शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 1104

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,  दि. 05 : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने  सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक मोबाईल ॲप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवाणी, यू-ट्यूब, आकाशवाणी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आदींचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या  शिक्षकांना  सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान  समारंभाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह आदी उपस्थित होते.

 यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2023 चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये  शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजाळे, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिल्पनिदेशक, स्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.

श्रीमती मृणाल गांजाळे

पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार   (National Teachers’ Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ मधील राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार व २०२२ मधील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

डॉ. राघवन बी. सुनोज

प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपूरमचे आणि आयआयटी मुंबईचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी सन २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्रामध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून 2001 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरकडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 2012 पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

प्रो.केशव सांगळे

प्रा. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदान, संशोधन, शोधनिबंध, विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक प्रशासन, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदत, राज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम केल्याबद्दल सन 2023 या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. चंद्रगौडा  रावसाहेब पाटील

डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्च शिक्षणातील तंत्रज्ञान वापर, समाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापरासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

स्वाती योगेश देशमुख  हस्तकला (क्राफ्ट्स कौशल्य) प्रशिक्षक

अत्यंत समर्पित आणि कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेत, स्वाती योगेश देशमुख यांना वर्ष 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना 22 वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजपर्यंत 500+ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे.

       या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील 13 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 12 शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, 50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

०००००

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 167, दि.05.09.2023

 पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती-

श्रीमती मृणाल गांजाळे

श्रीमती मृणाल गांजाळे- शिंदे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले. त्यांचे सन २०१९-२०२० या वर्षात इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय २ विद्यालयासाठी निवड पात्र ठरले. प्रधानमंत्री विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर सत्रात CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले मागील वर्षी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला. राष्ट्रीय आय.सी.टी मेला मध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. राघवन सुनोज

            डॉ.सुनोज यांनी सेंट जोसेफ स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून, युनिव्हर्सिटी कॉलेज, तिरुवनंतपूरममध्ये शिक्षण घेतले आहे. डॉ. सुनोज यांनी बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून पीएच.डी प्राप्त केली. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन केल्यानंतर, ते वयाच्या 29 व्या वर्षी आयआयटी मुंबईमध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. डॉ. सुनोज यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CISR) 2019 मध्ये प्रतिष्ठित ‘शांतीस्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार’ प्रदान केला आहे.

प्र. केशव सांगळे

            प्रा. सांगळे हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे  संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख आणि संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य  अभियांत्रिकीमधील पदविका शासकीय तंत्रनिकेतन पुणे, पदवी व पदव्युतर पदवी शासकीय अभियांत्रिकी  महाविद्यालय,  कराड येथे घेतली. त्यांनतर त्यांनी पीएचडी ही पूर्ण केली.

डॉ. चंद्रगौडा पाटील

            डॉ. पाटील हे विद्यार्थ्यांना स्वत:च्या गतीने क्लिष्ट विषयाचे अवलोकन करता यावे यासाठी मागील दोन दशकांपासून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपकरणे, शैक्षणिक साहित्य व शिक्षण पध्दती विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. डॉ. पाटील यांनी विकसित केलेले एक्स-कोलॉजी व कॅलफार्म नामक परस्पर संवादी सॉफ्टवेअर औषधनिर्माण, वैद्यकीय, पॅरामेडिकल व पशुवैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे शैक्षणिक उद्दिष्टासाठी केल्या जाणाऱ्या विच्छेदनाला आळा बसून देशातील हजारो प्राण्यांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी डॉ.पाटील यांना होमिओपॅथी क्षेत्रातील संशोधन कार्याबद्दल भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देण्यात येणारा एक लाख रुपयांचा युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झालेला असून डॉ.पाटील यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

 

श्रीमती स्वाती देशमुख

श्रीमती स्वाती देशमुख यांनी 4 सप्टेंबर 2010 पासून मुंबईतील सरकारी आयटीआय  लोअर परेल येथे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग (COPA)असिस्टंट ट्रेडच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी संस्थेचे संकेतस्थळ विकसित करून, शैक्षणिक यू ट्यूब व्हीडिओ तयार करून आणि संगणक-आधारित प्रशिक्षण (CBT) मॉड्यूल डिझाइन करून त्यांच्या संस्थेच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त, प्रशिक्षणार्थींसाठी एक ई-लायब्ररी स्थापन केली आहे. डिजिटल शिक्षण संसाधनांचा प्रचार केला आहे. श्रीमती देशमुख यांनी संस्थेमध्ये हाय-टेक, इंटरनेट-सक्षम कॉम्प्युटर लॅबची स्थापना करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने उपलब्ध करण्यात तसेच विविध सक्षम विद्यार्थ्यांचे सक्षमीकरणात व रोजगार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

********

विकास कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत; कामे दर्जेदार करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

ठाणे, दि. 05(जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होणे अपेक्षित आहे, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व विहीत कार्यवाही पूर्ण करुन कामांना सुरुवात करावी, कोणत्याही परिस्थितीत ही कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला हवीत, मात्र ही कामे दर्जेदार असावीत,  असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिले.
जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, रमेश पाटील, संजय केळकर, कुमार आयलानी, शांताराम मोरे, रईस शेख, दौलत दरोडा, डॉ.बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, श्रीमती गीता जैन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी तसेच विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख आदी उपस्थित होते.
     जिल्हा वार्षिक नियोजन समिती निधीचा विनियोग व पुढील काळातील नियोजन याचा सविस्तर आढावा यावेळी घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, ठाणे जिल्ह्याला गेल्या वर्षीपेक्षा यंदा 132 कोटी रुपये जास्तीचे मिळाले आहेत. जानेवारी 2024 नंतर कधीही आचारसंहिता लागू शकते. याचा अंदाज घेता हा निधी यंदा डिसेंबर अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी परिपूर्ण प्रस्ताव सप्टेंबरअखेर पर्यंत सादर करावेत. कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व विहीत कार्यवाही पूर्ण करुन कामांना सुरुवात व्हायला हवी आणि ही कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला हवीत, हे करीत असताना कामे दर्जेदार होतील याकडेही कटाक्षने लक्ष द्यावे. चांगल्या प्रतीची लोकोपयोगी कामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
     यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत बोलताना श्री. देसाई यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करुन याबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येईल.
       यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी ठाणे जिल्ह्यातील वाढत्या अनधिकृत बांधकामाविषयी चिंता व्यक्त केली. याबाबत श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, प्रांताधिकारी व तहसिलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुरु असलेली अनधिकृत बांधकामे आहेत त्या परिस्थितीत तात्काळ थांबवावीत, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असे आदेश दिले.
    बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्री महोदय व इतर उपस्थित सर्व समिती सदस्यांचे स्वागत करुन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सभागृहास  जिल्हा वार्षिक नियोजन निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2022-23 या वर्षासाठी 618 कोटी इतका मंजूर निधी संपूर्ण खर्च झाला. यंदा सन 2023-24 साठी 750 कोटीचा नियतव्य मंजूर झाला असून गेल्या वर्षीपेक्षा 132 कोटी वाढीव मिळाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या योजना, आरोग्य सुविधा, नगरपालिका क्षेत्र, शाळा दुरुस्ती, महिला व बालकल्याण, पोलीस यंत्रणा, गतिमान प्रशासन यासाठी वाढीव निधी मंजूर झाला आहे. तसेच यंदा नव्याने गड किल्ले संवर्धनासाठी जिल्ह्यास 16 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी दिली. यानंतर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी  जिल्हा नियोजन समितीच्या दि. 11 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व त्याचा अनुपालन अहवाल सभागृहासमोर मान्यतेसाठी सादर केला.
लाभार्थ्यांना “आनंद शिधा” किट चे वितरण
बैठकीच्या सुरुवातीस काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात “आनंद शिधा” किट चे वितरण पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी याकरिता समन्वय साधला.
जिल्हा नियोजन निधीतून शासकीय कार्यालयांना “वाहन”
यावेळी जिल्हा पुरवठा कार्यालयासह अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, मिरा-भाईंदर या तहसील कार्यालयांसाठी जिल्हा नियोजन निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नव्या शासकीय वाहनाच्या चाव्या पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
     बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वैभव कुलकर्णी यांनी केले. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संगिता पाटील, लेखाधिकारी संतोष जाधव, सहाय्यक संशोधन अधिकारी विपुला कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मिरजेतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला तत्वतः मान्यतेसंदर्भातील कार्यवाही करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सांगली, दि. ५ (जि. मा. का.) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम व विद्यार्थी वसतिगृह बांधकामाला तत्वत: मान्यता देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील इमारत बांधकाम व अन्य सोयी-सुविधांबाबत झालेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण व आयुषचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कीर्तीकुमार मिरजकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.

या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधणे व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची इमारत बांधकाम करण्यासंदर्भात तत्वत: मान्यता देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सचिव, वैद्यकीय शिक्षण यांना दिल्या. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात येईल. या प्रस्तावांतर्गत 200 खाटांचे रुग्णालय बांधकाम तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अध्यापक व इतर मनुष्यबळ, यंत्र सामुग्री व साधन सामुग्री यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी एकूण 13 अभ्यासक्रम राबविण्याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रस्तावांतर्गत बांधकामासाठी आकारण्यात आलेले दर तपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा सादर करण्याबाबत तसेच अल्पसंख्याक विभागाकडून प्रशासकीय मान्यता तात्काळ मिळवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. तसेच, पॅरामेडिकल सायन्स योजना अंतर्गत महाविद्यालयाच्या बांधकामासाठीचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे 500 खाटांचे नवीन रुग्णालय, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच शवागृह आदि बाबींसाठी दोन महिन्यांच्या आत आवश्यक कार्यवाही करुन निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकांनुसार पुरेसा नर्सिंग स्टाफ नसल्यामुळे विविध आजारांवर उपचार करताना अपुरे मनुष्यबळ व साधने यांच्या मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात 100 प्रवेश क्षमतेचे बी. एस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरु केल्यास त्याचा फायदा जिल्ह्याला होईल. या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर पुढील मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण उपसचिव श्री. सूर्यवंशी यांनी दिली.

नव्या दोन एमआयडीसीमुळे अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत होणार वाढ – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी म्हणून राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी मिळाली असून भविष्यात अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

उद्योग, महसूल विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक आज सह्यादी अतिथीगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल, पशूसंर्वधन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीस महसूल विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्द‍िष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रिलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे, त्याच दृष्टीने राज्यात नवे उद्योग आणि नव रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नवीन उद्योगास चालना मिळावी, बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे, तसेच गावातील स्थानिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीच्या संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ता, विळद येथे ६०० एकरावर फेज २ व शिर्डी येथे साईबाबा शिर्डी एमआयडीसी अशी ५०० एकर वर दुसऱ्या एमआयडीसीला उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी तत्त्वत: मंजुरी दिल्याची माहिती श्री. विखे पाटील यांनी दिली.

शासनाच्याच जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी असल्याचे मंत्री श्री. विखे -पाटील यांनी सांगितले, तसेच याबैठकीत जुन्या एमआयडीसीच्या संदर्भातील निंबळक एमआयडीसी येथील समांतर रस्त्याला, सुपा एमआयडीसीला ५० कोटी रुपयांचे अद्ययावत असे अग्न‍िशमन (फायर) स्टेशन, तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 5 : मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विद्यापीठ  स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मराठी भाषा विद्यापीठ समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे, समितीचे सदस्य डॉ. विद्या पाटील, प्रो. राजेंद्र नाईकवाडे, डॉ.अविनाश आवलगावकर, महंत कारंजेकर, डॉ.रमेश वरखेडे, डॉ.दिलीप धोंडगे, डॉ. रुपाली शिंदे, डॉ. केशव देशमुख, डॉ.छाया महाजन, मराठी भाषा विभागाचे सहसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी सर्व समिती सदस्यांनी सर्वांगीण अभ्यास करावा. या विद्यापीठात मराठी भाषेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

विद्यापीठाची स्थापना या वर्षाच्या आत करण्यासाठी समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. तो प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येणार आहे.त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर करावे लागेल. सर्वांनी लवकरात लवकर संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

बैठकीत अभ्यासक्रम कशाप्रकारे राबवले जातील याबद्दल चर्चा करण्यात आली. तातडीने या विद्यापीठाच्या कामकाजास प्रारंभ व्हायला हवा. थीम पार्क क्षेत्रातच याची स्थापना करण्यात येईल व इमारत तयार झाल्यानंतर नव्या ठिकाणी सर्व विभाग स्थलांतरित केले जातील.” असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी अध्यक्ष श्री. मोरे यांचे स्वागत करून अहवाल सादर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

0000

‘शासन आपल्या दारी’ अभियानामुळे साडेबावीस लाख लाभार्थ्यांना लाभ

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेल्या या अभियानातून प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. तथापि, पुणे जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय अशी कामगिरी केली असून सुमारे २२ लाख ६१ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ आणि सेवांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे वितरित केलेल्या लाभांची किंमत सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती यांची शासन स्तरावरील कामे स्थानिक पातळीवरच मार्गी लागावीत, त्यांना विविध योजनांचे देय लाभ मिळावेत, त्यांना शासकीय कार्यालयात एकाच कामासाठी वारंवार चकरा घालाव्या लागू नये हा या अभियानामागचा उद्देश आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात महसूल मंडळ स्तरावर, तालुकास्तरावर या अभियानांतर्गत मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. जेजुरी (ता. पुरंदर) येथे भव्य जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

या अभियानाच्या माध्यमातून शासन थेट जनतेच्या दारी पोहोचले आहे. शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजना पोहोचण्यास व कमीत कमी कागदपत्रे, जलद मंजुरी व शासकीय निर्धारित शुल्कात नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास हे अभियान उपयुक्त ठरले आहे. या उपक्रमाच्या पूर्वतयारीअंतर्गत १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणात गतीने कार्यवाही करत लाभ वितरणारी कार्यवाही करण्यात आली.

या अभियानाच्या माध्यमातून ३८५ विविध प्रकारचे लाभ वितरित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, अधिवास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र यासह विविध प्रकारचे दाखले, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, नावांची वगळणी, नवीन शिधापत्रिका तयार करणे आदी कामकाज, जात प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पोस्टामध्ये खाते उघडणे, पशुधन लसीकरण, आधार क्रमांक जोडणी व अद्ययावत करणे, आरोग्य तपासणी आदी लाभ प्रत्यक्ष देण्यात आले.

महाडीबीटी नोंद, फळबाग नोंद, बि- बियाणे मागणी अर्ज, शेती किट, फवारणी किट, बाजार किट, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पशुसंवर्धन विभागांतर्गत गायी, म्हशी, शेळी व मेंढी वाटप, परिवहन विभागांतर्गत शिकाऊ चालक अनुज्ञप्ती, सामाहिज न्याय व दिव्यांग कल्याण विभागांतर्गत दिव्यांग साहित्य वाटप, निवडणूक विषयक कामकाजाअंतर्गत नवमतदार नोंदणी, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, आयुष्मान कार्ड वितरण, प्रधानमंत्री आवास योजना तसेच विविध घरकुल योजनांच्या लाभांचे वितरण, महामंडळांच्या कर्ज योजना व अन्य योजनांचे लाभ या अभियानात नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

स्वामित्व योजना, कृषी यांत्रिकीकरण, जि. प. कृषी विभागातर्फे अवजार खरेदीसाठी अनुदान, स्वयंसहायता समूहाला अनुदान, स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, सौर पंप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अनुसूचित जमातीच्या नागरिकांना पर्यटन विकासासाठी अनुदान, जि. प.तर्फे महिलांना अर्थसहाय्य, अशा विविध योजनांचाही लाभ देण्यात आला.

या अभियानात २२ लाख ६१ हजार ७८७ लाभार्थ्यांना २ हजार ९९९ कोटी ९३ लाख रुपयांचे लाभ वितरित करण्यात आले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागांतर्गत २५ हजार २८० लाभार्थ्यांना, महिला व बालकल्याण विभाग ५१४ लाभार्थी, कृषी विभाग १ हजार ९५० लाभार्थी, ग्रामपंचायत विभाग २ हजार २१३ लाभार्थी, प्राथमिक शिक्षण विभाग ७ लाख १० हजार ११२ लाभार्थी, घरकुल योजनेचा ३ हजार ६६५ लाभार्थ्यांना याप्रकारे ठळक लाभ वितरित करण्यात आले.

जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत १६ हजार १२१ लाभार्थी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ६ हजार ५३९ लाभार्थी, संजय गांधी योजनेचा ९८ हजार ४० लाभार्थ्यांना, महसूल विभागाच्या विविध योजनांचा ४ लाख ६२ हजार ९८६ लाभार्थ्यांना, निवडणूक विभाग ६४ हजार ३६२ लाभार्थी, नगरपालिकेकडील लाभ २३ हजार ७६३ लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडील योजनांचा ४ लाख ८ हजार ६९८ लाभार्थ्यांना, कामगार आयुक्त १० हजार १७ लाभार्थी, अग्रणी बँक कार्यालयाच्यामार्फत विविध सेवांचा २ लाख ५१ हजार ४१० लाभार्थी, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा ६ हजार ९७४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. याशिवाय पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली असून अनुक्रमे २९ हजार २२० आणि ७५ हजार १७० लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ दिले आहेत.

महारोजगार मेळाव्यात ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी निवड

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या १ हजार २९ उमेदवारांपैकी ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली.

शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. अशा क्लिष्ट प्रक्रियेतून जाताना सर्वसामान्य नागरिकांची दमछाक होत असते. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात आले. त्याचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.

जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अभियानाचे यश सांगणारा होता.

-सचिन गाढवे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

‘आयुष्मान भारत’ व ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे कार्ड वितरण प्रक्रियेस गती द्यावी – केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत

मुंबई, दि. ५ : केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे,  असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी आज दिले.

केंद्रीय आरोग्य सचिव श्री. पंत यांनी आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना निर्देश दिले. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव नवीन सोना, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, राज्य आरोग्य विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त संचालक नितीन अंबाडेकर, स्वप्निल लाळे, सहसंचालक विजय कंदेवाड, सहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर आदी उपस्थित होते.

पुढील वर्षी नियोजित पीआयपीचे (प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लॅन) प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना देत आरोग्य सचिव श्री. पंत म्हणाले की, पीआयपी व पीएम अभिम अंतर्गत जास्तीत जास्त निधी खर्च करावा.  दर्जेदार काम आरोग्य क्षेत्रात उभारावे. जेवढा जास्त खर्च कराल,  तेवढा निधी केंद्र शासनाकडून मिळेल. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारतींची निविदा प्रक्रिया गतीने राबवावी.

बैठकीत आयुष्मान भव मोहीम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  तसेच राज्य शासनाचे विविध निर्णय, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात येणारा निधी व झालेला खर्च, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, वैद्यकीय शिक्षण विभागाचे निर्णय आदींचाही आढावा घेण्यात आला. बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभाग,  वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ/

 

आदिवासी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आश्रमशाळेत आदिवासी भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

            मुंबई‍‍दि. ०५ : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे. आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन  होवून ही भाषा शब्दकोशांच्या माध्यमातून जतन व्हावी म्हणून बोलीभाषांचे शब्दकोश शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

            मंत्रालयात मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी भाषेतील शब्दकोश प्रमाणित करण्याबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यासआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडउपसचिव विजेंद्रसिंग वसावेराईज फाऊंडेशन संस्थेचे ऋषिकेश खिलारे उपस्थित होते.

            मंत्री डॉ. गावित म्हणाले कीशासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात कोरकूपावराभिलालाकोलामकातकरीगोंडपारधीप्रधान या आठ भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देण्यात यावेत. पुढील टप्प्यात उर्वरित आदिवासी भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी धोरण निश्चित करावे. याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

            राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात आगामी काळात पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी बोलीभाषेत शिक्षण देण्याचा मानस आहे. राईज फाऊंडेशन ही संस्था आदिवासी बोली भाषेचे भाषिक संशोधन करण्याचे काम करते. या संस्थेने आदिम भाषेतील शब्द व संकल्पनांचा शब्दकोश तयार केला आहे. हा शब्दकोश आयुक्त कार्यालयाने शिक्षण विभागाकडून प्रमाणित करून घ्यावा. तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले बालभारतीच्या पुस्तकांचे आदिवासी बोलीभाषेत भाषांतर करून  शासकीय आश्रमशाळांना उपलब्ध करून द्यावेत. तसेच आयुक्त कार्यालयाने ध्वनीचित्रफित स्वरूपात आदिवासी बोलीभाषेतील शिक्षणसामग्री उपलब्ध करून द्यावीअसेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

*****

 

शैलजा पाटील/विसंअ/

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

            मुंबई, दि. ५ : विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

             सन 2022-23 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते सहकुटुंब गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री कपिल पाटील, विक्रम काळे, किरण सरनाईक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

            समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन 2021-22 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहेत. एक लाख दहा हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

            पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य शासन शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवनवीन योजना आणि उपक्रम राबवित आहे. शिक्षक हा यातील महत्त्वाचा घटक आहे. ते ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने पालकांनंतर गुरूजनांना महत्व दिले जाते. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचे शासनाचे ध्येय असून शिक्षणाचे महत्त्व जोपासण्यासाठी शासनामार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवून यात अधिक योगदान देण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र सरकारचे राज्याला पाठबळ असून त्या माध्यमातून राज्यात सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षण विभाग आणि शिक्षकांचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक राज्य शासनाचे ब्रँड अम्बॅसेडर ठरावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे. त्यामुळे शिक्षणाकडे भविष्याची गुंतवणूक म्हणून पाहणे गरजेचे आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे काम बलशाली देश घडविण्यामध्ये सहाय्यभूत ठरले पाहिजे, तसेच इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले पाहिजे, असे सांगून यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षक राज्य शासनाचे ब्रँड अम्बॅसेडर ठरले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षकांना दिलेल्या पुरस्कारांमुळे त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळते असे सांगून शिक्षकांना यापुढील काळात स्वत:ला सतत अपडेट आणि अपग्रेड करीत रहावे लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

            श्री.पवार म्हणाले, राज्य शासन सर्वाधिक खर्च शिक्षण क्षेत्रावर करीत आहे. हा खर्च सत्कारणी लागला पाहिजे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा, स्वच्छता, आनंददायी वातावरण आवश्यक असते. यासाठी उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कामे करण्याचाही शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री प्रगती करीत आहे, याचे श्रेय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना असून त्यांच्या नावे दिला जाणाऱ्या पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील भिडे वाडा येथे सावित्रीबाईंचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी प्रगतीशील भारत घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून वाचायला शिकवणारा शिक्षक समाजाला घडवतो आणि वाचवतो अशा शब्दांत शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. समाजात शिक्षकांना विशेष दर्जा असून विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागा असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविणार – दीपक केसरकर

            पुढची पिढी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करीत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार दिले जात असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शालेय शिक्षण विभाग काम करीत आहे. यात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे शासनाचे धोरण असल्याचे श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले. जनगणना आणि निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे विभागाच्या परवानगीशिवाय लादले जाऊ नये यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षकांचे मुख्यालय किती किलोमीटर अंतरापर्यंत असावे हे देखील लवकरच निश्चित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी उद्योगांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी वापरता येईल का याबाबत विभागामार्फत प्रस्ताव देण्यात आला असून शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पाच ते दहा वर्षांसाठी शाळांमधील सुविधांच्या विकासाची जबाबदारी उद्योगांकडे देता येईल, असे त्यांनी सांगितले.

            शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने 61 हजार शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविण्यात आला, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली, शिक्षकांच्या सतत होणाऱ्या बदल्या थांबविण्यात आल्या, शिक्षण सेवक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक आदींच्या मानधनात तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली. त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, पायमोजे शासनामार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडविण्यात आणि सक्षम नवीन पिढी घडविण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रास्ताविकाद्वारे शिक्षण प्रणालीत असलेले शिक्षकांचे महत्व अधोरेखित करून शिक्षक पुरस्कारासाठीच्या निवड प्रक्रियेची माहिती दिली.

 

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022-23 साठी निवड झालेले शिक्षक – प्रवर्गनिहाय यादी

प्राथमिक शिक्षक

श्रीमती स्पृहा सुरेश इंदू, चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा, चेंबूर मुंबई; डॉ.पूनम दीपक शिंदे, राजर्षी शाहूनगर हिंदी शाळा, धारावी, मुंबई; श्रीमती सीमा कृष्णकांत तायडे, मुंबई पब्लिक स्कूल, मालवणी व्हिलेज, मालाड, मुंबई; डॉ. नेहा निलेश संखे, मीरा-भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक चार, मिरे, जिल्हा ठाणे; संदीप दत्तात्रेय वारगे, जिल्हा परिषद शाळा हटाळे, जिल्हा रायगड; श्रीमती वरूणाक्षी भारत आंद्रे, जिल्हा परिषद शाळा चिंचणी नंबर ३, जिल्हा पालघर; श्रीमती माधुरी राजेश शेजवळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे, जिल्हा पुणे; वैभव विठ्ठल पोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी, जिल्हा पुणे; लक्ष्मीकांत एकनाथराव इडलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव, जिल्हा अहमदनगर; बाळासाहेब पुंडलिक बोडखे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2, जिल्हा सोलापूर; श्रीमती नलिनी बन्सीलाल अहिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगंगानगर, जिल्हा नाशिक; गोकुळ त्र्यंबक पाटील, जिल्हा परिषद निकुंभे, जिल्हा धुळे; पंकज गोरख भदाणे, जिल्हा परिषद शाळा बोडीपाडा, जिल्हा नंदुरबार; डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळा कंडारी, जिल्हा जळगाव; सचिन कुंडलिक देसाई, विद्या मंदिर बशाचामोळा, जिल्हा कोल्हापूर; धन्यकुमार प्रल्हाद तारळकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदने नायकुडे वस्ती, जिल्हा सातारा; प्रसाद राजाराम हसबनीस, जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, जिल्हा सांगली; लक्ष्मण सहदेव घाडीगावकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागवे कात्रादेवी, जिल्हा रत्नागिरी; दीपक तानाजी डवर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सौंदाळे, जिल्हा सिंधुदुर्ग; डॉ. विनोद पांडुरंग शिनकर, श्री सरस्वती जीवन प्रशाला औरंगपुरा, औरंगाबाद; निलेश नंदकुमार जोशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवलगाव, जिल्हा जालना; अण्णासाहेब अशोक घोडके, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी, जिल्हा बीड; योगेश बळीराम ढवारे, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू, जिल्हा परभणी; शंकर देवराव लेकुळे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोंढुर, जिल्हा हिंगोली; डॉ. सतीश नारायणराव सातपुते, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शासकीय वसाहत, लातूर; दीपक गुरुबसआप्पा भांगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इज्जतगाव, जिल्हा नांदेड; विक्रम बलभीमराव पाचंगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी, जिल्हा उस्मानाबाद; श्रीमती विजया संजय कोकमवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोरी, जिल्हा नागपूर; खुशाल किसन डोंगरवार, पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी, जिल्हा भंडारा; परमानंद रामलाल रहांगडाले, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातोना, जिल्हा गोंदिया; संतोष दामोदर नन्नावार, लोक विद्यालय तळोधी, जिल्हा चंद्रपूर; सुजय जगदीश बाछाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर, जिल्हा गडचिरोली; अंकुश जगन गावंडे, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दाभा, जिल्हा अमरावती; उमेश हिम्मतराव सराळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजवाडा, जिल्हा अकोला; संतोष कान्होजी पट्टेबहादूर, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कुरळा, जिल्हा वाशिम; सुरेश बन्सी उतपुरे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घिरणी, जिल्हा बुलढाणा; संदीप मधुकरराव कोल्हे,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी, जिल्हा यवतमाळ.

माध्यमिक शिक्षक

श्रीमती मनीषा महेंद्र शिंदे, स्वामी शामानंद हायस्कूल भटवाडी, घाटकोपर; डॉ. हेमाली प्रदीप जोशी, द बोरिवली एज्युकेशन सोसायटी, आरसी पटेल हायस्कूल, बोरिवली; डॉ. स्वाती जयदीप खैरे, द ग्रेटर मुंबई एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, विलेपार्ले; श्रीमती शमा खलीकुज्जमान तारापूरवाला, अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल, भायखळा; अविनाश मुरलीधर कुलकर्णी, पुणे विद्यार्थीगृहाचे विद्या भवन हायस्कूल नेरूळ, नवी मुंबई; राजेंद्र बाजीराव पालवे, सु. ए. सो. चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, जिल्हा रायगड;

सचिन दगडू पाटील, पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, जिल्हा पालघर; संपत माणिक गर्जे, भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी, पुणे; श्रीमती हर्षा बाळकृष्ण पिसाळ, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, डेक्कन, पुणे; मंगेश गुलाब कडलग, रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय, सात्रळ, जिल्हा अहमदनगर; तानाजी रामचंद्र माने, शरदचंद्र पवार प्रशाला, अवंतीनगर, जिल्हा सोलापूर; रावसाहेब खंडेराव जाधव, श्री अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस, जिल्हा नाशिक; संजय दगाजीराव पाटील, शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंबाळे, जिल्हा धुळे; रवींद्र अरूण गुरव, नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिर तळोदा, जिल्हा नंदुरबार; डॉ. सीमा भास्कर सैंदाणे, लाडकुबाई विद्या मंदिर भडगाव, जिल्हा जळगाव; सुधीर आप्पया आमणगी, माध्यमिक विद्यालय कसबा आरळे, जिल्हा कोल्हापूर; डॉ. शुभांगी तानाजी कुंभार, जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल, वर्ये, जिल्हा सातारा; प्रशांत प्रकाशराव चव्हाण, क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर सोनी, जिल्हा सांगली; जयसिंग माणकू पाटील, बॅ. नाथ पै विद्यालय व जुनिअर कॉलेज, हर्चे, जिल्हा रत्नागिरी; श्रीमती सुषमा प्रवीण मांजरेकर, विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस, जिल्हा सिंधुदुर्ग; डॉ. संतोष पांडुरंग भोसले, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय, औरंगाबाद; कल्याण नरसिंगराव सोळुंके, मत्स्योदरी विद्यालय अंबड, जिल्हा जालना; महेश चंद्रकांत गाडे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ताडसोन्ना, जिल्हा बीड; श्रीमती छाया उमाजी गायकवाड, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, परभणी; अशोक हनुमंतराव सुरवसे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली; डॉ. संदीपान गुरूनाथ जगदाळे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर; शेख इरफान अहमद मोहम्मद अशरफ, जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव, जिल्हा नांदेड; भैरवनाथ खंडू कानडे, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय चिकुंद्रा, जिल्हा उस्मानाबाद; डॉ. ज्योतीमणी रॉक्यू, दीनानाथ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज धंतोली, नागपूर; युवराज दयाराम खोब्रागडे, जिल्हा परिषद हायस्कूल पालंदुर, जिल्हा भंडारा; महेंद्र भूवराज सोनेवाने, शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव, जिल्हा गोंदिया; श्रीमती स्मिता अनिल चिताडे, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर; श्रीमती जयश्री विजय खोंडे, धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी, जिल्हा गडचिरोली; गणेश जानराव मस्के, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आर्वी, जिल्हा वर्धा; अतुल रमेशराव पडोळे, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुर्जना घाट, जिल्हा अमरावती; बबलू श्रीराम तायडे, जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी, जिल्हा अकोला; डॉ. संतोष दामोदर पेठे, यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजळाबा, जिल्हा वाशिम;

श्रीमती सुवर्णा नंदकिशोर कुलकर्णी, आदर्श विद्यालय चिखली, जिल्हा बुलढाणा; साईनाथ मारोतराव चंदापूरे, श्री गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर उमरखेड, जिल्हा यवतमाळ.

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक प्राथमिक

बापू शंकर ढोडरे, जिल्हा परिषद शाळा दोऱ्याचापाडा, जिल्हा ठाणे; शरद महादेव नागटिळक, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव, जिल्हा रायगड; संजय हरिश्चंद्र पाटील, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यामंदिर हमरापुर, जिल्हा पालघर; संतोष रामचंद्र थोरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडाळे, जिल्हा पुणे; नरेंद्र खंडू राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीर्थाचीवाडी, जिल्हा अहमदनगर; श्रीमती माधुरी केवळराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे, जिल्हा नाशिक; विलास शिवाजीराव जमदाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी, जिल्हा नाशिक; श्रीमती वैशाली प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषद शाळा धोंगडे दिगर, जिल्हा धुळे; श्रीमती रोहिणी गोकुळराव पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळा लोथ, जिल्हा नंदुरबार; अनिल शिवाजी माळी, जिल्हा परिषद शाळा वरुळ, जिल्हा नंदुरबार; श्रीमती कल्पना देविदास माळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसाडे, जिल्हा जळगाव; सुरेंद्र गंगाधर कुडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी, जिल्हा नांदेड; महेंद्र प्रेमलाल सोनेवाने, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचाळा, जिल्हा नागपूर; सुरेश गजाननजी कश्यप, जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी, जिल्हा गोंदिया; संजय विस्तारी येरणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी, जिल्हा चंद्रपूर; अशोक धाडूजी बोरकुटे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहुर्ली, जिल्हा गडचिरोली; दिलीप रावजी नाकाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतानपार, जिल्हा गडचिरोली; जितेंद्र सत्यनारायणजी राठी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादेही, जिल्हा अमरावती; दीपक वसंतराव पडोळे, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा, घोन्सी केंद्र केळापूर, जिल्हा यवतमाळ;

थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

श्रीमती प्रेरणा जयवंत शेलवले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहुली, जिल्हा ठाणे; श्रीमती वृषाली सुनील कडलग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धांदरफळ बुद्रुक, जिल्हा अहमदनगर; श्रीमती कुंदा जयवंत बच्छाव, महानगरपालिका शाळा क्रमांक 18, आनंदवली, नाशिक; श्रीमती नकुशी पांडुरंग देवकर, विद्या मंदिर बाचणी, जिल्हा कोल्हापूर; डॉ. सविता जयंत मुळे. श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, सरस्वती नगर, औरंगाबाद; श्रीमती शेख वजात नौशिन शेख हमीदोद्दीन, जिल्हा परिषद उच्च शाळा येळेगाव, जिल्हा नांदेड; श्रीमती दीप्ती चंदनसिंह बिष्ट, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा महानगरपालिका वेटरनरी कॉलेज, नागपूर; श्रीमती अंजली भवानीशंकर देव, मनीबाई गुजराती हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय अंबापेठ, जिल्हा अमरावती.

विशेष शिक्षक (कला)

महादेव शरणाप्पा खळूरे, यशवंत विद्यालय फुलेनगर अहमदपूर, जिल्हा लातूर.

विशेष शिक्षक (क्रीडा)

शिवाजी पांडुरंग पाटील, स्वातंत्र्य सैनिक मारूती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे, जिल्हा कोल्हापूर.

दिव्यांग शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक

छगन पंढरीनाथ पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडे, जिल्हा जळगाव.

शिक्षक (स्काऊट)

बालासाहेब मोहनराव चिवडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला खुर्द, जिल्हा उस्मानाबाद.

शिक्षक (गाईड)

श्रीमती वर्षा हिरामण दळवी, रायगड जिल्हा परिषद शाळा वराठी, जिल्हा रायगड.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून वजन काट्यांची पडताळणी, मुद्रांकन बंधनकारक

मुंबईदि. 5 : वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याखालील नियमांनुसार सर्व प्रकारचे वजन व काटे यांचे आयातउत्पादनदुरुस्ती अथवा विक्री करावयाची असल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून उत्पादनासाठी उत्पादक परवानादुरुस्ती परवाना अथवा विक्रीसाठी परवाना घेणे आवश्यक आहे. सर्व वजनकाट्यांची स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून पडताळणी व मुद्रांकन करून घेणे बंधनकारक आहे. वजनकाट्यांची वेळेत पडताळणी व मुद्रांकन झालेले आहे किंवा नाही याची खात्री करावी व याबाबत कुठलीही तक्रार असल्यास dyclmmumbai@yahoo.in येथे ई-मेल करावाअसे आवाहन सहनियंत्रकवैधमापन शास्त्रमुंबई यांनी केले आहे.

परवाने न घेता राज्यात खुल्या बाजारात वजनकाट्यांची उत्पादनदुरुस्ती व विक्री सुरु असल्याच्या तक्रारी वैधमापन शास्त्र विभागाकडे येत आहेत. तसेच चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजनकाट्यांचीसुद्धा कमी दरात राज्यात खुल्या बाजारात विक्री केली जात आहे. या काट्यांना राज्य किंवा केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. हे वजनकाटे अप्रमाणित असल्यामुळे ग्राहकहित साधले जात नाही. तसेच बाजारात अनधिकृत व्यक्ती त्यांचे स्टीकर वजनकाट्यांना लाऊन त्यांची अनधिकृत विक्री करीत आहेत. ग्राहकहिताच्या दृष्टिकोनातून व्यापारी वर्गवजनमाप उपयोगकर्ते व ग्राहकांनी परवानाधारक व्यक्तीकडूनच वजन काट्यांची खरेदी अथवा दुरूस्ती करावीअसे आवाहनही सीमा बैससहनियंत्रकवैधमापन शास्त्र विभाग यांनी केले आहे.

0000

ताज्या बातम्या

 प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न...

0
मुंबई,दि.७ :  प्रत्येक व्यक्तीला निरोगी  आयुष्य जगण्यासाठी चांगल्या आहाराची आवश्यकता असते.सुरक्षित अन्न व औषध प्रत्येक व्यक्तीला मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने "अन्न सुरक्षा:...

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा...

0
मुंबई, दि. ७ :- राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापकांकडे...

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. ७ :  महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या...

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

0
रायगड दि. ७ जून : रोहा-अष्टमी नगर परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या ‘शिवसृष्टी’ या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री ...

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

0
सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश...