बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 1021

सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर

मुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभ

मुंबई, दि. 3:  मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडेसहाला सुरू केलेला स्वच्छतेचा जागर दुपारी बारापर्यंत सुरू होता. मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी डीप क्लिन मोहिमेचा शुभारंभ केला. सायन, धारावी, कमला नेहरू पार्क, बाणगंगा, बीआयटी चाळ परीसर या भागांना भेटी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली स्वच्छतेची मॅरेथॉन जवळपास सहा तास सुरू होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत रस्ते, गटारी, नाले सफाई, रस्त्यांची सफाई कामांची पाहणी केली जागोजागी सफाई कामगारांनी त्यांनी संवाद साधला. सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो आहेत असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभ झाला. धारावी टी जंक्शन येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थी, सफाई कामगार यांच्याशी संवाद साधत मुंबईची स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ झाली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. नालेसफाई, रस्ते धुणे याकामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी पायपीट केली.

मुंबईत असलेल्या 24 वॉर्डमध्ये सखोल स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकाच वेळी एका वॉर्डमध्ये अन्य चार ते पाच वॉर्डातील सफाई कर्मचारी बोलावून सुमारे तीन ते चार हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून रस्ते, गटारी, पदपथ, नालेसफाई या मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे सफाई कामगारांचे जथ्थे आज मुंबईच्या एफ उत्तर, जी उत्तर, डी वार्ड मध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या हातात झाडू आणि जोडीला रस्ते धुणारी यंत्रे, फॉगर, स्मोक गन या अत्याधुनिक साहित्याच्या मदतीने स्वच्छतेचा जागर सुरू होता.

प्रदुषणमुक्तीवर उपाय योजना म्हणून मुंबईचे रस्ते धुताना आधी त्यावरील माती उचलून मग उच्च दाबाने पाणी मारून रस्ते धुवावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आज पासून सुरू झालेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा परिणाम येत्या काही दिवसात नक्कीच बघायला मिळेल. सफाई कर्मचारी सकाळी लवकर कामाला सुरूवात करतात. मुंबईकरांच्या निरोगी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर असून मुंबईचे खरे हिरो ते आहेत असे सांगत त्यांनी ठरवले तर मुंबई, स्वच्छ, निरोगी आणि प्रदुषणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करा

धारावी भागात मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर या भागातील सार्वजनिक स्वच्छता गृह, शौचालये यांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करण्यात यावी असे निर्दोश मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. केवळ मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर न देता झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते, पदपथ यांची देखील साफसफाई करा. संपूण मुंबईत सखोल स्वच्छता मोहिम यशस्वी राबविली तर आमुलाग्र बदल दिसून येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या 48 वसाहतींचा कायापालट

मुंबईतील सफाई कामगारांच्या 48 वसाहतींचा कायापालट करण्यात येणार असून गौतम नगर, कासरवाडी येथील वसाहतींना भेटी दिल्या आहेत. यासर्व वसाहतींमध्ये दर्जेदार सोयीसुविधा देण्यात येतील.. स्वच्छतेच्या बाबतीत मुंबईचे नाव देशात नव्हे तर जगात अग्रक्रमावर येवू द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना केले.

सायन हॉस्पीटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. धारावी, शाहू नगर, एकेजी नगर, धारावी, टी जंक्शन, कमला नेहरू पार्क, बाणगंगा तलाव, गिरगाव चौपाटी येथील स्वच्छतेची पाहणी केली. जागोजागी मुख्यमंत्री सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करीत होते.

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री रंगले क्रिकेटमध्ये

गिरगाव चौपाटीवर पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनीने छायाचित्र काढण्याची विनंती केली. त्यांनी छायाचित्र घेतल्यानंतर मुलांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात बॅट दिली आणि आमच्या सोबत खेळा अशी विनंती केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुलां सोबत काही क्षण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) उप आयुक्त (परिमंडळ 1) डॉ. संगीता हंसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार , जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

००००

शहराची सुंदरता व स्वच्छतेमध्ये नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि.2 :  नियमित स्वच्छता व शहर सुशोभीकरणाच्या माध्यमातून शहराचे रूप बदलत असते. त्याकरिता शहराच्या सुंदरतेत व स्वच्छतेमध्ये नागरिकांचे श्रम आणि त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सुंदर माझी ओपन स्पेस, सुंदर माझे उद्यान व शहर सौंदर्यीकरण आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, इको-प्रो चे बंडू धोत्रे, पोलीस निरीक्षक श्री.राजपूत, अभय पडगेलवार, राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार,  महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

माझं शहर सुंदर आणि स्वच्छ असावे, याच मानसिकतेतून नागरिकांनी श्रमदान व योगदान द्यावे, असे आवाहन करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महानगरपालिकेने सुंदर माझे उद्यान, सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व नागरीक एकत्रित आले. लहान मुले जेव्हा उद्यानात खेळायला जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. लाखो रुपये खर्च करून देखील असा आनंदी चेहरा बघता येत नाही. त्यासाठी उद्याने उत्तम करा आणि ओपन स्पेस विकसित करा, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये आज सर्वाधिक उद्याने आहेत. घुग्गूसमध्ये 10 पेक्षा जास्त उद्याने, बल्लारपूरमध्ये 14 पेक्षा जास्त ओपन स्पेस विकसित केले तर चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 15 पेक्षा जास्त बालउद्याने विकसित केली आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान, ऑक्सीजन पार्क, जॉगर्स पार्क आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे, उत्तम व सुंदर अशा बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. वनमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू केला. एका दिवसात 2 कोटी 87 लक्ष वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि जनतेने यात सहभाग घेतला. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर वृक्ष लागवड करण्यात आली होती. दाट जंगलाचा भास होईल इतक्या सुंदर वृक्षाचा विस्तार त्या ठिकाणी झाल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

पुस्तिकेचे तसेच नुतनवर्षाच्या कॅलेडंरचे विमोचन : यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस’ या पुस्तिकेचे तसेच 2024 नुतनवर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.

उत्कृष्ट कार्य व योगदानाबद्दल अधिकाऱ्यांचा सत्कार : गणेशोत्सवात योगदान दिल्याबद्दल सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे श्री. चिंतावार तसेच शहर पोलीस स्टेशनचे श्री. राजपूत, डॉ.अमोल शेळके, मनिषा कन्नमवार यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सुंदर माझे उद्यान स्पर्धा पुरस्कार :  महानगरपालिकेमार्फत 23 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा राबविण्यात आली. यामध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त जलमंदीर उद्यान सिव्हील लाईन चंद्रपूर, द्वितीय पुरस्कार प्राप्त दिनदयाल उद्यान, तुकूम तर तृतीय पुरस्कार प्राप्त महात्मा बसवेश्वर उद्यान, वडगाव या गटास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा पुरस्कार : या स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त कर्मवीर खुले मैदान, सरकार नगर चंद्रपूर, द्वितीय पुरस्कार प्राप्त वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघ, द्वारका नगर, तुकूम तर तृतीय पुरस्कार प्राप्त पसायदान जेष्ठ नागरीक, बहूउद्देशीय मैदान या गटास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

गणेश मंडळाना प्रोत्साहनपर पुरस्कार : गणेश मंडळाना उत्स्फूर्त  सहभागाबद्दल जयहिंद गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, ओम गणेश मंडळ, जोडदेऊळ पठाणपुरा गणेश मंडळ आदी मंडळांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. तर दत्तनगर येथील नवयुवक बाल गणेश मंडळास विशेष पर्यावरणपूरक प्रथम पुरस्कार देण्यात आला.

पर्यावरण आणि वनांचे महत्त्व समजण्यासाठी ‘ताडोबा’ हे चालतेबोलते विद्यापीठ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 2 : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण तसेच वनांचे महत्त्व समजण्यासाठी ताडोबा पर्यटन ही महत्वाची बाब झाली असून हे एक चालते – बोलते विद्यापीठच आहे, असे विचार राज्याचे वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारीकरिता पर्यटन वाहनांचे लोकार्पण करताना ते बोलत होते. नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ताडोबा अंधारी प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., राहूल पावडे, देवराव भोंगळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

गतवर्षी देश-विदेशातील जवळपास 3 लाखांच्या वर पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी आले, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा प्रकल्पातील सोयीसुविधा उत्तम व्हाव्यात, यादृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले असून सिंगापूरच्या आर्किटेक्चरला डिझाईन बनविण्याचे काम देण्यात आले आहे. देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात सुंदर टायगर सफारी ताडोबाची राहील, यासाठी आपण प्रयत्नशील आहो. अतिशय महत्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यामुळे टायगर सफारीकरीता गाड्या टप्प्याटप्प्याने बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिल्या टप्पात आज सहा गाड्यांचे लोकार्पण होत आहे, असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद मिळणार : चंद्रपूर जिल्ह्यात राहणा-या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांनाही ताडोबाची व्याघ्र सफारी व्हावी, त्यांना वनांचे निरीक्षण जवळून करता यावे तसेच पर्यावरणाचा अभ्यास व्हावा, यासाठी जिल्ह्यातील 7500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ‘चला जाणूया वनाला’ या उपक्रमांतर्गत मोफत वनपर्यटन, व्याघ्र दर्शन घडविण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना ताडोबासह राज्यातील इतर अभयारण्यात वन व वाघ्र पर्यटनाचे मोफत नियोजन करण्यात येणार आहे,

नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नवीन क्रुझर वाहनांसाठी 92 लक्ष 79 हजार रुपयांचा निधी : ताडोबा वन्यजीव कोअर विभागात जिप्सी व कॅन्टर वाहनाद्वारे पर्यटक सफारीचा आनंद घेतात. कोअर विभागातील बरेच रस्ते एकेरी व छोटे असल्याने कॅन्टर वाहन जाण्यास अडचण निर्माण होते.  तसेच या वाहनांच्या आवाजामुळे इतर पर्यटकांना त्रास होतो. त्यामुळे कँटरद्वारे सफारी करणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने नऊ आसनाचे क्रुझर पर्यटन वाहन सुरू करण्याची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. यासाठी जिल्हा वार्षिक योजना (2022-23) नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत क्रुझर वाहन खरेदी करण्यासाठी 92 लक्ष 79 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झाला.

नवीन क्रझर वाहनात जंगल सफारीच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यात आले आहेत. ही वाहने मोहर्ली गेटवरून पर्यटकांसाठी नियमीत उपलब्ध राहतील.  या वाहनांसाठी बुकींग व्यवस्था पूर्वीप्रमाणेच बुकींग मशीनद्वारे क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयात उपलब्ध राहील.

 

महसूल विभागासाठी 10 नवीन बोलेरो : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतीमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासाठी 10 नवीन बोलेरो गाड्यांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २: राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना  मुदतवाढ करण्याबाबत आदेश दिले.

उत्पादन शुल्क विभागातील लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान नि वाहनचालक आणि चपराशी  या पदांच्या एकूण ७१७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या भरती प्रक्रियेस मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाची मंजुरी मिळाली होती. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाली होती. यात १ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.

मात्र, हे अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता आले नाहीत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना काही दिवस इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा मंत्री शंभूराज देसाई यांनी संवेदनशीलतेने विचार करून विभागास तात्काळ मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना त्यांनी निर्देश दिल्यानंतर  विभागाकडून सोमवार, ४ डिसेंबर २०२३ च्या रात्री ११:५५ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या उमेदवारांनी दि. ३० मे, २०२३ रोजीच्या जाहिरातीस अनुसरून दि. ३० मे, २०२३ ते ०९ जून, २०२३ या कालावधीत अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा केले आहे, त्यांनाच त्यांच्या अर्जात दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ पासून ते दि. ०८ डिसेंबर २०२३ च्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत बदल करता येणार आहेत.

याबाबत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या. मात्र, एकही इच्छुक विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून वंचित राहू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच आता ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यादृष्टीने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तसेच ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध असून आता मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहनही मंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने केले आहे.

आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार

मुंबई, दि. 02 – रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या 4 व 5 डिसेंबर, 2023 रोजी भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपली असून, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीनंतर केंद्राकडून 4 व 5 डिसेंबर या दोन दिवसांसाठी पीक विमा पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, तसेच आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी किमान दोन दिवस वरील पिकांचा विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात यावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती. ही विनंती केंद्राकडून मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान  ज्वारी, आंबा, काजू, संत्रा आदी उत्पादक शेतकरी विहित वेळेत आपला विमा भरु शकले नव्हते, त्यांनी दि. 4 व 5 डिसेंबर दरम्यान आपला विमा भरुन प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री ४ डिसेंबर रोजी  करणार अनावरण

नवी दिल्ली, 2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून संध्याकाळी 4.15 वाजता सिंधुदुर्गला पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ कार्यक्रमाला प्रधानमंत्री उपस्थित राहतील. प्रधानमंत्री भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके  सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदुर्ग येथील ‘नौदल दिन 2023’ सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे प्रधानमंत्र्यांनी जलावतरण केले. तेव्हा शिवरायांच्या राजमुद्रेपासून  प्रेरणा घेत साकारण्यात  आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला आहे.

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रति नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते.

शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 02: राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा तयार करताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे बालकांवर अतिरिक्त भार न येता त्यांना जे ज्ञान मिळणे गरजेचे आहे, ते सुद्धा दिले गेले पाहिजे, अशा पद्धतीने अभ्यासक्रम बनविण्यात यावा. सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्व शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

जवाहर बालभवन येथे राज्य पायाभूत शैक्षणिक आराखड्याबाबत राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत आढावा घेताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते. बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सहायक आयुक्त अरविंद रामरामे, शिक्षण संचालक सर्वश्री संपत सूर्यवंशी, महेश पालकर आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, एससीईआरटीचे संचालक अमोल येडगे, डॉ. दीपक म्हैसेकर, सुहास पेडणेकर, डॉ. मधुश्री सावजी आदी उपस्थित होते.

पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमाबाबत सूचना देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले, शालेय शिक्षण विभागाने बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेबरोबर करार केला आहे. अभ्यासक्रम बनविताना बालमनाचा अभ्यास करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी. बाल मानसोपचार तज्ज्ञ यांचेही मार्गदर्शन घ्यावे. मुलांवर अभ्यासाचे दडपण येणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत तज्ज्ञांचे पॅनल तयार करावे. त्यांचे मत जाणून घेऊन अभ्यासक्रम बनवावा. पॅनलमध्ये बाल मानसोपचार तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञ, सीबीएसई  शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञ, बोर्डाच्या शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञ यांचा समावेश असावा. पॅनलवरील तज्ज्ञांचा अहवाल घ्यावा. या अभ्यासक्रमात बोली भाषा व मराठीची सांगड घालावी.

मंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले, मुलांना आनंद मिळावा, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. बोली भाषेतून भाषा ज्ञान देण्यात यावे. अभ्यासक्रम अंतिम होण्यापूर्वी तज्ज्ञांच्या माध्यमातून विचार मंथन झाले पाहिजे. सर्वंकष अभ्यासक्रम तयार झाला पाहिजे. अध्यापनाबाबत शाळांमध्ये पालकांचा प्रतिसाद घ्यावा. पालकांच्या प्रतिसादानुसार अध्यापनामध्ये शिक्षकांनी बदल करावा. महिन्यातून किमान एक वेळ तरी पालकांचा प्रतिसाद घ्यावा. मुलांच्या शाळांची वेळ व दिवसातील तासांचा कालावधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निश्चित करावा. त्यासाठी राज्यातील उत्कृष्ट, नावाजलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे दिवसाचे शैक्षणिक तास लक्षात घ्यावे. याबाबतीत झालेले संशोधन तपासावे. त्यानुसार पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांसाठी धोरण ठरवावे. दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतंत्र शाळेसोबतच आठवड्यातून किमान एक दोन दिवस अन्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण देण्याची व्यवस्था करावी.  जेणेकरून त्यांच्यातील न्यूनगंड दूर होईल.

बैठकीत उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या. तसेच पुढील बैठकीपूर्वी दिलेल्या सूचनांनुसार आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी दिले. संचालक श्री.येडगे यांनी आभार मानले. बैठकीला समितीचे अशासकीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मुंबईतील धारावी आणि डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

संपूर्ण स्वच्छता मोहिमेची ‘प्रमाणित कार्यपद्धती’ तयार

यापुढे दर शनिवारी, प्रत्येक परिमंडळात एक विभाग याप्रमाणे, सात विभागांमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता होणार

मुंबई, दि. २ – स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्‍यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्‍यात आली आहे. या ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत उद्या रविवार, दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७:०० वाजता जी उत्‍तर विभागातील धारावीतून करण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी डी विभागातदेखील संपूर्ण स्वच्छता मोहीम सकाळी १०:०० राबवली जाणार आहे.

राज्‍याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे सुमारे ५ हजार अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकदेखील सहभागी होणार आहेत.

या विशेष मोहिमेअंतर्गत निवडलेल्‍या विभागातील रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई,  सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, कर्मचारी वसाहतींमध्ये स्वच्छता, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडामुक्त  परिसर, केबल्स व वायर्स यांचे जाळे हटवणे आदी कार्यवाही केली जाणार आहे. या स्वच्छ‍ता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह, समाजातील ख्यातनाम व्यक्ती, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था – संघटना आदींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या विशेष मोहीमेविषयीचा तपशील देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव म्हणाल्या की, डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या दोन महिन्‍यातील प्रत्‍येक शनिवारी राबविण्‍यात येणा-या ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, महानगरपालिकेच्‍या विविध विभागातील अधिकारी – कर्मचा-यांच्‍या जबाबदारीचे वाटप करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार, प्रत्येक परिमंडळातील एक विभाग (वॉर्ड) निवडून व्‍यापक स्‍तरावर व सखोल, सर्वांगीण स्‍वच्‍छता केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहील. विभागाचे सहायक आयुक्त साप्ताहिक कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रांची नावे निश्चित करतील. शनिवारी सकाळी सामूहिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी त्या भागातील सर्व रस्ते, गल्ल्या संबंधित कर्मचा-यांकडून नियमित कामकाजाप्रमाणे स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छता मोहिमेदरम्यान वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग आदी आवश्यक अतिरिक्त वाहने आणि संयंत्रे पुरवतील. तर अतिक्रमण निर्मूलन विभाग विनापरवाना जाहिरात फलक, पोस्टर्सवर आदींवर कारवाई करेल. तसेच परिसरातील बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत देखील घेण्‍यात येईल.

डीप क्लिनिंगमोहिमेसाठी प्रमाणित कार्यपद्धती

१) विभागाचे सहायक आयुक्त त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रांची नावे निश्चित करतील.

२) कचरा अलगीकरणासह सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, सार्वजनिक उद्याने – स्थानिक उद्यानांची निगा राखणे, मुलांसाठी खेळण्याची साधने असणे व ती सुस्थितीत असणे, शासकीय कर्मचारी निवासस्थाने – वसाहतींमध्ये सामूहिक स्वच्छता राबविणे, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, अस्ताव्यस्त विखुरलेले केबल्सचे जंजाळ काढणे यांसह विविध उपाययोजना राबविल्या जातील.

३) गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिकांना स्वच्छता मोहिमेबद्दल माहिती दिली जाईल.

४) सामूहिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी त्या भागातील सर्व रस्ते, गल्ल्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून नियमित कामकाजाप्रमाणे स्वच्छ करण्यात येतील.

५) ज्या रस्त्यांवर धूळ साचली आहे, असे रस्‍ते फायरेक्स/डिस्लडिंग/वॉटर टँकर वापरून धुतले जातील.  त्‍यानंतर एकाच वेळी ब्रशिंग केले जाईल. या मोहिमेदरम्यान संकलित होणा-या गाळाची स्वतंत्रपणे विल्‍हेवाट लावली जाईल.

६) उद्यान विभागातील कर्मचारी विभागातील उद्याने आणि खेळाचे मैदान स्वच्छ करतील.

७) कीटकनाशक विभाग परिसरात फवारणी करेल आणि संसर्गजन्‍य रोगांना प्रतिबंध करण्‍यासाठी रासायनिक औषधांचा वापर करेल.

८) मोहिमेदरम्‍यान परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहे पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक केली जातील.

९) रस्त्यांलगतच्या भिंती स्वच्छ करुन त्या सामाजिक संदेशाने रंगवल्या जातील. त्‍यासाठी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्‍यात येईल.

१०) जास्तीत जास्त लोकसहभागासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ख्यातनाम मान्यवर, अशासकीय संस्‍था, विद्यार्थी, सामाजिक सक्रिय नागरिक तसेच सामाजिक संघटना इत्यादींना सहभागी करून घेण्‍यात येणार आहे.

११) अनधिकृत जाहिरात फलकांवर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाई करण्‍यात येईल. विभागातील बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्‍यात येईल.

१२) कानाकोप-यात साचलेला कचरा, राडारोडा हटविला जाईल.

१३) स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी घनकचरा विभाग, वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्‍य जल वाहिनी विभाग हे आवश्यक अतिरिक्त वाहने आणि यंत्रणा पुरवतील.

‘मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 02: राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा 5 डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जवाहर बालभवन येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते.

या अभियानासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा – 2 या उपक्रमांचा शुभारंभदेखील 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय कार्यक्रमात राजभवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे, असे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले, उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असणार आहेत. तर उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनजंय मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अ व ब वर्गाच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शाळा अशा स्तरांवर राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात विभाग व राज्यस्तर, तर उर्वरित महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे. या अभियानातून 2 कोटी मुलांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सर्व स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, दत्तक शाळा योजनेत मोठमोठे उद्योग समूह सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व)  निधीच्या उपयोगातून शाळांमध्ये पायाभूत सोयी – सुविधा अद्ययावत करून देणार आहेत. या योजनेतून कुठल्याही प्रकारे शाळांचे खाजगीकरण करण्यात येणार नाही. केवळ शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा अद्ययावत करण्याचा यामागील उद्देश आहे. महावाचन उत्सव – महाराष्ट्रातील वाचन चळवळ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वाचनातून प्रगल्भ करण्याचा उद्देश आहे. उच्च शिक्षण विभागाच्या राज्यात असलेल्या विविध ग्रंथालयांना या उत्सवासाठी शाळांसोबत संलग्न करण्यात येणार आहे. वाचन उत्सवातून विद्यार्थ्यांचा प्रतिसादही जाणून घेण्यात येणार आहे.

माझी शाळा – माझी परसबाग उपक्रमाविषयी माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले, या उपक्रमातून शाळांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे. शाळांमध्ये परसबाग असणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शेतीबद्दलचे ज्ञान वाढेल, त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, शेतीबद्दलचे आकर्षण वाढेल. परसबागेत भाजीपाला उत्पादनासाठी कृषी विभागामार्फत बिया पुरविण्यात येतील. परसबागेत उत्पादित भाजीपाल्याचा समावेश ‘पोषण आहार’ मध्ये करण्यात येईल. यात आठवड्यातून एक दिवस अंडी, भात किंवा भरडधान्यापासून बनविलेल्या पदार्थाचा समोवश करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले, स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचा संस्कार रुजत आहे. स्वच्छतेसाठी विद्यार्थी आग्रही होत आहेत. हा सकारात्मक बदल दिसून येत आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ 5 डिसेंबर रोजी होत आहे. या उपक्रमांमध्ये शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केले.

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान राबवा – विभागीय आयुक्त सौरभ राव

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीपर्यंत चालणार आहे. 18-19 वर्षे वयोगटातील मतदानासाठी पात्र झालेल्या युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान घ्यावे. यामध्ये प्रसारमाध्यमे व राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग घ्यावा. युथ आयकॉन यांचे कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये घ्यावेत, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज येथे दिल्या.

दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष / प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, राजकीय पक्षांसोबत समन्वय साधून त्यांच्या सूचना, काही आक्षेप असतील तर ते विचारात घ्यावेत. मतदार यादीमध्ये नावे जोडणे, कमी करणे व सुधारणा करत असताना पारदर्शकता व निष्पक्षपणे काम करावे. कोणत्याही यंत्रणेविरुद्ध तक्रार येऊ नये याची काळजी घ्यावी. या अनुषंगाने एक मोठी जबाबदारी ERO व त्यांच्या अधिनस्त यंत्रणांची आहे. त्यासोबत राजकीय पक्षांचेही दायित्व महत्वाचे असून, कामाला गती देण्यासाठी व पारदर्शकतेसाठी त्यांनी बुथ लेव्हल असिस्टंटची नियुक्ती अपेक्षित संख्येमध्ये तात्काळ करावी. बुथ लेव्हल असिस्टंट बरेचसे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करू शकतो, असे ते म्हणाले.

यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांचे काही प्रश्न मांडले. यावर अनुषंगिक कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आुयक्त सौरभ राव यांनी दिल्या.

खासदार संजय पाटील यांनी नवमतदार नोंदणीसाठी सेलिब्रेटी किंवा क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंकडून आवाहन करावे, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीबाबत तसेच नवमतदार नोंदणीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 24 लाख 12 हजार 811 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 38 हजार 450, स्त्री मतदार 11 लाख 74 हजार 250 व तृतीयपंथी 111 आहेत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 421 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांनी बुथ लेव्हल एजंट नियुक्त करावा. काही मदत हवी असल्यास बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...