शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 1106

स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३ : स्थानीय लोकाधिकार समितीने भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले. या समितीच्या कामकाजाची माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी अतिशय वस्तुनिष्ठ  पद्धतीने पुस्तकरूपाने प्रकाशित केली आहे. सध्याच्या कार्यकर्त्यांना ही माहिती प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

हॉटेल सहारा स्टार येथे खासदार श्री. कीर्तिकर यांचा ५७ वर्षांचा राजकीय प्रवास आणि लोकाधिकार चळवळीच्या लढ्याच्या घटनाक्रमावर आधारित ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, सर्वश्री खासदार प्रतापराव जाधव, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, बांधकाम व्यावसायिक संजय कुलकर्णी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, खासदार श्री. किर्तीकर यांचा पुस्तक प्रकाशन समारंभ हा कौटुंबिक समारंभ आहे. स्थानीय लोकाधिकार समितीचा इतिहास त्यांनी सांगितला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आम्हा सर्वांना मिळाली. मराठी माणसांना नोकरी मिळावी यासाठी त्याकाळी स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले. ते आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.

भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले. संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचे काम केले. जीवाला जीव देणारे कार्यकर्ते या समितीने जोडले. शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारी संघटना म्हणून स्थानीय लोकाधिकार समितीची ओळख असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबईच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. नीती आयोगाने मुंबई विकासासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. विविध यंत्रणांना एकत्र आणून रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले की, खासदार गजानन किर्तीकर हे अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. मराठी माणसांच्या हक्कासाठी त्यांनी खूप काम केले. सरकारी, निमसरकारी कार्यालयात मराठी माणसांना न्याय देण्यासाठी त्यांनी काम केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. राणे यांच्या हस्ते खासदार श्री. कीर्तिकर आणि पुस्तक निर्मितीत सहकार्य करणाऱ्या पत्रकार योगेंद्र ठाकूर, पुस्तक सजावटकार सतीश भावसार, आदिती बोकील, सुलभा तेरणीकर, मनीषा राणे, संदीप कानसे, उदय सावंत, शिरीष साटम. ॲड. गौरव कळमकर, भाऊ तोरसेकर आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, बांधकाम व्यावसायिक संजय कुलकर्णी यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्री. कराड यांच्यावतीने महेश साने यांनी हे मानपत्र स्वीकारले.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. बोरसे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

०००

लेहमध्ये त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

कर्नल सुनील शेओरन यांची फडणवीस यांनी घेतली भेट

लेह/मुंबई दि. ३ : लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे ३ कोटी रुपये खर्च करुन हे संग्रहालय उभारण्यात येत असून, हा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, त्यावेळी एनएसजी तुकडीचे नेतृत्व करणारे कर्नल सुनील शेओरन यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली. कर्नल सुनील शेओरन यांचा बुलेट कॅचर म्हणून उल्लेख केला जातो. त्यांच्या कामगिरीचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.

१४ कोर कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा आणि आमदार श्रीकांत भारतीय यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, त्रिशूळ हे उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे शौर्याचे प्रतिक आहे. त्रिशूळ डिवीजनने सुद्धा असेच शौर्य कायम दाखविले आहे. जेथे श्वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी तुम्ही पराक्रम गाजवताय. आम्ही तुमच्या शौर्याला सलाम करतो. देशाचा सन्मान वाढविण्यात लष्कराची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि त्यात त्रिशूळ डिवीजनचे योगदान महत्वपूर्ण आहे.

आज भारत सर्व क्षेत्रात प्रगती करतो आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर आता भारताने सूर्याची मोहीम हाती घेतली आहे. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. लष्करासाठी दुर्गम भागात रस्ते, पूल अशा सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या जात आहेत. या संग्रहालयामुळे सीमावर्ती भागात पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील पर्यटक येतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सुमारे वर्षभरापूर्वी त्रिशुळ युद्ध संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. महाराष्ट्रातील अ‍ॅड. मीनल भोसले आणि सारिका मल्होत्रा या दोन महिलांनी या भागात भेट दिली, तेव्हा या संकल्पनेचा उदय झाला. त्यांनी श्रीकांत भारतीय यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर यासाठीचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारने हा निधी दिल्याबद्दल लेफ्ट. जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. लष्करी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांचा समावेश असलेला एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आला होता. त्रिशूळ युद्ध स्मारकानजीक हे संग्रहालय उभारण्यात येत असून, ते त्रिशुळाच्या आकाराप्रमाणे असणार आहे. यात तीन प्रदर्शन कक्ष असणार असून, त्यात 1962, 1965, 1971, 1991 आणि अगदी अलिकडच्या काळात झालेल्या कारवायांमधील शहीदांच्या स्मृती असणार आहेत.

हे त्रिशुळ डिवीजन साहसी जवानांचे असून, एकिकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीन अशा दुहेरी क्षेत्रात भारताच्या अखंडतेसाठी ते कार्यरत असतात. या संग्रहालयात पाषाणशिल्प, या त्रिशुळ डिवीजनच्या स्थापनेचा इतिहास, विविध अभियानांमध्ये मिळालेले यश, युद्धात वापरलेले शस्त्र, दारुगोळा, वाहने, संपर्क व्यवस्था, जवानांनी कुटुंबीयांशी केलेला पत्रव्यवहार इत्यादी बाबी असणार आहेत. 1962 च्या युद्ध काळात या डिवीजनची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत 150 वीरता पुरस्कार या डिवीजनला मिळालेले आहेत.

०००

जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा – राज्यपाल रमेश बैस

वर्धा, दि. ३ (जिमाका) : पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे काम करत असतात. कामाचा ताण असतांनाही ते कर्तव्यात कसूर करत नाही. त्यामुळे विभागाच्यावतीने त्यांच्यासाठी ‘मेडीटेशन’सारखे उपक्रम राबविण्यासोबतच जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

शासकीय विश्राम भवन येथे राज्यपालांनी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला, अनेक बाबी जाणून घेतल्या. यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते.

राज्यपालांनी जिल्ह्यातील सिंचन, कृषि, खरीप हंगामाची स्थिती व विविध शासकीय योजनांची माहिती व प्रगती यावेळी जाणून घेतली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरण केले. जिल्ह्याच्या एकूनच स्थितीचा आढावा त्यांनी सादरीकरणातून राज्यपालांसमोर मांडला. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. दरवर्षी पडणाऱ्या पावसाचा दहा टक्के भाग सुध्दा उपयोगात येत नाही. सगळे पाणी वाहून जाते. कमी खर्चात छोट्या छोट्या योजना करून पाणी कसे साठविता येईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना राज्यपालांनी केल्या.

मनरेगातून पाणी साठविण्याच्या योजना केल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी त्याचा उपयोग होईल. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्वाचा आहे. या हंगामात त्यांना कृषि निविष्ठा उत्तम दर्जाच्या मिळाल्या पाहिजे. याबाबतीत शेतकऱ्यांची फसगत होणार नाही, याकरीता विशेष दक्षता घेतली गेली पाहिजे. निविष्ठा उत्तम दर्जाच्या नसल्यास शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षच वाया जाण्याची शक्यता असते, असे ते म्हणाले. आदिवासी घटकासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, शाळाबाह्य मुले, ग्रामपंचायत भवन, ग्रामसभा आदींची माहिती त्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्याचे पर्यटन, आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, वनहक्क कायदा, पीएम किसान, प्रधानमंत्री पिकविमा योजना, नाविन्यपुर्ण योजनेतून राबविलेले उल्लेखनिय उपक्रम, मनरेगा, पीएमएफएमई, पोकरा, शेतकरी उत्पादक कंपनी, आरोग्य विभागाच्या योजना, जलजीवन व स्वच्छ भारत मिशन, अमृत महाआवास, जीवनोन्नती अभियान, शिक्षण विभागाच्या विविध योजना व नाविन्यपुर्ण उपक्रम, उद्यमिता केंद्र, सेवादूत प्रकल्प आदींची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी आपल्या विभागाशी संबंधित बाबींची व नाविन्यपुर्ण उपक्रमांची माहिती राज्यपालांना दिली. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा दि. ३:  जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा संदर्भ देऊन आज बुलढाणा येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कारवाईबाबत घोषणा केली. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले असून अपर पोलीस अधिक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही, आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल.

सर्वसामान्य मराठा कुटुंबात जन्मलेला मी देखील एक असून मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर नोकरीपासून वंचित राहिलेल्या साडेतीन हजार मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी अधिसंख्य पदे भरण्याचा निर्णय आम्ही घेतला.

जालना येथे आंदोलन करणारे मनोज जरांडे पाटील यांच्याशी या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी त्यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन मी त्यांना केले होते. त्याना अपेक्षित असलेला निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर अधिकारी प्रयत्नशील होते. मात्र त्यापूर्वीच ही घटना घडल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

०००

सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक
  • राज्य शासनाने जनकल्याणाचे निर्णय घेतले

बुलढाणा, दि. ३ : राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ जनतेच्या व्यापक हिताच्या निर्णयाला प्राधान्य देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावरून उतरून मदत करणारे सरकार आहे. येत्या काळातही सर्वसामान्याच्या हितासाठी गतीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील कऱ्हाळे ले आऊटजवळील मैदानात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज पार पडला. यावेळी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सुरू केल्यापासून शासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत आहे. राज्यात सातत्याने कार्यक्रम घेण्यात आले आहे. यातून आतापर्यंत १ कोटी ६१ लाख नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमातून नागरिकांच्या दारापर्यंत जाणारे देशातील एकमेव राज्य आहे. अभियानातून बुलढाणा जिल्ह्यात आजच्या दिवशी १ लाख तर आतापर्यंत १७ लाख ४३ हजार नागरिकांना लाभ देण्यात आला आहे.

राज्य शासन जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. गेल्या काळात बंद पडलेल्या असंख्य योजना नव्याने पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. ३२ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यातून आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नदीजोड प्रकल्प, दुष्काळग्रस्तांना मदत, महिलांना बस प्रवासात सवलत, ७५ हजार पदभरती असे हिताचे निर्णय घेण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या मदतीने राज्याचा विकास करण्यात येत आहे. महिलांच्या विकासासाठी बचतगटांना चालना देण्यात येत आहे. बचतगटांना स्वस्त व्याजदराची कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच विपणनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक

जालना जिल्ह्यात घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आवश्यकता भासल्यास न्यायालयीन चौकशी करण्यात येऊन यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यासोबतच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मदत देण्यात आली. तसेच मेहकर तालुक्यातील ५० तलाठी कार्यालयांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमावर आधारित कॉफी टेबलबुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांची भाषणे झाली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्रास्ताविक केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वाटप

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात लाभ देण्यात आले. यात सुनीता प्रशांत खरे, रा. सुंदरखेड, ता. बुलडाणा, (पिठाची चक्की), राजू भीमराव हिवाळे, रा. भीमनगर वार्ड, क्रमांक दोन, बुलढाणा, (वाहन करातून सूट), हरिदास काळमेघ, रा. काकोडा, ता. संग्रामपूर, (विमा संरक्षण निधी), टी. एस. घुले, कुलाभवानी फार्मर प्रोड्युसर कंपनी, रा. वडगाव पाटण, ता. जामोद, (ड्रोन), रामेश्वर मदनराव कोल्हे, रा. धोडप, ता. चिखली, (सामाजिक कल्याण), ज्योती निलेश पाटील, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली, (कुकुट पालन), चंद्रकला मनोहर सोनवणे, बुलडाणा, (आत्मनिर्भर निधी), शितल पंडीत खंडागळे, रा. कोलवड, ता. बुलडाणा, (प्रधानमंत्री मातृवंदन योजना), भूषण विनायक काळे, रा. राऊतवाडी, ता. चिखली, (अनुकंपा नोकर भरती), सविता गजानन आंधळे, रा. खामगाव, (राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय), प्रभाकर शंकर पहूरकर, रा. भानेगाव, ता. शेगाव, (प्रधानमंत्री मत्स्य योजनेतून इन्सुलेटेड वाहन), प्रियंका गजानन ताटे, रा. बुलडाणा, (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम), लता कृष्णा गवते, रा. चिखली, (ई-व्हेईकल), अनुराधा सोळंकी, रा. पाटोदा, ता. चिखली, (खेळाचे अद्ययावत साहित्य), सुमेध तायडे व कीर्ती तायडे, रा. संग्रामपूर, (सामुदायिक विवाह), पी. पी. सोनुने, रा. मलकापूर, (स्मार्ट प्रकल्प), उषा विजय मिसाळ, रा. बुलडाणा, (नागरी जीवनोन्नती अभियान), सरला गजानन जाधव, रा. कोलवड, (ग्रामीण जीवनोन्नती), निर्मला देशमुख, रा. मेहकर, मंगला शेजोळ, रा. देऊळगाव माही (ट्रॅक्टर), प्रथमेश जवकर, रा. बुलडाणा, (खेळाचे साहित्य), ऋषीकेश ढारे, रा. शेगाव, अर्चना जाधव, रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर, राहुल लोखंडे, रा. भालगाव, ता. चिखली (रोजगार मेळावा) या लाभार्थ्यांना लाभ देऊन गौरविण्यात आले. तसेच चंद्रयान मोहिमेत योगदान देणारे उद्योजक गितीका जयेश विकमशी आणि राजेंद्र भोसले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत विविध साधनांचे वितरण बचत गट, एफपीओ व वैयक्तिक लाभार्थींना करण्यात आले. जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील कुलभवानी शेतकरी उत्पादक कंपनीला ड्रोन फवारणी यंत्र महाडीबीटीअंतर्गत ४० टक्के अनुदानावर देण्यात आले. त्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कंपनीचे टी एस घुले यांना प्रदान करण्यात आले. ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, हार्वेस्टर आदी अनुदान तत्वावरील अनेक उपसाधने वितरित करण्यात आली.

शिबिरात विविध शासकीय विभागातर्फे ५० दालनांद्वारे शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन करण्यात आले. मुद्रांक नोंदणी कक्षाचे उद्धाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे लोकार्पण

बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी इमारतीचे लोकार्पण आणि कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर त्यांनी इमारतीची पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर आदी उपस्थित होते. नव्या इमारतीमध्ये शहर पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरीता सुसज्ज कक्षांचे निर्माण करण्यात आले आहे. ४ कोटी खर्चून ही इमारत बांधण्यात आली आहे.

०००

समाज व राष्ट्रहित साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे  – राज्यपाल रमेश बैस

वर्धा, दि. ३ : देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान राहिले आहे. देशाला जागतिकस्तरावर नेण्यासाठी यापुढे देखील या संस्था महत्त्वाचे योगदान देतील. नव्या शैक्षणिक धोरणाने परिवर्तनाचा दृष्टिकोन ठेवला आहे. हे धोरण नव्या पिढीला मातृभाषेत शिक्षणाला प्रोत्साहन देते. युवकांनी देशाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी तयार झाले पाहिजे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

येथील जय महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकुलपती डॉ. प्रशांत बोकारे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, पोलीस अधीक्षक नूरुल हसन, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. ,

राज्यपाल श्री. बैस यांनी जय महाकाली शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. मागील आठवड्यात चंद्रयान तीन ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली. यामुळे जगभरात देशाचे नाव झाले. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. या मोहिमेनंतर आदित्य एल -१ ही मोहीम देशाने हाती घेतली आहे. देशाचे नाव जगात लौकिक वाढविणाऱ्या या घटना आहे.

भारताने जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. देशात होत असलेली शैक्षणिक प्रगती आपल्या विकासाचा आधार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने परिवर्तनवादी दृष्टिकोन स्विकारला आहे. आजचे जग हे कौशल्याचे आहे. कौशल्य अंगिकारत आपल्याला प्रयोगशील होणे आवश्यक आहे. भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून भारत करीत आहे, असे राज्यपाल म्हणाले.

सार्वजनिक खर्चातून चालविल्या जाणारी आपली शिक्षण प्रणाली जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची प्रणाली आहे. देशात अनेक ठिकाणी राज्य, केंद्रीय विश्वविद्यालये, मानद, खाजगी विद्यापीठे, राष्ट्रीय महत्वाच्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. देशाच्या विकासात या संस्था महत्वाचे योगदान देत आहेत. जागतिकस्तरावर आपल्या अधिकाधिक संस्थांना मानांकन प्राप्त होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. देशाने ५० टक्के सकल नामांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे.

विद्यापिठे, शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेवर नव्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रमांचे सुसूत्रीकरण, आधुनिकीकरण व उच्च शिक्षण प्रणालीचा अंगिकार करावा लागेल. आजच्या आधुनिक काळात केवळ साक्षर होऊन उपयोग नाही तर एआय साक्षर होणे गरजेचे आहे. युवकांमध्ये मोठी ताकद आहे. युवकांनी संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र मानले पाहिजे. स्वत:ला काही क्षेत्रांपुरते मर्यादित न ठेवता देशातील कोणतेही राज्य आणि जगात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी संस्थेची माहिती दिली. उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, डॉ. प्रशांत बोकारे, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

जय महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने बांधण्यात आलेल्या शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन व आभार संध्या शर्मा यांनी केले.

०००

 

 

विभागीय आयुक्तांकडून ‘शासन आपल्या दारी’ च्या पूर्वतयारीचा आढावा

????????????????????????????????????

बुलढाणा, दि. २ : राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ हा सामान्य जनतेला एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ व मदत वितरणाचा कार्यक्रम उद्या रविवार, दि. ३ रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे संपूर्ण तयारी झाली आहे. अमरावती विभागात प्रथमच हा कार्यक्रम होत असून कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी याठिकाणी सर्व अनुषंगिक सोयी-सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

विभागीय आयुक्तांनी आज प्रत्यक्ष कऱ्हाळे लेआउट येथे होणाऱ्या कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी करुन तेथील पूर्वतयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य पथक, पोलीस बंदोबस्त आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. प्र. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कडासने तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उद्या दुपारी ११:३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत एक लाखाहून अधिक लाभार्थींना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. यात ३० हजार ऑफलाईन, तर ७५ हजार लाभार्थींपैकी ई-केवायसी झालेल्या लाभार्थींना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे खासदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती असणारी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, संजय गायकवाड, विभागीय आयुक्त निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ. अमोल शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

दरम्यान विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी बुलढाणा तालुक्यातील सागवान ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेतून झालेल्या वृक्ष लागवडीच्या कामाची तपासणी केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पवार उपस्थित होत्या. याठिकाणी कडू बदाम, कांचन आणि शिसम या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

०००

डेंग्यू, मलेरियाच्या प्रतिबंधासाठी मिशन मोडवर उपाययोजना करा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दि. २ (जिमाका): जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणांनी मिशन मोडवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

जिल्ह्यातील चिकनगुनिया, डेंग्यू व मलेरिया या साथीच्या आजारांच्या सद्यस्थितीबाबत दुरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, आरोग्य उपसंचालक डॉ कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, मालेगाव मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आहेर, नाशिक महानगपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते, जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. माधव अहिरे, बायोलॉजिस्ट डॉ. राजेंद्र त्र्यंबके आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे साथीचे आजार पाण्याच्या माध्यमातून पसरतात. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये आपला परिसर स्वच्छ व कोरडा ठेवण्यासाठी विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात यावी. त्याचप्रमाणे संशयित रुग्णांची शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक ते सर्व उपचार वेळेत उपलब्ध होतील, निर्धारित उपचार पद्धतीचा काटेकोरपणे अवलंब करण्यात यावा. तसेच खाजगी रुग्णालयांसोबत समन्वय साधून तपासण्या व उपचार वेळेत होतील यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे.

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या साथी नियंत्रणात राहण्यासाठी स्वच्छतेसोबतच नागरिकांच्या तपासण्या होणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी ज्या भागांमध्ये संशयित रुग्ण आढळले असतील तिथे सर्वेक्षण करून प्रमुख अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्यात. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साथीच्या आजारांबाबत नियमित आढावा घेऊन त्याविषयी सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिल्या. तसेच या आजारांवरील उपचारासाठी लागणारी औषधे, तपासणी किट व लसीचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकरिता नियोजन करण्यात आले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येऊन त्याबाबतचा नियमित अहवाल सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यूच्या सात रुग्णांपैकी पाच रुग्ण खाजगी व दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी दिली. तर ग्रामीण भागात मलेरियाचे दोन रुग्ण असून ते घरीच उपचार घेत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

०००

सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. २: सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. कमी पावसामुळे कुकडी प्रकल्पात सध्या कमी पाणी साठा आहे. तथापि, पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक असून सध्याचे सुरू असलेले कुकडी डावा कालव्याचे आवर्तन दोन दिवसांनी वाढवून १० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे, असा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी प्रकल्प व घोड संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, बबनराव पाचपुते, अतुल बेनके, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पावसाच्या मोठ्या खंडामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे.  या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. विसापूर जलाशयात अतिशय कमी पाणीसाठा असून पिण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने कुकडी कालव्याचे पाणी २ दिवस अधिक सुरू ठेऊन विसापूरमध्ये पाणी सोडावे.

घोड प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्के पाणीसाठा आहे. तथापि, पिण्यासाठी घोड धरणात आवश्यक पाणी आरक्षण ठेवून घोड धरणातून  कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी सोडणे आवश्यक असून त्याप्रमाणे पाणी सोडावे, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत महसूलमंत्री श्री. विखे पाटील आणि सहकारमंत्री श्री. वळसे पाटील यांनी तसेच उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व नियोजनाबाबत सादरीकरण केले.

०००

पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. २: सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाची परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.

खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहूल कुल, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल.

पवना व चासकमान मध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही, असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

नीरा प्रणालीत समाधानकारक पाणी

नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४ टीएमसी ने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

कालव्याच्या टेलच्या भागातील शेतीला योग्य दाबाने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी कालवाक्षेत्रातील पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यकता भासल्यास ठराविक वेळेतच वीजपुरवठा करा. अवैध पाणीवापरावर नियंत्रण आणण्यासाठी मनुष्यबळाचे फेरनियोजन करत इतर ठिकाणचे मनुष्यबळ सिंचन व्यवस्थापनावर वापरात आणावे. बाह्य स्रोताद्वारे तात्पुरते मनुष्यबळ घेण्यात यावे, अशा सूचना महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी केल्या.

नीरा डाव्या कालव्याद्वारे संरक्षित सिंचन पूर्ण होताच शेटफळ तलाव ५० टक्के भरण्याचे नियोजन आहे. सध्या नीरा उजवा कालवा आणि डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून ते नियोजनाप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस आमदार समाधान अवताडे, शहाजीबापू पाटील आदी उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

महावितरणचा वर्धापन दिन म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण -पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दि. ६ : महावितरण कंपनीने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत विविध उपक्रमांद्वारे वीसावा वर्धापन दिन साजरा केल्याचे कौतुक करताना, विज वितरण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या...

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन प्रशिक्षण सत्राचे आयोजन

0
मुंबई, दि. ६ :  सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचलन याविषयी प्रशिक्षण सत्राचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा येथे दि. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२५...

‘परिवहन महामंडळा’च्या जागांचा ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करून उत्पन्न वाढवा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे...

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

0
मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल - अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद मुबारक! ईद  अल -...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांची मुलाखत

0
मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, स्वाती पांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ग्रामीण...