मंगळवार, जून 24, 2025
Home Blog Page 1038

सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग महामंडळामार्फत योजना राबविणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, दि. 31 : सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ या महामंडळांच्या योजनांच्या धर्तीवर शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ व  आदिवासी  विकास महामंडळामार्फत योजना राबविण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांच्या योजनांची कार्यप्रणाली व स्वरूप याबाबतचा आढावा मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

त्री डॉ. गावित म्हणाले की, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाते. तसेच महामंडळामार्फत अल्प व्याजदरात कर्ज योजनाही राबविण्यात येते. आदिवासी दुर्गम भागात प्रक्रिया उद्योगाला संधी आहे. या उद्योगांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या महामंडळांमार्फत राबविण्यात येतील. आदिवासी बांधवांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होईल.

या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे उपसचिव विजेंद्रसिंग वसावे, उपसचिव र. तु. जाधव, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे सहायक व्यवस्थापक दत्तराज शिंदे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक य. रा. पवार, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे उपव्यस्थापक नागनाथ पवार उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 31 : विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद असते. स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ते सिद्ध केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे स्वप्न विद्यार्थी प्रत्यक्षात आणत आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनून उत्कृष्ट कार्य केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते ‘लेटस् चेंज अभियानांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा गौरव सोहळा तसेच दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सोहळा आज येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव इम्तियाज काझी, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, प्रकल्प संचालक रोहित आर्या, गांधीजींची वेशभूषा करून स्वच्छता मॉनिटर्स प्रकल्पाला पाठिंबा देणारे शरद नयनपल्ली यांच्यासह राज्यात प्रभावी कामगिरी केलेल्या 100 शाळांमधील 300 विद्यार्थी, उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यांचे समन्वयक आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाचा दुसरा टप्पा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून विद्यार्थ्यांना जगभराचे क्षीतिज मोकळे झाले आहे. भविष्यात याच विद्यार्थ्यांनी जगाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असून राज्यात स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावी कार्याद्वारे आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचे पत्र उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणार असल्याचे सांगून दुसऱ्या टप्प्यासाठी मंत्री श्री.केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी परिसर स्वच्छ राखण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यांचा झाला गौरव

मंत्री श्री.केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पात उत्कृष्ट कार्य केलेल्या बुलढाणा, जालना, मुंबई उपनगर, सातारा, सोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या समन्वयक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील प्रभावी कामगिरी केलेल्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, अंकुशनगर, जि.जालना; मत्स्योदरी विद्यालय, अंबड, जि.जालना; युगधर्म पब्लिक स्कूल, बुलढाणा; आदर्श जि.प. स्कूल, बोरखेडी, जि.बुलढाणा; एन.व्ही. चिन्मया विद्यालय, शेगाव आणि जनता हायस्कूल, जालना या शाळांच्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

उपक्रमाविषयी : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची नकळत होणारी चूक दाखवून देऊ लागले. यावर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आला. यात राज्यातील 64,198 शाळांमधून 59,31,410 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून समाज माध्यमांतून यासंदर्भातील 15 लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत.

प्रकल्प संचालक श्री. आर्या यांनी प्रास्ताविकाद्वारे उपक्रमाची माहिती दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

‘शासन आपल्या दारी’त नोकरीची संधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

यवतमाळ, दि.३१ (जिमाका) : शहराजवळील किन्ही येथे नुकताच शासन आपल्या दारी उपक्रमाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ नागरिकांना देणे हाच उद्देश. मात्र, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम नवीन उमेद घेवून आला.

कारण, या कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महारोजगार मेळाव्यात २६४ युवकयुवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २०७ जणांची नामांकित कंपन्यांमध्ये प्राथमिक निवड करण्यात आली. हा मेळावा नक्कीच या बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी देणारा ठरला.

या मेळाव्यात पेटीएम, हिमालया कार्स, वैभव एम्टरप्रायझेस, मेगाफिड बायोटेक आदी नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांतील एकूण १५०४ जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेवून पात्र ठरणाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक्रम बेरोजगारांनाही संधी देणारा उपक्रम म्हणून नावारुपाला आला.

राज्यात नाही म्हटले तरी बेरोजगारीचा प्रश्न आहेच. राज्य शासन भरती प्रक्रियाही राबवित आहे. मात्र, स्पर्धा परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने आपली निवड होईल की नाही, या मनस्थितीत युवक खाजगी किंवा कंत्राटी नोकरीच्या शोधात असतात. अशातच राज्य शासनाचा शासन आपल्या दारी उपक्रमात रोजगार मेळावे आयोजित करुन बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा फायदा देखील युवकांना झाला आहे. त्याची प्रचिती यवतमाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पंडित दीनदयाळ महारोजगार मेळाव्यातून दिसून आली.

शासन आपल्या दारी कार्यक्रमात आयोजित महारोजगार मेळाव्यात २६४ उमेदवारांना नोंदणी केली होती. त्यापैकी २०७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यातील अर्जून आनंद राठोड आणि पंकज ज्ञानेश्वर जाधव या दोन उमेदवारांना नामांकित कंपनीमध्ये नौकरी मिळाली. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आल्याने उपक्रमाची उंची वाढली आहे.
०००

राजधानीत सरदार पटेल यांची जयंती साजरी; इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनी अभिवादन

नवी दिल्ली, 31 : देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली, तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते.

यावेळी निवासी आयुक्त  तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना  राष्ट्राची एकात्मता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली, तर इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर – अरोरा यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रभारी उपसंचालक (माहिती ) श्रीमती अरोरा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 196, दि.31.10.2023

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 1 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा ‘दिलखुलास’ कार्यक्रम प्रसारित होईल.

वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील आणि वर्षा आंधळे यांनी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

0000

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता १४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान दत्तक प्रक्रिया राबविण्यात येणार

मुंबई, दि. ३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत दत्तक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १४ ते २१ नोव्हेंबर २०२३ हा कालावधी दत्तक महिना असून ज्या दाम्पत्यास मूल दत्तक घ्यावयाचे आहे त्यांनी cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली जात आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.नागरगोजे यांनी केले आहे.

सद्य:स्थितीत दत्तक विधानाबाबत केंद्र सरकारने केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाची (Central Adoption Regulation Authority) स्थापना केली आहे. ही संस्था महिला व बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात याबाबत कामकाज करणारी यंत्रणा जिल्हा बाल संरक्षण कक्ष म्हणून कार्यरत आहे. ज्या दाम्पत्यास मूल दत्तक घ्यावयाचे आहे त्यांनी cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत, पहिला मजला, दुसरा टप्पा, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर मोनोरेल स्टेशन जवळ, चेंबूर, मुंबई- ४०००७१ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५२३२३०८  यावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. नागरगोजे यांनी केले आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 31 : अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच खरेदीसाठी ११ हजार ८०० रुपये, अंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून अंगणवाडी सेविकांच्या अन्य मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीची बैठक आज झाली. त्यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम.ए.पाटील, शुभा शमीम, भगवान देशमुख, सुवर्णा तळेकर, सरिता मांडवकर उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने झालेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी विविध घोषणा केल्या आहेत. केंद्राच्या सूचना प्राप्त होताच त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच घेण्यासाठी ११ हजार ८०० रुपये, अंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून, ३००० अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नतीही मिळणार आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक लाभ ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय सादर करण्यात येईल. अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे आणि इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मंत्री कु. तटकरे यांनी कृती समितीला दिली.

******

संध्या गरवारे/विसंअ/

मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया सुलभरित्या राबवावी – महसूल विभाग अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा

मुंबई, दि. 31 : मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांनी सुलभरित्या राबविण्याच्या सूचना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिल्या.

मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील प्रक्रिया राबविण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महसूल विभागाचे उपसचिव संतोष गावडे, छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी श्री.देवरा म्हणाले की, मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला आहे. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून 13 हजार 498 जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा कराव्यात. या कागदपत्रांचे भाषांतर करुन जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन करुन पब्लिक डोमेनवर उपलब्ध करुन द्यावी. जात प्रमाणपत्र सुलभरित्या उपलब्ध करुन देण्यासाठीच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध कागदपत्रे हे मोडी व ऊर्दू लिपी मध्ये असल्याने त्याचे भाषांतर करताना काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही श्री. देवरा यांनी यावेळी दिल्या.

सचिव श्री. भांगे म्हणाले की, मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला असून  जात प्रमाणपत्र वितरणाबाबतची कार्यवाही नियमावली तातडीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र वितरण कार्यवाही नियमाच्या आधारे मिशन मोडवर राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

‘मिनी स्टेडीयम’ चे काम दर्जेदार होण्यासाठी खेळाडूंनी लक्ष द्यावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि.31 : जिल्ह्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे, या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवावा यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विसापूर येथील तालुका क्रीडा संकूल हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असून बल्लारपूर मध्येही ‘मिनी स्टेडीयम’ चे काम हाती घेण्यात आले आहे. खेळाडूंसाठी होणाऱ्या या स्टेडियमच्या कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तमोत्तम व्हावा, यासाठी प्रशासनासोबतच खेळाडूंनीही लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे विचार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

बल्लारपूर शहरातील मिनी स्टेडीयमच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. कांचन जगताप, न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, हरीष शर्मा, चंदनसिंग चंदेल, काशिनाथ सिंह, समीर केने, मनिष पांडे, नीलेश खरबडे, राजू दारी यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

शहरातील खुल्या जागेमध्ये मिनी स्टेडीयम करीता येथील खेळाडूंनी निवेदन दिले होते, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विकास व सौंदर्यीकरण अंतर्गत येथे संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच शौचालय, ॲप्रोच रोड, मुख्य प्रवेश द्वार, खडीकरण रस्ता, पाण्याची टाकी इतरही कामे येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी 29 लक्ष 95 हजार 172 रुपये मंजूर करण्यात आले असून भविष्यात आणखी निधी देण्यात येईल. मात्र कामाच्या गुणवत्तेवर आणि दर्जावर येथील खेळाडूंनीच लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सदर काम 3 महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, बल्लारपूरमधील कुठलेही काम उत्कृष्टच असले पाहिजे. बसस्थानक, पाणी पुरवठा योजना, नाट्यगृह, सैनिक स्कूल, बॉटनिकल गार्डन, पोलिस स्टेशन आदी विकास कामे दर्जेदार असून सिंगापूरचे कौन्सल जनरल यांनी चिठ्ठी लिहून या विकास कामांचे कौतुक केले आहे. आपले गाव, शहर नेहमी समोर राहावे. प्रत्येकच क्षेत्रात आपण अग्रेसर असलो पाहिजे, यासाठी सर्वांनी मिळून विकासात योगदान द्यावे. आज एका छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बल्लारपूर विकासात अग्रेसर : बल्लारपूर शहरात तसेच तालुक्यात अनेक विकास कामे करण्यात आली आहे. येथे न्यायालयाची इमारत प्रस्तावित असून 100 बेडेड रुग्णालय तसेच कामगार विमा योजनेअंतर्गत हॉस्पीटलची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

स्पोर्ट सेंटरसाठी प्रयत्न : देशात सन 2036 मध्ये ऑलंपिक स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे उत्कृष्ट स्टेडीयम आहे. त्यामुळे या परिसरात स्पोर्ट सेंटर उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार आहे. सैनिक स्कूलमधील फुटबॉल ग्राऊंड आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असून युरोपियन संघाने या ग्राऊंडला मान्यता दिली आहे.

परिसरातील नागरिकांचा सत्कार : यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यात चंद्रशेखर घोडे, राजू कंचर्लावार, अनुप नगराळे, दर्शन मोरे, जगदीश फौजी, अनिल मिश्रा, अजय शर्मा, संकेत भालेराव, किशोर रणदिवे, राहुल ठाकूर, मुरली भाकरे आदींचा समावेश होता.

०००

सर्वसामान्य नागरिक बल्लापूरच्या विकासाचे शिल्पकार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

चंद्रपूर, दि. 31 : लोकप्रतिनिधी म्हणून मला बल्लारपूर या स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करता आलीहे माझे सौभाग्य आहे. पण या तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार येथील सर्वसामान्य नागरिक आहेतअशी भावना वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. बल्लारपूर तालुका विकासामध्ये असाच कायम अग्रेसर राहावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

बल्लारपूर येथे नगर परिषद प्रशासकीय बांधकामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. कांचन जगतापन.प. मुख्याधिकारी विशाल वाघकार्यकारी अभियंता मुकेश टांगले, हरीश शर्माचंदनसिंग चंदेलकिशोर पंदीलवारआशिष देवतळेकाशिनाथ सिंहमनिष पांडेसमीर केनेनिलेश खरबडेराजू दारी आदी उपस्थित होते.

बल्लारपूरचा कितीही विकास केला तरी येथील नागरिकांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाहीअसे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेविकासाची अनेक कामे या क्षेत्रात झाली आहे. मात्र संपूर्ण शहराचे नियंत्रण ठेवणा-या  नगर परिषदेचीच इमारत राहून गेली होती. आज मात्र या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी करतांना अतिशय आनंद होत आहे.

बल्लारपूरमध्ये रविवारी 1.29 कोटी रुपयांच्या मिनी स्टेडीयमचे भूमिपूजन4 कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामाची पायाभरणी आणि 10 कोटीच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे. बाहेरून येणा-या व्यक्तीला या शहराचा हेवा वाटावाअसा विकास बल्लारपूरचा झाला आहे. नगर परिषदेच्या इमारतीकरीता जेवढा निधी लागेलतेवढा दिला जाईल. ही इमारत दर्जेदार आणि अप्रतिम व्हायला पाहिजेअशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी अंतर्गत नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या माळ्याचे काम करण्यात येणार असनू यासाठी 9 कोटी 78 लक्ष 71  हजार 792 निधीची तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. कार्यक्रमाचे संचालन सतीश कनकम यांनी केले

बल्लारपूर विकासाचे मॉडेल : विसापूर येथील सैनिक स्कूलबॉटनिकल गार्डनएस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्रबल्लारपूर येथील पोलिस स्टेशनची इमारतआधुनिक जीमभाजी मार्केटनाट्यगृहअभिनव बसस्थानकविश्रामगृहशाळांच्या इमारतीमहिलांसाठी डीजीटल शाळाविशेष बाब म्हणून उपविभागीय कार्यालयनगर परिषद चौक ते कलारी काटा गेटखुल्या जागांचा विकासगणपती घाटछठ घाटांचा विकास आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणांवर तर चित्रपटांची शुटींगसुध्दा करता येतेत्यामुळे मुंबईतील दिग्दर्शकांना बल्लारपूर येथे आमंत्रित केल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

लोकशाहीचे मंदिर तसेच प्रभु रामाच्या मंदीरासाठी जिल्ह्याचे लाकूड : भारताच्या लोकशाहीचे मंदीर असलेल्या नवीन संसद भवनात तसेच अयोध्या येथील प्रभु रामाच्या मंदिरासाठी चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून लाकूड पाठविण्यात आले आहे. तसेच आता भारत – पाकिस्तानच्या सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची संधी राज्याच्या सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून मला प्राप्त झाली आहे.

न.प. निवृत्त सफाई कर्मचा-यांचा सत्कार : नगर परिषदेच्या पायाभरणी समारंभात मुख्याधिकारी विशाल वाघ आणि माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी सेवानिवृत्त सफाई कर्मचा-यांचा सत्कार आयोजित केलाही अतिशय अभिमानाची बाब आहे. या सफाई कर्मचा-यांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर सेवा दिलीत्यांच्या सेवेचा हा सन्मान आहेअसे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी चंद्रभान जोगीसुनील पवारसतिश गोगूलवारनरसुबाई नख्खाकमल मनसरामरामगोपाल मिश्राहंसाराणीअनिल लुथडेसुनील तुमरामगुणरत्न रामटेकेकानपल्ली मलय्यातुलसीराम पिंपळकरउमाकांत बंडावार आदी सफाई कर्मचा-यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शालश्रीफळ देऊन सत्कार केला.

०००

ताज्या बातम्या

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २३ : त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग

0
मुंबई, दि. 23 : नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अ‍ॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षकांसाठीच्या १३ व्या प्रशिक्षण सत्राला प्रारंभ...

पाणीपुरवठा योजनेची कामे तत्काळ पूर्ण करावी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. २३ : हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांना वॉटर ग्रीड १३२ या योजनेचा लाभ लवकर होण्यासाठी कामांमध्ये गती आणावी. तसेच पाणी पुरवठ्याची कामे...

जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रिय सहभाग आवश्यक – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक...

0
मुंबई, दि. २३ : केंद्र शासनामार्फत भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती वर्षभर साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ नोव्हेंबर...

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश

0
आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा गडचिरोली, दि. २३ : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी, सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करावे, तसेच प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती...