शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 1027

तरुणांना कौशल्यविषयक शिक्षण देऊन रोजगारक्षम बनवावे-राज्यपाल रमेश बैस

पुणे, दि.१२: तरुणांना विविध भाषा शिकवितानाच रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना सर्वोत्तम कौशल्य विषयक शिक्षण देण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी होण्यासह त्यांचा जीवनस्तर उंचावेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारक समितीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘पुनरुत्थान गुरुकुलम्’च्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह मिलिंद देशपांडे, सचिव सतीश गोरडे उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, भारत सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे. तरुण कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेले देश मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे आशेने पाहत आहेत. भारतासाठी ही सुवर्णसंधी असून त्यासाठी आपल्या युवा लोकसंख्येला कौशल्याचे शिक्षण उपयुक्त ठरेल.

स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेल्या आदिवासी बांधवांनी येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्यात पुढाकार घेतला होता. आदिवासी जमातींच्या हक्कांना राज्यघटनेद्वारे संरक्षित करण्यात आले आहे. या समाजाला शिक्षीत करुन त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही श्री. बैस म्हणाले.

‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’च्या माध्यमातून आदिवासी समाजातील मुलांना संगणक, मूर्तीकला, मातीची भांडी तयार करण्याचे शिक्षण देणे आणि महिला सबलीकरण आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या विकासासाठी करण्यात येत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. श्री.प्रभुणे गेल्या पाच दशकापासून आदिवासी समाजासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुलम् पारधी समाजाच्या ३५० मुलांची देखभाल करत आहे. गुरुकुलम् ला सर्वप्रकारची मदत करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे ४१ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे असे सांगितले.

गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलम् च्यावतीने करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करुन त्यानुसार गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना जन्मदाखला आणि आधार कार्ड मिळावे यासाठीच्या अडचणी सोडविल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधिश सोनल पाटील, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, सहायक धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुके, उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांचा प्रातिनिधीक स्वरुपात राज्यपाल महोदयांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी राज्यपाल श्री. बैस यांनी ‘गुरुकुलम्’ ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

क्रांतितीर्थ’ वाड्याला राज्यपालांची भेट

राज्यपाल रमेश बैस यांनी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या ‘क्रांतितीर्थ’ वाड्याला भेट देऊन उभारण्यात आलेले म्युरल्स, संरक्षित दगडी व लाकडी बांधकाम, ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे आदींची माहिती घेतली. येथील मूर्ती पाहून जीवंतपणाचा अनुभव येतो, असे ते म्हणाले.

०००

 

“एैस पैस गप्पा नीलमताईंशी” या पुस्तकाचे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 12 : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या राजकारण व महिलांचे प्रश्न या क्षेत्रांबरोबर एक लेखिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. बुधवार १३ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते “एैस पैस गप्पा नीलमताईंशी” या पुस्तकाचे राजहंस प्रकाशन,पुणे या संस्थेद्वारे प्रकाशन करण्यात येणार आहे.

या प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लेखक सदानंद मोरे, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह या पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या श्रीमती करुणा गोखले, सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे संयोजन शीतल म्हात्रे, अंजली कुलकर्णी, जेहलम जोशी, सुनीता मोरे यांनी केले आहे.

००००

मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रीय ‘सारथी’

राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना,उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विविध महामंडळांची, विभागांची निर्मिती राज्य शासन करत असते. या पार्श्वभूमीवर  मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या, युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथीची स्थापना करण्यात आली आहे.

सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक  प्रगतीसाठी  विविध कल्याणकारी उपक्रम,योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. राज्यातील 1 लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. पीएच.डी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107 तर शिक्षण विभागातंर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.तर कौशल्य विकास प्रशिक्षण विभागांतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना तर सारथीच्या इतर उपक्रमातंर्गत 60 हजार 140 जणांना लाभ झालेला आहे.

संरचना आणि निधीची तरतूद

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथी कार्यरत आहे. शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन 2023-24 या आर्थिक वर्षात 300 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे  मुख्यालय पुणे येथे असून  उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच सारथीचे  राज्यात 8 विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ही संस्था राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली Indian Companies Act 2013 & Rules कंपनी कायदा – 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत असून संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबध्द त-हेने व प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्यात येते. सारथीच्या संचालक मंडळावर शासनाने बारा संचालकांची नियुक्ती केलेली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते. सारथी संस्थेचे संस्थापन समयलेख Memorandum of Association & Article of Association (MoA व AoA) हे Registrar of Companies यांचेकडे चार जून 2018 रोजी नोंदणीकृत केले असून त्यामध्ये नमूद तीन  मुख्य उद्दिष्टे व 82 पूरक उद्दिष्टानुसार संस्थेचे कामकाज चालू आहे.

सारथीमार्फत राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक प्रगतीच्या योजना महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग या उपक्रमातंर्गत सारथीमार्फत युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराराणी स्पर्धा परिक्षा विभाग सक्रीयरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या  पूर्व परिक्षेसाठी पाचशे विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थांना दरमहा 13 हजार व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रु.विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.

उपयुक्तताः- आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत एक हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 21 कोटींचा लाभ डिबिटी द्वारे देण्यात आला आहे. युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पन्नास हजार रु.एकरकमी दिले जातात. सारथी मुख्यालयातून विद्यार्थ्यांना झूम मिटींगद्वारे मार्गदर्शनही करण्यात येते. त्यांच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर त्या सोडवण्यात येतात. मागील तीन वर्षांत साडेसहाशे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3.25 कोटींचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रु.एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षांत 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाखांचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.

यशस्व‍िताः- युपीएससी परिक्षांमध्ये सारथीच्या माध्यमातून विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत असून आयएएस सेवेत तीन वर्षात बारा,आयपीएस मध्ये 18 तर आयआरएस सेवेत आठ आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये एकुण बारा अशा सारथीमधील 51 विद्यार्थ्यांची युपीएससी परीक्षेत निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी सारथी संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच युपीएससी सीएपीएफ सेवेसाठी संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

राज्यसेवा प्रशिक्षण मार्गदर्शन – युपीएससी प्रमाणेच राज्य सेवा परिक्षा अर्थात एमपीएससीमध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,कोचींग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  एमपीएससी साठी साडे सातशे विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.

उपयुक्तताः- आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत 1125 विद्यार्थ्यांना पूर्व परिक्षेसाठी 8.26 कोटीचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार एक रकमी दिले जातात.आत्तापर्यंत मागील तीन वर्षात 7367 विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी अकरा कोटी रुपयांचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.तसेच मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहा हजार रु.एकरकमी दिले जातात.त्यासोबतच विद्यार्थ्यांना सारथीच्या मुख्यालयातून झूम मिटींगद्वारे तसेच अभिरुप मुलाखत द्वारेही मार्गदर्शन केल्या जाते.मुलाखतीची सर्व तयारी करुन घेण्यात येते.

यशस्व‍िताः- मागील तीन वर्षांत 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 56.60 लाखाचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.सारथीच्या मार्गदर्शातून सन 2021-22,23 या वर्षात वर्ग एक श्रेणीमध्ये 74 तर वर्ग दोन श्रेणीत 230 अशा एकूण 304 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे.

उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती

        डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहीरात जूलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील 153 पात्र विद्याथ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर  एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना  परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती  योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून चार जूलै 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.  यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF)

या अतंर्गत सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे/ विकसित करणे. संशोधन पुर्ण होईपर्यंत परंतू कमाल पाच वर्षाच्या कालावधी करिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह रू.31,000/- अधिछात्रवृत्ती देण्यात येते. यामध्ये 2019 ते 2023 या कालावधीत एकुण 2109 विद्यार्थांचा सहभाग आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम(csms-deep) राबवण्यात येतो. दि.1 फेब्रुवारी 2023 पासून प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 36,525 अर्जांपैकी अंतिम छाननीतून सारथी संस्थेने मान्यता दिलेल्या अर्जांची संख्या 27,346 इतकी आहे.

छत्रपती राजाराम महाराज – सारथी शिष्यवृत्ती 2022-23 योजना

यामध्ये एकूण 31.23 कोटी रु. वाटप करण्यात आले आहे. यासाठी  इयत्ता 9 वी व 11 वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, दहावी मध्ये 60% गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रू.800 प्रमाणे वार्षिक रू.9600/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.  तर मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF)- सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

सन 2022-23 पासून ही  योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण,कापनीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन,वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते. शेतकरी उत्पादन कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 योजनेचा कार्यारंभ आदेश जानेवारी 2023 रोजी देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसी स्तरावर सुरु असून ऑक्टोबर 2023 पासून प्रशिक्षणाचे राज्यातील 26 ठिकाणी सुरवात करण्यात येईल. याचे वार्षिक लाभार्थी हजार असणार आहेत.

सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

या कार्यक्रमांतर्गत 35 सेक्टरचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत वीस हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थी नोंदणी सुरु असून 186 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विविध वयोगटातील एकूण 61 हजार 535 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर 5290 विद्यार्थ्यांना 10.25 लक्ष रुपयांची पारितोषिके देण्यात आली आहेत.  तसेच  करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरांचे ही राज्यभरात विविध जिल्ह्यांत आयोजन केल्या जाते. ज्याचा विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.

विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प/योजना

या सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथी मार्फत  श्रीमंत मालोजीराजे – सारथी इंडो जर्मन टुल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद,पुणे,कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब्रुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी त्यांच्या मुलाखती सुरु आहे. तसेच नवीन जाहीरात ही 3 जूलै 2023 रोजी  प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये  औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्यावत,आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून उद्योगांना आवश्यक रेडी टू वर्क मनुष्यबळ उपलब्ध करणे हे उद्देश आहेत. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते.

विविध पद्धतीने सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी,आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम,योजना राबवण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्य शिकवणुकीला मूर्त रुप देण्याच्या दिशेने ‘सारथी’च्या माध्यमातून शासनाची सुरु असलेली वाटचाल निश्चितच आश्वासक आहे.

००००

 

वंदना आर.थोरात,

विभागीय संपर्क अधिकारी

 

 

 

प्रत्येक शिधापत्रिकाधारकांपर्यंत धान्य पोहोचवावे – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 12 : प्रत्येक पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच गरीब, गरजू लाभार्थींना विनासायस  शिधापत्रिका देखील दिल्या जाव्यात, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी येथे दिले.

मुंबईतील आझाद मैदानात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने रेशन दुकानाच्या बाबतीत विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. मंत्री श्री. भुजबळ यांनी या महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या शिष्टमंडळात आमदार विनोद निकोले, संघटनेच्या प्राची हतिवलेकर, केरळच्या माजी मंत्री मरियम ढवळे, नसीमा शेख, रेखा देशपांडे, पी.के श्रीमंती यांचा समावेश होता.

००००

वंदना थोरात/विसंअ/

 

 

राज्य बाल धोरणात सोशल मीडियासह, अंमली पदार्थांपासून बालकांना परावृत्त कार्यक्रमाचा समावेश करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 12 : बालके व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल, सोशल मीडिया आणि अंमली पदार्थाचे व्यसन जडल्याचे निदर्शनास येत आहे. या व्यसनांपासून मुलांना परावृत्त करण्यासाठीच्या (डीटॉक्स) कार्यक्रमाचा समावेश करून, बाल धोरणाचा मसुदा जलदगतीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

बालविवाह प्रतिबंधासाठी उपाययोजना, महाराष्ट्र बाल धोरण, महिला धोरण, पाळणाघर योजना, अंगणवाडी सेविकांच्या कामकाजाचा आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, मोबाईल, सोशल मीडियाचे व्यसन आणि ड्रग्जचे व्यसन जडलेल्या मुलांसाठी डीटॉक्स कार्यक्रम राबविण्याबाबत बालधोरणात  समावेश करण्यात यावा. आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या मदतीने हा डीटॉक्स कार्यक्रम शाळांमध्ये राबविल्यास मुलांची मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शासकीय वसतिगृहांच्या तपासणीसाठी नियुक्त कृतीदलाचा अहवाल तत्काळ सादर करावा. तसेच, ज्या गावांमध्ये पात्र महिलांच्या अभावी अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत, अशा गावांत महसूल क्षेत्रातील महिलांची अंगणवाडी सेविका पदावर नेमणूक करण्यासाठी अटी शिथिल करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी.

केंद्र पुरस्कृत पाळणाघरांची संख्या आणि मागणी असलेल्या पाळणाघरांची संख्या, लाभ घेतलेल्या महिलांची सामाजिक प्रवर्गनिहाय संख्या तसेच गर्भधारणा आणि प्रसुतीपश्चात नैराश्य या समस्येसाठी मानसोपचारतज्ज्ञ सेवा, कुटुंबासाठी विशेष समुपदेशन सुविधेसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देशही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिले. ग्राम बाल संरक्षण समित्यांमध्ये प्रशिक्षण देऊन गावांत एकही बाल विवाह होऊ नये या उद्देशाने कार्यवाही करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बालकांसाठी पुन्हा १०९८ हेल्पलाईन सुरू

बंद अवस्थेत असलेली १०९८ ही हेल्पलाईन मंत्री कु. तटकरे यांच्या पुढाकाराने पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले. या हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत असूनही,  प्रकरणे २४ तासांत निकाली काढण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाल धोरणात बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि विकास, बाल संरक्षण, बालकांचा सहभाग, आर्थिक, सामाजिक आणि इतर असुरक्षितता या बाबींमुळे वागलेली बालके, अनुसूचित जाती व जमाती, विभक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील बालके, शहरी भागातील गरीब बालके, रस्त्यावर राहणारी बालके, हंगामी स्थलांतरित व दुर्लक्षित बालके, दिव्यांग बालके, समलैंगिक, तृतीयपंथी, नैसर्गिक आपत्तीमुळे व नैसर्गिक बदलामुळे बाधित बालके, अनाथ, हरवलेली, अनैतिक व्यापारातील, बाल कामगार, लैंगिक अत्याचार पीडित, कैद्यांची मुले, देहविक्री करणाऱ्या महिलांची बालके, एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने बाधित मुले, बालगृहातील, सुधारगृहातील बालके, विविध यंत्रणा, तसेच बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. बाल धोरण अधिक लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही आयुक्त डॉ. नारनवरे यांनी यावेळी सांगितले.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

 

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आयटो’चे अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल – प्रधान सचिव राधिका रस्तोगी

मुंबई, दि. 12 : इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) , केंद्र शासनाचा पर्यटन विभाग व पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्ममाने २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयटीसी हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद  येथे ३८ व्या ‘आयटो’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी दिली.

कफ परेड येथील हॉटेल ताज प्रेसिडेन्ट येथे ‘आयटो’ परिषदेबद्दल माहिती देण्यासाठी पर्यटन विभाग व ‘आयटो’मार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती रस्तोगी बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ‘आयटो’चे अध्यक्ष राजीव मेहरा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, ‘आयटो’चे मानद सचिव संजय रजझदान,’आयटो’ उपाध्यक्ष रजनीश कैस्था यासह आयटोचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

श्रीमती रस्तोगी म्हणाल्या की, महाराष्ट्र हे या परिषदेचे यजमानपद भूषवित असून तीन दिवस चालणा-या या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाची बलस्थाने पर्यटन क्षेत्रातील  विविध घटकांना समजावून सांगता येतील. महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील ‘आयटो’च्या माध्यमातून विविध घटकांपर्यत जाईल. या परिषदेत विविध मार्गदर्शपर व्याख्यानांचे आयोजन केले आहे, यामध्ये हॉटेल्स आणि टूर ऑपरेटर्स यांच्यातील समन्वय : काळाची गरज, तंत्रज्ञानाचा बदलणारा चेहरा : क्रूझ पर्यटन, नदी पर्यटन आणि  सागरी किनारी पर्यटन, महाराष्ट्रातील पर्यटन संधी आणि आव्हाने, औरंगाबादमधील पर्यटनाच्या संधी या विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील सहभागीधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होईल.

‘आयटो’चे अध्यक्ष श्री. मेहरा म्हणाले की, ‘आंतरराज्य पर्यटन आणि नाविन्यपूर्ण शाश्वत पर्यटन’ ही या ‘आयटो’ची थीम असून तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात  ‘इंडिया ट्रॅव्हल मार्ट’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशभरातून ९०० ते १००० एवढे पर्यटनाशी निगडित संस्थेचे भागधारक उपस्थित राहणार आहेत. परिषदेत सहभागी राज्यांना त्यांच्या पर्यटन स्थळांची  माहिती व पर्यटन व्यवसायिकांशी परस्पर संवाद (Interaction) साधण्यास संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या परिषदेत सहभागी राज्यांना निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ) ही भारताची टूर ऑपरेटर्सची राष्ट्रीय सर्वोच्च संस्था आहे ज्याचे देशभरातील सदस्यत्व आहे. या संस्थेच्या सदस्यामध्ये देशाचे इनबाउंड टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, हॉटेल चेन, एअरलाइन्स, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, ट्रॅव्हल प्रेस आणि मीडिया, पर्यटन शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारचे पर्यटन विभाग व राज्य पर्यटन विकास महामंडळे यांचा समावेश आहे. आयटो चे वार्षिक अधिवेशन हे भारतीय पर्यटन दिनदर्शिकेतील सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक मानले जाते.

श्री. मेहरा यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दर्शन घडवण्यासाठी टूरचे आयोजन प्रतिनिधींसाठी करण्यात आले आहे. त्यात अजिंठा आणि वेरूळ लेणी, शिर्डी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, लोणार सरोवर, शनी शिंगणापूर मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, सुशील मंदिर आदींचा समावेश असेल. 1 ऑक्टोबर रोजी आयटो रन फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम आयोजित करणार आहोत.

यावेळी पर्यटन संचालक डॉ. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी यांनी महाराष्ट्र राज्यातील पर्यटनास संधी असल्याची माहिती यावेळी दिली.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम

मुंबई, दि. 12 : देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार असून राज्यस्तरावर या मोहिमेचा कार्यारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

धर्मादाय रूग्णालयांविषयीचे  आरोग्य आधार ॲप व राज्यातील खासगी आरोग्य संस्थांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲप, आरोग्यवर्धिनी केंद्रामधील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांची दैनंदिन उपलब्धता तसेच कामावर आधारित मोबदल्याची अदायगी याचे सनियंत्रण करण्याकरीता समुदाय आरोग्य अधिकारी ॲप यांची राज्यस्तरावर सुरूवात मोहिमेच्या कार्यारंभ सोहळ्यावेळी करण्यात येणार आहे.

सर्व जिल्ह्यांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असून गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविणे व जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अयवयदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम, वय वर्ष 18 वरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ सेवा पंधरवाडाही राबविण्यात येईल. ‘आयुष्मान आपल्या दारी’ अंतर्गत पात्र लाभार्थींचे आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण, स्वयं नोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहित करणे, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे संयुक्त कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.

आयुष्मान सभेचे 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामसभेच्या स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन दर आठवड्याला शनिवारी करण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार,  दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग व इतर असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान  व उपचार, तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्र रोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी होईल. या सर्व मेळाव्यांदरम्यान 18 वर्ष व अधिक वयोगटातील पुरूषांची आरोग्यविषयक सर्वंकष तपासणी करण्यात येणार असून  ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे दर आठवड्याला आरोग्य मेळावा पार पडणार आहे.

निलेश तायडे/विसंअ/

 

 

कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 12 : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’ संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ३ ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र.शा. नाईकवाडी यांनी केले आहे.

कृषी आयुक्तालयाच्या ११ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे श्री. नाईकवाडी यांनी कळविले आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

 

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 12 : बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या विविध विधेयकांच्याबाबतीत शेतकरी, कृषी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निविष्ठा उत्पादक, विक्रेते तसेच संबंधित विविध घटकांकडून सुधारणा व सूचना मागविण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी गत पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निवेष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते. विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहाने हे विधेयक दोन्ही सभागृहांच्या 25 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. या संयुक्त समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.

या बैठकीस विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, रमेश कराड, कैलास पाटील, वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य प्रशांत बंब, संजय रायमुलकर, सुरेश वरपुडकर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समितीतील विविध सदस्यांनी विधेयकातील तरतुदीबद्दल आपले मत मांडले. तसेच विविध सुधारणा सुचवल्या त्यावर समितीचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी, हा कायदा व्यापक जनमानसावर प्रभाव टाकणारा असल्याने विधेयकाच्या प्रारूपाची सूक्ष्म चिकित्सा झाली पाहिजे, असे मत मांडले. तसेच गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे, त्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली पाहिजे. समाजातील सर्व घटकांकडून 30 दिवसांच्या आत सूचना मागून घेण्यात येतील व त्यानंतर त्यावर सखोल विचार करून समिती निर्णय घेईल, असे त्यांनी जाहीर केले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

 

‘दिल्लीची बुलबुल’ सचित्र कथासंग्रहाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 12 : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे चारित्र्य आणि दृष्ट‍िकोन उत्तम राहण्यासाठी चांगले वाचन गरजेचे असून कथासंग्रह यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले.

उत्तरप्रदेश सरकारच्या निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव तसेच नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकारच्या विश्वस्त डॉ. अनिता भटनागर जैन लिखित ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र कथासंग्रहाचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. त्याचे प्रकाशन मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आज त्यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी झाले. यावेळी निवृत्त महसूल सेवा अधिकारी आशू जैन, बंदरे, परिवहन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, विद्या प्रकाशन मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ जैन आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, पर्यावरण आणि नैतिकता हे विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्ट‍िकोन उत्तम राखण्यात महत्वाचे घटक आहेत. भाषा समृद्ध होण्यासाठी आणि सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी देखील प्रादेशिक भाषेतील कथासंग्रह उपयुक्त ठरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ.जैन यांनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये विविध विषयांवरील 60 पेक्षा अधिक साहित्य लेखन केले असून त्यांची पर्यावरण, नैतिकता आणि संस्कृती या विषयांवर भर देणारी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली पुस्तके सुमारे 15 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांना त्यांच्या पुस्तकांसाठी विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

ताज्या बातम्या

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले...

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0
मुंबई, दि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता...

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

0
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे...