रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 935

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात २१ ते २५ फेब्रुवारी कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करावे – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, ‍‍दि. 16 : आदिवासी समाज बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसंदर्भात लाभार्थ्यांना  लाभ देण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करावे, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या.

मंत्रालयात मंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प कार्यालयातंर्गत लाभार्थी मेळाव्याच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री डॉ. गावित बोलत होते.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, केंद्र व राज्य शासनातर्फे आदिवासी समाजातील अनुसूचित जमाती वर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी लाभार्थ्यांना न्युक्लिअस बजेट योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शबरी घरकुल योजना या योजनांसह विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन तसेच पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ याठिकाणी देण्यात येणार आहेत.

21 फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी येथे 22 फेब्रुवारी, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी 23 फेब्रुवारी रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर 24 फेब्रुवारी, यवतमाळ जिल्ह्यातील राजुरा, वरोरा, झरीजामनी आणि 25 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, कळंब येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंत्री डॉ.गावित यांनी केले आहे.

या बैठकीस प्रकल्प अधिकारी गडचिरोली राहुल कुमार मीना, प्रकल्प अधिकारी भामरागड आदित्य जीवने, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव मच्छिंद्र शेळके तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती, दि. १६:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

श्री.पवार यांनी कन्हेरी वन विभाग, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नटराज मंदिर परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली.

यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव , उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

नटराज मंदिर परिसरातील कॅनालच्या समांतर असलेले पदपथ स्वच्छ राहतील याची दक्षता घेतानाच सार्वजनिक कामांचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर पोलिसांनी कार्यवाही करावी. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम अंतिम आराखड्याप्रमाणे पूर्ण करावे. परिसरातील रस्त्याचा विचार करुन पुरेशा उंचीच्या संरक्षक भिंती उभाराव्यात.

कन्हेरी वनविभागात सरळ वाढणारी, सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा आणि ती झाडे जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोयीस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. कामे झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत. या सर्व सार्वजनिक कामांसाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई दि. १६: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्यदेखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा   सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलदगतीने पार पडले.

या कामकाजाकरिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण, जमीन धारणा, जमाबंदी, भूमी अभिलेख, तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचे प्रमाण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाण इत्यादी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवांनी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली. तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहितीसुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली. याव्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्यांविषयीचीसुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली.

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात  टिकले, मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नव्हते. आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पावले वेळोवेळी उचलली आहेत. आयोगाने विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केले असून मला विश्वास वाटतो की, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या  आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल.

आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पावले उचलली आहे. आयोगाने आज विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला आहे. २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशनदेखील आम्ही बोलाविले आहे. हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे असे आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आज अहवाल देतेवेळी मुख्य सचिव डॉ नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते, ओमप्रकाश जाधव, मच्छिंद्रनाथ तांबे, ज्योतिराम चव्हाण, मारुती शिंकारे, डॉ गोविंद काळे, डॉ गजानन खराटे, नीलिमा सरप(लखाडे), सदस्य सचिव आ.उ. पाटील आदी उपस्थित होते.

पुरस्कांरांमधून आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 15 : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सारख्या पुरस्कारांमुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे समाजामध्ये चांगले काम करण्याची प्रेरणा आणखी लोकांना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह उद्योगपती मुकेश अंबानी, लोकमत समूहाचे विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, ऋषी दर्डा, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते जितेंद्र, रणबीर कपूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजामध्ये अनेक लोक विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत असतात असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या लोकांना व त्यांची कामगिरी समाजासमोर आणण्याचे काम अशा पुरस्कारांच्या माध्यमातून लोकमत समूह करीत आहे. या पुरस्कारांमुळे समाजातील नवीन पिढीला समाजासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहते.  लोकमत समूहाचे काम फक्त बातम्या देण्याइतके मर्यादित नसून अनेक समाजोपयोगी कामे या समूहामार्फत केली जातात. राज्यातील गुणवंतांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याची चांगली परंपरा लोकमत समूह जपत असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात विविध विकास कामे सुरु आहेत. तसेच अनेक विकास प्रकल्प शासनाने पूर्ण केले आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा विकास वेगाने सुरू आहे. 22 किलोमीटर लांबीच्या अटल सेतुमुळे रायगड – मुंबई अवघ्या 15 मिनिटांत पोहोचता येते. समृद्धी महामार्गामुळे नागपूर – मुंबई प्रवास 7 तासांचा झाला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने असे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. थेट परकीय गुंतवणुकीमध्येही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेचाही प्रथम पुरस्कार राज्याला मिळाला आहे. हे सर्व राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री उत्कृष्ट काम करत असल्यामुळेच शक्य झाले आहे. तसेच राज्याचे अधिकारीही लोककल्याणासाठी उत्कृष्ट काम करत आहेत. राज्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या या लोकांना लोकमत समूहाने आज पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्याबद्दल मी लोकमत समूहाचे अभिनंदन करतो असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग 

            मुंबईदि. 15 : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला  चालना मिळणार आहे. प्रकल्पासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून याबाबत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला.

            बैठकीस खासदार संजयकाका पाटीलमुख्य सचिव नितीन करीरमित्राचे सीईओ प्रवीण परदेशीजागतिक बँकेचे प्रतिनिधीनाबार्ड अधिकारी तसेच विविध विभागांचे सचिवअधिकारी उपस्थित होते.

            जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यात जोखीम गृहित धरुन जलव्यवस्थापनपूर व्यवस्थापनसंस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत  म्हणाले की,  याशिवायनाबार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4 हजार 643 कोटी रुपये खर्च येणार असूनसिंचनक्षमता वृद्धीसाठी 155 प्रकल्पांच्या कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 5 हजार 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.

            पहिल्या टप्प्यात ही सुमारे 10 हजार कोटींची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 38 अपूर्ण प्रकल्प पूर्णत्त्वास नेली जाणार आहेत. अशी एकूण 15 हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेतअसेही त्यांनी सांगितले.

             बळीराजा जलसंजीवनी योजना तसेच प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या या प्रकल्पांसाठी 2019 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता.

              आता नव्याने सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्पांना गतीने पूर्ण करता येईल. शिवायनियमित अर्थसंकल्पावर त्याचा भार पडणार नाही.

निलेश तायडे/विसंअ/

 

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  दि. 31 जानेवारी, 2024 असा होता. या प्रवेशिका मागविण्याकरिता दि.29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच http://13.200.45.248 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

000

ज्येष्ठ नागरिकांच्या आनंददायी जीवनासाठी ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबत उपक्रम राबविणार – विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड

छत्रपती संभाजीनगर दि. 15: आपल्या पाल्यांपासून दुर्लक्षितव हक्कांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृध्दापकाळातील आयुष्य सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविधयोजना व कायदेशीर तरतुदी यांचा समन्वय साधून ज्येष्ठांना दिलासा देणारा ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबतचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी आज सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त श्री.अर्दड यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त नयना बोंदर्डे, उपायुक्त अनंत गव्हाणे, उपायुक्त जगदिश मिनियार, उपायुक्त सुरेश बेदमुथा, नगरपालिका प्रशासन उपायुक्त ॲलीस पोरे सामाजिक कार्यकर्त्या डॉ. पदमा तापडीया विविध विभागाचे विभागप्रमुखउपस्थित होते.

विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड म्हणाले, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, कुशीत वाढवले, मोठे केले, प्रेमाचा वर्षाव केला त्या वृध्द आई- वडीलांनाआयुष्याच्या शेवटी केवळ स्वार्थ, मोह, तिरस्कार, मत्सर व अहंकारातून अथवा गैरसमजातून बऱ्याच ठिकाणी त्रास देण्याच्या घटना समाजामध्ये घडत असल्याचे दिसून येते. घरातील एक अडगळ म्हणून वृध्दांकडे बघण्याऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णयान्वये “राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठनागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून विभागनिहाय निर्देश यापुर्वीच निर्गमीतकेले असल्याचे त्यांनी सांगितले.

आई-वडील, ज्येष्ठ नागरिक यांच्या वृध्दापकाळात त्यांच्यामुलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा व त्याच बरोबर इतर मुलभूत सोईसुविधा यामध्ये वैद्यकीय उपचार, घरामध्ये सन्मानाची वागणूक या बाबी उपलब्ध व्हाव्यात,या हेतूने भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक, पालकांना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी आई-वडीलांचा व ज्येष्ठ नागरीकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, 2007 हा कायदा अस्तित्वात आणला आहे. अधिनियमाप्रमाणे जे आई-वडील व ज्येष्ठ नागरिक हे आपल्या स्वतःच्या उत्पन्नामधून किंवा स्वतःच्या मालमत्तेमधून स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ ठरतात. असे आई-वडील तसेच ज्येष्ठ नागरिक ज्यांना अपत्य आहे, ते त्यांच्या मुलांविरुध्द, नातवाविरुध्द व जे ज्येष्ठ नागरिक निपुत्रिक आहे ते उक्त अधिनियमाच्या कलम 2 (छ) मध्ये नमुद”नातेवाईक’ या संज्ञेत बसणाऱ्यांविरुध्द नर्वाह प्राप्त करण्यासाठी अधिनियमातील कलम 5 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज करु शकतात, अशी तरतूद असल्याचे श्री. अर्दड यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक यांना सन्मानाने जीवन जगता यावे या दृष्टीने त्यांच्या गरजांच्या मर्यादेत त्याचा निर्वाहभत्ता चालविणे हे मुलांचे व कलम 2 (छ) मध्ये नमुद नातेवाईकांचे दायित्व निश्चित केलेआहे. अधिनियमातील तरतूद क्रमांक 5 प्रमाणे ज्येष्ठ नागरिक  आई-वडीलांच्या किंवा आजी- आजोबांच्या बाबतीत अज्ञान असणाऱ्या त्यांच्या एका किंवा अधिक मुलांविरुध्द व निपुत्रिक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत कलम 2 (छ) प्रमाणे नातेवाईक असणाऱ्यांच्या ताब्यात अशा ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता असेल किंवा अशी मालमत्ता या ज्येष्ठ नागरिकांकडून वारसा हक्काने त्याला मिळणार असेल अशा नातेवाईकाविरुध्द निर्वाह प्रदान करण्याच्या अनुषंगाने अर्ज सादर करता येणार असल्याचेही विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले.

अधिनियमाच्या कलम २३ प्रमाणे या अधिनियमाच्या प्रारंभ नंतर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी एखाद्या व्यक्तीला तो त्या ज्येष्ठ नागरिकाला मुलभूतसुविधा पुरवेल या शर्तीस अधीन राहून दान अथवा अन्य प्रकारे आपली मालमत्ता हस्तांतरितकेली असेल आणि त्या व्यक्तीने त्या ज्येष्ठ नागरिकाला मुलभूत सुविधा पुरविण्यास नकारदिला असेल किंवा तो त्यासाठी असफल ठरलेला असेल तर असे झालेल्या मालमत्तेचे हस्तांतरण लबाडीचे किंवा जबरदस्तीने किंवा गैरवाजवीप्रमाणे केले असल्याचे मानण्यात येईल व न्यायाधिकरणात असे हस्तांतर अवैध आहे असे घोषित करता येईल अशी तरतूद असल्याचा उल्लेखही श्री. अर्दड यांनी केला.

अधिनियमातील कलम 2 (छ) नुसार “नातेवाईक” या व्याख्येतअसणाऱ्या व निर्वाह भत्त्याच्या लाभापासून वंचित असणाऱ्या गरजू ज्येष्ठ नागरिकांची वारसा हक्कात असलेली अथवा स्व अर्जित मालमत्ता ज्या पाल्यांच्या ताब्यात असेल, हस्तांतरित करण्यात आली असेल अशा पाल्यावर दायित्व निश्चित करणे आवश्यक आहे तसेच सदर अधिनियमातील कलम 5 प्रमाणे दायित्व असलेल्या ज्येष्ठांचे संगोपण न करणाऱ्या, संगोपणास प्रतिसादन देणाऱ्या पाल्यांच्या विरुध्द सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाल्यास अधिनियमातील कलम 23 मधील प्रचलित तरतुदी विचारात घेत अशा वंचित ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कामध्ये प्रशासकीय पातळीवरुन निर्णय घेण्याची गरज असल्याचे श्री. अर्दड यांनी स्पष्ट केले.

असा राबविणार उपक्रम

मराठवाड‌्यात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व तलाठी सजा अंतर्गत ६० वर्षे व त्यावरील वय असलेल्या आई वडील व ज्येष्ठ नागरिकाना”आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ या कायद्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधिनस्तउप विभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी व तलाठी सजा यांचेमार्फत आवश्यक पाऊले उचलण्यात येणार आहेत.

महसुली अभिलेखात फेर बदल होत असताना किंवा वाटणीच्या आधारावर फेरबदल करताना संबंधित घरातीलआई-वडील, आजी-आजोबा व ज्येष्ठ नागरिक यांचा उदरनिर्वाह यासाठी योग्य तेवढी मालमत्ताठेवण्यात आली आहे किंवा कसे? किंवा फेर बदल करतांना पालकांच्या पुढील आयुष्यात काळजीसंदर्भाने अटी व शर्ती नमूद केल्या आहेत का ? या बाबी विचारात घेऊनच असा बदल करण्यात यावा. महसुली अभिलेखात फेर बदल अथवा वाटणीनंतर आई-वडील अथवा ज्येष्ठ नागरीकांची मुले (मुलगा-मुलगी) किंवा नातेवाईक त्यांची काळजी घेत आहेत का? याबद्दल तलाठी सजानिहाय खात्री करतील व या बाबीकडे लक्ष देवून कार्यवाही करतील.

उपक्रमाची अंमलबजावणी करताना जर संबंधित व्यक्तीचा मुलगा-मुलगी किंवा नातेवाईक त्यांच्या आई-वडीलांची, ज्येष्ठांची काळजी घेत नसतील किंवा त्यांना सन्मानाने आयुष्य व्यतीत करु देत नसतील व मालमत्ता हस्तांतराणाचे वेळी दिलेल्या शब्दाचे पालन करत नसतील, असे संबंधित आई-वडील, वयोवृध्द व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक जर तोंडी तक्रार करत असतील तर संबंधित तलाठी यांनीत्यांची लेखी तक्रार देण्यास मदत करुन आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याणअधिनियम, 2007 मधील तरतूद क्रमांक 23 प्रमाणे संबंधित मुलाकडून तसेच नातेवाईकांकडून संबंधित मालमत्ताधारक ज्येष्ठांना मालमत्तेचा पुर्नहक्क देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यासप्रस्ताव सादर करावा.

जर सबंधित व्यक्तीचा मुलगा-मुलगी किंवा नातेवाईक यांच्याकडून आई-वडील किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या नावे पुर्नहक्काने मालमत्तेची नोंद घेतल्यानंतर अशा ज्येष्ठांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रसंगी असे आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे चरितार्थ व कल्याणासाठी नियम, 2010 चे प्रकरण 6 मधील नियम 20 नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचेव मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत कृती आराखडा विनिर्दिष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची यादी संबंधित तलाठयांकडेअद्ययावत ठेवण्यासोबतच त्यांना महिन्यातून एकदा भेट द्यावी लागणार आहे.

राज्यात उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखालील निर्वाह प्राधिकरणामार्फत आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम आणि त्या अंतर्गत 23 जून, 2010 च्या अधिसूचनाअन्वये राज्यात लागू केलेले नियम, 2010 ची काटेकोर अंमलबजावणी करुन दुर्लक्षित व वंचितआई-वडील, ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह खर्च मिळवून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर संबंधीत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीने सदर उपक्रमाचे सुयोग्य नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. तालुका स्तरावर तहसिलदार याचे अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करुन सदर समितीची वेळोवेळी आढावा बैठक घ्यावी, तसेच सदरील कार्यवाही करतांना वयोवृध्द आई-वडील व ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित व वंचित राहणार नाहीत, निर्वाहच्या तक्रारी उद्भवणार नाहीत याबाबत सर्व संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी यांना जाणीव करुन द्यावी तसेच उपक्रमाशी निगडीत सर्व संबंधितांनी आपसांत योग्य समन्वय ठेवून हा उपक्रम त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत.

*****

मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या क्षेत्राकडे सजगतेने बघण्यासाठी

१६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘महाखादी कला- सृष्टी प्रदर्शन २०२४’ निमित्ताने  खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांचा हा माहिती देणारा लेख…

खादी हे आपले महावस्त्र आहे. ज्याने स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाला एकत्र बांधले  आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेशीचा स्वाभिमान जागवण्याचे काम केले. या एका धाग्याने संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे काम केले होते. खादीच्या धाग्यात एक शक्ती आहे. त्यामुळेच सर्व विभागांना एकत्र करुन खादीच्या कपड्यांचे महत्व आणि इतरही आपली सुंदर वस्त्र परंपरा आहेत याचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. आजकाल नागरिक मॉलमध्ये जाऊन खरेदी करतात. तिथे मोठमोठ्या जाहिराती केलेल्या असतात. ५० टक्के सूट, एकावर एक मोफत असे विविध पद्धतीने ग्राहकांना आकर्षित केले जाते. कोणीही कोणतीही वस्तू अशी मोफत देत नाही. त्याची छुपी किंमत कशात तरी दडलेली असते. पण जाहिराती पाहून आपण आकृष्ट होतो.

आमचा विभाग लघु उद्योजकांसाठी काम करतो. माझ्या विभागासोबत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ, एक जिल्हा एक उत्पादन , उद्योग संचालनालय, भारतीय लघु उद्योग विकास बॅंक, जी लघु उद्योजकांना कर्ज देते आदिवासी विकास विभाग आणि खादी व ग्रामोद्योग आयोग या सर्वांच्या सहकार्याने १६ ते २५ फेब्रुवारी  २०२४ दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एम एम आर डीए च्या मैदानावर ‘महाखादी कला- सृष्टी २०२४’ एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ खादीला प्रोत्साहन देतेच पण खादी ग्रामोद्योग आयोग सुद्धा लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत असते.  आमचा उद्देशच लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा आहे.

मोठ्या उद्योजकांना, त्यांच्या वस्तूंना सहज बाजारपेठ उपलब्ध होते. ते सहज ऑनलाइन मार्केटमध्ये सुद्धा समाविष्ट होतात.  लघु उद्योजकांना मात्र हे सहज शक्य होत नाही. टेक्नोसॅव्ही म्हणजे ऑनलाईन विक्री प्रक्रिया वस्तुचे विशिष्ट प्रकारचा फोटो, विशिष्ट प्रकारचे पॅकिंग, मार्केटपर्यंत पोहचण्यासाठी बरेच प्रयत्न करायला लागतात. त्यामुळे लघु उद्योजकांना बाजारपेठ  मिळवुन देणे फार महत्वाचे आहे. लघु उद्योजकांनी निर्माण केलेल्या फार अप्रतिम वस्तु आपल्याकडे आहेत ज्याला खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत आपण पोहचवले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपण लोकांना दिले तर त्यांचा उद्योग वाढीस लागू शकतो.

कारागिरांना हातमागावरील एक वस्त्र तयार करायला अतिशय  परिश्रम लागतात. खादी किंवा पैठणीला तयार करायला दीड ते तीन महिने लागतात. जीव ओतून तयार केलेल्या या वस्त्राची किंमत त्यामुळेच जास्त असते. मात्र त्याकडे आपण त्या आत्मियतेने व सजगतेने पाहिले पाहिजे.

लघु उद्योजकांना बाजारपेठ  उपलब्ध करुन देण्याची गरज आहे, म्हणून महाखादी कलासृष्टी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही उद्योग संचालनालयाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. ज्यात प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आहेत.  जसे छत्रपती संभाजीनगर मधील पैठणी, हिमरू शॉल,पालघरची वारली, नागपूरची संत्री, कोल्हापूरचा गुळ, चप्पल, लासलगावचे कांदे, कोकणाचे काजू, नाशिकचे द्राक्षे, महाबळेश्वरचे मध आहे, अशी वैविध्यपूर्ण वस्तूंनी सजलेली वैशिष्ट्यपूर्ण बास्केट महाखादी कलासृष्टी प्रदर्शनामध्ये असणार आहे. सुंदर अशा कपड्यांसोबतच हस्तकलेच्या वस्तू व खाद्यपदार्थ आहेत.

आपल्याजवळ एकतरी पैठणी असावी असे आपल्या महाराष्ट्रातील स्त्रीचे स्वप्न असते. साधीसुधी नाही तर भरजरी पैठणी असावी असे तिला वाटते. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या उद्योजकांच्या पैठणी या इतर पैठणीपेक्षा खुप वेगळ्या असतात. खरेतर पैठणी ही पैठणची आहे. पैठणच्या पैठणीची वीण, काठपदर, त्यावरील बुटी हे सगळेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रदर्शनात अशा सुंदर पैठणी उपलब्ध असतील.

या एक्स्पोमध्ये एक प्रात्यक्षिक व अनुभव  दालन असणार आहे. ज्यात आपल्याला पैठणीचा इतिहास, तिचे विणकाम, मध कसे तयार होते, खादी कशी तयार करतात, चरख्यावरील सूतकताई, हातमागावर कापड तयार करणे, बांबूपासून तयार होणा-या वस्तू, लाखाच्या बांगड्या अशा अनेक वस्तूंचे प्रात्यक्षिकासह अनुभव नागरिकांना येथे घेता येईल. संध्याकाळी फॅशन शो, काही मनोरंजनात्मक  कार्यक्रम, काही परिषदा आहेत ज्यात फॅशन इंडस्ट्री आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीची वाढ आणि विकास यात दिग्गजांचे अनुभव आणि चर्चा ऐकता येईल.

प्रदर्शन बघताना खूप वेळ खरेदी केल्यानंतर भुक शमविण्यासाठी बचत गटाच्या महिलांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील यात महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. जसे मांडे, तांबडा पांढरा रस्सा, पुरणपोळी, बटाटावडा, कोकणीपदार्थ, वैदर्भिय पदार्थ आणि त्या- त्या भागातील विविध स्वादिष्ट व रुचकर खाद्य पदार्थांची मेजवानी नागरिकांना तब्बल १६ ते २५ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे.

या महोत्सवात केवळ खरेदी किंवा खाद्यपदार्थच नाही तर, या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांचा  एक दृष्टिकोन तयार होईल. लघु उद्योजकांचे महत्व आणि आपल्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान मोठे आहे. कृषी  व्यवसायानंतर अर्थव्यवस्थेच्या १७% योगदान देणारे लघुउद्योग हे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. याकडे नागरिकांनी सजगतेने पहावे म्हणून हे प्रदर्शन आहे. याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा एवढेच नागरिकांना मन: पूर्वक आवाहन करते.

0000

आर. विमला

मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ.

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता पाठपुराव्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई, दि. 15 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता सेवानिवृत्त (भाविसे) अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच सरहद संस्था, पुणे चे अध्यक्ष संजय नहार हे या समितीचे सदस्य असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची कार्यवाही केंद्र शासनाकडून केली जाते. यासाठी केंद्र शासनाने काही निकष विहीत केले आहेत. या निकषांच्या आधारे संशोधन आणि अभ्यास करुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाने 10 जानेवारी 2012 रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकांची समिती स्थापन केली होती. या समितीने इतिहास संशोधन करुन जुने संदर्भ, प्राचीन ग्रंथ, पुरातन काळातील ताम्रपट, कोरीव लेख, शिलालेखांचा संदर्भ इ. प्राचीन दस्ताऐवज तपासून त्याआधारे एक सर्वंकष व परिपूर्ण अहवाल शासनास सादर केला. या अहवालामध्ये सविस्तर विवेचनासह मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळणेसाठी विहित केलेल्या निकषांची पूर्तता करते हे पुराव्यांसह स्पष्ट केले आहे.

समितीने तयार केलेला मराठी भाषेमधील मूळ अहवाल दि. 12 जुलै 2013 च्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर समितीने परिशिष्टांसह सादर केलेला इंग्रजीमधील अहवाल देखील दि. 16 नोव्हेंबर 2013 रोजी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्या स्तरावर सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीतील एक पदाधिकारी महिन्यातून एकदा दिल्ली येथे संस्कृती मंत्रालय, केंद्र शासन यांच्याकडे व वरिष्ठ स्तरावर संपर्क करुन मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत पाठपुरावा करतील. त्यानंतर हे  पदाधिकारी शासनास प्रगती अहवाल सादर करतील, असे याअनुषंगाने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

महाराष्ट्र वन विकास महामंडळाचा सुवर्ण महोत्सव

महाराष्ट्र वन विकास महामंळाची स्थापना १६ फेब्रुवारी १९७४ रोजी राज्य शासनाची पूर्ण मालकी असलेली शासनाची उपकंपनी म्हणून करण्यात आली. समान ध्येय आणि उद्दिष्टे असलेले वन विकास मंडळ १९६९ पासून अस्तित्वात होते. याचे रूपांतर महाराष्ट्र वन विकास महामंडळामध्ये झाले. या महामंडळाला उद्या 50 वर्षे पूर्ण होत आहेत. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महामंडळाची माहिती तसेच कार्यकर्त्वाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…

सागरोपवन वाढविणे, त्याची कापणी, इमारत व इतर वनउपजांचे विपणन करण्याचा पाच दशकाहुन अधिक अनुभव असणारे वनीकरण क्षेत्रातील अग्रेसर महामंडळ अशी ओळख महाराष्ट्र वन विकास महामंडळाने जपली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन असलेले, नफा आणि सरकारला लाभांश देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड असलेले अशीही महामंडळाची वेगळी ओळख आहे. महामंडळामार्फत झालेल्या रोपवनाचे सध्याचे मुल्य ४ हजार कोटींपेक्षा जास्त असून ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये महामंडळ मोठया प्रमाणात योगदान देत आहे.

3 लाख 43 हजार हेक्टर कार्यक्षेत्र

महाराष्ट्र सरकारने ०३.४३ लाख हेक्टर जंगल महामंडळाला त्यांच्या उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले आहे. ते राज्याच्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ०६.०० टक्के इतके आहे. महामंडळाला भाड्याने दिलेले वनक्षेत्र हे ३ प्रदेशात विभागले असून त्याअंतर्गत १२ वन प्रकल्प विभाग, १ औषधी वनस्पती विभाग आणि बल्लारशाह येथे १ आगार विभाग कार्यरत आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमांवर भर

महामंडळ बाह्य संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर यशस्वीरीत्या रोपवणाची निर्मिती करीत आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, इंडियन एअर फोर्स, बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यासारख्या अनेक संस्थांच्या जमिनीवर “टर्नकी रोपवन” करण्यात आली आहेत. अशाप्रकारे महामंडळ विविध सरकारी योजनांतर्गत आणि कॉर्पोरेट हरित उपक्रमांचा एक भाग म्हणून निकृष्ट वनजमिनीवर देखील वृक्षारोपण करते.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान

काही वर्षांपूर्वी, गोरेवाडा, नागपूर येथील जागतिक दर्जाच्या प्राणिसंग्रहालयाची रचना, बांधकाम आणि संचालन करण्याचे काम महाराष्ट्र सरकारने महामंडळकडे सोपवले होते. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान ही महामंडळाची निर्मिती आहे. वाघ, अस्वल यांसारखे वन्य प्राणी आणि तृणभक्षी प्राण्यांच्या विविध प्रजाती त्यांच्या जवळच्या नैसर्गिक अधिवासात दाखवून हे उद्यान नागपुरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून बहरले आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पामध्ये आफ्रिकन सफारी, वॉक-इन एव्हियरी, ट्रायबल ट्रेल आणि वॉकिंग ट्रेल यासारखी अनेक आकर्षणे जोडली जाणार आहेत.

वनोपज उत्पादन व विक्रीत सुसुत्रता

 महामंडळ दरवर्षी सुमारे ५० हजार घनमीटर इमारती लाकूड निर्मिती ‍करते. त्याची विक्री लिलावाद्वारे केली जाते. ग्राहकांना स्पर्धात्मक किमतीत दर्जेदार लाकडाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, महामंडळने नुकतेच चिराण लाकडाचे उत्पादन आणि विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली येथे स्थापित सरकारी आरागिरणीचे रूपांतर करून एक उत्पादन युनिट स्थापन करण्यात आले आहे. भविष्यात अश्या आणखी उत्पादन युनिट्ससह महामंडळ सर्वोत्तम दर्जेदार चिराण लाकडाचा विश्वासार्ह पुरवठादार म्हणून भारतीय लाकूड बाजारपेठेत मोठा प्रभाव पाडण्यासाठी तयार आहे.

इतर उपक्रमासह बांबूचे मूल्यवर्धन

 महामंडळाने पर्यावरण पर्यटन, औषधी वनस्पतींची लागवड, इमारत लाकूड आणि बांबूचे मूल्यवर्धन यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांमध्येही विविधता आणली आहे. इतर अनेक हरित उपक्रमही सुरू होत आहेत. महामंडळ च्या सामाजिक व्यवसायिक जबाबदारी (CSR) निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.

येत्या काळातही हे महामंडळ यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत, असे या महामंडळाच्या आजवरच्या वाटचालीवरून दिसून येते. ख-या अर्थाने हे महामंडळाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल ही ‘सुवर्ण’मय ठरली आहे.

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर 

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....