गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1133

कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

         सांगली दि. 30 (जि.मा.का.) : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज सांगली शिक्षण संस्थेच्या सांगली येथील सिटी हायस्कूला भेट देऊन संस्थाचालक यांच्याशी संवाद साधला व कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

            यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, संचालक नितीन खाडीलकर, हरी भिडे, विजय देवधर, केदार खाडिलकर, विपीन कुलकर्णी आदि उपस्थित होते.

            सिटी हायस्कूलमध्ये संस्थाचालक यांच्याशी संवाद साधताना  शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपल्याला व्होकेशनल ट्रेनिंगवर भर द्यावा लागेल. शिक्षण संस्थांनी काही कोर्सेस डिझाईन केले पाहिजेत की, जेणकरून भावी पिढी बेरोजगार राहणार नाही. कौशल्यावर आधारित शिक्षण पध्दती निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था फार मोठे योगदान देवू शकतात. यासाठी शिक्षण संस्थांना एका वेगळ्या दिशेने वाटचाल करावी लागेल.आणि हीच वाटचाल शिक्षण संस्थानाही सक्षम बनवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी; पूरग्रस्तांशी साधला संवाद

नागपूर,  दि. 29 – शहरातील पूर परिस्थितीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज पूरग्रस्त भागाला भेट देत पूरपीडितांशी संवाद  साधला. पंचनाम्याच्या कामाला गती देत पूरपीडितांना शक्य ती मदत शासनाकडून दिली जाईल, असे त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना आश्वस्त केले.

मंत्री श्री. पाटील यांनी आज सकाळी अंबाझरी तलाव, अंबाझरी घाट, काचीपुरा,  सरस्वती विद्यालय, कॅार्पोरेशन कॅालनी तसेच सिताबर्डीतील  पुलाला भेट देत पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी काचीपुरा आणि कॅार्पोरेशन कॅालनीतील पूरपीडितांशी संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले.

 शासन स्तरावरून पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली असून 2 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आतापर्यंत सुमारे 12 हजार 500 पंचनामे पूर्ण झाले आहेत. शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे यावेळी त्यांनी पूरपीडितांना आश्वस्त केले.

पूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत, भविष्यात करण्यात येणाऱ्या उपायोजना, शासन स्तरावरून सुरू असलेली पंचनाम्याची कार्यवाही, नाग नदीचे खोलीकरण याविषयीची माहिती त्यांनी यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी,  जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्याकडून जाणून घेतली. तसेच पंचनाम्याच्या कार्यवाहीला तसेच मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. यावेळी सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल केंद्रास भेट

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर केंद्रास भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी आपत्तीच्या प्रसंगी वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांच्या प्रदर्शनीची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. संकटकाळात वापरण्यात येणाऱ्या आर. आर. स्वा, इन्स्पेक्शन होल मेकर, व्ही. एल. सी कॅमेरा, सर्कुलर स्वा, ऑक्सिजन सिलेंडर, एअर लिफ्टींग बॅग, फ्लोटिंग पंप, स्कुबा सेट, आस्का लाईट आदी बचाव उपकरणांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक समादेशक कृष्णा सोनटक्के आदी उपस्थित होते.

*****

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला विशेष पॅकेज देणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

नागपूर दि.29 : महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरला भविष्यात कधीही पूर परिस्थितीचा फटका बसू नये. यासाठी कायमस्वरूपी संरक्षण व पूर नियंत्रणासाठी विशेष पॅकेज देण्यात येईल, असे सूतोवाच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून नागपूरच्या पूर परिस्थितीवर एकत्रित आराखडा तयार करण्यासाठी ते आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यामार्फत निधी उभारून नागपूरला अत्यंत अपवादात्मक स्थितीत सुद्धा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, अशा आधुनिक उपाययोजना करण्याच्या सूचना श्री.फडणवीस त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सर्व विभागाने समन्वय ठेवून एकत्रित सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करावा अशी सूचना त्यांनी आज बैठकीत केली.

२ ऑक्टोबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पंचनामे पूर्ण करावेत. ३ ऑक्टोबरपासून सानुग्रह निधी वाटपास सुरुवात करावी. पंचनाम्या संदर्भातील जिल्ह्याचा अहवाल आल्यानंतर कॅबिनेट बैठकीत ठेवला जाईल. तातडीच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

 

तत्पूर्वी मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी आज सकाळी नागपूर शहरातील विविध भागात भेट देत पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली.  त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अँड.आशिष जायस्वाल, विकास ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या समादेशक डॉ.प्रियंका नारनवरे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव धारूरकर, संदीप जोशी,यांच्यासह जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख उपस्थित होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. आप्पासाहेब धुळज दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी 23 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बैठकीमध्ये २ ऑक्टोबर पर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे स्पष्ट केले. गेल्या पाच दिवसात साडेबारा हजारावर पंचनामे करण्यात आले आहेत. आणखी काही ठिकाणचे पंचनामे बाकी असून ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी काही नागरिकांना पैशाची मदत नको असेल तरीही घरातील दस्तावेज व अन्य  झालेल्या नुकसानाची नोंद पंचनाम्‍यात करण्याचे आवाहन केले. भविष्यात पंचनामा हा महत्त्वपूर्ण दस्ताऐवज असून शहरी भागातील नागरिकांनी शासनाच्या तलाठ्यांकडूनच हा पंचनामा करून घ्यावा. अन्य कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये, अशी स्पष्ट सूचना केली.

जिल्ह्यातील सर्व मंडळाची आकडेवारी एकत्रित करण्यात यावी सोबतच महानगरपालिका क्षेत्राबाहेरील क्षतीग्रस्तांना सकारात्मकपणे मदत केली जाईल.सरसकट मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी लोकप्रतिनिधींनी नागपूर शहरातील पूरग्रस्त भागातील विविध समस्या लक्षात आणून दिल्या. त्यावर बोलताना ते म्हणाले, नाग नदीतील प्रवाहात येणारे सर्व अडथळे दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नाग नदीवरील तुटलेल्या सुरक्षा भिंतीला जोडण्यासाठी मदत करण्यात येईल. मात्र आता ही कायमस्वरूपी उभारणी असेल. काही पुलाची पुनर्बांधणी नव्या तंत्रज्ञानाने केली जाईल. अंबाझरी तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल. दीडशे वर्षे जुन्या या तलावाला पुढचे दीडशे वर्ष कोणताही धोका पोहोचणार नाही अशा पद्धतीचा विकास करण्यात येईल. शहरातील दोन्ही नाल्यांच्या भागातील अतिक्रमण हटविण्यात येईल. त्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. थोडक्यात यासाठी एक विशेष पॅकेज तयार करून येत्या अधिवेशनामध्ये मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

मदत व पुनर्वसन विभागामार्फत काही प्रलंबित मागण्या व निधीची आकडेवारी यावेळी विविध यंत्रणांनी सादर केली. मंत्रालय स्तरावर बैठका लावून यापूर्वीच्या प्रलंबित कामाचा निपटारा  केला जाईल असेही त्यांनी सांगितले. बैठकीचे आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे यांनी केले. बैठकीनंतर या आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेले बाळूची पंढरी उमरेडकर यांच्या कन्या राधिका बाळूजी उमरेडकर यांना शासनाकडून चार लक्ष रुपयाचा धनादेश मदतनिधी म्हणून देण्यात आला.

*****

 

कांदा उत्पादन, खरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – केंद्रीय वाणिज्य मंत्री, पियुष गोयल

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली,29: कांदा उत्पादनखरेदी तसेच विक्री दराविषयी 140 कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिल्याची माहिती  राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

नाशिक जिल्ह्यातील व्यापारांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढण्यासाठीकृषी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारराज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तारनाफेड संस्थेचे अपर व्यवस्थापकीय संचालक  एस.के.सिंगएनसीसीएफ चे व्यवस्थापकीय संचालक ॲनीस जोसेफ चंद्राकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजाग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे आर्थिक सल्लागार डॉ कामखेथेंग गुईटे उपस्थित होते.  

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारांच्या समस्या सुरु आहेत. या समस्येच्या निदानासाठी केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांच्यासमवेत मुंबई येथे बैठकाही पार पडल्या होत्या.  यासंदर्भात कृषी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पणन मंत्री श्री सत्तार यांनी व्यापारांच्या समस्या संदर्भात तातडीने लक्ष घालून हा विषय सोडविण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल केंद्रीय मंत्री श्री गोयल यांचे आभार मानले. कांदा उत्पादक शेतक-यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नयेयासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी  प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र शासनाने हजार 410 रूपये प्रतिक्विंटल दराने नाफेड  आणि एनसीसीएफ मार्फत लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन्ही संस्थांकडून अत्यंत कमी प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून,नाफेड तसेच एनसीसीएफ या संस्थांनी प्रत्येकी एक-एक लाख टन कांदा आणखी खरेदी करण्याबाबत केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती मंत्री श्री सत्तार यांनी यावेळी दिली. आता 400 कोटी रूपयांची आणखी कांदा खरेदी करण्यात येईल. कुठल्याही परिस्थिती मध्ये गरीब शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नाहीअसे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सरकारच्या मागणीप्रमाणे ज्या ज्या भागात कांदा शिल्लक असेल तिथे माल खरेदीला परवानगी दिली जाणार. तसेच नवीन कांदा खरेदी केंद्र उभारले जातील. याबाबत मार्केटिंग फेडरेशनने देखील सहमती दर्शवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कांदा खरेदी व खरेदी केंद्रांबाबत शासनाकडून दररोज वर्तमानपत्रात जाहिरातीव्दारे माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्र शासनाने कांद्यासाठी ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे आणि ते कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांची मागणी होती. याबाबत केंद्र शासनाकडून उच्चस्तरीय समितीने दिलेल्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.सत्तार यांनी दिली. तसेच कांदा उत्पादन शेतकरी व ग्राहकांची गैरसोय  टाळण्यासाठी व्यापारांनी लिलाव बंदी चा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी केद्र सुरु करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या कीकेंद्र सरकार देशातील जनतेचा विचार करुन  निर्णय घेत असते. ज्यावेळी कांद्याचे दर वाढतात किंवा कमी होतात त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी नाफेड संस्थेची मदत घेण्यात येते. १४० कोटी जनतेचा विचार करुन निर्णय घेतले जातात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी ग्राहक हित आणि शेतकरी हित ही पाहिले जाते.

0000

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ या माहिती नाट्यपटाचे १ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण

मुंबई दि. 29 : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्मित मुक्तिसंग्राम (कथा मराठवाडयाच्या संघर्षाची) या माहिती नाट्यपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या नाट्यमाहितीपटाचे प्रसारण सह्याद्री वाहिनीवर दिनांक १ ऑक्टोबर, २०२३ रोजी, दुपारी १.३० वाजता करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रेरणेने या नाट्य माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
पहिल्यांदाच मराठवाडा मुक्तिसंग्रामाची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असुन या नाट्य माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी केले आहे. तसेच या नाट्य माहितीपटात सुप्रसिध्द अभिनेते अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस, विक्रम गायकवाड, अभिनेत्री स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकारांनी भुमिका साकारली आहे. त्याचबरोबर केदार दिवेकर यांनी संगीत दिग्दर्शन, निखिल लांजेकर यांनी ध्वनी संयोजन आणि प्रतीक रेडीज यांनी कला दिग्दर्शन केले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामावरती उपलब्ध पुस्तके आणि संदर्भग्रंथ यांचा सखोल अभ्यास करून ७५ मिनिटांचा हा नाट्य माहितीपट अवघ्या १२ दिवसात तयार करण्यात आला आहे.
तरी या नाट्य माहितीपटाचा आस्वाद राज्यातील प्रक्षेकांनी घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी केले आहे.
००००

“एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

            मुंबई, दि. २९ : – स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

            “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात “एक तारीख एक तास” या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात  सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.

            याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, स्वच्छता  आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” हे अभियान यशस्वी करायचं आहे. “एक तारीख एक तास” या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे

            “स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. या अभियानानंतर आपल्याला १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले आहे.

00000

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका

मुंबई, दि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

 सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके-विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत इतर मागासवर्ग, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार आदी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले.

 कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची शासनाची भूमिका नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  सांगितले की, मराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन इतर मागास, भटक्या विमुक्त समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

राज्यातील सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या महामंडळाना निधी देताना कुठलाही भेदभाव होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देतानाच भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांबाबत स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इतर मागास समाजातील विद्यार्थ्य़ांसाठी ७२ वसतीगृहे तातडीने सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देताना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र असल्यास आठ लाखाच्या मर्यादेचं प्रमाणपत्राची अट मागे घेण्यासंदर्भात तपासणी करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

इतर मागास समाजासाठी ४००० कोटी रुपयांच्या योजना- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 राज्य शासनाच्या माध्यमातून इतर मागास समाजासाठी सुमारे ४००० कोटी रुपयांच्या योजनांची अमंलबजावणी करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासनाने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय प्रवेशामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णयही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकार इतर मागास समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

भटक्या विमुक्त समाजाला भरघोस निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील भटक्या विमुक्त समाजाला आणि त्यातील दुर्लक्षीत घटकांना भरघोस निधी देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या महामंडळांना निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांच्यासह श्री. शेंडगे, श्री. तडस, डॉ. तायवाडे, श्री. बावकर, श्री. पडळकर, लक्ष्मणराव गायकवाड, पल्लवी रेणके, मंगेश ससाणे, विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीस राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर, पुरुषोत्तम प. शहाणे (पाटील), शरद वानखेडे, सुभाष घाटे, नरेश बरडे, शकील पटेल, दिनेश चोखारे, प्रकाश भगरथ, भालचंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

००००

 

 

राज्यातील आदिवासी भागात शाळांचे शंभर टक्के डिजिटलायझेशन करणार

नंदुरबार; दिनांक २९ सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त) येत्या दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रभाव निर्माण करून या भागातील माणूस उभा करण्याची क्षमता फक्त शिक्षकात आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित वर्ष २०२२-२३ च्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण संमारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, रूपसिंग तडवी, सुरेश नाईक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी (प्राथमिक), प्रवीण अहिरे (माध्यमिक) ‘डायट’ चे प्राचार्य डॉ. जयराम भटकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, डॉ. युनुस पठाण (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (योजना) भावेश सोनवणे व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, ग्रामीण, आदिवासी भागातील शिक्षकांनी काळानुसार अपडेट राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्याच्या शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करायला हवे. त्यासाठी लागणाऱ्या इंटरनेट, ब्रॉडबॅंड, संगणक, दूरचित्रवाणी संच यासारख्या सर्व माहिती-तंत्रज्ञानाच्या सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांची परिक्षा घेऊन त्यांना ज्या ठिकाणी नव्याने प्रशिक्षण अथवा उजळणी करण्याची गरज असेल त्यासाठी सत्रांचे आयोजन केले जाईल. आज शहरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुशिक्षित पालकांच्या सुबत्ततेमुळे वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीन प्रहरात शैक्षणिक उजळणी करण्याची संधी उपलब्ध असते. त्यामुळे अशी मुले गुणवत्ता यादीत आले तरी त्याचे अप्रूप वाटत नाही. याउलट ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती असते, कैक किलोमीटर अंतरावर शाळा असते, रस्ते खडतर असतात, काही शाळा एक शिक्षकी असतात, अशा परिस्थितीतही गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवर्जून कौतुक होते; या  कौतुकाचे खरे श्रेय आदिवासी भागातील खडतर परिश्रम करणाऱ्या शिक्षकांचे असते. आदिवासी दुर्गम भागातील शिक्षक हा जिथे अज्ञानाचा अंध:कार आहे, तिथे ज्ञानाचा दिवा तेवत ठेवतो. जिथे अभावाने ग्रासलेले पोकळी असते, तिथे जनजागृतीची प्रभाव निर्माण करून माती आणि माणसांना घडवण्याचं, त्यांना दिशा देण्याचं काम करत असतो. अशा चिकाटीने काम करणाऱ्या शिक्षकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पारंपरिक शिक्षणासोबत दृकश्राव्य माध्यमातून शिक्षणाची सुविधाही राज्यातील आदिवासी दुर्गम भागात निर्माण करून १०० टक्के शाळांचे डिजिटलायझेशन करणार असल्याचे, यावेळी त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आदिवासी आश्रम शाळांना स्वमालकिच्या इमारती असतील आणि तीन वर्षात या इमारतींना सोबत तेथील शिक्षकांना शासकीय निवासस्थाने सुद्धा बांधण्याचा शासनाचा विचार आहे. भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद, आश्रम शाळांना जोडणाऱ्या रस्त्यांची, पुल-फर्च्यांच्या निर्मितीसोबतच २४ तास विद्युत पुरवठा करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे सांगून मंत्री डॉ. गावित म्हणाले, सध्या आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून एकापेक्षा अधिक शाळांमध्ये प्रवेश दाखवून विद्यर्थ्यांचे आणि पाठोपाठ शासनाच्या होणाऱ्या नुकसानीवर निर्बंध  यामध्यमातून बसणार आहे.  चांगल्या, मेहनती शिक्षकांमुळे राज्यातील धडगाव, अक्कलकुवा सारख्या आदिवासी-दुर्गम भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावत चालला असून तेथील विद्यार्थी विविध शैक्षणिक क्षेत्रातून आपले नाव करियर उंचावताना दिसत आहेत, सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना शुभेच्छा देत असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

 

जिल्हा परिषदेच्या १९ शाळांच्या इमारतींसाठी ८ कोटी ५० लाख मंजूर – डॉ. सुप्रिया गावित

जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, अथवा जुन्या अथवा ज्यांना स्वमालकीच्या इमारती नाहीत अशा शाळांच्या इमारतींच्या निर्माणाची प्रक्रिया आदिवासी विकास विभागाच्या माध्यामातून सुरू करण्यात आली असून, अशा प्रकारच्या १९ शाळांच्या इमारती उभारण्यासाठी सुमारे ८ कोटी ५० लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेला जोडणाऱ्या रस्त्यांच्या निर्मितीचेही काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी दिली  आहे. यावेळी त्यांनी ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे व ज्यांना पुरस्कार मिळाला नाही अशा शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आदिवासी भागातील काम शिक्षकांसाठी आव्हानात्मक – डॉ. हिना गावित

अन्य कुठल्याही भागात काम करण्यापेक्षा आदिवासी दुर्गम भागात काम करणे शिक्षकांसाठी आव्हानात्मक असते. या भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संवादाची पहिली भाषा ही बोली भाषा असते. अशा बोली भाषेतून बाल्यावस्थेतील मुले जेव्हा शिक्षण घेण्यासाठी शाळेत येतात तेव्हा अशा मुलांना शिकविण्यासाठी शिक्षकांना सर्वप्रथम या भागातील बोली भाषा शिकावी लागते. त्यांनतर बोली भाषा आणि मातृभाषा या दोन्ही भाषांमधून विद्यार्थ्यांची आकलनक्षमता वाढवण्याचे आव्हानात्मक आणि अत्यंत चिकाटीने आदिवासी-दुर्गम भागातील  शिक्षक करत असतात, असे प्रतिपादन यावेळी बोलताना खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.

हे आहेत जिल्हा शिक्षक पुरस्कार्थी

रोहिणी गोकुळराव पाटील( जि.प.शाळा, लोय ता. जि. नंदुरबार),बालकिसन विठ्ठल ठोंबरे (जि.प.शाळा, आमलाण ता. नवापूर जि. नंदुरबार), डॉ. जितेंद्रगीर विश्वासगीर गोसावी(जि.प.शाळा, टवळाई ता. शहादा जि. नंदुरबार),समाधान गोविंद घाडगे (जि.प.शाळा, अमोनी ता. तळोदा जि. नंदुरबार), प्रविणकुमार गंगाराम देवरे(जि.प.शाळा, राजमोही लहान ता. अक्कलकुवा), विजयसिंग मिठ्या पराडके(जि.प.शाळा, गौऱ्या ता. धडगांव)

विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार

ओमशेखर वैजीनाथ काळा (जि.प.शाळा, पाचोराबारी ता. जि. नंदुरबार),नारायण तुकाराम नांद्रे (जि.प.शाळा, शनिमांडळ (मुली) ता. जि. नंदुरबार), विभावरी अर्जुन पाटील(जि.प. केंद्रशाळा, धडगांव ता. धडगांव),

 

राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक

पंकज गोरख भदाणे (जि.प.शाळा, बोरीपाडा, ता. अक्कलकुवा),

रोहिणी गोकुळराव पाटील(जि.प.शाळा, लोय ता. नंदुरबार), अनिल शिवाजी माळी(जि.प.शाळा, वरुळ ता.नंदुरबार), रविंद्र गुरव(नेमसुशिल विद्यालय,तळोदा)

०००००

मेरी माटी मेरा देश अभियानातून साकारणारे ‘अमृत वाटिका’  हे राष्ट्रीय एकात्मतेच प्रतीक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक: 29 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातून मातीचे कलश जिल्हा प्रशानाच्यावतीने दिल्ली येथे पाठविण्यात येणार असून तेथे साकारण्यात येणारे अमृत वाटिका हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणार आहे, असे प्रतिपादन दळवट येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले आहे.

 सुशोभित केलेल्या मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन करण्यात आले. यामध्ये ज्या आदिवासी बांधवांना शेतजमीन आहे त्यांनी संकल्पनेनुसार कलशामध्ये माती टाकली तर ज्या नागरिकांना स्वतःची शेत जमीन नाही त्यांनी चिमूटभर तांदूळ या कलशामध्ये टाकून आपला सहभाग नोंदवला. दिल्ली येथे निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मे आणि शहीद जवान यांच्या स्मारकासाठी हा मातीचा कलश जिल्हा प्रशासनाकडून जाणार आहे. केंद्र सरकारने ‘ एक भारत, श्रेष्ठ भारत ‘ या भावनेने दिल्ली आणि ७ हजार ५०० गावांमध्ये देशी आणि स्थानिक वनस्पतींचे उद्यान उभारण्यासाठी ‘अमृत वाटिका’ योजना सुरू केली आहे. ‘मेरी माटी, मेरा देश ‘ या अभियानांतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतींमध्ये ‘शिलाफलकम’ स्मृती फलकही लावण्यात आले आहेत.

  मातीचा कलश घेऊन डॉ.भारती पवार यांच्यासह आदिवासी बांधवांनी पारंपारिक आदिवासी वाद्यांच्या तालात आपली परंपरा सांभाळत लोककलेच्या माध्यमातून नृत्य करत परिसरातून मिरवणूक काढली. यावेळी आदिवासी बांधवांबरोबर राज्यमंत्री डॉ. पवार यांनी देखील नृत्यामध्ये सहभागी होऊन ढोल वादनाचाही आनंद घेऊन हा कार्यक्रम उत्साहात संपन्न केला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या मोहिमेत सहभागी झाले होते.

000000

 

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – सचिव सुमंत भांगे

मुंबई, दि.२९ : राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर  हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिल्या आहेत.

राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्यावतीने निर्गमित करण्यात आले आहे. या दिवशी सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सचिव श्री. भांगे यांनी सांगितले आहे.

******

शैलजा पाटील, वि.सं.अ.

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...