सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 1094

प्रत्येक शिधापत्रिकाधारकांपर्यंत धान्य पोहोचवावे – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 12 : प्रत्येक पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच गरीब, गरजू लाभार्थींना विनासायस  शिधापत्रिका देखील दिल्या जाव्यात, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी येथे दिले.

मुंबईतील आझाद मैदानात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने रेशन दुकानाच्या बाबतीत विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. मंत्री श्री. भुजबळ यांनी या महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या शिष्टमंडळात आमदार विनोद निकोले, संघटनेच्या प्राची हतिवलेकर, केरळच्या माजी मंत्री मरियम ढवळे, नसीमा शेख, रेखा देशपांडे, पी.के श्रीमंती यांचा समावेश होता.

००००

वंदना थोरात/विसंअ/

 

 

राज्य बाल धोरणात सोशल मीडियासह, अंमली पदार्थांपासून बालकांना परावृत्त कार्यक्रमाचा समावेश करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 12 : बालके व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल, सोशल मीडिया आणि अंमली पदार्थाचे व्यसन जडल्याचे निदर्शनास येत आहे. या व्यसनांपासून मुलांना परावृत्त करण्यासाठीच्या (डीटॉक्स) कार्यक्रमाचा समावेश करून, बाल धोरणाचा मसुदा जलदगतीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

बालविवाह प्रतिबंधासाठी उपाययोजना, महाराष्ट्र बाल धोरण, महिला धोरण, पाळणाघर योजना, अंगणवाडी सेविकांच्या कामकाजाचा आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, मोबाईल, सोशल मीडियाचे व्यसन आणि ड्रग्जचे व्यसन जडलेल्या मुलांसाठी डीटॉक्स कार्यक्रम राबविण्याबाबत बालधोरणात  समावेश करण्यात यावा. आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या मदतीने हा डीटॉक्स कार्यक्रम शाळांमध्ये राबविल्यास मुलांची मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शासकीय वसतिगृहांच्या तपासणीसाठी नियुक्त कृतीदलाचा अहवाल तत्काळ सादर करावा. तसेच, ज्या गावांमध्ये पात्र महिलांच्या अभावी अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत, अशा गावांत महसूल क्षेत्रातील महिलांची अंगणवाडी सेविका पदावर नेमणूक करण्यासाठी अटी शिथिल करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी.

केंद्र पुरस्कृत पाळणाघरांची संख्या आणि मागणी असलेल्या पाळणाघरांची संख्या, लाभ घेतलेल्या महिलांची सामाजिक प्रवर्गनिहाय संख्या तसेच गर्भधारणा आणि प्रसुतीपश्चात नैराश्य या समस्येसाठी मानसोपचारतज्ज्ञ सेवा, कुटुंबासाठी विशेष समुपदेशन सुविधेसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देशही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिले. ग्राम बाल संरक्षण समित्यांमध्ये प्रशिक्षण देऊन गावांत एकही बाल विवाह होऊ नये या उद्देशाने कार्यवाही करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बालकांसाठी पुन्हा १०९८ हेल्पलाईन सुरू

बंद अवस्थेत असलेली १०९८ ही हेल्पलाईन मंत्री कु. तटकरे यांच्या पुढाकाराने पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले. या हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत असूनही,  प्रकरणे २४ तासांत निकाली काढण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाल धोरणात बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि विकास, बाल संरक्षण, बालकांचा सहभाग, आर्थिक, सामाजिक आणि इतर असुरक्षितता या बाबींमुळे वागलेली बालके, अनुसूचित जाती व जमाती, विभक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील बालके, शहरी भागातील गरीब बालके, रस्त्यावर राहणारी बालके, हंगामी स्थलांतरित व दुर्लक्षित बालके, दिव्यांग बालके, समलैंगिक, तृतीयपंथी, नैसर्गिक आपत्तीमुळे व नैसर्गिक बदलामुळे बाधित बालके, अनाथ, हरवलेली, अनैतिक व्यापारातील, बाल कामगार, लैंगिक अत्याचार पीडित, कैद्यांची मुले, देहविक्री करणाऱ्या महिलांची बालके, एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने बाधित मुले, बालगृहातील, सुधारगृहातील बालके, विविध यंत्रणा, तसेच बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. बाल धोरण अधिक लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही आयुक्त डॉ. नारनवरे यांनी यावेळी सांगितले.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

 

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आयटो’चे अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल – प्रधान सचिव राधिका रस्तोगी

मुंबई, दि. 12 : इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) , केंद्र शासनाचा पर्यटन विभाग व पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्ममाने २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयटीसी हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद  येथे ३८ व्या ‘आयटो’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी दिली.

कफ परेड येथील हॉटेल ताज प्रेसिडेन्ट येथे ‘आयटो’ परिषदेबद्दल माहिती देण्यासाठी पर्यटन विभाग व ‘आयटो’मार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती रस्तोगी बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ‘आयटो’चे अध्यक्ष राजीव मेहरा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, ‘आयटो’चे मानद सचिव संजय रजझदान,’आयटो’ उपाध्यक्ष रजनीश कैस्था यासह आयटोचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

श्रीमती रस्तोगी म्हणाल्या की, महाराष्ट्र हे या परिषदेचे यजमानपद भूषवित असून तीन दिवस चालणा-या या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाची बलस्थाने पर्यटन क्षेत्रातील  विविध घटकांना समजावून सांगता येतील. महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील ‘आयटो’च्या माध्यमातून विविध घटकांपर्यत जाईल. या परिषदेत विविध मार्गदर्शपर व्याख्यानांचे आयोजन केले आहे, यामध्ये हॉटेल्स आणि टूर ऑपरेटर्स यांच्यातील समन्वय : काळाची गरज, तंत्रज्ञानाचा बदलणारा चेहरा : क्रूझ पर्यटन, नदी पर्यटन आणि  सागरी किनारी पर्यटन, महाराष्ट्रातील पर्यटन संधी आणि आव्हाने, औरंगाबादमधील पर्यटनाच्या संधी या विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील सहभागीधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होईल.

‘आयटो’चे अध्यक्ष श्री. मेहरा म्हणाले की, ‘आंतरराज्य पर्यटन आणि नाविन्यपूर्ण शाश्वत पर्यटन’ ही या ‘आयटो’ची थीम असून तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात  ‘इंडिया ट्रॅव्हल मार्ट’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशभरातून ९०० ते १००० एवढे पर्यटनाशी निगडित संस्थेचे भागधारक उपस्थित राहणार आहेत. परिषदेत सहभागी राज्यांना त्यांच्या पर्यटन स्थळांची  माहिती व पर्यटन व्यवसायिकांशी परस्पर संवाद (Interaction) साधण्यास संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या परिषदेत सहभागी राज्यांना निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ) ही भारताची टूर ऑपरेटर्सची राष्ट्रीय सर्वोच्च संस्था आहे ज्याचे देशभरातील सदस्यत्व आहे. या संस्थेच्या सदस्यामध्ये देशाचे इनबाउंड टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, हॉटेल चेन, एअरलाइन्स, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, ट्रॅव्हल प्रेस आणि मीडिया, पर्यटन शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारचे पर्यटन विभाग व राज्य पर्यटन विकास महामंडळे यांचा समावेश आहे. आयटो चे वार्षिक अधिवेशन हे भारतीय पर्यटन दिनदर्शिकेतील सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक मानले जाते.

श्री. मेहरा यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दर्शन घडवण्यासाठी टूरचे आयोजन प्रतिनिधींसाठी करण्यात आले आहे. त्यात अजिंठा आणि वेरूळ लेणी, शिर्डी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, लोणार सरोवर, शनी शिंगणापूर मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, सुशील मंदिर आदींचा समावेश असेल. 1 ऑक्टोबर रोजी आयटो रन फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम आयोजित करणार आहोत.

यावेळी पर्यटन संचालक डॉ. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी यांनी महाराष्ट्र राज्यातील पर्यटनास संधी असल्याची माहिती यावेळी दिली.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम

मुंबई, दि. 12 : देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार असून राज्यस्तरावर या मोहिमेचा कार्यारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

धर्मादाय रूग्णालयांविषयीचे  आरोग्य आधार ॲप व राज्यातील खासगी आरोग्य संस्थांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲप, आरोग्यवर्धिनी केंद्रामधील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांची दैनंदिन उपलब्धता तसेच कामावर आधारित मोबदल्याची अदायगी याचे सनियंत्रण करण्याकरीता समुदाय आरोग्य अधिकारी ॲप यांची राज्यस्तरावर सुरूवात मोहिमेच्या कार्यारंभ सोहळ्यावेळी करण्यात येणार आहे.

सर्व जिल्ह्यांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असून गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविणे व जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अयवयदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम, वय वर्ष 18 वरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ सेवा पंधरवाडाही राबविण्यात येईल. ‘आयुष्मान आपल्या दारी’ अंतर्गत पात्र लाभार्थींचे आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण, स्वयं नोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहित करणे, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे संयुक्त कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.

आयुष्मान सभेचे 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामसभेच्या स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन दर आठवड्याला शनिवारी करण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार,  दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग व इतर असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान  व उपचार, तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्र रोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी होईल. या सर्व मेळाव्यांदरम्यान 18 वर्ष व अधिक वयोगटातील पुरूषांची आरोग्यविषयक सर्वंकष तपासणी करण्यात येणार असून  ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे दर आठवड्याला आरोग्य मेळावा पार पडणार आहे.

निलेश तायडे/विसंअ/

 

 

कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 12 : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’ संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ३ ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र.शा. नाईकवाडी यांनी केले आहे.

कृषी आयुक्तालयाच्या ११ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे श्री. नाईकवाडी यांनी कळविले आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

 

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 12 : बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या विविध विधेयकांच्याबाबतीत शेतकरी, कृषी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निविष्ठा उत्पादक, विक्रेते तसेच संबंधित विविध घटकांकडून सुधारणा व सूचना मागविण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी गत पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निवेष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते. विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहाने हे विधेयक दोन्ही सभागृहांच्या 25 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. या संयुक्त समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.

या बैठकीस विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, रमेश कराड, कैलास पाटील, वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य प्रशांत बंब, संजय रायमुलकर, सुरेश वरपुडकर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समितीतील विविध सदस्यांनी विधेयकातील तरतुदीबद्दल आपले मत मांडले. तसेच विविध सुधारणा सुचवल्या त्यावर समितीचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी, हा कायदा व्यापक जनमानसावर प्रभाव टाकणारा असल्याने विधेयकाच्या प्रारूपाची सूक्ष्म चिकित्सा झाली पाहिजे, असे मत मांडले. तसेच गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे, त्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली पाहिजे. समाजातील सर्व घटकांकडून 30 दिवसांच्या आत सूचना मागून घेण्यात येतील व त्यानंतर त्यावर सखोल विचार करून समिती निर्णय घेईल, असे त्यांनी जाहीर केले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

 

‘दिल्लीची बुलबुल’ सचित्र कथासंग्रहाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 12 : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे चारित्र्य आणि दृष्ट‍िकोन उत्तम राहण्यासाठी चांगले वाचन गरजेचे असून कथासंग्रह यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले.

उत्तरप्रदेश सरकारच्या निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव तसेच नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकारच्या विश्वस्त डॉ. अनिता भटनागर जैन लिखित ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र कथासंग्रहाचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. त्याचे प्रकाशन मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आज त्यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी झाले. यावेळी निवृत्त महसूल सेवा अधिकारी आशू जैन, बंदरे, परिवहन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, विद्या प्रकाशन मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ जैन आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, पर्यावरण आणि नैतिकता हे विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्ट‍िकोन उत्तम राखण्यात महत्वाचे घटक आहेत. भाषा समृद्ध होण्यासाठी आणि सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी देखील प्रादेशिक भाषेतील कथासंग्रह उपयुक्त ठरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ.जैन यांनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये विविध विषयांवरील 60 पेक्षा अधिक साहित्य लेखन केले असून त्यांची पर्यावरण, नैतिकता आणि संस्कृती या विषयांवर भर देणारी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली पुस्तके सुमारे 15 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांना त्यांच्या पुस्तकांसाठी विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

आजी आजोबा हे एकत्रित कुटुंब पद्धतीचा आधार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 12 : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पद्धतीमध्ये आजी – आजोबा हे आधारस्तंभ असून त्यांचे नातवंडांवरील प्रेम हे दुधावरच्या सायीसारखे असते. ज्येष्ठ नागरिक ही आपल्या राष्ट्राची अनमोल संपत्ती असून आजी – आजोबांना शाळेतील आपल्या नातवांबरोबर काही क्षण घालवता यावेत यासाठी ‘आजी – आजोबा’ दिवस साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज मुंबईतील सेंट कोलंबा या मुलींच्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आजी – आजोबांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्य शुभदा केदारी, माजी नगरसेवक आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी आशा विचारे मामेडी, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह शाळेच्या विद्यार्थिनी आणि त्यांचे आजी – आजोबा उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, चांगला समाज घडविण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते. यामुळेच शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगले व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. त्याचबरोबर शिक्षक आनंदी राहिले, तर ज्ञानदान अधिक चांगले होईल या उद्देशाने विद्यार्थ्यांना घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील शाळांच्या अनुदानवाढीचा निर्णय घेण्यात आला असून याचा लाभ सुमारे 61 हजार शिक्षकांना झाला आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पदभरती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देताना पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले, आठवीपर्यंत सर्वांना एकसारखा गणवेश, कोडिंग-डिकोडिंगचे प्रशिक्षण, शेती विषयाचा अभ्यासक्रमात समावेश, कौशल्य शिक्षण, परसबाग उपक्रम, रिड महाराष्ट्र अभियान आदींचा त्यांनी उल्लेख केला.

विद्यार्थ्यांच्या आनंदाचा निर्देशांक (हॅपिनेस इंडेक्स) चांगला असेल, तर ते अधिक चांगले ज्ञानार्जन करू शकतील. सेंट कोलंबा ही शाळा सुमारे 190 वर्षे ही दोन्ही कार्ये उत्तमरित्या करीत असल्याबद्दल शाळेचे कौतुक करून मंत्री श्री.केसरकर यांनी शाळेच्या मैदानासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार दिवस घालवता यावा यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

उपसंचालक श्री.संगवे यांनी प्रास्ताविकाद्वारे आजी – आजोबा दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे भावविश्व जोपासले जावे यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या संकल्पनेतून हा दिवस राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आजी – आजोबांचा गौरव करण्यात आला. त्यांच्यासोबत खेळ खेळण्यात आले. दीपिका उगरणकर आणि मीना गोखले या आजींनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी मल्लखांब, तलवारबाजी, नृत्य आदींचे प्रात्यक्षिक सादर केले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

मराठवाड्यातील इनाम जमिनीसंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 12 : विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा परिपूर्ण अभ्यास करुन इनाम जमिनीसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनास तातडीने सादर करावा असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

हैदराबाद रोख इनामे रद्द करणे अधिनियम 1954 चे कलम 2 अ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील बैठक आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सुरेश धस, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहसचिव श्रीराम यादव, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, औरंगाबाद विभागीय अपर आयुक्त बी. जे. बेलदार, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. पाठक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इनाम जमिनीसंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल करीत असताना यामध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांनी तेथील तज्ज्ञांना समितीमध्ये घ्यावे आणि त्यानंतर समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करावा. बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीच्या निराकरणाबाबत शासनाने छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांना एक सदस्यीय समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या समितीने दिलेला अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. या अहवालाचा सुद्धा अभ्यास विभागामार्फत करण्यात यावा असे श्री. विखे-पाटील म्हणाले.

हैद्राबाद इनामे आणि रोख अनुदाने नष्ट करण्याबाबत अधिनियम 1954 च्या कलम 2 (अ) (3) मध्ये सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाला सादर करण्यात आला आहे. या विभागाकडून अभिप्राय आल्यानंतर याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असेही श्री. विखे-पाटील म्हणाले.

——-

वर्षा आंधळे/विसंअ/

 

उच्च शिक्षण विभागांतर्गत सात शासकीय इमारतींच्या बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीची मंजुरी – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १२ : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत सात शासकीय इमारतीच्या बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक झाली. यावेळी वित्त, नियोजन, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल  आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई, विज्ञान संस्थेतील आण्विक व विकिरण प्रयोगशाळा इमारत बांधकामासाठी रु.२४.२५ कोटी, सावित्रीबाई फुले महिला छात्रालय, मुंबई वसतिगृह बांधकामासाठी रु. ८९.५२ कोटी, वांद्रे (मुंबई) येथील सर ज. जी. कला संस्थेच्या कला वसतिगृह व वास्तुशास्त्र वसतिगृह इमारत बांधकामासाठी रु.१९९.७३ कोटी, शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी रु.५९.२६ कोटी रुपये, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास रु.५४७.२७ कोटी, नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेसाठी आवश्यक विविध बांधकामासाठी १७४.७४ कोटी रुपये,तंत्रनिकेतन वांद्रे येथील मुला – मुलींचे वसतिगृह इमारत बांधकाम अशा एकूण सात प्रकल्प बांधकामांस मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ११०० कोटी रुपये पेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

 

 

ताज्या बातम्या

‘शिवसृष्टी’ निर्मितीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जिमाका रायगड, दि. ९ जून:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व आचार आदर्श मानून राज्य सरकारची वाटचाल सुरु आहॆ. पाचाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन...

बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतने पूर्ण करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे...

0
मुंबई, दि. 9 :- कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील बंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक विकासास चालना मिळेल....

सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

0
मुंबई, दि. ९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षासाठी राज्यभरातून एकूण १३० सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि...

शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी ‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी

0
मुंबई, दि. 9 : युवकांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने शासनाच्या बरोबरीने सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गत दोन...

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. 9 :- “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं...