रविवार, मे 11, 2025
Home Blog Page 1022

मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प; ४६ हजार कोटींहून अधिक विकास कामे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि. 16 : – मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही. या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद महसूल विभागाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केल्याचे जाहीर केले. या नामकरणाबाबतची अधिसूचना जाहीर झाल्याने, या दोन्ही नामकरणांवर शिक्कामोर्तबचे झाल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा नवी दिल्ली येथे उभारण्यात येईल. तसेच छत्रपती संभाजीनगर मधील 300 वर्षे जून्या तीन पुलांचे नुतनीकरण करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 2016 नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली. 2016 मध्ये आपण मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाल्याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, नियोजन, ग्रामविकास, कृषी तसेच पशूसंर्वधन आदी विभागांशी निगड़ीत विविध निर्णय घेण्यात आले. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विभागात सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

मराठवाड्यात सुरू असलेल्या कामांची विभागनिहाय माहिती पुढीलप्रमाणे

जलसंपदा – २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये, सार्वजनिक बांधकाम-१२ हजार ९३८ कोटी ८५ लाख
पशुसंवर्धन, दुग्धविकास,मस्त्यव्यवसाय- ३ हजार ३१८ कोटी ५४ लाख, नियोजन – १ हजार ६०८ कोटी २८ लाख, परिवहन – १ हजार १२८ कोटी ६९ लाख, ग्रामविकास – १ हजार २९१ कोटी ४४ लाख, कृषी विभाग – ७०९ कोटी ४९ लाख, क्रीडा विभाग – ६९६ कोटी ३८ लाख, गृह – ६८४ कोटी ४५ लाख, वैद्यकीय शिक्षण – ४९८ कोटी ६ लाख, महिला व बाल विकास – ३८६ कोटी ८८ लाख, शालेय शिक्षण – 490 कोटी ७८ लाख

सार्वजनिक आरोग्य –35.37 कोटी, सामान्य प्रशासन- 287 कोटी, नगरविकास – २८१ कोटी ७१ लाख, सांस्कृतिक कार्य- २५३ कोटी ७० लाख, पर्यटन – ९५ कोटी २५ लाख, मदत पुनर्वसन – ८८ कोटी ७२ लाख, वन विभाग – ६५ कोटी ४२ लाख, महसूल विभाग- ६३ कोटी ६८ लाख,उद्योग विभाग- ३८ कोटी, वस्त्रोद्योग -२५ कोटी, कौशल्य विकास-१० कोटी, विधी व न्याय- ३ कोटी ८५ लाख

जलसंपदा विभाग – मराठवाड्यातला दुष्काळ हटविणार. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहुन जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणार. २२.९अ.घ.फुट पाणी वळविण्याची १४ हजार ४०कोटींची योजना राबविणार.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे रूप पालटवणार. १५०कोटी
वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधारा. १७९३हे क्षेत्र सिंचित होणार. २८५ कोटी ६४ लाख

नियोजन विभाग – मराठवाड्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करणार
वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखडा.१५६.६३कोटी
श्री तुळजा भवानी मंदिराचा१३२८कोटीचा विकास आराखडा
श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास. ६०.३५ कोटी
उदगीर येथे बाबांच्या समाधी स्थळ विकास आराखड्यासाठी १कोटी
सिल्लोड तालुक्यातील मोजे केळगावचे श्री. मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानाच्या ४५ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता
पाथरी येथे साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा. ९१.८०कोटी
मानव विकास कार्यक्रमात 100 बसेस पुरविणे. 38 कोटी

महिला व बालविकास विभाग – मराठवाड्यातील ३४३९ अंगणवाड्यांच्या बांधकामांचा तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम. ३८६.८८कोटी
शालेय शिक्षण-
मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई स्व. दगडाबाई शेळके यांचे धोपटेश्वर येथे यथोचित स्मारक उभारणार. ५ कोटी
मराठवाड्यातील स्वातंत्रसेनानीच्या गावातील शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून विकसित करणार. ७६ तालुक्यांतून शाळा निवडणार. विविध सुविधांसाठी ९५ कोटी.
बीड जिल्ह्यांतील उस तोड कामगारांच्या मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना. १६०० मुलीना लाभ. ८०.०५कोटी
मराठवाड्यातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करणार. २० टक्के लोकसहभागाची अट शिथिल. २०० कोटी खर्च
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ आणि पालम तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरु करणार. ४०० मुलींना शिक्षण घेणे शक्य. २०.७३कोटी खर्च

क्रीडा विभाग-
परभणी जिल्हा क्रीडा संकुला साठी कृषी विभागाची जागा मंजूर. १५ कोटी
छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी समिती गठीत. ६५६.३८कोटी खर्चून अद्ययावत क्रीडा विद्यापीठ उभारणार
कलाग्रामच्या जागेवर एमआयडीसी आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार.
परळीत ५ कोटींचे तालुकाक्रीडासंकुलउभारणार
उदगीर तालुक्यात जळकोट येथे ५ कोटी खर्चून क्रीडासंकुलउभारणार
परभणी जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी १५ कोटीस मंजुरी

पशुसंवर्धन विभाग
मराठवड्यात दुधाची क्रांती येणार. सर्व जिल्ह्यातील ८६०० गावांत दुधाळ जनावरांचे वाटप. ३२२५ कोटी
तुळजापूर तालुक्यात शेळी समुह योजना राबविण्यासाठी १० कोटी
देवणी या गोवंशीय प्रजातीच्या उच्च दर्जाची वंशावळ निवड – ४कोटी

पर्यटन विभाग-
फर्दापूर, छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. प्रत्येकी ५० कोटी
उदगीर तालुक्यातील हत्तीबेट येथे पर्यटनस्थळ- ५कोटी
अंबड येथील मत्स्योदरीदेवी संस्थानाचा विकास. 40 कोटी.

सांस्कृतिक कार्य विभाग-
मराठवाड्यातील विविध स्मारके,प्रसिद्ध मंदिरांचा विकास.अंबेजोगाई, संगमेश्वर, तर, महादेव मंदिर माणकेश्वर, तेर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, होट्टल मंदिर, भोग नृसिंह, गुप्तेश्वर मंदिर धाराशूर, चारठाणा मंदिर समुह, आदि. २५३ कोटी70 लाख.

महसूल विभाग-
बीड जिल्हाधिकारी इमारत उभारणार.६३.६८कोटी
वसमत येथे मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी जागा.
लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची मध्यवर्ती प्रशासकीय शासकीय इमारत.

वन विभाग-
लातूर, वडवाव, नागनाथ टेकडी विकास करणार. ५.४२ कोटी
माहूर येथे वनविश्रामगृह बांधणार.

मदत व पुनर्वसन-
वसमत मौजे कुरुंदा येथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी ३३.०३कोटी
मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणार. प्रादेशिक आपत्ती प्रतिसाद केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे बळकटीकरण.५५.६९कोटीखर्च.
धारुर तालुक्यातील सुकळी या गावचे पुनर्वसन.

उद्योग विभाग-
आष्टीला कृषिपुरक क्षेत्रासाठी एमआयडीसी उभारणार. 38 कोटी
वसमत, चाकूर, वडवणी (पुसरा), मौजे सिरसाळा ता. परळी येथे एमआयडीसी स्थापन करणे.
उदगीर आणि जळकोट येथे एमआयडीसी मंजूर

कौशल्य विकास विभाग-
धाराशिव विश्वकर्मा रोजगार योजना राबविणार

सार्वजनिक बांधकाम-
मराठवाड्यातील रस्ते सुधारणार ३००कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेणार. २४००कोटी
नाबार्ड अर्थसहायातून मराठवाड्यात ४४ कामे हाती घेणार. १०९कोटी
हायब्रिड अॅन्यूईटी योजनेतून मराठवाड्यातील १०३०कि.मी. लांबीचे रस्ते सुधारणार. १० हजार ३००कोटी
साबरमती घाटाप्रमाणे नांदेडचा गोदावरीघाटाचे सौंदर्य खुलणार. रिव्हर फ्रंटसाठी १००कोटीखर्च
औसा तालुक्यातील मातोळा येथे तसेच कंधार तालुक्यातील मौजे कंल्हाळी येथे हुतात्म्यांचे स्मारक उभारणे.
लोहारा तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे बहुउद्देशीय इमारत उभारणार.
पाटोदा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस निधी.
बीड येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम.
लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्ग चार पदरी करणे.

ग्रामविकास विभाग-
मराठवाड्यातील ७५ ग्रामपंचायतींना आता स्वत:चे कार्यालय मिळणार आहे. पुढील ३ वर्षात १८० कोटी देणार. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत.
बीड येथे जिल्हापरिषदेची नवीन इमारत. ३५ कोटी.
उर्जा विभाग
परळी औष्णीक विद्युत केंद्र येथील प्लांट्सना मंजुरी.
गृह विभाग
नांदेड शहरात सीसीटिव्हीचे जाळे.शहर सुरक्षित होणार. १००कोटी
१८निजामकालीन पोलीस स्टेशन्सचा होणार कायापालट. ९२.८०कोटी
बीड, परळी, अंबाजोगाई येथे पोलीस हौसिंग. 300 कोटी.
छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौक पोलीस ठाणे इमारत आणि निवासस्थाने तसेच मिल कॉर्नर येथील निवासस्थाने. 191 कोटी 65 लाख.

परिवहन विभाग-
मराठवाड्यातील विविध शहरांतील बस स्थानकांमध्ये अमुलाग्र बदल करणार
छत्रपती संभाजीनगर विभागात आधुनिक ११९७ई-बसेस चालवणार . ४२१कोटीस मान्यता
छत्रपती संभाजीनगर विभागात वाहन निरिक्षण व परिक्षण केंद्र स्थापन करणार. १३५.६१ कोटी
राज्यातील ९ राष्ट्रीय महामार्गावर Intelligent Traffic Management Systemबसविणार. पुणे- छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पास मान्यता. १८८.१९कोटी खर्च येणार
छत्रपतीसंभाजीनगर व नांदेड येथे स्वयंचलित चाचणी पथ प्रकल्प.१०.३७ कोटी
वरील सर्व उपक्रमांना मिळून एकूण 1 हजार 128 कोटी 69 लाख निधी.

नगरविकास विभाग-
मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये ६४०.२९ कोटी निधी . त्यापैकी रुपये ५३४.७४ कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये ५०५.५५ कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर
केंद्र पुरस्कृत अमृत २.० – छत्रपती संभाजीनगर शहरासाठी रुपये २७४०.७५ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प रुपये २७५.६८ कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प तर रुपये २.७८ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प असे एकूण रुपये ३०५९.२१ कोटी किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
नांदेड वाघाळा महानगरपलिकेसाठी रुपये ३२९.१६ कोटी किमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प
अर्धापूर नगरपंचायतेसाठी रुपये २५.१३ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
भूम नगरपरिषदेसाठी रुपये १.८३ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
माहूर नगरपरिषदेसाठी रुपये २४.६२ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
पेठ उमरी नगरपंचायतेसाठी रुपये ३.६० कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
हिंगोली शहरासाठी रुपये १०४.२८ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
औंढा नागनाथ तिर्थक्षेत्रासाठी रुपये ३६.४४ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प
खुलताबाद शहरासाठी रुपये २१.३२ कोटी किमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प
नळदुर्ग शहरासाठी रुपये ९३.४२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
माजलगांव शहरासाठी रुपये ४६.५४ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
लोहा शहरासाठी रुपये ६६.३९ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प
तुळजापूर तिर्थक्षेत्रासाठी रुपये १५८.५२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
उमरगा शहरासाठी रुपये १२६.८२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्प रुपये १६.५६ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
जालना शहर पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये ३५ MLD क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र व १५ MLDक्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यासाठी रुपये ५६.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येईल.रुपये ४७.९८ कोटी
नांदेड वाघाळा महानगरपालिका घनकचरा प्रकल्प- रुपये ८.०७ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
श्री. क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकास आराखडा- रुपये २८६.६८ निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
औंढा नागनाथ विकास आराखडा रुपये ५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये ६४०.२९ कोटी निधी . त्यापैकी रुपये ५३४.७४ कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये ५०५.५५ कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर
परभणी शहराची रुपये १५७.११ कोटी किंमतीची समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येईल.
परभणी शहराची रुपये ४०८.८३ कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प मंजूर करण्यात येईल.
लातूर रस्ते विकास प्रकल्प रुपये ४१.३६ कोटी मंजूर करण्यात येईल.
नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता लातूर महानगरपालिकेस रुपये २६.२१ कोटी व परभणी महानगरपालिकेस रुपये ११.७५ कोटी निधी मंजूर करण्यात येईल.
उदगीर नगरपरिषदेस नाट्यगृहाच्या बांधकामासाठी रुपये १२ कोटी निधी मंजूर करण्यात येईल.
उदगीर शहरात भूमीगत गटार यंत्रणा.
नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील कार्यान्वीत असलेल्या घनकचरा प्रकल्प व प्रगतीपथावर असलेल्या बायोगॅस प्रकल्पासाठी रुपये ८.०७ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

माहिती व तंत्रज्ञान संचालनालय-
मराठवाड्यात ४३२ ग्रामपंचायतीना भारतनेट जोडणी वर्षभरात देणार. २८६ कोटी.
छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे विद्यापीठ परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यासाठी माहिती संग्रहालय.

(रोजगार हमी योजना)
मराठवाड्यात 4 लाख विहिरींचा कार्यक्रम राबविणार.

(कृषी विभाग)
आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बीड येथे सीताफळ आणि इतर फळांवर प्रक्रिया उद्योग. ५ कोटी
हळद संशोधनास आता वेग येणार. हिंगोलीतील हरिद्रा संशोधन केंद्रासाठी १०० कोटी.
अंबाजोगाई येथील शासकीय कृषी महाविद्यालयात मुलामुलींचे वसतीगृह सुरु.105 कोटी.

सार्वजनिक आरोग्य विभाग
अहमदपूर, चाकूर, माजलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर, धारुर तालुक्यातील तेलगाव तसेच वडवली येथे ग्रामीण रुग्णालयास निधी, किनगाव ग्रामीण रुग्णालय बांधकाम. एकूण निधी 374 कोटी 91 लाख.
(मृद व जलसंधारण)
अहमदपूर तालुक्यातील मानार नदीवर 9 कोल्हापुरी बंधारे. पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी आणि उंबर विहिरा साठवण तलाव, आष्टी आणि शिरुर तालुक्यात कोल्हापूर बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रुपांतर आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी, घळाटी, टोकवाडी आणि पोखर्णी नदीवर सिमेंट नाले बंधारे.
(अल्पसंख्याक विकास)
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती.
छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अनुदानात वाढ. तसेच पारंपारिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरसांचे अनुदान 2 लाखावरुन 10 लाख करणे.
इतरही घोषणा:परळी वैजनाथ विकास आराखड्यात आयुर्वेद पार्कचा समावेश, वेरूळ येथे शहाजी राजे भोसले यांचे स्मारक
00000

मंत्रिमंडळ निर्णय

छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ

 उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. स्वयं सहायता समूहांसाठी फिरत्या निधीत तसेच कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स (समुदाय संसाधन व्यक्तींच्या) मानधनात वाढ करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये १ लाख २४ हजार गटांना रुपये २४८.१२ कोटी वितरीत करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील १२ लक्ष ४५ हजार  महिलांना आणि मराठवाड्यातील ८ हजार ८३३ समुदाय संसाधन व्यक्तींनात्याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.

स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणा-या 15 हजार रुपये फिरता निधीमध्ये वाढ करुन ती रक्कम 30 हजार रुपये करण्यात आली आहे. सर्व स्वयंसहाय्यता गटांसाठी रुपये ९१३ कोटी खेळते भांडवल म्हणून राज्य शासनाकडून देण्यात येतील.

त्याचप्रमाणे समुदाय संसाधन व्यक्तींना दरमहा देण्यात येणारे 3 हजार रुपये मासिक मानधनात वाढ करुन दरमहा 6 हजार रुपये मासिक मानधन करण्यात आलेले आहे. यासाठी राज्य शासनाने वाढीव 163 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महाराष्ट्रामध्ये एकूण ६ लाख ८ हजार  स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून साधारण ६० लाखापेक्षा जास्त महिलांना या कार्यक्रमात सामावून घेतलेले आहे. यापैकी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १ लाख २४ हजार स्वयंसहाय्यता गटांमध्ये साधारणपणे १२ लाख २३ हजार  महिलांचा समावेश आहे. अभियानांतर्गत गटांना सुरवातीच्या टप्प्यात दिले जाणारे खेळते भांडवल केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्रातील ३ लाख ८८ हजार  गटांना  रुपये ५८२ कोटी  वितरीत केलेले आहेत, त्यापैकी मराठवाड्यामध्ये ८३ हजार ५९३ गटांना रुपये १२५ कोटी रकमेचे वितरण करण्यात आलेले आहे. यामध्ये अधिकचे खेळते भांडवल महिलांना उपलब्ध होऊन जास्तीत जास्त रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे.

—–0—–

मराठवाडयात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार

11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता; १३ हजार ६७७ कोटी सुधारित खर्चास मान्यता

मराठवाड्यातील दहा सिंचन प्रकल्प आणि त्यासाठी १३ हजार ६७७ कोटी सुधारित खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मंजूरी देण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये अंबड प्रवाही वळण योजना (ता. दिंडोरी) जि. नाशिक, निम्न दुधना प्रकल्प (ता. सेलू) जि. परभणी, जायकवाडी टप्पा- 2 (ता. माजलगांव) जि. बीड, बाभळी मध्यम प्रकल्प (ता. फुलंब्री) जि. नांदेड, वाकोद मध्यम प्रकल्प (ता. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प (ता. पुसद) जि. यवतमाळ, पोटा उच्च पातळी बंधारा (ता. औंढा, नागनाथ) जि.हिंगोली, जोडपरळी उच्च पातळी बंधारा (ता. वसमत) जि. हिंगोली, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा (ता. वसमत) जि. हिंगोली, ममदापूर उच्च पातळी बंधारा (ता.पूर्णा), जि. परभणी, उनकेश्वर उच्च पातळी बंधारा (ता.किनवट) जि. नांदेड यांचा समावेश आहे.

अंबड प्रवाही वळण योजनेसाठी 10 कोटी 33 लाख रुपये खर्च येईल.  यामुळे करंजवण धरणातील व स्थानिक वापरासाठी 51 हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध होणार आहे.निम्न दुधना प्रकल्पाच्या कामास  728 कोटी 85 रुपये खर्च येईल. या प्रकल्पाद्वारे परभणी व जालना या दोन जिल्ह्यातील एकूण 34 हजार 438 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या 4 हजार 104 कोटी 34 लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. 1 लाख 18 हजार 790 हेक्टर सिंचन क्षेत्राला याचा फायदा होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पोटा उच्च पातळी बंधारा प्रकल्पाच्या 237 कोटी 20 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील 1 हजार 429 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. जोडपरळी उच्च पातळी बंधाऱ्यासाठी 236 कोटी 51 लाख रुपये कामास मान्यता देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील 1434 हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा प्रकल्पाच्या 2 हजार 611 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील 1 हजार 356 हेक्टर. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ममदापूर उच्च पातळी बंधाऱ्यासाठी 271 कोटी 87 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. परभणी जिल्ह्यातील 1 हजार 375 हेक्टर. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील जायकवाडी टप्पा-२ ( ता. माजलगाव) प्रकल्पाच्या 536 कोटी 61 लाख रुपये खर्चाच्या आधिक्य किंमतीस मान्यता देण्यात आली. हे पाणी माजलगाव धरणातून माजलगाव उजवा कालव्याद्वारे कि.मी. 0 ते 148 मधील 84 हजार 850 हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देता येऊ शकेल.

नांदेड जिल्ह्यातील बाभळी (ता. धर्माबाद) येथील मध्यम प्रकल्पाकरिता 771 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे 1 हजार 600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अशा रीतीने दोन्ही बंधाऱ्याच्या दोन्ही तीरावरील एकुण 7 हजार 995 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वाकोद (ता. फुलंब्री) येथील मध्यम प्रकल्पाकरिता 275 कोटी 01 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. यामुळे फुलंब्री तालुक्यातील 11 गावातील 2 हजार 217 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. याशिवाय सात गावांसाठी 1.915 दलघमी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. नांदेड जिल्हयातील उनकेश्वर (ता. किनवट) येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्पाच्या 232 कोटी 71 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. किनवट   तालुक्यातील   1 हजार 90  हेक्टर आणि यवतमाळ  जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 370 हेक्टर असे एकूण 1 हजार 460 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

साखळी बंधाऱ्यांना एकच प्रशासकीय मान्यता

राज्यात आता साखळी बंधाऱ्यांमधील प्रत्येक बंधाऱ्याची स्वतंत्र प्रशासकीय मान्यता न घेता प्रकल्प म्हणून सर्व साखळी बंधाऱ्यांची मिळुन एकत्र प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. या संदर्भात स्थापन केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

——0——

राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय

राज्यातील शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेत रकमेच्या स्वरुपात देणगी देता अथवा स्वीकारता येणार नाही. कॉर्पोरेट ऑफिसेसना सीएसआरच्या माध्यमातून अशा प्रकारची देणगी देता येईल. पायाभूत व भौतिक सुविधा ज्यामध्ये स्थापत्य व विद्युत काम, काळानुरूप आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, डिजीटल साधने, आरोग्य सुविधा, रेन वाटर हार्वेस्टिंग, सॅनिटरी पॅड व्हेंडीग मशिन्स यासारख्या नाविन्यपूर्ण बाबींसाठी वस्तू व सेवांच्या स्वरुपात देणगी देता येईल. देणगीदारास पाच वर्षे अथवा दहा वर्षे कालावधीसाठी शाळा दत्तक घ्यावी लागेल.

राज्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट ऑफिसेस आदींच्या सहकार्यातून शाळांसाठी पायाभूत सुविधा व आवश्यक संसाधनांची उपलब्धता वाढवून त्यायोगे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करण्याचा या  योजनेचा मुळ उद्देश आहे. यात समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट ऑफिसेस यांना विशिष्ट शाळा दत्तक घेता येईल. या शाळेच्या गरजेनुसार त्यांना आवश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करता येईल. त्याचप्रमाणे अतिरिक्त वर्ग खोल्यांचे बांधकाम, इमारतींची दुरुस्ती, देखभाल व रंगरंगोटी या मार्गाचा देखील अवलंब करण्यास मुभा असेल.

दत्तक शाळा योजने अंतर्गत सर्वसाधारण पालकत्व व नामकरण आधारित विशिष्ट पालकत्व अशा दोन पद्धतीने देणगी देता येईल. ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी पाच वर्ष कालावधीसाठी देणगीचे मूल्य 2 कोटी व 10 वर्ष कालावधीसाठी 3 कोटी रुपये इतके राहील. तर ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी हे मुल्य अनुक्रमे 1 कोटी व 2 कोटी रुपये तसेच, ‘ड’ वर्ग महानगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामीण भागातील शाळांसाठी हे मूल्य अनुक्रमे 50 लाख व 1 कोटी रुपये इतके होत असेल तर देणगीदाराच्या इच्छेनुसार त्याने सुचविलेले नांव शाळेस त्या विशिष्ट कालावधीकरिता देता येईल.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. 1कोटी व त्याहून अधिक मूल्याचे प्रस्ताव या समितीस सादर करण्यात येतील. क्षेत्रीय स्तरावर महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांकरिता अनुक्रमे आयुक्त, महानगरपालिका, संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात येतील. या समितीस 1 कोटीहून कमी मूल्यांच्या प्रस्तावांची छाननी करून त्यास मान्यता देण्याचे अधिकार असतील.

—–0—–

समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ

समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमातंर्गत करार पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्य स्तरावरील कार्यालयात ६४ व जिल्हा स्तरावरील कार्यालयात ६१८७ असे एकूण ६२५१ कर्मचारी यांना याचा लाभ मिळेल. अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.

या कर्मचाऱ्यांच्या मानधनापोटी २२९ कोटी ५६ लाख एवढा वार्षिक खर्च येतो. मानधनात १० टक्के वाढ केल्यामुळे2५२ कोटी ५२ लाख इतका खर्च येईल.

—–0—–

सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत सौर ऊर्जा कुंपणाच्या किंमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपये या पैकी जी कमी असेल अशी रक्कम थेट हस्तांतरण (डीबीटी) पदध्तीने अनुदान स्वरुपात देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेसाठी २०२३-२४ साठी अर्थसंकल्पीत शंभर कोटी रुपयांपैकी साठ कोटी रुपयांची तरतूद सौर ऊर्जा कुंपणाकरीता करण्यात आली आहे.

वनक्षेत्राचे प्रभावी संरक्षण झाले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु, त्याचबरोबर मानव-वन्यजीव संघर्ष विशेषत: शेती-पिकांच्या नुकसानीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. वन्यजीवांमुळे शेतपिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना पिकाचे रक्षणाकरीता रात्रीच्या वेळी शेतावर पिकाचे संरक्षण करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय तर होतेच पण वन्यजीवांच्या हल्ल्याचा धोकादेखील असतो. त्यासाठी सौर कुंपण उपयुक्त ठरते.

—–0—–

राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना

८५ हजार रुपये दरमहा मानधन

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी पदावर नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांना पुढील ५वर्षांसाठी ८५हजार रुपये दर महाइतके सुधारित मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यमंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यासाठी येणाऱ्या वार्षिक १२.९८कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली. राज्यातील वरीष्ठ निवासी संवर्गातील डॉक्टरांना वेगवेगळे मानधन अदाकरण्यात येत असल्याने सदर मानधनातील तफावत दूर होण्यास यामुळे मदत होईल.

एकूण १४३२ पदे राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर नव्याने निर्माण करण्यास ६ जानेवारी २०२३ रोजी मान्यता देण्यात आली होती. राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्स संवर्गातील एकूण मंजूर पदे आता त्यामुळे २२७६ झाली आहेत. यामध्ये मराठवाड्यातील ४८३ पदे आहेत.

राज्यात एकूण २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून एकूण १७ संस्थामध्ये २५ हजार रुपये  व त्यावर प्रचलित दराने देय होणारा महागाई भत्ता या दराने मानधन प्रस्तावित करण्यात आले आहे. उर्वरीत ६ महाविद्यालयांतील वरीष्ठ निवासी संवर्गातील डॉक्टरांना त्या त्या महाविद्यालयाच्या पदनिर्मितीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मानधन अदा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

—–0—–

लाल कंधारी, देवणी या देशी

गोवंशाचे जतन करणार

लाल कंधारी व देवणी गोवंश प्रजातीचे जतन  व संवर्धनाकरिता अंबेजोगाई तालुक्यातील मौजेसाकुड येथे  पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन  प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

लालकंधारी व देवणी या देशी गोवंशाचे मूळ पैदास क्षेत्र मराठवाड्यात असून,सदर गोवंशाचे अस्तित्व मराठवाड्यातीललातूर,बीड,उस्मानाबाद,परभणी,औरंगाबादया  जिल्ह्यात आहे.या स्थानिक जातींचे वैशिष्ट्येम्हणजेसदर जातीया दूध उत्पादन व  नर पशुधन शेतीकामासाठी उपयुक्त आहेत, मात्र 2013 मध्ये लाल कंधारी गायींची संख्या 1,26,609 इतकी होती ती 2020 मध्ये  1,23,943 इतकी कमी झाली आहे. तसेच 2013 मध्ये देवणी गायींची संख्या 4,56,768 वरुन सन 2020 मध्ये  1,49,159 इतकी कमी झाली आहे. सदर प्रजातींचे महत्व विचारात घेऊन सदर जातींचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

साकुड पशुपैदास प्रक्षेत्रासाठी 13 नियमित पदे व 37 इतकी पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येतील.  पशुधनासाठी चारा, पशुखाद्य, औषधी तसेच विज,पाणी यासाठी दरवर्षी6 कोटी  इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

—–0—–

देशी गायी-म्हशींमध्ये भृणप्रत्यारोपणासाठी

फिरतीप्रयोगशाळा स्थापन करणार

गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी गायी-म्हशींमध्ये भृण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात निर्माण करण्याकरीता फिरती प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

विदर्भ, मराठवाडा, पुणे विभाग आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी अनुक्रमे अकोला, औरंगाबाद, पुणे आणि अहमदनगर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार OPU-IVF & ETप्रयोगशाळा स्थापन करण्यात येतील. या तीन प्रयोगशाळांसाठी एकूण रु.1802.72  लक्ष इतका निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यास येईल.

—–0—–

सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय

सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या न्यायालयासाठी 16 नियमित पदे आणि 4 बाह्य यंत्रणेद्वारे पदे उपलब्ध करून देण्यात येतील.

—–0—–

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय

परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे जिरेवाडी येथे 60 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी 154 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

यासाठी 45 शिक्षक आणि 43 शिक्षकेत्तर पदे निर्माण करण्यात येतील.

—–0—–

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी 132 कोटी 90 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

मौजे जिरेवाडी येथे 60 विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय सुरु करण्यात येईल. यासाठी 16 शिक्षक आणि 24 शिक्षकेत्तर पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी एकूण 132 कोटी 89 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

—–0—–

परळी वैजनाथला सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र

सोयाबीन उत्पादनास गती येणार

परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे सोयाबीन उत्पादनास गती येईल.

मौजे जिरेवाडी येथील शासकीय जमिनीवर हे प्रशिक्षण व प्रक्रीया उपकेंद्र सुरु करण्यात येईल. या उपकेंद्रामध्ये एकूण 15 पदे निर्माण करण्यात येतील.  यासाठी 24 कोटी 5 लाख रुपये निधीस मान्यता देण्यात आली.  सोयाबीन हे मराठवाड्यातील महत्त्वाचे पीक असून देशात 120.90 लाख हेक्टर क्षेत्रावर तर महाराष्ट्रात 49.09  लाख हेक्टर आणि मराठवाड्यात 24.87 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड होते.  बीड जिल्ह्यात सोयाबीनखाली 3 लाख हेक्टर जमीन आहे. या उपकेंद्राच्याद्धारे सोयाबीनच्या विविध वाणांची निर्मिती करण्यात येईल.  त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेण्यात येतील.

—–0—–

राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान

राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे अभियान 2 ऑक्टोबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबवण्यात येईल.

या अभियानात राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना तसेच महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजना पोहचवणे, त्यांची पात्रता तपासून लाभार्थी महिलांची यादी ही कार्यवाही करण्यात येतील .तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक लाख महिलांना थेट लाभ देण्याचे उद्दीष्ट आहे.

—–0—–

गोर बंजारा सामाजिक भवनासाठी नवी मुंबईत भूखंड

गोर बंजारा जमातीसाठी सामाजिक भवन उभारण्याकरीता नवी मुंबई येथे भूखंड वाटप करण्याच्या निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

गोर बंजारा समाजाने या संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार सिडको महामंडळाने शासनास प्रस्ताव सादर केला होता. या  भवनासाठी नवी मुंबई, बेलापूर येथील सेक्टर क्र.२१ व २२ मधील भुखंड क्र. २१ व २२ एकत्रित अंदाजित क्षेत्र ५६०० चौ.मी. चा भूखंड सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार निश्चित केलेल्या भाडेपट्टादराने इतर मागास बहुजन कल्याण विभागास वाटप करण्यात येईल. भूखंडाच्या कमाल ४००० चौ.मी. क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रासाठी राखीव किंमतीच्या १२५ % दराने दर निश्चित करण्यात येईल.

—–0—–

जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार

१० कोटीस मान्यता

जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या केंद्रास दहा कोटी रुपये खर्च येईल.

MAGIC (Marathwada Accelerator for Growth & Incubation Council) आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर हे जालना जिल्हयातील ८ शासकीय व ४ खाजगी आयटीआयचे विद्यार्थी, स्टाफ व जिल्हयातील नवउद्योजक यांच्यासाठी नाविन्यता व उद्योजकता वाढीसाठी उपयुक्त ठरु शकणार आहे.

जालना येथील उपलब्ध असणाऱ्या वर्कशॉप २ मधील पहिल्या मजल्यावरील २२२५ चौरस फुट आणि तळमजल्यावर ८०७५ चौरस फुट अशा प्रकारे एकूण १०,३०० चौरस फुट जागेवर इन्क्युबेशन सेंटर स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, जालना यांचे अध्यक्षतेखालील संनियंत्रण आणि देखरेख समिती स्थापन करण्यास व या जिल्हास्तर समितीमध्ये जिल्हाधिकारी, जालना (अध्यक्ष), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई, आणि प्राचार्य, आयटीआय, जालना व सहायक आयुक्त, कौशल्य विकास, जालना (सदस्य सचिव) हे शासनाचे प्रतिनिधीत्व करतील.

—–0—–

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशानुसार लाभ

राज्यातील २००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेत असणाऱ्या आणि २००९ मध्ये नियमित सेवेत समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांना मॅट च्या आदेशानुसार वेतन निश्चित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

उच्च न्यायालयातील याचिका मागे घेऊन दि. ०२.०२.२००९ रोजीच्या अधिसूचनेनुसार समावेशन झालेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी गट-अ यांना नियमित पदावर केलेल्या अस्थायी सेवेच्या कालावधीतील तांत्रिक खंड अर्जित रजेमध्ये रुपांतरीत करुन सदर सेवा कालावधीतील अर्जित रजा व वार्षिक वेतनवाढी मंजूर करून सदरचे वैद्यकीय अधिकारी समावेशनापूर्वी नियमित पदावर ज्या तारखेला अस्थायी स्वरूपात सेवेमध्ये प्रथमत: हजर झाले त्या तारखेपासून आजपावेतोची वेतननिश्चिती करण्यास मान्यता देण्यात आली.

समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ (एस-२०) यांना लागू करण्यात येऊन त्यांचे देखील नियमित पदावर केलेल्या अस्थायी सेवेच्या कालावधीतील तांत्रिक खंड अर्जित रजेमध्ये रुपांतरीत करुन या सेवा कालावधीतील अर्जित रजा व वार्षिक वेतनवाढी मंजूर करुन सदरचे वैद्यकीय अधिकारी समावेशनापूर्वी नियमित पदावर ज्या तारखेला अस्थायी स्वरूपात सेवेमध्ये प्रथमत: हजर झाले त्या तारखेपासून आजपावेतोची वेतननिश्चिती करण्यास मान्यता देण्यात आली.

—–0—–

नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय

नांदेड येथे साठ विद्यार्थी क्षमतेचे शासकीय कृषी महाविद्यालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या महाविद्यालयासाठी 45 शिक्षक आणि 43 शिक्षक पदे निर्माण करण्यात येतील. या महाविद्यालयासाठी 146 कोटी 54 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात एकही शासकीय कृषी महाविद्यालय कार्यरत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.

—–0—–

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या महाविद्यालयास 430 खाटांचे रुग्णालय संलग्नित असेल. यासाठी अंदाजे 485 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

—–0—–

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जमीन

धारााशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कौशल्य व उद्योजकता विभाग आणि जलसंपदा विभागांची जागा उपब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या महाविद्यालयास एकूण दोन्ही विभागांची मिळून 12 हेक्टर 64 आर जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.

—–0—–

सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय

सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

—–0—–

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 16 : राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मराठवाडा येथील प्रत्येक व्यक्तीकरिता दिनांक १७ सप्टेंबर हा अविस्मरणीय दिवस आहे. यंदा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. मुक्ती संग्रामात अनेक ज्ञात – अज्ञात देशभक्त नागरिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमधील लोकांचे या लढ्यामध्ये भरीव योगदान होते. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो तसेच जनतेला मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो’, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकांचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसुली विभाग, जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.

००००

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार

मुंबई दि 15:- स्वराज्य मॅगझिनच्या वतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पाँडेचेरीत ‘पाँडी लिट फेस्टिव्हल’मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वराज्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न विश्वनाथन आणि संपादकीय संचालक आर. जगन्नाथन यांच्या हस्ते स्वीकारला.

स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्काराची रक्कम दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असण्यामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अमूल्य योगदान आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेनुसारच आमची वाटचाल सुरू आहे. सुशासन हा एकप्रकारे प्राणवायूच असतो. तो असेल तर किंमत नसते आणि नसला तर अस्वस्थता वाढते. सुशासन हा प्रशासनाचा पाया आहे.

महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावते आहे, अशी भावना श्री फडणवीस यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पकतेने गेल्या काळात अनेक क्रांतिकारी निर्णय आणि सुधारणांद्वारे राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल घडले असून श्री. फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प इतिहासात मैलाचा दगड ठरत आहेत.

जनतेशी सहजतेने जवळीक साधण्याचे कसब, ध्येयासक्त, प्रामाणिक, आधुनिक तंत्रज्ञानातील जाणकार यांसारख्या गुणांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे देशात ओळखले जातात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरव मानपत्रात करण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 15:- थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही पहिलाच आहे आणि पहिलाच राहील. विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे नवभारत ग्रुपच्या वतीने ‘नवभारत नवराष्ट्र महाराष्ट्र 1 कॉन्क्लेव्ह 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रबंध संपादक निमिष माहेश्वरी, युवराज ढमाले हे उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योगसमूहांचा आणि उद्योजकांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याचा नवभारत समूहाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. वाचकांशी बांधिलकी जपत नवभारतने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सगळे जग  आता भारताकडे आश्वासकपणे पाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे  जी 20 चे ‘डिक्लरेशन’ यशस्वी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकाराने आफ्रिकन युनियनचा जी 20 समूहात समावेश झाला.

चीनचे औद्योगिक प्राबल्य दिवसेंदिवस कमी होत असून भारताचे प्राबल्य वाढते आहे. जपानमध्ये तंत्रज्ञान आधारित उद्योगात आता नवा विचार रुजतो आहे. आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन पर्यंतही जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे असणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र देशाचे  ग्रोथ इंजिन

महाराष्ट्र हे देशाचे  ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे ‘कॅपिटल’ बनले आहे. मुंबईत पायाभूत सुविधांची कामे आता वेगात सुरू आहे. ट्रान्स हार्बर लिंक क्रांतिकारक ठरणार आहे. पुण्यातील रिंगरोडमुळे उत्पादन क्षेत्रात मोठे बदल होतील. पुण्याजवळ नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे.

नागपूर आता लॉजिस्टिक कॅपिटल बनत आहे. समृद्धी महामार्गामुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी वाढली आहे. वाढवण बंदर सर्वात मोठे बंदर ठरणार असून भूमिपुत्र आणि मच्छीमार यांना विश्वासात घेऊनच येथे विकास करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियान ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान

जलयुक्त शिवार अभियानामुळे महाराष्ट्रातील भूजल पातळी वाढली असल्याचे केंद्रीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी कृषिपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज पुरवठा करता येणे शक्य होणार आहे. यामुळे कृषी उत्पन्नातही वाढ होईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५ : मुंबईकरांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे.  मुंबईकरांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी मुंबईत गेल्या वर्षभरात एक लाख कोटींहून अधिक रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांचा गौरव केला.

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे रवींद्र नाट्य मंदिर येथे राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार राहुल शेवाळे, वंदे भारत ट्रेनचे जनक सुधांशू मणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथील रहिवाशांना अपेक्षित अशा सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईला अधिक वेगवान करणारा सागरी किनारा मार्ग, एमटीएचएल प्रकल्प, मुंबई मेट्रोचे जाळे, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मार्ग हे अभियंत्यांच्या मेहनतीचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात दोन टप्प्यात मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

अभियंत्यांनी कामाचा दर्जा राखावा, मुंबईकरांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, शासन देखील पूर्ण पाठिंबा देईल, असे सांगून मागील वर्षी दिलेल्या वचनाची पूर्तता करून अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात आला असून त्यांना थकबाकी सुद्धा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपल्या अभियांत्रिकी क्षमतेच्या जोरावर भारताने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनातून संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. याचा गौरवपूर्ण उल्लेख करून या घटना भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबईला सुदृढ, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करायचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची सूचना केली. मुंबईसह महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून त्याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईमध्ये आयकॉनिक अशा इमारती उभ्या कराव्यात, यासाठी विकासकांना प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. रहिवाशांना अपेक्षित असलेली मुंबई घडवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेत जग जिंकले. महाराष्ट्रातील व्यवस्था सुद्धा उत्तम होती. याचे शेर्पा अमिताभ कांत यांनी ‘मुंबई आपने चमका दी’ या शब्दात कौतुक केले. तसेच जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी यांनी समुद्री सेतू प्रकल्प पाहून ही एक यशकथा, अभियांत्रिकी आविष्कार असल्याचे म्हटले, ही आपल्या कामाला मिळालेली उत्स्फूर्त दाद आहे, याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्याचे वचन दिले होते, ते आज पूर्ण केले आहे.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नागरी सुविधा पुरविणारी महानगरपालिका आता पायाभूत सुविधा विकसित करणारी यंत्रणा झाली असल्याचे सांगितले. मागील वर्षभरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे झपाट्याने विकासकामे होत असल्याचे सांगून सध्या मुंबईत एक लाख कोटींहून अधिकच्या सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मी अभियंता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’ च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात

औरंगाबाद, दि. १५:  औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास  उपायुक्त अपर्णा थेटे, मंगेश देवरे, सविता सोनवणे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी   शंभूराजे विश्वासू, शहर अभियंता अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी सांगता संपूर्ण मराठवाड्यात भरगच्च कार्यक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात अभिजीत आणि सरला शिंदे यांनी आलाप ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यामध्ये वंदे मातरम..वंदे मातरम …, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा…, मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती…, संत महंताची भूमी माझी मराठवाड्याची, भोळीभाबडी माणसं लय पुण्यवान माती…जय जय महाराष्ट्र माझा…या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

औरंगाबाद, दिनांक १५ (विमाका) :  महाराष्ट्राला उज्ज्वल अशी सांस्कृतिक परंपरा आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  त्याच अनुषंगाने छत्रपती शिवरायांची वाघनखे लवकरच राज्यात दाखल होतील. त्याचबरोबर विकीपीडियाशी सामंजस्य करार करून जगभरातील ३०० भाषांत राज्याच्या सांस्कृतिक वारशाची माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ऑनलाइन पोर्टलचाही आधार घेऊन राज्याचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील लातूर, परभणी येथील नाट्यगृहे लवकरच पूर्णत्वास नेण्यात येतील, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तापडिया नाट्य मंदिरात ‘नाट्य गौरव’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते.

या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील जीर्ण झालेल्या नाट्यगृहांना नवसंजिवनी देण्याचे काम शासन करत आहे. सांस्कृतिक कार्याचे, विचारांचे अदान-प्रदान व्हावे यासाठी राज्यात नवीन ७५ ठिकाणी तालुका पातळीवर सांस्कृतिक नाट्यगृह उभारण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे नियोजन आहे. संचालनालयाने विविध पुरस्कारांच्या रकमांमध्येदेखील भरीव प्रमाणात वाढ केली आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. आगामी काळात महाराष्ट्राची कला, सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचावा यासाठी ‘ॲमेझॉन’ या ॲपप्रमाणे सांस्कृतिक पोर्टलची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर देशासह परदेशात महाराष्ट्राची परंपरा पोहोचविण्याचा सांस्कृतिक संचालनालयाचा मानस आहे. लवकरच जपानमध्येही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर करणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

प्रधान सचिव श्री. खारगे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी सांस्कृतिक विभागाकडून उद्योन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देणे, राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे आयोजन करणे, नाट्यक्षेत्रासाठी अधिकाधिक भरीव काम करणे, हौशी, व्यावसायिक नाट्यकर्मी, कलावंतांना  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संचालनालय पुढाकार घेत असल्याचे श्री. खारगे म्हणाले.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. मान्यवरांनी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना सन्मानित केले. प्रहसन, गणेश वंदन, सांस्कृतिक कार्यक्रमांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमात रंगत आणली. ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा रॉबिनहुड-क्रांतीवीर दत्तोबा भोसले’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. राज्य्भरातील नाट्यस्पर्धेतील विजेते संघ, नाट्यकर्मी, संगीत दिग्दर्शक, नाट्य लेखक, दिग्दर्शक आदींची कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती होती.

राज्य नाट्य स्पर्धेस मुदतवाढ

राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होण्याची आजची (ता.१५) शेवटची तारीख होती. परंतु कलावंतांची मागणी लक्षात घेऊन या स्पर्धेस सात दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा मंत्री मुनगंटीवार यांनी केली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने शहरात उत्साहाचे वातावरण 

औरंगाबाद, दि. 15 (विमाका) : ‘मराठवाडा मुक्तिदिनाचा विजय असो’…!  ‘मराठवाड्याचा जयजयकार’…! ‘मराठवाड्याचा विजय असो’…! ‘भारत माता की जय’…!  अशा विविध घोषणांनी आज सकाळी शहर दुमदुमले. निमित्त होते, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीचे. क्रांती चौक येथून प्रारंभ झालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साह आनंददायी होता.

आमदार संजय सिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सुमारे 40 शाळांचे 3 ते साडेतीन हजार विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते. या फेरीदरम्यान विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लेझीमची प्रात्यिक्षिके सादर केली.  शहराच्या विविध भागातून  फिरुन या प्रभात फेरीचा समारोप खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाला.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रम आणि महिला बचतगटांच्या प्रदर्शन व विक्रीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त रणजित पाटील, अपर्णा थेटे आदींसह क्रीडा व शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रभात फेरीतील सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लाठी प्रात्यक्षिके सादर केली.  यावेळी गायक अभिजित शिंदे व सरला शिंदे यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.  उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाण्यांवर नृत्यही केले.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांनी उपस्थितांना मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देताना मराठवाड्याला निजाम राजवटीपासून कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळाले, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हा स्वातंत्र्याचा लढा कसा लढला याची माहिती आपल्या मनोगतात दिली. भविष्यात आपल्या भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात जी. श्रीकांत यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने शहरात तीन दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच  मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श अंगीकारण्यास सांगितले.

तत्पूर्वी यश शिंपले, रवींद्र बोरा, सारा भावले,  वैष्णवी मस्के, आर्या नाईक या विद्यार्थ्यांनी  मराठवाड्याचा स्वातंत्र्यलढा या विषयावर मनोगत व्यक्त केले.

यावेळी  माजी सैनिकांचा सहभाग असणाऱ्या नागरिक मित्र पथकातील सदस्यांचा आणि सफाई कर्मचाऱ्यांचा मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...