अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी – जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि.२२ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सर्तक रहावे. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कृषी विभाग आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजीत बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. यात पालकमंत्र्यांनी शेतकर्यांच्या पाठीशी शासन सर्वतोपरी खंबीरपणे उभे असल्याचे नमूद केले. तर सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आपत्कालीन उपाययोजनांसाठी प्रशासनाने सज्ज राहण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.
जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर तसेच इतर तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवैध, बोगस खतांमुळे ही शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच अलीकडे होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांमध्ये मोठी हानी झाली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा पालकमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री व मदत, पुनर्वसन मंत्र्यांनी व्यापक आढावा घेतला. आणि प्रशासनाला सूचना केल्या.
या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आदींसह विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, कपाशीवरील लाल्या रोगाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकर्यांसाठी जनजागृती करावी. टोल फ्री क्रमांक जाहीर करावा. नॅनो युरियाची फवारणी केली पाहिजे यावर शेतकर्यांमध्ये जागृती करावी. अवैध खत विक्रेते व कंपन्यांवर कारवाई करावी्. सततचा पाच दिवस पडणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून ग्राह्य धरावा.
या बैठकीत विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने आधी पाऊस पडला नसला तरी अलीकडच्या काळात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ९१ टक्के पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती देण्यात आली. तर कपाशीची लागवड ही उद्दीष्टापेक्षा जास्त म्हणजे १०८ टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले. जिल्ह्यात दोन महिन्यातील पावसाचा आढावा देखील याप्रसंगी घेण्यात आला. यात जुलैमध्ये आजवर होत असलेल्या सरासरी पावसापेक्षा १३६ टक्के पाऊस जास्त झाला असून जिल्ह्यातील ८६ पैकी ८२ मंडळांमध्ये एकूण सरासरीच्या पन्नास टक्कयांपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जूनपासून आजवर पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांना प्रत्येकी चार लाख रूपये याप्रमाणे शासकीय मदत प्रदान करण्यात आली आहे. तर ३६ गुरांचा मृत्यू झाला असून यासाठी ७ लक्ष २२ हजार रूपये दिलेले आहेत. यावल आणि रावेर तालुक्यातील ३३ गावांमध्ये सुमारे साडेतीनशे घरांची अंशत: हानी झाली असून यासाठी अंदाजे चौदा लक्ष रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तर अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता आपत्कालीन पथक तयार करण्यात आले असून त्यांना बचावाचे साहित्य प्रदान करण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सरदार कंपनीच्या खते आणि बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची हानी झाली असून या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली आहे. बोगस बियाणे आणि खतांची विक्री खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत देण्यात यावी. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा प्रदान करण्यात यावा असे निर्देश देखील त्यांनी दिलेत. तर ना. गिरीश महाजन यांनी ग्रामविकासमधील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी मुख्यालयात थांबण्याचे निर्देश दिलेत.
एक रूपयात पीक विमा योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात गावनिहाय मोहीम राबविण्यात यावी. दररोज किमान ४० हजार शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांकडून अवास्तव पैसे आकारणार्या सेतू सेवा केंद्रांवर कारवाई करा. अशा सक्त सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात जरी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी धरणातील पाणी पातळी कमी आहे. तेव्हा पाण्याचे काटकसरीने वापर करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्यात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे. याला प्रतिबंध घालण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाने करावे. जळगाव शहरातील अंतर्गत रस्ते व गटारींचे कामे करण्यात यावेत. अशा सूचना ही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिल्या.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जसे शेतकर्यांचे नुकसान होत आहे तसाच प्रकारे बोगस खते व बियाणे यामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासन लवकरच कायदा करणार आहे्. पोलीस विभागाने ही अशा उत्पादकांवर कडक कारवाई करावी्. खतांची गुणवत्ता विभागाने तपासणी करावी. केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरच केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. गळके छत असलेल्या शाळांची दुरूस्ती करण्यात यावी. महावितरण विभागाने यंत्रणा सक्षम ठेवत अखंडीत वीज पूरवठा करण्याचे काम करावे्. ग्रामविकास यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रस्ताव तयार करावेत. या प्रस्तावांना मान्यता व निधी पुरविण्याचे काम केले जाईल् .
यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार मंगेश चव्हाण व आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
000
विद्यापीठात कवयित्री बहिणाबाईंचा पुतळा उभारण्यात येईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील
तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
जळगाव, दि.२२ जुलै (जिमाका) – कवयित्री बहिणाबाई चौधरी पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन मधून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच पुतळाही उभारण्यात येणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. जी-२० संमेलनाच्या रूपाने तरूणांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. देशाला शिखरावर पोहचविण्याचे काम तरूणच करू शकतात. अशी आशा ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित ‘जी-२० युवा संवाद – भारत @२०४७ संमेलना’चे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक डी. कार्तिगेन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखाडे , नितीन झाल्टे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तरूणांनी प्रगती करण्यासाठी शिस्त अंगिकारण्याची गरज आहे. आजचा तरूण सोशल मिडियात अडकला आहे. भारतातील तरूणाची आता जगाला कौशल्य रूपी मनुष्यबळाच्या रूपाने गरज आहे.
आज तरूणांमध्ये प्रतिभा आहे. तरूणांना दिलेले उद्दिष्ट तरूण निश्चित पूर्ण करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षणाकरिता आज भरपूर निधी दिला जात आहे. तरूण देशाचे भवितव्य आहे. तरूणांनी संधीचे सोने करावे. असे ही पाटील यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री श्री.महाजन म्हणाले की, भारत तरूणांचा देश आहे. जगाला कौशल्ययुक्त तरुणांची गरज आहे. ही गरज भारताचे तरूण पूर्ण करू शकतात. यासाठी तरूणांनी कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. गाव सोडण्याचे धाडस केले पाहिजे. तरूणांनी कामात प्रामाणिकपणाना अंगिकारला पाहिजे. मनामध्ये जिद्द ठेवून काम केले पाहिजे. संकटाला न घाबरता धाडस करून तरूणांनी काम केले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळात तरूणांच्या शैक्षणिक व सर्वांगिण हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तरूण देशाचे भविष्य आहे. तरूणांनी स्वत:ला ओळखावे. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे. अशी अपेक्षाही श्री.महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.
कुलगुरू श्री माहेश्वरी यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पंचप्रण संकल्पनेवर तरूणांनी काम करावे. युवकांमधील उर्जेचा वापर करण्याचे आपल्यापुढे आवाहन आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सक्षमपणे करत आहे.
तासिका नियमित करा, कॉपी न करता परीक्षा द्या. जीवनात शिस्तपणा असला पाहिजे. चांगल्या मित्रांचा गोतावळा तयार करा, प्रमाणिकपणा जपा, ज्ञान, कौशल्य व प्रतिभेचा वापर करून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम तरूणांनी करावे. अशा शब्दात कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राजेश पांडे यांनी बीज भाषण केले. श्री.पांडे म्हणाले की, २०४७ पर्यंत जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश भारत असणार आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या पंचप्रण संकल्पनेवर तरूणांनी काम करायचे आहे. भारताची युवाशक्ती आपल्या कौशल्यावर जगाचं नेतृत्व करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात युवकांचे कौशल्य व कल्पनाशक्तीला वाव देणारा अभ्यासक्रम असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्याहून महाराष्ट्रातील ५ लाख तरूणांशी संवाद साधणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत या संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील अडीच लाख तरूणांपर्यंत विकसित भारताचा संकल्प पोहोचला पाहिजे. अशी अपेक्षा श्री.पांडे यांनी यावेळी व्यक्त केली.
भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनपूर्वी विद्यापीठ आवारात तिरंगा रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना दिलेल्या अमृत काळातील पंचप्रण संकल्पनेवर हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांनीही युवकांशी संवाद साधला.
000
पावसाची स्थिती पाहून नागरिकांनी परतीच्या वारीत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड
बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी
मुंबई, दि.२२ : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध करून देईल अशी घोषणा केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती जुबिन इराणी यांनी केली.
षण्मुखानंद ऑडिटोरियम, सायन पूर्व मुंबई येथे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग भारत सरकार व महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “वत्सल भारत” या विभागीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी बोलत होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र सह गुजरात, आंध्रप्रदेश, गोवा, दादरा नगर हवेली, दमन, दिव राज्यातील सदस्य सहभागी झाले होते.
केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या, ‘चाइल्ड ट्रॅकिंग’ या सिस्टमच्या माध्यमांतून जी मुले हरवली होती अशी देशातील चार लाख मुले शोधली आहेत आणि त्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं आहे. 2 हजार 500 मुलं ही दत्तक घेतली गेली आहेत. पोक्सो अंतर्गत महिलांना भारत सरकार पूर्णपणे मदत करणार असून त्यांचा कायदेशीरदृष्ट्या येणारा आर्थिक भार देखील भारत सरकार उचलणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अवैध मानवी तस्करी रोखण्यासाठी युनिट बनवलेले आहे, यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर आम्हाला कळवाव्यात. प्रत्येक गावागावाच्या बाल सुरक्षा समित्या कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर एखाद्या बालकाला जर मदतीची आवश्यकता असले तर त्याची माहिती भारत सरकारला कळवावी, आम्ही त्याच्यासाठी नक्की मदत करू.
प्रत्येक जण आप आपल्या परीने स्वताच्या राज्यातील वेगवेगळ्या शासकीय व निम शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांची बालकांची काळजी समर्पित भाव ठेऊन सेवा देत आहात याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन पूर्णपणे प्रयत्न करेल असेही मंत्री श्रीमती स्मृती इराणी म्हणाल्या.
यावेळी केंद्रीय महिला बालविकास विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार चड्ढा यांनी बाल हक्क अधिनियम कशाप्रकारे लागू केला जात आहे, वत्सल भारत योजनेबाबत माहिती दिली. यावेळी सहसचिव इंद्रा मालो यांनी वत्सल भारत योजनेसाठी सर्व राज्यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच मिशन वस्तूंचे ते पोर्टल देखील लॉन्च केले असल्याची माहिती यावेळी दिली.
केंद्रीय बाल संरक्षण बालसुरक्षा आणि बाल कल्याण विभागाच्या सदस्य सचिव रूपाली बॅनर्जी, महाराष्ट्र राज्याचे महिला बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे, बापूराव भवाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, शोभा शेलार आणि अब्दुल चौधरी यासह राज्यातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी उपस्थित होते.
000
इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
अलिबाग,दि.22(जिमाका) :- इरशाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी. या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
इरशाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नढळ गावात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी जाऊन भेट देत उपलबद्ध सुविधांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने व संवेदनशीलतेने तात्काळ भेट दिली होती. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन विधान सभेमध्ये केले होते व प्रत्येक मृत व जखमी कुटुंबाला शासनाची सर्वोतोपरी मदत जाहिर केली होती. विधानभवनात माझी भेट घेऊन सविस्तर माहिती ही दिली होती. या भेटी वेळी त्यांनी आपादग्रस्त लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याबाबत या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचेही सांगितले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
या दरम्यान त्यांनी दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्रित येऊन दहा दहा लोकांचा समूह करून त्यातील एक जणाने सर्व आपादग्रस्त लोकांची जबाबदारी घ्यावी आणि काय वस्तू लागणार आहे त्याची यादी करावी व ती आम्हाला कळवावी. जेणेकरून आपण एक कुटुंब असल्यासारखं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. कोणत्याही व्यक्तीसोबत गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार मनिषा कायंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, तहसिलदार आयुब तांबोळी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, अप्पर तहसिलदार पूनम कदम, नगरसेविका शीतल म्हात्रे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलमताई जोशी, मंगेश चिवटे उपस्थित होते.
000