शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 73

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

जिल्हा वार्षिक योजनेच्या २०२४-२५ च्या खर्चास मान्यता

हिंगोली (जिमाका), दि. 28 :  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2024-25 च्या खर्चास पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज मान्यता दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 साठीच्या 311 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, 30 जानेवारी 2025 च्या बैठकीतील इतिवृताच्या अनुपालनासही मान्यता देण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार राजुभैय्या उर्फ चंद्रकांत नवघरे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्ह्याच्या विकासात सर्वसामान्य केंद्रीत योजनांना महत्त्वाचे स्थान देण्यात येणार असून, शिक्षण, आरोग्य, वीज, पर्यटन, कृषि, सिंचन यासह विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येईल. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम करताना प्राथमिकता ठरवून ते टप्प्याटप्प्याने सुरु करावे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील विकास कामे करताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचीही अंमलबजावणी करावी. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अनुदानाची रक्कम ईकेवायसी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडण्याचे निर्देशही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. वळवाच्या पावसामुळे जिल्ह्यातील घरकुल आणि हळद, केळी आणि भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोबतच वीज पडून झालेली जीवित व वित्तहानी झाली आहे. कृषि व महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर बळसोंड, श्री जगदंबा देवी मंदिर देवस्थान दरेगाव तसेच इतर तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचे श्रेणीवर्धन करण्यासाठीचे प्रस्ताव व कार्यवाही करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. जिल्ह्यातील अपघातप्रवण रस्त्यांची तपासणी करून त्यांना ब्लॅकस्पॉट घोषित करण्याची कार्यवाही आरटीओंनी पूर्ण करावी. जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील सर्व तलावांची पाहणी व सर्वे करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. चिरागशहा, नागेशवाडी, गवळेवाडी, सारंगवाडी तलावांच्या दुरुस्ती, डागडुजीची कामे तात्काळ सुरु करून पावसाळ्यात होणारी जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच आवश्यक तिथे वनविभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमानुसार छोटे पाझर तलाव बांधणी करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी कामे हाती घ्यावीत,असेही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आदर्श शाळा विकसित करा. तेथील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शालेय, क्रीडा साहित्य, पाठ्यपुस्तके खरेदी करा. तसेच शाळा, वाड्या तपासून घ्या. या निधीतून चांगली  क्रीडांगणे तयार करून भावी खेळाडू घडवण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. डोंगरी विकास योजनेतून डोंगरी भागातील अंगणवाड्यांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले.

शाळा आणि शहरातील विविध भागात सीसीटीव्ही बसवावेत. पावसाळ्यापूर्वी ग्रामीण रस्त्याची कामे पूर्ण करावीत. आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांला आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल,असे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2024-25 आराखड्यातील 277 कोटींची तरतूद प्राप्त झाली होती. त्याचे सर्व विभागांना वितरण करण्यात आले व विविध कामांवर सर्व 272 कोटी खर्च करण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी सन 2025-26 अंतर्गत 311 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अनुसूचित उपयोजनेत 54 कोटी तर आदिवासी उपयोजनेत 24 कोटी 74 लाख 89 हजार नियतव्यय मंजूर आहे. या सर्व निधीसाठीचे प्रस्ताव वेळेत तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी संबंधितांना दिले.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विभागनिहाय आढावा घेताना मृदा व जलसंधारण, वन विभाग, कृषि, पर्यटन, क्रीडा विभाग, जिल्हा ग्रंथालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, कौशल्य विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा विभाग यासह सर्व विभागांचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी तसेच पशुसंवर्धन विभागासाठी औषध खरेदी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण योजनांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांचाही आढावा घेतला. तसेच यावेळी जिल्हा अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या खर्चाचाही आढावा घेण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्यानुसार कृषि, सिंचन, फळबाग लागवड, हळद लागवड, उद्योग व स्वयंरोजगार, पर्यटन यासह विविध विषयावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.

            गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पडत असलेल्या वळवाच्या पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. बोगस खते व बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी व जिल्हा प्रशासनाने नियंत्रण पथकामार्फत बारकाईने लक्ष ठेवावेत. दैनंदिन पर्जन्यमानाविषयीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावी. पावसाळ्यात आरोग्य यंत्रणेने मुख्यालयी राहून तात्काळ आरोग्य सेवा पुरवाव्यात. महसूल विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे वेळेत उपलब्ध करुन द्यावेत. शेतकऱ्यांना बँकांनी वेळेत  आणि सहज व सुलभ पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी बैठकीत दिल्या.

मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम गुणवत्तेसह कालमर्यादेत पूर्ण करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 28 : रायगड, मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम उत्तम दर्जाचे आणि कालबद्ध पद्धतीत पूर्ण करावे. मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मच्छिमारांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

श्रीवर्धन येथील मच्छिमार जेट्टीच्या बांधकाम कामाच्या आढावा संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्यासह मौजे दिघी कोळीवाडा, मुळगाव, भरडकोल, जीवनेश्वर येथील कोळीबांधव  उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, या बांधकामामध्ये त्रुटी आढळून आल्याचे निदर्शनास आले असून, त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. नव्याने बांधकाम करावे अथवा डागडुजी करावी. उर्वरित काम चांगल्या गुणवत्तेचे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावे. त्याचप्रमाणे प्रलंबित डिझेल परतावा लवकरात लवकर मिळावा अशा सुचना दिल्या. तसेच, जेट्टीअंतर्गत आईस फॅक्ट्री, कोल्ड स्टोरेज, पंपटाकी, उर्वरित जागेचा योग्य वापर करण्याची तरतुदीसह मच्छीमारांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

इजिप्त सोबत सौहार्दाचे संबंध वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २८ : इजिप्त सोबत महाराष्ट्राचे अनेक दशकांपासूनचे सौहार्दाचे संबंध असून महाराष्ट्र हे संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असल्याचे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

इजिप्तच्या महावाणिज्यदूत दाहिला तावाकोल यांनी राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांची भेट घेतली. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्र हे भारताचे शक्ती केंद्र असून भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा सहभाग आहे. राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याअनुषंगाने येथे अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे. इजिप्तमधील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे आल्यास त्यांचे येथे स्वागत होईल. राज्यात पर्यटकांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची पर्यटन स्थळे असून पर्यटक सुरक्षित पर्यटनाला अधिक महत्त्व देत असल्याने महाराष्ट्राला अधिक पसंती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

इजिप्तच्या महावाणिज्यदूत दाहिला तावाकोल यांनी इजिप्तविषयी माहिती देऊन महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करीत असल्याबद्दल महाराष्ट्राचे कौतुक केले. इजिप्त आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या आणि व्यापाराच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी इजिप्तचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ राज्यात येऊ इच्छित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/

‘भाषिणी’ उपयोजकासाठी भाषिक डेटा संकलनाची गरज – सचिव किरण कुलकर्णी

मुंबई, दि. 28 :- भाषिणी उपयोजक (भाषिणी अ‍ॅप्लिकेशन) अधिकाधिक प्रगत, सक्षम आणि उपयोगी व्हावे यासाठी भाषिक डेटाचे व्यापक स्तरावर संकलन करणे अत्यावश्यक आहे. या डाटा संकलनासाठी सर्व विभागांनी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठी भाषा विभाग आणि केंद्र सरकारच्या भाषिणी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात ‘भाषिणी’ उपयोजकांच्या वापराच्या अनुषंगाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सह सचिव डॉ. नामदेव भोसले, डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग, प्रा. मितेश खापरा,  मराठी भाषा विभागातील तसेच मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सचिव श्री. कुलकर्णी म्हणाले, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि मराठी भाषेचे व्यापक स्तरावर सुलभीकरण करणे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भाषिणी उपयोजकासाठी आवश्यक असलेला डाटा संकलित करण्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या कामकाजामध्ये वापरले जाणारे शब्द व संज्ञा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी एक व्यापक मोहीम राबविणे आवश्यक असून, राज्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये नियुक्त केलेल्या मराठी भाषा अधिकाऱ्यांचे देखील या कामासाठी सहकार्य घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारत सरकारने भाषिणी उपयोजक (भाषिणी अॅप्लीकेशन) हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. भाषिणी अॅप्लीकेशन हे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रियेवर (एनएलपी) आधारित प्लॅटफॉर्म आहे, जे ए.आय. आणि एन.एल. पी. चा वापर करून भारतीय भाषा डिजिटल आणि तांत्रिक सेवांमध्ये अधिक प्रवेशयोग्य बनवण्याचा प्रयत्न करते. तसेच भारतीय अधिकृत भाषांमध्ये सेवा देते. डिजिटल सेवा भारतीय भाषांमध्ये सहज उपलब्ध करून देणे. भारतातील विविध भाषांमध्ये भाषांतर आणि संवाद साधने सुलभ करणे हा यामागचा हेतू आहे.

या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून असलेले श्री. नाग आणि श्री. खापरा यांचे भाषिणी उत्पादने आणि त्यांचा वापर व डेटासेटची भूमिका आणि अधिक सुधारित भाषिक एआय मॉडेल विकसित करण्यासाठी प्रादेशिक योगदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी श्री. नाग यांनी मराठी भाषा विभागामार्फत हॅकॅथॉन स्पर्धा राबविण्यात येईल असे सांगितले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेकडून करण्यात आलेल्या कामाची दृकश्राव्य चित्रफीत दाखवण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

‘अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 28 : कुटुंबातील आपला जीवाभावाचा माणूस निघून गेल्यानंतर, ज्या कुटुंबांनी सामाजिक भान जागृत ठेवून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या जीवनात नवीन ज्योत प्रज्वलित झाली असून, नव्याने जीवनदान मिळाले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

मुंबईतील सायन रुग्णालयातील झेड.टी.सी.सी. (ZTCC) या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयात अवयवदान केलेल्या कुटुंबातील सदस्यांचा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  श्री. आबिटकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला झेड.टी.सी.सी.चे अध्यक्ष डॉ.एस.के.माथूर, न्यायमूर्ती संदीप शिंदे, आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, मुंबईतील खासगी व शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, समाजात अवयवदानाबद्दल असलेले गैरसमज, अकारण भीती, सामाजिक रूढी, चालीरिती या बाजूला ठेवून वेळ प्रसंगी सामाजिक विरोध पत्करून आपण विज्ञानवादाकडे जाणारा अवयवदानाचा विवेकी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण समाजाचे आयडॉल बनला आहात. अलीकडच्या काळात अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हजारो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असतात. पण प्रत्यक्षात अवयवदानाचं प्रमाण अल्प आहे. त्यामुळे अवयवदानाविषयी समाजात जागृती आणि विश्वास निर्माण करणे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आणि नाशिक येथे नव्या झेड.टी.सी.सी. केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. झेडसीसीची टीम, संलग्न रुग्णालये, आरोग्य विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हे काम एक मिशन म्हणून हाती घेणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णालयाने केवळ सहभाग नव्हे, तर पुढाकार घ्यावा, योग्य समुपदेशनाद्वारे कुटुंबीयांमधील भीती, अंधश्रद्धा दूर करावी, ग्रामीण भागात जागरूकतेसाठी विशेष मोहिमा राबवाव्यात. हे संपूर्ण कार्य ही केवळ वैद्यकीय बाब नाही, तर ही मानवतेची, आणि सामाजिक बदलाची चळवळ आहे, असेही मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.  महाराष्ट्र राज्य अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

झेड.टी.सी.सी. चे सेक्रेटरी भरत शहा यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर यांचे स्वागत केले व अवयवदान कार्ड काढण्याचे आवाहन केले. अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या अपोलो, ब्रिच कँडी, क्रिटीकेअर एशिया, हिरानंदानी, फोर्टीस, एशियन रिलायंस, ग्लोबल, जसलोक, ज्यूपिटर, लिलावती, के.ई.एम. अंबानी, जी.एस.सी, कोकिलाबेन इत्यादी रुग्णालयातील प्रतिनिधींचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

000

संजय ओरके/विसंअ/

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 28 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने दुपारी  ३.३५ वाजता आगमन झाले.

त्यांचे स्वागत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर-पाटणकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक शेरिंग दोरजे, अतिरिक्त आयुक्त परमजीत सिंग दहीया,  मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच पोलिस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती यांनी पुढील नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

मुंबई,दि. 28 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दि. 5 जून 2025 रोजी मुलाखतीस सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सीडीएस-65 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. तसेच उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परीक्षेकरिता ऑनलाइन द्वारे अर्ज केलेला असावा. ही पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी: training.pctenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्सअप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

0000

रास्तभाव दुकानांमधून ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जूनपूर्वी उचलण्याचे आवाहन

मुंबई, दि. २८ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो. आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून २०२५ पूर्वीच रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे.

सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून २०२५ पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून उचलावे, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

मोहिनी राणे/ससं/

‘पर्यटन सुरक्षा दल’ उपक्रमाचा विस्तार करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. २८ : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा दल हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सवात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या संदर्भात मंत्री श्री. देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन संचालक श्री. पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडील अधिकारी- कर्मचारी यांची सेवा घेण्यात येत आहे. सुरवातीच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी आणि कोयनानगर येथे हा उपक्रम राबविण्यात येईल. या उपक्रमांतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांसाठी वाहने घेण्यात यावीत. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तत्पूर्वी मंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील कोयनानगर नेहरू गार्डन, स्काय वॉक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटन प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली. हे प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी विहित निकषानुसार तयार करून पाठवावेत आशा सूचनाही त्यांनी दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

राजधानीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. 28 :  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा हुंकार पेरणारे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्र शासनाचे आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना श्री. जाधव म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतीकारक नव्हते, तर भारतीय राष्ट्रवादाचे खरे पुरस्कर्ते होते.” त्यांच्या विचारांनी आजही प्रेरणा मिळते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा  यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000

अमरज्योत कौर अरोरा/ वृत्त विशेष  -119

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...