सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 1111

शतकी परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क बंगाल क्लब दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 20 : राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 20) शतकी परंपरा असलेल्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गा पूजा मंडळाला भेट देऊन देवीची पूजा केली.

यावेळी क्लबचे मानद सल्लागार जॉय चक्रवर्ती, अध्यक्ष दिलीप दास, सचिव मृणाल पुरकायस्थ व बंगाली भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंगाली समाजाने राज्याला उत्तम डॉक्टर, उत्तम शिक्षक, उत्तम संगीतकार, गायक, खेळाडू आणि विचारवंत दिले आहेत.  मुंबई आणि राज्याच्या विकासात  बंगाली भाषिक लोकांचे योगदान मोठे आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी दुर्गा पूजेसारखे सण महत्त्वाचे आहेत. विविध धर्म व पंथाच्या लोकांना निमंत्रित करून दुर्गोत्सव सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. बंगाल क्लब कडे खेळाच्या सुविधा आहेत. या क्लबच्या माध्यमातून देशासाठी उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बंगाल क्लबची स्थापन १९२२ साली करण्यात आली तर येथील दुर्गा पूजा १९३५ पासून सुरु असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

०००

Maharashtra Governor visits Centurion Bengal Club Durga Puja

 

Mumbai 20:  Maharashtra Governor Ramesh Bais today visited the Durga Puja organized by the Century old Bengal Club at Shivaji Park in Mumbai on Friday (20 Oct).

Joy Chakraborty, Honorary Advisor of Bengal Club, Dilip Das, President, Mrinal Purkayastha, Secretary and a large number of people were present.

Speaking on the occasion, the Governor said the Bengali community has given Maharashtra great doctors, teachers, musicians, singers, athletes and intellectuals. He said that the contribution of Bengali speaking people to the progress and development of Mumbai and Maharashtra is of a high order.

The Governor said that festivals like Durga Puja play an important role in maintaining social harmony and brotherhood. He said efforts should be made to make Durgotsav inclusive by inviting people from various religions and sects. The Governor said, Bengal Club has good infrastructure for sports and games. He expressed the hope that the Club will produce excellent sportspersons for the country in the years to come.

According to the organizers, the Bengal Club was founded in 1922 while Durga Puja was started in 1935.

000

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. २० ऑक्टोंबर (जिमाका) –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले असून देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमातून देशाप्रती मायभूमीच्या माती विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम असून  देशभक्तीची उज्वल परंपरा जोपासली जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव पंचायत समिती आवारात  माझी माती – माझा देश अंतर्गत अमृत कलशांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींकडे  सुपूर्द करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात माझी माती – माझा देश अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, माझी माती – माझा देश या संकल्पनेतून प्रधानमंत्री श्री. मोदीसाहेबांनी देशातील सर्व घटकांना, अबाल वृद्ध, सर्व वयोगटातील लोक, महिला यांना एकत्र  करण्याचे काम केले आहे. त्याला आपल्या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री यांनी या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शासकीय अधिकारी, विभाग, सर्व नागरिक, ग्रामस्थ यांचे आभार व शुभेच्छा दिल्या. या अमृत कलशांमध्ये तालुक्यांमधील प्रत्येक गावांमधील माती आणि तांदूळ जमा करण्यात आले आहेत. सुरुवातीस पंचायत समिती आवारामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातून  आणलेल्या अमृत कलशांचे स्वागत करण्यात आले.

धरणगावात ‘कलशाची’ निघाली भव्य मिरवणूक !

धरणगाव शहरातील पंचायत समिती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढत ‘माझी माती – माझा देश’ च्या कलशाचे पूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  करीत नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांच्यासह मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी देशभक्ती पर गीते  सादर करून, चौका – चौकात फटाक्यांची आतषबाजी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यावेळी पालकंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मेरी माटी – मेरा देश कलश कार्यक्रमा बाबत सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन  ग्रामविकास संघटनेचे सचिव पंजाबराव पाटील यांनी केले तर आभार  अध्यक्ष सी. एन. सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी संजय डॉ. संजय भायेकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, उपजिल्हाप्रमुख पाटील सर माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहरप्रमुख विलास महाजन, गट नेते पप्पू भावे, विस्तार अधिकारी कैलास पाटील, संजय धनगर, ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष सी. एन. सोनवणे, सचिव पंजाबराव पाटील, तालुक्यातील  सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून होणारी कामे लोकोपयोगी, पारदर्शी व दर्जेदार करावीत – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीमधून करण्यात येणारी कामे लोकोपयोगी, पारदर्शी व दर्जेदार करावीत. तसेच, काटेकोर नियोजन करून सर्व विभागप्रमुखांनी प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च करावा, अशा सूचना राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून ४०५ कोटी रूपये नियतव्यय मंजूर आहे. शासनाकडून अर्थसंकल्पित तरतुदीच्या ७० टक्के निधी प्राप्त झाला आहे. सप्टेंबर अखेर ८३ कोटी, ७७ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मंजूर निधी त्या-त्या  विकास कामांवर विहित वेळेत खर्च झाला पाहिजे, याचे कटाक्षाने पालन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक यंत्र सामग्री, ट्रान्सफॉर्मरसाठी वीज वितरण कंपनीने सविस्तर प्रस्ताव तातडीने राज्य शासनास सादर करावा. या कामांसाठी आवश्यक अतिरीक्त निधीसह, संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर उपलब्ध पाण्यातून पेयजल, सिंचन व वीजनिर्मिती आदिबाबतचे नियोजन, खरीप दुष्काळ मूल्यांकन अंतर्गत एकूण ८ तालुक्यांचा प्राधान्याने समावेश करावा यासंदर्भात जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने पाणी, चारा, टँकर अशा सर्व प्रकारचे नियोजन व व्यवस्था तयार ठेवावी, अशा सूचना करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटच्या टोकांपर्यंत प्रथम पोहोचण्यासाठी नियोजन करावे. विद्यार्थिनींना एस. टी. बसची प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी एस. टी महामंडळाने पूर्वीप्रमाणे मार्ग आखावेतअशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत जलयुक्त शिवार योजनेबाबत आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जलयुक्त शिवार योजनेमधील कामांचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या. या योजनेसाठी प्राप्त निधी  मृद व जल संधारण, जिल्हा परिषद, वन विभाग आणि कृषि विभागाकडील मंजूर कामांसाठी वितरित करण्यात आला असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

दुष्काळी तालुक्यात पाणी योजनांचे पाणी पोहोचत आहे. मात्र, विजेअभावी पिकांना याची झळ बसू नये. थकबाकीमुळे कृषि पंपाची वीज खंडित करू नये, तसेच, उपसा सिंचन योजनांतील पाण्याचे व आवर्तनांचे मेअखेरचे नियोजन आतापासूनच करावे, अशा सूचना खासदार संजय पाटील यांनी बैठकीत दिल्या.

आमदार अनिल बाबर यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन, महावितरणअंतर्गत आवश्यक तेथे अतिरीक्त निधीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्याची सूचना केली. तसेच, घरकुलाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सूचित केले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विक्रम सावंत यांनी महावितरण कंपनीकडील कामे गतीने व्हावीत, नादुरूस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतील कामे गतीने व्हावीत, असे मत मांडले. आमदार सुमनताई पाटील यांनी एस. टी महामंडळाचे जुने मार्ग पूर्ववत सुरू करण्याची तर आमदार सुधीर गाडगीळ यांनी नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

उपसा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना येणाऱ्या अडचणींचा आढावा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपसा सिंचन योजनेचे अधिकारी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे घ्यावा. त्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी शिबिर आयोजित करून निर्णय घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ (सर्वसाधारण) करिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडील आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सन २०२२-२३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून प्रशासकीय मान्यता दिलेली कामे तात्काळ पूर्ण करून निधी खर्च करण्याचे आदेश यावेळी डॉ. खाडे यांनी दिले. तसेच, चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंत खर्चित निधीचा आढावा घेण्यात आला. १२ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या इतिवृत्तांतास व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच, प्रस्ताव प्राप्त झालेल्या यात्रास्थळांना “क” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.

मौजे भूड (ता. खानापूर), मौजे सालगिरी, पाच्छापूर (ता. जत) येथे आरोग्य उपकेंद्र बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. गुड्डापूर (ता. जत) येथील धानम्मादेवी मंदिरास “अ” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी शिफारस करण्यात आली.

वैरण व पशुखाद्य कार्यक्रम अंतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्ध करणे तसेच लम्पी प्रादुर्भाव रोखण्यासाठी रु. १.२० कोटी पुनर्विनियोजनाव्दारे उपलध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रम अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दाराचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम करणे या कामास मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून तर सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी अनुसूचित जाती उपयोजनामधून सन 2023-24 मध्ये करण्यात येत असलेल्या कामांची व आतापर्यंत खर्चित निधीची माहिती सादरीकरणातून दिली.

प्रारंभी जिल्हा परिषदेअंतर्गत स्मार्ट पीएचसी व स्मार्ट स्कूलसंदर्भात माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

000

शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.20 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्या. अभियानांतर्गत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

शासन आपल्या दारी अभियानाचा महसूल भवन येथे आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वैशाली रसाळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या समित्यांच्या प्रमुखांकडून तयारीची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली.

जिल्हाभरातून येणाऱ्या लाभार्थ्यांची वाहतूक, भोजन, पाणी व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना सुखरून आणून त्यांना पोहोचविण्यात यावे. भोजन, पाणी व वाहतूक व्यवस्थेत त्रुट्या राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

आयोजनाच्या यशस्वीतेसाठी एकून 31 समित्या तयार करण्यात आल्या आहे. त्यात समन्वय समिती, सभा मंडप, वाहतूक, भोजन, वाहन, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, स्टॅाल व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पाणी पुरवठा, वाहनतळ, निवेदन समिती, विद्युत व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध समित्यांचा समावेश आहे. या समित्यांसाठी समिती प्रमुखाची नेमणूक करण्यात आली असून समिती प्रमुखाकडून त्या-त्या समितीच्या तयारीचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.

राज्यभर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा उपक्रम होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे. जिल्ह्याचे वैशिष्ट्य, नाविन्य या कार्यक्रमातून दिसले पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले. विविध विभागाचे जवळपास 35 स्टॅाल कार्यक्रमस्थळी राहणार आहे. याठिकाणी लाभार्थ्यांना त्या-त्या विभागाच्या योजना व इतर उपक्रमांची माहिती उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री सचिवालयाचे दालन

लाभार्थ्यांना आपल्या अडीअडचणींची निवेदने मुख्यमंत्र्यांना द्यावयाची असतात. अशी निवेदने स्विकारण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र दालन कार्यक्रमस्थळी राहणार आहे. या ठिकाणी चार वेगवेगळी पथके राहणार असून त्यांच्याद्वारे निवेदन स्विकारून निवेदनकर्त्यांना पोच दिली जातील. सर्वसामान्यांची निवेदने स्विकारून त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.

000

दिव्यांगांना स्वयंचलित तीनचाकी सायकल पुरविण्यासाठी लाभार्थींची माहिती संकलित करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : जिल्हा दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पात्र दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल पुरविण्यासाठी लाभार्थींची माहिती संकलित करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

दिव्यांग कल्याण निधी  नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत व समिती सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या ५ टक्के स्वीय निधीमधून जिल्हा दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत जवळपास सव्वा तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून स्वयंचलित तीन सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ८० टक्के दिव्यांगत्व आवश्यक आहे. या अनुषंगाने यासाठी  महानगरपालिका, नगरपालिका आणि समाजकल्याण विभागाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाभार्थींची यादी संकलित करावी. दिव्यांग व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. विटा, इस्लामपूर आणि कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगासाठी प्रमाणपत्र देण्याबाबत तपासणीची सोय करण्याबाबत डॉ. खाडे यांनी या बैठकीत सूचिते केले.

अर्जदाराचे सर्व बाबींपासूनचे उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र अर्जदारांना लाभ देण्यात येणार आहे.

 बैठकीत दिव्यांग घरकुल योजनेबाबतही चर्चा करण्यात आली. दिव्यांग घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्रति लाभार्थी एक लाख 20 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी किमान 40 टक्के दिव्यांगत्व आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या 5 टक्के स्वीय निधीमधून तरतूद करण्यात आली आहे. यामधून दिव्यांग घरकुल योजना, दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शिबिर व मेळाव्याचे आयोजन यासह वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना राबवण्यात येणार आहेत. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

000

आरसेटी संस्थेतून महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण

एक स्री खूप चांगली व्यवस्थापक असते. एका वेळी ती अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करत असते. ज्यांना स्वावलंबी व्हायची आस आहे, त्यांच्यासाठी आर सेटी खास आहे. कारण ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भर बनाव्यात,  त्यांची स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने बँक ऑफ इंडियाच्यावतीने स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण  संस्थेच्या (RSETI) वतीने मातृभाषेतून व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. या आर सेटीमधून प्रशिक्षण घेऊन कित्येक महिलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर सेटी ही 2010 साली स्थापन झाली आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत व त्या जिल्ह्यातील अग्रणी बँकेद्वारे संचलित एक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्यांचे वय वर्ष १८ ते ४५ आहे आणि ज्यांना मातृभाषेचे ज्ञान आहे, अशा ग्रामीण भागातील व्यक्तिंना प्रायोजित प्रशिक्षण दिले जाते. संस्थेमधून दिली जाणारी प्रशिक्षणे ही निवासी व मोफत स्वरूपाची असतात. प्रशिक्षणा दरम्यान चहा, नाष्टा, जेवण, निवासाची सोय, प्रात्यक्षिकसाठी लागणारे सर्व साहित्य हे सर्व मोफत पुरवले जाते.

प्रशिक्षणार्थींची निवड करताना प्रथम संस्थेकडील प्रशिक्षण अभ्यासक्रमांची जनजागृती करुन प्रशिक्षणार्थींची निवड मुलखतीद्वारे केली जाते. यासाठी प्रशिक्षणार्थींना आवश्यक कागदपत्रके, दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म तारखेचा कागदोपत्री पुरावा, 2 पासपोर्ट साईज फोटो, दारिद्र्यरेषेखाली असल्यास त्याचा कागदोपत्री पुरावा इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात.

अशा प्रकारच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमामधून प्रशिक्षण घेऊन महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. या संस्थेमार्फत दिली जाणारी प्रशिक्षणे ही उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी अल्पकालीन प्रशिक्षण व दीर्घकालिन स्वावलंबन असतात.

संस्थेमध्ये महिला वर्गासाठी काही विशेष प्रशिक्षणे आहेत. कुक्कुटपालन, खेळणी बनवणे, अगरबत्ती तयार करणे, फास्ट फूड उद्यमी, महिलांसाठी वस्त्रलंकार रचना, पापड लोणचे मसाला पावडर तयार करणे, कागदी पिशव्या लखोटे व फाईल तयार करणे, मधमाशी पालन, कॉस्च्युम ज्वेलरी उद्यमी, जूट बॅग उद्यमी, बांबू हस्तकलाकुसर, ब्युटीपार्लर मॅनेजमेंट, रेशीम कोश उत्पादन, दुग्धव्ययसाय गांडूळ शेती, भाजीपाला रोपवाटिका शेती, व्यायसायिक फूलशेती इत्यादी प्रशिक्षणे संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. या प्रशिक्षणामध्ये काही प्रशिक्षणे ही 10 दिवसांची तर काही प्रशिक्षणे 30 दिवसांची तसेच अल्पकालिन प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमातून परिपूर्ण व्यावसायिक ज्ञान व प्रात्यक्षिके, बाजारपेठ निरीक्षण व व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून आत्मविश्वासामध्ये वाढ, विविध शासकीय योजना व प्रकल्प अहवालविषयक माहिती दिली जाते. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी मदत केली जाते.

प्रशिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून सप्टेंबर २०२३ अखेर २४४ प्रशिक्षण कार्यक्रम घेतले असून त्यातून ६ हजार, ८५४ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये ५ हजार ७९९ इतक्या महिला आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमातून ५ हजार, १०६ इतकी स्वयंरोजगार निर्मिती झाली असून यामध्ये महिलांचा समावेश ४ हजार, २९१ इतका आहे.

 ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत व बँक ऑफ इंडिया सांगली संचलित स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे (RSETI) हे प्रशिक्षण केंद्र, डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालयच्या पाठीमागे, रमा उद्यान शेजारी मिरज, (०२३३-२९९००३७) येथे कार्यरत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत RSETI संस्थेस भेट द्यावी. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयोग यशस्वी होत आहेत.

 संकलन

जिल्हा माहिती कार्यालय,

सांगली

जिल्हा क्रीडा संकुलात सुविधांसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) :  जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा व खेळाडुंसाठी  आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यासंदर्भात आवश्यक निधीचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा. निधी उपलब्धतेसाठी  पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व  राजेसाहेब लोंढे आदि उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलमधे  करण्यात येणाऱ्या विविध कामांबाबत चर्चा करून त्यास मान्यता देण्यात आली. क्रीडा संकुलात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडु निर्माण व्हावेत, यासाठी करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.

या बैठकीत  जिल्हा क्रीडा संकुल येथे 400 मीटर सिंथेटिक धावण मार्ग, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव दुरुस्ती, कबड्डी व खो-खोसाठी डोम, अद्ययावत व्यायामशाळा, खो-खो, व्हॉलिबॉल या खेळाची मैदाने, क्रीडा साहित्य खरेदी, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे आदिंसह अन्य कामांवर चर्चा करण्यात आली.

000

सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन कटीबध्द – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

जालना, दि. 20 (जिमाका) :-   समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबध्द आहे.  गोरगरीबांच्या कल्याणाकरीता शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत, या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्याचा प्रत्यक्ष लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जातो, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

तर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती  व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना प्राधान्याने दिला जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

मेरी माटी, मेरा देश, अमृत कलश यात्रेचे उदघाटन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना लाभार्थींच्या मेळाव्याचे  आज बदनापूर येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. दानवे तर उदघाटक म्हणून श्री. सावे यांच्यासह आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, तहसिलदार सुमन मोरे, गट विकास अधिकारी ज्योती राठोड आदी उपस्थित होते.

श्री. दानवे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात मेरी माटी, मेरा देश हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत देशातील प्रत्येक गावांतून माती जमा केली  जात आहे. ही माती दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या शहीदांच्या स्मारकासाठी उपयोगात आणली जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलीदान दिले आहे, त्यांचे स्मरण आजच्या पिढीला व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असावा.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट तळागाळातील लोकांना व्हावा, हा उद्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आहे, असे सांगून श्री. दानवे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरु केल्या. योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावे, यासाठी जनधन योजना सुरु केली. गरीबांसाठी उज्ज्वला गॅस, प्रत्येकाच्या घरात शौचालय, मोफत धान्य यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळावा, याकरीता नुकतीच विश्वकर्मा योजना सुरु करण्यात आली आहे. सर्वसामन्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम संपूर्ण भारतात राबविण्यात आला. याचा समारोपीय कार्यक्रम म्हणून केंद्र शासन मेरी माटी, मेरा देश अभियान राबवित आहे. यामध्ये प्रत्येक गाव, शहरातील ग्रामस्थ व नागरिकांना आपल्या मातीविषयी जाणीव  निर्माण व्हावी, तसेच स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आहुती दिली त्यांचे स्मरण व्हावे, या उद्देशाने आपले गाव व शहरातील जमा करण्यात आलेली माती दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या शहीदांच्या स्मारकासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमात लोकांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे.

पालकमंत्री  श्री. सावे पुढे म्हणाले की, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत बदनापूर तालुक्यातील 2 हजार 61 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मान्य झाले असून त्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल 1 हजार 51 लाभार्थ्यांना रुपये 15 हजाराचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच निधी वितरीत करण्यात येईल. या लाभार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, ज्यांना लाभ मिळाला आहे, त्यांनी आपल्या घराचे काम तात्काळ सुरु करावे.

राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्यावतीने ओबीसी समाजासाठी मोदी आवास योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत, असे सांगून श्री. सावे म्हणाले की, राज्यातील 36 जिल्हयात ओबीसी समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुला व मुलींसाठी 72 होस्टेल बांधण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. पालकांनी प्राधान्याने मुलींना शिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार नारायण कुचे म्हणाले की, घरकुलापासून सर्वसामान्य व्यक्ती वंचित राहू नये म्हणून शासन घरकुलाच्या विविध योजना राबवित आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतंर्गत बदनापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी 27 कोटी इतका निधी मंजूर केला आहे, याबद्दल शासनाचे आभार. ज्या लाभार्थ्यांना निधी मिळला आहे, त्यांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, शासनाच्या घरकुलाच्या विविध योजना जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. घरकुलाचे दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. सर्वसामान्यांना घरकुल सहजपणे बांधता यावे, यासाठी प्रयत्न केला जाईल.

कार्यक्रमानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून अनुदान वितरीत करण्यात आले.  प्रारंभी मेरी माटी, मेरा देश अंतर्गत बदनापूर तालुक्यातील सर्व गावातून जमा करुन आणलेल्या मातीच्या कलाशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय, गायन, भाषण सादर केले. कार्यक्रमास मोठया संख्येने विद्यार्थी, ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेमधील कामे सर्व यंत्रणांनी विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सन 2022-23 मध्ये अमरावती जिल्ह्याने 100 टक्के खर्च केलेला आहे. अशाच तऱ्हेने सन 2023-24 मध्येही सर्व यंत्रणांकडून कामे विविध कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिले.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजना 2022-23 तसेच सन 2023-24 आणि अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 तसेच 2023-24 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा घेतला. पालकमंत्री यांनी बैठकीच्या सुरुवातीला शारदेय नवरात्रोत्सवाच्या सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच नवरात्री दरम्यान कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. यानंतर बैठकीला उपस्थित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्रमुखांकडून जिल्हा वार्षिक योजनेच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी तथा धारणी प्रकल्प अधिकारी रिचर्ड यान्थन, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अर्थसंकल्पातील तरतूद 350 कोटी रुपयांची आहे. माहे मार्च 2023 अखेरपर्यंत 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद 101.20 कोटी एवढी असून माहे मार्च 2023 अखेर पर्यंत 101.18 कोटी खर्च करण्यात आले आहे. याशिवाय आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र (टीएसपी, ओटीएसपी, माडा मिनीमाडा) यामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद 96.55 कोटी आहे. माहे मार्च 2023 अखेरपर्यंत यामध्ये 96.54 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सन 2022-23 मध्ये अमरावती जिल्ह्याने 100 टक्के खर्च केलेला आहे. अशाच तऱ्हेने सन 2023-24 मध्येही सर्व यंत्रणांकडून काम विविध कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)2023-24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार 395.00 कोटी रुपयांची तरतूद आहे. सन 2022-23 च्या कामांचे दायित्व 38.69 कोटी एवढे आहे. यासाठी प्राप्त तरतूद 276.58 कोटी एवढी आहे. विहित मुदतीत 100 टक्के निधी मार्च 2024 अखेरीस खर्ची पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी प्रयत्न करावे. तसेच जिल्हा परिषदस्तर व नगर विकास विभागाकडील यंत्रणांना सन 2022-23 मध्ये वितरित केलेला निधी माहे मार्च 2024 अखेर पर्यंत खर्च करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

जिल्हा नियोजनातील कामे करताना सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करताना कामांची निकड लोकप्रतिनीधींनी दिलेल्या शिफारशी, सूचना तसेच सामान्य जनतेच्या मागण्यांना महत्त्व देऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन प्रस्ताव सादर करावे. तसेच सर्व यंत्रणांनी कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. तसेच मंजूर कामे दर्जेदार व्हावी यासाठी उपाययोजना करव्यात. ज्या यंत्रणांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. आगामी काळातील आचारसंहिता विचारात घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन निधी मार्च 2024 पूर्वी खर्ची पडेल असे नियोजन करण्याच्या यंत्रणांना सूचना दिल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्री अंबा व श्री एकविरा देवीचे दर्शन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील हे आज अमरावती दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी नवरात्रीच्या पावन पर्वावर विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. श्री अंबादेवी संस्थाच्यावतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे-पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री अंबादेवी संस्थानाचे अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव ॲड. दीपक श्रीमाळी, रवींद्र कर्वे, विश्वस्त विलास मराठे, दिपा खेडेकर, मिना पाठक, किशोर बेंद्रे, ॲड. राजेंद्र पांडे, सुरेंद्र भुरंगे, अशोक खंडेलवाल यांनी तर श्री एकविरा देवी संस्थानाचे अध्यक्ष डॉ. अमित खरया, सचिव चंद्रशेखर कुळकर्णी, विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी पालकमंत्र्याचा यावेळी सत्कार केला.

ताज्या बातम्या

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...