शनिवार, मे 31, 2025
Home Blog Page 1110

‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

    नवी दिल्ली, 24 :  ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला.  यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार रेखाया मराठी चित्रपटाला, तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी  थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला.    

            येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2021 करिताच्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखरचित्रपट लेखन परीक्षक समितीचे अध्यक्ष यतिंद्र मिश्रानॉन फिचर फिल्म परीक्षक समितीचे अध्यक्ष वसंथ साईचित्रपट परीक्षक समितीचे अध्यक्ष केतन मेहता यांनी विविध श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची  घोषणा केली.

            फिचर फिल्ममध्ये विविध 32  श्रेणीत पुरस्कार जाहीर झालेले आहेत. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर झाले.

एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

            वर्ष 2021 मध्ये मराठी भाषेमधून एकदा काय झालं’ हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वडील आणि मुलाच्या नात्यातील सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाला रजत कमल पुरस्कार जाहीर झाला असून  निर्माता गजवंदना शो बॉक्स एलएलपी, तर दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे आहेत.

            गोदावरी (द होली वॉटर)’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ,  2 लाख 50 हजार रोख असे आहे.

            नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार थ्री टू वन’  या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झालेला आहे.  हा पुरस्कार संयुक्तरीत्या मिठू’  सोबत मिळालेला आहे. थ्री टू वन’ या चित्रपटाची निर्मिती एफटीआयआय ची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती आहेत. पुरस्काराचे स्वरुप रजत कमल आणि प्रत्येकी 50 हजार रूपये रोख आहे.

             ‘रेखा’ या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.

            हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट सरदार उधम’ हा ठरला.  2021 यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दक्ष‍िणेतील चित्रपट अधिक दिसून आले असून उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पुष्पा’ या तेलगु चित्रपटासाठी अल्लू अर्जूनला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 2 अभिनेत्रींना विभागून मिळणार आहे. गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी आलिया भट तर मिमी’ या चित्रपटसाठी क्रिती सेनॉन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिमी’ या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार  पल्लवी जोशी यांना द कश्मीर  फाइल्स’ या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.

            सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ अंतराळ वैज्ञानिकावर आधारित असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झाला आहे. संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील  पुरस्कार आर आर आर’ या तेलुग चित्रपटाला जाहीर झालेला आहे. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता या श्रेणीतील पुरस्कार द कश्म‍ीर फाइल्स’ या हिंदी चित्रपटाला जाहीर झालेला आहे.

            चित्रसृष्टीतील एकूण उत्कृष्ट कारकिर्दीसाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके’ राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नंतर करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

00000

 

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी कालमर्यादेत कामे पूर्ण करावी – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन  कल्चर पार्कची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील मरीन कल्चर पार्क संदर्भात मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार योगेश कदम, उद्योग विकास आयुक्त दीपेद्रसिंह कुशवाह, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, उद्योग सहसंचालक संजय कोरबू, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र काकुस्ते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हर्णे येथे ॲक्वा कल्चर पार्क उभारण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या सल्लागार संस्थेने सादरीकरण केले.  या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी  या ठिकाणी किती गुंतवणूक, उलाढाल व रोजगार उपलब्ध होईल याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी. या प्रकल्पाला मेरीटाईम बोर्डाची मान्यता घ्यावी तसेच यासाठी लागणाऱ्या जमिनीची संपादन प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करावी.

अँकर युनिटसाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील ६० उद्योजकांमधून उत्तम उद्योजकाची निवड करण्यात यावी.  येथे उद्योग स्थापित करण्यास इच्छुक उद्योगांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य योजनेसोबतच राज्य शासनाच्या मत्स्य विकास धोरणाचा अभ्यास करून त्यातील लाभाची माहिती उद्योगांना द्यावी. राज्य शासनाने मत्स्य विकास धोरणात रत्नागिरीसाठी विशेष श्रेणी तयार केली आहे. यामध्ये वीज, भांडवल,  मुद्रांक शुल्क, वस्तू व सेवाकर याबाबत उद्योगांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या धोरणाची माहिती उद्योजकांना देण्यात यावी.

या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेत अंतर्गत रस्ते, वीज, पाणी इत्यादी पायाभूत सुविधांची कामे १५ दिवसांत पूर्ण करण्यासही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/

 

 

टंचाईग्रस्त संभाव्य गावांतील कामे अभियान स्तरावर करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि.24 : सध्या राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे दहा जिल्ह्यांतील 350 गावे आणि 1319 वाड्यांमध्ये 369 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावे व संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात पाणीपुरवठा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे अभियानस्तरावर सुरू करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

टंचाई कालावधीत करावयाच्या  उपाययोजना बाबतीत आढावा बैठक मंत्रालयात आज घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधीक्षक अभियंता अजय सिंह, जलजीवन मिशनचे दहा जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते. तसेच दहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील दहा जिल्ह्यांत टँकर सुरू आहेत. या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेऊन टंचाई संदर्भात पुढील उपाययोजना करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आगामी काळात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन स्थानिक नागरिकांना करावे.

पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन करावे जेणेकरून पुढील टंचाई कालावधीत पाण्याची उपलब्धता होईल, असे पाहावे. भविष्यात लागणाऱ्या टँकरसाठी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. टंचाई सदृश गावात जलजीवन मिशन व अन्य पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले .

राज्यात नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा या दहा जिल्ह्यांतील सध्या 350 गावांत आणि 1319 वाड्यांमध्ये 369 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

टोकियो, दि. 24 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानतानाच वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी जपान सरकारच्या वतीने दिले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा आजचा जपान दौऱ्याचा चौथा दिवस आहे.

यावेळी बोलताना जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा म्हणाले की, जपान जी-7 चे नेतृत्व करीत असून भारत जी-20 चे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे हे दोन देश जागतिक पातळीवर मोठी भूमिका बजावू शकतात. जपान सरकार सातत्याने नवीन संशोधनाला चालना देत असून एमएसएमईला सहकार्य करीत आहे. वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे उद्योगांचे पॉवर हाऊस आहे. सुमारे 750 जपानी कंपनी महाराष्ट्रात आहेत. आता महाराष्ट्रात सिंगल विंडो परवानगीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनसंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम अतिशय वेगाने सुरू आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या उदघाटनासाठी आपण सुद्धा यावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. मेट्रो-3 चे सर्व प्रलंबित विषय आता मार्गी लागले असून त्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्प अतिशय महत्वपूर्ण असून शिवाय पोर्ट कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यावर राज्य सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

इशिकावाचे व्हाइस गव्हर्नर अतुको निशिगाकी यांची भेट

इशिकावाचे व्हाइस गव्हर्नर अतुको निशिगाकी यांनी आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुपा इंडस्ट्रियल पार्कमध्ये गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त केला असून जपान गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ घेऊन आपण स्वतः महाराष्ट्रात यावे, असे निमंत्रण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना दिले. त्यावर आपण 2024 आरंभी महाराष्ट्रात येऊ, असे त्यांनी आश्वस्त केले आहे. महाराष्ट्राचा एक चमू राज्यातील गुंतवणूक संधी सांगण्यासाठी इशिकावा येथे पाठविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मित्सुबिशी राज्यात आणखी विस्तार करणार

मित्सुबिशीचे उपाध्यक्ष हिसाहिरो निशिमोटो यांची सुद्धा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट घेतली. तळेगाव येथे मित्सुबिशीने गुंतवणूक केली असून पहिला टप्पा डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा महाराष्ट्राचा मनोदय असून मित्सुबिशी सुद्धा या क्षेत्रात काम करीत आहे. महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्यास मित्सुबिशीने अनुकूलता दर्शविली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात पुण्यात आणखी गुंतवणूक करणार असल्याचे सुद्धा मित्सुबिशीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

एनटीटी डेटा

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज एनटीटी डेटाचे उपाध्यक्ष हिदेएकी ओझाकी यांची भेट घेतली. पुण्यात एनटीटीचे डेटा सेंटर आहे. राज्यात डेटा सेंटर धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली. एनटीटीने मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त अन्य जागांची सुद्धा चाचपणी करावी. नागपूर हे मध्य भारतातील महत्वाचे ठिकाण ठरू शकते. आयआयएमच्या मदतीने नागपुरात आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटर सुरू करत आहोत, त्यामुळे एनटीटी त्यात सहकार्य करू शकते, असेही त्यांनी सांगितले. त्यावर हिदेएकी ओझाकी म्हणाले की, निश्चितपणे आम्ही नागपूरला भेट देऊ. डेटा सेंटर तयार करताना हरित ऊर्जा आणि हरित इमारत यावर सर्वाधिक भर दिला जातो, असे एनटीटी डेटाचे उपाध्यक्ष हिदेएकी ओझाकी यांनी सांगितले.

 जायका उपाध्यक्षांसोबत भेट

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज जायकाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाकाझावा केईचिरो यांची भेट घेतली. मेट्रो-3, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन इत्यादी विविध प्रकल्पांना वित्तपुरवठा केल्याबद्दल श्री. फडणवीस यांनी आभार मानले. नाग नदी आणि मुळा-मुठा नदी संवर्धन सुद्धा सुरू झाले आहे. या सर्व प्रकल्पांवर ‘वॉर रूम’च्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. या सर्व प्रकल्पांबाबत जशी सहकार्याची भूमिका जायकाने घेतली, तशीच भूमिका वर्सोवा-विरार सी लिंकसाठी घ्यावी, अशी विनंती श्री. फडणवीस यांनी केली. मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पात सुद्धा मदत करण्याची विनंती श्री. फडणवीस यांनी केली. मुंबईची यशोगाथा सांगितली जाईल, तेव्हा जपानचे सुद्धा स्मरण केले जाईल, असेही श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविला जाणार आहे.

जपान पंतप्रधानांच्या विशेष सल्लागारांसमवेत बैठक

जपान पंतप्रधानांचे विशेष सल्लागार मासाफुमी मोरी यांची आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जपानमध्ये भेट घेतली. जपान सरकारने मला विशेष अतिथीचा दर्जा देत निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी जपान सरकारचे विशेष आभार मानले. जपानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिलेली भेट, जायकाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सातत्याने मिळत असलेले सहकार्य इत्यादींबाबत श्री. फडणवीस यांनी आभार मानले. जपान आणि भारत परस्पर सहकार्यातून जगाला एक उत्तम भविष्यकाळ देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. मेट्रो-3 प्रकल्पात मध्यंतरीच्या काळात आलेले अडथळे आणि ते दूर करण्यासाठी श्री. फडणवीस यांनी केलेले प्रयत्न याचा जपान पंतप्रधानांचे विशेष सल्लागार मासाफुमी मोरी यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवर टेस्ट राईड घेतल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला आणि त्याबद्दल आनंद व्यक्त केला. वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्प सध्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडे आहे, त्यांची मंजुरी मिळताच त्यालाही जपान सहकार्य करेल, असे त्यांनी आश्वस्त केले. मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्प आणि महाराष्ट्रातील इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती आपण पंतप्रधानांना देऊ, असेही त्यांनी सांगितले.

जेरासोबत बैठक

जपानमधील सर्वांत मोठी आणि सुमारे 30 टक्के वीज उत्पादन करणाऱ्या जेरा कंपनीचे कार्यकारी अधिकारी युचिरो काटो यांचीही आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट घेतली. महाराष्ट्र सरकारने ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. पण, टप्प्याटप्प्याने औष्णिक वीज निर्मिती केंद्र बाद करणे, ही नवीन संकल्पना आहे. यादृष्टीने एखादा पथदर्शी प्रकल्प आपण भारतात राबवावा. एलएनजीवर आधारित सार्वजनिक वाहतूक प्रकल्प, कंपनीने भारतात यावे आणि एक भागीदार म्हणून महाराष्ट्राकडे पहावे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नागपुरकरांशी संवाद

जपानमध्ये वास्तव्यास असलेल्या नागपुरकरांशी आज सकाळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संवाद साधला. त्यांच्या अनुभवांतून आणि योगदानातून जपानमध्ये ते यशस्वी होत आहेत, हे पाहून मला अतिशय आनंद झाला. यातील अनेक जण जपानमधील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात येण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, याचा मला अभिमान आहे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान अनमोल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. २४ : स्वातंत्र्यानंतर मुंबईत स्थलांतर केल्यानंतर सिंधी समाजातील लोकांनी अनेक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था स्थापन करून मुंबईच्या शैक्षणिक विकासात अनमोल योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. सिंधी समाजातील लोकांनी स्थापन केलेल्या एचएसएनसी शिक्षण संस्थेने पुढील २५ वर्षांसाठी आपल्या विकासाचा रोडमॅप तयार करून देशविदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

मुंबईतील ३० महाविद्यालये व शाळांचे संचलन करणाऱ्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) बोर्ड या सिंधी अल्पसंख्यांक संस्थेच्या स्थापनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

सिंधी समाजाने फाळणीनंतर विस्थापित झाल्यानंतर मुंबईत येऊन निर्धार, मेहनत व प्रामाणिकपणाने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवले. एचएसएनसी शिक्षण मंडळ या दृढ निर्धाराचे जिवंत उदाहरण आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

एचएसएनसी संस्थेचे संस्थापक एच.जी. अडवाणी व ‘विद्यासागर’ के एम कुंदनानी यांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे मुंबईतील महाविद्यालये देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या यादीमध्ये गणली जातात, असे राज्यपालांनी सांगितले.

आगामी काळात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळे अभूतपूर्व बदल येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांनी कृत्रिम प्रज्ञेच्या अनुरुप अभ्यासक्रम आखावेत, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यात सर्वाधिक विदेशी विद्यार्थी पुणे येथे शिक्षणासाठी येतात याकडे लक्ष वेधून एचएसएनसी समूहातील महाविद्यालयांनी उत्कृष्ट अध्यापक नेमून, चांगले अभ्यासक्रम राबवावे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुरूप अभ्यासक्रमात बदल करून  मुंबईला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पसंतीचे केंद्र बनवावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

सन १९४९ मध्ये वांद्रे येथील नॅशनल कॉलेजपासून सुरुवात करून आज एचएसएनसी ही संस्था ३० महाविद्यालयांचे संचालन करीत असून संस्थेत ५०,००० विद्यार्थी शिकत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल हरीश यांनी यावेळी दिली.  संस्था अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निवासी शैक्षणिक संकुल विकसित करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते बोर्डाच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे माजी अध्यक्ष किशू मनसुखानी व विश्वस्त माया सहानी तसेच ओएसडी पदमा शहा यांचा संस्थेतील गौरवपूर्ण सेवेबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी व सचिव दिनेश पंजवानी यांची देखील समयोचित भाषणे झाली. एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजन वेळूकर,  माजी प्र. कुलगुरु डॉ. नरेश चंद्र, ‘इग्नू’चे माजी कुलगुरु डॉ. राजशेखरन पिल्लई, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच निमंत्रित उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor launches 75th year celebrations of HSNC Board

Maharashtra Governor Ramesh Bais  presided over the inaugural ceremony of the 75th year Celebrations of the Hyderabad (Sind) National Collegiate (HSNC) Board at Raj Bhavan, Mumbai on Thursday (24 Aug). A vision document ’75th Year Aspirations’ was released on the occasion. The Governor felicitated former President of the Board Kishu Mansukhani, trustee Maya Shahani and OSD Padma Shah on the occasion.

Vice Chancellor of University of Mumbai Dr Ravindra Kulkarni, former VC Rajan Welukar, President of HSNC Board Anil Harish, Provost of HSNC University Dr Niranjan Hiranandani, Secretary of the Board Dinesh Panjwani, former Pro VC Dr Naresh Chandra, Vice Chancellor of HSNC University Dr. Hemlata Bagla,  teachers and invitees were present.

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांची २५, २६ व २८ ऑगस्टला मुलाखत

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे (आयटीआयचे) संचालक दिगांबर दळवी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील युवकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी आयटीआयचे प्रशिक्षण केंद्र सुरू असून या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण दिले जाते, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी अर्ज कुठे व कसा करावा, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर युवकांना रोजगाराची संधी कशाप्रकारे उपलब्ध करून दिली जाते याबाबतची माहिती, संचालक दिगांबर दळवी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि.25, शनिवार दि.26 आणि सोमवार दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

पत्रकार अधिस्वीकृती समिती मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी दीपक कैतके यांची निवड

मुंबई, दि. २४ : पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी दीपक हनुमान कैतके यांची आज निवड करण्यात आली. समितीच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीस समितीचे सदस्य विभव बिरवटकर, राजू सोनवणे, चंदन शिरवाळे, विनया देशपांडे उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ नुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.

श्री. कैतके हे देवपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड येथील रहिवासी असून ते दै. महासागर आणि हिंदुस्थान पोस्टचे मुंबई प्रतिनिधी म्हणून काम पाहतात.

प्रारंभी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे यांनी उपस्थित समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व श्री. कैतके यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. कांबळे आणि उपस्थित समिती सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

००००

 

 

अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

 मुंबई, दि. 24 : महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिले.

राज्य लॉटरीच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, लेखा व कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राज्य लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, उपसचिव मनीषा कामठे, राज्य लॉटरी विक्रेता अध्यक्ष विलास सातार्डेकर यांच्यासह लॉटरी विक्रेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले की, राज्याचा महसूल वाढावा, नागरिकांचा लॉटरीवर विश्वास राहण्यासाठी आणि पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट विक्री सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

सध्या सण, उत्सवाचे दिवस असल्याने लॉटरीला पोषक वातावरण आहे. यामुळे विशिष्ट प्रमाणात तिकीट विक्री झाल्यास बक्षिसावर हमी देण्याबाबतही चर्चा झाली. लॉटरीचा प्रचार, प्रसार होण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी लॉटरीची जाहिरात करावी. परराज्यातील विक्रेत्यांकडील लॉटरीविषयी कराबाबतची थकीत रक्कम वसूल करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

अपर मुख्य सचिव श्री. सिंह यांनी सांगितले की, एनआयसीच्या माध्यमातून ऑनलाईन लॉटरी करण्याबाबत प्लॅटफॉर्म तयार करून ऑनलाईन लॉटरी तिकीट विक्री करण्यात येणार आहे.

श्रीमती देशभ्रतार यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीबाबत माहिती दिली.

यावेळी लॉटरी विक्रेते यांनी मांडलेल्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं/

 

 

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमधील मोकळ्या खोल्या अंगणवाडीसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 24 :- राज्यातील अनेक अंगणवाड्या भाडेतत्त्वावरील खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत.  अंगणवाड्यांना स्व-मालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. याअनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्ग खोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महिला व बाल विकास विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव शिवराज पाटील, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागात 94 हजार 886, तर नागरी भागात 15 हजार 600 अशा एकूण 1 लाख 10 हजार 48 अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी 21 हजार 969 अंगणवाड्या भाडेतत्त्वावरील इमारतीत भरतात. तसेच इतर 9060 अंगणवाड्या समाजमंदिर, वाचनालयाच्या इमारतीत भरतात. लहान मुलांना आनंददायी शिक्षण मिळण्यासाठी त्यांना पुरेशी जागा व इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्गखोल्या अंगणवाडीच्या मुलांसाठी वापरता येऊ शकतात. त्यादृष्टीने ग्रामविकास विभागामार्फत धोरण तयार करावे. तसेच शहरांमधील अंगणवाड्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत निधी देण्याबाबत उचित कार्यवाही करावी.

राज्य महिला आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांची कार्यालये सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. महिलांना आपल्या तक्रारी, निवेदने घेऊन येण्यास सोयीचे व्हावे, यासाठी सोयीच्या ठिकाणी कार्यालय उपलब्ध करून द्यावे. या दोन्ही आयोगांना प्रभावी काम करता यावे यासाठी मनुष्यबळ, स्वच्छतागृहे आदी बाबी देखील पुरविण्यात याव्यात. त्यासाठी लागणारा आवश्यक निधी त्यांना देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

मुंबईतील मानखुर्द व बोर्ला तसेच पुण्यातील हडपसर आणि येरवडा याठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या मालकीच्या जमिनी आहेत. या जमिनींवर काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमणे हटवून त्यांचा वापर विभागाच्या आवश्यक बाबींसाठी करण्याबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

—-०००००—-

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. २४ : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अध्यक्ष अतुल सावे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. राज्यातील इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, स्वतःच्या उद्योग उभारणीतून समाजातील अन्य गरजू व्यक्तींनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी आणि राज्याच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री श्री.सावे यांनी केले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, एसडीएफसी बँकेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष प्रिती शर्मा, महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री सावे म्हणाले की, राज्यातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश असलेल्या शासन प्रमाणिकरण प्राप्त गटांना स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.या योजनेमुळे मोठया प्रमाणत रोजगार उपलब्ध होणार आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत प्रती गटास बँकेकडून जास्तीत जास्त १० लाख रुपये आणि उद्योग उभारणीकरिता बँकेमार्फत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषीसंलग्न व पारंपरिक उपक्रम तसेच लघु उत्पादन व व्यापार / विक्री संदर्भातील लघु व मध्यम उद्योग त्याचप्रमाणे सेवाक्षेत्रातील गट या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या मर्यादेत व्याजाची रक्कम गटाच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाद्वारे जमा करण्यात असल्याचे ही त्यांनी सांगीतले.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरीता वैयक्तिक व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष पर्यंत) देखील ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, बँकेमार्फत राबविण्यात येणाच्या या योजनेंतर्गत आतापर्यंत ४ हजार २७३ लाभार्थींना महामंडळामार्फत Letter of Intent (Lol) लाभ देण्यात आला आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अधिक माहिती व सहभागाकरिता इच्छुकांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन योजनांचे पोर्टल या Menu वरील गट कर्ज व्याज परतावा या योजनेवर Click करुन माहिती घ्यावी, असे महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

0000

प्रवीण भुरके/स.सं

 

ताज्या बातम्या

विभागीय आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्त

0
छत्रपती संभाजीनगर : दि.30 (विमाका) :- मराठवाडयात विभागीय आयुक्त म्हणून काम करताना एक दिवस गावकऱ्यांसोबत, सस्ती अदालत, संवाद मराठवाडयाशी असे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांच्या...

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा; भरपाई आराखडे त्वरीत सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.30:  सातारा जिल्ह्यात 20 ते 28 मे या दरम्यान एकूण सरासरी 294 मिमी पर्ज्यनमान झाले, मे महिन्यातील पावसाची ही टक्केवारी सर्वसाधारण 880 टक्‌यांपेक्षा...

एमएसआरडीसीकडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवा

0
मुंबई- नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती द्यावी कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करणार मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे दि. ३०: 'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास,...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया १५ जूनपासून सुरू

0
मुंबई, दि. ३०: भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी प्रणालीवर नविन तसेच नूतनीकरण अर्जांसाठी...