रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 1010

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 7 : समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभा‍वीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी रामगिरी येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत विस्ताराने सुचना दिल्या. या बैठकीस  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशिप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी संपुर्ण देशभर हा यात्रेचा उपक्रम राबविली जात आहे. समाजातील सर्वच घटकातील वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली ही मोहिम राज्यात प्रभावीपणे राबवा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना उपक्रम काळात लाभ देण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने कसा राबविता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. यात्रेचा जनजागृती रथ गावांमध्ये जात असतांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून आपल्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगितल्या पाहिजे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील, यासाठी ग्राम स्तरावर काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांस या उपक्रम कालावधीत विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, असे सांगितले. उपक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर असला पाहिजे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवितांना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून उपक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. केंद्र शासनासह राज्याच्या योजनांची देखील या कालावधीत जनजागृती केली जावी, असे त्यांनी सुचविले.

0000

 

 

धान उत्पादकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री थेट बांधावर; नागपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

नागपूर, दि. 7 : नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नागपूर जिल्ह्यात मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी, सावनेर व हिंगणा या सहा तालुक्यात भात, कापूस आणि तूर या पिकांचे जवळपास 5 हजार 480 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत आज केली.

रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी दुपारी 3 च्या सुमारास मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांच्या शिवारात भेटी दिल्या. यावेळी त्यांनी थेट शेतात जाऊन धानपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 335 गावांमध्ये या अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे. जवळपास 2 हजार 880 हेक्टरमधील 6 हजार 886 शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. आतापर्यंत 52 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, महसूल, पणन व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

 

 

विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’चे प्रदर्शन

नागपूर, दि. 7 : आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त ‘लोकराज्य’ मासिकाचे प्रदर्शन विधिमंडळ परिसरात लावण्यात आले आहे. या दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

महासंचालनालयाचे संचालक (माहिती व प्रशासन) हेमराज बागुल, संचालक  (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.

‘लोकराज्य’ मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असून त्यास सात दशकांची परंपरा लाभली आहे. हे मासिक राज्याचा जडणघडणीचा साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, माहितीपूर्ण विशेषांक विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणून लोकराज्य ओळखले जाते. विश्वासार्ह माहितीमुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरले आहे.

या प्रदर्शनात 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध विशेषांकही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ‘लोकराज्य’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी यावेळी प्रदर्शनाची माहिती दिली.

000

ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ध्वजदिन निधी संकलनासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक महिन्याचे वेतन

नागपूर, दि. : ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी अधिकाधिक योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. तसेच, ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वत:चे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली.

 

रामगिरी येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘हम करे राष्ट्र आराधन तन से, मन से, धन से, जीवन से’ या ब्रिदाप्रमाणे प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशासाठी योगदान देण्याची गरज आहे. सीमेवर सैनिक देशरक्षणासाठी अहोरात्र तैनात असतात. देशाच्या प्रगतीतही सैनिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. लष्कराच्या कल्याणासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी देणारा ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात सुरू आहे. सैनिकांप्रती कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात योगदान देण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

भारत देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. संरक्षण साहित्याची खरेदी करणारा देश म्हणून असलेली भारताची  ओळख आता संरक्षण साहित्याचा विक्रेता देश अशी झाली आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्यावर अनावरण करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे सौभाग्य आपणास लाभल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केला. ध्वजदिन निधी संकलनात देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त 185 टक्के ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्याचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला. ध्वजदिन निधी संकलनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

०००

मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि. ७ : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्‍या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे आज येथे दिले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय उपायुक्त गजेंद्र बावणे, रिद्धपूर येथील महंत कारंजेकर बाबा, महंत वाईनदेशकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, सहसचिव प्रताप लुबाळ, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव, डॉ. उमेश काकडे, संतोष चव्हाण, प्रशासन अधिकारी डॉ. प्रभू दवणे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. तिचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने समिती गठित केली. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आला आहे.

मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करण्याबाबत नियम व अटी तपासून उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने अहवाल सादर करावा. आणि ही जागा अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे, असे निर्देशही श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

महानुभाव गोविंदप्रभू तीर्थस्थान सेवा समिती रिद्धपूर (जि.अमरावती) यांच्या जागेत (कॅम्पस) मध्ये जून २०२४ पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याबाबत ही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०७ : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. सन २०२३-२०२४ मध्ये १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी  प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात येणार असून मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अ. ना. जावळे यांनी केले आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३१ व्या सत्राचे प्रशिक्षण, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५० रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तो १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक असून मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक/आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई- ६१ येथे २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत. अधिक माहितीकरिता अशोक जावळे, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो.नं. ९८३३२६६२५१ आणि श्री. जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक, मो. नं ७५०७९८८५५२ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

नागपूर येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात ‘स्टार्टअप्स एक्स्पो’चे आयोजन

मुंबई, दि.७: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागार्तर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात’ स्टार्टअप्स एक्स्पो’चे आयोजन ९ आणि १० डिसेंबरला करण्यात येत आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत या एक्सपोचे आयोजन करण्यात आले  असून या एक्सपोत स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इन्क्युबेटर्ससह इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, नागपूर येथे होणाऱ्या ‘स्टार्टअप्स एक्स्पो’मध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने स्टार्टअप म्हणजे काय  ते यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत.स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा, इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे. या एक्सपोमध्ये स्टार्टअप्ससाठी इनक्यूबेटर, गुंतवणूकदार, ग्राहक, शासनासोबत काम करण्याची संधी, इनक्यूबेटर्ससाठी महत्त्वाकांक्षी नवउदयोजक, स्टार्टअप्स, इतर इनक्यूबेटरकडून प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होतील. गुंतवणूकदांना आशादायक स्टार्टअपसोबत जोडण्याची संधी मिळेल. इनोव्हेटर्ससाठी स्टार्टअप योजना, शासकीय लाभ, यशस्वी स्टार्टअप, इन्क्युबेटर इत्यादींबद्दल माहिती या एक्सपोत मिळेल. उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, इन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी  या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इन्क्युबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा याने केले आहे.

महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना,उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८” जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता  सोसायटी कार्यरत आहे. या माध्यमातून इच्छुकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

विधानपरिषद शतकमहोत्सव आणि नागपूर हिवाळी अधिवेशनांचे योगदान

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवानिमित्त हिवाळी अधिवेशन, २०२३ चे औचित्य साधून दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत विधानपरिषद सभागृह, नागपूर येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. “महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्त्वपूर्ण योगदान” या विषयावरील चर्चासत्राच्या माध्यमातून गत हिवाळी अधिवेशनांमधील महत्त्वपूर्ण संमत विधेयके, ठराव, चर्चा, प्रस्ताव आणि त्यानुषंगाने घेण्यात आलेले निर्णय यांचे संदर्भ नव्याने अधोरेखित होणार आहेत. भारतातील संसदीय लोकशाहीत केंद्रस्तरावर लोकसभा आणि राज्यसभा ही द्विसभागृह पद्धती स्वीकारण्यात आली असली तरी राज्यस्तरावर ६ राज्यांचा अपवाद वगळता सर्व राज्यांमध्ये विधानपरिषद हे दुसरे सभागृह अस्तित्वात नाही. महाराष्ट्र विधानपरिषदेने गत शंभर वर्षाच्या कालकसोटीवर आपली उपयुक्तता आणि महत्व सिद्ध केले असून एरव्ही राजकीय परीघात येण्याची शक्यता नसलेल्या विद्वतजनांचा संसदीय सहभाग विधानपरिषदेमुळे शक्य झाला.

देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. श्री. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली  Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये श्री. नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. अत: सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. भारताच्या घटनात्मक इतिहासातील १९१९-१९२०-२१ नंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९३५ चा भारत सरकार कायदा (Government of India Act 1935) होय. या कायद्याद्वारे संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. या कायद्यान्वये विधानसभा आणि विधानपरिषद असे नामाभिदान देऊन मुंबई प्रांतात १९३७ मध्ये दोन सभागृहे अस्तित्वात आली.

दिग्गज सदस्यांची मालिका

विधानपरिषदेचा आरंभबिंदू ठरवायचा झाले तर आपल्याला शंभर पेक्षाही जास्त वर्षे मागे जावे लागेल. २२ जानेवारी, १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये भूतपूर्व मुंबई प्रातांच्या लेजिस्लेटीव्ह कौन्सिलची (Council of Governor of Bombay) पहिली बैठक भरली होती. १८६२ ते १९३७ या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत –

सर्वश्री जगन्नाथ शंकर शेठ, जमशेटजी जीजीभॉय, सर माधवराव विंचूरकर, रावसाहेब विश्वनाथ, नारायण मंडलिक, रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सर फिरोजशाह मेहता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, नारायण गणेश चंदावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी दिग्गज सन्माननीय सदस्यांची मालिका विधिमंडळाला लाभली आहे. तेव्हापासून १९२१ चा संदर्भ पुढे नेत आजही विधानपरिषद कार्यरत आहे, उल्लेखनीय योगदान देत आहे. केवळ राज्यातील नव्हे तर देशातील ते एक सर्वाधिक जुने सभागृह आहे, ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.

वरिष्ठ सभागृह द्धतीवरील टीका एकांगी

विधानसभा हे सभागृह लोकांनी थेट निवडून दिलेल्या सदस्यांद्वारे तयार होत असल्याने तेच जनतेचे खरेखुरे प्रतिनिधी ठरतात. त्यामुळे मग विधानपरिषद या सभागृहाची गरजच काय?  विधानपरिषद हे सभागृह असावे की, असू नये, असा प्रश्न, असे वादविवाद अधूनमधून उपस्थित केले जात असतातच.  “मागल्या दाराने प्रवेश”, “राजकीय सोय लावण्याचा उपाय” असे अनेक प्रवाद विधानपरिषद नामनियुक्त सदस्यत्वासंदर्भात जोडले गेले आहेत तर विधानपरिषदेच्या एकूणच अस्तित्वाच्या विरोधात मतप्रदर्शन करणारा गट नेहमीच विधानपरिषदेच्या बाबतीत “वेळकाढूपणाचे सभागृह”, “कायदयाचा किस पाडणारे सभागृह”, “खर्चिक प्रणाली” अशी मल्लिनाथी करीतच असतो.  परंतु या गोष्टी, यासंदर्भातील टीका ही एकांगी स्वरुपाची आहे.  वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे.  पूर्ण विचारांती या प्रश्नाकडे बघितल्यास लोकशाही संवर्धन व बळकटीसाठी विधानपरिषद किंवा द्विसभागृह पध्दती ही एक आवश्यक अशी संकल्पना आहे, असेच म्हणावे लागेल. It is a ‘Revising Chamber’ and not a ‘Delaying Chamber’- असे माजी सभापती श्री. जयंतराव टिळक यांनी म्हटले आहे ते अगदी योग्यच होय.

संसदीय लोकशाहीत निर्णय प्रक्रियेअगोदर सखोल विचारमंथनाला महत्व आहे. Decision out of Discussion is Important. त्याचप्रमाणे कोणत्याही धोरणात्मक निर्णयापर्यंत पोहचताना त्यासंदर्भातील सर्व मतमतांतरांचा परामर्श घेतला जाणे आवश्यक असते. Diverse views must be acknowlegded. विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाच्या अस्तित्वामुळे ही गरज पूर्ण होऊ शकते. महाराष्ट्र विधानपरिषदेने आजवरच्या वाटचालीत यादृष्टीने उल्लेखनीय योगदान देत आपली आवश्यकता अधोरेखित केली आहे आणि त्यात नागपूर अधिवेशनांचे महत्वपूर्ण संदर्भ, कामकाज यांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल.

हिवाळी अधिवेशनांत महत्वपूर्ण कामकाज…

राज्यातील सहकाराचा पाया विस्तृत आणि भक्कम करून ग्रामीण भागात समृध्दीचे वारे खेळविणारा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा तत्कालीन सहकार मंत्री श्री. बाळासाहेब भारदे यांनी डिसेंबर, १९६० नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडला आणि याच अधिवेशनात विस्तृत चर्चेअंती तो संमत झाला. मा.श्री. भारदे साहेब पुढे १९६२ ते १९७२ असे दोन टर्म विधानसभा अध्यक्ष राहिले होते. जिल्हापरिषद व पंचायत समिती विधेयक माहे डिसेंबर, १९६१, शिक्षण क्षेत्रातील बाबींसंदर्भात श्वेतपत्रिकेवर चर्चा माहे नोव्हेंबर, १९६८, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कायदा माहे डिसेंबर, १९६८, विदर्भ-कोकण-मराठवाडा यांच्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ स्थापन करण्यासंदर्भातील महत्वपूर्ण अशासकीय ठरावे माहे नोव्हेंबर, १९६९, हरिजनांवर होणाऱ्या अत्याचाराची मीमांसा करण्यासाठी व त्यावर उपाययोना सुचविण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय – श्री. वि.स.पागे समितीचे गठन माहे डिसेंबर, १९७२, पंढरपूर मंदिरे विधेयक माहे नोव्हेंबर, १९७३, प्राणी रक्षण विधेयक माहे डिसेंबर, १९७६, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आरक्षण विधेयक – पदोन्नतीतील आरक्षण विधेयक माहे डिसेंबर, २००२, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग विधेयक माहे डिसेंबर, २००५, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण विधेयक माहे डिसेंबर, २००८, प्रदीर्घ चर्चा आणि छाननी अंती संमत करण्यात आलेले महत्त्वपूर्ण असे अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक माहे डिसेंबर, २०१३ असे नागपूर अधिवेशनांमधील संमत विधेयकांचे महत्त्वपूर्ण योगदान आपल्या डोळ्यासमोर आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात आलेली कापूस एकाधिकार खरेदी योजना तसेच रोजगार हमी योजना अशाच मूलगामी चर्चा आणि विचारमंथनांचे फलित आहे. यावेळी या विधेयकांमधील विधानपरिषदेतील चर्चा, सुचविलेल्या सुधारणा उल्लेखनीय ठरले आहे. त्याचप्रमाणे सन १९६० ते २०२३ या कालखंडात महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण शासकीय ठराव संमत करण्यात आले.

सामंजस्य आणि सहमतीचे दर्शन

आजपर्यंत नागपूर येथील अधिवेशने ही विदर्भातील प्रश्नांबरोबरच राज्यातील महत्वाचे प्रश्न, ध्येयधोरणे, संमत कायदे यादृष्टीने नेहमीच महत्वपूर्ण आणि वैशिष्टयपूर्ण ठरली आहेत.  कृष्णा-गोदावरी पाण्याच्या वाटपासंबंधातील ठराव, लोकसभेत व विधानसभेत सरळ निवडणुकीने भरल्या जाणाऱ्या एकूण जागांच्या एक तृतीयांशपेक्षा कमी नाही एवढया जागा महिलांसाठी आरक्षित करण्याबाबतचा प्रस्ताव, वनसंवर्धन कायदा, मानवी अवयव प्रत्यारोपण  अधिनियम १९९४ मध्ये सुधारणा करणारा ठराव, कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यासाठी घटनेत सुधारणा करण्याबाबत, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मा.अध्यक्षांनी सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन यासंदर्भात सभागृहाने संमत केलेला ठराव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी एन.टी.सी. च्या मालकीची साडेबारा एकर जागा केंद्र शासनाने देण्याबाबतचा एकमताने संमत झालेला ठराव, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई चा  नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई” असे करण्याबाबत केंद्र सरकारला करण्यात आलेली शिफारस एकमताने संमत, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” असा नामविस्तार, एल्फीस्टन रोड या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “प्रभादेवी” असे करण्यात यावे अशी शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली. अशा अनेक संदर्भामध्ये नागपूर अधिवेशनात घेण्यात आलेले हे निर्णय, चर्चा महत्वपूर्ण ठरली आहे.  या सर्व वेळी सभागृहांमध्ये अतिशय सामंजस्य आणि सहमतीचे दर्शन घडले.

महाराष्ट्र, जम्मू – काश्मीर आणि कर्नाटक…

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रसंगी मध्यप्रांतातील मराठी भाषिक विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला.  नागपूरला असलेला तेव्हाच्या राजधानीचा दर्जा त्यागून वैदर्भीय जनता महाराष्ट्रात सामील झाली.
२८ सप्टेंबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेल्या नागपूर करारान्वये “शासनाचे कार्यस्थान अधिकृत निश्चित कालावधीकरीता नागपूर येथे हलविण्यात येईल आणि दरवर्षी राज्य विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात येईल”, असे सुनिश्चित करण्यात आले.  अशाप्रकारे दोन ठिकाणी विधीमंडळाचे अधिवेशन गेली अनेक वर्षे भारतात महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीर या दोन राज्यात आयोजित केली जात आहेत. सन २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीर, लडाख केंद्रशाषित प्रदेश झाले आहेत.  तसेच  कर्नाटकमध्ये सन २०१२ मध्ये बेळगांव येथे सुवर्ण विधानसभा नावाने नवीन इमारत  बांधण्यात आली असून तेथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. नागपूर करारानुसार १९६० पासून उप राजधानी नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे आयोजित केले जाते.  फक्त काही अपवाद वगळता नागपूर कराराव्दारे अंमलात आणली गेलेली ही व्यवस्था अव्याहतपणे सुरु आहे.  महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नागपूर येथे घेण्यात न आलेल्या अधिवेशनांची संख्या ६ आहे.  त्यांचे वर्ष आणि कारणे

पुढीलप्रमाणे :-

(१) १९६२ – भारत-चीन युध्दामुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही.

(२) १९६३ – तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मारोतराव कन्नमवार यांचे दिनांक २४  नोव्हेंबर, १९६३ रोजी निधन झाल्यामुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ  शकले नाही.

(३)१९७९ – लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे यावर्षी नागपूर येथे  अधिवेशन होऊ शकले नाही.

(४) १९८५ – दिनांक २८ डिसेंबर, १८८५ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना  मुंबई येथे झाली होती.  त्याचा शताब्दी महोत्सव मुंबई येथे आयोजित  करण्यात आल्याने या वर्षी नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही.  मात्र १९८६ साली ३ ऐवजी ४अधिवेशने झाली, त्यापैकी जानेवारी,  १९८६ आणि नोव्हेंबर, १९८६ अशी दोन अधिवेशने नागपूरला झाली.  या दोन्ही अधिवेशनाच्या बैठकांची संख्या प्रत्येकी १५ दिवस होती.

(५) सन २०२० (६) सन २०२१ – वैश्विक महामारी कोरोना (कोविड-१९) मुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही.

उपरोक्त सहा अपवाद वगळता १९६० पासून दरवर्षी नित्यनेमाने १ अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यात नागपूरातील ४ पावसाळी अधिवेशनांचाही समावेश आहे. (सन १९६१, १९६६, १९७१ आणि अलीकडचे जुलै, २०१८)

बरखास्तीचा ठराव सखोल विचारमंथनाअंती फेटाळला…

महत्वाची बाब म्हणजे नागपुरातील १९६१ च्या पहिल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह बरखास्त करण्यात यावे असा ठराव विधानसभेत मांडण्यात आला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती. श्री.स.गो. वर्टी (वसई), ठाणे यांनी विधानपरिषद बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करणारा हा ठराव २५ जुलै, १९६१ रोजी विधानसभेत मांडला. ठरावावर बरेच विचारमंथन झाले. हा ठराव ४४ विरुध्द ८४ मतांनी फेटाळण्यात आला. हे कार्यवृत्त जिज्ञासूंनी वाचणे आवश्यक आहे. द्विसभागृह असावे की नसावे आणि असल्यास ते का असावे, यासंदर्भातील सखोल विचारमंथन आपल्याला वाचायला मिळेल. द्विसभागृह पध्दतीसंदर्भातील हा महत्वाचा वैचारिक ठेवा आहे.

भावनिक ऐक्य आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका

विशाल मराठी भाषिक राज्याची निर्मिती आणि नागपूर करार या संदर्भात बोलतांना प्रथम मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी भावनिक ऐक्याला महत्व दिले होते.  नागपूर येथील अधिवशेनाच्या आयोजनासंदर्भात खर्चाचा मुद्दा घेऊन टिका केली जाते  परंतु अधिवेशनामुळे भावनिक ऐक्याचा बंध बळकट होणे आणि अधिवेशन काळात विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणे, विकास योजनांना गती मिळणे शक्य झाले आहे.  नागपूर अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांवर, विकास योजनांवर प्रश्न-लक्षवेधी-ठराव-अर्धा तास चर्चा-अशासकीय ठराव-औचित्याचे मुद्दे-स्थगन प्रस्ताव अशा विविध संसदीय आयुधांव्दारे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सखोल विचारमंथन झाल्याचे आपल्याला मागील अधिवेशनांच्या कार्यवृत्तावरुन दिसून येईल.  दोन्ही सभागृहांचे मा.पीठासीन अधिकारी नागपूर अधिवेशन काळात विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी संबंधीत विषयांना, सन्मानीय सदस्यांना अग्रक्रमाने संधी उपलब्ध करुन देत असतात.

नागपूर अधिवेशन आणि राजकीय घडामोडी

नागपूर हिवाळी अधिवेशनांचे महत्त्व सभागृहातील कामकाजाइतकेच या दरम्यानच्या सभागृहाबाहेरील राजकीय घडामोडींना देखील तितकेच आहे. ज्येष्ठ नेते श्री. शरदचंद्रजी पवार विधानसभा विरोधी पक्षनेते असतांना मुख्यमंत्री श्री. अ.र.अंतुले सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते नागपूर पर्यंत डिसेंबर, १९८० मध्ये काढण्यात आलेली ऐतिहासिक शेतकरी दिंडी, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असतांना त्यांच्या विरोधात झालेले डिसेंबर १९८२ चे बंड, मंत्रीपदी असतांना ज्येष्ठ नेते श्री. सुशिलकुमारजी शिंदे आणि श्री. विलासरावजी देशमुख यांनी डिसेंबर १९९० चे नागपूर हिवाळी अधिवेशन आटोपताच जानेवारी महिन्यात फडकावलेले बंडाचे निशाण, तत्कालीन आक्रमक शिवसेना नेते श्री. छगन भुजबळ यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत केलेले डिसेंबर १९९१ चे  बंड, त्यामुळे शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ घटल्याने विरोधी पक्षनेतेपद श्री. मनोहर जोशींकडून श्री. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे याच हिवाळी अधिवेशनात येणे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. भाऊसाहेब फुंडकर यांनी काढलेली शेतकरी दिंडी, शिवसेना नेते श्री. दिवाकरजी रावते यांची कापूस दिंडी, ११ डिसेंबर, २०१२ रोजी श्री. नितीनजी गडकरी, श्री. गोपिनाथजी मुंडे, श्री. एकनाथराव खडसे-पाटील, श्री. देवेंद्रजी फडणवीस, श्री. सुधीर मुनगंटीवार, श्री. विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला नागपूर अधिवेशनावरील विराट घेराव मोर्चा आणि त्याचे सभेत झालेले रुपांतर या घटनांची राजकीय इतिहासात नोंद झाली आहे.

विधानपरिषद सदस्यत्वाच्या (विदर्भ पदवीधर सन १९७८ ते ८४ आणि १९८४ ते १९९०) माध्यमातून दमदार कामगिरीद्वारे “विधानपरिषदेतील वाघ” असा लौकिक श्री. गंगाधरराव फडणवीस यांनी प्राप्त केला होता. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत दस्तुरखुद्द नागपुरातील विधानसभा सदस्य असलेल्या श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विदर्भाकडे मुख्यमंत्रीपद आले. या त्यांच्या कारकिर्दीत नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासासंदर्भात सर्वंकष प्रयत्न सभागृहात आणि सभागृहाबाहेर करण्यात आले. ज्याचे दृष्य परिणाम सध्या दिसत आहेत. नागपूर विधान भवन जुन्या इमारतीतील नवीन मंत्री परिषद सभागृहात त्यांनी अधिवेशन कालावधीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या विकासकामांच्या संदर्भातील सादरीकरणासह उच्चस्तरीय बैठकांचे काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी केली. गतीमान प्रशासनासाठी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

१२५ व्या जयंतीनिमित्त महामानवाला मानवंदना…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर हिवाळी अधिवेशन डिसेंबर, २०१५ मध्ये दोन्ही सभागृहात त्यांच्या कार्याचा गौरव आणि अभिवादन करण्यासाठी विशेष चर्चेचे आयोजनही तत्कालीन मुख्यमंत्री आणि पीठासीन अधिकारी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले. सर्वपक्षीय सन्माननीय सदस्यांनी अतिशय अभ्यासूपणे यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. घटनाकारांना दोन्ही सभागृहांनी अशाप्रकारे केलेले अभिवादन हा विधिमंडळ कार्यवृत्तातील अनमोल ठेवा आहे.

वादे वादे जायते तत्वबोधा:…

ज्येष्ठांचे सभागृह, विद्वानांचे सभागृह असा लौकिक प्राप्त केलेल्या विधानपरिषदेने “वादे वादे जायते तत्वबोधा:” ही उज्वल प्रबोधन परंपरा जपली आहे. या शतक महोत्सवी वाटचालीत सभागृहाचे पीठासीन अधिकारी आणि विरोधी पक्षनेते यांचे विशेष योगदान लाभत आले आहे आणि लाभत राहिल. यंदाचे नागपूर डिसेंबर, २०२३ हिवाळी अधिवेशन या शतक महोत्सवाबरोबरच आणखी दोन कारणांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. दरवर्षी नागपूर अधिवेशनात राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित केला जाणारा अभ्यासवर्ग यंदाचा सुवर्णमहोत्सवी असा ५० वा संसदीय अभ्यासवर्ग आहे. त्याचप्रमाणे नागपूर विधिमंडळाची ऐतिहासिक वारसावास्तू आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी प्रसिध्द आहे. या वास्तूची पायाभरणी १७ डिसेंबर, १९१२ करण्यात आली होती ज्याला यंदाच्या वर्षी १११ वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या संसदीय वाटचालीत लोकहिताचे प्रभावी कायदे मंजूर करून ते राबविण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या या संस्मरणीय वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे हे कृतज्ञ स्मरण. त्याचप्रमाणे दिवंगतांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

 

– निलेश मदाने,

जनसंपर्क अधिकारी,

म.वि.स. संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, नागपूर

nilmadane72@gmail.com

नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबई,दि ७ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ‘नमो महारोजगार मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजता, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा अंतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा महामेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मेळाव्यात विविध पदांसाठी ७०० नियुक्त्या होणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल ४० हजारांहून अधिक जागांसाठी पदभरती होणार आहे. या रोजगार महामेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नमो महारोजगार बटनवर क्लिक करून, विचारलेली माहिती संपूर्णपणे भरून नोंदणी पूर्ण करावी.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, या महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स आणि इनवेस्टर्स तसेच नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत. स्टार्टअप्स उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे.एकाच छताखाली इनोव्हेटर्स, इन्क्युबेटर्स आणि इनवेस्टर्स यांच्यासाठी हा मेळावा पर्वणी ठरणार आहे. उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, इन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी  या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

 

 

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त उद्या विशेष चर्चासत्र

नागपूर, दि.7  : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार विधानपरिषदेचे सदस्य आणि नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त उद्या दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विधानपरिषद सभागृह, विधान भवन येथे “महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्वपूर्ण योगदान” या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील,  विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम, १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली  Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. तथापि, कोविड-१९ महामारीमुळे त्‍यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.

विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार यांना दि. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले असून यानिमित्त जुन्या आठवणींना तसेच विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वाटचालीतील हिवाळी अधिवेशनातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या प्रसंगांना उजाळा मिळणार आहे.

000000

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...