रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 973

जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कामांना मिळाली गती

मुंबई, दि. 22 : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जनतेशी सुसंवाद कार्यक्रमात विनंती केली आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले आहेत. या उमेदवारांनी मंत्री श्री.केसरकर यांचे पत्र पाठवून आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या ‘शासन आपल्या दारी- जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. धाराशीव जिल्ह्यातील नळदुर्गच्या शुभांगी कदम यांनी मंत्री श्री.केसरकर यांना याअनुषंगाने अर्ज दिला होता. आजच्या सुसंवाद कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमात सात अर्जदारांनी आपले अर्ज सादर केले. तर 14 व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजनेतून निवृत्तीवेतन मंजुरीचे प्रमाणपत्र, गौण खनिज उत्खनन परवाने, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. नवीन अर्ज सादर केलेल्यांपैकी एका पालकाची मुलगी तायक्वांदो खेळ प्रकारात राष्ट्रीय पातळीवर खेळली आहे, तथापि, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना खर्च भागविणे शक्य होत नसल्याने त्यांना शासकीय योजनेतून लाभ देण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली. तर दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. एका नागरिकाच्या पुणे जिल्ह्यातील मालमत्तेच्या प्रलंबित असलेल्या मूल्यांकनाबाबत स्वत: मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी प्रश्न तातडीने मार्गी लावला. मंत्री श्री.केसरकर यांनी अन्य अर्जांवर देखील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यात ६०० संस्था होणार ‘सुमन’ संस्था – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 22 : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची ‘सुमन’ संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत. यामध्ये 538 आरोग्य संस्थांची सुमन बेसिक म्हणून, 47 आरोग्य संस्थांची बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रीक ॲण्ड न्यू बॉर्न केअर व 15 आरोग्य संस्थांची कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर या प्रकारात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यातील आरोगय संस्थांची  सुमन संस्था म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा मानस आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुमन संस्थांची संकल्पना मूर्तरुपात आणण्यात येत आहे.  आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. राज्यात 600 संस्था सुमन संस्था म्हणून निवड करण्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमाचे (सुमन) ध्येय हे,  टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व बालमृत्यू, आजार संपुष्टात आणून प्रसूतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त करणे आहे.  सुमन अंतर्गत सर्व लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची 100 टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे व त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ज्ञान, कौशल्य बळकटीकरण करून त्यांच्यामध्ये लाभार्थींच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे, लाभार्थ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे, आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहे.

या कार्यक्रमांतर्गंत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना आवश्यक आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध संसाधनांच्या आणि सेवांच्या आधारे सेवा हमी पॅकेजनुसार सुमन बेसिक, सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर आणि सुमन कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच सुमन कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर यामध्ये जिल्हा, स्त्री रूग्णालये व संदर्भ सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. सुमन बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर यामध्ये प्रथम संदर्भ सेवा केंद्र नसलेल्या काही उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालये यांचा समावेश आहे. तसेच सुमन बेसिकमध्ये राज्यस्तरावरील संस्थांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे, या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे.

 

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२: – पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिक एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठीच्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

उद्या गुरूवारी (दि. २३) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कार्तिक एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून कार्तिक एकादशीच्या तयारीचा आढावा घेतला. या संवादात मंदिर समितीचे गहिनीनाथ अवसेकर महाराज यांच्यासह, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंढरीची वारी हा आपल्या सगळ्यांच्याच आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आपल्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वच यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. कार्तिक एकादशी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी विविध घटकांनी समंजसपणे पुढाकार घेतला आहे. ही चांगली बाब आहे. पंढरपूरची वारीही आपली संस्कृती आहे. ती आपण सगळ्यांनी मिळून जतन केली पाहिजे.  आपण राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस प्रवास आणि महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे या वारीसाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी येतील. त्यांना विठुरायाचे दर्शन घेता येईल. ही एक प्रकारे सेवाच आहे. त्यामुळे आमचे प्रशासन देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी मनापासून प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. यासाठी पोलीस प्रशासनासह, विविध यंत्रणांचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी पंढरपुरातील स्वच्छता या घटकाविषयी विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, तसेच चार विश्रांती कक्षांची उभारणी, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, नदी किनाऱ्याची स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, आरोग्य शिबीरांचे आयोजन याविषयीही त्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वारकरी आणि पंढरपूर वारीबद्दल आस्थेने पुर्वतयारीचा आढावा घेतल्याबद्दल श्री. अवसेकर महाराज यांनी आभार मानले.

००००

आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

जिल्हा बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना; नवीन वर्षात ३४९५ एसटी बसेस सेवेत दाखल होणार

मुंबई, दि. २२: राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. बसस्थानाकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

एसटी महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार २२०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे २२०० तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवकरीता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. बसस्थानकांवरील होर्डींग्जची दुरुस्ती करतानाच त्यांची सजावट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा

देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. २२ : राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाने मंजूर केलेला सर्व निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर याबाबत विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 केंद्र शासनाकडून पंधराव्या वित्त आयोगामार्फत राज्याला मिळणाऱ्या निधीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव  नितीन करीर, अपर मुख्य सचिव (व्यय) ओमप्रकाश गुप्ता, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव  (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए., नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र शासनाच्या वित्त आयोगाकडून राज्यातील विकास कामांसाठी मंजूर निधी वर्षनिहाय वितरित करण्यात येतो. मंजूर झालेल्या निधीचे वितरण हे विभागांनी केलेल्या कामावरील वर्षनिहाय खर्चानुसार केले जाते. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी या निधीतून करावयाची कामे प्राधान्यक्रमाने पूर्णत्वास न्यावीत. राज्याच्या विकासासाठी हा निधी सहाय्यभूत ठरत असल्याने हा निधी वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी उपयुक्तता प्रमाणपत्र तत्परतेने आयोगाला सादर करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, आरोग्य विभागाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा उपयोग प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांच्या उभारणीसाठी करावा. तसेच नगरविकास आणि मदत व पुनर्वसन विभागाने समन्वयातून नगरपालिकांच्या अग्निसुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण करावे. याद्वारे उपलब्ध निधीचा शंभर टक्के उपयोग करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

——०००——

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र : न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी घेतला अमरावती विभागाचा आढावा

अमरावती, दि.22 : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. समितीला यासंबंधीचा अहवाल सादर करावयाचा असल्याने कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीची नोंद असलेले दस्त ऐवज व कागदपत्रांचा  समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (नि.) यांनी विभागीय बैठकीत आढावा घेतला.

समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसुली विभागात दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्त कार्यालयात न्यायमूर्ती श्री. शिंदे यांनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदी, अनुषंगिक बाबींचा व कामकाजाचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव ॲड. शेखर मुनघाटे, समिती कक्षाचे उपसचिव विजय पोवार, ॲड. अभिजीत पाटील, कक्ष अधिकारी माधुरी देशमुख यांचेसह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर इमर विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री. शिंदे म्हणाले की, अमरावती विभागांतर्गत असणाऱ्या पाचही जिल्ह्यांत कुणबी व मराठा जातीच्या समाजाची लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे. शासकीय विभागाकडे विशेषत: महसूल विभागाकडे असलेल्या महसुली अभिलेखांच्या सन 1948 पूर्वीच्या तसेच सन 1948 ते सन 1967 कालावधीतील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदीची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल समितीला सादर करण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षाने स्वीकारुन त्याबाबतही अहवाल सादर करण्यात यावेत.

अमरावती विभागातील पाचही जिल्हा प्रशासनाचा याअनुषंगाने कामकाजाचा सविस्तर आढावा न्यायमूर्ती शिंदे यांनी बैठकीत घेतला. मागील पाच वर्षात मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र वितरणाचा तसेच विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अवैध ठरलेल्या प्रकरणांच्या कारणांचा आढावा घेतला. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी प्रास्ताविकात कामकाजाची माहिती देऊन विभागात कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्यांची संख्या 20,06,413 असल्याचे सांगितले.

यावेळी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहितीचे सादरीकरण करुन कुणबी जातीविषयक सांख्यिकी आणि केलेल्या कामकाजाविषयी विवेचन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकरणांचे निरीक्षण, पडताळणी, तपासणी, वस्तुस्थितीबाबत समिती अध्यक्षांना सविस्तर माहिती दिली.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी चांगले नियोजन करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण देशासह जिल्ह्यात १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी चांगले नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. मुश्रीफ यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात योजनांच्या व मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या ९ चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून रथ मार्गस्थ करण्यात आले.  जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायत क्षेत्रांमधे चित्ररथांद्वारे जनजागृती अभियान राबवून योजनांचे महत्त्व लाभार्थ्यांना पटवून दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने,  प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तथा नोडल अधिकारी ग्रामीण अरूण जाधव, संजय पाटील यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील १०२५ ग्रामपंचायतींमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. या यात्रेमार्फत ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या मोहीम राबविण्यात येणार आहे. या यात्रेसाठी शासनाकडून सुसज्ज असे चित्ररथ जिल्ह्यात आले असून त्यांच्यामार्फत सर्व तालुक्यात तसेच पुढे नागरी क्षेत्रात केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी केली जाणार आहे.

ही यात्रा पुढील टप्प्यात नगरपालिका, महानगरपालिकेच्या क्षेत्रात जाणार असल्याने या यात्रेचे दरदिवसाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. या यात्रेत भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती कार्यवाही यंत्रणेने करावी, या यात्रेसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मनुष्यबळ, वाहनव्यवस्था, यात्रेच्या जाण्या-येण्याचे मार्ग, स्थळांची माहिती इत्यादींची केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, स्तरावर समन्वय समिती गठीत करण्याच्या व प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या तसेच प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणारे चित्ररथ दिवसाला १८ गावे पूर्ण करून येत्या दोन महिन्यात संपूर्ण १०२५ ग्रामपंचायती पूर्ण करणार असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

गाव पातळीवरती अभियान राबवित असताना विविध कुटुंबांकडून योजनेचे लाभ मिळाले किंवा नाही याबाबतचीही माहिती एकत्रित केली जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीएम पोषण अभियान, हर घर जल जीवन मिशन, स्वामित्व योजना, जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम, नॅनो फर्टिलायझर, पीएम गरीब कल्याण योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना यांचा समावेश असणार आहे.

तर पुढील टप्प्यात शहरी भागात पीएम स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्वला योजना, पीएम मुद्रा कर्ज योजना, स्टार्टअप इंडिया, आयुष्यमान भारत योजना, स्वच्छ भारत अभियान, पीएम ई बस सेवा, अटल मिशन, पीएम भारतीय जन औषधि योजना, उज्वला योजना, सौभाग्य योजना, डिजिटल पेमेंट इन्फ्रा, खेलो इंडिया, उडान, वंदे भारत ट्रेन्स अँड अमृत भारत स्टेशन योजना याबाबतची माहिती एकत्रित केली जाणार आहे. तद्नंतर योजना न पोहचलेल्या कुटुंबांना व व्यक्तींना ती दिली जाणार आहे.

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस, शिवछत्रपती पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. २२:- भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आढावा घेतला.

‘शिवछत्रपती भारतीय आरमाराचे जनक आहेत. तसेच त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे, त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश दिले.

या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर, कॅप्टन सुधीर सावंत यांच्यासह व्हॉईस ॲडमिरल डी. के. त्रिपाठी, रिअर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, रिअर ॲडमिरल मनिष चढ्ढा, कमोडोर एस.के. रॉय, संदिप सरना, गोकुल दत्ता, आशिष शर्मा, विक्रम बोरा, कॅप्टन चैतन्य, उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यंदाचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात येत आहे. नौसेना दलाने या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांच्या पाहणीअंती सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली आहे.

बैठकीत नौसेना अधिकाऱ्यांनी नौसेना दिवसाच्या अनुषंगाने तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या अनुषंगाने नियोजित विविध कार्यक्रम, त्यांची रूपरेषा आणि त्यातील वैशिष्ट्ये याबाबत सादरीकरण केले. या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी सरखेल कान्होजी आंग्रे तसेच हिरोजी इंदुलकर यांचे वंशज यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी राजकोट येथे शिवाजी महाराज यांचा ४३ फूट पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच शिवछत्रपतींच्या देदीप्यमान जीवनकार्याचा आढावा घेणारी आर्ट गॅलरी साकारण्यात आली आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विदेशातील नौसेनेचे वरिष्ठधिकारी तसेच देश-विदेशातील मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रस्ते, विविध पायाभूत सुविधा आदींचा आढावा घेण्यात आला.
000

 

सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर राज्याचे सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत उद्या प्रसारित होणार आहे.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट, संगणकासारख्या गॅजेट्सचा वापर वाढला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांची ऑनलाइन होणारी फसवणूक व गुन्हे रोखण्यासाठी शासनाच्या सायबर विभागामार्फत वेळोवेळी दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक झाल्यास तक्रार कुठे नोंदवावी, अशा विविध विषयांबाबत पोलीस अधीक्षक श्री. शिंत्रे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून अधीक्षक श्री. शिंत्रे यांची मुलाखत उद्या गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

 

 

कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे निविष्ठा धारकांना त्रास होणार नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 22 : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना त्रास होणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेच्या प्रतिनिधींना दिली.

मंत्रालयात कृषीविषयक प्रस्तावित कायद्यासंदर्भात कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक झाली. या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे – पाटील, आमदार दिलीपराव बनकर, आमदार किशोर पाटील, सचिव सुनील चव्हाण, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कृषी संचालक विकास पाटील, अवर सचिव उमेश चंदिवडे यांच्यासह निविष्ठा विक्रेता संघटनेचे राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला कायदा सर्वांसाठी लाभाचा आहे. या कायद्यातील तरतुदींमुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टळणार आहे. बोगस खते, बोगस बियाणे प्रकरणी उत्पादक कंपन्यांवर कारवाईची तरतूद असणार आहे. यामध्ये विक्रेत्यांना साक्षीदार म्हणून घेण्यात येणार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही. या कायद्यामुळे प्रामाणिक कृषी निविष्ठा उत्पादक, विक्रेते, शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. तसेच शेजारील राज्यातून येणारी बोगस बियाणे विक्रीस पायबंद बसेल. निविष्ठांच्या लिंकेज बाबत कंपन्यांवर कारवाई करणे सोपे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, निविष्ठा धारकांच्या अडचणींचा विचार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा ही भूमिका आहे. निविष्ठांच्या विक्रीबाबत उत्पादक ते शेतकरी, अशी साखळी तयार करून प्रत्येक निविष्ठांचे बॅचनुसार ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांपर्यंत चांगली व प्रमाणित उत्पादने मिळतील. उत्पादक व शेतकरी यांच्यामध्ये पुरवठ्याची सुरक्षित व चांगली साखळी  उभारण्यात येणार आहे.

सहकार मंत्री श्री. वळसे – पाटील म्हणाले की, राज्यात खतांचे व बियाणांचे कोणतेही लिंकिंग होता कामा नये. तसेच कायद्याबाबत कंपनीच्या प्रमुखांशीही बैठक घेण्यात यावी.

या बैठकीवेळी कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी कायद्यासंदर्भात कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांचे निराकरण केले. तसेच कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहितीही देण्यात आली.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/स.सं.

 

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...