बुधवार, मे 28, 2025
Home Blog Page 1112

पुढच्या पिढीसाठी ‘पाणीदार’ बना ; जलजीवन मिशन चे शिल्पकार बना ! – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक 18 ऑगस्ट 2023 (जिमाका वृत्त) पाणी हे अत्यावश्यक बाब आहे. दुर्गम भागात मैलोमैल चालून घरातल्या माता, भगीनी, मुली पाणी आणतात, हे विदारक सत्य पुढच्या पिढ्यांसाठी बदलायचे असेल तर ‘पाणीदार’ बना ; जलजीवन मिशन चे ‘शिल्पकार’ बना, अशी भावनिक साद  राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी घातली आहे.

ते जलजीवन मिशन च्या कामांसंदर्भात नंदुरबार तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंचांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार, प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार, तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार पं.स. गटविकास अधिकारी जयवंत उगले, नंदुरबार तालुक्यातील गावांचे सरपंच व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ही योजना मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. त्यानंतर भविष्यकालिन नियोजनावर अधारित अशी एखादी पाणी योजना यायला 30 वर्षे वाट पहावी लागेल. भविष्यातील 30 वर्षे वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या दूरदृष्टिकोणातून ही पाणी योजना पेयजल व दैनंदिन वापरासाठी बनविण्यात आली आहे. दर मानसी लागणाऱ्या पाण्याचेही सुक्ष्म नियोजन यात आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जलजीवन मिशन च्या कामात भरीव प्रगती दिसणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी वेळेवेळी भेटी द्याव्यात. कामकाजात कुचराई/हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, प्रसंगी आजच नोटीस देण्यात याव्यात. एकही गाव, वस्ती, पाडा आणि नागरिक वंचित राहणार नाही, यासाठी नियोजनासोबतच समन्वय राखावा, असेही निर्देश पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिले आहेत.

योजना परिपूर्ण होण्यासाठी त्रुटींचे निराकरण करा – डॉ. हिना गावित

जलजीवन मिशन च्या कामात काही त्रुटी असल्यास गावातील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक यांनी वेळीच निदर्शनास आणून दिल्यास त्याचे निराकरण करून योजना परिपूर्ण होण्यासाठी मदत होईल. तसेच या योजनेच्या नियोजनात परिसरातील शाळा, आश्रमशाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र सार्वजनिक कार्यालये यांना लागणाऱ्या पाण्याचेही नियोजन करावे, असे आवाहन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.

 

लक्षणीय…

 

???? जलजीवन मिशनच्या कामांसाठी प्रथमच संरपंच व ग्रामसेवकांशी थेट संवाद

 

???? जलजीवन मिशन ची कामे 2024 पर्यंत पूर्ण करावित.

 

????  कामात कुचराई करणारे अधिकारी व वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार.

 

????  नियोजनासोबत समन्वयाचीही गरज.

 

????  योजनेतील त्रुटी ग्रामस्थ, सरपंच व ग्रामसेवकांनी सांगितल्यास योजना परिपूर्ण करण्यासाठी तात्काळ निराकरण करणार.

 

????  शाळा, आश्रमशाळा, आरोग्य केंद्र व सार्वजनिक कार्यालयांचाही असेल योजनेच्या नियोजनात समावेश.

स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, स्वातंत्र्याच्या लढाईत ज्या महान व्यक्तींनी आपले योगदान दिले. त्यांचे जीवनचरित्र तरुणपिढीने जाणून घेणे आवश्यक आहे. असेच व्यक्तीमत्व ज्यांनी कुष्ठरोग्यांचा सेवेसाठी आपले आयुष्य वाहून दिले, ते म्हणजे पद्मश्री शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन होय. अमरावतीत कुष्ठरोग्यांचे सेवाधाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन’ चे ते संस्थापक होय. त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा मागोवा  घेणारा हा लेख…

 

स्वातंत्र्यसेनानी डॉ. शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांचा जन्म २५ डिसेंबर १९९२ ला कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील जमखंडी या संस्थेतील आसंगी या छोट्याशा गावी झाला. बालवयातच आई वडीलांचे छत्र हरविले. त्यानंतर त्यांच्यापेक्षा मोठ्या बहिणींनी कै. बहिणाक्का जोशी यांनी त्यांचे संगोपन केले.  हुशार व तल्लख बुध्दीमत्ता असलेल्या शिवाजीरावांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यात झाले. शालेय जीवनात टिळकांच्या भाषणांनी त्यांच्यावर संस्कार केले. पुढे कलकत्यावरून त्यांनी होमिओपॅथीची पदवी संपादीत केली. कलकत्त्यात असताना रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी ते चांगलेच प्रभावित झाले होते. विवेकानंदांच्या विचारांचे प्रतीक म्हणून त्यांनी भगवा फेटा बांधायला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत तो फेटा त्यांच्या डोक्यावर होता. काही काळ गोरगरीबांच्या उध्दारासाठी कार्य करणाऱ्या अलाहबादच्या रामकृष्ण मिशनमध्ये त्यांनी सेवा दिली.

नंतरच्या काळात सन १९१७ मध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने ते अमरावतीला आले.  आणि याच परिसरात त्यांचे कार्य उभे राहिले. दादासाहेब खापर्डे यांच्या मध्यस्तीने नागपूरचे महान थिऑसाफिस्ट अप्पासाहेब मराठे यांच्या कन्या पार्वतीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि अमरावतीवासियांसाठी ते दाजीसाहेब झाले. शिवाजीराव आणि पार्वतीबाई पटवर्धन यांचे जीवन म्हणजे धगधगते यज्ञकुंड होते. १९१८ साली अमरावती शहरात प्लेगच्या महामारीने थैमान घातले होते. प्रेतांचा खच पडू लागला. सगळे अमरावती शहर भयग्रस्त झाले. शासकीय यंत्रणा सुन्न आणि उदासीन होती. याचप्रसंगी त्यांनी वैद्यकीय सेवेचा विडा उचलला. या काळात दाजीसाहेबांनी कोणतेही शुल्क न आकारता व औषधांचाही खर्च न घेता घरोघरी फिरुन रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. त्यांच्या या कार्यामुळे ते संपूर्ण विदर्भात लोकप्रिय झाले.

स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यात सहभागी

तो काळ टिळक युगाच्या समाप्तीच्या आणि (१ ऑगस्ट १९२० ला टिळकांच्या मृत्यू) गांधी युगाच्या उदयाचा होता. गांधी विचाराने भारावून जात त्यांनी स्वातंत्र्य लढाईत सक्रीय भाग घेतला. २४ जानेवारी १९२० ला दारुच्या मक्त्याला जाहीर विरोध, ७ जुलै १९२१ ला परदेशी कपड्यांवर बहिष्कार, स्वदेशी कपड्यांचा वापर या गांधीजींच्या आदेशानुसार जाहिर सभेतून निषेध नोंदवून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १० मार्च १९२१ साली महात्मा गांधी अमरावतीला आले असताना, डॉ. पटवर्धनांकडेच थांबले होते. यावेळी महात्मांजींबरोबर दाजीसाहेबांचा सर्व कार्यक्रमात अग्रणी सहभाग होता. यावेळी गांधीजीच्या दिलेल्या हिंदी भाषणाच्या मराठीत अनुवाद पार्वतीबाईंनीच केला होता.

देशबंधू चित्तरंजनदास, वीर वामनराव जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. २१ डिसेंबर १९२६ रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी दोन तासांकरीता महात्मा गांधी अमरावतीला आहे होते. या कार्यक्रमासाठी दाजीसाहेबांनी स्वत: महात्मा गांधी यांना आमंत्रित केले होते. यानिमित्त गांधीजींच्या एक वर्षांच्या मौन व्रतानंतर त्यांचे भाषण ऐकण्याची संधी अमरावतीकरांना लाभली होती. दाजीसाहेबांना महात्मा गांधीबद्दल फार आदर होता व ते महात्माजींचे चांगले परिचयाचे झाले होते.

सन १९३० मध्ये सुरुवातीला सुभाषचंद्र बोस व इतर ११ बंगाली देशभक्तांना एक वर्षाची शिक्षा देण्यात येऊन ब्रिटीशांच्या दडपशाहीला सुरुवात झाली. या दडपशाहीविरुध्द दादासाहेबांनी गावोगावी जाऊन भाषणे केलीत, लोकांना जागृत केले. ६ एप्रिल १९३० जालीयनवाला बाग स्मृती प्रित्यर्थ सुरु करण्यात हरताळ /आंदोलन सप्ताहात दाजीसाहेब आघाडीवर होते. रोज प्रचारसभा, जनजागरण सभा घेवून त्याविरुध्द कडकडीत हरताळ पाडण्याचे आवाहन त्यांनी जनमानसांना केले. १९३० ला महात्मा गांधीना अटक झाल्यानंतर इकडे वऱ्हाडात वीर वामनराव जोशी यांनाही अटक होवून दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. या सरकारच्या दडपशाहीविरुध्द त्यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसोबत अमरावती शहरात संपूर्ण हरताळ पाळला. त्यांनी जाहीर सभा घेवून सरकारच्या या कृतींचा कडाडून भाषणातून निषेध नोंदविला. स्फुर्तीदायी व्याख्यानांनी जागृती केल्याबद्दल तसेच स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवल्याबद्दल डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांना १५ जून १९३० ला आणि १२ जुलै १९३० ला असे दोनवेळा अटक करुन तरुंगात पाठविण्यात आले. पटवर्धन दांपत्य तुरुंगवासात असताना त्यांची लहान मुलगी गंभीर आजारी पडली. मुलीचे वडील डॉक्टर, पण तेही तुरुंगात होते. पटवर्धनांना ब्रिटीशांनी अट घातली की, सत्याग्रहात भाग घेणार नाही, असे लिहून द्या तुम्हाला सोडण्यात येईल, पण दाजीसाहेबांनी ठणकावून सांगितले की, ‘देशापेक्षा मला मुलगी मोठी नाही’ पुढच्या काही दिवसांत मुलीचे निधन झाले.

 

कुष्ठरोगाच्या रुग्णांची सेवा

तुरुंगवासात असताना त्यांचे लक्ष कुष्ठरोग झालेल्या एका कैद्याकडे गेले. पुढे जाऊन कोणीही त्यास शिवण्याचे धाडस करत नव्हते. त्याला अन्न-पाणी सुध्दा लांबूनच दिल्या जाई. त्याचा सुकलेला चेहरा व हातापायांना जखमा होत्या, त्यातून पू वाहून दुर्गंधी येत होती. त्याच्या या वेदना पाहून डॉ. पटवर्धन कळवळले, त्यांनी त्या क्षणापासूनच त्या रोग्याची सेवा करायला सुरुवात केली. पुढे एकदा शहरातील जवाहर गेटजवळ एक कुष्ठरोगी त्यांना रस्त्यावर बसून भीक मागत असलेला आढळून आला. अंगावर जखमा, हातपायांची बोटे झडलेली, विद्रुप चेहरा अशा अवतारात तो भीक मागत होता. त्याचदिवशी त्यांना असे कळले की, त्या भिकाऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विहिरीतून वास येऊ लागला. पण मृतदेह बाहेर काढयास कुणीही तयार नव्हते. लोकांनी मागणी करुन ती विहीर नगरपालिकेला बुजवायला लावली. याचा शिवाजीरावांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी उर्वरित आयुष्यात कुष्ठरोग्यांची सेवा हेच आपले ध्येय ठरविले.

नंतरच्या काळात डॉ. भोजराज यांच्यासोबत वरुडला व्याख्यानासाठी जात असताना रस्त्यात बेवारस मरुन पडलेल्या कुष्ठरोग्याचे हाल त्यांनी पाहीले. कुत्रे त्याच्या प्रेताचे लचके तोडत होते आणि लोक निर्विकारपणे त्याकडे पाहत होते. या सगळ्या घटनांचा डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी कुष्ठ निर्मुलनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले.

शिवनी जबलपूर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दाजीसाहेबांनी महात्मा गांधीजीची भेट घेतली असता, गांधीजी म्हणाले देशाचे स्वातंत्र्य निश्चित आहे. पण देशाला भूक निवारण, स्वयंरोजगार, कुष्ठरोग निर्मुलन अशा भीषण समस्यांना तोड द्यावे लागणार आहे. हे माझे अपूर्ण राहिलेले कार्य तुम्ही करावे, असे मला वाटते.  गांधीजींशी बोलल्यानंतर दाजीसाहेबांच्या कार्याची दिशा पक्की झाली आणि त्यांनी कुष्ठ निर्मुलनांचे कार्य अविरत करण्याच्या मनाशी पक्का निर्धार केला.

कुष्ठ रोग्यांवर उपचार करण्यासाठी कुष्ठधाम उभारण्यासाठी आवश्यक जागेचा सर्वात मोठा प्रश्न होता. अमरावती शहराच्या आजूबाजूच्या परिसरात जागेचा शोध घेण्यास सुरुवात झाली. शहराच्या पूर्वेस ५ किमीवर मोकळी व पडीक जमीन त्यांच्या नजरेस पडली. जुगलकिशोर जयस्वाल हे त्या जमीनीचे मालक होते. दाजीसाहेब तुरुंगात असताना जुगुलकिशोर यांचा मुलगा आजारी पडला होता. अमरावतीमधील तज्ज्ञ व नामवंत डॉक्टरांनी उपचार केले तरी मुलगा दुरुस्त होईना. शेवटी जुगुलकिशोर हताश होवून दाजीसाहेबांना तुरुंगात भेटायला गेले व आपल्या मुलाच्या आजाराची माहिती दिली. दाजीसाहेबांनी ऐकीव माहितीच्या आधारे आजाराच्या लक्षणांचा अंदाज घेवून औषधी लिहून देऊन उपचार केलेत. त्या आजारातून मुलगा पूर्ण बरा झाला. मुलाचे प्राण वाचविल्यामुळे दानशुर जुगुलकिशोर यांनी आपली ८० एकर पडीक जमीन कुष्ठधामासाठी दिली. दाजीसाहेबांच्या जागेची नड लक्षात घेता सुखप्पा प्रेमलवार व लालाशाम या सेवाभावी वृत्तीच्या नागरिकांनीही आपली जमीन स्वयंस्फुर्तीने दाजीसाहेबांना देणगी म्हणून दिली. दाजीसाहेबांना आनंद झाला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली.

‘तपोवन’ची स्थापना

26 सप्टेंबर 1946 या घटस्थापनेच्या दिवशी श्री. जगदंबा कुष्ठनिवास, तपोवन या संस्थेची आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तपोवनमध्ये भजन झाले. त्याप्रसंगी दाजीसाहेबांचे या माळरानांत पहिले भाषण झाले. आज याठिकाणी वीस झोपडया उभ्या आहेत. उद्या या माळरानाचे नंदनवनात रुपांतर नक्कीच होईल. त्यादिवशी दाजीसाहेबांनी तपोवनातच मुक्काम केला. कृष्ठरोग्यांशी चर्चा केली. त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांना दिलासा दिला. स्वाभिमानाने जगण्याचा सल्ला देवून जगण्याची उमेद कुष्ठरुग्णांत निर्माण केली.

याच सुमारास 15 ऑगस्ट, 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. अखंड भारताची इंग्रजांनी धार्मिकतेच्या आधारावर भारत आणि पाकिस्तान अशी देशाची फाळणी घडवून आणली. त्यानंतर जातीय दंगली जोर धरु लागल्या. निर्वासितांचे लोंढे भारतात येवू लागले. 1 जुलै, 1950 ला मध्य प्रातांचे राज्यपाल मंगलदास पक्कास यांच्या हस्ते संस्थेचे रितसर उद्घाटन होऊन ती ‘विदर्भ महायोगी सेवामंडळ’ या नावाने पुढे नावारुपास आली. गाडगेबाबांनी 1954 साली तपोवनमध्ये येऊन साफसफाई केली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेकांचे पाय या भूमीला सतत लागत राहीले.

डॉ. पटवर्धन यांचे काम आणि सेवाभावी वृत्तीशी डॉ. राजेंद्र प्रसाद परिचयाचे होते. त्यामुळे या कामाचा सन्मान म्हणून 1959 साली आग्रह करुन डॉ. पटवर्धन यांना पद्मश्री हा सन्मान स्विकारायला लावला.

दाजीसाहेब हे ध्येनिष्ठ, देशाभिमानी, कडक शिस्तीचे होते. समाजातील इतर नागरिकांप्रमाणे कुष्ठरुणांना मान-सन्मान मिळावा, कुष्ठरोगी स्वावलंबी व्हावेत यासाठी ते सतत झटत.  आजही ‘तपोवन’ च्या कार्यकारणीवर त्यांच्या घरातील कोणी नाही. त्यांच्या पुढच्या पिढीने आपले कार्य इतर क्षेत्रात उभे केले. तपोवनमधून बाहेर पडताना पार्वतीबाईंचे एक वाक्य नजरेस पडले आणि पुन्हा आठवण राहते. ‘आयुष्यभर फक्त एकच केले, स्नेह सहकार्याची ज्योत अखंड तेवत ठेवली, आता देणं घेणं सारं संपंल आहे. मागणं एकच आहे. अनाथ अपंगाकरिता थोडा उजेड ठेवा.’

संस्थेकडे आज बाराशे ते तेराशे एकर जमीन आहे. डॉ. शिवाजीराव पटवर्धन व पार्वतीबाई यांच्या त्यागातून हे कार्य उभे राहीले. या कार्यासाठी अनेक पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले आणि पटवर्धनांनी ते नम्रपणे नाकारले. विद्यापीठाची डिलीट स्विकारली नाही. पुण्याचा टिळक पुरस्कार स्विकारला नाही. सगळ्या पुरस्कारांपलीकडे ते होते. कुष्ठरुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य जगातील सकळ्या पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे,  असे ते म्हणत. त्यांच्या कार्यरुपाने सतत नव्या पिढीला प्रेरणा मिळत असते. अशाच लोकोत्तर, ध्येयनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, सेवाभावी तपस्वी दाजीसाहेबांना कोटी कोटी प्रणाम…

विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती

प्रबोधनाचा समृद्ध वारसा

           भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना आपण मागे वळून पाहिल्यास आपणाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यावेळेच्या संपूर्ण पिढीने स्वत:ला वाहुन घेतले होते. त्यामध्ये संत-महंतांचाही मोलाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शन व प्रबोधनाने स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावी होत गेला होता. त्याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याविषयी ही माहिती….

 

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात अनेक संत-महंतांच्या कार्याचा, प्रबोधनाचा वारसा आपल्या देशाच्या सर्वसामान्य जनतेला मिळाला आहे. त्यापैकी एक होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान अमूल्य आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक 11 मे 1909 रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु  श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निघुन गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.

इ.स.1925 मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. 28 ऑगष्ट 1942 रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेंबर मध्ये सुटका झाली. 1943 मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला. 5 एप्रिल 1943 रोजी श्री गुरुदेव मुद्रणालयाची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोहेंबर 1943 रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. सर्वांसाठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा।  भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे।”

संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचावं?’ हे त्यांच्या ‘ग्रामगीते’च्या चाळिसाव्या अध्यायात सांगितलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ‘ग्रंथाध्ययन.

सामान्य माणसानं चांगलं जीवन कसं जगावं, याचं प्रतिपादन ज्या ग्रंथात केलं आहे, ते वाचावेत. फार अवजड तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारे ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त असले, तरी सामान्य माणसांसाठी त्यांचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्या प्रकारचं जीवन जगतो, त्यासाठी उपयुक्त असे ग्रंथच वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो, त्याचं मर्म आपल्याला कळायला हवं. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मन:शांतीही मिळते. योग्य वाचन केल्यानं असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठीच नसतं, तर सध्याचं जीवन जगण्यासाठीही आवश्यक असतं.

संत तुकडोजींचे कार्य

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणतांना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.

जनजागृतीचा जागर

ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.  प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा, वाईटरूढी, व्यसने यांचा त्याग करा. अश्या आशयाचे थोडावेळ भाषण केले की, हातातील खन्जरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होवून जाई. सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले. व त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी या नावाने संबोधू लागले.       ‘ग्रामगीता’ लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजाविले. भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्रार्थना करावी.  सर्वांशी प्रेमाने वागाव. गोवंश बंदी व पशु संर्वधन करावे हे शिकविले.

चीन युद्ध (1962) व पाकीस्तान युद्ध (1965) झाले तेव्हा सैन्यास धीर देण्यासाठी महाराजांनी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गाईली, व सैन्याचे धैर्य वाढविले. ते फ़ार प्रयत्नवादी होते. तन,मन,धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले. दिनांक 11 आक्टोंबर 1968 रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रम्हलीन झाले. त्यांचे चरणी आपले शत: शत: प्रणाम.

  • विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती

मेरी माटी मेरा देश : सन्मान शूरवीरांचा

 

 

देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी  “मेरी माटी मेरा देश” ही मोहिम देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची ही संक्षिप्त माहिती…

 

देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) बसवण्यात येणार आहेत. अमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत माती आणली जाणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच त्यांच्या “मन की बात” प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेची घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमृत सरोवरांजवळील ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील. माहिती आणि प्रसारण तसेच दूरसंचार विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा, सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन आणि युवा व्यवहार सचिव मीता राजीवलोचन यांनी नवी दिल्लीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी देखील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना अपूर्व चंद्रा म्हणाले की, ‘मेरी माटी मेरा देश ‘ हा भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम असेल. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या “हर घर तिरंगा” या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ हा आणखी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.
शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे , मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे “मेरी माटी मेरा देश” या मोहिमेचे प्रमुख घटक असल्याचे अपूर्व चंद्रा यांनी स्पष्ट केले. मेरी माटी मेरा देश या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या वर्षीही हर घर तिरंगा अभियान आयोजित केले जाईल या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आणि ती देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात माध्यमांची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली.
सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी आपल्या सादरीकरणात माहिती देताना सांगितले की या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी तसेच पंच प्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम सादर केले जातील. वीरहृदयांची गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील  स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन  करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या भागातील ज्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावांबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहीम १२ मार्च २०२१ रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विशेष आयोजनाच्या समारोपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतभरात २ लाखाहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशभरातील जनतेने यात व्यापक लोकसहभाग नोंदवला आहे, अशी माहिती गोविंद मोहन यांनी दिली. ९ ते ३० ऑगस्ट,२०२३ दरम्यान, ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतिक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील, असे या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना सांस्कृतिक सचिवांनी सांगितले. या कृतीतून लोक भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे यावर लक्ष केंद्रित करून पंच प्राणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. गेल्या वर्षी सर्वांच्या सहभागामुळे “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वी झाला होता. या वर्षी देखील, १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. भारतीय सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवू शकतात आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करू शकतात.

या देशव्यापी मोहिमेचा तपशील https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर पाहता येईल, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव मीता राजीवलोचन यांनी दिली. पोर्टलवर ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती असून, तरूण या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रमही अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सहभागी होऊ शकतात.  युवक-युवतींनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होण्याचे तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मीता राजीवलोचन यांनी केले. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीच्या इतर डिजिटल व्यासपीठाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेच्या प्रसारमाध्यमांवरच्या प्रसारणाची माहिती दिली.
‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार आहे. त्यानंतरचे कार्यक्रम १६ ऑगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका/ नगरपरिषद आणि राज्य स्तरावर होतील. ३० ऑगस्ट २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ,नवी दिल्ली येथे समारोप समारंभ होणार आहे.

 

विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती.

000

शेतकऱ्यांनी पायाभूत सुविधांचा उपयोग उन्नतीसाठी करावा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

बुलडाणा, दि. 18 : विदर्भातील जिल्ह्यात उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच शेततळे, नाला खोलीकरणातून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता करून देण्यात येत आहे. शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांचा उपयोग करून शेतकऱ्यांनी स्वतःची उन्नती करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

श्री. गडकरी यांच्या हस्ते आज मलकापूर येथे नांदुरा ते चिखली या 800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या 45 किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार वसंत खंडेलवाल, राजेश एकडे, संजय कुटे, श्वेता महाले, आकाश फुंडकर यांच्यासह चैनसुख संचेती, उमा तायडे, विजयराज शिंदे आदी उपस्थित होते

श्री. गडकरी म्हणाले, गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 81 किलोमीटर वरून 353 किलोमीटरवर गेला आहे. ही कामे करताना नदी, नाले, शेततळे खोदून करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचे रस्ते तयार होत असतानाच यातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाची सोय निर्माण झाली. यात उपलब्ध पाणी शेतीसाठी देण्यात येत आहे. जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी जिगाव प्रकल्पाला सहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहे. सिंचनाची छोटी छोटी कामे हाती घेऊन जिल्ह्याची सिंचन क्षमता 70 टक्क्यांवर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट रस्ते, पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास शेतकरी समृद्ध होईल. शेतीतील उत्पन्न वाढावे यासाठी चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. खारपाण पट्ट्यात तलाव बांधून यात खाऱ्या पाण्यातील झिंग्याचे उत्पन्न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्राप्तीमध्ये चांगली वाढ होण्यास मदत होईल. स्मार्ट शहर होण्यासोबतच स्मार्ट खेडीही निर्माण होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा विकास झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही. शेतकऱ्यांनी बायोडिझेलच्या उत्पादनाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न होता आता ऊर्जादाता होणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने नॅनो एरिया उपलब्ध करून दिल्यामुळे उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. येत्या काळात प्रत्येक गावात चार ड्रोन देऊन त्याद्वारे फवारणी होणार आहे. यामुळे पिकांना परिणामकारक होत देणे शक्य होणार आहे.

यावेळी श्री. गडकरी यांनी शेगाव ते संग्रामपूर, संग्रामपूर ते मध्य प्रदेश सीमा, जळगाव जामोद ते पाळधी या 1700 कोटी रुपयांच्या कामांची घोषणा केली.

ग्रामपंचायत क्षेत्रातील आपले सेवा केंद्र त्वरित कार्यान्वित करा – कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई, दि. 18 :- कोकण विभागातल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बंद असलेली ‘आपले सरकार सेवा केंद्र’ तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावे आणि इतर सर्व योजनांच्या प्रगतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्ष रहावे. सर्व योजनांना शासनाकडून देण्यात आलेले आर्थिक व भौतिक लक्षांक साध्य करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज दिल्या.

कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाच्या बैठक कक्षात डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षते खाली कोकण विभागातील जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर  उपस्थित होते.

बैठकीत माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या थीममध्ये करावयाच्या कामांबाबत आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना, जल जिवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला व बाल विकास विभागाच्या योजना, ग्रामपंचायत विभागाकडील योजना, समाजकल्याण विभागाकडील योजना इ. योजनांचा आयुक्तांनी आढावा घेतला.

यावेळी सर्व जिल्हयांमार्फत आपल्या कार्यक्षेत्रात माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत माहे जुन व जुलै, २०२३ दरम्यान केलेली कामे व माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2023 मध्ये करावयाच्या कामांबाबत सादरीकरण करण्यात आले.

घरकुल योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमिन उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडया व शाळा यांना भेटी देऊन क्षेत्रिय कामकाजाचा आढावा घेण्याबाबत निर्देश यावेळी देण्यात आले.

वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्काराचे वितरण ; नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

यवतमाळ, दि.१८ (जिमाका) : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुसद येथे आयोजित करण्यात आलेल्या वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार सोहळ्यात केले.

पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात कृषिमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी आमदार ॲड. निलय नाईक, आमदार इंद्रनिल नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, माजी नगराध्यक्ष अनिताताई नाईक, माजी राज्यमंत्री डॉ.एन.पी.हिराणी, बाबासाहेब नाईक कापूस सूत गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी आमदार ख्वाजा बेग, राजेंद्र नजरधने, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हरितक्रांतीचे प्रणेत, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, वसंतराव नाईक यांचे कार्य अजरामर आहे. सलग बारा वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळतांना त्यांच्या काळात राज्यावर दुष्काळासारखे तीन संकट आले. या संकटांचे संधीत रुपांतरित करुन राज्यात हरितक्रांती घडवणे ही साधीसुधी बाब नाही. त्यांनी सुरु केलेली रोजगार हमी योजना राज्यात आजही सुरु आहे. या योजनेचे अनुकरण संबंध जगाला करावे लागले. दुष्काळाच्या संकटाला संधी मानून हरितक्रांती घडवणारा, असे वसंतराव नाईक यांचे व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार कृषिमंत्री मुंडे यांनी यावेळी काढले.

कृषिभूषण पुरस्कार लवकरच जाहीर करणार

राज्य शासनाचे कृषिभूषण पुरस्कार येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल. भव्य कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

राज्यात एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच

राज्य शासनाने पंचामृत अर्थसंकल्पातून राज्यातील  शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी १३०० रुपये मोजावे लागत होते ते आता एका रुपयात शेतकऱ्यांना विमा कवच देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. पीएम किसान योजनेंतर्गत ४५ लाख लोकांना लाभ मिळाला. ई-केवायसी, आधार लिंक, भूमि अभिलेखच्या अडचणींमुळे वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पहिल्या टप्याच्या लाभ दिला जाईल. नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून १२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याचा पहिला हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना पुन्हा सुरु करणार आहोत. मागेल त्याला शेततळे, शेडनेट, ठिबक सिंचनासाठी अर्ज करणाऱ्यांना लाभ दिला जाईल. खते, बियाण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे कौतुक

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पुरस्कार दिला जातो, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

पुरस्कारार्थींची माहिती

पश्चिम महाराष्ट्रातील कपिल जयप्रकाश जाचक, (मु.पो. जाचकवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) बजरंग सदाशिव साळुंखे (मु.पो. बामणी, ता.सांगोला, जि. सोलापूर), उत्तर महाराष्ट्रातील विश्वास आनंदराव पाटील (मु.पो. लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव), महेंद्र निंबा परदेशी (मु.पो. कुसुंबा ता.जि. धुळे), मराठवाडा विभागातील बाळासाहेब नारायणराव पडूळ (मुपो लाडसावंगी, ता.जि. औरंगाबाद), अनिल तुळशीराम शेळके (मु.पो. कुंभेफळ, ता.जि.औरंगाबाद), कोकण विभागातील मिथिलेश हरिश्चंद्र देसाई (मु.पो.लांजा, ता. लांजा जि. रत्नागिरी), संदिप बबन कांबळे (मु.पो. खानू, ता.जि. रत्नागिरी), विदर्भातील रवींद्र जयाजी गायकवाड ( मु.पो. गायवड, ता. कारंजा जि. वाशिम), अनिल शिवलाल किरणापुरे (मु.पो. लवारी, ता. साकोली, जि. भंडारा), कृषी शास्त्रज्ञ प्रा. डॅा. दिगंबर मोकाट, वनस्पती विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महिला शेतकरी सविता वैभव नालकर (मु.पो. चिंचविहिरे ता. राहुरी जि. अहमदनगर) यांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

000

पोषण अभियान कार्यक्रमाच्या केंद्र व राज्य हिश्श्याच्या झालेल्या बदलाप्रमाणे राज्यात अंमलबजावणीस मान्यता

मुंबई, दि.१८: पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाच्या केंद्र व राज्य हिश्श्याच्या प्रमाणात झालेल्या बदलाप्रमाणे  पोषण अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती  महिला व बालविकास विभागाने दिली.

          सन 2018-19 या आर्थिक वर्षापासून राज्यात राबविण्यात येणारा पोषण अभियान हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम केंद्र शासनाने पोषण 2.0 अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली.

          तसेच केंद्र पुरस्कृत पोषण अभियान हा कार्यक्रम सुधारित केंद्र हिस्सा 60 % व राज्य हिस्सा 40% या प्रमाणात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

          त्याकरिता पूरक मागणीद्वारे प्राप्त झालेला अतिरीक्त नियतव्यय उपयोजनात आणण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावा – ‘मित्रा’च्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

प्रधानमंत्र्यांचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचे काम करा

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्यासाठी ‘मित्रा’ ची भूमिका महत्त्वाची

मुंबई, दि. 18 :- केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्रा’च्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विशेष सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा घेतला. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रिलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘मित्रा’ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ‘मित्रा’च्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्र्यांनी कृषी, उद्योग, अर्थ, व्यापार, उत्पादन, ‘आयटी’ क्षेत्राच्या विकासावर भर देण्याच्या तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘मित्रा’चे कामकाज प्रभावी, गतिमान करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. अंतिम टप्प्यात असलेले राज्यातील 89 सिंचन प्रकल्प, जिल्हाविकासाच्या योजना, नागरी पाणीपुरवठ्याचे, मलनिस्सारण प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात यावेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. राज्याचे ग्रोथ सेंटर असलेल्या पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या रिंगरोडसह उन्नत रस्त्याचे काम ‘एनएचएआय’ आणि ‘मित्रा’च्या समन्वय, सहकार्याने मार्गी लावण्यात यावे, आदी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या. बैठकीला ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, अपर मुख्य सचिव दिपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील पूर नियंत्रण आणि नुकसान प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कामांचा आराखडा तयार करावा

मुंबई, दि. १८ : चंद्रपूर जिल्ह्यात पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कामांचा परिपूर्ण आराखडा तयार करा आणि ज्या कामांचा मंत्रालय स्तरावर विविध विभागांशी पाठपुरावा आवश्यक आहे, त्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला दिले.

मंत्रालयात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती, त्यामुळे झालेले नुकसान, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मदत कार्य आदींचा आढावा घेतला. मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव आप्पासाहेब धुळाज, महसूल विभागाचे सहसचिव संजय इंगळे, ग्रामविकास विभागाचे सहसचिव का. गो. वळवी, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अ. शं. गाडेगोणे, महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल, चंद्रपूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील आदींची उपस्थिती होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्याला यावर्षी ईरई नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत करण्याबरोबरच पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ करावयाच्या आणि दीर्घ उपाययोजनांबाबत आराखडा आवश्यक आहे.  पूर येण्याची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना विविध पातळ्यांवर होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने याबाबत विविध यंत्रणांची मदत आणि माहिती घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नदीच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत, नदीतील गाळ काढणे आणि नदीपात्राची स्वच्छता आवश्यक आहे. याशिवाय, पूर नियंत्रण बॅरेज संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, पूरनियंत्रण रेषेमुळे चंद्रपूर शहराच्या विकासालाही काही प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे पूरनियंत्रण रेषेची वस्तुस्थिती तपासावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पूर नियंत्रण आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीला प्रतिबंध व्हावा, यासाठी नगरविकास, महसूल, मदत व पुनर्वसन, ग्रामविकास आदी विभागांकडे तातडीने परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा आणि या विभागांनी आवश्यक मदत त्यासाठी करावी, असे निर्देश मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सादरीकरणाद्वारे यावेळी पूर परिस्थिती आणि करावयाच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. वर्धा नदीच्या बॅक वॉटरमुळे शहराला पुराचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ करावयाच्या कामांसाठी मदत व पुनर्वसन विभाकाकडे 50 कोटी रुपयांचा आणि ग्रामविकास विभागाकडे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

दीपक चव्हाण/विसंअ

ताज्या बातम्या

आरोग्य विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यत प्रभावीपणे पोहोचवा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

0
यवतमाळ, दि. 27 (जिमाका) :  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांची, उपक्रमांची व उपलब्ध सेवा सुविधांची माहिती वृत्तपत्रे व विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे निर्देश...

महापुरुषांचे विचार आचरणात आणल्यास खरे परिवर्तन घडेल- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

0
मुंबई, दि. २७ : आजच्या आधुनिक युगात महापुरुषांच्या विचारधारेतूनच आपल्याला सामाजिक समतेचा, न्यायाचा मार्ग सापडतो. महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता, प्रत्यक्ष आचरणात आणल्यास...

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासनानंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे

0
मुंबई, दि. २७ : राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील, असे कृषी मंत्री ॲड.माणिकराव...

प्रकल्पग्रस्त स्थानिकांना खासगी कंपनीत रोजगार संधीसाठी प्रयत्न करणार – कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
मुंबई, दि. २७ : प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या पाल्यांना बृहन्मुंबई , ठाणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील खासगी कंपनीत प्राधान्याने नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न...

‘बलरामपूर बायोयुग’ जैविक युगाकडे एक पाऊल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 27 : वातावरण बदलाच्या समस्येमुळे आज पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर "बायोयुग"...