शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 74

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १० तालुक्याचे वर्गीकरण होऊन ते डी+ वर्गवारीत झाले. पुढील एक महिन्यात नवीन औद्योगिक धोरण जाहीर होणार असून या धोरणात जळगाव जिल्ह्यातील शिल्लक पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत दिली.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळांनी उद्योगमंत्री श्री.सामंत यांची भेट घेतली. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याच्या पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत होणार असल्याची तत्वतः मान्यता उद्योगमंत्री यांनी दिली. बैठकीस एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह, सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात उद्योग आले पाहिजेत, यासाठी उद्योजकांशी बोलून त्यांना जळगाव जिल्ह्यात उद्योग उभारण्याबाबत विनंती करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जळगाव जिल्ह्यात मेगा प्रकल्प किंवा अल्ट्रा मेगा प्रकल्प आल्यास प्रस्तावित औद्योगिक धोरणानुसार सवलतीचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे ५०० कोटी पेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या उद्योगांना सुद्धा एमएसएमई अंतर्गत लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले की, डिफेन्स उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची गरज लागते. डिफेन्स उद्योगास जागा उपलब्ध करून दिल्यास त्याचा मोठा फायदा जळगाव जिल्ह्यास होऊ शकतो, असेही मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून ६८१ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 28 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासन निर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने संबंधितांच्या बैठका घेऊन पाठपुरावा केल्यामुळे हा शासन निर्णय निश्चित वेळेत जारी होऊ शकला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार प्रयत्नशील होते. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत तयार करण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास आणि त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला. त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून 6 मे 2025 रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने 681 कोटी 32 लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरीचा शासन निर्णय आज जारी केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे यंदा त्रिशताब्दी जन्मवर्ष असून त्यानिमित्ताने त्यांच्या चौंडी जन्मगावी 6 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नियोजन विभागाने निश्चित वेळेत आज शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्यांचे ऐतिहासिक महत्त्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती, संस्थांकडूनंच ही कामे करु घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. जी कामे केंद्र शासनाच्या PRASAD योजना, स्वदेश दर्शन योजना किंवा अन्य  योजनांमधून शक्य आहेत. ती त्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षात 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही शासन निर्णयात दिले आहेत.

शासन निर्णय – choundi GR

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या  जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.

००००

Governor pays tributes to Savarkar on birth anniversary

Mumbai Dated 28 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on the occasion of his 142nd Birth Anniversary at Raj Bhavan.

Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Deputy Secretary S. Ramamoorthy, staff and officers of Raj Bhavan and State police were present.

000

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.२८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं

बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती

मुंबई, दि. २८ : शासकीय, निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथील करून या धोरणास स्थगिती देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

शासकीय, महानगर पालिका यांच्या वैद्यकीय महविद्यालयातून एमबीबीएस अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर विहीत कालावधीची शासनाची बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना एमडी, एमएस तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरवता येणार नाही, असा शासन निर्णय 2017 साली घेण्यात आला होता. त्यामुळे बंधपत्रित सेवेच्या अटीस स्थगिती देण्यात आल्यामुळे आता पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

बंधपत्रित सेवांची अट 2019-20 मधी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून लागू करण्यात आली होती. तसेच याबाबत विद्यार्थी संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे या अटीची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्यात येत नव्हती. यंदाची पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा ही जून महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बंधपत्रित सेवेच्या अटीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच बंधपत्रित सेवेसाठी आवश्यक जाता सार्वजनिक आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. उपलब्ध असलेल्या जागांचा विचार करता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पदवी अभ्याक्रमानंतरची बंधपत्रित सेवा पूर्ण असणे या धोरणास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे.

 

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २८ : राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेस मध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी आज ठाणे येथे केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटीचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, सध्या दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे. या उद्देशाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ” एकात्मिक सुरक्षा प्रणाली ” नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धती पासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या सोबतच वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसविण्यात येणार आहे.

या उपकरणामुळे महिलांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येणे शक्य होणार असून, चालकाला गाडी चालवणे अधिक सोपे होणार आहे. तसेच त्याने मद्यपान केले असले किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेच कळणार असल्याने प्रवाशांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली बसविण्यात येत आहे. त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एसटीमध्ये अमुलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

परिवहन महामंडळाच्या या ‘स्मार्ट बस’मध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली (ADAS) आणि चालक निरीक्षण केमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच 360 अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात दोन, समोर आणि पाठीमागे प्रत्येकी एक कॅमेरा बसवण्यात आला आहे. तसेच चालक सहाय्यक स्क्रीन, मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

००००

आरोग्य विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यत प्रभावीपणे पोहोचवा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

यवतमाळ, दि. 27 (जिमाका) :  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांची, उपक्रमांची व उपलब्ध सेवा सुविधांची माहिती वृत्तपत्रे व विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिले.

राज्यात आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येतात, विविध सोईसुविधा रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच आरोग्य विभाग चांगले काम करीत आहे, याचे माध्यमांद्वारे वृत्तांकन केले पाहिजे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचा त्वरित खुलासा करून वस्तुस्थिती मांडली पाहिजे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांनी यासाठी सजग राहून कार्य करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

राज्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांची आढावा बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यात आरोग्य विषयक जनजागृती व प्रसिद्धी उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. ग्रामीण व अतिदुर्गम भागात राबविण्यात येणारे जनजागृती उपक्रम याविषयी माहिती घेऊन सदर उपक्रम अधिक चांगल्या प्रकारे कसे राबवता येतील यासाठीही विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना करून जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांना माध्यमाद्वारे प्रभावी काम करता यावे यासाठी प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

या बैठकीला आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. संजय कुमार जठार तसेच सर्व जिल्ह्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते.

000

महापुरुषांचे विचार आचरणात आणल्यास खरे परिवर्तन घडेल- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

मुंबई, दि. २७ : आजच्या आधुनिक युगात महापुरुषांच्या विचारधारेतूनच आपल्याला सामाजिक समतेचा, न्यायाचा मार्ग सापडतो. महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता, प्रत्यक्ष आचरणात आणल्यास खरे परिवर्तन साधता येईल, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले

मंत्रालयात महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम झाला. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर समाजसुधारक व विचारवंतांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे व पदाधिकारी उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री श्री. सावकारे म्हणाले, महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव अतिशय चांगली संकल्पना आहे. या माध्यमातून महापुरुषांच्या कार्याचे स्मरण केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी शोषित वर्गासाठी न्याय, समानता आणि शिक्षण यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला.

मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागातील मान्यवर उपस्थित होते.

अनु. जाती, जमाती, विजा-भज, इ.मा.व., वि. मा.प्र शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

0000

मोहिनी राणे/ससं/

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासनानंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे

मुंबई, दि. २७ : राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील, असे कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी पर्यवेक्षकांच्या शिष्‍टमंडळाला सांगितल्यानंतर कृषी सहायकांनी पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले, कृषी विभागात कृषी सहायक या संवर्गातील कर्मचाऱ्यांचे मोठे महत्त्व आहे.  शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने आणि खरीपाचा हंगाम सुरू होत असल्याने कृषी सहायकांनी आंदोलन करणे उचित होणार नाही. त्यांच्या विविध अडचणींबाबत शासन सकारात्मकतेने विचार करीत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. सुरूवात म्हणून कृषी सहायकांच्या पदनामामध्ये ‘सहायक कृषी अधिकारी’ असा बदल करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्याची पावसाची स्थिती आणि खरीप हंगाम पाहता शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता विचारात घेऊन कृषी सहायकांनी आंदोलनाचा निर्णय स्थगित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कृषी सहायकांचे सुरू असलेले आंदोलन स्थगित करीत असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष विलास रिढे आणि सरचिटणीस महेंद्र गजभिये यांनी यावेळी जाहीर केले.

शासनाकडून  महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटनेच्या न्याय मागण्याची दखल घेऊन मागण्यांची सोडवणूक केली जाणार असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे व कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले.

संघटनेस संप मागे घेण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार, संघटनेने आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन पुकारलेला संप स्थगित करीत आहे असे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील कृषी सहायक संघटनेचे सर्व सदस्य दि. २७ मे २०२५ पासून पूर्ववत कामावर रुजू होऊन नियमित कामकाज करणार आहेत असे संघटनेकडून  सांगण्यात आले आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

प्रकल्पग्रस्त स्थानिकांना खासगी कंपनीत रोजगार संधीसाठी प्रयत्न करणार – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि. २७ : प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या पाल्यांना बृहन्मुंबई , ठाणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील खासगी कंपनीत प्राधान्याने नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्त कोळी समाजाच्या पाल्यांना खासगी कंपन्यात नोकरी उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी येथील कामगारांच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राहूल कुल, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष चंदू पाटील, प्रधान सचिव आय.ए.कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच.पी.तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, अपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, संघटनेचे डॉ. रूपेश कोळी, हेमंत वैती, माथाडी मंडळाचे अध्यक्ष निखील वाने आदीसह अधिकारी उपस्थित होते.

कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, कोकण विभागात १६,४४३ कारखाने कार्यरत असून त्यामध्ये १३ लाख ११ हजार ६२९ कामगार कार्यरत आहेत. उद्योग विभागाच्या तरतुदीनुसार राज्यातील रहिवासी असणाऱ्या पात्र स्थानिकांना पर्यवेक्षणीय श्रेणीत ५० टक्के तर इतर श्रेणीतील ८० टक्के खासगी उद्योगात रोजगार देण्यात येतो. यानुसार संबंधित खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करेल.

‘एमआयडीसी’त सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचे निर्देश

पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी क्षेत्रातील औषध निर्मिती क्षेत्रातील तसेच रासायनिक उद्योग क्षेत्रातील कंपन्याना तातडीने भेटी देऊन अहवाल सादर करावा. सुरक्षिततेचे नियम न पाळणाऱ्या कंपन्या, प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी श्री. फुंडकर यांनी दिले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...