शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 1035

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसाठी चार हजार कोटींच्या रोख्यांची विक्री

मुंबई, दि. 8 : राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसंबधित खर्चासाठी 10 वर्षे मुदतीच्या तसेच 11 वर्षे मुदतीच्या प्रत्येकी दोन हजार कोटींच्या रोख्यांच्या विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकासकामांना अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 12 सप्टेंबर, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लीलाव आयोजित करण्यात येईल. लीलावाचे बिडस् दिनांक 12 सप्टेंबर, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक आणि अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 13 सप्टेंबर, 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 13 सप्टेंबर, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी अनुक्रमे 10 व 11 वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 13 सप्टेंबर, 2023 पासून सुरु होईल. 10 वर्षे मुदतीच्या कर्जरोख्याची परतफेड दिनांक 13 सप्टेंबर 2033 रोजी तर 11 वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांची परतफेड दि. 13 सप्टेंबर 2034 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 13 मार्च व 13 सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील.

००००

‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक : 8 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत राज्यातील एक कोटी 57 लाख ‘आनंदाचा शिधा’ संच वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे आनंदा शिधा वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, नायब तहसीलदार निरांजना पराते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक कोटी 57 लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संचाचे वाटप होणार असून त्याचा राज्यातील साधारण साडेसात कोटी जनतेला लाभ होणार आहे. जिल्ह्यातील साधारण सात लाख ७८ हजार लाभार्थ्यांना शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. या आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधा जिन्नसांचा समावेश आहे. हा संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयांत वितरित केला जाणार आहे. राज्यातील गोर गरीब जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या आनंदाचा शिधाच्या माध्यमातून गोरगरिबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे.

येवला तालुक्यात १४० स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील, पिवळे, केसरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील अंत्योदय योजनेतून ९ हजार ५८६ व प्राधान्य योजनेतून २८ हजार ४१४ अशा साधारण 38 हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होणार आहे, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसींसाठी राज्यात १२ लाख घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने  १२ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे ही त्यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी ५०० नवीन रेशन कार्डचेही वाटप करण्यात आले.

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज योजनेचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍दि. ८ : अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये चर्चासत्राचे आयोजन करून त्या माध्यमातून समस्या जाणून घ्याव्यात व त्यानुसार नवीन योजनाबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. या समाजातील नागरिकांसाठी  नवीन विविध योजना तयार करुन त्या माध्यमातून समाजाचा विकास करण्याचा मानस आहे. मंत्री श्री. सत्तार यांनी या बैठकीत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेवून समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध मुद्दयांवर चर्चा केली.

या बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा. ताशिलदार तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

इरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार – मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. ८ :- मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, संबधित प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य पार पडल्यानंतर प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्यापैकी 144 व्यक्ती हयात असून दुर्घटनेमध्ये 84 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 27 मृतदेह सापडले. तर 57 व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन 23 जुलै 2023 रोजी सायंकाळी बचाव व शोधकार्य थांबविण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता.

दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे. यामधील 7 मयत व्यक्ती आणि 57 बेपत्ता व्यक्तींना प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अनुदान वाटप करण्याची मागणी मंजूर झाली असून या दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. हा निधी तत्काळ वितरित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि.8 (जिमाका) : शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत विचार सुरु असून त्याला लवकरच मूर्त स्वरुप येईल. तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू स्मारक भवन (दसरा चौक) येथे केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) तर्फे देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खा. धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शेंडकर, राजेखान जमादार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. राज्यातील शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने  शासनाने सुमारे 1100 कोटीहून अधिक रुपयांची तरतूद केली असून भविष्यात शैक्षणिक सुधारणांचे अनेक निर्णय घेणार असल्याचे सांगून यावर्षीपासून अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) अभ्यासक्रम मराठीतून सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. केसरकर म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींची निवड अतिशय पादर्शकपणे‍ केली असल्याचे खा. श्री. माने यांनी सांगितले तर कोल्हापूर जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा गुणवत्तापूर्ण असल्याचे गौरवोद्गार आ. जयंत आसगावकर यांनी काढले.

प्रारंभी भुदरगड तालुक्यातील सचिन देसाई, करवीर तालुक्यातील सुधीन आमनगी व नकुशी देवकर हातकणंगले तालुक्यातील शिवाजी पाटील यांना सन 2023 तर शाहूवाडी तालुक्यातील शोभा पाटील यांना सन 2022 चा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल  शाल, श्रीफल, स्मृर्तीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 

सन 2022-23 व 2023-24 या वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक :-

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022- मारुती डेळेकर (आजरा), सचिन भोसले- (भुदरगड), राजेंद्र शिंदे- (भुदरगड), प्रशांत पाटील- (चंदगड), अर्चना देसाई- (गडहिंग्लज), गीतांजली कमळकर- (कागल), राजाराम नारींगकर- (राधानगरी), विश्वास भोसले-(गगनबावडा), सुषमा माने- (हातकणंगले), महेश बन्ने- (हातकणंगले), दत्तात्रय पाटील- (करवीर), तानाजी घरपणकर- (पन्हाळा), शिवाजी पाटील- (शाहूवाडी), अरुणा शहापुरे- (शिरोळ) सन 2023 पुरस्कार – श्रीमती सुरेखा नाईक- (आजरा), कविता चौगले- (भुदरगड), सरीता नाईक-(चंदगड), पद्मश्री गुरव- (गडहिंग्लज), स्नेहा चव्हाण- (कागल), गणेश पाटील- (राधानगरी), सायली तांबवेकर- (हातकणंगले), राजेंद्र तौदकर- (करवीर), किरण सुतार-(पन्हाळा), कविता मगदूम- (शाहूवाडी), साताप्पा नेजे- (शिरोळ), संजय देसाई- (गगनबावडा) यांना देण्यात आला.

विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 – विजय परिट, (कागल) ; जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 माध्यमिक शिक्षक गट-  संतोष सनगर (करवीर) तर उच्च माध्यमिक गट कुंडलिक जाधव (गगनबावडा)  व सुषमा पाटील (करवीर) यांना विभागून देण्यात आला.

विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार 2023 –   अनिल चौगले (राधानगरी) यांना तर माध्यमिक शिक्षक गट पुरस्कार विजया दिंडे (करवीर) यांना देण्यात आला.

यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत (सन 2019-20) हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत संभापूरला 5, शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत शिवारेला 3 तर आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीला 2 लाख रुपये तसेच सन 2020-21 व 2021-22 साठी आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत वाटंगीला 5, हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी ग्रामपंचायत 3 तर पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत पोखलेला 2 लाख रुपयांचे बक्षीस पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देऊन यावेळी गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी तर आभार श्रीमती शेंडकर यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि.8 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरचा जयपूरच्या धर्तीवर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन करुन पंचगंगा घाटावरील विकास व संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यावर पंचगंगा घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर होणाऱ्या विकास व संवर्धन कामाचे भूमिपूजन मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेतून दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून ही कामे होणार आहेत. पंचगंगेचा जूना 60 मीटर व नवीन 55 मीटरचा घाट अशा एकूण 115 मीटर लांब घाटाचा विकास व पायरीचे 11 टप्पे या निधीतून करण्यात येणार आहेत. यातील 115 मीटरचे 5 टप्पे होणार असून 55 मीटरचे 11 टप्पे होतील. घाटाचा हेरिटेज लुक कायम ठेवून कामे गतीने करावीत, अशा सुचना करुन हे काम पूर्ण झाल्यावर पंचगंगा घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

केवळ औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील विकासाबरोबरच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा विकास करणे आवश्यक आहे. राज्यासह देशभरातील प्रत्येक नागरिक कोल्हापूरला आला पाहिजे या दृष्टीने कोल्हापूरच्या विकासावर भर देण्यात येत आहे, असे सांगून पंचगंगा घाट हे कोल्हापूरचे सौंदर्य आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाच्या विकासाबरोबरच जुना राजवाडा ते नवा राजवाडा मार्ग, अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आदी विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या सहकार्याने कोल्हापूरचा विकास गतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि. 8 : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल.  त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.

—–०—–

समर्पित भावनेने काम करून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि.8 (जिमाका):- प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरत असताना या समाजाप्रती काही देणे आहे अशी समर्पित भावना ठेवून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळयात पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विजयराजे ढोबळे, सौ. शोभा पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन द्वारा होत असलेल्या शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेले असून त्यांच्या कार्यामुळे समाजाला मोठा फायदा झालेला आहे. अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज करत असताना चाकोरी बाहेर जाऊन त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना मदत करून त्यांचे प्रश्न सोडवण्यास हातभार लावलेला आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकाचे उत्पादन चांगले घेऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते शेतकरी उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. शोभा पवार यांनी सत्कार स्वीकारला. मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, शेतकरी बाळासाहेब काळे, उद्योजक दत्तात्रय कोरे, संध्या खांडेकर, सीमाताई घाडगे व अन्य मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रुरल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी प्रस्ताविक केले व या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.

‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई दि. 8 : कृषी महाविद्यालय, पुणे येथील शिरनामे सभागृहात ‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी फलोत्पादनचे संचालक डॉ.कैलाश मोते, सहसंचालक अशोक किरनळी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे प्राध्यापक डॉ.पराग हळदणकर, कृषी अभियांत्रिकीचे  प्राध्यापक डॉ.रवींद्र बनसोडे उपस्थित होते.

शासकीय रोपवाटिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी, सर्व संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू; सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ८ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, त्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुंबई शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे इच्छा असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास, प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मुंबईमध्ये रात्र अभ्यासिकेची नितांत गरज होती. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू होणार असून, त्याचा लाभ या शाळेत शिकणाऱ्या सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याचे, मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथम रात्र अभ्यासिका सुरू झाली असून, यापुढे प्रत्येक वार्डमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने, पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असेल अशा इमारतीतच ६ ते ८ या वेळात रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पालकांकडून संमती पत्र, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पराग आळवणी, माजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ

ताज्या बातम्या

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले...

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0
मुंबई, दि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता...

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

0
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे...