावी.

खोडकिड : पेरणीनंतर पिक ६ आठवड्याचे असताना खोडकिडीचा प्रादुर्भाव सुरु होतो. या किडीच्या अळीद्वारे मुख्य खोडाचे नुकसान होऊन मर होते. त्यामुळे  फुटव्यावर परिणाम होतो. सर्वाधिक नुकसान जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाणवते. खोडकिड नियंत्रणासाठी प्रचलित किडनाशकाचा किंवा पद्धतीचा वापर करावा.

      उपाययोजना: पावसाळा सुरु होताच ७ ते १० दिवसाच्या आत पेरणी करावी तसेच पेरणीकरीता जास्त बियाणे वापरावे.

आंतरमशागत :

आंतरमशागत करताना रोपांची प्रति एकरी योग्य संख्या ठेवण्यासाठी पेरणीनंतर २० दिवसांच्या आत विरळणी करावी. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात. त्यामुळे तणनियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.

काढणी व मळणी :

राळा पिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. साधारणपणे ८० ते १०० दिवसात पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करावी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करुन ठेवावे.

उत्पादन :

हे पीक लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या निविष्ठा व सुधारित तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे पिक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.

 

(संदर्भ:- अ.भा.स,नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषि संशोधन केंद्र, कोल्हापूर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत)

0000

 

दत्तात्रय कोकरे

वरिष्ठ सहायक संचालक (मा)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 20: आरोग्य विभागाअंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.  या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी  29 ऑगस्ट 2023 पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 22 सप्टेंबर 2023 रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण 22 सप्टेंबर रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही  आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

नीलेश तायडे/स.सं

केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त

मुंबई, दि. 20 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने  माहे ऑक्टोबर या महिन्याकरीता गव्हाच्या नियतनामध्ये केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याकरिता विहीत परिमाणात गहू व तांदूळ वितरित होणार आहे. तसेच, पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 6 व 7 (PMGKAY 6 & 7) योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वितरणानंतर शिल्लक 30069.65 टन तांदूळ व 45972.59 टन गव्हाचे समायोजन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे ऑगस्ट, 2023 च्या अन्नधान्यात करीत असल्याचे कळवले होते. अन्नधान्य वितरणाच्या आकडेवारीची काही माहिती केंद्र शासनाच्या संचालक, सार्वजनिक वितरण यांनी अद्याप अद्ययावत केला नसल्याने, केंद्र शासन व राज्य शासनाच्या अन्नधान्य वितरणाच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे. त्या अनुषंगाने ही माहिती अद्ययावत केल्यानंतर त्यानुसार शिल्लक अन्नधान्याचे समायोजन माहे ऑक्टोबर,2023 च्या नियतनात करण्यात यावे, याबाबत विभागामार्फत केंद्र शासनास विनंती करण्यात आली होती. तथापि, केंद्र शासनाने त्यांच्याकडील उपलब्ध वितरणाच्या आकडेवाडीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 6 व 7 (PMGKAY 6 & 7) योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वितरणानंतर शिल्लक अन्नधान्याचे समायोजन माहे ऑक्टोबर,2023 मध्ये करण्याकरिता सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे ऑक्टोबर, 2023 च्या नियतनात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. सद्यस्थितीतील नियतन यामध्ये तांदूळ (टन) 2,45,610.240, गहू (टन) 1,38,155.760 एकूण (टन) 3,83,766 याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे, तर  केंद्र शासनाच्या पत्रानुसार PMGKAY 6 व 7 अंतर्गत शिल्लक अन्नधान्य यामध्ये तांदूळ में.टन  30069.65, गहू टन  45972.59 तर एकूण टन  76042.24 आहे.  उपरोक्त शिल्लक विचारात घेऊन माहे ऑक्टोबर, 2023 करिता सुधारित नियतन टन मध्ये  तांदूळ  215540.59,  गहू 92183.17  एकूण  307723.76 याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. एकूण 76000 टन अन्नधान्यापैकी 30772 टन तांदूळ जिल्ह्यांकडे उपलब्ध असून माहे ऑक्टोबरमधील नियतनात समायोजित करण्यात आलेला आहे.

45,972.59 टन एवढ्या मोठ्या परिमाणात गव्हाचे समायोजन एका महिन्यात केल्यास लाभार्थ्यांना गहू वितरित करणे कठीण होऊन पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपरोक्त 45972.59 टन गव्हाचे समायोजन माहे ऑक्टोबर या एका महिन्याऐवजी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, 2023 या 3 महिन्यांच्या कालावधीत करण्याबाबत केंद्र शासनास लेखी विनंती करण्यात आली होती. या विनंतीस अनुसरुन केंद्र शासनाने पुढीलप्रमाणे सुधारित नियतन कळविले आहे.  सद्यस्थितीतील नियतन  1,38,155.760 गहू (टन), केंद्र शासनाच्या पत्रानुसार PMGKAY 6 व 7 अंतर्गत शिल्लक अन्नधान्य 45972.59 आहे, तर ऑक्टोबर, 2023 करिता सुधारित नियत 1,22,831.56 आहे. नोव्हेंबर, 2023 करिता सुधारित नियतन 1,22,831.56 तर  डिसेंबर, 2023 करिता सुधारित नियतन 1,22,831.56  याप्रमाणे  केंद्र शासनाने सुधारित नियतन कळविले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲप चॅनलवर!

मुंबई, दि. २० : ‘जनसामान्यांचे मुख्यमंत्री’, अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम ठरलेल्या ‘व्हॉट्सॲप’ने चॅनेलच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असून त्यावर काल (19 सप्टेंबर), मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र चॅनेल सुरु करण्यात आले आहे. प्रमाणित असलेल्या या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चॅनेल सुरु केल्यानंतर काही वेळेतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी चॅनेलला फॉलो केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ही अंमलबजावणी करताना शासनाच्या योजना तसेच निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास त्यांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी लोकाभिमुख योजना, विकास प्रकल्पांची अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती, जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ‘हे सर्वसामान्यांचे सरकार’ असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सदैव जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे, आता हातातील स्मार्ट फोनवर थेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची, शासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने हा संवाद अधिक प्रभावी होणार आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत जनतेला माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम, यु ट्यूब, थ्रेड्स, कू, टेलिग्राम आदी समाजमाध्यम तसेच इन्स्टन्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो. व्हॉटसॲपने गेल्या आठवड्यात चॅनेलची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने कंपनीकडे संपर्क केला आणि ‘CMO Maharashtra’ या नावाने स्वतंत्र, प्रमाणित चॅनेलचा काल ‘श्रीगणेशा’ करण्यात आला आहे. या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काही तासांतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी या चॅनेलचे अनुसरण केले आहे.

चॅनेलला असे करा फॉलो :

व्हॉटस ॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल सेक्शन असून तिथे ‘Find channels’ मध्ये ‘CMO Maharashtra’ हे टाइप केल्यावर चॅनेलच्या यादीमध्ये हे प्रमाणित चॅनेल दिसेल, त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va4FQfl72WTydH1lnP3h  या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘CMO Maharashtra’ चॅनेलला फॉलो करता येणार आहे.

मराठा समाजातील लक्षित गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक  प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत.

त्यानुसार (सारथी ) पुणे मार्फत राज्यातील लक्षित गटातील शेतकऱ्यांना सारथी संस्थेच्या खर्चाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे यांचेमार्फत हरितगृहातील व्यवस्थापन व अन्य 9 प्रकारची कृषी उच्च तंत्रज्ञानावर आधारित विनामुल्य प्रशिक्षणासाठी राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील शेतकरी, युवक, युवतींकडून उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

असे असेल प्रशिक्षण

फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणा अंतर्गत हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, रोपाची अभिवृद्धी आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापनाचे 5 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.

फलोत्पादन व्यवस्थापन प्रशिक्षणात लँडस्केप व्यवस्थापन, ऊती संवर्धन तंत्रज्ञान, ड्रायफ्लॉवर, प्लँट पार्टस् 5 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. आणि पुष्प रचनाचे 3 दिवसाचे प्रशिक्षण 40  प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.

फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अंतर्गत पीक निहाय प्रशिक्षण कार्यक्रम त्यात फुल पिके, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, प्रक्षेत्रावरील फुलांची, फिलरची लागवड तसेच पीक निहाय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भाजीपाला, शिमला मिरची, चेरी टोमॅटो, काकडीचे 5 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे काढणीपश्चात प्रशिक्षणातंर्गत फळ पिके व भाजीपाला यांचे काढणीपश्चात व्यवस्थापन व पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे 3 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.

लाभार्थी निवड अटी शर्ती

प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. यासाठी लाभार्थ्यांचे मागील 3 वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे. प्रशिक्षण हे मराठी माध्यमात देण्यात येईल. क्षमता बांधणी प्रशिक्षणे ही पूर्णकालीन निवासी असून प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सारथी, पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल. सदर क्षमता बांधणी प्रशिक्षण राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था मार्फत तळेगाव (दाभाडे) जि.पुणे येथे देण्यात येईल. प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करुन क्रमवार निवडक पात्र उमेदवारांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी येणारा प्रवास खर्च संबंधित प्रशिक्षणार्थीना स्वत करावा लागेल. उर्वरीत पात्र प्रशिक्षणार्थीचा विचार पुढील बॅचसाठी केला जाईल. याबाबतची सूचना सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही.  प्रशिक्षण हे राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, सर्व्हे क्रमांक 398/400 सीआरपीएफ कॅम्प जवळ, जुना पुणे-मुंबई महामार्ग तळेगाव-दाभाडे, पुणे येथे राहील.

तरी ईच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर अथवा थेट एनआयपीएसटी च्या https://www.nipht.org   वरील लिंक https://sarthi.nipht.org   द्वारे 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत सादर करावे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर कागदपत्रे हार्ड कॉपी 10 दिवसांच्या आत किंवा 10 नोव्हेंबर, 2023 पुर्वी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, पुणे यांचेकडे पाठविण्यात यावे.

संकलनजिल्हा माहिती कार्यालय,नाशिक

समन्वय राखून प्रत्येक लाभार्थ्याला लाभ द्यावा – मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.19 (जिमाका)- ‘एडीआयपी’अर्थात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहसाहित्य सहाय्य या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3654 लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहसाहित्य दिले जाणार आहे. दि. 7 व 8 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात व नंतर 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन करुन साहित्याचे वाटप होणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची तपासणी करुन निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना लाभ पोहोचवावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय राखावा, असे निर्देश गृहनिर्माण व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल (दि.18) दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुदर्शन तुपे, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड, तसेच गटविकास अधिकारी पी.व्ही.नाईक, खुलताबाद, उषा मोरे, पैठण, संजय गायकवाड,फुलंब्री, ए.एस. अहिरे,सोयगाव, सी. एम. ढोकणे,कन्नड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात दिव्यांगांना सहाय्यभूत ठरणारे साहित्य व कृत्रिम अवयव देण्यासाठी 3654 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात शहरात 1060 लाभार्थी असून ग्रामिण भागात 2594 लाभार्थी आहेत.

पैठण येथे 272, खुलताबाद येथे 181, कन्नड येथे 535, सोयगाव येथे 234, वैजापूर येथे 365,  सिल्लोड येथे 415, गंगापूर येथे 206, फुलंब्री येथे 129 लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे सहसाहित्य व कृत्रिम अवयव देण्यासाठी  तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर शहरात दि.7 व 8 ऑक्टोबर तर फुलंब्री येथे दि.28, कन्नड येथे दि.29, सिल्लोड दि.30, सोयगाव दि.31, गंगापूर येथे दि.1 नोव्हेंबर, वैजापूर येथे दि.2 नोव्हेंबर, खुलताबाद येथे दि.3 नोव्हेंबर व पैठण येथे दि.4 नोव्हेंबर या दिवशी शिबिरे आयोजित करावीत असे नियोजन करण्यात आले आहे.

या नियोजनानुसार वाटप करण्यासाठी आणण्यात येणारे साहित्य हे सुरक्षित जागी ठेवणे, त्याची जोडणी करणे व प्रत्यक्ष तपासणी करुन दिव्यांगांना देणे,यासाठी नियोजन करावे. साहित्यांबाबत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवावी. ज्या लाभार्थ्यांना शिबिरस्थळी येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी  ग्रामपंचायतमार्फत घरपोच साहित्य देण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक लाभार्थ्याला साहित्य मिळेल यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून काम करावे,असे निर्देश श्री.सावे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

नवी दिल्ली, 19 : ढोल ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया ’च्या घोषाने कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदन आज निनादले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली. महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.  तसेच दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात दिसून आले.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.

महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात सदनाचे  निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, आज सकाळी येथील परिसरात जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३० मराठी गणेशोत्सव मंडळातही गणरायाची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव काळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांच्यावतीने या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळ्या लावणीसह विविध लोकनृत्य, नाटक, सांगितिक कार्यक्रम, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन येथील गणेशमंडळांनी यावर्षी केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठीसह अमराठी गणेशभक्तही दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

00000

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 174 /

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...