सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 977

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कामा रुग्णालयाचे डॉ.तुषार पालवे यांची मुलाखत

मुंबई, दि. 20 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या विषयावर कामा रुग्णालयाचे अधीक्षक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

आजची बालके हे उद्याचे भविष्य आहेत. बालकांचे आरोग्य सुदृढ असावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य हा कार्यक्रम काय आहे, राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे, राज्यातील किती मुलांची या कार्यक्रमांतर्गत तपासणी आणि उपचार करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती डॉ. पालवे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

दिलखुलास कार्यक्रमातून डॉ.पालवे यांची मुलाखत उद्या मंगळवार दि. 21, बुधवार दि. 22, गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

विदर्भात २२२ धान खरेदी केंद्रे सुरू

मुंबई, दि. 20 : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत 51 तर आदिवासी विकास महामंडळाची 171 अशी एकूण 222 धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते. आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहीत केलेल्या दर्जाच्या धानाची तसेच भरडधान्याची (ज्वारी, बाजरी, मका व रागी खरेदी करण्यात येते.

महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची “नोडल एजन्सी” म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते, तर भारतीय अन्न महामंडळाच्यावतीने राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई (बिगर आदिवासी क्षेत्रात) व  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक (आदिवासी क्षेत्रात) या दोन अभिकर्ता संस्थांमार्फत करण्यात येते.

पणन हंगाम २०२३-२४ मधील धान तसेच भरडधान्य यांची खरेदी करण्याबाबत दि.०९ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार दि.०९ नोव्हेंबर २०२३ पासून धान खरेदी करण्याच्या तसेच दि.०१ डिसेंबर २०२३ पासून भरडधान्य खरेदी करण्याच्या सूचना आहेत.

धान खरेदीकरिता विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांचा अभिकर्ता संस्थानिहाय तपशील पुढीलप्रमाणे  आहे-

यामध्ये गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनचे 31, तर आदिवासी विकास महामंडळाची 36 खरेदी केंद्रे आहेत. भंडारा मध्ये मार्केटिंग फेडरेशनचे 20, गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची 90, तर चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची 35 आणि नागपूरमध्ये 2, तर अमरावती जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची 8 अशा प्रकारे विदर्भात प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत एकूण 51, तर आदिवासी विकास महामंडळाची एकूण 171 अशी  विदर्भात एकूण 222 धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार

भंडारा, दि. 20 : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस मैदान, भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी ही घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, माजी मंत्री परिणय फुके, माजी खासदार शिशुपाल पटले,  मधुकर कुकडे, माजी आमदार नानाभाऊ पंचबुद्धे, चरण वाघमारे, विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते.

धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावाअशी विनंती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केली होती. त्यानुसार नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान जलदगतीने खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

सध्या शेत ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता यावीत्यासाठी भंडारा जिल्ह्यात पीक पाहणीच्या कार्यक्रमास 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली. समृध्दी महामार्गाचा भंडारागोंदियागडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या मार्गाच्या डीपीआरचे काम गतीने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 भंडारा जिल्हा नैसर्गिक वैविध्यता लाभलेला जिल्हा आहे. पर्यटनवाढीला या जिल्ह्यात मोठी संधी आहे. जिल्ह्यात पितळ उद्योग क्लस्टर उभारण्याची मागणी होत आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग वाढीसाठी आवश्यक त्या बाबी करण्यास शासन कटीबद्ध आहे. सर्वसामान्य गरीब लाभार्थ्यांना त्यांच्या दारी जावून योजना बहाल करण्याचा हा कार्यक्रम असून राज्यात 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना कार्यक्रमाने थेट लाभ मिळवून दिला आहे.

सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे केली जात आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण केवळ एक रुपया भरून पीकविम्याचा लाभ देण्याची योजना सुरु केली. लाखो शेतकऱ्यांच्या पिकाला या योजनेने संरक्षण दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरु केली. केंद्र शासनाने 6 हजार आणि राज्य शासनाच्या योजनेचे 6 हजार असे 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जात आहेत. अशा प्रकारची योजना राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्तांना चांगली मदत देता यावी म्हणून एनडीआरएफचे नियम बाजूला ठेऊन अधिक मदत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला. पूरबाधित कुटुंबांना 10 हजार रुपये भरपाई देण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान आपण नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणले. सर्वसामान्य गरीब कुटुंबांना शस्त्रक्रिया, उपचारांसाठी दिलासा देण्याकरीता महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना भाड्यात 50 टक्के सवलत, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपुर्ण मोफत प्रवास असे विविध जनकल्याणकारी निर्णय घेतले. येत्या काळात सर्वसामान्य नागरिक, लाभार्थ्यांना आपल्या कामासाठी शासकीय कार्यालयात जावे लागणार नाही. घरबसल्या सर्व सुविधा त्यांना मिळतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसाला 12 तास वीज देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. आगामी काळात कृषी फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शासकीय योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. भंडारा हा तलाव, जंगल, वने तसेच धानाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. राज्याने शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया भरून सुरु केलेल्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेत पहिल्याच वर्षी 1 कोटी 66 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारी ही योजना ठरली आहे.

शासनाने अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनिसांचे मानधन वाढविले. पोलिस पाटलांच्या मानधन वाढीचा देखील विचार सुरु आहे. शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम वाढविली. ओबीसी घटकांकरीता मोदी आवास योजना सुरु केली असून ओबीसीसाठी 10 लाख, तर अनुसूचित जाती, जमातीसाठी 5 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वसामान्यांना घर मिळाले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे.

भंडारा जिल्ह्यात अंभोरा येथे 352 कोटी रुपयांचा  जल पर्यटन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटनासह रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. गोसीखुर्द राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र शासनाने देखील या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला आहे. 2024 च्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देऊ, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

एक हजार 954 कोटींच्या अग्रिमाचे वाटप – उपमुख्यमंत्री अजित पवार

यावर्षीपासून महत्वाकांक्षी सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरु केली. योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यभर अग्रीम रक्कमेचे वाटप केले जात आहे. नुकसान भरपाईसाठी 47 लाख 63 हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली असून आतापर्यंत 1 हजार 954 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी यावर्षी पहिल्यांदाच 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शून्य टक्के व्याजाने पीककर्ज, पूरग्रस्तांना दुपटीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकऱ्यांनी धानासोबतच नगदी पिके देखील घेतली पाहिजेत. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी होती, ती पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढून महाविद्यालयाचे बांधकाम सुरु केले जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

पालकमंत्री डॉ. गावित यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून जिल्ह्यातील 50 ते 60 टक्के लाभार्थ्यांना प्रत्यक्षअप्रत्यक्ष लाभ देण्यात आला असल्याचे सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटनवाढीला संधी आहे. त्याला गती मिळणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला गती मिळावीअसे ते म्हणाले.

प्रास्ताविक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. शासन आपल्या दारी अभियान कालावधीत जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 756 लाभार्थ्यांना विविध विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 304 कोटी रुपये ईतकी आहे. एकट्या महसूल विभागाने या कालावधीत 99 हजार दाखल्यांचे वितरण केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॅा.अमोल शिंदे यांनी शासन आपल्या दारी अभियानाची भूमिका व फलनिष्पत्ती याबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी प्रास्ताविक केले. ‘शासन आपल्या दारी’ अभियान कालावधीत जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 756 लाभार्थ्यांना विविध विभागांच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 304 कोटी रुपये एवढी आहे. एकट्या महसूल विभागाने या कालावधीत 99 हजार दाखल्यांचे वितरण केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॅा.अमोल शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची भूमिका व फलनिष्पत्ती याबाबत माहिती दिली.

सुरुवातीस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रिमोटची कळ दाबून शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी विविध योजनेच्या 27 लाभार्थ्यांना विविध लाभांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील 168 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध नामांकित कंपन्यांच्यावतीने त्यांच्याकडील रिक्त 1 हजार 500 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या निवडक उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागाचे स्टॅाल लावण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांना निवेदन, तक्रार, म्हणणे सादर करता यावे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने स्वतंत्र दालन लावण्यात आले. रोजगार मेळाव्यात अनेक युवकांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थ्यांना नाश्ता, पाणी, भोजन व प्रवासाची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने विनामूल्य करण्यात आली होती. कार्यक्रमास आलेल्या लाभार्थ्यांना प्रदर्शनस्थळी विविध योजनांची माहिती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुर्तकोटी यांनी आभार मानले.

0000000

 

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबई दि. २० : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मोहिमेदरम्यान २१ ते २४ नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) कल्याण पांढरे यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे १९४८ पूर्वीचे तसेच १९४८ ते १३ ऑक्टोबर १९६७ या कालावधीतील कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावे, वंशावळ, शैक्षणिक व महसुली पुरावे, जुन्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास अशा नागरिकांकडून याबाबतचे उपलब्ध अभिलेख मुंबई जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावरील नियोजन भवन येथे २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विशेष कक्षात स्वीकारले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री. पांढरे यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी ०२२-२२६६४२३८ किंवा gadmumbaicity@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

०००

‘बाल स्नेही’ पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा

मुंबई, दि.२० : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), होप फोर चिल्ड्रन इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

हा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉइंट, मुंबई येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत.

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा राज्यस्तरीय बाल हक्क संरक्षण अधिनियमान्वये स्थापित आयोग आहे. बाल हक्काच्या संरक्षणाची जपणूक, प्रचार व प्रसार हा आयोगाचा उद्देश आहे. राज्यात बालकांचा सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा, आरोग्य इ. अनेक महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल संरक्षण कक्ष, विशेष बाल पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, बालगृह, बाल कल्याण समिती इ. प्रशासकीय यंत्रणा व संस्था या सकारात्मक पद्धतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेत, अशा व्यक्ती व संस्थांना “बाल स्नेही” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्यात अशाप्रकारे बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांकरिता बालस्नेही पुरस्कार सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेतलेले व सद्य:स्थितीत विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या एकूण ७५ तरुण – तरुणींचा सत्कार करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (ठाणे) महेंद्र गायकवाड, मुंबई शहरचे बी. एच. नागरगोजे उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ आखणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 मुंबई, दि. २० : चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ राज्यात तयार करण्यात येत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

कुलाबा येथील बेस्ट भवन येथे ‘अर्पण’  स्वयंसेवी संस्था आणि बेस्टच्या  माध्यमातून १८ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियान’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी  मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल, अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या रोजच्या प्रवासादरम्यान बालकांना येणारे वाईट अनुभव कसे टाळता येवू शकतात यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हा जनजागृतीपर चांगला उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमातून लहान मुलांना चांगले आणि वाईट स्पर्श याची माहिती द्यावी. बेस्ट बरोबर परिवहन विभाग, शिक्षण विभागामार्फत बालकांचे हक्क आणि सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवावे. बालकांना लहानपणापासूनच लैंगिक शिक्षणासंदर्भात माहिती झाली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. आम्ही नागरिकांसाठी मुंबईची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. हा उपक्रम म्हणजे आमच्या मुलांचे सुरक्षित भविष्य संरक्षित करण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीची साक्ष आहे असेही मंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

महाव्यवस्थापक विजय सिंगल म्हणाले की, बेस्ट बसमधील प्रवास सर्वांसाठी, विशेषतः आमच्या सर्वात छोट्या प्रवाश्यांसाठी सुरक्षित अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. अर्पण सोबत, आम्ही जागरूकता वाढवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी आणि शहरातील मुलांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी  काम करत राहू अशी ग्वाही श्री. सिंगल यांनी दिली.”

अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया यांनी बेस्टच्या  माध्यमातून 18 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी बेस्टच्या बसेसमधून लहान मुलांच्या सुरक्षा आणि अत्याचार जनजागृतीपर पोस्टरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : औद्योगिक विकास घडल्यास परिसराचा आर्थिक विकास होतो. नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना मिळते. त्यासाठी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यामुळे मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ते होण्यासाठी औद्योगिक पायाभूत सुविधा धोरणांतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

सांगली मिरज एमआयडीसीमधील रस्ते कामासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, महानगरपालिकेचे अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वित्त अधिकारी सुशील केंबळे, सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय अराणके आणि अतुल पाटील, व्यवस्थापक गणेश निकम तसेच अन्य पदाधिकारी आदि उपस्थित होते.

मिरज एमआयडीसी महानगरपालिका क्षेत्रात आहे. या क्षेत्रात एकूण 11.53 कि.मी.चे रस्ते असून यामध्ये 8.75 किमी मुख्य रस्ता व 2.78 किमी अंतर्गत रस्ते आहेत. सद्यस्थितीत या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमिवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज एमआयडीसीमधील रस्ते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक संबंधित विभागांनी प्राधान्याने आणि तात्काळ करावे. तसेच समांतरपणे अन्य प्रशासकीय प्रक्रिया प्राथम्याने आठवड्याच्या कालमर्यादेत पूर्ण करावी. रस्त्यांसाठी आवश्यक एकूण निधीच्या २५ टक्केअंतर्गत रक्कम स्वनिधीमधून एमआयडीसीतील उद्योजकांनी करापोटीचा महसूल म्हणून महानगपालिकेकडे जमा करावी. उर्वरित निधी नगरोत्थानमधून देण्यात येईल. उर्वरित ७५ टक्के रकमेसाठी औद्योगिक पायाभूत सुविधा धोरण अंतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हे रस्ते काम होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे उद्योजकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम दर्जेदारपणे करावे, अशा सूचना डॉ. खाडे  यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व आयुक्त सुनील पवार यांनी आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीसंदर्भात विचार मांडले. उद्योजकांनी त्यांचे मत मांडले.

तोरणमाळ म्हणजे पर्यटनाच्या अमर्याद संधी

नंदुरबार, दिनांक १९ महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण ही तोरणमाळची ओळख आहेच, परंतु त्यापलीकडे निसर्गसौंदर्य, इतिहास,  आदिवासी संस्कृती, निसर्गोपचारासह साहसी क्रीडा पर्यटन यासारख्या वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या येथे मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य रतिलाल नाईक,  तोरणमाळचे सरपंच इंदुबाई चौधरी, नगरसेवक संतोष वसईकर, पर्यटन संचालनालयाच्य उपसंचालिका मधुमती सरदेसाई,  कृषी पर्यटन तज्ञ पांडुरंग तावरे, नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे, ‘माविम’ च्या वरिष्ठ अधिकारी कांता बनकर, धडगावचे सुभाष पावरा, पर्यटन संचालनालयाचे कल्पेश पाडवी तसेच तोरणमाळ भागातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, तोरणमाळ या पर्यटन तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून पूर्वीपासूनच शासनाचे प्रयत्न राहिले आहेत आणि आता विद्यमान स्थितीतदेखील या दुर्गम भागातील बचत गटांना त्याच दृष्टिकोनातून प्रोत्साहन देणे सुरू आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रस्ते जोड योजना राबवणार आहे. तोरणमाळपासून ते शेवटच्या टोकावरील भादल गावापर्यंत वीज पोहोचावी म्हणून ३३ केवी उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर तोरणमाळ भागातील विविध विकास कामांसाठी ४०० कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी २०० कोटी रुपये येत्या काही दिवसात प्राप्त होतील आणि त्यातून विविध कामे सुरू झालेली दिसतील; अशी माहिती देऊन आदिवासी विकास मंत्री डॉ.  विजयकुमार गावित यांनी तोरणमाळच्या पर्यटन विकासाला भरभक्कम चालना देणार असल्याची ग्वाही दिली.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ सर्वत्र ओळखले जाते. आता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बिरसा मुंडा रस्ते जोड योजना राबवली जात आहे आणि त्यामुळे तोरणमाळ परिसरातील सर्व दुर्गम पाडे पर्यटनाच्या दृष्टीने संपर्कात येतील. या भागातील उंच शिखर जोडणारे झुलते पूल करावे, डंकी जम्पिंग ची व्यवस्था करावी,  तोरणमाळ भागात बोटिंग व्यवसाय विकसित करावा अशा विविध कामांना चालना दिली तर पर्यटन वाढू शकते. त्यादृष्टीने आपला सतत प्रयत्न राहणार आहे. विद्यमान स्थितीत या भागातील लोकांच्या घरात वीज पोहोचावी म्हणून ३३ केवीचे  उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून येथील बचत गटांना केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून चालना देऊन प्रक्रिया उद्योग विकसित केले जातील,  असे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला तोरणमाळ पर्यटन महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई यांनी आपल्या भाषणातून विषद केली. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात कृषीतज्ञ पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाची सविस्तर माहिती दिली.

विविध प्रकारचे आदिवासी नृत्य सादर करणारे पथक,  त्या भागात पर्यटनाला आलेले एक दांपत्य, स्ट्रॉबेरी सारखे निराळे कृषी प्रयोग राबवणारे शेतकरी आणि अन्य यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री डॉ.  गावित यांनी यावेळी प्रदर्शित प्रत्येकदालनाला भेट देऊन स्टॉल धारक बचत गटाच्या महिलांशी संवाद साधत विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग आणि प्रकल्प कसा विकसित करता येईल याचे मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या नागपूरच्या मिनीगोल्फ खेळाडूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

नागपूर दि. 19 : पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिनीगोल्फ या खेळात सुवर्णपदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर,  सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.

इंडियन ऑलिंपिक असोसिएशन, भारत सरकार, गोवा ऑलिंपिक असोसिएशन व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मिनीगोल्फ या खेळाचे आयोजन गोव्याच्या पणजी शहरात मीरामार बीच येथे करण्यात आले.

माजी महापौर संदीप जोशी, रितेश गावंडे,  साहेबराव इंगळे, दिलीप दिवे, रमेश शिंगारे व अजय हिवरकर आदी सामाजिक कार्यकर्ते खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी उपस्थित होते.

भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.19(जिमाका) :- आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा आहे. देशाची शान असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या “महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड, वर्तकनगर, ठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायिका संगीतकार श्रीमती उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्रीमती मीना खडीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, ठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, राजू मिश्रा, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्व युगांप्रमाणे ‘लता युग’ हे अविस्मरणीय आहे. त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लतादीदींची गाणी सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. राम मराठे, पी.सावळाराम, श्रीनिवास खळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) गायन-संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल.

ठाण्यातील इतर विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास होत आहे. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर सुशोभीकरण, स्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरु केले जाणार आहे. जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून 50 कोटी रूपये निधी दिला आहे. ‘वापरा आणि फेका’ ही आपली संस्कृती नाही. जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते, मी त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो, त्यांच्या विचारधारेवरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ या जागतिक समस्येवर  मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असून ‘अर्बन फॉरेस्ट’ ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीने, झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे, याची पूर्ण जाणीव असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या साथीने सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहोत. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू करण्यात आले असून नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे, शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठीच काम केले जाईल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना विशेष भेट दिली. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ठाण्याचे बदलते रूप पाहून मनापासून आनंद होत आहे. या ठाण्याला साजेशी अशी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) ची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे व आसपासच्या परिसरातील सर्वच वयोगटातील गायन-संगीतप्रेमींनी घ्यावा. हे संगीत विद्यालय चालविण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

श्री. सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सुरु असलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. या विकासकामांसाठी भरघोस निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले.

त्यापूर्वी, पोखरण रोड नं. 01 येथील सिंघानिया शाळेसमोरील 3.75 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात, अमृत 2.0 योजनेंतर्गत वर्तकनगर-लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील 200 कोटी रुपये मूल्य असलेला पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, खर्चाची रक्कम 50 कोटी रुपये असलेल्या शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. याबरोबरच वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचे सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणी (मूल्य 20 कोटी), ओवळा-माजिवडा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण (मूल्य 50 कोटी), मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फूटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणे (मूल्य 25 कोटी) या कामांचाही ऑनलाईन शुभारंभ मुख्य सोहळ्यात झाला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...