रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 972

विशेष लेख_योजना ‘सारथी’च्या….

राज्यातील मराठाकुणबीमराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिकशैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शाहू विचारांना देऊया गतीसाधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमालेचा हा चौथा भाग…

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट किंवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पीएच.डी. प्रवेश परीक्षेतून सूट देण्यात येते. या परीक्षांचे महत्व लक्षात घेवून ‘सारथी’मार्फत राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील लक्षित गटातील उमेदवारांना सेट, नेट स्पर्धा परीक्षापूर्व निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे.

सेट स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी दरवर्षी एक हजार उमेदवारांची निवड करण्यात येते, तसेच नेट स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठीही दरवर्षी एक हजार उमेदवारांची निवड करण्यात येते. या प्रशिक्षणाचा कालावधीत 4 महिन्यांचा असून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणासोबत दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क हे सारथी संस्थेमार्फत पॅनेलवरील प्रशिक्षण संस्थेस अदा करण्यात येते. सद्यस्थितीत पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील सारथी संस्थेच्या पॅनेलवरील प्रशिक्षण संस्थेमार्फत सेट स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. त्याच्याकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचा दाखला असावा. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा तसेच सेट, नेट परीक्षा देण्यासाठी पात्र असावा. त्याच्याकडे शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडून जाहिरातीद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.

प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची संधी

सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या सेट, नेट स्पर्धा परीक्षापूर्व निःशुल्क प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. https://sarthi-maharashtragov.in/  या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

तानाजी घोलप, माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

*****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंहपूर येथे घेतले श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन

पुणे, दि. 23: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृरसिंहाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर समितीचे  विश्वस्त मंडळ, मंदिराचे मुख्य पुजारी विलास रामचंद्र दंडवते, पुजारी मंडळाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष श्रीकांत दंडवते, प्रसाद दंडवते, कमलेश डिंगरी तसेच ग्रामपंचायत नीरा नरसिंहपूरचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कुलदैवत असल्यामुळे श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्यासाठी वारंवार येत असतो. मध्यंतरी बराच कालावधी गेल्यामुळे दर्शनाची ओढ होती. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठूरायाच्या चरणी पूजेचा योग आला आणि इथेही श्री लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनाचा योग आला. त्यामुळे येथे दर्शन घेऊन आनंद झाला, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस  यावेळी म्हणाले.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने पुजारी आणि विश्वस्तांनी पुणेरी पगडी घालून उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

0000

बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी व समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलाचरणी साकडे

पंढरपूर, (उ. मा. का.) दि. 23:- बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सर्वश्री राणा जगजितसिंह पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी,  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भागवत धर्माची पताका पिढ्यानुपिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहे. कितीही आक्रमणे झाली, संकटे आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही, त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली.  महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवले. अनेक पिढ्या बदलल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही, असे त्यांनी सांगितले.

मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन करण्यात येतील. विस्थापित व्हावे लागणार नाही तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. चंद्रभागा नदी अविरत पणे वाहत राहिली पाहिजे यासाठी नदी संवर्धनाचे सर्व उपाययोजना करण्यात येतील. नदी स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी नदी पात्रात नदी काठावरील सर्व गावातून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यात्रा कालावधीत जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा बद्दल त्यांनी कौतुक केले.

नाशिक जिल्ह्यातील श्री. बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला बबन घुगे ठरले मानाचे वारकरी

कार्तिकी एकादशी यात्रा 2023 निमित्त गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर  2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आलेली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी श्री. बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला.

प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी व उपस्थित सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले. कार्तिकी यात्रा निमित्त शासन व प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा बाबत आभार मानले. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किमान 12 तास लागत होते तर योग्य नियोजन करून कार्तिकी यात्रेला हा कालावधी आठ ते नऊ तासापर्यंत आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मंदिर समितीच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज यांनी आभार मानले.

0000

सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि.२२: राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

६५ एकर परिसर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

श्री. फडणवीस म्हणाले, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याकरीता ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. १४ वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व्यवस्था करीत आहोत. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत राज्यातील दोन ते अडीच लाख गृहभेटी देऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. महिलांना आजार होऊच नये याकरीता प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सामान्य नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांवर ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर राज्यातही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करुन, कुठलीही अट न ठेवता राज्यातील नागरिकांनाही ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभागाच्यावतीने ‘आरोग्याचा अधिकार’ (राईट टू हेल्थ) कायदा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा कायदा तयार झाल्यानंतर सामान्य नागरिकाला कायदेशीररित्या आरोग्य सेवा देणे बंधनकारक होईल.

महाआरोग्य शिबिराचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक येत असतात. त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सदरचे महाशिबीर पार पडल्यानंतर एक ‘महारेकॉर्ड’ तयार झाला. त्यामध्ये सुमारे ११ लाख रुग्णांनी विविध तपासण्या करत उपचार प्राप्त करुन घेतले. ज्या रुग्णांना पुढचे उपचार आवश्यक होते, त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित या महाशिबिरात आजपर्यंत सुमारे ४२ हजार रुग्णांनी लाभ घेतला. गरजू रुग्णांवर उपचार देण्यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली असून याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे  सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त येणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अतिशय कमी कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  आषाढी एकादशी यात्रेनिमित आयोजित महाआरोग्य शिबिरात ११ लाख ५० हजार रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. या ठिकाणी तपासणीअंती गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर पुढील योग्य ते उपचार राज्य शासनाच्या दवाखान्यात  मोफत करण्यात येत आहेत.

या महाशिबिरात अतिदक्षता विभाग, आपला दवाखाना तीनची निर्मिती, परिसरात १२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६० सुसज्ज रुगणवाहिका, २ हजार ९०० कर्मचारी, रुग्णाचे नियोजन करण्यासाठी वार रुम कार्यान्वित करण्यात आली आहे.  वारकऱ्यांना महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या सेवा एकाच छताखाली मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी २२, २३ व २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांनी या शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २२ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मोफत उपचार संकल्पनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यांनी बाह्य  व अंतर्रुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढला आहे.

देशाचे प्रधानमंत्री यांनी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन  डॉलरवर नेण्याकरिता राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ असले पाहिजे. त्यादृष्टीने येत्या अधिवेशनात ‘राईट टू हेल्थ’ विधेयक मांडण्याच्या मानस केला आहे. येत्या काळात राज्याचे आरोग्य खाते देशात क्रमांक एकवर नेऊ, असा संकल्प डॉ. सावंत यांनी केला.

दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय

शासकीय नोकऱ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली

स्वाधारच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करणार

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. 22 : राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवण्यासह स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करावी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या दिव्यांगांना  संधी मिळावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची प्रणाली सुरु करावी, असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.  सर्वच शासकीय विभागांनी दिव्यांगांचे विषय गांभीर्याने घेऊन त्यांच्यासाठी असलेल्या योजना, कार्यक्रम गरजूंपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा, यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत राज्यातील दिव्यांगांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगांच्या दारी अभियान राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचेसह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासकीय नोकऱ्यांमधील दिव्यांगांच्या आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देतानाच विभागनिहाय अनुशेषाची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मूकबधीर दिव्यांग व्यक्तींना वाहन परवाने देण्यासाठी नियमात दुरुस्ती आवश्यक असून त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची कार्यवाही करावी. दिव्यांगांच्या विविध प्रकारातील पदवीधरांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

कंत्राटी पदभरतीत दिव्यांगांना आरक्षण; सर्व विभागांनी अंमलबजावणी करावी

शासकीय विभागांमध्ये मानधनावरील कंत्राटी पदे भरताना दिव्यांगांना त्यात आरक्षण देण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. दहावी-बारावीमधील दिव्यांग विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये प्रवेश आहे त्याच ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याच्या नियमाची अंमलबजावणी करावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्हा, तालुका, मोठ्या शहरांमध्ये रहदारीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी गटई कामगारांप्रमाणे दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल्स देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिकासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन द्यावे

अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेत लेखनिकाचा पर्याय दिला जातो, लेखनिक मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुयोग्य पर्याय उपलब्ध करुन देण्याची गरज आहे, त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने अशी प्रणाली तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. सर्व शासकीय, निमशासकीय विभागाची संकेतस्थळे, मोबाईल ॲप आणि डिजिटल कागदपत्रे हे दिव्यांगांसाठीच्या मानकांप्रमाणे सुलभ होतील, याकडे विभागांनी लक्ष देण्याच्या सूचनाही  मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

दिव्यांगांना देण्यात येणारे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे आणि पोस्टल बॅंकेद्वारे देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असून यामुळे हे अर्थसहाय्य लवकर, वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. गाव पातळीपर्यंत दिव्यांगांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी विशेष अभियान घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

अपंगत्व निर्माण होणार नाही यासाठी आणि असलेले अपंगत्वाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच दिव्यांगांचे पुनर्वसनाचे काम करणे आवश्यक असून यासाठी इतर देशांमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

महा आवास अभियानाचा उद्या २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई दि. 22 : राष्ट्रीय आवास दिनानिमित्त  31 मार्च 2024 पर्यंत “महा आवास अभियान 2023-24” राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महा आवास अभियान पुरस्कार वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत 23 नोव्हेंबर, 2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.

राज्यात राबविण्यात येणाऱ्या  “महा आवास अभियान 2023-24” या अभियानामुळे 10 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

“सर्वांसाठी घरे-2024” या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढविणे हा या अभियानाचा हेतू आहे.

या अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे,  सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, बहुमजली इमारती, गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे, डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणे, इ. 10 उपक्रम राबविण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी केले.

विविध विभागाचे मंत्री, सचिव  व राज्यस्तरीय वरीष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

०००

श्री. राजू धोत्रे/विसंअ/

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई दि. 22 : महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांना प्रशासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर यांनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, अनुयायांकरीता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा, परिसर स्वच्छता, सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, भोजन व्यवस्था, अतिरिक्त एसटी बस व्यवस्था याबाबत आढावा घेतला. आरोग्य विभागातर्फे देखील आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत श्री.कल्याणकर यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कोकण विभागीय महसूल उपायुक्त विवेक गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्यावतीने श्री. कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या.

******

शैलजा पाटील/विसंअ/

 

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

            मुंबईदि. 22 (रानिआ) : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावाअसे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

            राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिकतसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. या खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर ॲपद्वारेच सादर करणे बंधनकारक आहेपरंतु, पोटनिवडणुकांत बिनविरोध विजयी झालेल्यांसह सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीने सादर करता येईलअसेही आयोगाच्या  प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

०-०-०

(Jagdish More, SEC)

सहकार महर्षी सुधाकर पंत परिचारक यांच्या सहकार क्षेत्रातील भरीव योगदानामुळे सर्वसामान्यांची प्रगती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

पंढरपूर दिनांक 22:- सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेले होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळेच या भागातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक प्रगती झालेली आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना च्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत ,समाधान आवताडे, राम सातपुते, सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री विजय देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, सहकार महर्षी सुधाकर पंत परिचारक यांनी सहकार उद्योग मोठा केला असून त्यांच्याकडे समाजाभिमुख नेतृत्व होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे आमचं भाग्य आहे असे  गौरवउद्गारही त्यांनी काढले. त्यांनी या भागात सहकार क्षेत्रातून केलेल्या कामामुळे अनेक लोकांची आर्थिक प्रगती झालेली आहे. सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार क्षेत्राचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर केला असे त्यांनी सांगितले.

पांडुरंग सहकारी साखर कारखाना वाखरी पासून 30 किलोमीटर  अंतरावर आहे. सभासदांची गैरसोय लक्षात घेता सभासदांना कारखान्याच्या सुविधा मेळाव्यात यासाठी वाखरी येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते फीत कापून कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

0000

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम महत्त्वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दिनांक 22:- वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा नाश होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस त्यातून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्याप्रमाणेच शहरी भागातही पाणी साचत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात येतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण विभागाच्या वतीने आयोजित कार्तिकी वारी पंढरीच्या दारी शिक्षणाचे धडे देईल घरोघरी या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला जात असून यातून तरुण वर्ग, विद्यार्थी व समाजातील अनेक घटकापर्यंत पर्यावरण जनजागृतीचा संदेश पोहोचवला जात आहे. आपल्या संतांनी ही  पर्यावरणाचे महत्त्व विशद केलेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पासून ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजापर्यंत सर्वांनी व्यक्ती सोबतच निसर्गाचा व पर्यावरणाचा विचार मांडलेले आहेत. निसर्गाचा घडलेला समतोल व्यवस्थित होण्यासाठी पर्यावरण जागृती सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच पर्यावरण संवर्धनाचे शिक्षण शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

प्रारंभी पर्यावरणाच्या दिंडीने हरिनामाचा गजर करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील , आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरला. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक व  पालकमंत्री यांच्या सोबत फडणवीस यांनीही फुगडी खेळली. आणि ज्ञानोबा तुकाराम , जय जय राम कृष्ण हरी असा गजर करत वारकरी भक्तांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले.

यावेळी  ह.भ.प पुर्वा काणे , संगीत नाटक अकादमी विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाडी, झी मराठी फेम शाहिर देवानंद माळी हे लोककलावंत त्यांच्या पथकासह सहभागी झाले होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, आयोजित ”कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी”या उपक्रमाची संकल्पना

 पंढरपूरच्या वारीला शतकानुशतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी साजरी होणारी आषाढ वारी आणि कार्तिक महिन्याच्या एकादशीला साजरी होणारी कार्तिकी वारी ही वारकरी संप्रदायासाठी आनंदाची पर्वणी असते. संपूर्ण विश्वात सातशे वर्षाहूनही अधिक काळ वारकरी संप्रदायाची ही वारी दिवसेंदिवस लोकाभिमुख चळवळ म्हणून वृध्दींगत होत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या उपक्रमाचे आयोजन कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात किर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.  या उपक्रमात प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळा,  विजेची बचत (सिएफएल बल्बचा वापर करा) पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन करा, प्लास्टीकचा वापर टाळा, वृक्षतोड टाळा, सेंद्रिय खताचा वापर करुन शेती करा, घरातील प्रत्येक माणसाने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा सुका कचरा  वेगळा करुन ओल्या कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोक कलांच्या माध्यमातून केली जात असते.  वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला  लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नविन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत आहे.

000

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...