मंगळवार, जून 10, 2025
Home Blog Page 1093

आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगाने भारत जगात आदर्श ठरेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई, दि. 13 : डिजिटल तंत्रज्ञान उपयोगात आणण्यामध्ये भारत उत्साहाने पुढे येत आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची प्रशंसा जगात होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर छोटे शहर आणि गावांना डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडण्यात भारत जगात उत्तम उदाहरण बनले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशनची सुरुवात करण्यात आली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आरोग्य क्षेत्रातील उपयोगामुळे भारत या क्षेत्रात जगामध्ये आदर्श ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

आयुष्मान भव: या 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गांधीनगर, गुजरात येथील राजभवनात करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेब लिंकद्वारे थेट प्रसारण सह्याद्री अतिथी गृह येथील मोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमात  करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना उपस्थित होते.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, की देशाने कोविड साथ रोगाच्या काळात खूप चांगल्या कामाचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. देशातील शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, अन्य आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी तसेच कुशल प्रशासन व नेतृत्वाच्या जोरावर यामधून देश बाहेर पडला. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविली. लोकसहभागातून अशक्यप्राय वाटणारे हे काम शक्य करून दाखविले.

प्रधानमंत्री क्षय रोग मुक्त भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कृत करण्याचे काम प्रशंसनीय असून क्षयरोग निर्मूलनात निक्षय मित्र म्हणून काम करणाऱ्या मित्रांचा सन्मानही स्पृहणीय आहे. आयुष्मान भव: मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी मोहिमेची विस्तृत माहिती देत मोहीम यशस्वी करून प्रत्येकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्य पुरस्कार अमरावतीच्या प्रमोद महादेव पुरी यांना जाहीर

अमरावती, दि. 13 :  राज्य शासन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करीत असते. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान होतो तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही त्याव्दारे प्रेरणा मिळत असते.

सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे सन 2021-22 ची राज्य पुरस्कार प्राप्त अधिकारी/कर्मचाऱ्यांची यादी शासन निर्णयाव्दारे नुकतीच जाहीर केली. त्यात मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक अमरावती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रमोद महादेव पुरी यांचा समावेश आहे.

प्रमोद पुरी हे नम्रता, वक्तशीरपणा व कार्यालयीन कामकाजामुळे महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. राज्यात २०१६ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला, ह्याची अधिसूचना २०१९ ला निर्गमित झाली. आणि ह्याच वेळेला २०१९ पासून खऱ्या अर्थाने प्रमोद पुरी यांच्या कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. प्रमोद पुरी यांनी सातवा वेतन आयोगाचे फिक्ससेशन, विकल्प आणि थकबाकी याबाबत सविस्तर मार्गदर्शन संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाले आहे. प्रमोद पुरी हे अमरावतीला मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून आज राज्यातील हजारो नवतरुण अधिकारी आणि लिपिक यांना प्रशासकीय बाबींचे धडे देत आहेत.

सातवा वेतन आयोगाचे मार्गदर्शन करण्यासाठी यशदा पुणे ह्या संस्थेने त्यांची राज्य मार्गदर्शक म्हणून निवड केली होती. प्रशासकीय कामात गती प्राप्त होण्यासाठी कर्मचारी ऑनलाईन कामात साक्षर असणे गरजेचे आहे. प्रमोद पुरी स्वतः ऑनलाईन कामात अत्यंत कुशल असून राज्यातील हजारो नवतरुण कर्मचाऱ्यांना स्वतःच्या Pramod Puri या Youtube चॅनेल व www.pramodpuri.com ह्या website च्या माध्यमातून प्रशासकीय कामाचे ज्ञान देण्याचे काम ते करत आहेत.

सामाजिक व व्यावसायिक बांधिलकी जपणारे प्रमोद पुरी यांना सन २०२१-२२ चा राज्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व समन्यातून त्यांचे कौतुक होत आहे तर पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याने शासनाचे आभार सर्व सामन्यातून मानले जात आहे.

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी ” अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधुन अभियंता गौरव समारंभ 2023 हा षण्मुखानंद सभागृह, माटुंगा, मुंबई येथे साजरा होत आहे. त्या समारंभात श्री पुरी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

000

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 13 : पणन हंगाम २०२३-२४ मध्ये धान व भरडधान्य प्रक्रिया पारदर्शक होण्याकरिता ऑनलाईन खरेदी पोर्टलवर शेतकरीनोंदणी तसेच लॉट एन्ट्री करताना आधार प्रमाणीकरण पद्धतीचा वापर करावा, तसेच मागील पणन हंगामात सुरु असणारी खरेदीकेंद्र चालू हंगामात सुरु ठेवण्यात यावीत. तथापि, अशी खरेदी केंद्र सुरु करण्याअगोदर त्या खरेदी केंद्रांबाबत मागील पणन हंगामामध्ये तक्रार नसल्याची खात्री अभिकर्ता संस्थांनी करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.

पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यात खरेदी करावयाच्या धान व भरडधान्य यांच्या खरेदीपूर्व तयारीच्या नियोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले.

धान खरेदीसाठी नवीन खरेदी केंद्र सुरु करण्याकरिता अभिकर्ता संस्थांनी त्यांच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस प्रस्ताव सादर करावेत. समितीने त्याबाबत निर्णय घ्यावा. ज्या जुन्या (पणन हंगाम २०२२-२३ मधील) खरेदी केंद्रांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याबाबत चौकशी करुन तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास अशी खरेदी केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्तावही अभिकर्ता संस्थांनी समितीसमोर सादर करावा. समितीने त्याबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

मागील हंगामात झालेली खरेदी विचारात घेऊन आवश्यकतेनुसार खरेदी केंद्रांमध्ये वाढ करण्याबाबतही समितीने निर्णय घ्यावा. धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध करुन द्यावयाच्या पायाभूत सुविधांबाबत योग्य ती कार्यवाही संबंधित यंत्रणांनी करुन धान खरेदी तसेच साठवणूक आणि वितरणप्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षित ग्रेडर, धान साठवणूक गोदामे, केंद्र शासनाच्या स्वीकृत कार्यप्रणालीनुसार (SOP) बाबींच्या पूर्ततेसह  सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी सूचित केले. तसेच अभिकर्ता संस्थांनी बाजार समित्यांच्या आवारामध्ये सुरु होणाऱ्या खरेदीकेंद्रांवर बाजार समित्यांमार्फत सुविधा उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. धान व भरडधान्य खरेदी करताना धान्याची गुणवत्ता तपासणी करुनच ते स्वीकारले जावे. धान खरेदी करताना खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित ग्रेडरमार्फत तपासणी करुनच केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दर्जानुसारच धान खरेदी करावे, असे मंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले.

बैठकीस विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहसचिव सतिश सुपे,मार्केटिंग फेडरेशनचे सुधाकर तेलंग, आदिवासी विकास महामंडळाच्या श्रीमती बनसोडे, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह पुरवठा विभागाचे उपायुक्त,जिल्हा पुरवठा अधिकारी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

वंदना थोरात/विसंअ/

धान भरडाईसाठीच्या दर सुधारण्यासाठीचा अहवाल सादर करावा – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुबंई, दि. 13 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या धानाच्या भरडाईकरीता केंद्र शासनामार्फत दर निश्चित करण्यात आला आहे. या दराव्यतिरिक्त राज्य शासनाने इतर काही राज्यांप्रमाणेच अतिरिक्त दरवाढ करण्याच्या गिरणी मालकांच्या मागणीबाबत समाधानकारक तोडगा काढणार असून त्यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

हंगाम 2021-22 व 22-23 मधील भरडाईच्या अनुषंगाने राइस मिलर्स असोसिएशनच्या मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधितांना निर्दैशित केले. बैठकीस आमदार राजू कारेमारे, तसेच गिरणी मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, धानाच्या भरडाईकरीता गिरणी मालकांच्या अडचणींबाबत विभागाचा सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. यामध्ये वाहतूकदर तसेच हमाली खर्चात प्रती क्विंटल दरवाढ करणे, गोदामाच्या ठिकाणी माल चढवणे तसेच वितरण केंद्रावर माल उतरवण्याच्या प्रक्रियेसाठीचा खर्च, बदलत्या इंधनदर, मजुरीदरानुसार त्यात काय बदल करता येणे शक्य आहे, या बाबींची तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधिताना दिल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ/

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ साठी १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून आवाहन

नवी दिल्ली  13 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होती. आता ती वाढवून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.

महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार, क्षमता, उमेद आणि उत्साहाचा  गौरव करण्यासाठी  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  (पीएमआरबीपी) प्रदान करत असते.

या पुरस्कारासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले  तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात किंवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुला-मुलींचे नामांकन करु शकतात. प्राप्त अर्जांची छाननी प्रथम छाननी समितीद्वारे केली जाते. अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीद्वारे केली जाते. 26 डिसेंबर 2023 रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील. राष्ट्रपती महोदय यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या विशेष समारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरुप पदक, रोख एक लाख रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे.

अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती तसेच पुरस्कारांसाठीचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे.

000000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 171, दि.13.09.2023

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

घडलेले मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत असताना. या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार योग्य नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलूया अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद ‘सोशल मीडिया’वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली आणि सकारात्मक भूमिका घेतली असताना, संवादाचा मार्ग प्रशस्त केला असताना खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत.

शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. राज्यात असलेले सकारात्मक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवाहन केले आहे.

००००

एसटी बसचे आरक्षण आता ‘आयआरसीटीसी’वरुनही करता येणार

मुंबई, दि. १३ :- एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी याकरिता एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या.

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एम.एस.आर.टी.सी) अर्थात एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.

यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) प्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे.

रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीट देखील आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल. अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या करारप्रसंगी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन- नैनुटिया, IRCTC च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सिमा कुमार आदी उपस्थित होते.

0000

कामगारांसाठीच्या ‘तपासणी ते उपचार’ योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार – कामगारमंत्री सुरेश खाडे 

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेत  कामगाराच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार असल्याची माहिती कामगारमंत्री तथा कामगार  कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी दिली.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवत असून यापुढेही कामगारांचे आरोग्य, घरकुल, मुलांचे शिक्षण यावर भर देणार असल्याचे, मंत्री श्री. खाडे यांनी सिटू संघटनेने कामगारांसाठी केलेल्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.

कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ आणि सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात  झाली. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, कामगार कल्याण मंडळाचे सचिव विवेक कुंभार, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सिटूचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, महासचिव कॉ. भरमा कांबळे, उपाध्यक्ष कॉ. शिवाजी मगदूम व इतर सदस्य उपस्थित होते.

कामगारांच्या पाल्यांना बी.फार्म. करण्यासाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते, या रकमेत वाढ करण्यासोबतच पी.एच.डी. आणि एम.फील. करणाऱ्या  विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. बांधकाम कामगारांना ‘मध्यान्ह भोजन’ ही योजना अतिशय उत्तमप्रकारे सुरू आहे. यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून लाखो नोंदणीकृत कामगारांना मोफत जेवण मिळत असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.

मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी कामगारांना नाक्यावर थांबण्यासाठी शेड उभारणी करणार असून त्याठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कामगारांच्या मदतीसाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणार असून कामगार विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्याचबरोबर राज्यात मोठ्या संख्येने बांधकाम चालू आहे. यातून मंडळाचा उपकर वाढविण्यासाठी कामगार संघटनांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी केले.

०००००

मनीषा सावळे /विसंअ/

‘आयुष्मान भव:’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. १३ : आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव:’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

आजपासून देशात ‘आयुष्मान भव:’ मोहिमेस सुरुवात झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी राज्याच्या मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रितपणे २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र आरोग्याच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असून सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून  यासाठी “आयुष्मान भव” ही महत्त्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

विविध उपक्रमांचा शुभारंभ

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या “निक्षय मित्र” व जिल्ह्यांना देखील गौरविण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य या एकत्रित योजनेच्या कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली. राज्यात या योजनेचे  २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे.

आज या समारंभात आरोग्य आधार अॅप, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅप, तसेच राज्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रातील अधिकाऱ्यांसाठीचे “समुदाय आरोग्य अधिकारी अॅप” यांचा शुभारंभ करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ही मोहीम राबवताना गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहीम, अवयवदान जागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबविण्यात येतील. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी  नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या वर्षभरात ११२ कोटीपेक्षा जास्त  मदत केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

२ ऑक्टोबरला आयुष्मान ग्रामसभा

२ ऑक्टोबर रोजी आयुष्यमान ग्रामसभा होणार असून ती आयुष्मान भारत आरोग्य योजनेच्या जाणीवजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आयुष्मान ग्राम सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी त्याचबरोबर यापूर्वी ज्या लाभार्थ्याने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संलग्नित असेलल्या रुग्णालयांची यादी अद्ययावत असावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अवयवदानाला महत्त्व

अवयव दान हे सर्वात मोठे आणि पुण्याचे कार्य आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आयुष्मान सभेमध्ये याविषयीही जागृती करण्यात यावी. क्षयरुग्ण यांना पोषण आहार देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ बनविणे हा उपक्रमही राज्यातील सामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

0000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १४ सप्टेंबर तर ‘दिलखुलास’ मध्ये १४, १५ आणि १६ सप्टेंबर रोजी पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत

मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी पर्यटन संचालनालयाने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचावी यासाठी विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, सण, उत्सव, भाषा, परंपरा जगभरात पोहोचावी यादृष्टीने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटनस्थळी कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण याबाबत डॉ. पाटील यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.४० ते ७.५५ या वेळेत तर, शुक्रवार दि. १५ आणि शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. १४ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

ताज्या बातम्या

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. 9 : ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-3 या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद...

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये उद्या भाषण

0
मुंबई, दि. 9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral...

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0
मुंबई, दि. 9 : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील...

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

0
ठाणे,दि.09(जिमाका):- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश...