मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 1107

महाराष्ट्र शासनाचे दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३३ च्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४६ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) प्रणालीनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १ नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येईल. तसेच रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १० वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी १३ सप्टेंबर, २०२३ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १३ सप्टेंबर २०३३ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर ७.४६ टक्के दरशेकडा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी १३ मार्च आणि १३ सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

आपल्या रसाळ वाणीने समाज प्रबोधन करणारे चक्रवर्ती संत हरपले

मुंबई दि. 26 : आपल्या मधुर व रसाळ वाणीतून समाज प्रबोधन करत कीर्तन परंपरेची ख्याती जगभरात पोहोचवलेले ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने राज्यातील एक चक्रवर्ती संत हरपले आहेत, अशा शब्दात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

बाबा महाराजांनी कायमच आपल्या सुमधुर वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने राज्यातील एक महान विभूती, एक चक्रवर्ती संत हरवले असल्याची भावना मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केली असून, त्यांच्या स्मृतीस श्री. मुंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीचे दर्शन

PM offers prayers at Shri Saibaba Samadhi Temple in Shirdi, Maharashtra on October 26, 2023.

शिर्डी, दि. 26 (उमाका वृत्तसेवा) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.

PM offers prayers at Shri Saibaba Samadhi Temple in Shirdi, Maharashtra on October 26, 2023.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी साई मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले.

0000

भागवत विचार सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 26  : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेण्यात एक कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. आवाजातील प्रेमळ आणि आश्वासक भाव तसेच उत्कृष्ट वक्तृत्व यामुळे त्यांच्या कीर्तन-प्रवचनांमध्ये श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यातून मोठा चाहता वर्ग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर निर्माण केला. राज्य सरकारने नुकताच ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार त्यांना दिला होता. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, संत अभ्यासक आपल्यातून निघून गेले आहेत.  मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो भाविकांच्या दुःखात मी सहभागी आहे.

00000

“येताय ना.. पाटगावचा मध चाखायला… !”

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेतलेल्या ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘पाटगाव’हे कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरले आहे. नाबार्ड, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन करुन इथल्या मध उद्योगाला चालना देण्यात येत आहे.

पाटगाव परिसरात मध निर्मिती आणि विक्री उद्योगाला प्रोत्साहन देवून पाटगावचा मध जगभरात पोहचवण्यासाठी राज्य शासन आणि प्रशासनाच्यावतीने प्रयत्न होत आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 226.71 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत 149.82 लाख निधी वितरीत केला असून यातील 31.71 लाख रुपये निधीतून मधाचे गाव पाटगाव उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून मध उद्योगाबरोबरच पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देवून पाटगाव परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. “मधाचे गाव पाटगाव” उपक्रमाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पाटगाव परिसरात तयार होणारा मध शुद्ध आणि नैसर्गिक असून इथला मध नक्की चाखायला हवा…!

सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे निसर्गरम्य ऐतिहासिक गाव.  कोल्हापूर शहरापासून साधारण ९० किलोमीटर अंतरावर असलेले १ हजार ५०२ लोकसंख्या असलेले ३७५ कुटुंब संख्येचे हे गाव. पाटगावचे क्षेत्रफळ १ हजार ५८.७३ हेक्टर आहे. पूर्वीपासूनच मध हा त्याच्या शुद्धतेसाठी आणि आरोग्यदायी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या परिसरात मधमाशा पालन उद्योग केला जातो. पाटगाव परिसरात वर्षभरात साधारण ८ ते १० टन मध उत्पादन होते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून आता ‘मधाचे गाव पाटगाव’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना याठिकाणी राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून होणार पाटगावचा विकास – शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम, जी -20, केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय वन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या गावांचा वर्षभर विकास करण्यात येणार आहे. रुरल टुरिझम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया ही देशपातळीवरील संस्था देशातील या 35 गावांचा विकास करणार आहे.

लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य-  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने ‘मधाचे गाव पाटगाव’हा उपक्रम राबविण्यात येत असून याद्वारे ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रोत्साहन देत निधी उपलब्ध करुन दिला. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटगावमधील उर्वरित कामांच्या नियोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच यादृष्टीने ते प्रयत्नशील आहेत. मध विक्री व पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासूनच या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य केले आहे. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून सुक्ष्म नियोजन केले. तर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी हे या उपक्रमाची अंमलबजावणी करत आहेत. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाबार्ड, खादी व ग्रामोद्योग विभाग, महसूल, ग्रामविकास, पर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी यासाठी समन्वयाने काम केले आहे.

पर्यावरणपूरक शाश्वत विकास- पाटगावमध्ये पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येवून याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. सामुहिक सुविधा केंद्र व कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून या भागाचा विकास साधण्यात येत असून मधाच्या थीमवर गावाचे सुशोभीकरण होत आहे. याठिकाणी माहिती केंद्र, बी-ब्रीडिंग प्रशिक्षण, मधमाशा पुरक व औषधी गुणधर्म असलेली  वृक्षलागवड करण्यात येत आहे. बी- ब्रीडींगमधून मधमाशांची संख्या वाढवून परागीभवनाची वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाला प्राधान्य देत दिवसेंदिवस कमी होणारी मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी पाटगाव मधाचे गाव ब्रँड तयार करुन मधाला योग्य बाजारभाव मिळवून देवून मध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

आजूबाजूची गावे होणार स्वयंपूर्ण- पाटगाव परिसरात मधमाशा पालनासाठी नैसर्गिक परिस्थिती अनुकुल आहे. मधाच्या गावाला भेट देणाऱ्या पर्यटक, शालेय विद्यार्थी सहलींना मार्गदर्शनाकरीता भुदरगड तालुक्यात प्रवेशापासून ते मधाच्या गावात पोहोचेपर्यंत व गावाच्या वेशीवर दिशादर्शक फलक तसेच गावात मधाच्या गावाचा आकर्षक लोगो तर मधपाळांच्या घरावरही नोंदणीकृत लोगो, फलक लावण्यात आले आहेत. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, मधपाळांना मधपेट्या देण्यासह आवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाटगावसह शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी’च्या माध्यमातून मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत मध निर्मिती व विक्री उद्योग व पर्यटनपूरक उद्योगांतून पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण होण्यासाठी चालना देण्यात येत आहे.

पर्यटन स्थळांचा विकास – पाटगावमध्ये शिवकालीन संत मौनी महाराज यांची जिवंत समाधी आहे. याव्यतिरिक्त वेदगंगा नदीवर १९९० मध्ये बांधण्यात आलेले पाटगाव धरण म्हणजेच ‘मौनी जलाशय’ गावाच्या जवळच आहे. हे धरण आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेला रांगणा किल्ला ही प्रमुख पर्यटन स्थळे पाटगाव परिसरात आहेत. या परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहेत. तसेच पर्यटन संचालनालयाच्यावतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यात येणार  आहेत.

मधाचे संकलन, प्रक्रीया, ब्रॅन्डीग, पॅकेजिंग व मार्केटिंग- पाटगाव परिसरातील 250 मधपाळांना कौशल्यांचे राष्ट्रीय प्रमाणीकरण व सुलभ पतपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच 100 मधपाळांना बी-ब्रीडिंगचे प्रशिक्षण देवून पेटी वाटपातून उत्पन्नाची संधी देण्यात येणार आहे. मध उत्पादक शेतकरी कंपनीमध्ये सहभागी पाटगाव व आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायतीतील मधपाळांकडून मध उत्पादन करण्यात येत आहे. या मधपाळांना मंडळामार्फत प्रशिक्षण देऊन सेंद्रिय मध संकलन करण्यासाठी स्टेनलेस स्टील भांडी पुरविण्यात येणार आहेत. मध संकलनानंतर पाटगाव येथे प्रक्रीया युनिट उभारुन प्रक्रिया झालेल्या मधाचे लेबलिंग, पॅकेजिंग व ब्रँडींग करुन तो मार्केटींगसाठी उपलब्ध होईल.

वसाहतींचे स्थलांतर करण्याविषयी जनजागृती- हवामान व पर्यावरणातील बदलामुळे मधमाशांच्या वसाहती जगवण्यासाठी, त्यांची संख्या वाढविण्यासाठी त्या एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी राज्यांतर्गत व राज्याबाहेर वाहतूक करुन न्याव्या लागतात. यामुळे प्रतिकुल हवामानापासून मधमाशांच्या वसाहतींचे संरक्षण करता येते. वसाहती जगवण्यासाठी त्यांचे स्थलांतर करण्याविषयी मधपाळांना प्रोत्साहन व मदत देणे, स्थलांतराच्या ठिकाणी तंबू उभारणे, वसाहती जगविण्यासाठी साखरपाक देणे अशा उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

शैक्षणिक अभ्यासाला प्रोत्साहन- पाटगाव येथील सदाहरीत जंगलात मधाचे औषधी व उपयुक्त गुणधर्म आहेत. या परिसरातील सातेरी मधमाशांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करुन इतर ठिकाणच्या मधापैकी पाटगाव मधील मध अधिक उत्कृष्ट असल्याबाबत शैक्षणिक अभ्यासाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

भविष्यातील नियोजन – गावातील नोंदणीकृत मधपाळांकडून मध संकलन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांना मधाची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन देणे, स्थानिक पातळीवर मधपाळांना मधाची शुध्दता व गुणवत्ता तपासणीसाठी पर्यटकांना लाईव्ह डेमो उपलब्ध करुन देणे. मध तपासणीसाठी प्रयोगशाळा, प्रोसेसिंग व पॅकेजिंग सुविधा, ब्रॅन्डींग करुन स्थानिक पातळीवर सीएफसी केंद्रा मार्फत विक्री केंद्र उभारणे, मधाचे गाव जागतिक नकाशावर येण्यासाठी चांगले रस्ते, दिशा दर्शक फलक लावणे व नकाशा रेखांकन करुन घेणे. मध आणि मधाचे उपयोग व उत्पादने याबाबत साहित्य पुस्तके, सीडी विक्रीसाठी उपलब्ध करुन देणे, मध व मधाची उप उत्पादने तयार करण्यासाठी फॅकल्टीची निवड करून मधपाळांना मधाची उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देणे व तयार झालेला माल सीएफसी केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळा मार्फत विक्री करणे. गाव पातळीवर तयार झालेल्या मालाचे पॅकेजिंग, बॅन्डींगसाठी मार्गदर्शन करणे.  मध संकलन व विक्रीसाठी ने आण करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे आदी सुविधाही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

शुद्ध व नैसर्गिक मध खरेदी करण्याची संधी – पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार केले आहे. येथे भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळ येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ यांनी दिली.

पाटगावमध्ये उत्तम दर्जाच्या मधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि मार्केटिंग बरोबरच सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून मध प्रक्रिया केंद्र, प्रयोगशाळा, प्रशिक्षण व माहिती दालन करण्यात आले आहे. प्रशासन आणि खादी व ग्रामोद्योग विभागाच्या वतीने पाटगावमधील मधपाळांना मध उत्पादन व विक्रीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. या ठिकाणी माहिती केंद्र, सेल्फी पॉईंट, दिशादर्शक फलक तसेच होम स्टे, हॉटेल, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देण्यात येत असून यामुळे पाटगावचा ‘मध’ जगभरात पोहोचेल व यातून रोजगार निर्मिती होवून या डोंगराळ भागातील गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. या गोष्टी सुरु आहेतच .. पण पाटगावचा शुद्ध आणि नैसर्गिक मध चाखायचा असेल.. इथलं निसर्ग सौंदर्य पहायचं.. अनुभवायचं असेल तर ‘पाटगावला यायलाच लागतंय.. !’

  • वृषाली पाटील, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

शिर्डी, दि. २६  (उ.मा.का.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस  महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले.

०००

बाबा महाराजांनी विठ्ठलभक्ती, वारकरी सांप्रदायचा वारसा पुढे नेला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २६ : “ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्राची विठ्ठल, ज्ञानेश्वर भक्तीची परंपरा, वारकरी सांप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. साध्या, सोप्या, रसाळ, ओघवत्या वाणीतल्या कीर्तनांनी महाराष्ट्राचे प्रबोधन केले. प्रबोधनाच्या चळवळीतून अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या किर्तनांनी व्यसनमुक्तीच्या लढ्याला बळ दिले.

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात बाबा महाराजांचे स्वतंत्र स्थान होते. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी आहे. बाबा महाराजांच्या कुटुंबियांच्या, अनुयायांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

०००

घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २६: ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे,  भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत धर्म आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की,  बाबा महाराजांची रसाळ वाणी, निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती.  त्यांनी  कीर्तन- निरूपण आणि भजन सातासमुद्रापार पोहचवले. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झाला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००

‘अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत

मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवाशी होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.

०००

२५ टक्के अग्रीम त्वरित वितरित करण्याचे आदेश – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. २५ : बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले आहे.

बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात आली होती. शेतकऱ्यांच्या हातात काही पडेल की नाही अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळण्याबाबत आग्रही होते.

बीड जिल्हा प्रशासनाने पावसाचे पडलेले खंडशास्त्रज्ञांनी दिलेले अहवाल इत्यादींच्या आधारे जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांमध्ये अग्रीम 25% पीकविमा वितरित करण्याच्या सूचना भारतीय कृषी विमा कंपनीस जारी केला होत्या.

मात्र कंपनीने सरसकट अग्रीम देण्यास हरकत घेत विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. विभागीय आयुक्तांनी सर्व अहवालाची फेर तपासणी करत व विमा कंपनीची बाजू समजून घेत हे अपील 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार फेटाळून लावले होते. त्यानंतर कंपनीने राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते.

आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे या अपिलाबाबत सुनावणी झाली. कृषी व महसूल विभागाने सादर केलेले अहवालशास्त्रज्ञांनी सादर केलेले अहवालपावसातील खंड व आकडेवारी तसेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती या सगळ्यांचा विचार करत विमा कंपनीचे अपील फेटाळून लावत विमा कंपनीला त्वरित 25 टक्के अग्रीम विमा वितरित करण्याचे आदेश भारतीय कृषी विमा कंपनीला दिले आहेत. याबाबतचा आदेश कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा राज्यस्तरीय कृषी विमा सल्लागार समितीचे प्रमुख अनुप कुमार यांनी आज जारी केले आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने बैठका घेऊन समन्वय साधला.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...