बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 758

शिकाऊ व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या तारखेत बदल

मुंबई, दि.१८ : परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहनचालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी  व पक्का परवाना वाहनचालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे.

ज्या उमेदवारांची पक्क्या परवाण्याकरिता वाहनचालक चाचणी २० मे २०२४ रोजी होती, ती दि.२१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदलण्यात (Re-schedule) करण्यात आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश (SMS) देखील पाठविण्यात आले आहेत.

तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास, त्या सर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता  बदल केलेल्या (Re-scheduled) दिनांकांस भेट द्यावी. संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा हवामान खात्याकडून प्राप्त इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवा

 अमरावती, दि. 17 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी आज येथे दिले.

मान्सून पूर्व तयारीबाबत अमरावती विभाग आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून  दूरदृष्य  प्रणालीव्दारे उपस्थित होते. तर उपायुक्त  संजय पवार, गजेंद्र बावणे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांच्यासह दूरसंचार विभाग, भूजल सर्वक्षण यंत्रणा, महावितरण, जलसंपदा या विभागाचे प्रादेशिक प्रमुख, प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी व पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. पाऊस वादळ प्रसंगी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. आपात परिस्थितीसाठी सर्व विभागाने समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश दिले.

त्या पुढे म्हणाल्या की, नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या इमारती, पूलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे, तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत. आवश्यक तिथे निवारा कक्ष उभारावेत. धरणातील पाणी सोडताना पोलीस, कंट्रोलरूम व संबंधिताना 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित  करुन हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

                                                                         00000

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची दुकाने १८ ते २० मे २०२४ पर्यंत बंद राहणार – निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव

मुंबई दि. 17 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 18 मे  रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते 20 मे 2024 रोजी मतदानसंपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी दिले आहेत.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील कार्यालयात आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामकाज आढावा बैठक झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मतदारसंघात 55 गुन्हे, 6 लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण 55 गुन्हे दाखल करण्यात आले असुन 56 आरोपीनां अटक करण्यात आले आहेत. दोन लाख 23 हजार 925 रूपयांची 647.29 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. चार लाख 50 हजाराचे एक वाहन जप्त करण्यात आले आहे, असे एकूण सहा लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरोधात  प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून नऊ लाख 40 हजार इतक्या रकमेचे बंधपत्र घेण्यात आले आहे. गोडाऊन, वाईन शॉप, परमिट रुम, देशी दारूचे गोडाऊन, देशी बार अशा एकूण 348 मद्याच्या अनुज्ञप्तीवर सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी दिली.

अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी 18002339999 टोल फ्री क्रमांक

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात सहा गस्ती पथक कार्यरत असून, त्या पथकांच्याकडून अवैध मद्यविक्री, अवैध वाहतुक व अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर बंद करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दैनंदिन तसेच रात्री गस्त घालण्यात येते. विभागाकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कामकाजाची माहिती ईएसएमएस ॲपवर अद्ययावत करण्यात येते. अवैध मद्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांकावर अथवा 8422001133 हा व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सत्यवान गवस तथा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ संपर्क अधिकारी यांनी सांगितले.

000

 

 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

            मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती काढल्या जातात.  एप्रिल महिन्यामध्ये ८ एप्रिल रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १९ एप्रिल रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष, १७ एप्रिल रोजी महाराष्ट्र गौरव, २४ एप्रिल रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी ४ वाजता काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

            त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ६९० तिकीटांना एकूण ६ लाख ७३ हजार ४०० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष तिकीट क्रमांक GS-02/9359 या किशोर लॉटरी सेंटर, सांगली यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास २२ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण १ हजार ४९९ तिकीटांना एकूण २९ लाख १० हजार ७५० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.

            महाराष्ट्र गौरव मालिका तिकीट क्रमांक G-25/1470 या कोमल एजन्सी, औरंगाबाद यांचेकडून  विक्री झालेल्या तिकीटास ३५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ६ हजार २३ तिकीटांना एकूण ४२ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.

            महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण ८७६ तिकीटांना एकूण ६ लाख ११ हजार ७०० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गजराज या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ७४ तिकीटांना एकूण २ लाख ३१ हजार ७५० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.

            याशिवाय एप्रिल २०२४ मध्ये साप्ताहिक सोडतीतून ३६ हजार ३१५ जणांना ८५ लाख ७१ हजार ७०० रुपयांची बक्षिसे जाहीर झाली आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून १० हजारावरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. १० हजार रुपयाच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे संबंधित कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे महाराष्ट्र दिन भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे दरवर्षी सहा भव्यतम सोडती काढल्या जातात. त्यापैकी महाराष्ट्र दिन भव्यतम सोडत ७ मे २०२४ रोजी दुपारी ४ वाजता काढण्यात आली. बालाजी मार्केटिंग, नागपूर येथून विक्री झालेल्या तिकीट क्रमांक MD-02/18101 या तिकीटास रक्कम ५० लाख रुपयांचे तिकीटास प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

या सोडतीच्या एकूण ११०२ तिकीटांना एकूण ५७ लाख ७९ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम १० हजार रुपयांवरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम दहा हजार रुपयांच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/

ठाणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

ठाणे, दि. 17 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या ठाणे जिल्ह्यातील तयारीचा प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भिड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरोघरी प्रतिनिधी पाठवून मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्याचे निर्देशही श्री.चोक्कलिंगम यांनी दिले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम हे ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हा नियोजन भवनच्या समिती सभागृहात निवडणुकीशी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याशी श्री.चोक्कलिंगम यांनी संवाद साधून माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या.


यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम, सर्व नोडल अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील निवडणुकीच्या संपूर्ण तयारीची माहिती जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या तयारीची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

सोसायट्यांच्या सचिव/अध्यक्षांच्या मदतीने मतदान टक्केवारीसाठी प्रयत्न करा
श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. पादर्शक व निर्भिड वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी एकत्रित काम करावे. ठाणे जिल्ह्यात मागील निवडणुकीत कमी मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी मतदानाच्या दिवशी आशा व अंगणवाडी स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांना घरोघरी पाठवून नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शहरी भागातील सोसायट्यांमधील नागरिकांनी मतदान करावे, यासाठी त्या सोसायट्यांच्या सचिव व अध्यक्षांची मदत घ्यावी. त्यासाठी सचिव व अध्यक्षांना केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) म्हणून घोषित करावे. शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत पालकांपर्यंत संदेश पोहचवावा.
माथाडी कामगार, विविध उद्योगातील कामगार, कर्मचारी यांनी मतदान करावे, यासाठी संबंधित उद्योग/संस्थांच्या प्रतिनिधींशी तसेच कामगार संघटनांशी संपर्क साधून आवाहन करावे. तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिलांचे मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सेलिब्रेटींकडून आवाहन करावे
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीसाठी सेलिब्रिटी, मान्यवरांची मदत घ्यावी. मतदानाचे आवाहन करणारी व्हिडिओ, रिल्स तयार करून ते ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांतून प्रसारित करावे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केलेल्या सेलिब्रेटींचे आवाहनाचे बाईटही समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करावेत.

मतदान केंद्रांची माहितीसाठी गुगल मॅपचा वापर करावा
मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना सुखद वाटावे, यासाठी केंद्रात व परिसरात वातावरण निर्मिती करण्यात यावी. पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, व्हिलचेअर, सेल्फी पॉईंट आदींची सोय करावी. तसेच मतदारांना रांगेत जास्त वेळ उभे राहू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षा कक्ष उभारता येईल का हे पाहावे. जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रापैकी 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा द्यावी. तसेच मतदान केंद्रांची जागा सुलभपणे सापडण्यासाठी क्यूआर कोड, गुगल मॅपचा वापर करून माहिती द्यावी. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्रावर पोहचण्यास अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आचारसंहिता भंगाविरुद्ध गुन्हे दाखल करा
शांततेत व निर्भिड वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी. पुरेशा प्रमाणात बंदोबस्त ठेवावा. तसेच आचारसंहिता भंग होत असल्यास तातडीने गुन्हे दाखल करावे. तसेच कोणत्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच चुकीची माहिती प्रसारित होत असल्यास त्याचे तातडीने खंडन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
मतदारांना मतदान केंद्रावर गेल्यावर मतदार यादीत नाव न सापडण्याच्या, नावे गायब होण्याच्या तक्रारी मतदानाच्या दिवशी येत असतात. अनेक मतदारांची नावे ही दुसऱ्या मतदार यादीत गेलेली आढळून येतात, त्यामुळे त्यांना नावे सापडत नाहीत. अशा मतदारांना मदत करण्यासाठी व तक्रारींची दखल घेऊन नावे शोधण्यासाठी हेल्पडेस्क तयार करण्याचे निर्देशही श्री. चोक्कलिंगम यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे, तीनही पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, तीनही मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघात केलेल्या तयारीची माहिती सादर केली.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ठाण्यातील स्ट्रॉंगरुमला भेट

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्री. एस.चोकलिंगम यांनी आज ठाण्यातील होरायझन स्कूल या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रुमला भेट देवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक तयारीची पाहणी केली.

ठाणे जिल्ह्यात येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लोकसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिन स्ट्रॉंगरुमध्ये ठेवण्यात येणार आहेत. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रुम होरायझन स्कूल येथे आहे. या स्ट्रॉंग रुमची पाहणी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये आदीउपस्थित होते. यावेळी श्री. शिनगारे व श्रीमती जायभाये यांनी केलेल्या तयारीची माहिती दिली. श्री. चोक्कलिंगम यांनी स्ट्राँगरुमची व्यवस्था चांगली केल्याचे समाधान व्यक्त केले.

०००००

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्राधान्याने मतदान करावे – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

  • मतदारांसाठीच्या सुविधांचा लाभ घ्यावा
  • पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान ; 24 हजार 579 मतदान केंद्र
  • सुमारे 2 कोटी 46 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज
  • चौथ्या टप्प्यात सरासरी 62.21 टक्के मतदान

मुंबई, दि. 17 :- राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान होत असून यामध्ये सर्व पात्र मतदारांनी प्राधान्याने आपल्या मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये 62.21 टक्के मतदान  झाले. 2019 च्या तुलनेत या आकडेवारीत एक टक्क्याने वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

आपले नाव मतदार यादी शोधा सहजतेने

मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आयोगामार्फत वर्षभर सुरु राहत असून पाचव्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदार यादीत 22 एप्रिल 2024 पर्यंत नाव नोंदणी केलेल्या सर्व मतदारांची यादी ऑनलाईन उपलब्ध असून यादीत नाव असलेल्यांना मतदान करता येणार आहे. मतदारांना विनासायस मतदान केंद्र, मतदान यादीतील आपले नाव याची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत व्होटर हेल्पलाईन ॲप तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर व्होटर पोर्टल याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये मतदारांनी आपल्या मतदार नोंदणी अर्जामध्ये दिलेल्या प्राथमिक माहितीचा तपशील भरल्यावर त्यांना आपले नाव कुठल्या मतदान केंद्रावर, मतदार यादीत कितव्या क्रमांकावर आहे याची माहिती उपलब्ध होते. जे मतदार या दोन्ही सुविधांचा लाभ घेवू शकत नाही त्यांच्यासाठी व्होटर हेल्पलाईन 1950 या क्रमांकावर देखील सुविधा उपलब्ध आहे. मतदानापूर्वी आवर्जून या सुविधांचा लाभ घेवून मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच ही माहिती घेतल्यास त्यांना अधिक सुलभतेने मतदानाचा हक्क बजावता येईल. तसेच ज्या मतदारांनी आपला मोबाईल क्रमांक मतदार नोंदणी अर्जासोबत जोडलेला आहे त्यांना तो नंबर टाकून किंवा मतदार ओळखपत्राचा दहा अंकी क्रमांक टाकून देखील आपले नाव शोधता येणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगामार्फत घरपोच मतदान चिठ्ठी वितरीत करण्यात येत आहे. मात्र ही चिठ्ठी कुठल्याही प्रकारे मतदार ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही.

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण २४ हजार ५७९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या तेरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४१,८९७ तर कंट्रोल युनिट (सीयु) २४,५७९ आणि २४,५७९ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्र परिसरात १०० मिटरच्या आत भ्रमणध्वनी यंत्रणा (मोबाईल) नेण्यास निर्बंध आहे.

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी तेराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थांतर्गत 15 मे पर्यंत 50,970 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे.  परवाने रद्द करून 1,136 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,976 इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,27,837 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  राज्यामध्ये 1 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 74.35 कोटी रोख रक्कम तर 48.36 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 185.55 कोटी रुपये, ड्रग्ज 264.69 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत १०५.५३ कोटी रुपये अशा एकूण ६७८.९७ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४८,४९० तक्रारी निकाली

16 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ६३८५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ६३७८ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ४९,५४३ तक्रारीपैकी ४८,४९० निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

 चौथ्या टप्प्यातील नाशिक विभागातील 05 आणि पुणे विभागातील 03 व औेरंगाबाद विभागातील 03 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात दि.13.05.2024 रोजी मतदान घेण्यात आलेले असून मतदानाच्या टक्केवारीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरूष मतदार मतदान केलेले पुरूष मतदार महिला मतदार मतदान केलेल्या महिला मतदार तृतीयपंथी मतदार मतदान केलेले तृतीयपंथी मतदार एकूण मतदार टक्केवारी
1 01 नंदुरबार 9,92,971 7,23,097

(72.82%)

9,77,329 6,69,528

(68.51%)

27 10

(37.04%)

70.68%
2 03 जळगाव 10,37,350 6,28,123

(60.55%)

9,56,611 5,37,827

(56.22%)

85 18

(21.18%)

58.47%

 

3 04 रावेर 9,41,732 6,21,983

(66.05%)

8,79,964 5,48,950

(62.38%)

54 11

(20.37%)

 64.28%
4 18 जालना 10,34,106 7,35,880

(71.16%)

9,33,416 6,25,335

(66.99%)

52 11

(21.15%)

69.18%

 

5 19 औरंगाबाद 10,77,809 7,09,131

(65.79%)

9,81,773 5,89,055

(60.00%)

128 41

(32.03%)

63.03%

 

6 33 मावळ 13,49,184 7,77,742

(57.65%)

12,35,661 6,40,651

(51.85%)

173 46

(26.59%)

54.87%

 

7 34 पुणे 10,57,877 5,84,511

(55.25%)

10,03,075 5,19,078

(51.75%)

324 89

(27.47%)

53.54%

 

8 36 शिरूर 13,36,820 7,73,969

(57.90%)

12,02,679 6,01,591

(50.02%)

203 33

(16.26%)

54.16%

 

9 37 अहमदनगर 10,32,946 7,21,327

(69.83%)

9,48,801 5,98,790

(63.11%)

119 51

(42.86%)

66.61%

 

10 38 शिर्डी 8,64,573 5,80,236

(67.11%)

8,12,684 4,77,028

(58.70%)

78 34

(43.58%)

63.03%

 

11 39 बीड 11,34,284 8,31,245

(73.29%)

10,08,234 6,88,270

(68.27%)

29 08

(35.51%)

70.92%

 

चौथ्या टप्प्यातील 11 मतदार संघामध्ये एकूण 62.21 टक्के मतदान झालेले आहे.

पाचव्या टप्प्यात 02 धुळे, 20 दिंडोरी, 21 नाशिक, 22 पालघर, 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे, 26 मुंबई उत्तर, 27 मुंबई उत्तर-पश्चिम, 28 मुंबई उत्तर-पुर्व, 29 मुंबई उत्तर-मध्य, 30 मुंबई दक्षिण-मध्य व 31 मुंबई दक्षिण अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव मतदान केंद्रे क्रिटीकल मतदान केंद्रे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या बॅलेट युनिट (बीयु) कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट
1 02 धुळे 1,969 14 18 3,938 1,969 1,969
2 20 दिंडोरी 1,922 04 10 1,922 1,922 1,922
3 21 नाशिक 1,910 06 31 3,820 1,910 1,910
4 22 पालघर 2,270 05 10 2,270 2,270 2,270
5 23 भिवंडी 2,191 06 27 4,382 2,191 2,191
6 24 कल्याण 1,960 00 28 3,920 1,960 1,960
7 25 ठाणे 2,453 01 24 4,906 2,453 2,453
8 26 मुंबई उत्तर 1,702 30 19 3,404 1,702 1,702
9 27 मुंबई उत्तर-पश्चिम 1,753 21 21 3,506 1,753 1,753
10 28 मुंबई उत्तर-पुर्व 1,682 32 20 3,364 1,682 1,682
11 29 मुंबई उत्तर-मध्य 1,698 30 27 3,396 1,698 1,698
12 30 मुंबई दक्षिण-मध्य 1,539 00 15 1,539 1,539 1,539
13 31 मुंबई दक्षिण 1,530 11 14 1,530 1,530 1,530
एकूण 24,579 160 264 41,897 24,579 24,579

मतदारांची संख्या

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण 85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.
1 02 धुळे 10,51,928 9,70,086 47 20,22,061 2,015
2 20 दिंडोरी 9,60,332 8,93,038 17 18,53,387 1,237
3 21 नाशिक 10,59,048 9,70,996 80 20,30,124 828
4 22 पालघर 11,25,209 10,23,080 225 21,48,514 876
5 23 भिवंडी 11,29,714 9,57,191 339 20,87,244 522
6 24 कल्याण 11,17,414 9,64,021 786 20,82,221 558
7 25 ठाणे 13,48,163 11,59,002 207 25,07,372 3,443
8 26 मुंबई उत्तर 9,68,983 8,42,546 413 18,11,942 639
9 27 मुंबई उत्तर-पश्चिम 9,38,365 7,96,663 60 17,35,088 1,544
10 28 मुंबई उत्तर-पूर्व 8,77,855 7,58,799 236 16,36,890 191
11 29 मुंबई उत्तर-मध्य 9,41,288 8,02,775 65 17,44,128  

1,026

12 30 मुंबई दक्षिण-मध्य 7,87,667 6,86,516 222 14,74,405  

2,154

13 31 मुंबई दक्षिण 8,32,560 7,03,565 43 15,36,168 3,035
एकूण 1,31,38,526

 

1,15,28,278

 

2,740

 

2,46,69,544

 

18,068

00000

वंदना थोरात/स.सं, पवन राठोड/स.सं

मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक

भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोर (Google Play Store)  व ॲपल स्टोर (Apple Store) वर अथवा  आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. यावर मतदानाच्या दिवशी सकाळी 9 नंतर दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते. मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी आणि ॲपवर दिसत असलेली टक्केवारी यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे स्वाभाविक आहे. या ॲपवर राज्य, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ यातील अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. हे ॲप  डाऊनलोड करुन वापरण्याची लिंक  सोबत जोडली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN

https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882

दर दोन तासांप्रमाणे मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजताची अंदाजित  टक्केवारी बघता येते. काही मतदान  केंद्रावर संध्याकाळी 6 वाजण्याच्या आत म्हणजे मतदानाची  वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रांवर दाखल झालेल्या मतदारांना टोकन देऊन सर्वांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान चालू राहते. काही मतदान केंद्रांवर अगदी रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालू असण्याची उदाहरणे आहेत.

मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथके विधानसभेच्या मुख्यालय असलेल्या ठिकाणी येवून मतदान यंत्रे, केंद्राध्यक्षांची डायरी व इतर कागदपत्रे सादर करतात. काही मतदान केंद्रे दुर्गम भागात तसेच विधानसभा मुख्यालयापासून दूर असल्यामुळे तेथील मतदान पथकांना मुख्यालयी पोहोचण्यास  उशीर होतो किंवा कधी कधी  पाऊस अथवा वाहतुकीचा अडथळा यामुळे देखिल उशिर होवू शकतो. पूर्णपणे पोलीस बंदोबस्तामध्ये विधानसभा मुख्यालयात  पोहोचल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षितरित्या क्रमवार एकत्र लावून लोकसभा मतदार संघाच्या मुख्यालय किंवा जिल्हा मुख्यालयामध्ये येण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि व्हिडिओच्या निगराणीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना सूचित केल्यानंतरच मतदान यंत्राचा प्रवास चालू होतो. अनेक ठिकाणी मतदान यंत्रे आणि संबंधित कागदपत्रे मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्राँगरुममध्ये पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा अगदी दुपार होते. दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी Encore ह्या भारत निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरद्वारे वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर जाहीर करतात. ही जाहीर करण्यात आलेली टक्केवारी “Close of Poll”  म्हणजे मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते.

केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरुन खात्री करुन जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी  आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून भारत निवडणूक आयोगाच्या  Encore या सॉफ्टवेअरवर भरण्यात येते आणि  तीच टक्केवारी वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर  प्रसिध्द करण्यात येते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होवून मतदानाची अंतिम टक्केवारी  वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर प्रसारित होते. त्याला “end of poll” अंदाजित टक्केवारी म्हणतात. यासाठी “मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री” ही समय मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.

वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर  मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व  मतदान केंद्रावरील  माहिती  एकत्र होऊन मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते. ही सर्व टक्केवारी अंदाजित असते. याचे कारण  उघड आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान संपते तेव्हा त्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी प्रत्येक मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी सूपुर्द केलेली असते.  प्रत्येक मतदान केंद्रावरील  ही संख्या आणि टक्केवारी हा संपूर्ण आकडेवारीचा मूळ आधार असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या 98,000 च्या आसपास होती. यावरुन ही आकडेवारी तयार करण्याचे काम किती मोठे आहे याची कल्पना करता येते.

एखादया राजकीय पक्षाने नियुक्ती केलेल्या सर्व मतदान केंद्रांवरच्या प्रतिनिधींकडून केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झालेल्या मतदानाची संख्या आणि  टक्केवारी याची तुलना केल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर झालेल्या टक्केवारीशी निश्चितपणे जुळेल. तरी देखिल वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) मध्ये अंतिम टक्केवारीला  Approximate असेच म्हटले आहे.  त्याचे कारण असे की ही अंतिम टक्केवारी केंद्राध्यक्षांच्या डायरीशी आणि राजकीय अथवा उमेदवारांच्या मतदान केंद्रातील उपस्थित प्रतिनिधींकडे दिलेल्या संख्येशी जुळत असली तरी मतमोजणीच्या दिवशी त्यामध्ये पोस्टल बॅलेट  (डाक मतपत्रिका) द्वारे झालेल्या मतदानाची संख्या  समाविष्ट केली जाते.  त्यामुळे मतदानाची संख्या आणि एकूण टक्केवारी यांच्यात मतमोजणीच्या दिवशी  किंचीतशी वाढ दिसून येते. वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर मतदानाच्या दिवशीच्या दुसऱ्या  दिवशी मध्यरात्री दिसणारी अंतिम टक्केवारी ही मतदान यंत्रावरील  मतदानाची टक्केवारी  असते. त्यामध्ये  Election Duty Certificate (EDC)  मतदारांनी मतदान यंत्रात केलेल्या मतदानाची संख्या समाविष्ट असते. त्याबाबतची नोंद संबंधित केंद्राध्यक्षांने डायरीत घेवून त्याची माहिती मतदान केंद्रातील प्रतिनिधींना दिलेली असते.

ही सर्व रचना लक्षात घेतल्यास या रचनेमध्ये बारकाईने विचार करुन त्याचे काटेकोर असे कार्यवाहीचे टप्पे भारत निवडणूक आयोगाने  गेल्या लोकसभा निवडणूकीपासूनच निश्चित केलेले आहेत. ही पध्दत आता चांगली प्रस्थापित  झालेली असून पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण आहे.

मतदानाच्या टक्केवारीत होणारे बदल याबाबत चर्चा करताना सर्वांनी ही प्रक्रिया नीट समजावून घेणे आवश्यक आहे. अन्यथा गैरसमज अथवा  अफवा  पसरु शकते आणि उपयुक्त तंत्रज्ञानाची सुविधा आपल्या सगळयांच्या हाती असूनही तिचा सुयोग्य उपयोग होत नाही, अशी परिस्थिती होऊ शकते.

०००००

-डॉ.किरण कुलकर्णी,

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,

महाराष्ट्र राज्य.

 

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर

मुंबई, दि. १७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगरमध्ये २० मे २०२४ रोजी मतदान  होणार आहे. २८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नागरिकांना आणि उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात काही समस्या अथवा तक्रार असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षातील ०२२- २०८५२६८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.

२८ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १५५ – मुलुंड, १५६ – विक्रोळी, १५७-भांडूप पश्चिम, १६९-घाटकोपर पश्चिम, १७०-घाटकोपर पूर्व, १७१-मानखुर्द, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांगांसह मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले.

०००

पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यापासून प्रतिबंध

मुंबई, दि. 17 : पावसाळी हंगामात सुरक्षिततता आणि पर्यावरणाच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घातली जाते. त्यामुळे आंतरदेशीय जलयाने कायदा 1917 (इनलँड व्हेसल कायदा 1917) च्या अंतर्गत नोंदणी झालेल्या जलयानांनी 26 मे 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात जलयाने घेऊन समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मुंबईच्या महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ.प्रवीण एस.खरा यांनी केले आहे.

000

एसडीओरके/स.सं.(मा.)

ताज्या बातम्या

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई, दि. १६ : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विरोधी पक्षनेते दानवे यांचा...

विधानपरिषद लक्षवेधी

0
गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १६ : मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात 2019 पासून लागू...

विधानपरिषद इतर कामकाज

0
विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही - मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे  मुंबई, दि. १६ :...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो स्थानक ते काशिमिरा नाक्यापर्यंत तसेच मीरागाव ते काशिगाव मेट्रो स्थानकापर्यंतचे वाया आकाराचे पूल मुख्य...

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा मुंबई दि. १६ : वसई -...