रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 933

नागपुरात होणार विस्तारित विभागीय क्रीडा संकुल – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

नागपूर, दि.१४ : विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विभागातील खेळाडू घडावेत, त्यांना विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात यासाठी दक्षिण –पश्चिम नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने विस्तारित विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे सांगितले.

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल आणि नागपूर जिल्ह्यातील विविध क्रीडाविषयक बाबींची आढावा बैठक पार पडली.  बैठकीला विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, युवक व क्रीडा महासंचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उपसचिव सुनील हंजे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व माजी आमदार सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोराडी येथे अत्याधुनिक तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येत असून, त्याचे बांधकाम मानंकांनुसार होत नसल्याच्या बाबी निदर्शनास येत असून, येथील बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता राहता कामा नये, चांगल्या सोयीसुविधा मिळाल्यास नागपूर विभागातून अजूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशाचा नावलौकीक कमवतील, असा विश्वास क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केला.

तालुका क्रीडा संकुलाचे काम वेगाने पूर्ण करून ते खेळाडूंना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगून, विभागीय क्रीडा संकुलामध्ये ज्या क्रीडा प्रकारांचे कोर्ट, हॉल, यासह विविध सोयीसुविधा नाहीत, त्या विस्तारित क्रीडा संकुलात उभारण्यात येतील. तसे प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश संबंधित विभागाला त्यांनी दिले.

तालुकास्तर लक्ष्यवेध लीग क्रीडा स्पर्धेसाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्याबाबत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी केली. नागपूर जिल्ह्यातील विविध क्रीडाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत गादा येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी विशेष बाब म्हणून अतिरिक्त निधी  उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार श्री. बावनकुळे यांनी केली. तसेच नागपूर हे मेट्रो शहर असल्यामुळे त्याचा वाढता विकास आणि लोकसंख्येचा विचार करता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत सुविधायुक्त असे क्रीडा संकुल उभारण्यात येईल, त्यासाठी जयप्रकाशनगर येथील जागेची पाहणी करण्यात आली असून, त्याचा प्रस्तावही पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय क्रीडा संकुलात सुविधांचा सुधारित आराखडा आणि अंदाजपत्रकाबाबतही क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांनी आढावा घेतला. तसेच नरखेड, रामटेक आणि उमरेड येथील तालुका क्रीडा अधिकारी यांच्या नियुक्ती शिवाय नागपूर ग्रामीण आणि भिवापूर येथील जागेचे समपातळीकरण करण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. तसेच विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत स्पोटर्स सायन्स सेंटरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा विभागाच्या प्रलंबित मागण्यांबाबतही सकारात्मकतेने चर्चा

क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मानकापूर येथे पार पडलेल्या  आढावा बैठकीत दिपाली विजय सबाने, सोनाली चिरकुटराव मोकासे, मृणाली प्रकाश पांडे, रोशनी प्रकाश निरके आणि संदीप नारायणराव गवई यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली असून, शासन निर्णयानुसार गुणवत्ताधारक दिव्यांग खेळाडूंना शासन सेवेत लवकरच घेण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

पॅरा आर्चर छत्रपती पुरस्कार विजेते संदीप गवई यांच्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने सुमोटो प्रकरण दाखल करून घेतले असून, त्यांनी दिलेल्या निर्णयावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचाही आढावा त्यांनी घेतला. आयसीसी महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत उपविजेत्या संघातील राज्यातील तीन खेळाडूंना रोख रक्कम प्रदान करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश क्रीडामंत्र्यांनी संबंधितांना दिले.  तसेच राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनापोटी प्रतिव्यक्ती आता 480 रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याप्रमाणे निवास व जेवणासाठी निधी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह इतरही विषयांवर मंत्री श्री. बनसोडे यांनी चर्चा केली.

०००

नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि.१४ :  उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्यातील नवीन इमारती व जुन्या इमारत दुरुस्ती  बांधकामास गती देवून ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी येत्या ८ दिवसात निविदा काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील मॉरीस महाविद्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक  झाली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दसपुते, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अजित बाविस्कर आदी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरामध्ये विविध बांधकामे नियोजित असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या कामास गती देण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांनी येत्या आठवड्यात निविदा काढण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (नागपूर) अधिक्षक अभियंते जनार्दन भानुसे आणि कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते. याशिवाय विद्यापीठ कॅम्पस परिसरात टेक्नॉलॉजी ॲण्ड एनर्जी पार्क बांधकाम, प्राचीन इतिहास आणि पुरातत्व संग्रहालय इमारतीचे बांधकाम, तांत्रिक कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या दुसऱ्या  टप्याच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था येथे प्रत्येकी २०० मुला-मुलींच्या वसतीगृह बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीत मुंबई येथील अधिक्षक अभियंता यांनी भारतरत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासंदर्भात सादरीकरण केले. मुंबईतील जवळपास १५ संस्थाच्या नवीन इमारती व अस्तित्वातील इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच  राज्यातील सर्व तंत्र निकेतन इमारतीचे दुरुस्ती व नुतनीकरण कामाचा आढावा घेण्यात आला.

कोल्हापुर  येथील नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  आवश्यक विविध बांधकामाबाबत अधीक्षक अभियंत्यांनी माहिती दिली. पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलां-मुलींच्या वसतिगृहासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी सादरीकरण केले. रायगड जिल्ह्यातील बाटू लोणेरे, जळगांव येथील प्रस्तावित सह संचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.

०००

बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा २०२३ राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न

मुंबई, दि.14 : पश्चिम नौसेना कमांड, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेला बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा 2023 राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्यात प्रथम नौदलाच्या संगीत बँडचे प्रदर्शन, सुर्यास्त सोहळा, फ्लॅाय पास्ट, कन्टीन्यूटी ड्रील, सेलर्स हॉर्नपाईप नृत्य, लाईट टॅटू ड्रमर नृत्य आदींचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

००००

 

सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रम

नागपूर, दि.14 : इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग व मेटाच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सायबर विश्वात सुरक्षित ठेवण्यासाठी मिशन ई-सुरक्षा हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. वनामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खा.सुनील तटकरे, आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे, सदस्य ॲड संगिता चव्हाण, दीपिका चव्हाण, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, गौरी छाब्रीया, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील व मेटाच्या अश्विनी देसाई उपस्थित होते.

समाजमाध्यमांमध्ये काही अपप्रवृत्ती सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करतात. महिलांची बदनामी, चारित्र्यहननासारखे प्रकार वाढले आहे. यासाठी पोलिसांचा सायबर सेल काम करतो. परंतू अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येकाने सामुहिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांद्वारे महिला व मुलींची बदनामी होणार नाही. तसेच समाजविघातक प्रवृत्ती बळावणार नाही. यासाठी व्यापक जनजागृतीची देखील गरज असल्याचे श्री.पवार म्हणाले.

संपुर्ण जग इंटरनेटने जोडले गेले आहे. समाजमाध्यम अविभाज्य भाग झाला आहे. यापासून आपल्याला दूर जाता येणार नाही. त्यामुळे अशा माध्यमांचा वापर करतांना प्रत्येकाने सामाजिक भान, दक्षता व खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. महिलांनी या माध्यमांचा वापर करतांना अधिक काळजी घेतली पाहिजे. वाईट प्रकार घडत असल्यास त्याची तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे. पोलिस विभागाने देखील अशा तक्रारींवर कालमर्यादेत कारवाई करावी, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

राज्य शासनाच्यावतीने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीचा 3 टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मालमत्ता खरेदीत महिलांना स्टॅम्प ड्युटीत 1 टक्का सवलत देण्यात आली आहे. महिलांच्या कल्याणासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतो. आवश्यकता भासल्यास अधिक निधी देऊ. आयोगाच्यावतीने महिलांसाठी सुरु करण्यात आलेला मिशन ई-सुरक्षा हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचे श्री.पवार म्हणाले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, डिजीटल वापरात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणावर वापर होत असतांना वापरकर्त्यांची सायबर सुरक्षा देखील महत्वाची आहे. यासाठी आयोगाने सुरु केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. इंटरनेट, समाजमाध्यमे वापरतांना आपण देखील सजग राहून वापर केला पाहिजे.

काही गोष्टी नव्याने निर्माण होत असतांना त्याचे काही दुष्परिणामही भोगावे लागतात. वाईट प्रवृत्तींमुळे महिलांना समाजमाध्यमांवर वाईट प्रसंगांना समोर जावे लागते. बदनामीकारक, अश्लील गोष्टी समाजमाध्यमांमुळे झपाट्याने पसरतात. यावर आळा घालण्यासाठी प्रत्येकाला या माध्यमाचा सुरक्षित वापर कसा करावा, याबाबत जागृत असणे आवश्यक आहे, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मिशन ई-सुरक्षा विषयी माहिती दिली. समाजमाध्यमांमध्ये महिलांची सर्वात जास्त बदनामी होते. त्यामुळे या माध्यमांचा वापर करतांना तो सुरक्षितपणे कसा करावा, काय काळजी घेतली जावी, यासाठी राज्यभर महिला, मुलींना या उपक्रमाद्वारे सायबर सुरक्षित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुर्वी हुंडाबळी, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार हे महिलांच्या बाबतीत प्रमुख प्रश्न होते. आता सायबर सुरक्षा हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्या म्हणाल्या. आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे यांनी प्रास्ताविक केले.

मेटाच्या अश्विनी देसाई यांनी यावेळी उपस्थित महिला, मुलींना समाजमाध्यमे वापरतांना घ्यावयाची काळजी, दक्षता, सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. मेटाच्या सहकार्याने आयोगाच्यावतीने संपुर्ण राज्यभर मिशन ई-सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचलन अनिरुद्ध पाटील यांनी केले तर आभार आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी मानले. यावेळी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

00000000 

विधानसभा कामकाज

मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरदि. १४ : प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची जन्मभूमी पंजाब असली तरी कर्मभूमी मात्र महाराष्ट्र आहे. त्यांची जन्मशताब्दी साजरी करताना यथोचित कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना सांस्कृतिक कार्य विभागाला करण्यात येईलअशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

0000

पवन राठोड/ससं/

विधानपरिषद इतर कामकाज

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 14 : केंद्र शासनाने कालच देशातील परदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) आकडेवारी जाहीर केली असून तीन महिन्यांत 28 हजार 828 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक राज्यात आली आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकावर येणारे राज्य ठरले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य जयंत पाटील यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, आशिया खंडातील औद्योगिक विकास महामंडळाची ओळख लॅण्ड बँक म्हणून ओळखले जात आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र त्याठिकाणाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम शासन करत आहे. रायगड जिल्ह्यातील जे प्रकल्प सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या शंका दूर केल्या पाहिजे. त्या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निवारणासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याठिकाणी असलेल्या 75 टक्के जमिनी खासगी आहेत. 25 टक्के जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत. खासगी जमिनीबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

नैना प्रकल्पाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून कोणावरही अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका आहे. नैना प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रायगड जिल्ह्यात 35 हजार कोटींची गुंतवणूक होणार

कोकण विकास समोर ठेवून कोकणाला विधायक दृष्टीने पुढे कसे नेता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 35 हजार कोटींची गुंतवणूक येणार असून रायगडच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मँगो पार्क प्रकल्पासाठी दोनशे एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोकणाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्या -ज्या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळे आहेत, त्याठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार असून उद्योग विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथे उभारण्यात येणारे प्रशिक्षण केंद्र देशातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी 500 कोटींची गुंतवणूक राज्यात करण्यात येत आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात 15 जिल्ह्यात उद्योग भवन निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी दीडशे कोटी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्याला मिळणार उद्योग नगरीची ओळख

बीडीपी प्रकल्प हा राज्यातून गेला नसून रायगड जिल्ह्यात होणाऱ्या या प्रकल्पाला मुर्त स्वरूप मिळेल. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटना महत्त्वाचा जिल्हा असून या ठिकाणी मोठ्या प्रकल्प येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही लाईड नावाची  कंपनी येत आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक हजार हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. यापुढे गडचिरोली जिल्हा उद्योग नगरी म्हणून ओळखला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील 18 घटकांना घेऊन विश्वकर्मा योजना च्या माध्यमातून प्रत्येक घरातील एका व्यक्तीला रोजगार मिळेल. ही योजना चळवळ म्हणून राज्यात राबविण्याच्या प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला मोबदला दिला जाईल. कामगारांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या पाठिशी  खंबीरपणे उभे राहण्याचे काम शासन करत आहे. राजकारण विरहित प्रकल्प राज्यात आले पाहिजे हे उद्योजकासाठी महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, सचिन अहिर, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला होता.

०००००

प्रविण भुरके/विसंअ

 

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

राज्यातील कुठलीही शाळा बंद होणार नाही  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि.14 : राज्यातील कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी समूह शाळा धोरण ठरविले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रस्तावाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. केसरकर बोलत होते. या चर्चेत सदस्य आमश्या पाडवी यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्यातील कुठल्याही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. त्यांच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वीज, पाणी यांसह विविध शैक्षणिक सुविधांसाठी संबंधित विभागांची बैठक घेऊन त्या देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

——————————————————————————-

सखी सावित्री समितीची स्थापना न करणाऱ्या शाळांवर कारवाई- शिक्षणमंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि.१४ : राज्यात बहुतांश शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली आहे. अद्यापही ज्या शाळा सखी सावित्री समितीची स्थापना करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समितीची स्थापना करण्याबाबतचा प्रश्न सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, प्रवीण दरेकर, श्रीमती मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला .

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, प्राथमिक, शिक्षण संचालनालयाकडून शाळा, केंद्र, तालुका/ शहर स्तरावर  सखी सावित्री समिती गठित करण्याबाबत 5 ऑक्टोबर 23 रोजीच्या पत्रान्वये निर्देश देण्यात आले आहेत. शाळा, केंद्र, तालुका / शहर स्तरावर सखी सावित्री समिती गठित करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु अद्यापही ज्या शाळांनी सखी सावित्री समिती गठित केली नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच तालुकास्तरीय सखी सावित्री समितीच्या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलविण्यात येणार आहे.

0000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

——————————————————————————-

शाळा व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक– शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि.१४ : राज्यातील शाळा व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / वर्ग तुकड्यांना प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. केसरकर बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत आसगावकर, कपिल पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, किशोर दराडे आदींनी सहभाग घेतला होता.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सद्यःस्थितीत पात्र / अपात्र शाळांबाबतच्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या 8 हजार 821 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यात आले असून विहित निकषांची पूर्तता न करणाऱ्या १८२२ शाळा अनुदानासाठी अपात्र करण्यात आल्या आहेत. शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णय, परिपत्रक, पत्रातील अटी व शर्तीनुसार तपासणी करून अनुदानासाठी पात्र  होणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणित संचमान्यता पूर्ण करून, अनुदानासाठी पात्र ठरत असलेल्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका असून याबाबतच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या त्रुटींचे निराकरण करण्यास शासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

—————————————————————————

अनाथ, दिव्यांग, एचआयव्हीग्रस्त मुलींना शिधापत्रिकेसह सुविधा  अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

नागपूर, दि.14 – राज्यातील अनाथ, दिव्यांग व एच.आय.व्ही.ग्रस्त मुलींना शिधापत्रिका व शिधावाटपाची  सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.

शिधापत्रिका व शिधावाटपाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, राज्यस्तरीय अनाथ सल्लागार समितीचे सदस्य आमदार श्रीकांत भारतीय यांनी 26 एप्रिल 2023 रोजीच्या पत्रान्वये 11 अनाथ, दिव्यांग व एच.आय.व्ही. ग्रस्त मुलींना शिधापत्रिका  तसेच शिधावाटप उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. याप्रकरणी  चौकशी करण्यात आली असून पत्रात नमूद 11 मुलींचे निवासी पत्ते व संपर्क क्रमांक यांची माहितीच्या अनुषंगाने संबंधित मुलींचे निवासी पत्ते, संपर्क क्रमांक व शिधापत्रिका वितरित  करण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त करून घेऊन त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

शिधापत्रिका वितरित करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अनाथ, दिव्यांग  व एच.आय.व्ही.ग्रस्त व इतर समाजघटकांना नियमानुसार प्रचलित पद्धतीने शिधापत्रिका वितरित करण्यात येतात. यासाठी वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयाकडून मोहिमेचे आयोजन करून शिधापत्रिका वितरित करून त्यावरील अनुज्ञेय लाभ देण्यात येतात. तसेच अकरा मुलींच्या शिधापत्रिका देण्यास उशीर का झाला याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 —————————————————————————–

मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि. 14 : मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करून खेळांडूसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रश्न सदस्य  विलास पोतनीस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, क्रीडा संकुल दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यादृष्टीने दुरुस्तीची कामे सुरू आहेत. क्रीडा संकुलातील जलतरण तलाव बंद केला जाणार नाही. यासाठी लागणारे आवश्यक पाणी सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या सूचनाही विचारात घेऊन प्रत्यक्ष त्यांची क्रीडा संकुलात भेट आयोजित करण्यात येईल.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

विधानपरिषद लक्षवेधी

सांबरकुंड वन जमीन हस्तांतरणांसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.१४ : कोकणातील सांबरकुंड वन जमीन हस्तांतरणांसाठी  केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी प्रतिक्षेत असून पाठपुरावा सुरू आहे. त्यास अंतिम मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांवर पाणी योजना राबवण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केले होते, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

श्री फडणवीस म्हणाले, बाळगंगा प्रकल्पाच्या धरणाचे काम भौतिकदृष्ट्या ८० टक्के झाले आहे. सदर प्रकल्पाद्वारे सिडको नवी मुंबई क्षेत्रास पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या वाढीव खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. सिडकोने प्रकल्पाचा उर्वरीत खर्च शासनामार्फत करणेविषयी सूचित केले आहे. तरी सदर प्रकल्पाच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजूरी देण्याची कार्यवाही शासनस्तरावर प्रगतीपथावर असून मंजूरीनंतर निधी उपलब्धतेनुसार प्रकल्पाची पुढील कामे  पूर्ण करणेचे नियोजन आहे.

रायगड जिल्ह्याचा शाश्वत विकास घडवताना बाळगंगा हेटवणे, सांबरकुंड ,काळकुंभे, आंबोली हे  प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, आमश्या पाडवी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

——————————————————————————–

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी पाठपुरावा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १४ : विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे. कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पुढील दोन दिवसांत दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी वैधानिक विकास मंडळांचे तातडीने पुनर्गठन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेतील या विषयावरील लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, नागपूर करारातील तरतुदींनुसार विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळे 1994 ला पाच वर्षांसाठी स्थापन झाली. त्यानंतर या मंडळांना आपण वेळोवेळी मुदतवाढ देत आहोत. त्यानुसार 27 सप्टेंबर, 2022 ला या मंडळांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्याच्या विविध प्रश्नांसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दोन दिवसांत राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे, त्यावेळी या विषयाबाबतचा पाठपुरावा करण्यात येईल.

यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या निधीसंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यपालांच्या निर्देशानुसार वार्षिक योजनेतील विभाज्य नियतव्ययाच्या वाटपाकरिता विदर्भासाठी 23.03 टक्के, मराठवाड्यासाठी 18.75 टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 58.23 टक्के याप्रमाणे सूत्र निश्चित करुन देण्यात आले आहे. तथापि, 2013-14 ते 2020-21 या कालावधीत विदर्भासाठी 27.97 टक्के, मराठवाड्यासाठी 19.31 टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 54.05 टक्के इतक्या निधीचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले आहे. राज्यात वैधानिक विकास मंडळे अस्तित्वात नसताना सुध्दा  2020-21 ते 2023-24 या कालावधीत विदर्भ-मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाड्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही, निधीची कमतरता भासू दिली ‍जाणार नाही. तसेच कोकणासह उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येईल. राज्याचा समतोल विकास, अनुशेष निर्मूलन याबाबतीत सरकार गंभीर असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

0000

दिवासींच्या जबरदस्तीच्या धर्मांतराची तक्रार आल्यास तत्काळ कारवाई मंत्री मंगलप्रभात लोढा

नागपूर, दि. 14 : विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिली. त्याचप्रमाणे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याच्या तक्रारी आल्यास त्याची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईलअसेही मंत्री श्री. लोढा यांनी विधानपरिषदेत सांगितले.

आदिवासी व्यक्तीच्या धर्मांतरांच्या प्रश्नाबाबत निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली  होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते. ते म्हणाले की, आदिवासी समाजाने आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करून जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशावेळी वेगवेगळी प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मपरिवर्तन केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी निवृत्त कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल. या समितीत सर्व राजकीय पक्षांचे (विधानसभा/विधानपरिषद) प्रतिनिधी आणि दिवासी समाजातील दोन व्यक्तींचा समावेश असेल. ही समिती 45 दिवसांच्या आत शासनाला अहवाल सादर करेल.

या लक्षवेधी सूचनेच्यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य सर्वश्री एकनाथ खडसेप्रवीण दरेकरगोपीचंद पडळकरराजहंस सिंहकपिल पाटील यांनी सहभाग घेतला होता.

 

००००

प्रवीण भुरके/विसंअ

 नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि.१४ :  उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्यातील नवीन इमारती उभारणी तसेच जुन्या इमारत दुरुस्ती  बांधकामास गती देवून ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी येत्या ८ दिवसात निविदा काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीबाबत  श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील मॉरीस महाविद्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक  झाली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दसपुते, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अजित बाविस्कर आदी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरामध्ये विविध बांधकाम नियोजित असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या कामास गती देण्यासाठी श्री. पाटील यांनी येत्या आठवड्यात निविदा काढण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (नागपूर) अधिक्षक अभियंते जनार्दन भानुसे आणि कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते. याशिवाय विद्यापीठ कॅम्पस परिसरात टेक्नॉलॉजी ॲण्ड एनर्जी पार्क बांधकाम, प्राचीन इतिहास आणि पुरातत्व संग्रहालय इमारतीचे बांधकाम, तांत्रिक कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या दुसऱ्या  टप्याच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था येथे प्रत्येकी २०० मुला-मुलींच्या वसतीगृह बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीत मुंबई येथील अधिक्षक अभियंता यांनी भारतरत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासंदर्भात सादरीकरण केले. मुंबईतील जवळपास १५ संस्थाच्या नवीन इमारती व अस्तित्वातील इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच  राज्यातील सर्व तंत्र निकेतन इमारतीचे दुरुस्ती व नुतनीकरण कामाचा आढावा घेण्यात आला.

कोल्हापुर  येथील नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  आवश्यक विविध बांधकामाबाबत अधीक्षक अभियंत्यांनी माहिती दिली. पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलां-मुलींच्या वसतिगृहासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी सादरीकरण केले. रायगड जिल्ह्यातील बाटू लोणेरे, जळगांव येथील प्रस्तावित सह संचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.

0000

 

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी २७ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि.१४ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन २०२२-२३ या  वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शकांकडून  अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराकरिता २७ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२२-२३ या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष असे आहेत :

क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव्य असावे.

वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत. सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षांत किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिलां (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू तयार केले असतील, असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.

खेळाडू पुरस्कार (पुरुषमहिला आणि दिव्यांग)

खेळाडूने पुरस्कार वर्षासह पूर्व ५ वर्षांपैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे. खेळाडूंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगत पूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरीष्ठ, कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्रशासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ट तीन वर्षांच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.

या पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक २७ डिसेंबर २०२३  पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई – ४००१०१ येथे सिलबंद पाकीटामध्ये सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२/२८८७११०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे  जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

००००

 

 

 

ताज्या बातम्या

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. 8 : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर...

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H2OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
मुंबई, दि. 8 - गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या 'प्रोजेक्ट H2OPE' (होप)...

सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा  वापर सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ :  राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे...

राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

0
मुंबई, 8 : राज्यात मागील 24 तासांमध्ये (8 जून रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड 20.8 मिमी, धाराशिव 13.8 मिमी, ठाणे 7.9 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून आज 8 जून  रोजी...