सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 883

नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा झपाट्याने विकास – डॉ. विजयकुमार गावित

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

नंदुरबार, दि. १९ ( जिमाका वृत्त) – महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी उकाई धरणाचे बॅकवॉटर आपल्या राज्याच्या वाट्याला आले. ते उचलण्यासाठी कुठलीही शाश्वत अशी यंत्रणा आजपर्यंत नव्हती. परंतु हे बॅकवॉटर उचलण्यासाठी १६ लिफ्टच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग मोठ्या प्रमाणावर सुजलाम्-सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. तसेच २५ वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले..

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (नाशिक) प्रशांत औटी, कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, उपविभागीय अधिकारी जेरा वळवी, गणपत गावित, चेतन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, रस्ते,वीज आणि जलसिंचन या त्रिसूत्रीवर येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असून उकाई डॅमच्या बॅकवॉटरमुळे जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, नवापूर आणि नंदुरबार हे तालुके सिंचनाखाली येत सुजलाम्-सुफलाम होणार आहेत. जिल्हा निर्माण झाला त्यावेळी जिल्ह्याचा निम्मा कारभार धुळे जिल्ह्यातील त्या-त्या विभागांच्या कार्यालयांमधून सुरू होता. आज मला सांगताना अतिशय आनंद होतोय की, जिल्ह्यात प्रत्येक विभागाचे स्वतंत्र कार्यालय असून काही कार्यालये अतिशय देखण्या आणि टुमदार इमारतींमध्ये जनसेवेचे काम करत आहेत. आज ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे कार्यालय उभे आहे, तेथे डोंगरदऱ्यांनी व्यापलेला निसर्गरम्य परिसर असून येणाऱ्या काळात या परिसरात स्टेडियम, वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रूग्णालय, आदिवासी सांस्कृतिक भवन यासारख्या जिल्ह्याच्या विकासाला रूपेरी किनार देणाऱ्या इमारती उभ्या राहणार आहेत. एकप्रकारे नवीन नंदुरबारच या परिसरात साकारणार आहे. देखण्या वास्तूत सचोटीने आणि उर्जेने काम करण्याची प्रेरणा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात निर्माण होत असते. जिल्हा निर्मितीपासून तर आजपर्यंत प्रत्येक त्रुटींवर मात करत पुढे वाटचाल करताना असे लक्षात आले की, जिल्ह्यात शासन-प्रशासन स्तरावर अधिक कार्यक्षमतेने काम करायचे असेल तर बहुविध कनेक्टिविटी ची गरज आहे. तसेच शाश्वत स्वरूपाच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीची गरज आहे. आपण मंत्री झाल्यानंतर ज्या विभागाने ज्या गोष्टींची मागणी केली ती तात्काळ देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचीच फलश्रुती म्हणजे ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन एक वर्षापूर्वी केले होते, त्याचे उद्घाटन व लोकार्पण आज आपण स्वत: करत असल्याचे सांगताना त्यांनी आज आदिवासी विकास विभागाकडे मागणी केल्यास ८ दिवसात निधी दिला जाईल याबाबत आश्वस्त केले. ते म्हणाले, राज्यात १५२ शासकीय आश्रमशाळा स्वत:च्या इमारती तयार होताहेत त्यातील ६३ एकट्या नंदुरबार जिल्ह्याच्या आहेत. प्रत्येक शासकीय इमारतीसोबत कर्मचारी, अधिकारी यांची शासकीय निवासस्थाने करण्यावरही आपला भर आहे.

नव्या संकल्पनांचे स्वागत आणि गतिमान कामाबद्दल अभिनंदन डॉ. सुप्रिया गावित

सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कार्यालयीन इमारत बांधकामात ज्या नवीन संकल्पना अंगीकृत करून एक देखणी आणि आगळी-वेगळी वास्तू निर्माण केली त्याबद्दल त्यांच्या नव्या संकल्पनांचे स्वागत असून, भूमिपूजनानंतर अवघ्या एका वर्षात इमारतीचे उद्घाटन करून एक गतिमान काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग अभिनंदनास पात्र आहे, असे  प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी यावेळी केले.

२५ फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन डॉ. हिना गावित

नंदुरबार एका नव्या रूपात विकसित होत असून गेल्या दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मोठ्या प्रगतीचे शिखरं पार करतोय. त्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राला एका शिखरावर घेऊन जाणारा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून, या वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला व भूमिपूजन सोहळा २५ फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत आहे. ज्याप्रमाणे आज या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे काम गतीने आणि गुणवत्तेने झाले, त्याच गतीने प्रत्येक शासकीय इमारतीचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना तसा आदर्श घालून देण्याचे आवाहनही यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले. तसेच लोकप्रतिनिधींचे जनतेप्रति असलेले स्वप्न साकार करण्याचे काम प्रशासकीय अधिकारी करत असल्याचेही खासदार डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संगीत विभागाला २५ हजार रुपयांचे बक्षीस

मुंबई, दि. 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडा भवन येथे शिवजयंतीनिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या संगीत विभागातर्फे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा तसेच देशभक्तीपर गीतांचे  सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी पालिकेच्या संगीत विभागाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

या कार्यक्रमाला पालिकेचे प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहरे) डॉ. अश्विनी जोशी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किशन जाधव तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

BMC celebrates Shiv Jayanti 

Maharashtra Governor Ramesh Bais attended the Shiv Jayanti celebrations organised by the Brihan Mumbai Mahanagarpalika at Krida Bhavan near Shivaji Park Mumbai. A cultural programme comprising patriotic songs on the life and work of Chhatrapati Shivaji Maharaj was presented by the Music Department of BMC.       The Governor announced a prize of Rs. 25000 to the Music Department of BMC on the occasion.

Administrator Dr I S Chahal, Additional municipal commissioner Dr Ashwini Joshi were among those present.

छत्रपती शिवाजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान मंत्रालयातील माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेस मंत्री श्री केसरकर यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.        

शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारुढ पुतळ्याला आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे किशन जाधव आदी उपस्थित होते.

Governor Bais garlands statue of Chhatrapati Shivaji Maharaj on Shiv Jayanti

Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Shivaji Park Mumbai on the occasion of Shiv Jayanti.

Guardian Minister of Mumbai Deepak Kesarkar, administrator of BMC I S Chahal, Kishan Jadhav of Chhatrapati Shivaji Maharaj Smarak Samiti were among those present.

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करु. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते.

शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. आग्र्याला देखील दिवाण-ए- आम येथे शिवाजी महाराज यांची जयंती गतवर्षीपासून साजरी करतो, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा

निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे १५ कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन

मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.  ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. ‘जाणता राजा’ महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

किल्ल्यांच्या विकासाकरिता एएसआयचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक  – देवेंद्र फडणवीस

राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी राज्यभिषेक केला; परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जो पर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारत भूमीत होतच राहील. शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार, चरित्र बालकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम करण्यात येत आहे. त्यामुळे रयतेने विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली असून त्यांच्या कल्याणकरिता प्रयत्न करु, असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले.

माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या मूलमंत्राचे रोपण केले. समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करून, त्यामधील पुरुषत्व जागृत केले. मुगलासारख्या बलाढ्य शत्रूचा नि:पात केला. शिवरायांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली, असेही त्यांनी सांगितले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास, आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करीत आहोत. शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी रायगड किल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून अखंड हिंदुस्थानसोबत युरोपातील राज्यसत्तांना अचंबित केले. हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत. त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा, एकतेचा विचार येत्या पिढीला कळण्याचा निर्धार या जयंतीनिमित्त करुया. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांमध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्याकाळात शिवरायांनी पेरला. परकीय सत्तेसमोर सार्वभौम स्वराज्याची स्थापन करत रयतेला आपले वाटावे असे राज्य, स्वराज्य त्यांनी स्थापन केले, याची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे.

जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सूचना केली.

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथळने येथील विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

शिवाई देवराईआणि वन उद्यानाचे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.

शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’ विकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव या भूमीवर आचंद्रसूर्य असणार आहे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. 18 (जिमाका) -छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव इथे आचंद्रसूर्य असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आपण पुस्तकात वाचतो पण ‘जाणता राजा ‘ हे महानाट्य पाहताना तो पराक्रम जिवंत होतो. त्यामुळे ‘जाणता राजा’ हे महानाट्य अनुभवायलाच हवं, उद्या आणि परवा दोन दिवस जिल्ह्यातील शिवप्रेमींनी ते अनुभवावं असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

     छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला पोलीस कवायत मैदान येथे ‘जाणता राजा ‘ या महानाट्याची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरतीने सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी सोपान कासार यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

     छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन हे संघर्षमय आणि प्रेरणा देणारे असल्याने त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘जाणता राजा’  हे महानाट्य प्रत्येक मराठी माणसाला आणि शिवप्रेमी माणसाला प्रेरणा देत असते.

     जळगावमध्ये याआधीदेखील ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग झाला होता, त्यावेळीदेखील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याची आठवण पालकमंत्र्यांनी यावेळी करून दिली. हा सुंदर उपक्रम सुरू केल्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले. जळगाव शहरात आयोजन करण्यात आलेल्या या महानाट्याचा लाभ जळगावकरांनी घ्यावा,असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणता राजा महानाट्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.

शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत लोकार्पण

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका):  थोर, प्रतिभावंत साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती जतन करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे जिल्हा वार्षिक योजनेतून 50 लाख रुपये व जिल्हा परिषदेच्या 30 लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, स्वर्गीय शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी शिवाजीराव सावंत, मुलगा अमिताभ सावंत, पत्रकार तथा निर्धार संस्थेचे समीर देशपांडे व मृत्यंजय प्रतिष्ठान चे सागर देशपांडे तसेच सावंत कुटुंबीय व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. हे दालन उभारण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा व कुटुंबीयांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

      पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, अत्यंत प्रतिकूल शेतकरी कुटुंबात शिवाजीराव सावंत जन्मले होते. लहानपणी एका निबंधामध्ये त्यांनी ‘आपण लेखक होणार’ असे लिहिले होते आणि याच दिशेने प्रवास करत जिद्दीने ते थोर प्रतिभावंत साहित्यिक बनले. शिवाजीराव सावंत हे हयात असते तर साहित्य क्षेत्राला आणखी झळाळी मिळाली असती अशा शब्दात त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करुन शिवाजीराव सावंत स्मृती दालन जतन होण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. पारगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शिवाजीराव सावंत स्मृती दालनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळेल  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, प्रख्यात साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या केवळ आठवणी न जपता समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम पुण्यात सुरु केला आहे, हे प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे उत्कृष्ट स्मृती दालन उभारण्यात आले असून त्याची देखभाल दुरुस्तीही वेळोवेळी व्हायला हवी. शिवाजीराव सावंत स्मृती दालनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन या दालनामध्ये राज्यातील नामांकित साहित्यिकांच्या उपस्थितीत वर्षातून एक तरी साहित्यिक सोहळा आयोजित करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

   आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, सध्या केवळ सोशल मीडियातील मजकुराच्या वाचनावर आपला भर असल्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आजऱ्यात उभारण्यात आलेले हे स्मृतती दालन सध्याच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. या दालनाचा उपयोग तरुण पिढीला जास्तीत जास्त पद्धतीने कशा प्रकारे होईल यासाठी प्रयत्न व्हावेत. शासकीय इमारती दालने यांचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रयत्न व्हावेत. स्वर्गीय सु.रा. देशपांडे यांच्याप्रमाणे त्यांची दोन्ही मुले पत्रकार सागर व पत्रकार समीर देशपांडे हे सामाजिक कार्यासाठी झटत असून हे दालन उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.

           शिवाजीराव सावंत स्मृतीदालन हे जिल्ह्यासह राज्यभरातील युवकांना माहितीपूर्ण व मार्गदर्शनपर ठरेल, असा विश्वास आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला.

           साहित्यिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात साहित्यिक शिवाजीराव सावंत यांचे स्मृतीदालन युवकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन विविध क्षेत्रात नाव उंचावणाऱ्या आजरा तालुक्यातील प्रतिभावंतांच्या माहितीवर आधारित कलादालन उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळावा, अशी अपेक्षा प्रास्ताविकातून निर्धार संस्थेचे समीर देशपांडे यांनी व्यक्त केली.

  मृत्युंजय प्रतिष्ठानचे सागर देशपांडे यांनी साहित्यिक शिवाजीराव सावंत यांचे जीवनचरित्र उलगडले. शिवाजीराव सावंत यांचे साहित्य वाचून प्रेरणा घेवून अनेक व्यक्तींनी आत्महत्येचा विचार बाजूला सारला, तर अनेकांना सीमेवर लढण्याचे बळ मिळाल्याचे दाखले त्यांनी मनोगतातून दिले. साहित्यकृती जगण्याचे बळ देतात, जवानांना देशासाठी लढण्याचे बळ देतात. वाचन संस्कृती जपण्यासाठी, साहित्यिकांच्या स्मृती जपण्यासाठी शासन सहकार्य करत असून समाजानेही यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिवाजीराव सावंत स्मृतीदालनाविषयी

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शिवाजीराव सावंत स्मृती दालनामध्ये साहित्यिक शिवाजीराव सावंत यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिलेल्या मृत्युंजय कादंबरी विषयीची माहिती, छावा कादंबरी चे पूजन केल्याच्या प्रसंगाचे छायाचित्र बालपण शिक्षण व विवाह मृत्युंजय कादंबरी ला मिळालेला भारतीय ज्ञानपीठ संस्थेचा 1995 चा मूर्ती देवी पुरस्कार जाहीर झाल्याचे व तत्कालीन उपराष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केल्याचे व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसोबतची छायाचित्रे, भावमुद्रा, पत्रव्यवहार शासनाच्या वतीने व विविध संस्थांच्या वतीने मिळालेले पुरस्कार, विविध ग्रंथसंपदा त्याचबरोबर त्यांच्या निधनाची वृत्तपत्रीय कात्रणे व शोकसंदेश देण्यात आला आहे. तसेच प्रतिभावंतांचे आजरे या दालनामध्ये कलामहर्षी बाबुराव पेंटर, प्रतिभावंत शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक, वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीपाद लक्ष्मण आजरेकर, केसरीचे युरोप प्रतिनिधी द. वि. ताम्हणकर, ,’ झुंजार’ चे संपादक बाबुराव ठाकूर, संयुक्त महाराष्ट्राचा लढा गाजवणारे शाहीर गव्हाणकर, ‘सोबत’ कार ग.वा. बेहेरे, संस्कृत पंडित के. ना. वाटवे यांचीही सचित्र माहिती याठिकाणी देण्यात आली आहे.

*******

आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

पुणे दि १८: आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून उमेदवारांना संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याच दिवशी आदेशही दिले जात आहेत.

ही भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन प्रक्रिया संपूर्ण पारदर्शी आणि सुरळीत पडण्याविषयी निर्देश दिले होते. आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील १० हजार ९४९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस संस्थेची निवड करण्यात आली होती.

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, फिंगर प्रिंट व आयरीस तपासणी सुविधा वापरण्यात आल्या आहेत . तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स ची व्यवस्थाही करण्यात आलेली होती. परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागनिहाय राज्यभर सुरू असून पुणे विभागातील आरोग्य भवन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, प्रबोधन हॉल पुणे येथे या विभागातील समुपदेशन व नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात येत आहेत. यामध्ये उमेदवारांना विभागाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले. उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया २ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व पदांची भरती प्रक्रिया अगदी पारदर्शी आणि सुरळीतरित्या पार पडल्याबद्दल निवड झालेल्या उमेदवारांनी प्रा. डॉ. सावंत यांचे आणि आरोग्य विभागाचे आभार मानले. काही उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी उमेदवारांनी भरती प्रक्रिये बाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी भरती प्रक्रियेची माहिती दिली.

वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या जागा भरणे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे.
००००

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याच्या आदर्शानुसार महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करण्याच्या दिशेने एकत्रित वाटचाल करूया – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

राज्यातील घराघरात शिवजयंती उत्सव साजरा करतानाच जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुयात

           मुंबई, दि. 18 :-  युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. सह्याद्रीच्या कडे-कपारीतील अठरा पगड मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली. ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच महाराष्ट्रात सुराज्य निर्मितीच्या दिशेने एकत्रित वाटचाल सुरु आहे, ही वाटचाल यापुढेही वेगवान पद्धतीने सुरू राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे. शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्यातील घराघरात साजरा करतानाच, जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करण्याचे आवाहन करुन त्यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवजयंती निमित्त दिलेल्या शुभसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करुन हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केले. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. स्वराज्य निर्मितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातील प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष जन्मला हे आपले भाग्य आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून घेतला होता. राज्यातील महायुतीचे सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानून काम करत राहील, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.

0000

मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा २० व २१ फेब्रुवारीला पारदर्शकपणे होणार- सचिव सुनील चव्हाण यांची माहिती

मुंबई,दि.१८: मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यासाठी आयुक्त, मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत  दि. १९/१२/२०२३ रोजी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून परीक्षा टी.सी. एस. कंपनीमार्फत, ऑनलाईन पद्धतीने दि. २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी 28 जिल्ह्यामध्ये एकूण 66 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पारदर्शी व व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पुरेशी दक्षता घेण्यात आली असून यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मृद व जलसंधारण सचिव सुनील चव्हाण यांनी दिली.

सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टि.व्ही.यंत्रणा, जॅमर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची पूर्वतपासणी करुनच प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांस कोणत्याही स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, ब्लुटुथ उपकरणे इत्यादी वापरण्यास व बाळगण्यास बंदी असणार आहे. उमेदवार प्रणालीमध्ये इंटरनेट अॅक्सेस नसणार आहे. शिवाय प्रश्नपत्रिका सीलबंद आणि सुरक्षितता बाळगून व्हीपीएन वापरुन डेटा सेंटरमध्ये हस्तांतरित केली जाणार आहे.

संपूर्ण परीक्षा पारदर्शी पध्दतीने पार पाडण्याबाबत swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर सूचना प्रसारित केल्या आहेत. यासंदर्भात टीसीएस कंपनीचे प्रतिनिधी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची मंत्रालयात 18 फेब्रुवारीला सविस्तर बैठक घेवून सूचना दिल्याची माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली.

परीक्षा केंद्राबाहेर आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सर्व परीक्षा केंद्रांवर विभागाकडून निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) अभियांत्रिकी सेवा परीक्षा, २०२२ च्या मुलाखती दिनांक २०/०२/२०२४ ते दि.२७/०२/२०२४ या कालावधीत आयोजित केल्या आहेत. सदरहू अभियांत्रिकी सेवा परीक्षा, २०२२ च्या मुलाखतीसाठी  पात्र ठरलेल्या व दि.20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजीच्या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विनंती करण्यात आली असून आयोगाकडून मुलाखतीसाठी सुधारित दिनांक देण्यात येणार आहे.  याची सर्व संबंधित परीक्षार्थींनी नोंद घेण्याचे आवाहन सचिव श्री. चव्हाण यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...