रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 971

राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. २३ : राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत आपणांस भेटावयास येतात. त्यातील काहींना  तर हिंदी भाषा देखील अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा विभाग  कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. हिंदी चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री नेहमी इंग्रजीतच बोलतात; हिंदी भाषेत बोलण्यास कचरतात, हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचे उदघाटन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अणुशक्ती भवन, तुर्भे मुंबई येथे गुरुवारी (दि. २३) झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध केंद्रीय संघटना, बँक व उपक्रमांना २०२२- २३ वर्षाचे क्षेत्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, राजभाषा विभागातील सचिव अंशुली आर्य, राजभाषा सहसचिव डॉ. मीनाक्षी जौली, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भुवनचंद्र पाठक तसेच राजभाषा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, निमंत्रित उपस्थित होते.

अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना घरी देखील इंग्रजीतूनच संवाद करण्याचे सांगतात.  हिंदी किंवा मराठी भाषेत बोलणाऱ्याकडे हीन दृष्टीने पाहिले जाते. परिणामतः मुले आपल्या मातृभाषेत किंवा हिंदीत बोलण्यास कचरतात, असे राज्यपालांनी सांगितले.

आपण राजभाषा संसदीय समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे, असे नमूद करून जगात भारत एकमात्र देश आहे जेथे आपलीच राष्ट्रभाषा वाचविण्यासाठी समिती नेमावी लागते, असे मत राज्यपालांनी नोंदविले. इस्रायलने हिब्रू भाषा जीवित करुन तिला मातृभाषा बनवले, असे सांगून स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनी देखील हिंदी ही राष्ट्रभाषा न होता राज्यभाषा राहिली, याबद्दल राज्यपालांनी खंत व्यक्त केली.

हिंदी भाषा येत नसेल याचा लोकांना न्यूनगंड येत नाही. परंतु इंग्रजी भाषा येत नसेल तर न्यूनगंड दिसून येतो, असे सांगून देशांतर्गत विमान प्रवासात  हिंदीचा वापर केला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लॉर्ड मेकॉले यांनी देशावर थोपलेली वैचारिक गुलामगिरी जावी व हिंदी भाषा लोकभाषा व्हावी यासाठी हिंदी भाषेत इंग्रजीला पर्यायी असे सोपे शब्द उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

भाषा हा कोणत्याही राष्ट्राचा आणि समाजाचा आत्मा असतो. त्यातून तो देश संवाद साधतो आणि आपल्या भावना व्यक्त करतो. आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या भूदान चळवळीच्या यशाचे श्रेय हिंदीला दिले होते. महात्मा गांधींनी ‘हिंदुस्थानी’ भाषेला सर्वोच्च स्थान दिले, असे सांगून जोपर्यंत लोक आपल्या मातृभाषेत विचार व्यक्त करीत नाहीत, तोवर कोणत्याही देशात स्वतंत्र विचारसरणीचा विकास शक्य होत नाही, असे राज्यपालांनी सांगितले. भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा या ‘राष्ट्रीय भाषा’च आहेत. त्यांच्यामध्ये भाषांमध्ये कोणताही संघर्ष नाही, तर त्या परस्परांना पूरक आहेत, असे श्री. बैस यांनी सांगितले.

सध्याच्या युगात प्रगतीसाठी तांत्रिक, वैज्ञानिक, व्यावसायिक आणि विविध विषयांचे अद्ययावत ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय भाषांमधील उच्च दर्जाच्या लेखनाला तसेच भाषांतराला प्रोत्साहन द्यावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. भाषेचा सर्वोत्तम विकास आणि प्रसार उत्स्फूर्तपणे आणि स्वेच्छेने होतो. त्यामुळे सर्वांनी स्वेच्छेने मातृभाषेला प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

आत्मनिर्भर भाषेचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी काम करावे : अजयकुमार मिश्रा

हिंदी ही राजभाषा होण्यात वैधानिक, शैक्षणिक व व्यावहारिक आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करून सन २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भाषेचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्री. मिश्रा यांनी यावेळी केले.

भारतीय भाषांमध्ये  आपापसात कोणतीही प्रतिस्पर्धा नाही.  केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे हिंदी शब्द सिंधू तयार केला असून आज त्यात ३ लाख ७० हजार शब्द जोडले गेले आहेत. हिंदी भाषेच्या प्रचार – प्रसारासाठी राजभाषा विभागाने ६९ मंत्रालयांच्या समित्यांचे गठन केले आहे, असे त्यांनी सांगितले.

जगात १०० पेक्षा  अधिक देशांमध्ये हिंदी शिकवली जाते. जगात ४८ देशांत ५ कोटी भारतीय लोक आहेत.  हे लोक हिंदीचा प्रचार प्रसार करीत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र दिले आहे. कायद्याची प्रवेश परीक्षा हिंदीतून होत आहे. यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा या सर्व विषयांमध्ये हिंदी व स्थानिक भाषेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी, केंद्रीय विद्यालय संगटन, रायपूर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड भोपाळ, केंद्रीय उत्पाद सीमा शुल्क, जबलपूर, हिंदुस्थान पेट्रोलियम, मनेरी, बँक ऑफ बडोदा, रायपूर, समुद्री उत्पात निर्यात विकास प्राधिकरण, मुंबई, दीपस्तंभ और दीपपोत महानिदेशालय, मुंबई, आयकर आयुक्त कार्यालय, नागपूर, इंडियन ऑइल, वांद्रे, मुंबई, बँक ऑफ बडोदा, मुंबई बँक, समुद्री वाणिज्य विभाग, मोरमुगाव, मौसम विज्ञान केंद्र, पणजी आदींना मध्य व पश्चिम क्षेत्रांचे राजभाषा पुरस्कार देण्यात आले.

००००

शालेय पोषण आहाराची मंत्री केसरकर यांनी घेतली चव

मुंबई, ता. २३ : विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास अनुसरून तज्ज्ञांच्या समितीने सुचविल्यानुसार तयार केलेले पदार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) सायंकाळी स्वत: चाखून बघितले. या पोषक तत्व असलेल्या आणि रूचकर पदार्थांचा लवकरच विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश केला जाणार आहे.

राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याअंतर्गत तज्ज्ञांनी सूचविलेले पदार्थ प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल किचन चालविणाऱ्या महिलांमार्फत तयार करण्यात आले. या पदार्थांचा मंत्री श्री.केसरकर यांच्यासह प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, सहसचिव इम्तियाज काझी, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्यासह तज्ज्ञांच्या समिती सदस्यांनी बुधवारी आस्वाद घेतला.

विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्याबरोबरच आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ द्यावेत, अशा सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोषण आहार ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीतील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली नाचणीच्या वड्या, भगरीचा उपमा, भगरीचा शिरा, भगरीची खीर, मटर पुलाव, सोया पुलाव, गोड पुलाव, अंडा बिर्याणी, मूगडाळ खिचडी, गोड खिचडी, कडधान्य, मसाले भात, तांदळाची खीर, असे विविध पदार्थ तयार करण्यात आले. या पदार्थांपैकी एक मुख्य पदार्थ, एक गोड पदार्थ आणि सलाद देण्यात यावा, अशी मंत्री श्री.केसरकर यांची संकल्पना आहे.

ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या, आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार – मंत्री गिरीश महाजन

महाआवास अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई, दि. २३ : प्रत्येकाच्या आयुष्यात स्वत:चे घर असावे, हे स्वप्न असते. गरीब, समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती यांना, तर घरकुल म्हणजे स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र व राज्य शासन घरकुलांच्या विविध योजना राबविते. या योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाने महाआवास अभियानाचा शुभारंभ केला आहे. महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाआवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व सन 2021-22 चे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयेाजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामसडक योजनेचे सचिव के. पी. पाटील, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे स्वप्न असल्याचे सांगत मंत्री श्री. महाजन म्हणाले की, समाजातील अंत्योदय पर्यंत योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गरिबांना गॅस जोडणी, नळ जोडणी, वीज जोडणी, शौचालयाची सुविधा देण्यात येत आहे. शासन समाजातील शेवटच्या घटकाला पुढे आणण्यासाठी विविध योजना राबविते. या योजनांची अंमलबजावणीची जबाबदारी यंत्रणांची आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य सध्या देण्यात येते. यामध्ये 1 लाख रूपयापर्यंत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच ही मागणीही पूर्ण होणार आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा देण्याचे चांगले काम यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने गंभीरतेने या कामाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे. घरांचे बांधकाम दर्जेदार करावे. केवळ घरकूलच नाही, तर अन्य योजनांचा लाभसुद्धा घरकुल लाभार्थ्याला देण्यात यावा. स्वच्छतेचा संस्कार हा शालेय जीवनापासूनच रुजायला पाहिजे. देशाच्या अर्थव्यवस्थेने 10 व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अधिक काम करावे लागणार आहे.

प्रास्ताविकात प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले की, महाआवास अभियान 20 नोव्हेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जागा नसलेल्या कुटुंबांना घरकुले देण्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी देशात अव्वल आहे. या अभियानाच्या माध्यमातून बांधकाम अपूर्ण असलेली, मंजूर असलेली मात्र बांधकाम सुरू नसलेली घरकुले पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.  महाआवास अभियानाबाबत सादरीकरण राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. दिघे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान अभियान पुस्तिका, मागील वर्षाची अभियान गौरव गाथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अभियानाच्या माहिती पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल मंजुरीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (विकास), ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी,  विभागीय प्रोग्रॅमर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

सन 2021-22 चे महाआवास अभियान पुरस्कार

विभाग : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वोत्कृष्ट विभाग प्रथम नागपूर, द्वितीय नाशिक, तृतीय पुणे, राज्यपुरस्कृत योजनेत कोकण प्रथम, नागपूर द्वितीय, पुणे विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हे :  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम भंडारा, द्वितीय जळगाव व तृतीय गोंदिया हे जिल्हे असून राज्य पुरस्कृत योजनेत सिंधुदुर्ग प्रथम, भंडारा द्वितीय व गडचिरोली तृतीय आहे.

तालुके : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, साकोली जि. भंडारा द्वितीय व गगनबावडा जि. कोल्हापूर तृतीय तसेच राज्य पुरस्कृत योजनेत लाखनी, जि. भंडारा प्रथम, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग द्वितीय व कळवण जि. नाशिक तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे.

ग्रामपंचायत : राज्य पुरस्कृत योजनेत संयुक्त प्रथम क्रमांक लोरे ता. वैभववाडी जि. सिंधुदुर्ग व जिंती ता. पाटण जि. सातारा, द्वितीय क्रमांक खलंग्री ता. रेणापूर जि. लातूर, तृतीय क्रमांक खोलापूर ता. भातकुली जि. अमरावती, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यामध्ये प्रथम क्रमांक निंबर्गी ता. द. सोलापूर, जि. सोलापूर, द्वितीय गोळवण, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग व तृतीय क्रमांक पोही, ता. अंजनगांव सुर्जी, जि. अमरावती.

बहुमजली इमारत या घटकात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये ताडगांव ता. मोहाडी, जि. भंडारा, द्वितीय लोणी बु., ता. रिसोड जि. वाशीम, तृतीय दीपकनगर ता. तुळजापूर जि. धाराशीव तसेच राज्यपुरस्कृत योजनेत प्रथम येरखेडा ता. कामठी, जि. नागपूर, द्वितीय नेवपूर, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर आणि तृतीय क्रमांक गणेशपूर, ता. रिसोड जि. वाशीम या ग्रामपंचायतीने पटकाविला आहे.

सर्वोत्कृष्ट गृहसंकुले या घटकात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम भांबुर्डी, ता. माळशिरस, जि. सेालापूर, द्वितीय मजरा (रै), ता. वरोरा जि. चंद्रपूर, तृतीय बुधला ता. कळमेश्वर जि. नागपूर, राज्यपुरस्कृत योजनेत प्रथम रायताळे, ता. जव्हार जि. पालघर, द्वितीय मोहकळ, ता. खेड जि. पुणे, तृतीय क्रमांक शेंद्रे, ता. जि. सातारा या ग्रामपंचायतीने पटकाविला आहे.

अधिकारी व कर्मचारी यांना विशेष पुरस्कार : राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणमधील राज्य समन्वयक डॉ. संघरत्न सोनवणे, वास्तू विशारद परमेश्वर शेलार, लेखा सहायक अंकिता राऊळ यांना मिळाला आहे.

विभागीय प्रोग्रॅमर पदासाठी मोहेसीन अहमद अयुब अली, जि अमरावती, जिल्हा प्रोग्रॅमर पदासाठी आशिष चकोले, जि. भंडारा, विवेक गोहील, जि. जळगांव, चंद्रकांत पाटील, जि. कोल्हापूर, जिल्हा डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदासाठी प्रफुल्ल मडामे, जि. भंडारा, सुमीत बोरसे, जि. जळगांव, राजेंद्र कवडे जि. कोल्हापूर, तालुका डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदासाठी सानिका चव्हाण ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, हर्षल मेंढे ता. साकोली जि. भंडारा, उमाकांत पडवळ ता. गगनबावडा जि. कोल्हापूर, सतिश पवार ता. पारोळा जि. जळगांव, दीपक शिंगणे ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा, किसन मांजरमकर ता. भोकर जि. नांदेड, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदासाठी राकेश चलाख ता. आरमोरी जि. गडचिरोली, करण पाटील ता. चाळीसगाव जि. जळगांव, भूषण ठाकरे ता. मालेगांव जि. नाशिक, परिक्षित चव्हाण, ता. जत, जि. सांगली, उमेश श्रीरामे, ता. मुखेड, जि. नांदेड, पवन म्हातारमारे, ता. बाळापूर जि. अकोला यांना पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाआवास अभियानातील विविध घटकांसाठी सर्वोत्कृष्ठ जिल्ह्यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.

००००

निलेश तायडे/हेमंतकुमार चव्हाण/ससं/

 

संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना सुरु १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरित

मुंबई, दि. २३ : राज्यातील काही भागात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे संभाव्य टंचाई निवारणार्थ राज्य शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पाणी टंचाई जाणवत असलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकर सुरु असलेल्या जिल्ह्यांना एकूण १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम,२००९ कलम २५व २६ च्या तरतुदीनुसार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा प्राधिकरणास पावसाळ्याच्या कालावधीत किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सल्ल्यानुसार किंवा पावसाचे प्रमाण व स्वरुप आणि पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीची माहिती किंवा अन्य कोणतीही संबंधित बाब लक्षात घेऊन एका वेळी एक जल वर्षापेक्षा अधिक नाही, अशा कालावधीकरीता, अशा क्षेत्रास पाणी टंचाई क्षेत्र म्हणून घोषित करता येते.

जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचे काम प्रगतीपथावर असून टंचाईग्रस्त गावातील योजना तातडीने पूर्ण करण्यात येत आहेत. या योजना पूर्ण झाल्यानंतर पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ पुढील नियोजनासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा टंचाई कालावधी सन 2023-24 तयार करण्याबाबत आवश्यकतेनुसार विविध उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील काही जिल्हयात पाऊस कमी झाल्यामुळे  पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टंचाई अंतर्गत उपाययोजना राबविण्यात येऊन पाणी टंचाई दूर करण्याचे प्रयत्न राज्य शासनामार्फत सुरु करण्यात आले आहेत. तसेच टंचाईग्रस्त भागात मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले जाते.

राज्यातील काही जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील 10 जिल्ह्यातील 355 गावे व 959 वाड्यामध्ये 45 शासकीय व 332 खासगी, अशा एकूण 377 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकर सुरु असलेल्या 10 जिल्ह्यापैकी 08 जिल्ह्यांना एकूण 19.53 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना

प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर पाणी टंचाई (20 लिटर्स/दिन /व्यक्ती पेक्षा कमी) भासण्याची शक्यता असणारी गावे / वाड्या निश्चित करुन संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्याशी विचार विनिमय करुन ऑक्टोंबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून अशा तीन स्वतंत्र तिमाहीसाठी  टंचाई कृती आराखडे तयार करण्यात येतात. टंचाई निवारणाकरीता पुढील अनुज्ञेय उपाययोजनांपैकी योग्य त्या उपाययोजनेची निवड करण्याच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.  बुडक्या घेणे, विहिर खोल करणे, विहिरीतील गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकर / बैलगाडीद्वारे पाणी  पुरवठा करणे, प्रगतीपथावरील पाणी पुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, धरणामध्ये अथवा तलावामध्ये चर खणणे तसेच टँकर मंजुरीचे जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार आवश्यकतेनुसार संबंधित  उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी यांनाही प्रदान करण्यात आले आहे.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयांत ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई, दि. २३ : मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविणारी मुंबई देशातली पहिली महापालिका ठरणार असून त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णतः लोकाभिमुख व निःशुल्क उपलब्ध होतील.

ही योजना राबविण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्‍यात येणाऱ्या औषधे व संसाधने खरेदी प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करण्‍याचे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

मध्यंतरी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी के.ई.एम रुग्‍णालयाला भेट दिली होती. त्यावेळी रुग्ण व नागरिकांशी झालेल्‍या चर्चेदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. महानगरपालिका रुग्‍णालयात उपलब्‍ध औषधे व संसाधनां व्‍यतिरिक्‍त नातेवाईकांमार्फत रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जातो.

गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्‍य उपचारावर होणाऱ्या (आऊट ऑफ पॉकेट एक्‍सपेंडिचर) खर्चामुळे साधारणतः १० टक्‍के नागरिक दारिद्रयरेषेखाली खेचले जातात. राष्‍ट्रीय स्‍तरावर विविध संस्‍थांनी केलेला अभ्‍यास व संशोधनातून निदर्शनास आल्याचे महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्याबाबत महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेमार्फत ४ वैद्यकीय महाविद्यालय, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसुतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. याखेरीज २०२ “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” देखील कार्यरत आहेत. या वैद्यकीय व्यवस्थेतील रुग्‍णालयांमध्ये ७१००, उपनगरीय रुग्णालयामध्ये ४०००, विशेष रुग्णालयात ३००० व इतर अशा एकूण सुमारे १५ हजार रुग्णशय्या आहेत. यामध्ये ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी २० लाख पेक्षा अधिक रुग्ण आंतर रुग्ण सेवेचा लाभ घेतात.

०००

सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र विकसित करण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामास निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २३ : हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र टप्या-टप्याने विकसित करण्यात करावे. पहिल्या टप्प्यात बोटिंग आणि उद्यान विकसित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस आमदार चंद्रकांत नवघरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाचे अवर सचिव मदन सोंडे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, उपस्थित होते. तर हिंगोलीचे  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले की, पर्यटन क्षेत्र विकसित करताना या ठिकाणी होणाऱ्या कामांवर देखभाल, दुरुस्तीचा खर्च मर्यादित असावा.  या बरोबरच कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदारही व्हावीत. सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र विकसित झाल्यास या भागात पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. हे पर्यटन क्षेत्र नांदेड, परभणी, वाशीम जिल्ह्यांना जवळ असल्याने या भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

वास्तूविशारद श्री. कुलकर्णी यांनी सादरीकरणातून सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्रात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.

 

एकनाथ पोवार/ससं/

संविधान दिवस कार्यक्रमात सहभागाचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली, दि. २३ : संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधान संस्थापकांच्या  योगदानाचा  सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय संविधानाचा  स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो.

संविधान दिवस साजरा करताना, संसदीय कामकाज मंत्रालयाने सर्व नागरिकांना संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाईन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात अधिकाधिक सहभाग निश्चित करण्यासाठी मंत्रालयाने दोन वेब पोर्टल्स  कार्यान्वित केले आहेत.

22अधिकृत भाषा आणि इंग्रजीमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे ऑनलाइन वाचनासाठी संकेतस्थळ असे – https://readpreamble.nic.in/  ;

ऑनलाइन प्रश्नमंजुषा  (“भारत: लोकशाहीची  जननी”) :

https://constitutionquiz.nic.in/

पोर्टल्स प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. यात कोणालाही सहभागी होऊन सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. प्राप्त प्रमाणपत्रे #SamvidhanDiwas हॅशटॅग वापरून समाजमाध्यम मंचावर पोस्ट करता येतील.

०००

‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. २३ : मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल 2024 कार्यक्रमाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते. मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक ब्रिंदा मिलेरा, प्रख्यात संगीतकार शमीर टंडन आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, नऊ दिवसीय महोत्सवामध्ये सर्वांना एकत्र आणण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फूड फेस्टिव्हल सादर केले जातील. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे. पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्वसमावेशकता जोपासणे आणि उद्योगात नवीन संधी आणि मार्ग शोधणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.’मुंबई फेस्टिव्हल 2024′ हा केवळ एक कार्यक्रम नाही; हा एक परिवर्तनकारी अनुभव आहे, जो भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महा शॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्ट‍िव्हलमध्ये समावेश आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. महिंद्रा म्हणाले की,  मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील स्टेक होल्डर्स एकत्र येत असून हा फेस्टिव्हल एक वेगळा अनुभव देणारा आहे. या फेस्टिव्हलमुळे मुंबईच्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन होईल. शिवाय सर्व मुंबईकरांना एकत्र आणण्यात या फेस्टिव्हलचा खूप मोठा वाटा असेल. ‘प्रत्येकजण आमंत्रित आहे,’ ही फेस्टिव्हलची संकल्पना अत्यंत समर्पक आहे. मुंबईतील कला, संस्कृती, क्रीडा, फॅशन आणि बरेच काही एकत्र करून अनेक कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होता येणार आहे. हा फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम  नसून रसिकांसाठी हा अवर्णनीय आनंद असेल, असे महिंद्रा म्हणाले.

पर्यटन संचालक डॉ. पाटील म्हणाले की, मुंबईत विविध ठिकाणी मुंबई फेस्टिव्हलचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. इव्हेंट लाइन-अपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्हायब्रंट म्युझिक फेस्ट, महा मुंबई एक्स्पो, मनमोहक सिनेमा, बीच फेस्ट, मुव्ही स्पर्धा आणि रोमांचक क्रिकेट क्लिनिक, स्टार्ट-अप फेस्ट अशा विविध आणि आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. मुंबई वॉक हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईचे गतिचक्र कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या डबेवाला, पोलिस हवालदार, बेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर तसेच सफाई कामगार, सफाई कर्मचारी आदी मुंबईवीरांचा सत्कार करण्यासाठी शहरातील आयकॉन्स एकत्र येतील. राज्य शासनाने विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा. लि. कंपनीकडे मुंबई फेस्टिव्हलचे संकल्पना आणि व्यवस्थापनेची धुरा सोपवली आहे. मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे शॉप ॲण्ड विन फेस्टिव्हल. ज्यामध्ये एकाधिक रिटेल आणि डायनिंग आउटलेट्स तसेच मनोरंजनाच्या संधींचा समावेश असेल. यातील मेगा बक्षिसांमध्ये अनेकांची स्वप्ने सत्यात उतरतील. मुंबई मॅरेथॉन आणि काळा घोडा कला महोत्सव हे मुंबई महोत्सवाचे सहयोगी कार्यक्रम म्हणून भाग आहेत.

मुंबई फेस्टिवल २०२४ च्या घोषणेनंतर मुंबई फेस्टिव्हलचा लोगो, ‘सपनो का गेटवे’ या थीमचे लोकार्पण करण्यात आले, यानंतर संगीतकार श्री. टंडन यांनी रचलेल्या संकल्प गीताचे देखील लोकार्पण केले गेले. गाण्यातून मुंबईची असीमित ऊर्जा आणि विविधतेत नटलेल्या एकतेचे दर्शन घडून येते. चित्रपट आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी मुंबई फेस्टिव्हलच्या गाण्याला हुक स्टेप्स सादर करून ‘संकल्प गीताने’ सादरीकरण केले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

कामगार कल्याण विभागाच्या योजनांच्या लाभामुळे शैक्षणिक स्वप्नपूर्ती

कामगार कल्याण विभागांतर्गत बांधकाम कामगारांसाठी अनेकविध लाभाच्या योजना कार्यान्वित आहेत. त्याचा लाभ अनेक कामगार घेताना दिसत आहेत. त्यापैकीच एक दत्तात्रय मेंडुगले. सांगलीत राहणारे श्री. मेंडुगले हे जवळपास 15 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात वायरिंगचे काम करतात. त्यांना दोन अपत्ये असून अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या मुलाला दोन वेळा प्रत्येकी 60 हजार रूपये तर मुलीला 10 हजार रूपयांचा शैक्षणिक लाभ मिळाला आहे.

श्री. मेंडुगले यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्यासह आई – वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी हे सदस्य आहेत. इलेक्ट्रिशियन बंधुंचे सहाय्यक म्हणून काम करताना दत्तात्रय यांनाही हे काम आवडू लागले. त्यांनी जेव्हा हे काम सुरू केले, त्यानंतर तत्कालिन बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेतल्यामुळे त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यात आली. बांधकाम व्यावसायिकाकडे काम व अन्य घरगुती कामांतून त्यांना महिन्याला साधारण 20 ते 25 हजार रूपयांची आर्थिक प्राप्ती होते. पत्नी शिलाई काम करून संसाराला थोडा फार हातभार लावते.

श्री. मेंडुगले यांनी त्यांच्या मुलाला याच क्षेत्रातील उच्च शिक्षण देण्याचे ठरविले. मुलगा सुदर्शननेही त्याला होकार दर्शवला. मुलानेही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करून डी. के. टी. ई. इचलकरंजी संस्थेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखेला प्रवेश मिळवला. पण, जेमतेम आर्थिक प्राप्तीमध्ये मुलांना उच्च शिक्षण देताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागायची.

दरम्यान, बांधकाम कामगार कार्डच्या नूतनीकरणवेळी कामगार कल्याण व इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कल्याणकारी योजनांबद्दल त्यांना माहिती मिळाली. त्यांनी अर्ज केल्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू. 60,000 अंतर्गत त्यांच्या मुलाला दोन वर्षे लाभ मिळाला. तसेच, नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना इयत्ता 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू. 10,000 या अंतर्गत बारावी सायन्समध्ये  शिकणाऱ्या श्रेया या त्यांच्या मुलीला लाभ मिळाला. यामुळे मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत असताना श्री. मेंडुगले मनापासून कामगार कल्याण विभागाचे आभार मानतात.

याचबरोबर मुले लहान असताना शैक्षणिक साहित्य तसेच शिष्यवृत्तीचा लाभही मिळाला आहे. तसेच, त्यांनाही सेफ्टी जॅकेट, साहित्य ठेवण्यासाठी पेटी असा लाभ मिळाला आहे. एकूणच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून श्री. मेंडुगले यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बाबींचा प्रवेश झाला. त्यामुळे स्थैर्य प्राप्ती आली.

000000

(संकलन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)

वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,दि.23 : वसमत (जि.हिंगोली) शहरातील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारे, बढा तलावाच्या कामाबाबतचे विकास प्रकल्प संबंधित यंत्रणेने समन्वयाने तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयात वसमत शहरातील विविध विकास प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. बैठकीला आमदार चंद्रकांत नवघरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, नगरपरिषद प्रशासनचे संचालक मनोज रानडे यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,वसमत नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशितोष चिंचाळकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, वसमत शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी वाढीव योजनेसाठी 159.61 कोटी रुपये, तर भुयारी गटार योजनेसाठी 191.69 कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिलेला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त करून तातडीने प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा. वसमत शहरातील 28 रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि नाला बांधकामासाठी 108 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

बढा तलावाची भिंत वाहून गेल्याने शहरात पाणी शिरले होते. यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सर्वेक्षण आणि दुरुस्तीचे काम करून घ्यावे. शिवाय जलसंपदा यांत्रिकी विभागाच्या मशिनरी घेऊन तेलाचा खर्च भागवून तलावातील गाळ काढावा. नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरून जलपर्णी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही उपमख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या. वसमत नगरपालिका हद्दीमध्ये अतिक्रमणे असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, त्यामुळे अतिक्रमणे हटवावीत, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्याकडून जिल्ह्यातील दुष्काळ, पीक स्थिती जाणून घेतली. पाणी, चाऱ्याची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, विजेबाबतच्या तक्रारी दूर कराव्यात, पाणी टंचाई भासली तर टॅंकर भरण्याचे स्त्रोत निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.

जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याने राज्य बँकर्स समितीमध्ये त्यांना सूचना देण्यात येतील, असे अपर मुख्य सचिव डॉ. करीर यांनी सांगितले.

००००

धोंडिराम अर्जुन/स.सं

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...