रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 66

महिला व मुलींच्या  सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय 

मुंबई,दि. ३१: महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून याआधीचे  शासन निर्णय, पुरक पत्रे व शुध्दीपत्रके या द्वारे अधिक्रमित करून गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना तसेच गट ब च्या योजना (वस्तु व खऱेदीच्या योजना ) राबवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागमार्फत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनेअंतर्गत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण,मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरिक विकासासाठी प्रशिक्षण,महिलांसाठी समुपदेशन केंद्र,इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण, तालुकास्तरावर शिकणा-या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे, किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायेदविषयक प्रशिक्षण, अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत,भाडे, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणे, पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन केंद्र, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण, विशेष प्राविण्य मिळवेलल्या मुलींचा सत्कार, महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा या बाबींचा समावेश आहे.

तर गट ब च्या योजना (वस्तू खरेदीच्या योजना ) या मध्ये अंगणवाडींना विविध साहित्य पुरविणे, कुपोषित मुलामुलींसाठी व किशोरवयीन मुलींसाठी, गरोदर,स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार,दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, महिलांना विविध साहित्य पुरवणे, 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शिकणा-या मुलींसाठी सायकल पुरवणे,या बाबींचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारः

महिला व बाल विकास विभागाने प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित दिनांक 31 मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामध्ये पुरस्काराचे स्वरूप, पात्रता निकष, पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपद्धती व यंत्रणा निश्चित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत अपेक्षित असलेला अंदाजे रूपये दोन हजार इतका खर्च महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांना उपलब्ध होणा-या जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 10% निधीतून करण्यात  यावा, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शासन निर्णय वाचण्यासाठी शासन निर्णय महिला बालविकास योजना signed येथे क्लिक करा.

00000

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

रत्नागिरी, दि. ३१ (जिमाका)- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर श्री.सिंह यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे मात्र एआय ला सत्य काय आहे हे माहीत नसते.

श्री. सिंह म्हणाले की, मी स्वत: पत्रकार कुटुंबातून आलो आहे. माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे.

यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची श्री. सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

००००

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ३१ : देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रदूषण कमी करणे, तसेच वन्यजीव आणि वनस्पतींचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हा कार्यक्रम धार्मिक स्थळाच्या परिसरात पर्यावरणपूरक सवयी रुजविण्या बरोबरच पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर परिसरात नागरिकांमध्ये सिंगल युज प्लास्टिक टाळण्याचे आवाहन तसेच सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्रीमती. मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमास सिद्धिविनायक मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासुर रोखायलाच हवा, सिंगल युज प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे याकरिता सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यासाठी संकल्प, संयम आणि प्रत्यक्ष कृती याची नितांत गरज आहे. शासन स्तरावर सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. यासाठी विभागामार्फत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी धोरणे आणि नियम ही लागू करण्यात आले आहेत. सिंगल यूज प्लास्टिकवर निर्बंध घालण्याबरोबरच, जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, कॉलेज, आणि सार्वजनिक ठिकाणी जागरूकता मोहिम देखील राबवल्या जात आहेत. कार्यशाळा, चर्चासत्रे, आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश पोहोचवला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमाअंतर्गत मंत्री पंकजा मुंडे यांनी सिद्धिविनायक मंदिर परिसरातील स्टॉलधारकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवण्याचे सांगत स्वत: कापडी पिशव्यांचे वाटप करून पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी प्लास्टिकच्या पर्यायांविषयी माहिती देणारे सूचना फलकांबरोबरच पर्यावरण जनजागृतीच्या घोषवाक्यांनी मंदिर परिसराचे वातावरण दुमदुमून गेले. पर्यावरण रक्षणासाठी शासन, संस्था आणि नागरिकांनी एकत्र येवून काम केल्यास नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टने सुद्धा प्लास्टिक बंदीसंबंधी जनजागृती कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

00000

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहिल्यानगर, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष,  राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी 28 वर्षं राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, घाटांचे बांधकाम, धर्मशाळांची उभारणी, गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य  त्यांनी अत्यंत समर्पित वृत्तीने केले.

अहिल्यादेवी होळकर यांनी काशी, अयोध्या, मथुरा, पंढरपूर, नाशिक, जेजुरीसह देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांच्या स्वतःच्या निधीतून केला.  त्यांनी सोमनाथ येथील मंदिर नव्याने बांधले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करतांना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. एवढी श्रीमंती असतानाही त्या योग्याप्रमाणे जीवन त्या साधेपणाने जीवन जगल्या. त्यांनी स्वतःसाठी धन खर्च केले नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले, म्हणून त्या ‘लोकमाता’ ठरल्या.

महिला सक्षमीकरण आणि आदर्श न्यायदान

गोरगरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी माहेश्वर येथे त्यांनी एक मोठे वस्त्रउद्योग केंद्र उभारले, तेथे माहेश्वरी वस्त्र तयार होऊ लागले. त्यांनी एक समृद्ध अर्थव्यवस्था उभी केली. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या. त्यांच्या सैन्यदलात शिस्त होती, कौशल्य होतं, आणि युद्धसज्जतेसाठी त्यांनी स्वदेशी तोफांचं उत्पादनही सुरू केलं. न्यायपद्धतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन अत्यंत प्रगतीशील होता. अहिल्यादेवींची आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले.  सर्वसामान्यासारखे न्यायदान करतांना हुंडाबंदी केली. महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले.

श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य आणि आदर्श आज 300 वर्षांनंतरही तितकंच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दी  निमित्ताने शासनाने 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यांच्या नावाने एक भव्य स्मारक, महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’, आणि त्यांच्यावर आधारित एक बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांचे कार्य देशभरात पोहोचविले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अहिल्यादेवी होळकर यांचे प्रजाहिताचे धोरण राबविण्यावर शासनाचा भर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान चौंडी मराठी संस्कृतीचे जागृत देवस्थान आहे. लोककल्याणकारी राज्य, सुराज्य जगाला दाखविण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. अहिल्यादेवींनी सर्वसामान्य माणसांच्या विकासाचे काम केले. त्यांनी धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. महिलांसाठी सैनिक तुकडी सुरू करण्याची त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली आहे.

अहिल्यादेवी निष्पक्ष व न्यायप्रिय राजमाता होत्या. प्रजेसाठी रोजगार निर्माण करण्याची दूरदृष्टी अहिल्यादेवींकडे होती. त्यांनी रस्ते, पूल व घाट बांधले. अहिल्यादेवींचे प्रजाहिताचे धोरण आज शासन राबवित आहे. याच व्यासपीठावरून जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावर शासन काम करत आहे. चौंडी विकासासाठी जो काही आवश्यक निधी लागणार होता, तो देण्याचे काम शासनाने केले आहे.

आज आपण लेक लाडकी म्हणतो तसे सूनही लाडकी मानली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासनाच्यावतीने 2017 पासून साजरी करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळासाठी शासनाने 681 कोटी रुपये मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मागणी केल्यानंतर अवघ्या 16 महिन्यांच्या कालावधीतच जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर  करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आज देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जात आहे. जिल्ह्यातील एक लाख एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबविण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्श समोर ठेवीत शासनाने लोकहिताचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. धनगर समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जपण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने लोकराज्यचा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित इतर विशेषांक आणि पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, मोनिकाताई राजळे,  शिवाजीराव कर्डीले, सुरेश धस, आमदार विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री अण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

00000

यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामे तातडीने पुर्ण करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळजवळ 70 कोटी रुपयांची विकास कामे, सिमेंट रस्ते सुरु आहे. या कामांमध्ये ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्या अडचणींची सोडवणूक करून कामे तातडीने पुर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी यवतमाळ शहरात सुरु असलेली विकास कामे, रस्ते व जिल्ह्यातील सिंचन सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला माजी राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी विकास मीना, यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता योगेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, यवतमाळ नगरपरिषदेचे मुध्याधिकारी श्री.क्यातमवार यांच्यासह जलसंपदा, बांधकाम, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यवतमाळ शहरात ठिकठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरु आहे. केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधीतील ही कामे काही ठिकाणी संथगतीने सुरु आहे. या कामांमध्ये काही अडचणी असल्यास नगर परिषद, बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, नगर रचना विभागाने संयुक्त पाहणी करून अडचणींची सोडवणूक करावी. या कामांसह सर्व कामे तातडीने पुर्ण करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. अमृत योजना, नगरोत्थान योजनेंतर्गत पुर्ण झालेली कामे, सुरु असलेली व सुरूच न झालेल्या कामांचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यात सर्व सिंचन प्रकल्पांद्वारे निर्मित सिंचन क्षमता, सद्या होत असलेले सिंचन, सिंचन व्यवस्थेतील अडचणी, पाणी वापर संस्थांची उभारणी, त्यांचे सक्षमीकरण व जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची कामे तातडीने पुर्ण करा. या प्रकल्पातून नियोजित सात हजार हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प मिळून असलेली सिंचनाची क्षमता प्रत्यक्षात साकार झाली पाहिजे. यासाठी आवश्यक ती कामे करा. याबाबत प्रकल्प निहाय सिंचन क्षमता व निर्माण झालेल्या सिंचन क्षमतेचा आढावा घेऊ, असे पालकमंत्री म्हणाले. श्री. येरावार यांनी शहरातील विकास कामांना गती देण्यासोबतच सिंचन सुविधेच्या बाबत मुद्दे उपस्थित केले. श्री.येरावार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले.

00000

 

सर्वसामान्यांना परिपूर्ण वैद्यकीय सुविधेसाठी शासनामार्फत विविध सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

नागपूर,दि. 31 : सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिल्या जात आहे. नागपूर मधील विविध शासकीय रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वैद्यकीय सुविधांचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून शासकीय दंत रुग्णालयातील ही अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाची अर्थात मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची राज्यातील पहिली उपलब्धी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

येथील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रीया गृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागीय संचालक डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पंदीलवार आदी उपस्थित होते.

अशा आहेत सुविधा

नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये लॉमीनार ऐअर फ्लो सारखे जीवाणू आणि धुळ कमी ठेवणारी यंत्रणा असल्याने निर्जंतुकीकरण सोपे झाले आहे. यात भविष्यातील गरजेप्रमाणे आवश्यकते बदल केव्हाही करता येऊ शकतात. सुरक्षिततेसाठी असलेली आंतरराष्ट्रीय मानके लक्षात घेऊन या नवीन ऑपरेशन थिएटरमध्ये सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

सिम्युलेशन लॅब

सिम्युलेशन लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था आहे. यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव आपल्या कौशल्यात वृध्दी करुन घेता येईल. देशातील अत्याधुनिक अशी पहिली सिम्युलेशन लॅब म्हणून याकडे पाहिले जात आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही नवी उपलब्धी करुन देण्यात आली आहे. यात आवश्यक तेवढे एक्स-रे आणि दंत प्रक्रिया शिकण्यास मदत होईल. विशेषत: येथील आधुनिक उपकरणाच्या मदतीने टायपोडोन्ट दातांवर थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक उपचार पध्दती शिकविली जात आहे.

0000

 

‘लोकराज्य’ जून २०२५

‘लोकराज्य’ जून २०२५

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

नवी दिल्ली, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांची  जयंती  महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, सहायक निवासी आयुक्त, डॉ राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह  उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

अहिल्यानगर दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी ता.जामखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरातील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते  महाआरतीही करण्यात आली.

000

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील विशेषांक प्रकाशित 

अहिल्यानगर, दि. ३१ : अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘लोकराज्य’ च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्यात  आयोजित या प्रकाशन सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,  आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार नारायण पाटील, आमदार अमोल खताळ, आमदार चित्रा वाघ, आमदार काशिनाथ दाते, आमदार मोनिका राजळे, आमदार सुरेश धस, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, माजी आमदार रमेश शेंडगे, प्रा.लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि ‘लोकराज्य’चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर जन्म त्रिशताब्दी निमित्ताने तयार करण्यात आलेले बोधचिन्ह आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य, त्यांचे महाराष्ट्रातील कार्य, धर्मपरायणता, समाजकार्य, राज्यकारभाराचा आदर्श, दातृत्व, त्यांनी उभारलेल्या विविध वास्तूंची माहिती अंकात देण्यात आली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी लिहिलेले लेख अंकात समाविष्ट आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसह शासनाने जन्म त्रिशताब्दी उत्सवानिमित्त घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देखील या अंकात देण्यात आली आहे.

000

 

ताज्या बातम्या

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी

0
सातारा दि.: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाहणी करून वारकऱ्यांची संवाद साधला. सार्वजनिक आरोग्य...

सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. 29 : सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन...

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...