शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 600

‘भारतीय न्याय संहिता’ या विषयावर ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि.२५ :  देशात १ जुलै २०२४ पासून नवीन फौजदारी कायदे लागू झाले असून भारतीय न्याय संहिता व अन्य कायद्यांबाबत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची मुलाखत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखतीत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी देशात १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत, सोमवार दि.२६ आणि मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.२५  ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

—— 000 —–

नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांच्या हस्ते पाच तख्त साहिबांची विशेष रेल्वेला हिरवी झेंडी

नांदेड दि. 25  (जिमाका)- नांदेड हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंघजी यांचे वास्तव्य असलेली पावन भुमी असून या भुमीत त्यांनी सर्व जगाला मानवतेची शिकवण दिली आहे. अशा या पावनभूमीतील नांदेडचे रेल्वे स्टेशन हे येत्या कालावधीत सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेले देशातील सर्वोत्तम रेल्वे स्टेशन करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी केले.

गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 25 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यत पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन येथून दुपारी 12.30 वाजता या यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी या विशेष ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, संत बाबा कुलवंत सिंघजी, समुह पंच प्यारे साहिबान, संत बाबा बलविंदर सिंघजी, आयोजक रविंद्रसिंघ बुंगई, दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे आदींची उपस्थिती होती.

नांदेड रेल्वे स्टेशन येथून आज पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वेला रवाना करण्यात आले. या यात्रेत 1 हजार 300 भाविकांचा समावेश असून ही यात्रा पटना, दिल्ली, अनंतसाहिब फतेहगडसाहिब सरहंद, दमदमासाहिब भटींडा, दरबारसाहिब अमृतसर येथे पोहोचणार आहे. तसेच ही यात्रा 6 सप्टेंबर रोजी नांदेडला पोहोचणार आहे. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी लंगर, वाहनांची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था केली आहे.

00000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दीदींशी संवाद; आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना

जळगाव,दि.25 (जिमाका) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली.

 

येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा 80 लखपती दीदींशी संवाद साधला. या लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदी, ड्रोन दिदी, पशु दिदी, कृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

०००००००

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाचे आयोजन

अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण; पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित

जळगाव, दि. 25 (जिमाका): भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात 3 कोटी घरे बांधण्यात येतील, त्यात महिलांचे नाव प्रथम असेल, असेही त्यांनी सांगितले.

जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीअल पार्क येथे (विमानतळ परिसर) देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेन्नासानी, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच, कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्र ही राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे. या राज्याला मातृशक्तीचा समृध्द आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो. अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचे दर्शन घडले. जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आपल्या देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोलाचा असून लखपती दीदी योजना ही त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.  मागील एका महिन्यात 11 लाख दीदी लखपती बनल्या आहेत, यात एक लाख दीदी महाराष्ट्रातील आहेत. त्यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकीकडे विकसित राष्ट्र म्हणून त्या दिशेने काम सुरु असताना महिलांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांसाठी 3 कोटी घरे बांधताना ती त्यांच्या नावावर केली जातील. याशिवाय केंद्र सरकारने जनधन खाते उघडले. मुद्रा योजना सुरू केली. विना तारण कर्ज दिले. यात 70 टक्के महिला आहेत. महिलांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला विश्वास आहे. त्यांच्यासाठी  स्व- निधी योजना सुरू केली. विश्वकर्मा परिवार अंतर्गत महिलांना जोडले. सखी मंडळ मार्फत 10 कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांना गेल्या दहा वर्षांत 9 लाख कोटींची मदत केली, असे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, बचतगटांच्या महिलांना ड्रोन पायलट बनविणार असल्याचे सांगून  त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. आधुनिक शेतीसाठी महिलांना प्रेरित कऱण्यात येईल. यासाठी महिलांना कृषी सखी करून रोजगार वाढविण्यावर भर राहील. महिलांसाठी अर्थसंकल्पात 3 लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सेनादलात महिलांचा समावेश केला गेला आहे. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याचा वापर केला जाईल. महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महिलांचे सामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. यासाठी आवश्यक ती मदतही प्रत्येक राज्यांना केली जाईल, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत राहील. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. रोजगार आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष येथे असते. त्यामुळे या प्रयत्नांसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाविकांना आदरांजली

दरम्यान, आपल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या यात्रेकरूंबाबत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने पावले उचलली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना तातडीने नेपाळला पाठविले. या दुर्घटनेत जखमींवर चांगले उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना  उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

देशात 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, यात राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. अनेक भगिनी पुढाकार घेवून लघु उद्योग करून कुटूंबाला पुढे नेत आहेत. राज्यात 25 हजार स्वयंसहायता गटांना  30 कोटींची कर्जे देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे. केंद्र शासनाने 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. राज्यातील कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने आणि सिंचन प्रकल्पांना निश्चितपणे मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना  शिवराज सिंह चौहान

लखपती दीदी ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि विकासाला वेग देणारी योजना आहे. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. भरपावसात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.

देशाच्या विकासात नारीशक्तीचे मोठे योगदान  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला विकासाच्या प्रवाहात आल्यास देशात प्रभावी आणि विकासात्मक बदल घडू शकतो. त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या नारीशक्तीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहाय्य करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नारीशक्ती ही विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. देशाच्या  विकासाच्या भागीदारीत महाराष्ट्र कुठेच कमी पडणार नाही.  संत मुक्ताई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अशा ठिकाणी हे लखपती दीदीचे संमेलन होत आहे. राज्यात बचतगटामार्फत 75 लाख कुटूंब जोडली गेली असून दोन कोटी कुटूंब जोडण्याचा संकल्प आपण केला आहे. जळगाव जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नार-पार सिंचन योजनेला आपण गती दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर निविदा आणि इतर प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्य शासन नेहमीच महिला भगिनींच्या पाठिशी  उपमुख्यमंत्री अजित पवार

संपूर्ण देशात सुरू असलेला विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्यात आला आहे.  केळी,  कांदा उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला आहे. राज्यात  50 लाख लखपती दीदी बनविण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दरम्यान, आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट (हिमाचल प्रदेश), महबूबा अख्तर (जम्मू काश्मीर), गंगा अहिरवार (मध्य प्रदेश), एस. कृष्णावेण्णी (तेलंगणा) आणि नीरज देवी (उत्तर प्रदेश), सेरिंग डोलकर (लडाख) यांना यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बचतगटाच्या 48 लाख महिलांना 2500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले.

उघड्या जीपमधून प्रधानमंत्री मोदी यांचे भगिनींना अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रमस्थळी उघड्या जीपमधून आगमन झाले. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरी मारली. यावेळी उत्साहाने भारावलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते.

0000

आकांक्षित तालुका विकासात जीवती तालुका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

केंद्र शासनाच्या ४थ्या डेल्टा रँकिंगमध्ये पटकाविले स्थान

चंद्रपूर, दि. 24 : विकासाच्या बाबतीत अतिमागास असलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या नीति आयोगाने संपूर्ण भारतात 500 आकांक्षित तालुके घोषित केले आहे. यात महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती या एकमेव तालुक्याचा समावेश असून नुकत्याच जाहीर झालेल्या 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जीवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर पहिल्या क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आंतरमंत्रालयीन समितीने 27 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशातून 500 तालुक्यांची निवड केली आहे. त्यापैकी या योजनेत महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जिवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यातील 27 तालुक्यांमूधन द्वितीय क्रमांक, पश्चिम विभागातील 70 तालुक्यांमधून 21 वा क्रमांक तर संपूर्ण भारतातील 500 तालुक्यांमधून जीवती तालुक्याने 111 वा क्रमांक पटकाविला आहे.

आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, मुलभूत पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आर्थिक समावेश आणि सामाजिक विकास या थीमवर तालुक्यांचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत तीन महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारच्या 40 निर्देशांकांपैकी जीवती तालुक्यात 6 निर्देशांक 100 टक्के साध्य करणे, हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 4 जुलै 2024 रोजी जीवतीमध्ये आकांक्षित तालुका अभियान अंतर्गत संपूर्णत: अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

असे आहेत जीवती तालुक्यासाठी विशेष निर्देशांक : आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास आणि मुलभूत पायाभूत सुविधा या प्रमुख पाच थीमवर सदर अभियान 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या  कालावधीत राबविण्यात येणार आहे. यात 1) गरोदर मातांची पहिल्या तिमाहीमध्ये 100 टक्के नोंदणी करणे, 2) तालुक्यामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असणा-या नागरिकांची 100 टक्के उच्च रक्तदाब तपासणी करणे, 3) या वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी करणे, 4) तालुक्यातील 100 टक्के गरोदर मातांना नियमितपणे पोषण आहार देणे, 5) भुधारकांना मृदा आरोग्य कार्डचे वितरण करणे आणि 6) तालुक्यातील 100 टक्के बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे.

0000000

रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

नंदुरबार, दि. 24 ऑगस्ट : महिलांना समाजासह, कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने  सुरू केली आहे. जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

त्या जिल्ह्यातील सोयरापाडा ता. अक्कलकुवा येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या मेळाव्यात बोलत होत्या यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशा पाडवी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण, जि.प.चे समाज कल्याण सभापती तथा सदस्य शंकर पाडवी,पंचक्रोशीतील सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, माझ्या कामाची सुरवात आदिवासी भागातील महिलांच्या प्रश्नातून झाली आहे.  महिलांमध्ये लक्ष्मी,दुर्गा, सरस्वती असते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, दहेली जलसिंचन प्रकल्पाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत होता. धरण झाले त्याच्यावर 422 कोटींचा खर्च करूनही त्याला कालवे नव्हेत, या कालव्यांना मान्यता देण्याचे काम या शासनाने केले आहे. या धरणामुळे 26 गावातली 3 हजार 200 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. येणाऱ्या काळात या आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलकुवा उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देणार असून खापर येथे चांगले तालुका रुग्णालय व्हावे यासाठीही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर  मोलगी येथेही उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या,जसे रेशन वर्षानुवर्षे मिळत आहे. तसे लाकडी बहिण योजनेचे पैसे देखील मिळत राहतील. त्यासाठी निवडणूकीत चांगली कामे करणारी माणसं निवडून देण्याची दबाबदारी नागरीकांची असते. पुढच्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातले रस्ते चकाकण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, बॅकामधली गर्दी पाहता बॅंकांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्याच्या  व बॅकांमध्ये कामानिमित्त आलेल्या महिलांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करुन देण्यासाठी सूचना केल्या जातील. अशा रांगांमध्ये उभ्या असलेल्या महिलांसाठी स्वत:च्या निधीतून चहापाणी आणि नाश्त्यासाठी निलम गोऱ्हे  यांनी दोन लाखांचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी विधान परिषदेत काम करत असताना, आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी प्रश्न मांडत असताना आपल्याला उपसभापती मिलन गोऱ्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असून त्यामुळे याभागातील अनेक योजनांना गती व न्याय मिळाला आहे.

यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला, भगिनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

0000000000

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

उदगीर येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीचे भूमिपूजन
लातूर, दि. 24 : मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर्टी संस्था स्थापन करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातही समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर शहरातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. आमदार अमित गोरखे, सचिन साठे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, नगरपरिषद मुख्याधिकारी सुंदर बोंदर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, बन्सीलाल कांबळे, अंबादास सगट यांच्यासह पदाधिकारी, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ना. संजय बनसोडे यांच्यासह मान्यवरांचे फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत करण्यात आले. ना. बनसोडे यांच्या हस्ते कुदळ मारून इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून या इमारतीसाठी 14 कोटी 96 लाख रुपये निधी उदगीर नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था असलेल्या या इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका असणार आहे.
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे चिराग नगरमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरात वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक होणार असून लवकरच त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
उदगीर शहरात अतिशय मोक्याच्या जागेवर  साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीची उभारणी होत आहे. याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आणखी 50 लाख रुपये निधी दिला जाईल, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि भव्य सभागृह उभारण्यात आले आहे. उदगीर शहरात विविध ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज भवन उभारण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
राज्य शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करीत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. पुढील काळात ही रक्कम दुप्पट करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन मातंग समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. बार्टीच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या आर्टी संस्थेमुळे मातंग समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षा, संशोधनासाठी मदत होवून समाजाचा विकास होईल, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्य, कष्टकरी माणसाचे जीवन रेखाटले. या समाजाच्या विकासाबाबत चिंतन करून साहित्य निर्मिती केली. त्यांचे विचार प्रत्येकाने समजून घेवून कोणताही जातीभेद न मानता समाजासाठी काम करावे, असे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यावेळी म्हणाले.
प्रा. अंबादास सगट, रामचंद्र तिरुके, बन्सीलाल कांबळे, पप्पू गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पंडीत सूर्यवंशी यांनी केले, शिवाजी देवताळे यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यस्तरीय कृषी महोत्सवास एक दिवस मुदतवाढ – कृषिमंत्री धनंजय मुंडे

आता २६ ऑगस्ट रोजी समारोप

मुंबई, दि.24 : परळी वैजनाथ, जिल्हा- बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे दि. २१ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. कृषी महोत्सवास राज्यातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रदर्शनाचा कालावधी एक दिवस वाढवण्यात येत आहे. त्यामुळे या कृषी महोत्सवाचा समारोप दि. २५ ऑगस्ट ऐवजी २६ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येईल.  सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, सिंचन साधने, संरक्षित शेती साधने, महिला गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादींच्या उत्पादित वस्तू, खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री साठी ४०० हून अधिक स्टॉल प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, झालेले संशोधन यांची देखील माहिती या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. तसेच रानभाजी महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

 

000000

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार

३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.२४.   ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने   सुरू आहे. ज्या महिलांनी ३१  जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या  पात्र महिलांना  लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री  आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे.   त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना  लाभ मिळणार आहे.

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.

००००

‘विकसित भारता’साठी एमएमआर प्रदेश पॉवर हाऊस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागरी विकास, पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूक येणार

मुंबई, दि. 24: – भारताच्या ‘फाईव्ह ट्रिलीयन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यात मुंबई महानगर प्रदेशाचा सिंहाचा वाटा राहणार आहे. या प्रदेशातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

एमएमआर प्रदेश २०४७ मधील विकसित भारतातील अर्थव्यवस्थेसाठी ‘पॉवर हाऊस’ ठरणार असून, यातील दळणवळण, शाश्र्वत नागरी विकास आणि पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना गती देणारी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एमएमआर प्रदेशाचा नागरी विकासाच्या दृष्टीने कायापालट होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांमध्ये ‘प्लॅटिनम’ आणि ‘सुवर्ण’ प्रकल्प अशा श्रेणीमध्ये आखणी केली जात आहे.

प्लॅटिनम प्रकल्प

अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लींक), अलिबाग, गोराई आणि मढ या तीन पर्यटन विकास क्षेत्रांचा, आणि खारबांव इंटिग्रेंटेड लॉजिस्टिक्स पार्क, अणगांव-सापे, वाढवण आणि दिघी येथील औद्योगिक नगरींचा समावेश आहे.

अटल सेतू हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. अलिबाग, गोराई आणि मढ या क्षेत्रात जागतिकस्तरावरील आधुनिक अशा पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल. वसई मधील खारबांव इथे २४८ हेक्टरवर ग्रीनफिल्ड इंडस्ट्रियल पार्क साकारण्यात येणार आहे. ज्यामुळे ५६० कोटी डॉलर्सची गुंतवणूक येणे शक्य होणार आहे.

अणगांव – सापे, वाढवण आणि दिघी इथे औद्योगीक नगरी विकसित केल्या जातील. हाय-ग्रोथ इंडस्ट्रीयल हब म्हणून यांचा विकास केला जाईल. ज्यातून उत्पादन क्षेत्र म्हणून आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा परिसर म्हणून तीन ठिकाणी मिळून सुमारे हजार कोटी डॉलर्सची गूंतवणूक होईल,अशी अपेक्षा आहे.

सुवर्ण प्रकल्पांतर्गत नैना प्राधिकरणांतर्गत बारा ठिकाणी टाऊनशिप प्रकल्प, मुंबई-पुणे हायवे सर्व्हिस लेन, गोरेगांव-ठाणे टनेल आणि सिंहगड रस्ता या प्रक्लांपासह, सार्वजनिक वाहतूक सुविधांचे प्रकल्प, सागरी-हवाई आणि रेल्वेचे पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते वाहतुकीचे महत्वांकाक्षी प्रकल्प, मुंबई-अहमदाबाद (हायस्पीड रेल्वे) बुलेट ट्रेन, एकात्मिक नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्रातील नैना प्राधिकरणांतर्गत एमएमआरडीए बारा ठिकाणी परवडणारी घरे श्रेणीतील गृहनिर्माण प्रकल्प उभे करेल, असे नियोजन आहे. यातून मोठ्या लोकसंख्येला मागणीनुसार घरे उपलब्ध करून देता येणार आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या दोन्ही बाजूला सहापदरी सेवा रस्त्यांची बांधणी करण्यात येईल. ज्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा वाढता ताण कमी करता येणार आहे. गोरेगांव-ठाणे टनेल आणि सिंहगड रस्ता विकास यांच्यामुळे महत्वाची विकास क्षेत्रांना जोडणारी दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षम जाळे

कोस्टल रोड मेट्रो आणि मेट्रो लाईन – ५ या महत्वांकाक्षी प्रकल्पांमुळे प्रवाशी वाहतूक सुविधेत मोठी सुधारणा होईल, यासाठी सुमारे १ हजार २७० कोटी डॉलर्सची तरतूद केली जाणार आहे.

बस रॅपिड ट्रांझिट सिस्टीम (बीआरटीएस)

मुंबईतील बस सेवेचे आधुनिकीकरण करताना या संकल्पनेचाही अवलंब केला जाईल. यातून २०३१ पर्यंत अतिरिक्त दोन लाख प्रवाशी वाहतुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सागरी, हवाई आणि रेल्वे पायाभूत सुविधा उभारणीस गती या क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे.

बंदर विकास

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, वाढवण बंदर, दिघी आणि रेवस या ठिकाणच्या बंदर सुविधांच्या विकासावर भर देण्याचे नियोजन आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार-उदीमाला प्रोत्साहन मिळेल.

हवाई वाहतूक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वाहतूक (२०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक) सुरु झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषण आणि अन्य समस्या दूर होणार आहे. याशिवाय २०३२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरणही करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणामुळे दरवर्षी आणखी सहा कोटीं प्रवाशांना वाहतूक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

रस्ते विकासांचे महत्वाकांक्षी प्रकल्प

एमटीएचएल, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा – कोस्टल रोड, वडोदरा महामार्ग यांसह भारतमाला परियोजना टप्पा-३ च्या कामांमुळे मोठी गूंतवणूक होणार आहे.

बुलेट ट्रेन

मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या प्रकल्पामुळे देशातील आर्थिकदृष्ट्या दोन महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत.

इंटिग्रेटेड रिव्हरफ्रंट विकास योजना 

मिठी, ओशिवरा या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एमएमआरडीएने नियोजन केले आहे. नमामी गंगा या प्रकल्पाच्या धर्तीवर यातून पर्यटन, विरंगुळा क्षेत्र म्हणून विकास केला जाईल. तसेच पर्यावरण जतन-संरक्षणाचे उपायही योजले जातील.

एकंदरीत भारताची नागरी लोकसंख्येची वाढ गृहीत धरून एमएमआर प्रदेशातील नागरी तसेच पायाभूत सुविधांचे सुनियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठीच या क्षेत्रात सुमारे १६ हजार ४०० कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकींच्या विविध क्षेत्रातील प्रकल्प, सुविधांच्या नियोजनावर भर देण्यात येत आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार संधीही उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

याबाबत नुकताच निती आयोगानेही अहवाल दिला आहे. त्यामुळे एमएमआर प्रदेश विकसित भारतासाठी ‘पॉवर हाऊस’ ठरणार आहे.

००००

ताज्या बातम्या

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपखल वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...

विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या विकासाचे प्रतिबिंब दिसावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दि. १२ (जिमाका): पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सबलीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे...

बिहारमध्ये ८०.११ टक्के मतदारांनी भरले नावनोंदणी फॉर्म

0
मुंबई, दि  १२ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमधील जवळपास सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून, आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६ कोटी...

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
देशाच्या स्वावलंबन व सामरिक सज्जतेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे नागपूर, दि. १२ : भारत आज जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारा देश म्हणून पुढे...

शिवतीर्थावर शिवभक्त, शिवप्रेमींचा जल्लोष

0
सातारा दि. १२ (जिमाका):  छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील...