मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 1132

इरशाळवाडीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ११ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द

मुंबई, दि. 24 : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले  होते. त्यानुसार आज विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 लाख रूपयांचा धनादेश  मंत्री श्री. पाटील यांनी सुपूर्द केला.

मंत्री श्री. पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख आणि लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. संवेदना सोशल फाऊंडेशन-कोल्हापूर, सावली सेवा फाऊंडेशन-पुणे, पुनर्निमाण सोशल फाऊंडेशन-पुणे, युवा स्वराज्य प्रतिष्ठान-पुणे या संस्थांकडून प्रत्येकी रुपये दोन लाख आणि आई प्रतिष्ठान-सोलापूर व चैतन्य प्रतिष्ठान-मुंबई या संस्थांकडून प्रत्येकी एक लाख असे एकूण रुपये 11 लाखांचा धनादेश  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

0000

काशीबाई थोरात /वससं/

विधानसभा प्रश्नोत्तरे

राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. २४ : “राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, उभारण्यात येणार आहेत”, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे  यांनी विधानसभेत सांगितले.

धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेत झालेला आर्थिक गैरव्यवहार संदर्भात विधानसभा सदस्य कैलास घाडगे- पाटील, यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.खाडे बोलत होते.

मंत्री श्री. खाडे म्हणाले, कामगारांची अधिकृतपणे नोंदणी करण्यामध्ये अधिक सुलभता आणि पारदर्शकता यावी, कामगारांना हक्काच्या सर्व सोई-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सेतू नोंदणी केंद्र उभारण्यात येणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभवाटप, मध्यान्ह भोजन योजनेमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली होती. या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. यामध्ये मध्यान्ह भोजन पुरवठा करण्याकरिता नियुक्त संस्थेने सर्व सर्वेक्षणाअंती निवड केलेल्या बांधकामांच्या ठिकाणावरील नोंदित व अनोंदित कामगारांना भोजन पुरवठ्याबाबत संबंधित विकासक, ठेकेदार यांनी आस्थापनांची सहमती पत्र प्राप्त करून जिल्हा कार्यालयास सादर केलेल्या कामगारांच्या यादीस मंजुरी देण्यात आली आहे.

मध्यान्ह  भोजनाचा लाभ  २७ हजार ३०१ कामगार जिल्ह्यातील विविध बांधकाम साईट, वीट भट्टी, स्टोन क्रशर, कामगार नाके, मनरेगा अशा विविध ठिकाणी काम करत होते, अशी माहिती मंत्री श्री.खाडे यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य नाना पटोले, अनिल देशमुख, आशिष शेलार, राजेश टोपे, विजय वडेट्टीवार, अतुल भातखळकर, भास्कर जाधव, प्रणिती शिंदे, योगेश सागर यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

000

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदिवडे बुद्रूक येथील ग्रामपंचायत आर्थिक अपहार प्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध विभागीय चौकशी सुरू – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. २४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रूक या ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामसेवक यांनी सन २०२०-२१ व २१-२२ या वर्षात १९ लाख २३ हजार व ग्रामपंचायत बांदिवडे खुर्द कोहळे या ठिकाणी सन २०१८-१९ व  सन २०१९-२० या वर्षात ११ लाख ३७ हजार असा जवळपास ३० लाख ५१ हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. याबाबत त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रूक या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाने केलेले अपहार प्रकरणी विधानसभा सदस्य वैभव नाईक, भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री. श्री. महाजन म्हणाले, सन २०१७ ते डिसेंबर २०२२ या कालावधीची पुनर्लेखा तपासणी करण्याबाबत ग्रामस्थ यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदने सादर केली आहेत. या प्रकारणांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी अहवालाच्या शिफारशीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

विधानसभा लक्षवेधी

पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित रुग्णालयासाठी जागा वर्ग करण्याची १५ दिवसांत कार्यवाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. २४ :- पालघर जिल्ह्यात १५० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित असून येत्या १५ दिवसांत त्यासाठी राज्य विमा कामगार मंडळास जागा वर्ग करण्याची आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.

सदस्य राजेश पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, राज्य विमा कामगार मंडळाच्या प्रस्तावित रुग्णालयासाठी बोईसर औद्योगिक क्षेत्रानजिकची पाच एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी, पालघर यांना कळविण्यात आले होते. विभागीय आयुक्त यांच्यामार्फत तो प्रस्ताव प्राप्त झाल्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य आशिष शेलार, मनीषा चौधरी, प्राजक्त तनपुरे यांनी सहभाग घेतला.

0000

महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता भाडेपट्टा आकारणीबाबत आठ दिवसांत निर्णय – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : राज्यातील महानगरपालिकांची आर्थिक परिस्थिती तसेच विविध सेवाभावी संस्था, व्यावसायिक व इतरांच्या मागणीच्या अनुषंगाने विविध प्रयोजनार्थ भाडेपट्टा आकारणी नियम निश्च‍ित करण्याची तातडी लक्षात घेऊन शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. येत्या आठ दिवसांत या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

सदस्य श्रीमती देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, राज्यातील महानगरपालिकेच्या मालकीच्या स्थावर मालमत्ताचे भाडेपट्टा नूतनीकरण अथवा हस्तांतरणासाठी नियम निश्चित केले होते. या नियमावलीमधील नियम ३ (२) नुसार “मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या ८ टक्के रक्कम किंवा बाजार भावानुसार निश्चित होणारे वार्षिक भाडे यापैकी जे जास्त असेल, तेवढे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत वार्षिक भाडे निश्चित करावे. ज्या प्रकरणात भाडेपट्टयाची रक्कम संबंधितांनी भरलेली नसेल, अशा प्रकरणात भाडेपट्टयाच्या रकमेवर २ टक्के एवढ्या व्याजाची आकारणी करावी, अशी तरतूद होती. या नियमावलीमध्ये आता सुधारणा प्रस्तावित असून यामध्ये निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक प्रयोजनाकरिता बाजारमूल्याच्या २ टक्के पेक्षा कमी नाही, व्यावसायिक व औद्योगिक प्रयोजनाकरिता बाजार मूल्याच्या ३ टक्के पेक्षा कमी नाही, अशा पद्धतीने आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समितीद्वारे आकारणी निश्च‍ित करणे, तसेच भाडेपट्टाची रक्कम अदा न केल्यास एक टक्का दराने दंड लागू करण्याबाबत नियमात सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने हरकती व सूचना प्राप्त करून घेण्यात आल्या असून याअनुषंगाने अंतिम निर्णय घेण्याची प्रक्रिया राज्य शासनस्तरावर सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेतर्फे खुल्या जागा व आरक्षित जागांवर महानगरपालिका स्थानिक निधी तसेच लोकप्रतिनिधींचे निधी अंतर्गत व्यायामशाळा, समाजमंदिर, सभामंडप सभागृह, अभ्यासिका, वाचनालय या प्रकारच्या इमारती १०७५ मिळकतींवर उभारण्यात आल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेतर्फे विविध सेवाभावी संस्थांना समाजोपयोगी उपक्रम तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी महानगरपालिकेच्या मिळकती राज्य शासनाद्वारे वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार आकारणी करुन भाडेपट्ट्याच्या दराने उपलब्ध करुन देण्यात येत होत्या. महानगरपालिकेच्या १०७५ मिळकतींपैकी १९५ मिळकती नाममात्र दराने व १६९ मिळकती विनामूल्य सार्वजनिक प्रयोजनार्थ उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य आशिष शेलार, अजय चौधरी, सुनील प्रभू, योगेश सागर, नितीन राऊत, राम कदम आदींनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

पुण्यातील पोलिसांच्या गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम रखडल्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षण आणि फॉरेन्सिक ऑडिट करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : राज्यातील पोलीस दलातील आजी –माजी अधिकारी-कर्मचारी यांच्या पुणे येथील पोलीस मेगासिटी गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम रखडल्याप्रकरणी या संस्थेचे विशेष लेखापरीक्षण केले जाईल तसेच बांधकाम व्यावसायिक आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्यातील आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरमार्फत तपासणी केली जाईल. त्यानंतर आलेल्या निष्कर्षानुसार कार्यवाही केली जाईल, कारण या गृहनिर्माण संस्थेत 5 हजार पोलिसांचे पैसे अडकले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सदस्य सुनील टिंगरे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुण्यातील लोहगाव येथे पोलिसांच्या निवासासाठी ही गृहनिर्माण संस्था 2009 साली नोंदविण्यात आली. मात्र त्यानंतर सन 2018 मध्ये संस्थेस पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली आणि त्याठिकाणी 34 टॉवरचे बांधकाम करण्यास सुरुवात झाली. मात्र, हे बांधकाम रखडल्याने आणि याठिकाणी पोलिसांचे पैसे अडकल्याने यातून व्यवहार्य मार्ग काढणे आवश्यक आहे.

याप्रकरणी असलेल्या तक्रारींची दखल घेऊन विभागीय सहनिबंधक यांच्यामार्फत या गृहनिर्माण संस्थेचे विशेष लेखापरीक्षण करुन घेण्यात येईल. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. याठिकाणी संबंधित कंपनी काम करण्यास इच्छुक नसल्यास काही विकल्प काढता येईल का, याचाही विचार केला जाईल. फॉरेन्सिक ऑडिटनंतर या कामासाठी जमा झालेली रक्कम अन्यत्र वळविण्यात आली आहे का, हेही तपासले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

पुण्यासह मुंबई आणि इतर ठिकाणीही पोलीसांच्या निवासस्थानांचा प्रश्न आहे. त्यासंदर्भात निश्चितपणे सर्व बाबी तपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदस्य आदित्य ठाकरे, श्वेता महाले, कालिदास कोळंबकर, दिलीप लांडे, अमीन पटेल, किशोर पाटील, योगेश सागर आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

कळवंडे धरण दुरुस्तीच्या निकृष्ट कामांप्रकरणी योग्य पर्यवेक्षण झाले नसल्यास कारवाई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४:  रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर विविध ठिकाणी धरण दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून याप्रकरणी संबंधित उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार पर्यवेक्षण झाले नसेल तर कार्यवाही केली जाईल. या सर्व कामांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात येईल आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना रक्कम अदा केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सदस्य भास्कर जाधव यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कळवंडे धरणामध्ये सध्या 22 टक्के इतका पाणीसाठा आहे. सन 2019 पासून धरणाच्या दोन्ही बाजूस माती भरावामधून पाणी पाझरत असल्याने गळती प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आली. त्याबाबत विहित प्रक्रिया राबविण्यात आली. सदर कामाचे अंदाजपत्रक दीड कोटी रुपयांच्या आतील असल्याने अशा निविदेसाठी कंत्राटदाराची निविदा भरण्याची सक्षमता तपासली जात नाही. मात्र, जलसंपदा विभागाची कामे करताना कंत्राटदाराची निविदा भरण्याची सक्षमता तपासली जावी या अनुषंगाने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करणे अथवा सध्याच्या शासन निर्णयात बदल करणे या दोन्ही पर्यायांचा विचार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

परभणी येथील नाट्यगृहाच्या कामाबाबत लवकरच बैठक  मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : परभणी येथील नाट्यगृहाचे बांधकाम हे निश्चितपणे पूर्ण केले जाईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, परभणी महानगरपालिकेस  मूलभूत सोयीसुविधा विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षात 1 हजार आसन क्षमतेच्या नवीन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देऊन 10 कोटी रुपये इतका निधी देण्यात आला होता. त्यानंतर महानगरपालिकेने वातानुकूलन यंत्रणेसह विविध विद्युत कामे प्रस्तावित करुन त्यासाठी निधीची मागणी केली आहे. हे नाट्यगृह पूर्ण व्हावे, हीच राज्य शासनाची भूमिका असून याबाबत लवकरच संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सदस्य नाना पटोले, सुरेश वरपूडकर, रवींद्र वायकर यांनीही यावेळी चर्चेत भाग घेतला.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे – मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. २४ : राज्यातील अवर्षणग्रस्त भागात  अत्यल्प पाऊस झाला किंवा झालाच नाही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यास टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य समाधान आवताडे यांनी मंगळवेढा, जि.सोलापूर येथील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांना चाऱ्याविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, ज्या जिल्ह्यात जनावरांचा चाऱ्याचा आणि  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा होणार आहे, त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेऊन चारा छावणी आणि पाण्याचा टँकर सुरू करण्यात येणार आहे. अति पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना आणि ज्या शेतात दुबार पेरणीची आवश्यकता आहे ,अशा ठिकाणी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, रोहित पवार, किशोर पाटील यांनी सहभाग घेतला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

आश्रमशाळांच्या परिपोषण अनुदानापोटी निधी उपलब्ध करण्याच्या मागणीवर विचार करणार – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 24 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा संस्थाचालकांची विद्यार्थ्यांचे गणवेश, शैक्षणिक साहित्य, आगाऊ भोजन साहित्य व दैनंदिन वापरातील साहित्य खरेदीच्या आगाऊ खर्चासाठी वेतनेतर अनुदानातील 60 टक्क्याच्या मर्यादेत परिपोषण अनुदानापोटी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे. ही बाब तपासून निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली. आश्रमशाळेतील कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेले अथवा थकलेले नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सदस्य सुनील कांबळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलेत होते.

श्री.सावे म्हणाले की, या विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या 977 विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गासाठीच्या निवासी, खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळेतील वेतन 100 टक्के अनुदान तसेच निवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांचे निवास, भोजन व दैनंदिन वापरातील साहित्य इत्यादीसाठी परिपोषण अनुदान, अनुज्ञेय इमारत भाडे रकमेच्या 75 टक्के तसेच संस्थेच्या आकस्मिक खर्चासाठी निवासी आश्रमशाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्राथमिक आश्रमशाळेसाठी 8 टक्के व माध्यमिक आश्रमशाळेसाठी 12 टक्के वेतनेतर अनुदान शासन देते.

सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये वेतनेतर अनुदानासाठी 225 कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे. निधी वितरीत करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली  असून अलिकडेच प्राप्त 10 टक्के निधी वितरीत करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. सावे यांनी यावेळी दिली.

विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळांतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी विहित कार्यपद्धतीनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाप्रमाणे 12 वर्ष सेवेनंतर कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्याबाबत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट गठित करण्यात आला आहे. अभ्यासगटाच्या शिफारसी प्राप्त झाल्यानंतर आश्वासित प्रगती लागू केल्यास शासनाच्या तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराबाबत अभ्यास करून नियोजन / वित्त विभागाच्या सहमतीने आणि शासन मान्यतेने याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विभागांतर्गत असलेल्या विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळांसाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी स्वतंत्र युनिट आहेत. सध्या नवीन आश्रमशाळांना मान्यता देण्याचे धोरण नाही. तथापी, काही प्राथमिक आश्रमशाळा चालकांकडून इयत्ता 7 वी नंतर नैसर्गिक वाढीने स्वेच्छेने व स्वखर्चाने वर्ग चालविण्याची मागणी आल्यानंतर, अशा संस्थांना नैसर्गिक वाढीने त्यासाठी अनुदान व पदमंजुरीची मागणी न करण्याच्या प्रतिज्ञापत्रातील अटी व शर्तीच्या अधिन राहून इयत्ता 8 वी व त्यापुढील वर्गवाढ मंजूर करण्यात येते. तथापि, नव्याने इयत्ता 9 वी  आणि 10 वी माध्यमिक आश्रमशाळा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन नसल्याचे मंत्री श्री. सावे यांनी स्पष्ट केले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मुंबई, दि. २४ : औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत विरोधी पक्षनेते यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली असून चौकशीत पोलीस प्रशासनाकडून बेकायदेशीर वसुली करण्यात येत असल्याबाबत निष्पन्न झाले नाही. तथापि, सभागृहात दिलेल्या माहितीची शहानिशा करून अवैध व्यवसाय चालवणारे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठिशी घालणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, अवैध व्यवसाय सुरू असून व्यावसायिकांकडून वसुली करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दलालांची नेमणूक केली आहे. याबाबत शासनाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबतची मागणी विरोधी पक्षनेते यांनी पोलीस महासंचालक तसेच पोलीस आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे केली होती. त्या चौकशीत असे निष्पन्न झाले नाही. राज्यात ऑनलाईन गॅम्बलिंग होत असल्यास त्यावर निश्च‍ित कारवाई केली जाईल. तथापि, जे ऑनलाईन खेळ खेळले जातात ते ‘गेम ऑफ स्कील’ स्वरूपात असल्यास त्यांना परवानगी असते. त्यावर कारवाई करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. ज्या खेळांमुळे तरूण पिढी वाईट मार्गाला जाऊ शकते अशा खेळांची अथवा गुटख्यासारख्या पदार्थांची जाहिरात करावी का याबाबत प्रसिद्ध व्यक्त‍िमत्वांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. हिंगोली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत मोहीम हाती घेऊन कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यासाठी ‘मकोका’ अथवा ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई करणार, असे त्यांनी सांगितले. अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा सहभाग आढळून आल्यास कलम 311 अन्वये कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, अभिजित वंजारी, ॲड.अनिल परब, श्रीमती प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.

0000

जनजाती सल्लागार परिषदेची बैठक पुढील महिन्यात प्रस्तावित – आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

मुंबई, ‍‍दि. २४ : अनुसूचित जमातीच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या योजना व सुविधा यांच्याकरिता सल्ला देण्यासाठी जनजाती सल्लागार परिषद कार्यरत असून या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीची बैठक ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित करण्यात आली असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य आमश्या पाडवी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, या परिषदेची 5 जानेवारी 2023 रोजी पुनर्रचना करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये याची बैठक प्रस्तावित असून सर्व संबंधित आमदार आणि निमंत्रितांना बैठकीसाठी विषय सूचविण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. ज्या सदस्यांना अद्याप पत्र प्राप्त झाले नसेल त्यांना ते तातडीने पोहोचविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

0000

त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणी ‘एसआयटी’चा अहवाल एका महिन्यात मागविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथील संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी शिवमंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी मनाई केल्यामुळे वाद निर्माण झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्यात आली असून त्याचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, श्रद्धा अथवा परंपरा यामुळे समाज एकत्र येणार असेल, तर त्यास कुणाची हरकत असणार नाही. तथापि, खोडसाळपणा अथवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन झाल्यास त्यावर कारवाई होईल. त्र्यंबकेश्वर प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने त्याची दखल घेणे भाग आहे. याप्रकरणी ज्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे त्याबाबतची कार्यवाही सुरू असून याबाबतचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य कपिल पाटील, नरेंद्र दराडे, अब्दुल्ला खान दुर्राणी, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

00000

बनावट बांधकाम परवानगी प्रकरणी स्थापन ‘एसआयटी’चे काम तीन महिन्यात पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 66 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले आहेत. या प्रकरणी पोलीस विभागामार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. येत्या तीन महिन्यात एसआयटीचे काम पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे महानगरपालिकेच्या वतीने विकासक व वास्तूविशारद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले.

सदस्य निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (महारेरा) स्थापना झाल्यानंतर अवैध बांधकामांवर आळा बसला असून नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. नुकतीच ‘रेरा’च्या देशभरातील रेग्यूलेटरची बैठक झाली असून त्यात प्राधिकरणासमोरील अडचणी आणि कार्यपद्धतीमधील बदलांबाबत चर्चा झाली आहे. याअनुषंगाने ज्या सूचना येतील त्यापैकी राज्य शासनाच्या अखत्यारीतील सुधारणा शासन करेल, तसेच ज्या सूचना केंद्राकडे पाठवायच्या असतील त्या केंद्र सरकारकडे पाठविल्या जातील. प्राधिकरणावरील रिक्त पदांवरील नियुक्त्यांबाबत बोलताना त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रकरणी मानपाडा येथील दाखल गुन्ह्यांमध्ये 25 आरोपींना, तर रामनगर येथे 42 आरोपींना अटक करण्यात आली असून 25 जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री.सावे यांनी दिली. संबंधित दुय्यम निबंधकावर कारवाई सुरू असल्याचे सांगून यापुढे ऑनलाईन परवानगीशिवाय नोंदणी होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, अभिजित वंजारी, जयंत पाटील, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

विधानपरिषद कामकाज

मुंबई, दि. २४ : राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींना आवश्यकतेनुसार निधीचे वितरण करण्यात येते. यामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सदस्यांना देण्यात येणाऱ्या विकास निधीमध्ये समान वाटपाबाबत धोरण आणणार का याबाबत नियम 289 अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना प्रत्येक विभागाकडून प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत निधीची उपलब्धता विचारात घेऊन अर्थसंकल्प अंतिम केले जाते. यापूर्वीच्या काही योजनांना स्थगिती देण्यात आली होती. प्राधान्य लक्षात घेऊन काही कामांवरील स्थगिती उठविण्यात आली असल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. विधान परिषदेतील सदस्यांमध्ये निधीचे असमान वितरण झाले असल्यास कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही यादृष्टीने विकास कामांची आवश्यकता आणि गुणवत्ता लक्षात घेऊन निधीचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहीर यांनी सहभाग घेतला.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. २४ : भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, जुलै महिन्याच्या उर्वरित कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. 24 जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार 1 कोटी 4 लाख 68 हजार 349 शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले असून विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्याबाबत कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत उत्तरात सांगितले.

मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे याची चौकशी करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची सूचना विधान परिषद सदस्य अंबादास दानवे  यांनी विधानपरिषद नियम ९३ अन्वये मांडली होती. त्यावरील उत्तरादाखल मंत्री श्री. मुंडे यांनी ही माहिती दिली.

मंत्री श्री.मुंडे म्हणाले, महाराष्ट्रात पाऊस जून ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पैरण्या केल्या जातात. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. दि. २५ जून पासून संपूर्ण महाराष्ट्र मान्सून पर्जन्यमानाने व्यापला आहे. राज्यात माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान २०७.६ मिमी असून प्रत्यक्षात १११.३ मिमी पाऊस पडला आहे (सरासरीच्या ५४ टक्के), राज्यात दि.०१ जून ते दि. २३ जुलै पर्यंत सरासरी पाऊस ४५३.१ मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस ४४१.५ मिमी आहे (सरासरी २७.४ टक्के). मराठवाड्यात माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १३४.० मिमी असून प्रत्यक्षात ५५.५ मिमी पाऊस पडला आहे (सरासरीच्या ४१.४ टक्के),मराठवाड्यात दि.०१ जून ते दि. २३ जुलै पर्यंत सरासरी पाऊस २७२.१ मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस २५१.१ मिमी आहे (सरासरी ९२.३ टक्के). राज्याचे सरासरी पेरणी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर आहे.

दि.२३.०७.२०२३ अखेर राज्यात ११४.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ८० टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत १२७.१२ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली होती. मराठवाडा विभागाची सरासरी पेरणी क्षेत्र ४८.५७ लाख हेक्टर आहे. दि.२३.०७.२०२३ अखेर मराठवाड्यात ४२.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ८८टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत ४५.३३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, राज्यात माहे जुलै मध्ये दि.२३.०७.२०२३ अखेर सोयाबीन पिकाची ४३.८७ लाख हेक्टर (१०६ टक्के), कापूस पिकाची ३९.७९ लाख हेक्टर (९५ टक्के), तूर पिकाची ९.६७ लाख हेक्टर (७५ टक्के), मका पिकाची ६.६४ लाख हेक्टर (७५ टक्के), उडीद पिकाची १.६२ लाख हेक्टर (४४ टक्के), मूग पिकाची १.३९ लाख हेक्टर (३५ टक्के) तसेच इतर पिकांची पेरणी झाली आहे. मराठवाड्यात माहे जुलै मध्ये दि.२३.०७.२०२३ अखेर सोयाबीन पिकाची २२.३३ लाख हेक्टर (११४ टक्के), कापूस पिकाची १२.८० लाख हेक्टर (८३ टक्के), तूर पिकाची ३.१५ लाख हेक्टर (६४ टक्के), मका पिकाची २.१४ लाख हेक्टर (७९ टक्के), उडीद पिकाची ०.७२ लाख हे. (४९ टक्के), मूग पिकाची ०.६४ लाख है. (३९ टक्के) तसेच इतर पिकांची पेरणी झाली आहे.

मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षणप्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशीरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशीरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. खरीप हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य तसेच तृणधान्य इ. पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी पिकांच्या नियोजनाबाबत शिफारशी केलेल्या आहेत. नियमित मौसमी पाऊस उशीरा सुरु झाल्यास पिकांचे नियोजन, पिकांचे वाण, खत व्यवस्थापन तसेच रोपांच्या प्रती हेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो, अन्यथा प्रती हेक्टरी उत्पादन कमी येते. यासाठी जिल्हा स्तरावर कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे व कृषी विज्ञान केंद्रे यांच्या सल्ल्याने जिल्ह्याचा पीक आपत्कालीन पीक आराखडा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही  मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २४: आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून राहिलेला, दोन पिढ्यांना जोडणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘जयंत सावरकर यांनी नानाविध चरित्र भूमिका सहजगत्या केल्या. हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी  मालिका या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 24 : “आपल्या अभिनयाने नाटक, चित्रपट, मालिका आणि ओटीटी अशा विविध माध्यमांत अमीट ठसा उमटवणारे, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने केवळ एक उत्तम अभिनेता नाही, तर अनेक कलाकारांचा मार्गदर्शक हरपला आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “जयंत सावरकर यांनी चार पिढ्यांसोबत काम केले. त्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका केल्या. त्यांचे विश्व इतके अनुभवसिद्ध होते की त्यातून नव्या पिढ्या घडत होत्या. एक ऊर्जावान आणि आपल्या विचारांवर ठाम असलेला अभिनेता आपण गमावला आहे. त्यांनी साकारलेला ‘अंतू बर्वा’ कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना”!

0000

 

दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील 

मुंबई, दि 24: दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा  बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतली. दरडप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव 10 दिवसांत सादर करावेत, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील खासगी जमिनीवर स्लम ॲक्टखाली घोषित केलेल्या झोपडपट्ट्या ज्यांना अन्य नागरी सुविधा देण्यात येतात, अशा ठिकाणीही दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी सुपेकर,  ठाणे महानगरपालिकेचे प्रशांत रोडे, व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे नालेसफाईच्या कामाप्रमाणेच संरक्षक भिंतीच्या व्हीपहोलची साफसफाई करण्यात यावी, तसेच सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा व जिल्हा नियोजन समिती यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवावा.

मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे क्षेत्रातील दरडप्रवण भागाची माहिती व मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन काय काय उपाययोजना करता येतील, याबाबतची  माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

00000

 

पूरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे राशन देण्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचे निर्देश

बुलडाणा, दि २३ : संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात गेल्या दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबाचे प्राधान्याने पुनर्वसन करीत या कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे राशन तातडीने पुरविण्यात यावे, असे निर्देश मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.
शेगाव येथील विश्रामगृहात आज श्री. पाटील यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पुराचे पाणी घरात शिरले आहे, अशा कुटुंबांना मदतीसोबत एक महिना पुरेल एवढे राशन देण्यात यावे. तसेच पुरामुळे मृत्यू झाला असल्यास तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे. पुरामुळे गावातील विहिरीत गाळपाणी गेले आहे आणि त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांनी चांगले पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी तात्काळ अधिग्रहित करून पाणीपुरवठा करावा. दूषित पाणीपुरवठा झाल्यास आरोग्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.
पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावातील कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे धान्य आणि सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच पुरामुळे बाधित आणि बिघर झालेल्या कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे. अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेल्यामुळे पिक, फळबागा आणि बुजलेल्या विहिरींचे तातडीने पंचनामे करावेत.

पुरामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणाची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. तसेच महसूल मंडळामध्ये 65 मिलिमीटरहून अधिक पाऊस झालेला असल्यास तेथील सरसकट पंचनामे करण्यात यावे. जिगाव प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुकसानीची माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.

000

पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, मुखेड, धर्माबाद, माहूर या तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान खुप मोठे आहे. दोन व्यक्ती प्राणास मुकले आहेत. साधारणत: साठ जनावरे वाहून गेल्याचे समोर आले आहे. विशेषत: नदी नाल्याच्या जवळ असलेल्या अनेक भागातील शेतीची जमीन खरडून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासन निश्चितपणे मदतीसाठी पुढे येईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिला. सध्या अधिवेशन सुरू असून लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय सभागृहात जाहीर केल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेऊन त्यांनी अतिवृष्टी झालेल्या बिलोली, देगलूर, मुखेड भागातील विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, माजी आमदार सुभाष साबने, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रवीण साले, डॉ. माधव पाटील उचेगांवकर, डॉ. विरभद्र हिमगीरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. विमानतळ येथील बैठक कक्षात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पॉवर पॉईंट प्रेझेटेंशनद्वारे जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची माहिती दिली. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आढावा घेऊन प्रत्यक्ष गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्याहस्ते पूरग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरुपात मदतीचे धनादेशही वाटप करण्यात आले.

अतिवृष्टीचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील लहान पूल व रस्त्याचीही मोठी दुर्दशा झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी दरवर्षी पूराच्या पाण्यामुळे रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटतो. अशा गावांची व ठिकाणांची यादी करुन त्याठिकाणी नवीन पूलाच्या कामाबाबत प्राधान्याने विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर पूरामुळे बऱ्याच गावात शेतजमीन खरडून जाते. अशी गावे व शेतशिवाराच्या जागांची निवड करुन त्याठिकाणी मृदसंधारणाच्या दृष्टीने, पाणलोटाच्या दृष्टीने वेगळा विचार करुन मनरेगामार्फत जे काही करता येईल त्याबाबत शासन पातळीवर चर्चा करुन निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री गिरीष महाजन यांनी बिलोली तालुक्यातील टाकळी, देगलूर तालुक्यातील लखा, वनाळी, सुगाव मुखेड तालुक्यातील एकलारा, टाकळी बु., बेटमोगरा, ऊच्चा माऊली या भागातील शिवाराची पाहणी केली. या भागातील अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने काही गावातील विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली असून ही कामे त्वरित पूर्ण करुन विद्युत पुरवठा पुर्ववत केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

000

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय

0
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना; समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास...

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

0
मुंबई, दि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरण,...

घनसावंगी मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. १३ : जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध पाणी पुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता...

शिरोळ मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. १३: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव...

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई दि. १३ : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात...