गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1027

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 1 ‍(जि. मा. का.) :  जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षे, ज्वारी आदि पिकांची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विविध ‍ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार,  मिरज प्रांताधिकारी उत्तम  दिघे, उपविभागीय कृषि अधिकारी मिरज रमाकांत भजनावळे, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे, तंत्र अधिकारी (विस्तार) एन. डी. माने,  ‍मिरज तालुका कृषि अधिकारी श्री. मिलींद निंबाळकर व तासगाव तालुका कृषि अधिकारी श्री. सर्जेराव अमृतसागर, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, तलाठी, कृषि सहायक उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत चर्चा घडवून आणू व पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा ‍दिलासा दिला.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्यातील काकडवाडी, कदमवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धुळगाव, कोंगनोळी, तासगाव तालुक्यातील कुमठे आदि ठिकाणी नुकसान झालेल्या ज्वारी व द्राक्षे पिकांची पाहणी केली. तसेच कोंगनोळी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी सागर लक्ष्मण वावरे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

000

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘चंद्रकला’ या कादंबरीचे प्रकाशन; ज्येष्ठ पत्रकार प्रा.न मा. जोशी यांची उपस्थिती

यवतमाळ, दि.१ (जिमाका) : पेशाने शिक्षिका असलेल्या चंद्रकला निंबाजीराव भगत यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेखक राजाराम जाधव लिखित ‘चंद्रकला’ या कादंबरीचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. ही कादंबरी चंद्रकला भगत यांनी संघर्षातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

केमिस्ट भवन येथे आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. न.मा. जोशी होते. प्रमुख अतिथी डॉ.टी.सी. राठोड, प्राचार्य रमाकांत कोलते, माजी  पोलिस महानिरीक्षक हरिसिंग साबळे, निंबाजी भगत आणि चंद्रकला निंबाजी भगत हे दाम्पत्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, लेखक राजाराम जाधव यांनी शासकीय सेवेत राहून सामाजिक प्रश्न कादंबरी आणि इतर साहित्य लेखनातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी लिहिलेली चंद्रकला ही कादंबरी वाचनास सुरुवात केल्यास पूर्ण संपेपर्यंत वाचकांना टिकवून ठेवणारी अशीच आहे. या कादंबरीतून चंद्रकला भगत यांनी संघर्षातून स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण केले याचे ज्वलंत उदाहरण आहे, असे पालकमंत्री श्री.राठोड यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार प्रा. न. मा. जोशी म्हणाले की, लेखक राजाराम जाधव यांच्या सामाजिक लिखाणाचे कौतुक करून त्यांच्या विद्यार्थी दशेपासून आजतागायत शासनाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून जी कारकीर्द यशस्वीपणे पार पडली त्याचा लेखाजोखा मांडला आणि ‘चंद्रकला’ कादंबरी संदर्भात अतिशय समर्पकपणे मांडणी केली, लेखकाला पुढील लिखाणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ज्या व्यक्तीच्या जीवन चरित्रावर आधारित कादंबरी लिहिण्यात आली आहे, ती व्यक्ती प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असणे ही महाराष्ट्रातली एकमेव घटना असेल. समाजातील भावभावना, प्रश्न मांडण्यासाठी कादंबरीचे विविध प्रकार आहेत. काव्य हे माणसाला जीवनाचा आधार देतात. काव्यामध्ये ताकद असल्याचे श्री.जोशी यावेळी म्हणाले.

चंद्रकला भगत यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या जीवनातील वास्तव मांडले. माझ्या जीवन चरित्रावर आधारित ‘चंद्रकला’ ही कादंबरी लिहिल्याबद्दल लेखक राजाराम जाधव यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. विशेष अतिथी डॉ. टी.सी राठोड यांनीही ‘चंद्रकला’ कादंबरीच्या लिखाणाबद्दल, त्यातील ओघवत्या भाषेचे कौतुक केले.

यावेळी प्राचार्य रमाकांत कोलते, हरिसिंग साबळे यांनी ‘चंद्रकला’ कादंबरी लिखाणाबद्दल लेखकाची मनोगतान प्रशंसा केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीराजारामजी जाधव यांनी करतांना ‘चंद्रकला’ कादंबरीच्या लिखाणाबद्दलची पार्श्वभूमी विषद केली. सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले तर आभार प्रतीक जाधव यांनी केले. यावेळी नवलकिशोर राठोड, धुपचंद राठोड, हिरासिंग राठोड, प्राचार्य शांताराम चव्हाण, प्राचार्य तोताराम राठोड, दयाराम राठोड, गोवर्धन राठोड, प्रकाश जाधव, ॲड जगदीश पवार उपस्थित होते.

०००

पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट्स कलर’ प्रदान

पुणे, दि.१: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राष्ट्रपतींचे निशाण’ (प्रेसिडेंट्स कलर) देऊन गौरविले. त्यांनी आभासी पद्धतीने ‘प्रज्ञा’ या सशस्त्र दलांच्या संगणकीय औषध उपचार केंद्राचे उद्घाटनदेखील केले.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल ए के सिंह, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक आणि आर्मी मेडिकल कॉर्पस् चे वरीष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल दलजित सिंग, एएफएमसीचे संचालक तथा कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल यांच्यासह संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या, एएफएमसी अर्थात सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च गुणवत्ता असलेली शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या संस्थेतून पदवीधर झालेल्यांनी युद्धाचा काळ, बंडविरोधी कारवाया, नैसर्गिक आपत्ती तसेच महामारीच्या काळात देशांतर्गत तसेच सीमापार भागात समर्पितपणे सेवा देऊन देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

एएफएमसी मधून पदवी मिळवलेल्या अनेक महिला सैनिकांनी सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे तसेच अत्यंत उच्च पदांवर काम केले आहे या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. या महिलांकडून प्रेरणा घेऊन, अधिकाधिक महिला सशस्त्र दलांमधील कारकीर्द निवडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, आज आपण वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता, प्रिसिजन मेडिसिन, त्रिमितीय छपाई, टेलीमेडिसिन आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर होताना पाहतो आहोत. सैनिकांना तंदुरुस्त तसेच युद्धासाठी सदैव सज्ज ठेवण्यात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवा विभागाने महत्त्वाचे योगदान दिले आहे.  त्यांना आपल्या तिन्ही सेनादलांतील कर्मचाऱ्यांना सर्वोच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळेल याची सुनिश्चिती करून घ्यावी लागते असे त्या म्हणाल्या.

एएफएमसीच्या पथकाने वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर अधिक भर द्यावा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना राष्ट्रपतींनी दिल्या. एएफएमसीमधील कर्मचारी त्यांच्या कार्यात उत्कृष्टता आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करतील, असा विश्वासदेखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

०००००

 

जिल्हा वार्षिकसह विविध योजनेच्या ५८१ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

कामे गुणवत्तापुर्वक करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश; योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा देणारी कामे करण्याच्या सूचना

यवतमाळ, दि.1 (जिमाका) : जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली. या बैठकीत सन 2024-25 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनेच्या तब्बल 581 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. या विविध योजनेतून कामे करतांना शेतकऱ्यांना दिलासा देणारी असावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला खा.हेमंत पाटील, आ.निलय नाईक, आ.धीरज लिंगाडे, आ.डॅा.वजाहत मिर्झा, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.डॅा.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.नामदेव ससाने, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत तीन वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. त्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेचा समावेश आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील या विविध योजनांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. नियोजन समितीच्या या बैठकीत या तिनही योजनेसह डोंगरी विकास कार्यक्रमाचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे आराखडे मंजूर करण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या आराखड्यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या 393 कोटीच्या आराखड्याचा समावेश आहे. यासोबतच अनुसूचित जाती उपयोजना 84 कोटी रुपये, आदिवासी उपयोजना 102 कोटी 66 लाख रुपये तर डोंगरी विकास कार्यक्रमाच्या 2 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली. मंजूरी दिलेल्या या विविध विकास आराखड्यांची एकून रक्कम 581 कोटी 66 लाख रुपये ईतकी आहे.

जिल्हा वार्षिक योजनेसह विविध विकास योजनेतून कामे करतांना गुणवत्तापुर्वक असावी तसेच या योजनांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न विविध विभागांनी करावा, अशा सुचना यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत खासदार, आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा झाली. कामे करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, त्यांना सुचविलेल्या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

000

परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी पोलिसांच्या पाल्यांना १० टक्के जागा राखीव – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत असलेल्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत  देण्यात येणाऱ्या परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी पोलिसांच्या पाल्यांना १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून  ताडदेव येथील पोलीस वसाहत आणि वरळी येथील मुंबई पोलीस कॉसिल्लिंग अँड प्लेसमेंट सेंटर एल विभाग 3 येथे कौशल्य प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री.लोढा यावेळी बोलत होते. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, सशस्त्र पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह, पोलिस सह आयुक्त एस.जयकुमार, पोलीस उपायुक्त प्रज्ञा झेडगे, अस्मिता संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र छांजड यासह पोलिस व पोलिसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. 

मंत्री श्री.लोढा म्हणाले, पोलीस आणि त्यांच्या कुटूंबियांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यात येत आहे. फक्त कौशल्य शिकविण्यावर नाही तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये अजून बदल करता येतील. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयंरोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईल, सरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यायचे याचे देखील मार्गदर्शन करता येईल असे मत मंत्री श्री.लोढा यांनी व्यक्त केले.

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योग उभारणीसाठी पोलीस आयुक्त फंडातून मदत मिळणार : विवेक फणसळकर

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात कौशल्य उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा उपक्रम आहे. मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता सुरू केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून काही तरी करू इच्छिणाऱ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महिलांना घरची जबाबदारी सांभाळत असतानाही एखादा व्यवसाय करता येवू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची संधी मिळेल. कौशल्य विकासाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू आपल्याच पोलिस कुटुंबाना विक्री करण्यासाठी देखील व्यासपीठ उपलब्ध देण्याबरोबरच तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण घेवून व्यवसाय करण्यासाठी पोलिस आयुक्ताच्या फंडातून मदत करण्यात येईल.

अशा प्रकारे राबविण्यात येणार कौशल्य प्रशिक्षण वर्ग   उपक्रम

पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सासायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगांव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम घेतले जातील. यामध्ये आयटी, गारमेंट, ब्युटी ॲण्ड वेलनेस, ऑटोमोटिव्ह ॲण्ड फुड प्रोसेसिंग क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. किमान ३०० तास ते कमाल ५०० तासाचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरूष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे प्रशिक्षणासाठी नोदंणी करू शकतात.या प्रशिक्षणासाठी एन.आय.सी च्या माध्यमातून बायोमॅट्रीक पध्दतीने प्रशिक्षणार्थीची हजेरी घेण्यात येणार आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेद्वारास शासनातर्फे NSQF स्टॅण्डर्ड चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.प्रशिक्षणापश्चात प्रशिक्षणार्थीला रोजगार संधी, शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

0000

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत

नागपूर दि. १: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर असून आज दुपारी १२.२० ला आगमन झाले. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर शनिवार २ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपतींचे भारतीय वायू सेनेच्या विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विवेक गर्क, ब्रिगेडिअर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदींनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रपतींचे राजभवन येथे स्वागत

दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज राजभवन येथे आगमन झाले, त्याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी पूजा पाटील उपस्थित होते.

०००

 

वृत्तवाहिन्यांनी लोकहिताचे निर्णय लाेकांपर्यंत पोहोचवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०१:  महाराष्ट्राची प्रगती आणि समृद्धी हेच राज्य शासनाचे ध्येय आहे. सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मराठी वृत्तवाहिन्यांनी शासनाच्या लोकहिताच्या निर्णयांना लाेकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मराठी चित्रपट आणि रंगमंच क्षेत्रातील कलावंतांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टिव्ही ९ मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप – मराठी टिव्ही आणि फिल्म अवॉर्ड्स २०२३’ मधील प्रमुख पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व कलावंत आणि विजेत्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, कलावंत हे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका निभावतात. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप दिल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते. टिव्ही ९ हे देशातील मोठे नेटवर्क आहे. टिव्ही ९ चा हा पहिलाच पुरस्कार सोहळा असून त्यात मराठी कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल त्यांनी टीव्ही ९ चे अभिनंदन केले.

मराठी कलावंतांनी रंगमंच जीवंत ठेवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी लोकांनी कलात्मकता आणि सर्जनशीलता जपली असून मराठी कलावंतांनी रंगमंच जीवंत ठेवले असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. टिव्ही ९ ने साधलेल्या प्रगतीचे कौतुक करून बायोस्कोप ला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टिव्ही ९ ने त्याच नावाने आपले पहिले पुरस्कार देण्याची सुरूवात केल्याबद्दल त्यांनी टिव्ही ९ नेटवर्कचे अभिनंदन केले. मराठी चित्रपटांनी आपला दर्जा कायम राखला असल्याचे सांगून त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे यावेळी अभिनंदन केले.

प्रारंभी टिव्ही ९ नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक बरूण दास यांनी प्रास्ताविकाद्वारे आपल्या वाहिनीची भूमिका मांडली.

यावेळी ‘सुभेदार’ या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा तर अभिनेता रितेश देशमुख यांना ‘वेड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘वाळवी’ चित्रपटातील भूमिकेसाठी शिवानी सुर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली तर सुभेदार चित्रपटासाठी दिग्पाल लांजेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. मालिका विभागामध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा, सचिन गोखले यांना याच मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तसेच जुई गडकरी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ‘जय जय स्वामी समर्थ’ साठी अक्षय मुडावदकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

०००

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

ठाणे, दि.30(जिमाका) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आपल्याला मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार, यामध्ये कुठलीही शंका नाही. या देशातील युवकांनासुध्दा हे मान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज कल्याण येथे केले.

“विकसित भारत संकल्प यात्रा” या उपक्रमाच्या पार्शवभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कोलम बस स्टॉप शेजारी, कल्याण- मुरबाड रोड, गोवेली, या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, अपर जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदिया, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, रामदास दौंड, जिल्हा कृषी अधीक्षक दिपक कुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, कल्याण तहसिलदार जयराज देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ, कोलमचे सरपंच राजेश भोईर, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, इतर विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, बचतगटाच्या महिला, शालेय विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये देशाची तसबीर व तकदीर बदलली आहे. हा देश एक विकसित देश, विकसित राष्ट्र म्हणून पुढे येतोय.  देशाचा सन्मान संपूर्ण जगभरामध्ये उंचावलेला आहे आणि आज श्री. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेत जवळजवळ 3 हजार खेड्यांमध्ये श्री. मोदी यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. भारत देशाची 140 कोटी जनता हा माझा परिवार आहे आणि मला कोणतीही जात नाही, जात जर म्हणत असाल तर माझी जात युवा, माझी जात महिला, माझी जात किसान, माझी जात गरिबी आहे, हे सांगितल्यामुळे संपूर्ण देशातील गरिबी हटवणार, जोपर्यंत या देशातील नागरिक सुखी, समृध्द होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि मी थकणार नाही, असा संकल्पच त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, या विकसित भारत संकल्प यात्रेच्या 3 मुख्य गोष्टी आहेत. एक वेगवेगळ्या केंद्रातील योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचविणे, दोन ज्यांना योजना पोहोचल्या आहेत त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला आहे, हे तपासणे आणि  तिसरी गोष्ट म्हणजे सर्वांना बरोबर घेवून जनचळवळ  उभी करणे, या चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी, युवा, महिला यांचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्न करणे, हा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी काही दिवसांपूर्वी “माय भारत” अशी एक संकल्पना मांडली आहे. त्यामध्ये युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम सुरु आहे. भारत देश हा युवा देश आहे. 140 कोटी जनतेपैकी 65 टक्के जनता ही वय वर्ष 35 वर्षांखालची आहे. आणि युवा म्हटले की, नवीन उमेद, नवीन इच्छा, नवीन कार्यपध्दती. कोणतेही आव्हान स्विकारण्याची ताकद युवांमध्ये असते, म्हणूनच भारताचे भवितव्य खूपच चांगले आहे. भारताचा विकास होत आहे, आणखी विकास होणार आहे. आदिवासी भाग, झोपडपट्टी भाग, शहरी-ग्रामीण भाग, अशा सर्व ठिकाणी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यत पोहोचण्याचे काम सुरु आहे, असे सांगून डॉ. कराड यांनी नागरिकांना आवाहन केले की, आपण या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सामील व्हावे आणि आपण आपल्याबरोबर जनचळवळ उभी करुन भारताचा विकास कसा होईल, त्यासाठी प्रयत्न करावा.

यावेळी डॉ.कराड यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व विविध योजनांचे कार्ड वाटप करण्यात आले. तर आमदार किसन कथोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना अशा संकल्प यात्रेतील आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान श्री. मोदी यांचे आभार मानले व या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ निश्चित मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छायादेवी शिसोदिया म्हणाल्या, विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात भिवंडी तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत येथून झाली आहे. ज्या लाभार्थ्यांना आजपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांना तो लाभ मिळवून देणे, विविध शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करणे, असा उद्देश असून तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बचतगटांचे उत्पन्न 1 लाखापर्यंत नेण्याचा निश्चय केला आहे.

यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जात असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या 17 महत्त्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती असलेल्या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील ग्राम व तालुकास्तरावर व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जात आहे. तसेच नागरिकांकडून निवेदनही स्वीकारले जात आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमानिमित्त विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना झालेल्या लाभाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्ड व जलजीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती  देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी सर्वांना मा.पंतप्रधान श्री. मोदी यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश ऐकविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले. योजनांची माहिती प्रत्येक वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी केले. फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार व प्रसिद्धी करीत आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले.

0000000000

जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरियंस सेंटर उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करु

मुंबई, दि. ३० :- मुंबईचे वैभव म्हणून  गेट वे ऑफ इंडिया, सीएसटी, वरळी सी लिंक याकडे पाहिले  जात असले तरीही जिवंत माणसे हे खरे वैभव असते. डबेवाले हे मुंबईचे  खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील, तरी तंत्रज्ञानाचा वापर करुन जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरियंस  सेंटर  उभारू. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरियन्स सेंटरच्या  भूमिपूजन कार्यक्रमात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, नगरसेविका सपना म्हात्रे, मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स  चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, डबेवाले कंप्युटरपेक्षा हुशार आहेत. एकही चूक न होता ते अचूक काम करतात, म्हणून जगभरातील विद्यापीठे, नेते त्यांच्या व्यवस्थापन तंत्राचा अभ्यास करतात. जगभर या असामान्य कामाचे कौतुक केले जाते.

डबेवाल्यांपर्यंत  पोहोचायला १०-१५ वर्ष उशीर झाला असला तरी आता डबेवाल्यांशी तयार झालेला ऋणानुबंध कायम राहील.

नैसर्गिक आपत्तीमध्ये डबेवाल्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत स्वखर्चातून मदत केली. डबेवाल्याना घरे मिळवून देण्यासही उशीर झाला, पण आता लवकरच त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल. तिन्ही रेल्वे लाईनवर घरांची योजना राबविण्यात येईल.

महाराष्ट्र धर्म, स्वधर्म हा वारकरी संप्रदायामुळे ताठ मानेने उभा आहे. वारकरी वारी चुकवत नाही तसे डबेवाले रोज डबा पोहोचवून वारी करतात. त्यांच्या कामातुन रोज वारी घडते.

यावेळी आमदार श्रीकांत भारतीय  प्रास्ताविक करतांना म्हणाले, मुंबईच्या जीवनात भागवत धर्माची पताका जिवंत ठेवण्याचे काम मुंबई डबेवाला यांनी केले आहे. विश्वासाहर्ता हा डबेवाला  यांचा युनिक सेलिंग पॉईंट आहे.

मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे मनोगत व्यक्त करताना  म्हणाले, डबेवाला संघटनेला १२५ वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. या संघटनेसाठी  ५२ वर्ष कामकरीत असताना २५ वर्ष अध्यक्ष म्हणून राहिलो. डबेवाले घरापासून वंचित आहेत. ८० टक्के लोक भाड्याने राहतात. आमचे घराचे  स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साकार करतील याची खात्री आहे असे ते म्हणाले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/

प्रत्येक वंचितास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपयुक्त ठरणार – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे, दि.30 (जिमाका) :- केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ वंचित राहिलेल्यांना त्यांच्या घराजवळच मिळावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु केली आहे. प्रत्येक वंचितास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज भिवंडी येथे केले.

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भिवंडी तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत, घोटगाव येथील एज्यू स्मार्ट डिजिटल स्कूल या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, तहसिलदार अधिक पाटील, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी संजय बागुल, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, इतर विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, बचतगटाच्या महिला, शालेय विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक गावातील गरजू नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा संकल्प आहे. निश्चितपणाने यामधून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ गावातील प्रत्येक गरजू नागरिकांना मिळेल. या उपक्रमाला नागरिकांकडूनही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. सरकारी योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमानिमित्त विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना झालेल्या लाभाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्ड व जलजीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती  देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी सर्वांना मा.पंतप्रधान श्री. मोदी यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश ऐकविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले. योजनांची माहिती प्रत्येक वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी केले. फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार व प्रसिद्धी करीत आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले.

0000000000

ताज्या बातम्या

कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १०: भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत स्थित दिडशे वर्षांपासूनच्या इतिहासाच्या काळ्या खुणा पुसत...

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...