गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1132

पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी व नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरतपणे सुरू ठेवाणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील विविध कामांचे भूमीपूजन व लोकार्पण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी टाकळी विंचूर च्या सरपंच अश्वीनी जाधव, लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉ. श्रीकांत आवारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष राजवाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा असून त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. ओझरखेड कॅनाल आणि चाऱ्यांच्या कामाची निविदा लवकरच काढण्यात येईल. मांजरपाडाच्या पाण्यामुळे ओझरखेड धरण भरते आहे. त्यामूळे ओझरखेड कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होतो आहे. येवला व निफाड तालुक्यांतील रस्त्यांची कामेही वेगाने सुरू आहेत. अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

 या कामांचे झाले भूमीपूजन

1.लासलगाव स्टेशन रोड (टाकळी विंचूर) येथे 2515 निधी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भूमीपुजन (रक्कम रू. 15 लक्ष)

2.2515 निधी अंतर्गत सभामंडपाचे उद्घाटन (रक्कम रू. 15 लक्ष)

3.संधान नगर येथे 2515 निधी अंतर्गत काँक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन

4.टाकळी विंचूर ते 12 बंगले येथे 2515 निधी  अंतर्गत भुमीगत गटार बांधणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रू. 15 लक्ष)

5.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्तीत अनुषंगिक कामे करणे कामांचे भुमीपूजन ( रक्कम रू. 8 लक्ष)

6.स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे उद्घाटन (रक्कम रू.10 लक्ष)

7.2525 निधी अंतर्गत सभामंडप बांधणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रू. 15 लाख)

8.जिल्हा क्रिडा निधी अंतर्गत ग्रीन जीम (व्यायामशाळा) चे उद्घाटन

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलशाचे उदघाटन करण्यात आले.

००००००

शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि.30 (जिमाका) :- हे शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे शासन आहे. “मराठवाडा मुक्ती संग्राम” हे इतिहासातील न विसरता येणारे पर्व आहे. या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना शतशः नमन करतो आणि हे शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने येथील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय केळकर, माजी खासदार आनंद परांजपे, अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन कदम, डॉ. दिलीप सपाटे, डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ.अविनाश भागवत, डॉ.राजेश कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना “मराठवाडा भूषण” हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी करोना काळात केलेले काम अत्त्युच्च दर्जाचे होते. त्यांनी केलेल्या कामाचे मोल होवूच शकत नाही. पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांना हा पुरस्कार प्रदान केल्याने खरे तर या पुरस्काराची उंची वाढली आहे.

ते म्हणाले, पुढच्या पिढीला माहिती देणारे, प्रेरणा व ऊर्जा देणारे असे कार्यक्रम सतत होणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील स्वातंत्र्यसेनानींनी मराठवाडा मुक्तीसाठी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. हे शासन मराठवाडा विकासासाठी कटिबद्ध आहे. यासाठीच मराठवाड्यातील विविध प्रकल्पांसाठी 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीस मंजूरी देण्यात आली आहे. मराठवाडा विकासित होणारच. मराठवाडा समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचबरोबर नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गासही मराठवाडा जोडला जाणार आहे.

हे शासन काम करणारे आणि चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करणारे शासन आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात प्राणांची बाजी लावून काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे विशेष कौतुक केले. यावेळी स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्व. बाळासाहेब नेहमी सांगायचे वय वाढले तरी मनाने तरुण असले पाहिजे. चांगल्या कामाचा सदैव ध्यास ठेवला पाहिजे, त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. स्व. बाळासाहेबांच्या आणि स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीवरच हे शासन काम करीत असून “शासन आपल्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटी 75 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम अजूनही सुरूच आहे. सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा सहज सुलभपणे लाभ मिळावा, हाच या उपक्रमाचा एकमेव उद्देश आहे.

आयोजकांनी “मराठवाडा भवन” साठी शासनास प्रस्ताव सादर करावा. याविषयी निश्चित सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे जाहीर करून जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी मोहीम लवकरच सुरू करण्यात येत असून त्यास स्व.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी शेवटी केली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्राम कधीही विसरू नका. आपल्या कार्यातून हा इतिहास टिकवून ठेवायला हवा. सबंध महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्याचाही विकास नक्कीच होणार. त्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार मनापासून कष्ट घेत आहेत. मुख्यमंत्री हे फक्त काम करणारेच मुख्यमंत्री असून त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उत्तम साथ मिळत आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे मराठवाड्याची मनापासून काळजी घेत आहेत. स्व.धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत कार्यरत असतात. त्यांच्या नेतृत्वात मराठवाड्याचा विकास व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करतानाच श्री. शिंदे हे सर्वसामान्यांसाठी झटून काम करणारे मुख्यमंत्री असल्याने ही अपेक्षा निश्चित पूर्ण होणार, हा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना “मराठवाडा भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले तर श्री.कैलास जाधव (प्रशासकीय क्षेत्र), सोमनाथ वाळके (शैक्षणिक क्षेत्र), कर्ण एकनाथ तांबे (सामाजिक क्षेत्र), मिलिंद शिंदे (कला क्षेत्र), सोनाली मात्रे (प्रशासकीय क्षेत्र), आत्माराम सोनवणे (सामाजिक क्षेत्र) यांना “मराठवाडा रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाडा भूषण पुरस्कार सन्मानार्थी पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर तसेच ह.भ.प प्रकाश बोधले महाराज आणि मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर किल्लारी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक डॉ.दिलीप सपाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व जेष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र हुंजे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0000000

मुक्ती दिन व नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : येवला शहरातील मुक्तीभुमी येथे १३ ऑक्टोबर रोजी होणारा मुक्तीभूमी दिन कार्यक्रम त्याचप्रमाणे श्री. क्षेत्र कोटमगाव, निमगाव वाकडा व लोणजाई माता यात्रोत्सवाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत. असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

आज येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित 13 ऑक्टोबर २०२३ रोजी होणारा मुक्तिदिन कार्यक्रम, श्री. क्षेत्र कोटमगाव, निमगाव वाकडा व लोणजाई माता, सुभाषनगर येथील यात्रोत्सवासाठी उपाययोजना व विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. या बैठकीस येवला उपविभागीय अधिकारी बााबासाहेब गाढवे, निफाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, १३ ऑक्टोबर रोजी मुक्तीभूमी येथे मुक्तीभूमी दिनाचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने अनुयायी येणार आहेत. त्यामुळे  अनुयायांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यावे. या कार्यक्रमासाठी बार्टीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणांशी समन्वय साधून मुक्तीभूमी येथील बाहेरील बॅराकेटिंग व मुक्तीभूमीच्या आतील सर्व व्यवस्था चोख ठेवावी. कार्यक्रमाच्या दिवशी मुक्तीभूमीच्या परिसरात लावले जाणारे स्टॉल्स हे शिस्तबद्ध रितीने लावले गेले पाहिजे. पोलीस यंत्रणेने लाऊड स्पीकरची परवानगी देतांना कालबद्ध नियोजन करूनच परवानगी द्यावी जणेकरून एकाच वेळी लाऊड स्पीकरच्या आवाजाचा गोंधळ होणार नाही याबाबत योग्य दक्षता घ्यावी. बाहेरील परिसराची संपूर्ण साफसफाई, येणाऱ्या लोकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी व पुरेशा प्रमाणात फिरते स्वच्छतागृह, कार्यक्रम पार पडल्यानंतर स्वच्छतेला नगरपालिका अधिका-यांनी प्राधान्य द्यावे. वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी सुसज्ज वैद्यकीय पथक पूर्णवेळ उपलब्ध ठेवावे. उपअभियंता महावितरण येवला यांनी या काळात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची

व्यवस्था तहसीलदार, शहर पोलीस व नगरपालिका यांनी संयुक्तरित्या करण्यात यावी. तसेच पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, श्री. क्षेत्र कोटमगाव यात्रोत्सवाच्या अनुषंगाने औरंगाबाद रोडपासून मंदिरापर्यंत अतिक्रमण असल्यास ते गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्ट यांनी संयुक्तरित्या काढावे तसेच आवश्यक तेथे बॅराकेटिंग करावे. महावितरण अधिकाऱ्यांनी यात्रा काळात सर्व विद्युत पोल, विद्युत जोडण्या, फ्युज बॉक्सची तपासणी करून सुस्थितीत ठेवावे, तसेच पूर्णवेळ विद्युत पुरवठा करण्यात यावा. यात्रेच्या ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, शहर पोलीस, ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टने संयुक्तरित्या कार्यवाही करावी. औरंगाबाद महामार्गावर होणारी पार्किंग व वाहतुकीचे नियोजन हे शहर पोलीस, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तरित्या करावे. यात्रा ठिकाणी दुकाने व स्टॉलसाठी परवानगी देतांना ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन करावे. वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत सुसज्ज वैद्यकीय पथक पूर्णवेळ उपलब्ध ठेवावे. संपूर्ण यात्रा कालावधीत परिसराची स्वच्छता ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी निर्जंतूक फवारणी करण्यात यावी. याप्रमाणेच निमगाव वाकडा व लोणजाई माता यात्रोत्सवासाठी नियोजन आणि उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बैठकीत दिले.

मंत्री छगन भुजबळ आढावा घेतांना म्हणाले, विशेष सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. शिबीरात लाभार्थ्यांना रेशन कार्ड अद्ययावतीकरण मोहीम राबविणे. ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, पी एम विश्वकर्मा योजना नोंदणी करणे. उत्पन्न् दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे लाभ देण्यात यावेत. राजापूर व ४० गाव पाणी पुरवठा योजनेसाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाईपलाईन साठी आवश्यक परवानगी देण्यात यावी तसेच  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राजापूर व ४० गाव पाणी पुरवठा योजना व धुळगाव साठवण तलाव योजनेसाठी प्रलंबित असलेला प्रस्ताव  ऑनलाईन सादर करावा. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रादेशिक) यांनी वन जमीन हस्तांतरण प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालय आंगणगाव येथे ग्रीन जीमचे  उद्घाटन संपन्न

मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालय आंगणगाव येथे जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत ग्रीन जीम चे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले  यावेळी येवला उपविभागीय अधिकारी  बााबासाहेब गाढवे प्रा. अर्जून कोकाटे, शिक्षक उपस्थित होते.

येवला तालुक्यातील रायते येथे सभामंडपाचे झाले लोकर्पण

येवला तालुक्यातील रायते येथे स्थानिक विकास निधीतून (रू १५ लक्ष) साकारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी येवला

उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, सरपंच भूषण गोठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

0000000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऋतुजा भोसले, स्वप्नील कुसाळे यांचे अभिनंदन

मुंबई, दि. ३०:- चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसले हिने व पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये स्वप्नील कुसाळे याने सुवर्णपदक पटकावले आहे. या दोघांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

‘महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी सुरुवातीपासूनच या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऋतुजाने टेनिस मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वप्नीलने देखील नेमबाजीचा उत्कृष्ट कामगिरीचा आलेख उंचावणारी कामगिरी केली आहे. या दोघांनीही सांघिक खेळात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भारताला पदकांची कमाई करून दिली आहे, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या यशासाठी ॠतुजा व स्वप्नीलचे तसेच त्यांच्या प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे व दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0000

वाघनखे करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी होणार लंडनला रवाना; मुंबईच्या विमानतळावर छत्रपतींच्या पुतळ्याला करणार अभिवादन

मुंबई, दि. 30:  छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी  वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रात्री लंडनकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पूरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या सोबत असतील.

एक ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनकडे रवाना होण्यापूर्वी मंत्री श्री. मुनगंटीवार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. यावेळी विविध संघटना, मंडळे, संस्था यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे  ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री. श्री मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

या दौऱ्यात लंडन येथील टॅव्हिस्टॊक चौक येथे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास मंत्री श्री. मुनगंटीवार उपस्थित रहातील. तेथील विविध भारतीय तथा महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून ते चर्चा करणार असून मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वाक्षऱ्या होतील. यानंतर लगेच दूरदृश्यप्रणालीद्वारे पत्रकार परिषद होणार असून मंत्री श्री. मुनगंटीवार हे पत्रकारांशी संवाद साधतील.

या दौऱ्यात मंत्री श्री. मुनगंटीवार हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानास भेट देणार असून तेथे महामानवास अभिवादन करणार आहेत.

000

स्वच्छतेसाठी महाश्रमदानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि.30 : दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाअंतर्गंत ‘कचरामुक्त भारत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘1 तारीख, एक तास’  उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण भागात सुमारे 56,786 ठिकाणी नियोजन करण्यात आले असून यामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत 19,461 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 95,84,680 नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छतेचे जनआंदोलन उभारले गेले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या प्रशासनाबरोबर ग्रामपंचायती व नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बसस्थानके, खुल्या जागा येथे साफसफाई, कचरा संकलन व वर्गीकरण करण्यात येणार आहे.  ग्रामस्थांच्या सहभागाने नदी, समुद्र किनारे, नाले काठावरील व तळ्यातील प्लास्टिक कचरा गोळा करण्याबाबत मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर स्वच्छता मोहिमेत राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,  गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह महिला बचतगट सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, युवा ग्रुप, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

000

रत्न आभूषण उद्योगात महिला उद्योजकांना येण्यास प्रोत्साहन द्यावे : राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 30 : दागदागिन्यांच्या ग्राहक व आश्रयदात्या अधिकांश महिला आहेत. तरी देखील रत्न आभूषण  उद्योग क्षेत्र आजही पुरुष प्रधान आहे, हा विरोधाभास आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुढे येत असताना रत्न आभूषण उद्योग क्षेत्रात येण्यासाठी महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे चौथ्या रत्न व आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आयोजक संस्था ‘ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’चे अध्यक्ष सैयम मेहरा, उपाध्यक्ष राजेश रोकडे, माजी अध्यक्ष आशिष पेठे, पु.ना. गाडगीळ आणि सन्सचे सौरभ गाडगीळ, सेन्को गोल्डचे शुभंकर सेन तसेच रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

रत्न व आभूषण उद्योग जगातील सर्वाधिक जुन्या उद्योगांपैकी असून या उद्योगाचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असून स्वित्झर्लंडने ज्या प्रमाणे घड्याळाच्या निर्मितीमध्ये नाव कमावले आहे त्याप्रमाणे भारताने रत्न आभूषण उद्योगामध्ये जगात नाव कमावले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

दुबई शॉपिंग फेस्टिवलप्रमाणे मुंबईचा देखील शॉपिंग फेस्टिवल सुरु करावा व या कामात रत्न आभूषण उद्योगाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना राज्यपालांनी केली.     रत्न आभूषण क्षेत्रातले कामगार या उद्योगाचा कणा असून त्यांच्या कल्याणासाठी तसेच आरोग्य व सुरक्षेसाठी रत्न आभूषण परिषदेने लक्ष द्यावे, असेही राज्यपालांनी सांगितले. नैतिकता व प्रामाणिकपणा हा उद्योगाचा दागिना आहे असे सांगून रत्न आभूषण उद्योगाने नीतिमत्ता कसोशीने जपावी, अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली.

भारतातील कारागिरांनी हाताने बनवलेली आभूषणे जगात उत्कृष्ट आहेत. या उद्योगाची उलाढाल आज ७ लाख कोटी रुपये इतकी असून पुढील काही वर्षात ती १० लाख कोटी रुपये होईल, असा विश्वास अध्यक्ष सैयम मेहरा यांनी व्यक्त केला. या क्षेत्रातील उद्योजकांच्या जीएसटी, कस्टम संबंधी अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले. रत्न आभूषण उद्योग प्रदर्शनामध्ये ७०० स्टॉल्स असून ७० हजार व्यापारी सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनाला भेट दिली व उद्योजकांशी संवाद साधला. राज्यपालांच्या  हस्ते यावेळी ‘जीजेसी कनेक्ट’  विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रदर्शन दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे.

0 0 0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

मुंबई, दि. 30 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश  अण्णा महानवर यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश  महानवर यांची नियुक्ती केली.

डॉ. प्रकाश महानवर (जन्म : 01.06.1967) सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत.

डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा कार्यकाळ 5 मे 2023 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.  त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. सुरेशकुमार  (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

0 0 0

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची एनसीसीकडून स्वच्छता

मुंबई, दि.३० : गेले १० दिवस गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. तर अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील प्रमुख चौपाटींवर भक्तांची असंख्य गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू होत्या. अशात चौपाटीवर निर्माल्य आणि इतर कचऱ्याचा प्रश्न दर वर्षी निर्माण होतो. त्यामुळे गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व एनसीसीमधील ५०० मुले व मुली आणि अधिकारी अनेक सभासद सहभागी झाले होते. गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी २०० गोण्या निर्माल्य आणि इतर कचरा काढण्यात आला.

या कार्यक्रमाला ब्रिगेडीअर विक्रांत कुलकर्णी आणि माधवाल, कमांडर सतपाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण मैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन एनसीसीच्या वतीने करण्यात येत असते.

0000

ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचे विशेष प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने शासनासोबत नियमित समन्वय ठेवण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. ३० : मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ही बैठक घडून आली.

चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. उपोषणकर्ते श्री. टोंगे, विजय बलकी, प्रेमानंद जोगी यांना लिंबू पाणी देऊन २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार, परिणय फुके, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आदी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणावर कुठलाही आघात होणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाने कोणतीही शंका मनात ठेवू नये. राज्यात आपण सर्व एकत्रित नांदत असतो, त्यामुळे राज्य सरकार ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. मुंबई येथील बैठकीत ओबीसी समाजाकडून मांडण्यात आलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच ओबीसीमधील सूक्ष्म असलेले भटके आणि विमुक्त जाती यांच्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. बैठकीचे सर्व छायाचित्रीकरण आणि इतिवृत्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देण्यात येईल.’

राज्य सरकारने ओबीसी संदर्भात आतापर्यंत २६ शासन निर्णय काढले आहेत. यात विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्ती, वसतीगृह व इतर महत्त्वाचे निर्णय आहेत. एवढेच नव्हे तर विद्यार्थी आणि युवकांच्या विकासासाठी व ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी चार हजार कोटींची तरतूद केली आहे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ओबीसीसाठी वेगळे मंत्रालय राज्यात स्थापन करण्यात आले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओबीसी हिताचे अनेक निर्णय घेतले असून वैद्यकीय क्षेत्रात ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण दिले आहे. तसेच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला आहे, याचाही उपमुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ‘राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरीता वसतिगृहासाठी इमारती भाड्याने घेतल्या आहेत. या वसतिगृहात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल. राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला विशेष प्राधान्य देणार आहे. ओबीसी नागरिकांसाठी १० लाख घरांची योजना राबविण्यात येत आहे. सर्व प्रश्न सोडविण्याची सरकारची तयारी आहे, मात्र त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारसोबत नियमित समन्वय ठेवावा.’

निधी कमी पडणार नाही

ओबीसी प्रवर्गाच्या योजनांकरिता निधीची कमतरता पडणार नाही. याची काळजी सरकार घेणार आहे. ज्या ओबीसी संघटना मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यांचे म्हणणे सुद्धा सरकार ऐकून घेईल. अशा संघटनांनी सरकारसोबत समन्वय ठेवून चर्चा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

उपोषणकर्त्यांची काळजी

चंद्रपूरमध्ये ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे, विजय बल्की, प्रेमानंद जोगी यांनी उपोषण मागे घेतले, याचा आनंद आहे. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे त्यांनी आभार मानले. रवींद्र टोंगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. तसेच पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळे उपोषणाची सांगता

ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी २० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबरला भेट दिली होती. त्यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. ओबीसी समाजाच्या मागण्या चर्चेतून आणि संवादातून सोडविण्यात येतील, असा विश्वास देऊन श्री. टोंगे यांनी अन्नत्याग उपोषण सोडावे, असे आवाहन त्यांनी केले होते.  श्री. मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळेच उपोषणाची सांगता होऊ शकली, अशी प्रतिक्रिया जनमानसांतून व्यक्त होत आहे.

श्री. मुनगंटीवार यांचा पुढाकार

ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत श्री. मुनगंटीवार सुरुवातीपासून अतिशय आग्रही आहेत. त्यांनी याबाबत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला. त्यांच्याच पुढाकारातून शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ ला मुंबई येथे ओबीसींच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली. राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. टोंगे यांचे उपोषण सोडण्यासाठी चंद्रपुरात आणण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यशस्वी देखील ठरले.

00000

ताज्या बातम्या

कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १०: भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत स्थित दिडशे वर्षांपासूनच्या इतिहासाच्या काळ्या खुणा पुसत...

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...