मंगळवार, जून 17, 2025
Home Blog Page 594

क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती संभाजीनगर दि.(जिमाका)- थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

आपत्ती व्यवस्थापन जनजागृती वाहनास पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती वाहनांना आज  पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेत प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे एकूण २० रोड शो व २० पथनाट्य सादर होणार आहेत. दि.७ पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे.

अवयव दानाबाबत जनजागृती आवश्यकपालकमंत्री

अवयव दान हे रुग्णाला जीवनदान देऊ शकते. त्यासाठी अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दि.३ ऑगस्ट या राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. शिराझ बेग तसेच सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जलसंधारण प्रकल्प बांधणी आणि दुरुस्तीचे काम तात्काळ मार्गी लावावे-पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर दि.(जिमाका)- सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील घाटनांद्रा बंधारा यावरील प्रकल्पयाचे पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी व जलसंधारणाचे काम पूर्ण करावे,असे निर्देश राज्याचे पणन वअल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री  तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जलसंपदा विभागाला दिले.

सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील जलसंधारण प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे. जिल्हा जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे, कार्यकारी अभियंता सब्बिनवार, सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील जलसंधारण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री सत्तार म्हणाले की, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या प्रकल्पाच्या माध्यमातून सोडवला जाणार आहे.  सोयगाव येथील धरणाची उंची वाढवण्याबाबत व सूक्ष्म सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी खेळणा प्रकल्प दुरुस्ती सह नवीन बंधारे तयार करण्याची काम हाती घ्यावे. यासाठी तात्काळ वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय करून जलसंधारण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी दिले. अजिंठा येथील मुख्य प्रवेशद्वाराची दुरुस्ती त्याचप्रमाणे इतिहासकालीन दरवाजाची दुरुस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. इतिहासकालीन दरवाजाचे पुनरुज्जीवन करताना पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दर्जेदार काम करावे,असेही सत्तार यांनी सांगितले.

जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न – पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर दि.(जिमाका)-जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच शिक्षण व आरोग्य या सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी दिलेल्या निधीचा विनियोग काटेकोरपणे करुन शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवावा,असे निर्देशही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिले. यावेळी सन २०२४-२५ साठी  ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांच्या नियतव्ययास मंजुरीही देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री अब्दुल सत्तार हे होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसभा सदस्य खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, आ. प्रशांत बंब तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच सर्व यंत्रणाप्रमुख आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी यापूर्वीच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपालन अहवालावर चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली. तसेच गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नियतव्यय सादर करण्यात आला. त्यात सर्वसाधारण योजनांसाठी ६६० कोटी रुपये, विशेष घटक योजनांसाठी १०४ कोटी रुपये तर आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रासाठी ९ कोटी ९० लक्ष रुपये अशा एकूण ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांच्या नियतव्ययास मान्यता देण्यात आली.

पालकमंत्री सत्तार म्हणाले की, शिक्षण आणि आरोग्य या घटकांसाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच जिल्ह्याचे नियोजन करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंत्रणांनी सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करावी. तसे न झाल्यास जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

नियोजन समितीच्या झालेल्या चर्चेत खासदार कल्याण काळे, उपस्थित सर्व आमदार, सदस्य यांनी सहभाग घेऊन मौलिक सुचना मांडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी नियोजन आराखड्याचे सादरीकरण केले व उपस्थितांचे आभार मानले.

महिला व बालविकास विभागामार्फत गर्भलिंगनिदान विरोधात जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माझी मुलगी या कवितेचे जनजागृती पोस्टर विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग व आयुष संचालनालयाच्या वतीने अवयवदान दिवस साजरा

मुंबई, दि. 3 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्या वतीने राष्ट्रीय (भारतीय) अवयवदान दिनानिमित्त आज मुंबईत अवयवदान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अवयवदान करण्याचे आवाहन केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष आयुक्त राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रमण घुंगराळेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय मुंबई, आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, मुंबई व मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

अवयव दान जनजागृती प्रभातफेरी नरिमन पॉईंट ते यशवंतराव चव्हाण सेंटर पर्यंत काढण्यात आली. प्रभातफेरीमध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय मुंबई, आर.ए.पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय मुंबई व मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे विद्यार्थी, अध्यापक व इतर मान्यवरांचा समावेश होता.

यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागाद्वारे अवयवदात्यांचा गौरव करण्यात आला. तसेच जुलै महिन्यात विभागाधिनस्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या  विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषक वितरण करण्यात आले.

अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांना नवीन जीवन मिळते. त्यामुळे या अवयवदान मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी केले.

प्रधान सचिव श्री. वाघमारे यांनी राज्यातील व देशातील अवयव दानाची परिस्थिती व त्यावर भविष्यात करावयास लागणाऱ्या धोरणाबाबत विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्त राजीव निवतकर यांनी केले. राज्यात सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमाचे व विभागाद्वारे अवयवदान सक्षम करण्याकरीता घेण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमात कार्यक्रमाचे समन्वय मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती मृणाल पोतदार व विशेष कार्य अधिकारी डॉ. राकेश वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डिंपल पाडावे व डॉ. रेवत कानिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे यांनी केले.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग व राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आजचा भारतीय अवयवदान दिवस हा मुंबईप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयातर्फे राज्यभर साजरा करण्यात आला. यामध्ये राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयामार्फत अवयवदान निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी ‘संविधान मंदिर’ उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची महती सांगण्याचा प्रयत्न – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई,  दि. ३ : महाराष्ट्रातील सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १६३ शासकीय तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर उभारले जाणार आहे. या संविधान मंदिरांचे १५ ऑगस्ट २०२४ रोजी एकत्रित ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक सतीश सूर्यवंशी, सह संचालक डॉ. अनिल जाधव, केदार दहीबावकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे आम्ही संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना राज्यघटनेची महती, त्याचे महत्त्व समजावण्याचा उद्देश आहे. हे मंदिर विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल. त्यांना, त्यांच्या विचारांना आकार देईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण या ठिकाणी पूजली जाईल. योग्य विचारांनी प्रेरित झालेला कौशल्य संपन्न युवा स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि देशाची प्रगती साधण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यामुळे नीतिमंत विचार आणि हाताला रोजगार असणारी पिढी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

२६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी, यासाठी संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात निर्माण होणारी पवित्र वास्तू इतक्या पुरतेच या संविधान मंदिराचे अस्तित्व सीमित राहणार नाही. महिन्यातून एकदा येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीबाबत विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. नागरिकांमध्ये विशेषतः उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांबद्दल जागरूकता वाढण्यासाठी मोहीम आयोजित करणे, घटनात्मक समस्या, दुरुस्त्या, समकालीन समाजातील घटनेची भूमिका यासारख्या विषयांना घेऊन परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करणे, विद्यार्थ्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार समजून घेण्यास किंवा त्यांचा वापर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना कायदेशीर सहाय्य आणि समर्थन प्रदान करणे, राज्यघटनेचे सखोल आकलन व्हावे यासाठी निबंध स्पर्धा व संबंधित कार्यक्रम आयोजित करणे यासह संविधानाच्या विविध पैलूंवर पुस्तके, लेख इत्यादी गोष्टी उपलब्ध करुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचा उद्देश आहे. संविधान दिवस, प्रजासत्ताक दिन यासारख्या विशेष महत्त्व असलेल्या दिवसांचे औचित्य साधून या दिवशी येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

मंत्री श्री. लोढा यांनी संविधान मंदिर आणि आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत नागरिकांच्या सूचनादेखील मागवल्या आहेत. नागरिक त्यांच्या सूचना ceo@mssds.in या ई-मेलवर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात जानेवारी ते मे २०२४ मधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ५९६ कोटी रुपये वाटपास मंजुरी – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि.३ : राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त  अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्यात येते. त्या अंतर्गत या निधी वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, जानेवारी ते मे, २०२४ या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे ,जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांसाठी जानेवारी ते मे, २०२४ या कालावधीत शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानी करता १०८२१.०० लाख रुपये, पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी ५८३.९९ लाख रुपये, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील नुकसानासाठी ३८२१२.४१ लाख रुपये, नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १०००४.३५ लाख रुपये असे एकूण एकूण रु.५९६.२१९५ कोटी (पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लक्ष पंचाण्णव हजार फक्त) इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. डीबीटी (DBT) द्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३ : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार

मुंबई, दि. ३ : बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार आहे.

महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता.

आज वर्षा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश दिले.

राज्याच्या ८५% कोटा (शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच ७०%कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा

मुंबई, दि.3 : पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड रोड येथे मजबूत पूर संरक्षक भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देताना निळ्या पूर रेषेतील (ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले.

विशेष दर्जा द्या

एकतानगर, सिंहगड रोड याठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे 3 लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. याठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत असे त्यांनी निदर्शनास आणले. मुख्यमंत्र्यांनी यावर याठिकाणी विशेष दर्जा देऊन पुनर्विकासाचे काम करावे तसेच तसा आराखडा तयार करावा असे निर्देश दिले.

जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडताना पुरेशी सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती दिली तसेच पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी पूर परिस्थितीत प्रशासनाने तत्परतेने केलेल्या मदत आणि बचाव कार्याविषयी सांगितले. धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याचेही ते म्हणाले. भविष्यात या भागात पुराचा धोका होऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पात पूर संरक्षकाचा विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले.

वाहनांची नुकसानभरपाई तातडीने द्या

पूर परिस्थितीत पुण्यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले. पण नियमांमुळे नुकसान भरपाई मिळत नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यावर पुणे पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना विमा कंपन्यांशी एकत्रितपणे बोलून यावर मार्ग काढण्यास आणि तातडीने वाहनधारकांना नुकसान भरपाई मिळावी अशा सूचना केल्या.

अन्नधान्याचे संच पुरवा

पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना विविध संस्थांकडून मदत करण्यात येत आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील पुरेसे अन्नधान्य असलेले संच पूरग्रस्त एकतानगर, सिंहगड रोड येथील गोरगरीब नागरिकांना पुरवावेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याशी बोलून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस मनसे पदाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा

बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतीत दुकानदार, ज्येष्ठ नागरिकांनाही मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

मुंबई, दि.3 : पोलीस दिवसरात्र आपले रक्षण करतात. पण मुंबईतल्या पोलिसांना राहण्यासाठी घरे नाहीत. आपल्याला पोलिसांसाठी लवचिक भूमिका ठेवावी लागेल, म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, नगरविकास विभाग यांनी एकत्रितपणे आपल्याला कशा पद्धतीने मुंबई आणि परिसरात पोलिसांसाठी सेवा सदनिका उपलब्ध करून देता येतील ते प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने ठरवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वरळी येथील पोलीस वसाहतीच्या समस्याही तत्काळ दूर करण्यासाठी आठ दिवसांच्या आत कार्यवाही व्हावी असेही ते म्हणाले.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी पोलीस वसाहतीतील रहिवासीदेखील उपस्थित होते.

पोलिसांना सेवा सदनिका देण्यासंदर्भात कार्यवाही करा

सध्या मुंबईत १८ हजार शासकीय सेवा सदनिका उपलब्ध असून एकूण पोलीस अधिकारी व कर्मचारी ५२ हजार आहेत. केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सदनिका आहेत अशी माहिती पोलीस सह आयुक्त जयकुमार यांनी यावेळी दिली. पोलिसांच्या संख्येच्या तुलनेत ही खूप अपुरी असून बीडीडी चाळीमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांना मालकी हक्काने सदनिका दिल्या आहेत, त्याप्रमाणे मुंबईत इतरत्रही पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिका कशा देता येतील हे पाहावे. सध्या ज्या ज्या गृहनिर्माण योजना सुरु आहेत, त्यात पोलिसांना काही सदनिका राखीव ठेवता येतात का, पुनर्विकसित प्रकल्पांमध्ये प्रोत्साहनपर एफएसआय देता येतो का, तसेच खासगी विकासकांच्या प्रकल्पात सदनिका राखीव ठेवता येतील का यादृष्टीने तातडीने संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

दंडनीय शुल्काबाबतचा प्रस्ताव तातडीने ठेवा

या बैठकीत वरळी पोलीस वसाहतीतील निवृत्त कर्मचाऱ्यांनीदेखील अनुज्ञेय कालावधीनंतर लावण्यात येणाऱ्या  दंडाच्या रकमेविषयी तक्रारी केल्या. 150 रुपये प्रति चौरस फूट असे अवाजवी दंडनीय शुल्क लावले जाते. कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर ही मोठी रक्कम भरणे शक्य होत नाही. तसेच अनेक अनुकंपा तत्वावरील पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिका रिकामी करून देण्यास सांगण्यात येते, अशा तक्रारी करण्यात आल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी दंडनीय शुल्काबाबतचा प्रस्ताव आठ दिवसांत शासनाकडे पाठवावा, असे निर्देश दिले. अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना सदनिकांतून काढू नका अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बीडीडी चाळीतील दुकानदारांना दिलासा

बीडीडी चाळींचे पुनर्वसन सुरु असून पूर्वीपासून त्याठिकाणी असलेल्या दुकानदारांनी आपल्याला पुनर्विकसित ठिकाणी वाढीव जागा मिळावी अशी मागणी केली. यासंदर्भात दुकानदार न्यायालयातदेखील गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दुकानदारांना वाढीव जागा कशी देता येईल याबाबत नव्या इमारतींच्या आराखड्याचा विचार करून तसा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या असेही त्यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांना सांगितले.

….तर एसआरए विकासकांवर कडक कार्यवाही करा

या बैठकीत वरळी येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या शिष्टमंडळाने विकासक थकित भाडे देत नाही, ताबा देत नाही, स्थगिती असूनही कामे सुरु आहेत, वीजेचा पुरवठा नाही, लिफ्ट्स् दिलेल्या नाहीत. जुन्या इमारतींची अवस्था वाईट होत असून दुरुस्ती केल्या जात नाही अशा तक्रारी केल्या. गोमाता जनता एसआरए, श्रमिक एकता फेडरेशन, साईबाबा नगर, भांडूप पूर्व येथील साईनगर एसआरए याठिकाणच्या रहिवाशांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. यावर नियम झुगारून देणाऱ्या अशा विकासकांवर कडक कार्यवाही करण्याचे तसेच एसआरए इमारतीतील ज्या सदनिका विक्रीसाठी खुल्या आहेत त्यांची विक्री थांबविण्याच्या नोटीसा देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले. इमारतींमध्ये आवश्यक त्या सुविधा आहेत का तसेच किती ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे ते तातडीने प्रत्यक्ष फिल्डवर अधिकाऱ्यांना पाठवून तपासण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जळगाव येथील पीएम आवासला गती द्या

या बैठकीत जयप्रकाश बाविस्कर यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे पंतप्रधान आवास योजना रखडली असून त्याला गती देण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांना यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून ही योजना राबविण्यातले अडथळे दूर करण्याचे निर्देश दिले.

…आणि मुख्यमंत्र्यांनी लावला रेल्वे डीआरएमना फोन

कल्याण ते शिळ रस्त्यावर पलावा समोरील पूल आणि कल्याण येथील पत्री पूल येथे रेल्वेच्या आवश्यक त्या मान्यता मिळालेल्या नाहीत तसेच येथील वाहतूक कोंडी अजूनही सुटत नाही याकडे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी यावर बैठकीतूनच मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांना दूरध्वनीवरुन याविषयी तातडीने परवानगी देण्याच्या सूचना केल्या. या पुलांच्या जोडरस्त्यांचे कामही तातडीने हाती घ्यावे. तसेच येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणखी काही पर्यायी रस्ते बांधता येतील का हे पाहण्यास त्यांनी एमएसआरडीएचे व्यवस्थापकीय अनिल गायकवाड यांना सांगितले. कल्याण शिळ फाटा मार्गावरील जमिनी घेतलेल्यांच्या भूसंपादनाचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

काळू धरणाची सद्य:स्थिती त्यांनी जाणून घेतली. एक ते दोन महिन्यात मान्यता प्राप्त होतील, अशी माहिती जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी यावेळी दिली. हे धरण पूर्ण झाल्यावर कल्याण डोंबिवली भागालाही चांगला पाणी पुरवठा सुरु होईल असे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

या बैठकीस मनसेचे पदाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, त्याचप्रमाणे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

0
मुंबई, दि. १७ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या...

पालिका शाळांनी विद्यार्थ्यांना परकीय भाषा देखील शिकवाव्यात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. १७: लहान मुले तंत्रज्ञानस्नेही असतात तसेच ते नवनवीन भाषा देखील लवकर शिकतात. बृहन्मुंबई महानगर पालिका देशातील आर्थिकदृष्ट्या संपन्न महानगरपालिका असून पालिकेने आपल्या...

वर्सोवा खाडी येथील मासेमारी बंदराच्या कामाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १७ : वर्सोवा खाडी येथील प्रस्तावित मासेमारी बंदराच्या कामास गती देऊन लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री...

मंत्रिमंडळ निर्णय 

0
महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या ‘महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९’ ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १७ : राज्यातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि प्राध्यापकांच्या क्षमतेत गुणात्मकवाढ करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘क्वांटम संगणन उपक्रम’  राबविण्यात...