बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 997

योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा  – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी  

  • खेमजई (ता. वरोरा) येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन
  • दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संवाद

चंद्रपूर, दि. १६ : केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसि भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचारी लोकांमध्ये जावून याबाबत जनजागृती करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या यात्रेसोबत जोडा व त्यांना लाभ मिळवून द्या, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसीत भारत संकल्प यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. पुरी म्हणाले, गत 9 वर्षात जे काम झाले आहे, आणि भविष्यात केंद्र सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी जे काम करणार आहे, अशा बाबींची माहिती या संकल्प यात्रेतून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. सोबतच महत्वाच्या विविध शासकीय योजनांचा लाभसुध्दा या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे या यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. योजनांपासून वंचित असलेल्यांना यात सहभागी करावे. विकसीत भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरात 3200 एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत सदर व्हॅन 65 हजार गावांमध्ये आणि 5 हजार शहरात गेली असून ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ अंतर्गत 1 कोटी 80 लक्ष लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले आहे.

पुढे श्री. पुरी म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात सुरवातीला 102 पेट्रोलपंप होते, आज 131 पेट्रोलपंप आहेत. 2014 मध्ये जिल्ह्यात 3 लक्ष 34 हजार एल.पी.जी गॅस कनेक्शन होते. ती संख्या आज चंद्रपूर जिल्ह्यात 6 लक्ष 32 हजार झाली असून जिल्ह्यातील 34495 कुटुंबांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 2014 मध्ये देशात 14 कोटी नागरिकांकडे गॅस कनेक्शन होते. आता 2023 मध्ये हा आकडा 32 कोटींवर पोहचला आहे. सन 2014 पर्यंत केवळ 1 लक्ष 5 हजार नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला होता, तर 2014 पासून 2023 पर्यंत ग्रामीण आणि शहरी मिळून 4 कोटी नागरिकांना आवास योजनेंतर्गत घरकूल देण्यात आले आहे. गत सरकारमध्ये देशातील 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती तर आज 2023 पर्यंत 6 लक्ष 50 हजार गावांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तसेच देशात आजच्या घडीला 50 कोटींपेक्षा जास्त लोकांचे बँकखाते काढण्यात आले आहे. तसेच आज जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, भविष्यात ती तिस-या क्रमांकावर पोहचणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकसीत भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

केंद्र सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतक-यांच्या खात्यात 6 हजार रुपयांचा थेट लाभ, आयुष्मान भारत अंतर्गत मोफत आरोग्य सेवा आदी योजनांचा यात समावेश आहे. या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून चित्ररथ आपल्या दारी येत आहे. गावातील लोकांनी या योजनांचा फायदा घ्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसीत भारत हा संकल्प आहे. जग बदलविण्यासाठी आपणही संकल्प करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मिशन शौर्य, मिशन जय किसान, मिशन ऑलंपिक, अयोध्येच्या राममंदिरासाठी काष्ट, नवीन संसद भवनासाठी चंद्रपूरचे लाकूड अशा अनेक बाबी करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा असल्यामुळे विकसित भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत 273 ग्रामपंचायतींमध्ये विकसीत भारत संकल्प यात्रा गेली आहे. यात एकूण 1 लक्ष 42 हजार 595 नागरिक सहभागी झाले आहेत. यात्रेदरम्यान 17558 कुटुंबाची आरोग्य तपासणी, 2557 जणांची उज्वला गॅस कनेक्शनकरीता नोंदणी, 6300 जणांना आयुष्मान भारतचा लाभ देण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा -केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर दि १६: विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत देशाच्या सर्व भागात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रा’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.

इटावा (ता. गंगापूर) येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड  बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड,  गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, सहायक गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, सरपंच कैलास शिनगारे, उपसरपंच बाबासाहेब घुले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, सामाजिक कार्यकर्ते संजय खांबायते, दीपक बडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील  शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे तसेच यामाध्यमातून लाभार्थी कुटुंबाच्या जीवनात बदल घडविण्यासाठी  प्रयत्न करण्यात येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा. विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिशन मोडवर काम करा, असे ते  यावेळी म्हणाले.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी  जनतेला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोयही शासनाने केली आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डीबीटीद्वारे निधी वितरण करण्यात येत आहे. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना,उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवा, असे निर्देश त्यांनी सबंधित यंत्रणेला दिले.

आपल्या देशाला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासाठी देशातील प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे.शासन आपल्या पाठीशी आहे, असे डॉ.कराड यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल व योजना गावागावात पोहचविण्यासाठी ही संकल्प यात्रा आपल्या गावात आली असल्याचे सांगून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामवत यांनी संकल्प यात्रेचे आयोजन व विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे डॉ.कराड  यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी  मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

०००

लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थींशी थेट संवाद

 चिखली येथे विकसित भारत संकल्प यात्रेस लाभार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन

 जालना, दि. १६ (जिमाका) : केंद्र सरकार हे अनेक लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने प्रभावीपणे राबवित आहे.  ज्या गरजू लाभार्थींना अद्याप या योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा  विविध योजनेस पात्र व्यक्तींना लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सध्या देशभर राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फिरत्या एलईडी वाहनांवरील दूरदृश्यप्रणालीव्दारे विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  बदनापूर तालुक्यातील चिखली येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. दानवे बोलत होते.

मंचावर आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास लाभार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मंत्री श्री. दानवे म्हणाले की,  केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जालना जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सध्या सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा 2014 ला केंद्रात निवडून आल्यानंतर त्यांनी आमचे सरकार हे गरीब आणि शेतकरी यांच्यासाठी समर्पित असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्य व्यक्ती आणि युवकांच्या कल्याणासाठीही अनेक योजना राबवित आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेने अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या मार्गदर्शनात  श्री. दानवे यांनी प्रधानमंत्री घरकुल योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र, आयुषमान भारत योजना, गरीब कल्याण योजना, घरकुल योजना, किसान सन्मान योजना, तृणधान्य, महिला आरक्षण,  स्वच्छ भारत अभियान, किसान क्रेडिट कार्ड, किसान सन्मान योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर  आदीबाबत माहिती देऊन कल्याणकारी योजनांचा  लाभ घेण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी डॉ.  श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, केंद्र शासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचे लाभ वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी  अनेक शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत, वंचित व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा उद्देश हा विकसित भारत संकल्प यात्रेचा आहे. सर्वसामान्यांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुखी करावे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी रूपाली निकम यांच्यासह इतर लाभार्थ्यांनी  आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी लाभ घेतलेल्या शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्या जीवनात झालेला बदल सांगितला.

कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या विविध  शासकीय योजनांच्या स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली.

या ठिकाणी  प्रधानमंत्री  जनऔषधी परियोजना, कृषी, नाबार्ड, महाराष्ट्र बँक (जनधन योजना), उज्वला योजना, आधार नोंदणी/नूतनीकरण, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत  ( प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ), पशुधन विकास ( पशुधन विषयक किसान क्रेडिट कार्ड), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बचत गट आदी स्टॉल लावण्यात आले होते. स्टॉलला भेट देण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी  झाली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून  विकसित भारत संकल्प शपथ घेण्यात आली.

जिल्ह्यातील गावागावात जाऊन  केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम दि. 26 जानेवारी, 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.

 ०००

‘शासन आपल्या दारी’अभियानासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे-  पालकमंत्री उदय सामंत

★रायगड येथे ५ जानेवारी २०२४ रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

★शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांचे दालन उभारणार

रायगड,दि. १६ (जिमाका): खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

‘शासन आपल्या दारी’ या अभियानानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दि.5 जानेवारी 2024 रोजी रायगड जिल्हा दौरा आहे. यासंदर्भात माणगाव तालुक्यातल लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापाठ लोणेरे येथील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच  इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने ‘शासन आपल्या दारी’ ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.रायगड जिल्ह्यातील या कार्यक्रमासाठी अंदाजे 1 लाख महिला, पुरुष उपस्थित राहणार आहेत. या सर्व नागरिकांची  गैरसोय होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू,असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या  तालुकानिहाय महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीची माहिती घेवून या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी आणण्याची, पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट याची व्यवस्था याबाबतचा आढावा पालकमंत्री यांनी यावेळी घेतला.

वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, नगरपालिका, परिवहन महामंडळ आदी विभांगाना सूचना देण्यात आल्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला मंत्री श्री सामंत यांनी दिल्या.

महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी सर्व विभागानी काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक विभागाने नेमून दिलेली कामे मुदतीत व उत्कृष्टपणे पूर्ण करावीत. या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग  महत्वाचा असल्याचेही सांगून त्यांनी नियोजनामध्ये आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या.

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची विभागनिहाय सविस्तर माहिती यावेळी दिली.

०००

 

धेरंड-शहापूर येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री उदय सामंत

रायगड,दि. १६(जिमाका):अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर येथील एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहेत, त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित धेरंड-शहापूर भूसंपादनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे आदिंसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला पाहिजे,ही भूमिका एमआयडीसीने घेतली आहे.  पहिला हा भाव रु.35 लाख होता, दुसरा भाव रु.50 लाख, तिसरा रु.60 लाख आता यामध्ये वाढ करुन तो रु.70 लाखापर्यंत नेला आहे. अजूनही यामध्ये कॅल्यूलेशन करुन काही वाढीव देता आले तर त्यासाठीही प्रयत्न केले जातील.  या प्रकल्पामुळे सहा गावे प्रकल्पबाधित होणार आहेत. या प्रकल्पाबाधित सहा गावांच्या नागरी सुविधांसाठी रु.5 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिले आहे. प्रकल्पबाधितांना नोकरी, प्रकल्पबाधितांना दाखला आणि भूखंड वाटप अविकसित असेल तर 15 टक्के, विकसित असेल 10 टक्केचे प्रस्ताव एमआयडीने शेतकऱ्यांना दिला आहे.  पुढील 15 दिवसांच्या आत  याबाबत पुढील बैठक घेण्यात येईल.

सर्वांनी प्रकल्प आणण्यासाठी दुजोरा दिला असून सर्व शेतकरी सकारात्मक आहेत,ही आनंदाची बाब असून सगळयांचे अभिनंदन  करतो.  शेतकऱ्यांची मागणी काय आहे, शेतकऱ्यांना समाधानी कसे करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

०००

पुस्तक महोत्सवाने सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची मान उंचावली- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे दि. १६: विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाने सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी म्हणून पुण्याची मान उंचावली आहे, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे,  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,  डेक्कन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे, शहीद भगतसिंह यांचे पणतू यादवेंद्रसिंग संधू, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

पुणे पुस्तक महोत्सवासारखा जनतेचा सोहळा इतरत्र पाहिला नसल्याचे नमूद करून डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने पुस्तकांशी संवाद  घडतो. पुस्तक मार्गदर्शन करतात, सांत्वन करतात, विचार देतात, समाजातील एकोपा वाढवितात. त्यामुळे पुस्तक वाचनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उदारीकरणाचा फायदा मध्यमवर्गाला होत असल्याने शिक्षणाचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, डिजिटल माध्यमांमुळे वाचन संस्कृतीला धक्का पोहोचतो आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

मंत्री श्री.पाटील म्हणाले, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि पुण्याच्यादृष्टीनेही महत्वाचा असा हा पुस्तक महोत्सव आहे. महोत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक विद्यार्थी आणि पालकांना मोफत देण्यात येणार आहे. चांगल्या गोष्टींमध्ये सहभाग ही पुण्याची संस्कृती असल्याने महोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री.मराठे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सव साहित्य , कला आणि खाद्य संस्कृतीचा महोत्सव असून २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ग्रंथ चळवळीशी संबंधित सर्व घटकांना एका ठिकाणी आणून ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. भांडारकर संशोधन संस्थेतील ज्ञानभांडार अनुवादित करून देशभरात पोहोचविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पुस्तक न्यास करेल, असे त्यांनी सांगितले.

श्री.संधू म्हणाले, शहीद भगतसिंग यांनी ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे गीत लिहिल्यावर महाराष्ट्र आणि त्यांच्या कुटुंबाचे नाते जोडले गेले. त्यांनी कारागृहात असताना शंभरपेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन केले. त्यांनी लिहिलेली जेल डायरी पुणेकरांना पाहता यावी यासाठी महोत्सवात ठेवण्यात येत आहे. या डायरीच्या दर्शनाने युवकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करतानाच पुणे पुस्तकांचे केंद्र म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक श्री.मलिक म्हणाले, देशातील कोणत्याच पुस्तक महोत्सवात स्थापित झाले नाहीत असे चार विश्वविक्रम पुण्याच्या महोत्सवात होत आहे. पुण्याला जगातील पुस्तकांची राजधानी म्हणून स्थापित करण्यात राष्ट्रीय पुस्तक न्यास सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी राज्य शासनाचे विशेष सहकार्य मिळल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.पांडे यांनी केले. पुस्तक प्रदर्शनातील २५० दालनात २० पेक्षा अधिक भाषांमधील २० लाख पुस्तके उपलब्ध आहे. महोत्सवात १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे.

श्री. संधू यांच्या हस्ते ‘हिंदवी स्वराज्य स्थापना- शिवराय छत्रपती झाले’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तके महोत्सवाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी सकाळपासून १० हजार पुस्तक प्रेमींनी प्रदर्शनाला भेट दिली.

कार्यक्रमपूर्वी विद्यापीठाच्या परदेशी विद्यार्थ्यांनी त्या-त्या देशाचे नृत्य आणि संगीत सादर केले.  पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ या १८ हजार ७५१ पुस्तकांनी ‘जयतू भारत’ हे जगातील पुस्तकांनी बनलेले सर्वात मोठे वाक्य बनवून विश्वविक्रम साकार करण्यात आला. यापूर्वीचा विक्रम ११ हजार १११ पुस्तकांचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्नील डांगोरीकर यांनी याबद्दलचा निकाल जाहीर केला व आयोजकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांशी साधला संवाद

पुणे दि.१६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी  संवाद साधला.  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्वेनगर चौक येथे उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाला खासदार प्रकाश जावडेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार, उपायुक्त नितीन उदास आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी यात्रेबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य गरजू नागरिकांना देण्यासाठी योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहीचवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यात्रेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना लाभ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

०००

भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल -केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी

पुणे, दि. १६ : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’  भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी  केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विकसित भारत यात्रेला दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करून अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी असताना श्री. चौधरी बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके, अल्केश उत्तम आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. चौधरी म्हणाले की, देशातील सर्वसामान्य जनतेचा विकास झाला तरच भारत जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येईल. सन २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे  प्रधानमंत्री मोदी यांचे उद्दिष्ट असून जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्ती सुविधा संपन्न होणार नाही तोपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. हा उद्देश साध्य करण्यासाठी विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना स्थानिक आणि गाव पातळीपर्यंत पोहचविण्यात येत आहेत.

जे नागरिक योजनांपासून वंचित आहेत, ज्यांना आतापर्यंत योजनांचा लाभ मिळाला नाही अशा गरजू नागरिकांना यात्रेच्या माध्यमातून जागेवरच योजनांचा थेट लाभ दिला जात आहे. गेल्या ९ वर्षात देशभरातील गरिबांच्या खात्यात विविध योजनांच्या माध्यमातून  किमान ३३ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत  जमा करण्यात आली आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्री. चव्हाण म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील नागरिकांना पोहचविण्याच्यादृष्टिने सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आणि नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकातील नागरिकांना योजनांची माहिती देण्यात येत असून त्यांना थेट लाभ दिला जात आहे. ही यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात मंत्री श्री. चौधरी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत कार्ड, बचत गटांना खेळते भांडवलसाठी आर्थिक मदतीचे धनादेश, जल जीवन मिशन चे कार्यारंभ आदेश इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

०००

लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणार –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १६: लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला पूर्वीच मान्यताही दिली आहे. त्यामुळे भविष्यात या विद्यापीठात पायाभूत सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संमेलनात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मंचावर एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजू मानकर, फूड अँड गव्हर्न्ससचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, लोकसारंग हरदास, माधव लाभे, उत्कर्ष खोपकर, मोहन पांडे आदींची उपस्थिती होती.

ही तंत्रज्ञान संस्था उभी करण्यामध्ये डी. लक्ष्मीनारायण यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे योगदान हे संस्थेच्या जीवनपटातील मोठी घटना असल्याचे सांगून, वर्षभरापूर्वी स्वायत्त संस्थेत रुपांतर व्हावे, अशी संस्थेची मागणी होती. मात्र आता हे अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ झाले असून, आपण दिलेला शब्द पाळल्याचा आनंद होत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचा २५० कोटी रुपयांचा आराखडा पूर्वीच तयार करण्यात आला असून, त्याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे भविष्यात या विद्यापीठात पायाभूत सोयीसुविधा उभरणीसाठी मोठा निधी दिला जाईल, असे सांगून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पायाभूत सोयीसुविधांसाठी निधी दिल्याचे सांगितले. त्याच धर्तीवर या संस्थेच्या पायाभूत सोयीसुविधा अतिशय उत्तम दर्जाचा उभारून भविष्यात ही संस्था प्रिमीयम इंस्टिट्यूट म्हणून नावारुपास यावी, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

संस्था उभारणीस माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे राहणार असून, त्यांनी संस्थेसोबत टाय-अप करून स्वयंपूर्णतेकडे कसे जाता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2030 पर्यंत देशाच्या 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या आर्थिक सामर्थ्याचे महाराष्ट्र हे प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. कुठल्याही देशाच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा महत्त्वपूर्ण असतो. अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा मोलाचा असणार आहे. पारदर्शकता आणि गतिमानता  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येण्यास मदत होत असून अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

एलआटीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी अतिशय उत्तम प्रयत्न केल्यामुळे या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा आणि स्थान मिळाले आहे. उच्च व तंत्र शिक्षणात तंत्रज्ञानालाच महत्त्वाचे स्थान राहिले असून, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते कसे वापरले, त्यातून कोणती निर्मिती केली, याला अधिक महत्त्व असते, असे सांगून त्यांनी या विद्यापीठासारखी इतर विद्यापीठांनी व्यवस्था निर्माण करावी, असा आशावाद उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

कुलगुरु डॉ. राजू मानकर यांनी या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाची एलआयटी ही मातृसंस्था असल्याचे सांगून, आता त्याचे विद्यापीठात रुपांतर झाल्याचे सांगितले. त्यांनी उपमुख्यमंत्री यांनी वर्षभरात या संस्थेची केवळ स्वायत्त संस्था करावी, अशी मागणी केली होती. मात्र वर्षभरात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केलेल्या कामगिरीबाबत माहिती दिली. त्याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचेही आभार मानले.

यावेळी जी. डी यादव, लोकसारंग हरदास यांचीही समायोचित भाषणे झाली. माधव लाभे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची माहिती दिली.

लिटा संवाद या नियतकालिकाच्या वार्षिकांकाचे तसेच विद्यापीठाच्या ध्वजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रोफेसर डॉ. सुधीर भगाडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अजय देशपांडे, मनोज पलरेचा यांनाही युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉ. गिरीजा भरत यांचा महिला गटातून शाल श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तर चिन्मय गारव यांना यंदाचा युथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकसारंग हरदास यांनी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पायाभूत सोयीसुविधा उभारणीसाठी 1.6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डॉ. सुगंधा गाडगीळ आणि सचिन पळसेकर यांनी सूत्रसंचालन तर माधव लाभे यांनी प्रास्ताविक केले. ‘लिटा’चे सचिव उत्कर्ष खोपकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००

नागपूर वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२३० कोटीची गुंतवणूक, ३ हजार रोजगार

नागपूर, दि.१६ : मिहान नागपूरचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. येथे उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याने उद्योजकांचे पसंतीचे ठिकाण ठरले आहे. इन्फोसिससारख्या जागतिक किर्तीच्या अनेक कंपन्या येथे उभ्या राहात आहेत. त्यामुळे नागपूर हे वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर’ असून शहराची हळूहळू आयटी हबच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जागतिक कीर्तीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या नागपूर विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खा.कृपाल तुमाने, इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॅाय, कार्यकारी उपाध्यक्ष सुनीलकुमार धानेश्वर, वरिष्ठ उपाध्यक्ष तरंग पुराणिक, उपाध्यक्ष नीलाद्री प्रसाद मिश्रा यावेळी उपस्थित होते.

नागपूर येथे उभे राहिलेले इन्फोसिसचे हे मी आतापर्यंत पाहिलेल्या केंद्रांपैकी अतिशय चांगले केंद्र आहे. या ठिकाणी ३ हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. केंद्राने आपला विस्तार करून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजे. नागपूर, विदर्भातील युवकांना संधी दिल्यास केंद्राचा व्याप गतीने वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशाने ५ ट्रिलीयन डॅालर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी महाराष्ट्राचा प्रमुख पुढाकार राहणार आहे. डिजिटल वापरात भारत जगाचे नेतृत्व करतो आहे. आज भाजीपाला विक्रेते देखील डिजिटल व्यवहार करताना आपण पाहतो. माहिती तंत्रज्ञानाच्या यशस्वी वापरात भारताने 30 वर्षाचा टप्पा गाठला. या तंत्रज्ञानाचे महत्व नागरिकांना समजले आहे. विकासात तंत्रज्ञानाचे महत्वाचे योगदान आहे. भारतासारख्या देशात केवळ तंत्रज्ञानामुळे विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, देशाचा आर्थिक विकास वेगाने होत आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आपण बाळगले आहे. त्यासाठी इन्फोसिस सारख्या कंपन्यांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. मिहानमध्ये उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आपण निर्माण केल्या. पाणी, रस्ते, पुल, मेट्रोचे चांगले नेटवर्क तयार केले आहे. नागपुरात उत्तम दर्जाचे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण लवकरच उभे करू. पुढील तीन वर्षात नागपुरात अतिरिक्त 1 लाख रोजगार निर्माण होईल, असे श्री.गडकरी म्हणाले. इन्फोसिसला भविष्यात लागणाऱ्या बाबींसाठी सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीस उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी फित कापून केंद्राचे उद्घाटन केले. केंद्राच्या परिसरात वृक्षारोपन केले. प्रास्ताविकात इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॅाय यांनी केंद्राच्या स्थापनेची माहिती दिली. आभार वरिष्ठ् उपाध्यक्ष तरंग पुराणिक यांनी मानले.

नागपूर हे इन्फोसिसचे राज्यातील तिसरे केंद्र

इन्फोसिस ही जागतिक कीर्तीची आयटी कंपनी आहे. पुणे व मुंबईनंतर नागपूर येथे सुरु झालेले इन्फोसिसचे हे महाराष्ट्रातील तिसरे केंद्र आहे. 230 कोटीची गुंतवणूक या केंद्रासाठी करण्यात आली असून येथे 3 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. 2 लाख 65 हजार चौसर फुट जागेवर केंद्राचे बांधकाम करण्यात आले. बांधकामात कला व विज्ञानाचा संयोग करण्यात आला आहे. या केंद्रात युवकांना क्लाउड, एआय आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दूरसंचार, बॅंकींग, रिटेल, एअरोस्पेस, वाहन, लॅाजिस्टिक, उत्पादन आदी विविध क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

०००

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...