बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 1022

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर दि २: विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत देशाच्या सर्व भागात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रा’ च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.

इटावा (ता. गंगापूर) येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड  बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड,  गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, सहायक गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, सरपंच कैलास शिनगारे, उपसरपंच बाबासाहेब घुले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, सामाजिक कार्यकर्ते संजय खांबायते, दीपक बडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील  शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे तसेच या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाच्या जीवनात बदल घडविण्यासाठी  प्रयत्न करण्यात येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा. विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिशन मोडवर काम करा, असे ते  यावेळी म्हणाले.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी  जनतेला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोयही शासनाने केली आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डीबीटीद्वारे निधी वितरण करण्यात येत आहे. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना,उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवा, असे निर्देश त्यांनी सबंधित यंत्रणेला दिले.

आपल्या देशाला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासाठी देशातील प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे.शासन आपल्या पाठीशी आहे, असे डॉ.कराड यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल व योजना गावागावात पोहोचविण्यासाठी ही संकल्प यात्रा आपल्या गावात आली असल्याचे सांगून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामवत यांनी संकल्प यात्रेचे आयोजन व विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे डॉ.कराड  यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी  मनोगत व्यक्त केले.

यावेळी ग्रामस्थ व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि.२ : कमी पावसामुळे राज्य शासनाने १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि मदत कार्यक्रम समिती व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळ निवारण अंमलबजावणीबाबत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

यावेळी महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि मदत कार्यक्रम समितीचे (एमडीआरएसपी) शिरीष कुलकर्णी व स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक, गौतम गालफाडे, झेलम जोशी, राज्यातील विविध ठिकाणच्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलातील कमतरता आदी निकष लक्षात घेऊन १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यात गंभीर तर १६ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात कमी पाऊस, सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मदत दिली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध भागात सामाजिक संस्था दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी मोलाचे कार्य करीत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, दुष्काळात पिण्याचे पाणी, चारा टंचाई, बेरोजगारी इत्यादी परिस्थितीला सामोरे जावे लागते. बेरोजगारीमुळे वंचित घटक, आदिवासी, शेतमजूर आदी घटकातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. याची सर्वाधिक झळ महिला, जेष्ठ व्यक्ती, मुलांना बसते. त्यांचे स्थलांतर रोखून त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळवून देणे, त्यासाठी त्यांना जॉब कार्ड मिळवून देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर होतो का आदींची माहिती संस्थांनी निर्दशनास आणावी. दुष्काळ निवारणाच्या कामात स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय ठेवून जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात याव्यात. संस्थांनी सक्षम होऊन चांगल्या प्रकारे सर्वेक्षण करावे. कामे करताना अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी संस्थांच्या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात यावे. दुष्काळाच्या परिस्थितीतही शाश्वत विकास कसा राहील, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी श्री.  कुलकर्णी आणि श्रीमती पाठक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.  तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या भागातील दुष्काळाची परिस्थिती सांगितली.

लातूर येथील दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिशादर्शक ठरेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

लातूर, दि. 02 (जिमाका) : हरंगुळ बु. येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रूपाने आज राज्यातील पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन होत आहे. ही संस्था दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याच्या उपक्रमात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष अजित मराठे, हरंगुळच्या सरपंच शीतल झुंजारे, संवेदना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. राज्य शासनामार्फत संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला 1 कोटी रुपयांचा धनादेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी सुपूर्द केला. मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवांना नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे सर्वसामान्यांचा दिव्यांग बांधवांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. लातूर येथे संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी फार मोठे काम उभा राहिले आहे. अतिशय तळमळ आणि चिकाटीने ही संस्था दिव्यांग बांधवांसाठी काम करीत आहे. या संस्थेत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याठिकाणी दिव्यांग बांधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यामुळे दिव्यागांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे ना. लोढा यांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल : ना. बनसोडे

राज्य शासनामार्फत स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. नव्याने सुरु होत असलेल्या संवेदना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणामुळे दिव्यांग बांधव स्वावलंबी बनतील. तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. तसेच लातूर येथे रेल्वे बोगी निर्मिती कारखाना सुरु होणार असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये याबाबतचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच संवेदना प्रकल्प येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात संवेदना प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्थेबाबत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे ना. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या अंतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी 9 हजार दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांना विविध साधनांचे वाटप करण्यात आले. तसेच यापुढेही दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे म्हणाले.

दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्याचा उपक्रम अतिशय अभिनव आहे. दिव्यांग बांधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभर असे उपक्रम राबविले जावेत. दिव्यांग बांधवांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारखे काळानुरूप उपयुक्त ठरणारे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग बांधवांना नोकरीच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून राज्यातील पहिली दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर जिल्ह्यात उभारण्यात आली, ही जिल्ह्यासाठी अभिमानस्पद बाब असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. तसेच राज्य शासन दिव्यांग बांधवांच्या विकासाठी आग्रही असून दिव्यांग कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे दिव्यांग बांधव आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होईल. विविध विभागामार्फत दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे अभिसरण करून त्यांच्या कल्याणसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांना उच्च दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण मिळण्यासाठी संवेदना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे मदत होणार आहे. या संस्थेतील साधनसामग्री दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरेल अशी असून राज्यातील दिव्यांग बांधवांना येथे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात श्री. मराठे यांनी जनकल्याण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तर प्रास्ताविकामध्ये संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर यांनी संवेदना प्रकल्पाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवाश सांगितला. तसेच संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेचा उद्देश, प्रवेश क्षमता, प्रशिक्षण याबाबत माहिती दिली. संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वार्षिक अहवालाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्त्यानी विविध गीतांचे सादरीकरण केले.

दिव्यांग कल्याणासाठी विशेष कामगिरीबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, खोपेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजाबाई मोरे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील परिचारक योगेश वाघ यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये सहकार्य करणारे लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य विठ्ठल गाडेकर, प्रभारी प्राचार्य मनीषा बोरूळकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदीसाठी महसूल अभिलेखासह इतरही अभिलेख तपासावे – समिती अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे

नाशिक विभागाच्या कामकाजाबद्दल अध्यक्षांनी व्यक्त केले समाधान

नाशिक, दि. २ – कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जात नोंदणीची कागदपत्रांची तपासणी केवळ महसूल अभिलेखापुरती मर्यादित न ठेवता इतर विभागाबरोबरच नागरिकांकडे उपलब्ध असलेले सबळ पुरावे किंवा नाशिक जिल्ह्याप्रमाणे पुरोहित संघ अशा संस्थांचीदेखील मदत घ्यावी, अशी सूचना शिंदे समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नाशिक विभागाच्या व विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी अभिनंदन केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन कक्षात कुणबी,  मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी न्यायमूर्ती श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, समितीचे उपसचिव विजय पवार, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक,  अँड.अजिंक्य जायभावे, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सलीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद ,  जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) शहाजी उमाप, उपायुक्त रमेश काळे, विठ्ठल सोनवणे, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी यांचेसह विभागातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष,अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आदि उपस्थित होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी भूमि अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक व मुद्रांक नोंदणी विभाग, शिक्षण विभाग, पोलीस, कारागृह विभाग यासह विविध विभागांकडील नोंदीबाबतही सविस्तर माहिती जाणून घेतली. संबंधित विभागांनी तसेच इतर लिपीतील नोंदीबाबत संबंधित भाषा जाणकारांची मदत घेण्यात यावी. तसेच येत्या ८ डिसेंबरपर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल समितीकडे पाठवावा असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संपूर्ण विभागाची माहिती  सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये नाशिक विभागात तपासण्यात आलेली कागदपत्रे व कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबीच्या आढळून आलेल्या नोंदीबाबतची माहिती दिली. तपासलेल्या अभिलेख प्रकारामध्ये मुख्यतः जन्म मृत्यूच्या नोंदी व शैक्षणिक अभिलेख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात, कुणबी, कुणबी -मराठा, मराठा-कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहितीही श्री. गमे यांनी दिली. विभागातील जिल्हा जात पडताळणी समितीने मागील पाच वर्षात वैध-अवैध ठरवलेल्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांबाबतची माहिती दिली. तसेच नोंदी तपासण्यासाठी नाशिक जिल्हा पुरोहित संघ यांची देखील मदत घेण्यात येत असून सदर संघाच्या अभिलेख तपासणीसाठी शासनस्तरावरून यंत्रणा नियुक्त करून अभिलेखांचे व्यावसायिक पद्धतीने स्कॅनिंग व अपलोडिंग केल्यास महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांच्या कुणबी नोंदणी आढळून येतील असेही श्री. गमे यांनी सांगितले.

 

विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी विभागस्तरीय समितीला काम करीत असताना आवश्यक वाटणाऱ्या बाबींची माहिती देताना समितीच्या अध्यक्षांना सांगितले की, सापडलेल्या कुणबी नोंदी स्कॅन करणे व अपलोड करणे यासाठी निधीची, मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मोडी, उर्दू भाषेतील नोंदी वाचून मराठीत भाषांतरित करण्याकरिता मोडीवाचक, उर्दूवाचक यांना मानधन देणे अथवा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी स्वरूपात नियुक्ती देण्याबाबत विचार व्हावा.

अनेक नोंदी ह्या जीर्ण स्वरूपात असल्याने सदर नोंदीचे जतन करण्याबाबत धोरण ठरवणे आवश्यक आहे. सापडलेल्या नोंदीचा डेटा मोठ्या प्रमाणात असल्याने सदर नोंदी स्कॅन करून वेबसाइटवर अपलोड करणेकरिता सर्व्हरवरती Space ची उपलब्धता करणे त्याबाबत आवश्यक Software, Portal , Link तांत्रिक बाबीबाबत धोरण ठरवणे आवश्यक असल्याचेही श्री गमे यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या जिल्ह्यात कुणबी, कुणबी -मराठा, मराठा-कुणबी नोंदी शोधण्याबाबत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती सादर केली. नाशिक विभागात सुरू असलेल्या या कामकाजाबाबत अध्यक्ष न्यायमूर्ती शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान

नागपूर, दि.   : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसांच्या नागपूर भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विमानाने शनिवारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे प्रस्थान केले.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

राष्ट्रपती शुक्रवारी रात्री नागपूर राजभवन येथे मुक्कामी होत्या. शनिवारी सकाळी सुरेश भट सभागृहामध्ये विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ आटोपल्यानंतर राष्ट्रपती महोदया नागपूर विमानतळावर पोहोचल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विवेक गर्क, ब्रिगेडिअर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती महोदयांच्या प्रस्थानानंतर दुपारी पावणेदोनच्या सुमारास राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईकडे प्रस्थान केले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला.

निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर, दि.2 :  भारतीय मूल्यांना अनुसरून  सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. यामुळे देश एक वैश्विक ज्ञानशक्ती (ग्लोबल नॉलेज पॉवर) म्हणून स्थापित होईल,असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केला. औपचारिक पदवी हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नसून वेगाने बदल घडणाऱ्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत  कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस होते तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून त्यामुळे सर्व क्षेत्रात बदल घडत आहेत, असे सांगून राष्ट्रपती म्हणाल्या तंत्रज्ञानाच्या सदुपयोगाने देश व समाजाचे हित जोपासले जाऊ शकते तर त्याच्या दुरुपयोगाने मानवतेचे नुकसान होऊ शकते. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग आपले जीवन सुकर करत आहे परंतु यातून निर्माण होणारा डीपफेकसारखा प्रकार सामाजिक स्वास्थासाठी अत्यंत घातक आहे. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या उपयोगाने निर्माण होणाऱ्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नैतिक शिक्षणाचा मार्ग उपकारक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शतकी वाटचाल उच्च परिमाणे स्थापित करणारी ठरली असून समृद्ध वारसा जोपासणाऱ्या या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिल्याचा गौरवास्पद उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाल्या, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांचे सहाय्य घेऊन विद्यापीठाला ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलंस बनवावे.या विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले हे प्रशंसनीय आहे. देशाच्या विकासात संशोधन व नाविन्यतापूर्ण शिक्षणाची मोलाची भूमिका असून हे विद्यापीठ संशोधन, नाविन्यतापूर्ण शिक्षण व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे या विद्यापीठातील फॅकल्टी मेंबर्सच्या नावाने  67 हून अधिक पेटंटची  नोंदणी झालेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कक्ष निर्माण केला आहे. स्थानिक प्रश्न आणि गरजा लक्षात घेऊन संशोधनावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सर्व जग आज ग्लोबल व्हिलेज झाले असून कुठलीही संस्था जगापासून अलिप्त राहू शकत नाही. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहयोगावर विद्यापीठाने भर द्यावा असे सांगून त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्या व गरजांनुसार नाविन्यपूर्ण संशोधनाला प्राधान्य दिले तरच जागतिक आव्हानांचा सामना करणे शक्य होईल.

शिक्षण प्रदान करत असतानाच  शैक्षणिक संस्थांनी समाजाप्रति असलेली जबाबदारी पार पाडावी. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना मदत करणे हे शैक्षणिक संस्थांसह आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अशा वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून अमृत काळात देशाच्या विकासामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या पदवी प्राप्त तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असल्याबद्दल विशेष समाधान व्यक्त करुन मुलींच्या शिक्षणातील गुंतवणूक ही देशासाठी मोलाची असल्याचे त्या म्हणाल्या.

उज्ज्वल भविष्याची वाटचाल करत असताना विपरीत परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी ज्ञान व आत्मशक्तीने लढावे व आपल्या योग्यतेवर सदैव विश्वास ठेवावा असा संदेश देतांनाच राष्ट्रपतींनी संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील अभंगाचा दाखलाही दिला.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होत असल्याचा विश्वास व्यक्त करुन राज्यपाल रमेश बैस म्हणाले, पूर्वी ब्रिटीशकालीन मानसिकतेच्या प्रभावातून नोकरीसाठी शिक्षण होते. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली  शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी न शिकता जागतिक स्तरावरील विकसित कौशल्य आत्मसात करावे, सोबत एखादी जागतिक भाषा आत्मसात करावी. कुशल मानव संसाधन निर्माण करण्यासोबतच योग शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रातील जागतिक संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विदर्भाच्या विकासात विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे. विदर्भ हा महाराष्ट्राचा विकसनशील भाग असून विद्यापीठाच्या माध्यमातून  स्थानिक गरजांनुसार संशोधन होण्याची गरज आहे. विद्यापीठाने  गुणवत्ता राखत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करावे. विदर्भातील थोर संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांचा आदर्श ठेवत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व संस्कार मिळेल अशी पद्धत विकसित करावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भविष्यात शिक्षणालाच महत्त्व आहे. प्रधानमंत्र्यांनी  शिक्षणाचे संपत्तीत रूपांतर करण्याचे आवाहन केले आहे. शिक्षणामुळेच जागतिक आर्थिक महासत्तेचे देशाचे स्वप्न साकार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुणात्मक मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज आहे. जागतिक स्तरावर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल अशी युवापिढी घडविण्याचे आव्हान नागपूर विद्यापीठाने स्वीकारावे,असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे विद्यापीठ नवसंशोधनाचे केंद्र म्हणून विकसित होत असून  स्टार्टअप इको सिस्टीममध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. नागपूर विद्यापीठातही नव संशोधन आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उत्तम कार्य सुरु आहे. शकत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात नवसंशोधन तसेच सर्वांगीण विकासासाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यापीठ सज्ज असल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला .

विज्ञान व तंत्रज्ञान  विद्या शाखेतून डि.एससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र हरीसा तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतीदास रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. विद्या शाखानिहाय १२९ संशोधकांना या कार्यक्रमात आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

महाबळेश्वरमधील बॉम्बे पॉईंट येथील स्टॉलधारकांची भाडेदरवाढ ५ टक्केच करावी यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि. 1 (जिमाका) : सातारा वनविभागात महाबळेश्वर हे प्रसिध्द थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी देश-विदेशाचे अनेक पर्यटक भेटी देत असतात. बॉम्बे पाँईंट या स्थानकावर सांयकाळच्यावेळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी असतेच. या ठिकाणी असणाऱ्या स्टॉल धारकांकडून सन 2011-2012 पासून प्रतिवर्षी 20 टक्के भाडेवाढ धोरणानुसार स्टॉल भाडे वसूल करण्यात येते. ही भाडेवाढ 20 टक्के ऐवजी 5 टक्के करावी अशी मागणी स्टॉलधारकांकडून करण्यात येत असून तसा प्रस्ताव शासनासा सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालून पाठपुरावा करु अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
 जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी या विषयाबाबत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी , मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधिक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सहायक वनसंरक्षक महेश झांजूरने, महाबळेश्वरचे आर.एफ.ओ गणेश महांगडे, यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
 महाबळेश्वर येथील बॉम्बे पॉईंट धारकांना 20 टक्के भाडेवाढीच्या धोरणानुसार स्टॉलभाडे उभारणी करण्यास शासनाने मे 2012 च्या पत्रानुसार मंजुरी दिली आहे. त्यानुसार संबंधीत स्टॉलधारकांकडून प्रतिदिवस स्टॉलभाडे वसुल करण्यात येत आहे. स्टॉलधारकांनी सन 2019-20 अखेर स्टॉल भाडे भरणा केला आहे. तथापि तद्नंतर सन 2021-22 पासून संबंधित स्टॉल धारकांनी स्टॉलभाडे भरणा केला नाही. ही दरवाढ कमी करावी ती 20 टक्क्यावरुन 5 टक्के करावी. अशी मागणी सदर स्टॉलधारकांनी केली आहे. याबाबतचा प्रस्तावा शासनास सादर करण्यात आला असून तो मंत्रालय स्तराव आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालून मार्गी लावू अशी ग्वाही पालकमंत्री यांनी यावेळी दिली.
000

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन

नागपूर ,दि. 1 : गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय निदान उपलब्ध होत असल्यामुळे आजारांचे निदान अचूक होणार आहे त्यामुळे गरीब रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल. सेवाभावीवृत्तीने सुरू होणारा रुग्ण सेवेचा हा यज्ञकुंड अव्याहतपणे सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

श्री. सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशनच्यावतीने वर्धा मार्गावरील पावनभूमी येथे गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, मोहन मते, ॲड. आशिष जायस्वाल, श्री.सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी, अमोल काळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, सामान्य माणसाला न्याय देण्याचे निर्णय घेताना आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर वैद्यकीय महाविदयालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या व प्रतिक्षा यादी लक्षात घेता सेवाभावी संस्थांनी पुढे येवून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सहकार्य करावे. बदलती जीवनशैली तसेच वातावरणातील बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या रुग्णांच्या निदानासाठी अत्याधुनिक रुग्णालयांची आवश्यकता आहे. गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमुळे या कामास प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

राजकारणाला समाजकारणाची जोड असणे आवश्यक आहे. फडणवीस कुटुंबाने सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसहाय्य व्हावे यासाठी सातत्याने काम केले आहे.सेवाभावी संस्थांनी उच्च दर्जाच्या तसेच सर्व सामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राजकारणासोबत शिक्षण ,आरोग्य व विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता व्यक्त करतांना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, प्राण वाचविणाऱ्या आरोग्य सेवा गरिबांपर्यंत पोचविण्यासाठी गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल. विदर्भातील जनतेपर्यंत या सेंटरच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा पोहोचणार आहेत. गंगाधर फडणवीस यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजसेवेला प्राधान्य दिल्याचे श्री.गडकरी यांनी सांगितले.

अन्न ,वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसोबत बदलत्या काळानुसार शिक्षण,आरोग्य आणि रोजगार हे महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सामान्य जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन तत्पर आहे, त्यासोबतच खाजगी व सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त करताना श्री. फडणवीस म्हणाले, सर्वसामान्यांना आरोग्यावर खर्च करावा लागतो. हा खर्च टाळणे शक्य आहे.अशा संस्थांच्या मागे समाजानेही उभे राहण्याची आवश्यकता आहे. गरीब रुग्णांना नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केली.

प्रांरभी, संदीप जोशी यांनी प्रास्ताविकात गंगाधरराव  फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर येत्या सहा महिन्यात पूर्ण करुन या सेंटरचे लोकार्पण करण्यात येईल. तसेच अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज उपचारपध्दती येथे उपलब्ध होतील, असे सांगितले. स्वागत ॲड. अक्षय नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी केले, तर संस्थेचे सचिव पराग सराफ यांनी आभार मानले.

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार सांस्कृतिक महोत्सवाला भेट

नागपूर दि. 1 : नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाने देश-विदेशातील नामवंत कलाकार तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृती नागपूरकर रसिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ही येथील जनतेसाठी मोठी सांस्कृतिक मेजवानी ठरत आहे. खासदार महोत्सवाची कलाकारांप्रमाणेच जनताही आतुरतेने वाट बघत असल्याचे गौरवोद्गार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचे आयोजक तथा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, खासदार कृपाल तुमाने, आमदार  प्रवीण दटके,  आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यंवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

श्री नितीन गडकरी यांची ओळख विकास पुरुष म्हणून संपूर्ण देशात आहे.  रस्ते, इमारती व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसोबतच त्यांच्यातील कलासक्त पुरूष  क्रीडा, संगीत, नृत्य आणि विविध कलांच्या माध्यमातून आपली  कलासंस्कृती जोपासण्याचे काम करित असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला शोभेल असे हे आयोजन असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की खासदार सांस्कृतिक महोत्सवातून विदर्भातील स्थानिक कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असल्याने व अन्य कलाकांरांच्या कला बघण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्यासाठी हा महत्वाचा महोत्सव आहे.

नितीन गडकरी यांनी प्रास्ताविकातून सांस्कृतिक प्रगतीसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांनी ‘द पियुष मिश्रा प्रोजेक्ट बल्लीमारान’ या कार्यक्रमाचा आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पियुष मिश्रा व गीतरामायण नाटीका प्रमुख अरूणा भिडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी करावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

समाजात अवयवदानासाठी जनजागृती करण्याची गरज

नागपूर दि. 1: माफक दरातील सुलभ वैद्यकीय उपचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असून कोविडसारख्या महामारीने मजबूत आरोग्य यंत्रणेची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी बनविण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करुन जागतिकस्तरावर नाविन्यपूर्णतेचे केंद्र म्हणून देशाची ओळख प्रस्थापित करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित  होते.

 

नव्या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची गरज प्रतिपादित करुन राष्ट्रपती म्हणाल्या की, वैश्विक स्तरावर सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय साध्य करण्यात डॉक्टरांची अपुरी संख्या हे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा लाभ प्राप्त होण्यात असमानता निर्माण झाली आहे. ती दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून जिल्हा रुग्णालय संलग्नित वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यास मदत केली जात आहे. यामुळे प्रादेशिक असमतोल आणि शहरी-ग्रामीण दरी  कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्य सेवांच्या विकासासोबतच त्या परवडणाऱ्या असाव्यात, या उद्देशाने जगात सर्वात मोठी असणारी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य विषयक दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्याचे सरकारचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अवयवदानाबाबत समाजात पुरेशी जागरुकता नसल्याने गरजू रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, त्यासोबतच अवैधरित्या अवयव विक्रीचे  प्रकारही घडत असल्याबाबत खंत व्यक्त करुन वैद्यकीय क्षेत्राने अवयवदानासाठी जनजागृती करावी तसेच मानसिक आरोग्याच्या समस्येचाही सहानूभूतीने विचार करावा असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

मध्य भारतात गेल्या 75 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची त्यांनी विशेष प्रशंसा केली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या वैद्यकांची मोठी फळी निर्माण केल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नुतनीकरणासाठी शासनाने भरीव निधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री. गडकरी म्हणाले की, नव्या सुविधांनी सुसज्ज होणारे हे रुग्णालय व महाविद्यालय वाढती गरज भागवू शकणार आहे. या महाविद्यालयाने नागपूरसह लगतच्या राज्यातही उल्लेखनीय वैद्यकीय सेवा दिली असून विशेषत: कोविडकाळातील योगदान प्रशंसनीय आहे. पूर्व विदर्भात सिकलसेल, थॅलेसेमियाचे रुग्ण लक्षणीय संख्येने आढळून येतात. अमृत महोत्सवाचे औचित्य साधत लवकरच बोन मॅरो विषयक उपचार सुविधेची सुरुवात होणार आहे.

स्थापनेवेळी आशियातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय अशी ओळख असणाऱ्या या संस्थेने प्रारंभापासूनच सेवाभाव जपत असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. ही देशातील एक महत्वाची वैद्यकीय संस्था असून अनेक विख्यात तज्ज्ञ या संस्थेने दिल्याचा विशेष उल्लेख करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  महाविद्यालयाच्या सुविधांमध्ये काळानुरूप बदलाची गरज होती. यासाठी अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाला नवे स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शासनाकडून ५५० कोटींचा निधी देण्यात आला असून लवकरच कायापालट होणार आहे. एक अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून त्यास नवे रुप मिळणार आहे. त्याअंतर्गत  शस्त्रक्रिया कक्ष, अद्ययावत यंत्र सामग्री,  वसतिगृह, नवीन इमारती, क्रीडांगण, कॅन्सर इन्स्टिट्यूट आदींची उपलब्धतता होणार असून पुढील ५० वर्षांची गरज या निमित्ताने पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात या संस्थेचे योगदान मोलाचे ठरणार आहे. आयजीएमसीसाठीही ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्यात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती देऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, निवासी वैद्यकीय अधिका-यांची १ हजार ४३२ पदांची पदभरती होणार आहे. या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.  नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यासोबतच नवीन  प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांसाठी  आशियाई विकास बँकेमार्फत चार हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बी.एसस्सी नर्सिग आभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. नर्सिंग, तांत्रिक, अतांत्रिक संवर्गातील  5  हजार 182 पदांची भरती प्रकिया पूर्ण झाली असून लवकरच नियुक्तीपत्र देण्यात  येणार असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, महाविद्यालयांशी संबधित चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  या महाविद्यालयातून उत्तीर्ण पहिल्या तुकडीचे विद्यार्थी डॉ. बी. जे. सुभेदार, महाविद्यालयासाठी जमीन दान करणारे कर्नल डॅा. कुकडे यांचे नातू ॲड. दिनकर कुकडे आणि या महाविद्यालयाला मदत करणाऱ्या डॉ. शकुंतला गोखले यांचे नातेवाईक रवी लिमये व डॉ. प्रमोद गिरी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. नवनिर्मित सभागृहाचे डिजिटल पद्धतीने उद्घाटनही करण्यात आले. विशेष डाक तिकिटाचे अनावरण करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्मरणिका आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॅा. राज गजभिये यांनी केले.

00000

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...