रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 879

कोकणासह कोल्हापुरातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासह काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

काजूबोंड रसावर प्रक्रियेसाठीच्या तंत्रज्ञानाकरिता ब्राझीलसोबत सामंजस्य करार करण्यात यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

काजू प्रक्रिया उद्योगांना ‘एसजीएसटी’चा परतावा ५ मार्चपूर्वी द्या; ‘सीजीएसटी’ची अडीच टक्के रक्कमही तातडीने परत करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. २१ :- कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा. काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा ५ मार्चपूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची अडीच टक्के रक्कम देखील राज्य शासनातर्फे तातडीने परत करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उद्योगाचा विकास साधण्याच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस पणनमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, काजू उत्पादक विभागातील स्थानिक आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, शेखर निकम, महाराष्ट्र कॅश्यू मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, काजू उत्पादकांना जीएसटीमध्ये सवलत देण्याबरोबरच काजू बोंडूपासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारून काजू पिकाच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उत्पादकांचा विकास साधला जाईल. जीएसटी करप्रणालीमध्ये काजू बियांसाठी पाच टक्के व काजूगराला पाच टक्के असा दुहेरी कर लागला आहे. यापैकी राज्याचा २.५ टक्के कराचा परतावा मिळत असून ‘सीजीएसटी’च्या २.५ टक्के परताव्याची रक्कम देखील राज्य शासनामार्फत दिली जाईल. या अनुषंगाने उद्योग विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या ३२ कोटींच्या प्रस्तावांपैकी २५ कोटींच्या प्रस्तावांना वित्त विभागाने मान्यता दिली असून शिल्लक १५० प्रस्तावांचा परतावा ५ मार्चपर्यंत देण्यात यावा. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोकण आणि कोल्हापूर परिसरात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून या परिसरात काजू बियांवर प्रक्रिया करणारे उद्योग कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त काजू बोंडूचे सुमारे २२ लाख मे.टन उत्पादन होत असून काजूच्या बोंडूंना विशिष्ट वास येत असल्याने ते प्रक्रिया न होता वाया जाते. ब्राझीलमध्ये यावर संशोधन होऊन अशा बोंडांचा वास घालवला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने तयार केली जातात. कोकणातील काजू बोंडांवर अशी प्रक्रिया करून उत्पादने तयार करण्यासाठी ब्राझीलसोबत करार करण्यात यावा. यासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादन क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन याबाबतची कार्यवाही करावी. यासाठी काजू मंडळाचे कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू संशोधन केंद्राच्या इमारतीत स्थापन करावे. यासाठी लागणारा निधी वित्त विभागामार्फत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत कोकण विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यांमध्ये काजू फळपिक विकास योजना लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पणन विभागामार्फत काजू फळ पिकाच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामार्फत राज्याचा काजू ब्रँड तयार करणे, काजू प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाबाबतच्या कार्यांना चालना देणे, उत्पादनांचे मार्केटिंग करणे आदी कामे करण्यात येत आहेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ काजू उत्पादकांना मिळवून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

०००

अमीन सयानींचा आवाज कित्येक पिढ्यांना आठवणीत राहील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली संवेदना            

मुंबई, दि. २१ : अनेक पिढ्यांवर आपल्या सुरेल आवाजाची मोहिनी घालणाऱ्या आणि कोट्यवधी रसिकांना खिळवून ठेवणारे ज्येष्ठ आकाशवाणी निवेदक आणि आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचे निधन प्रत्येक रसिकांसाठी दुःखदायक आहे. त्यांचा आवाज कित्येक वर्ष रसिकांच्या कानात गुंजत राहील आणि ही मोहिनी कायम राहील.” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या शोकसंदेशात मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणतात की, रेडिओ विश्वातील आवाजाचे जादूगार सुप्रसिद्ध रेडिओ प्रस्तुतकर्ता आणि उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. भारतात आकाशवाणीला लोकप्रिय बनविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. ‛बिनाका गीतमाला’ च्या माध्यमातून प्रत्येक घराघरात त्यांचा आवाज पोहोचला होता. अलीकडेच त्यांची मुंबईतील राहत्या घरी भेट घेऊन एका दिग्गज कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य प्राप्त झाले. रेडिओ विश्वातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, लिविंग लिजेंड अवार्ड, पर्सन ऑफ द इयर, अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या जाण्याने आवाजाच्या कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

000

दीपक चव्हाण/विसंअ/

अमीन सयानी यांना राज्यपालांची श्रद्धांजली

मुंबई, दि. २१ : राज्यपाल रमेश बैस यांनी प्रसिद्ध रेडिओ उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आकाशवाणी व रेडिओ सिलोनवरील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत अमीन सयानी यांनी हजारो सांगीतिक कार्यक्रम व जिंगल्स द्वारे जगभरातील रसिकांची मने जिंकली. ‘बहनो और भाईयो’ ही त्यांची उद्घोषणा देखील अतिशय लोकप्रिय ठरली.

 त्यांच्या अनोख्या शैलीमुळे रेडिओ सिलोनवरील गीतमाला व इतर कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्यांच्या निधनामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील एक शैलीदार रेडिओ उद्घोषक व आवाजाचा जादूगार गमावला आहे, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

०००

Governor condoles demise of Amin Sayani

Mumbai 21 : Governor Ramesh Bais has expressed grief over the passing of well known Radio presenter Amin Sayani.

In a condolence message, Governor Bais said that “During his long years with All India Radio and Radio Ceylon, Amin Sayani won the hearts of millions of music lovers with his unique presentation style and also through numerous jingles. His address ‘Behno Aur Bhaiyo’ also endeared him to the audience. It was largely due to his unique style that Radio Ceylon reached the pinnacle of its popularity. With his demise, the nation has lost one of the finest radio announcers and Voice artist in the post-independence era.”

000

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशीष शेलार, आमदार पराग आळवणी, संत गाडगे महाराज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश उर्फ भाऊ चौधरी उपस्थित होते.

 

मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन करणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असून महाराजांसमोर नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रभू श्री रामाप्रमाणेच समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम केले. सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण केली. गुलामगिरीच्या विरुद्ध लढा उभारला. माँ जिजाऊ साहेबांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. माता -भगिनींचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती, राजनीती, परराष्ट्रनिती याचा अभ्यास जगभरात केला जातो. त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे काम कसे करावे हा पाठ शिकवला, असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महिला सन्मान आणि महिला सुरक्षा या विषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करत आहेत. २०४७ पर्यंत भारत विकसित देश बनवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे. देशाची पुढील हजार वर्षांची वाटचाल कशी असावी याचा वस्तुपाठच महाराजांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमान, तेज यातूनच नव भारत निर्मितीचे काम करत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा कलावंत हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमीन सयानी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २१ : ज्येष्ठ रेडीओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्यकरणारा कलावंत हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमची पिढी ही रेडीओवरील अमीन सयानी यांचा आवाज ऐकतच मोठी झाली. त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने अनेक विक्रम रचले. या गीतमालेतील गाण्यांबरोबरच अमीन सयानी यांचा आवाज ऐकण्यासाठी रसिक आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पहात असत.  त्यांनी अनेकांना आपल्या आवाजाचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या निवेदनाच्या शैलीमुळे अनेकांनी आपल्या निवेदनात बदल केले. त्यांच्या निवेदनाची शैली असलेली निवेदकांची एक पिढी तयार झाली. भाषेवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या निधनाने एक थोर निवेदक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने रेडिओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 21 :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगीतिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडिओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानी यांनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडिओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडिओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीत रसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडिओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगीतिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडिओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती; पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 20 : राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता बिल्डरांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून बिल्डर त्यांच्याकडे धावत येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील मराठी माणसाची स्वप्नपूर्ती होणार, असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

गृहनिर्माण सहकार परिषदेतील स्वयंपुनर्विकास/पुनर्विकासाच्या निर्णयाबाबत अभ्युदयनगर येथे आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री दिपक केसरकर, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, राज्य शासनाने घेतलेल्या स्वयंपुनर्विकासाच्या निर्णयामुळे किमान 25 हजार वसाहती म्हणजेच साधारणपणे 5 लाख घरांची निर्मिती होणार आहे. तीन पिढ्यांपासून घराचे स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. बीडीडी चाळींचा बिल्डरांकडून नव्हे तर म्हाडाकडून विकास करण्याचा निर्णय घेतला. 100 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्यांना 560 स्क्वेअर फुटांचे घर दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अभ्युदयनगरच्या सीएनडीच्या विकासाचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्या, प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान 17 पोलीस वसाहती म्हाडाकडून विकसित केल्या जाणार असून बांद्रा रिक्लमेशन, आदर्शनगर वरळी, पीएमजीपी कॉलनी पुनमनगर, अंधेरीतील वसाहतींच्या विकासाचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

00000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३.३७ कोटी रुपये वितरित

मुंबई दि. 20 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत  23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 23.37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

0000

महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोराम राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई, दि. २० : अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री तसेच संसदीय समित्यांचा सदस्य या नात्याने आपण उत्तर पूर्वेतील प्रत्येक राज्यांना भेट दिली आहे. तेथील नैसर्गिक सौंदर्य जगातील सुंदर देशांना तोडीस तोड देणारे आहे.  पर्यटनासाठी विदेशात जाण्यापूर्वी आपण उत्तर पूर्व राज्यांना भेट दिली तर तेथील पर्यटन वाढेल व लोकांमधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

राज्यपाल  बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २० फेब्रुवारी) महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालय व एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोक गीत व नृत्यांचा सांस्कृतिक बहारदार कार्यक्रम सादर केला.

सूर्योदय पाहावयाचा असल्यास प्रथम अरुणाचल प्रदेश राज्याकडे पहावे लागते. त्या राज्यात लोक परस्परांना शुभेच्छा देताना ‘जय हिंद’ म्हणतात ही गोष्ट उल्लेखनीय असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आपण त्रिपुरा राज्यातील एका लहानश्या गावाला भेट दिली होती. तेथील स्वच्छता व प्रत्येक घरासमोरील फुलांची वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण थक्क झालो होतो, असे सांगून उत्तर पूर्व राज्यांच्या विकासाकरिता गेल्या दहा वर्षांमध्ये कसोशीने प्रयत्न झाले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत  देशातील विविध राजभवनांमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे करण्यात येत असून महाराष्ट्रात आतापर्यंत १८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे करण्यात आले. या उपक्रमामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांची कला, संस्कृती, परंपरा व नृत्य यांमधील समृद्धी पाहण्यास मिळाली, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

सिडनहॅम व एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही राज्यांच्या लोकगीत व नृत्यावर सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.  राज्यपाल बैस यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थी कलाकारांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ले. जन. के टी. परनाईक (नि) यांचा अरुणाचल प्रदेश स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत तसेच विद्यापीठांतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान संस्था व सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई या महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

 

Foundation Day of Arunachal Pradesh and Mizoram celebrated in Maharashtra Raj Bhavan

 

The State Foundation Day of Arunachal Pradesh and Mizoram was celebrated for the first time in Maharashtra Raj Bhavan in the presence of Maharashtra Governor Ramesh Bais on Tue (20 Feb).

The Arunachal Pradesh and Mizoram State Foundation Day was celebrated as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India.

A cultural programme depicting the rich culture, folk dance and traditions of Arunachal Pradesh and Mizoram was presented on the occasion. The Cultural programme was presented by the students of Dr Homi Bhabha State University. Two audio visual films showing the beauty and well known tourist destinations of the two States were also shown on the occasion.

The Governor complimented the students of the University for their excellent cultural presentation.

A video message of Arunachal Pradesh Governor Lt Gen K T Parnaik, PVSM, UYSM, YSM (Retd) was shown on the occasion.

Vice Chancellor of Dr Homi Bhabha State University Prof Rajneesh Kamat, Deans of affiliated colleges, members of faculty and students were present on the occasion.

०००

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरिता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दि. २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४  रोजी आयोजित केला जाणार असे घोषित करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव या तारखांमध्ये बदल झाला असून ठाणे येथे होणारा मेळावा २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल.

या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनवेस्टर्स व इनकुबेटर्स या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जावून उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येईल, मुलाखती देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

‘नमो महारोजगार’ मेळाव्याकरिता जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

संध्या गरवारे/विसंअ

ताज्या बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक सहाय्य योजना

0
वंचित घटकांतील नागरिकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग...

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...