सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 100

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायो-डायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणार काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथील गोरेवाडा परिसरात सुमारे 3 लाख स्केअर मीटर क्षेत्रावर हा पार्क साकारण्याबाबत आज प्राथमिक आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य संदीप जोशी, मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त बी वैष्णवी, ग्रिन यात्राचे प्रदीप त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

असा असेल बायो-डायव्हर्सिटी पार्क

निसर्गाशी जवळीकता साधत त्याच्या जपवणूकी विषयी सर्वच धर्माने भर दिला आहे. यातील तत्व लक्षात घेऊन हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्त्वांवर उभारला जाईल. यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाची, शिक्षणाची संधी मिळेल. कृषी, विज्ञान, वन, जैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल. पूर्वापार चालत आलेली व या मातीत एकरुप असलेली विविध प्रकारची झाडी इथे लावली जाईल. सुमारे दिडशेपेक्षा अधिक बांबूच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केले जाईल.

आध्यात्मिक अनुभूतीसह या पार्कमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धनावर भर राहील. देवराई वन, नक्षत्र वन, राशी वन, औषधी वनस्पती संशोधन व संवर्धन, फुलपाखरु व काजवे असलेले वन, विविध मातींचे वैविध्य जपणारे दालन, पर्जन्यमापन, दिशा शास्त्र, योगा झोन, पीस झोन, फॅमिली झोन, मानसशास्त्र, आरोग्य या प्रमुख घटकांशी अंर्तमुख करणारा हा पार्क राहील.

00000

 

एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नागपूर, ता. १७ –  शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज शनिवारी (१७ मे) पाहणी केली.


यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी,  उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, स्वच्छता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डा. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सोनम देशमुख, सुसबिडीच्या श्रीमती वृंदा ठाकूर, प्रकल्प संचालक संजय गदरे, वित्तीय संचालक श्री विनोद टंडन, नागपूर प्रकल्प प्रमुख नितीन पटवर्धन, सल्लागार राजेंद्र जगताप व माजी नगरसेवक बाल्या बोरकर आणि दीपक वाडिभस्मे उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तसेच त्यांना  प्रकल्पाची माहिती दिली. कंपनीतर्फे ३० एकर जागेवर बांधकाम  करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे १००० मे. टन प्रतिदिन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारला जात आहे.
यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.  या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता
M/s. SusBDe  नागपूर महानगरपालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करत आहे.
या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, सेंद्रिय खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार M/s. SusBDe यांना देण्यात आले आहेत.  सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, Dry Fermantation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी कालावधी मध्ये या ३० एकर जागेव्यतिरिक्त 9 एकर जागा Fresh Waste Prossessing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. सध्या या जागेवर पायलट प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे.
या केंद्राची सुद्धा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पाहणी केली.

०००

‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांची मुलाखत

Oplus_16908288

मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 20, बुधवार दि. 21, गुरूवार दि. 22, शुक्रवार दि. 23 आणि शनिवार दि. 24 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारण होणार असून या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी तसेच दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 27 मे 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. निवेदक निलेश पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुलाखतीच्या पहिल्या भागात अवैध मासेमारीच्या नियंत्रणासाठी ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा, मत्स्यव्यवसायाला देण्यात आलेला कृषीचा दर्जा, मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांच्या पारदर्शी अंमलबजावणीसाठी एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर, मासेमारी तलावांचे ‘डिजिटलायझेशन’, मच्छिमार संस्थांना समन्यायी पध्दतीने तलावांच्या वाटपाचे धोरण,  देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी अशा अनेक विषयांवर मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर उत्तरे दिली आहेत.

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. यामध्ये  पर्यटनवाढीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न, ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग, ‘गाळमुक्त नदी’ मोहिम, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन,  सामान्य जनतेचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या ‘पालकमंत्री कक्षा’ची देखील सविस्तर माहिती मंत्री श्री. राणे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

000000

समांतर निवडणुकीसंदर्भात संयुक्त समितीची महाराष्ट्रातील नेत्यांशी व बँकिंग क्षेत्राशी सखोल चर्चा

Oplus_131072

मुंबई, दि.१७ :  भारतीय संविधान (१२९ वा सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ संदर्भात गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, रिझर्व बँक ऑफ इंडिया, विविध बँका व विमा कंपन्यांशी विस्तृत सल्लामसलत केली.

मुंबईच्या ताज हॉटेल येथे आज समांतर निवडणूक संदर्भात लोकसभा सदस्य पी.पी.चौधरी, लोकसभा सदस्य धर्मेंद्र यादव, राज्यसभा सदस्य घनश्याम तिवारी यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली.

समितीने राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समांतर निवडणुकांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक व प्रशासकीय परिणामांवर चर्चा केली. अधिकाऱ्यांनी समितीला आश्वासन दिले की, एक सखोल अभ्यास केला जाईल आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रावर एकत्रिक निवडणुकांमुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती समितीला दिली जाईल.

यानंतर, समितीने महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता, यांच्याशी एकत्रिक निवडणुकांच्या घटनात्मक, तार्किक आणि इतर बाबींवर चर्चा केली.

समितीने नंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींशी निवडणुकांच्या असमकालीनतेमुळे होणाऱ्या आर्थिक धोरणांवरील परिणामांविषयी संवाद साधला. आरबीआयच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ते या विषयावर सखोल आणि सर्वसमावेशक अभ्यास करतील आणि वारंवार निवडणुकांमुळे निर्माण होणाऱ्या राजकीय व धोरणात्मक अनिश्चिततेचा प्रभाव समजून घेतील.

शेवटी, समितीने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, युनियन बँक, एलआयसी, जीआयसी आणि नाबार्डसह बँकिंग व विमा क्षेत्रातील प्रमुख संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, एकत्रिक निवडणुकांचा बँकिंग व क्रेडिट संस्कृतीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी ते ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या माध्यमातून सर्वसमावेशक अभ्यास करतील आणि त्याचे निष्कर्ष समितीला सादर करतील.

000

 

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न; बियाणे, खते, निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत आढावा

पुणे, दि. १७: मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, हिरामण मांडेकर, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आदी उपस्थित होते.

जिल्ह्याने ॲग्री हॅकॅथॉनचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. ज्याचा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होईल. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर अधिक मागणी होईल. ते पाहता विविध पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा म्हणून अधिकची तरतूद करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते नंतर वाढवून ७५ हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत असून १ लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत तक्रारींकडे तात्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभाची रक्कम महाडिबीटी मार्फत वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सून वेळेवर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यानुसार जिल्ह्यात बियाणे आणि खतांच्या पुरेशा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३४ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ४८ हजार क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ लाख ९६ हजार मे. टन रासायनिक खतसाठा मंजूर आहे. त्यानुसार पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही. युरियाचा ७ हजार ५०० मे. टन आणि डी.ए.पी. चा १ हजार मे. टनचा संरक्षित (बफर) साठा करण्यात येणार आहे.

यावर्षी ॲग्री हॅकॅथॉन हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच उद्योग संघटना आदींनी स्पर्धक म्हणून नोंदणी केली आहे. यात कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून त्यावर स्पर्धकांनी सादर केलेल्या उपाययोजनांची छाननी करुन १ ते ३ जूनदरम्यान हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. एआय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, जीआयएस, आयओटी, ड्रोन तंत्रज्ञान, शेतीमध्ये मशीन लर्निंग आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक वर्गीकरणातील प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाईल.

याशिवाय पुढील पाच वर्षात निर्यातक्षम पिकांच्या लागवड तसेच उत्पादन वाढीसाठी समूह अर्थात क्लस्टर पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. यात केळी, अंजिर, स्ट्रॉबेरी, आंबा, करडई व सूर्यफूल, ज्वारी, भात, भाजीपाला, सोयाबीन यासह ऊस उत्पादकतेत वाढ करणे यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख (जीआय) मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आमदार श्री. शेळके यांच्या मागणीच्या अनुषंगाने कृषी विभागाने तात्काळ तसा प्रस्ताव करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या रकमेत वाढ व्हावी, वनविभागाच्या हद्दीतील जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, अशी मागणी आमदार कुल यांनी केली. त्यावर कार्यवाही निर्देश श्री. पवार यांनी दिले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी या योजनेचे अनुदान आजच बँक खात्यावर जमा झाल्याचा लघुसंदेश (एसएमएस) उपमुख्यमंत्री महोदयांना दाखविल आणि समाधान व्यक्त केले.
0000

सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली तब्बल १ हजार ५१ नागरिकांकडून निवेदने
  • हैद्राबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबारात प्रातिनिधीक स्वरूपात पट्टे वाटप

नागपूर, दि. १७ :  नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी इच्छा हजारो झोपडपट्टीधारकांची आहे. या पासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत. निकषाची पुर्तता करणारा एकही व्यक्ती हक्काच्या घरांपासून वंचित राहणार नाही. जे झोपडपट्टीधारक शासनाच्या निकषात मोडतात त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी महानगरपालिका, नझूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हैदराबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या २१ झोपडपट्टी धारकांना प्राथमिक स्वरुपात पट्टे वाटप करून झाला. यानंतर त्यांनी जनतेची निवेदने स्विकारली. यावेळी विधान परिषद सदस्य संदिप जोशी, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वासाठी घरे योजना-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने नागपुर शहरामधील नझुलच्या जागेवरील 33 झोपडपट्टीच्या प्रस्तावातील 3 हजार 714 झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात आले आहे. आजवर मंजुर पट्टेपैकी 2157 पी.टी.एस झोपडपट्टी धारकांना चलान देण्यात आलेले आहेत. पंरतु सदर अकृषीक आकारणीची रक्कम चलानाद्वारे भरणा केलेली नसल्याने वाटप करण्यास शिल्लक आहे. याबाबत शिबीर घेवून कार्यवाही केली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल विभाग) नागपूर कडुन 18 झोपडपट्टी पैकी  तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, भांडेवाडी या 3 झोपडपट्टयामध्ये एकुण 160 झोपडपट्टी धारकांना  पट्टे वाटप करण्यात आले आहेत. 474 संबधित पट्टेधारकांनी चलानाची रक्कम शासन जमा केल्यानंतर पट्टा वाटप करण्यात येईल. याबाबत  दिनांक 20.5.2025 रोजी शिबीर आयोजीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

उर्वरित चिंचभुवन, शामनगर, गिट्टीखदान, पन्नालाल देशराज नगर, आदिवासी नगर, पुनापुर, वाठोडा, भरतवाडा, हुडकेश्वर, कुराडपुरा, शोभाखेत, बिनाकी, कोष्टीपुरा, ठक्करग्राम व नारागाव या 15 झोपडपट्टीमध्ये 1121 पट्टे वाटप करणे शिल्लक आहे. त्यापैकी 2 झोपडपट्टी मध्ये पट्टे वाटपासाठी दिनांक 19 मे 2025 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे.

  मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल हजार ५१ नागरिकांकडून निवेदने

सर्वसामान्य नागरिकांना जनता दरबारातून आपले प्रश्न मार्गी लागतात असा लोकांचा विश्वास वाढीस लागला आहे. यासाठी जाणिवपूर्वक महिन्यातून एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूर मध्ये मुख्यमंत्री या नात्याने मी करतो. यात प्राप्त झालेल्या लोकांच्या निवेदनांवर गंभीरतेने विचार करून पात्र असलेल्या प्रत्येकाला न्याय मिळतो ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हैदराबाद हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यात महिलांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत, तरूणांपासून दिव्यांग व्यक्तिंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना आपली निवेदने दिली. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यादृष्टीने भव्य मंडप व कुलर्सची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी स्वयंशिस्तीचा प्रत्यय देत अप्रत्यक्षरित्या प्रशासन व शासकीय प्रणालीबाबतचा विश्वास दृढ केला.  राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या शिष्ट मंडळानी भेट घेवून आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली. यात संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ तातडीने सुरू करणे व त्यावर समाजाचे प्रतिनिधी नेमणे, पारंपारिक तेल घाणी उद्योगाच्या पुर्नविकासासाठी मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान राज्याच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करणे, तेलघाणीतील सुटे तेल विक्रीवर शासनाचे निर्बंध उठविणे आदी मागण्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.

या शिष्टमंडळात माजी खासदार रामदास तडस, डॉ. भुषण कर्डिले, गजानन शेलार, संजय विभुते, बळवंतराव मोरघडे, पुष्पाताई बोरसे, अतुल वांदिले, जगदिश वैद्य, कुणाल पडोळे, प्रविण बावनकुळे, नरेंद्र सुर्यवंशी, भगवान बोरसे हे पदाधिकारी सहभागी होते.

00000

सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांमुळे दहशतवादविरोधी लढ्याला मोठे बळ; जगासमोर भारताची एकजूट दिसणार

मुंबई दि. १७ : ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी खासदारांची सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या राष्ट्रांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो. ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ते म्हणतात की, पहेलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला आतंकवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय आहे असं मी समजतो. विशेष म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं.

संपूर्ण जगासमोर दहशतवादाची गंभीर समस्या आहे.  त्या विरोधात  ठामपणे उभं राहण्यासाठी अशा रीतीने उचललेलं हे पाऊल जगभरात भारताची प्रतिमा एक जबाबदार, शांतताप्रिय आणि दहशतवाद विरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्र म्हणून उजळेल, असा मला विश्वास वाटतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.

0000

विकासकामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबारदिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शासकीय यंत्रणांनी विकासकामे नियम आणि निकषाप्रमाणे मुदतीत पूर्ण करावीत; कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच  जिल्हा वार्षिक योजनेत कोणतेही प्रस्ताव सादर करताना  तेथील स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन व त्यांची शिफारस घेऊनच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत.

आज नियोजन भवनात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी विधानपरिषदचे सदस्य चंद्रकांत रघुवंशी, किशोर दराडे, माजी मंत्री तथा आमदार डॉ.  विजयकुमार गावित, शिरीषकुमार नाईक, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर  जिल्हा नियोजन अधिकारी, नंदुरबार शशांक काळे, उपस्थित होते. तसेच या बैठकीत झालेल्या चर्चेत सर्वांनी सहभाग घेतला.

सन 2024-25 या संदर्भ वर्षातील जिल्हा वार्षिक योजनांचा 31 मार्च, 2025 अखेरपर्यत वार्षिक योजनांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा सन 2024-25

दिनांक 31 मार्च, 2025 अखेर झालेला खर्च                                        (रुपये लाखात)

क्र. योजना मंजूर नियतव्यय प्राप्त तरतुद वितरीत तरतुद झालेला खर्च  खर्चाची टक्केवारी
1. सर्वसाधारण योजना 19200.00 19200.00 19200.00 19087.79 99.42%
2. आदिवासीउपयोजना(TSP/OTSP) 38925.00 38925.00 38925.00 38611.00 99.20%
3. अनुसुचित जाती उपयोजना 1400.00 1400.00 1399.50 1399.50 99.96%
  एकूण नंदुरबार जिल्हा 59525.00 59525.00 59524.50 59098.29 99.28%

 

 बैठकीत सन 2024-25 मधील कामांचा आढावा घेण्यात आला.

  • पालकमंत्री यांनी निर्देश दिल्यानुसार  शेतकऱ्यांसाठी मोफत माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु.
  • अन्न परीक्षण प्रयोगशाळा ( food testing lab)  ला देखील मंजुरी.
  •  कृषी कार्यालय सर्व प्रयोगशाळांसाठी सुसज्ज इमारत उभारणार.
  • टंचाईग्रस्त वाडी पाड्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी 123 गावांना टँकर मिळणार
  • स्मशानभूमी  नसलेल्या 5 गावांना स्मशानभूमी कामांना मंजुरी.
  • 3 ग्रामपंचायत कार्यालय इमारत व बँक साठी निधी मंजूर  ग्रामपंचायत कार्यालयात बँकेची सुविधा होणार सुरु.
  • बँकेची सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी बचत गटातील बँक सखी देणार सेवा .
  • सरकारी कार्यालयामध्ये टप्याटप्याने अभ्यांगतासाठी पाणी व स्वच्छतागृहाची सोयीसुविधा .
  • रुपये 1 कोटी खर्चाच्या फिश क्लस्टरला मंजुरी
  • अंगणवाडी मध्ये आहार  शिजवण्यासाठी साहित्य वाटपास मंजुरी
  • प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र होणार प्रमाणित आवश्यक साहित्यासाठी आरोग्य विभागास निधी मंजुर
  • लहान मुलांसाठी रुपये 3  कोटी निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे पीआयसीयु (PICU)  कार्यान्वित होणार.
  • नंदुरबार शहरातील चार ठिकाणी सिग्नल साठी रुपये 50 लक्ष मंजूर
  • पोलीस दलाच्या वाहनासाठी रुपये 1.50 कोटी उपलब्ध
  • पोलीस अधीक्षक कार्यालय : सौर विद्युत व्यवस्थासाठी निधी मंजूर.

वरील मंजुर कामांच्या बाबतीत जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले असुन पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी  नियोजन विभागाचे अभिनंदन केले.

जिल्हा वार्षिक योजना मंजुर नियतव्यय सन 2025-26           (रुपये लाखात)                                                                        

क्र. योजना मंजूर नियतव्यय
1. सर्वसाधारण योजना 21300.00
2. आदिवासीउपयोजना(TSP/OTSP) 42954.15
3. अनुसुचित जाती उपयोजना 1400.00
  एकूण नंदुरबार जिल्हा 65654.15

  बैठकीपूर्वी झाला गुणगौरव सोहळा..

यामध्ये सर्व सनसनाटी व कठीण गुन्ह्याचा यशस्वीपणे शोध लावून तपास करणे कामी  जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. तसेच माननीय मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कार्यालयांना बक्षीस जाहीर झाले अशा कार्यालयांचा सत्कार करण्यात आला यामध्ये उपविभागीय कृषि अधिकारी यांचे कार्यालय (सी. के. ठाकरे), तालुका कृषी अधिकारी धडगांव (आर. एम. शिंदे) , सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार (नितीन वसावे), तालुका वैद्यकीय अधिकारी धडगाव (कांतीलाल पावरा), कनिष्ठ अभियंता जलसंधारण विभाग नंदुरबार (निलेश पाटील),  मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार (राहुल वाघ), व उपवनसंरक्षक कार्यालय,अक्कलकुवा.

तसेच बिहार येथे खेळण्यात आलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने 56 गोल्ड, 45 सिल्वर, आणि 48 ब्राँझ  असे एकूण 149 पदके मिळवलीत.   या स्पर्धेत एस. ए. मिशन हायस्कूलचे खेळाडू सौरभ राजपूत याच्या निर्णायक गोलने महाराष्ट्र मुलांच्या रग्बी संघाला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये ब्राँझ पदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचे तसेच त्यांच्या सोबत असलेला खेळाडू प्रणव गावित व त्यांचे मार्गदर्शक खुशाल शर्मा यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते शाल व पदक देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी सार्वजनिक आरोग्य विभाग नंदुरबार यांना सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत हुडको यांच्याकडून प्राप्त सहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकोटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

000000

 

युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१७: रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ययुक्त शिक्षण मिळण्याकरीता कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टाटा ग्रुप, नगरविकास विकास, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, सीओईपी टेक विद्यापीठाचे कुलगुरू सुनील जी. भिरुड, टाटा टेक्नॉलॉजीसचे कौशल्य विभागाचे प्रमुख सुशीलकुमार, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आदी उपस्थित होते.

राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यावर भर

श्री. पवार म्हणाले, औद्यागिक प्रशिक्षणाला काळानुरुप अत्याधुनिक बनविण्याची गरज होती, कृत्रिम बुद्धीमत्तासारखे अत्याधुनिक प्रशिक्षण युवकांना मिळाले पाहिजे, यादृष्टीने टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून राज्यात चंद्रपूर, गडचिरोली येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कौशल्यवर्धन केंद्राकरिता टाटाने २४० कोटी रुपये आणि राज्य शासनाने ४० कोटी रुपये तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापिठातील केंद्राकरीता टाटाकडून १४५ कोटी रुपये आणि राज्य शासनाकडून ३० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच कल्याण डोंबिवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही कामे सुरु आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत

श्री. पवार पुढे म्हणाले, पुणे शहर ही शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. अलीकडील काळात पिंपरी-चिंचवडमुळे पुणे शहरालादेखील औद्यागिक नगरी अशी ओळख मिळाली आहे. पुण्यासहित परिसराचा औद्योगिक विकास होताना आयटी पार्कसारख्या संस्था स्थापना झाल्या आहेत. उद्योग आणि आयटी पार्कमध्ये कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज विचारात घेता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडमार्फत संचालित बाणेर येथील कौशल्यवर्धन केंद्रातून युवकांची रोजगारक्षम पिढी निर्माण करणारे अत्याधुनिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. उद्योगाधंद्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याचे प्रात्याक्षिकही दिले जाणार आहे. यामुळे युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार तसेच औद्यगिक क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी

या प्रकल्पाअंतर्गत सर्व यंत्रसामुग्री, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण पुणे महानगरपालिकेस करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पीईबी इमारत माहे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी. सर्व सुविधांनी युक्त आराखडा तयार करुन त्याप्रमाणे कामे दर्जेदार पद्धतीने गतीने पूर्ण करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विविध सार्वजनिक विकासकामे सुरु असून अधिकाऱ्यांनी समर्पण भावनेने काम करावे, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

कौशल्यवर्धन केंद्राच्या माध्यमातून ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट-डॉ. राजेंद्र भोसले

पुणे शहरातील विद्यार्थ्यांसोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्रातून दरवर्षी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये २७९ कोटी ६७ लाख इतकी असून या रक्कमेपैकी रुपये २३७ कोटी ७२ लाख रुपये इतकी रक्कम टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याकडून तर उर्वरित खर्च रुपये ४१ कोटी ९५ लाख रुपये नगर विकास विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून सुमारे १ एकर (३ हजार ६०५ चौ.मी.) जागा उपलब्ध देण्यात आली असून त्यामध्ये सुमारे २२ हजार चौरस फूट क्षेत्रफळात इमारत उभारण्यात येणार आहे. या केंद्राचा नवउद्योजक, स्टार्टअप यांच्यासोबत लाखो युवकांना लाभ होणार आहे, असे प्रास्ताविकात  डॉ. भोसले म्हणाले.

000

 

‘महाराष्ट्र दर्शन’ भित्तीपत्रकांचे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात १९ मे पासून प्रदर्शन

मुंबई, १७ मे २०२५ : महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र दर्शन’ या विशेष उपक्रमांतर्गत मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सचित्र भित्तीपत्रकांचे १९ ते २१ मे २०२५ या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र दर्शन’ या प्रदर्शनाद्वारे राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक विविधतेचे दर्शन घडविण्यात येणार असून, मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांना याचा अनुभव घेता येणार आहे.

000

 

ताज्या बातम्या

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून विविध विषयांचा आढावा

0
सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील जलप्रकल्प, पुनर्वसन आदी कामांचा आढावा मुंबई दि. ३०: जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी...