शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog Page 579

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न करावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ नियामक परिषदेची पहिली बैठक

मुंबई,दि.१४ कलावंतांची खरी संपत्ती ही कलेची  निर्मिती असते.  ती राज्याची, देशाची व जगाचीही असते. त्या कलेचे वैभव जोपासण्यासाठी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच कला शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने प्रयत्न करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ नियामक परिषदेची पहिली बैठक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. यावेळी उच्च व तंत्र  शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी,कला संचालक राजेश मिश्रा, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

याबैठकीत शासकीय उच्च कला  परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा यांचे प्रस्तावित परीक्षा शुल्कास तसेच उच्चकला पदविका प्रमाणपत्र परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या शुल्कास मान्यता, राज्यकला शिक्षण मंडळासाठी लेखा परिक्षणासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक, महाराष्ट्र राज्य कला संचालनालय पीएलएमधून तात्पुरत्या स्वरूपात निधी देण्यास मान्यता,महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा परीक्षा,शुल्क निश्चित समितीच्या कामासाठी संगणक प्रणाली  राबविणे याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ.होमी भाभा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 13 :  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्र दालन संदर्भात आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ. होमी भाभा विद्यापीठ,मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी  आणि आर. के. लक्ष्मण फाउंडेशन यांच्यातील या सामंजस्य कराराच्या माध्यमातून  आर. के. लक्ष्मण यांच्या सर्जनशील तत्त्वज्ञानाचा समावेश करून कला शिक्षणाचा विकास करणे, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कला आणि संवाद शिक्षण सुधारण्यासाठी प्रशिक्षण आणि सर्जनशील अभिव्यक्ती, चिंतनशील विचार, आणि संवाद कौशल्ये विकसित करण्याच्या संधी प्रदान करण्यात येणार आहे.

या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी  आणि आर. के. लक्ष्मण फाउंडेशन ११ वी इयत्तेपासून पुढील विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षण कार्यक्रम सह-निर्मित आणि व्यवस्थापित करतील. या कार्यक्रमांमध्ये संग्रहालय दौऱ्यांचे आयोजन, कार्यशाळा, आणि ख्यातनाम कलाकारांशी संवाद अशा प्रत्यक्ष शिक्षणाच्या संधी समाविष्ट केल्या जातील. शिवाय, आर. के. लक्ष्मण फाउंडेशन डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक कौशल्ये आणि सर्जनशील विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देईल.

मंत्रालयात झालेल्या सामंजस्य कराराच्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव विलास पाध्ये,आर.के.लक्ष्मण फाउंडेशनचे संचालक उषा लक्ष्मण, डॉ.विशाल बानेवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव विलास पाध्ये यांनी तर आर.के.लक्ष्मण फाउंडेशनचे संचालक उषा लक्ष्मण यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

डी-नोव्हो विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,दि.१३ : मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचा मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.या विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र  शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या विद्यापीठासाठी आवश्यक पदे भरण्यास मान्यता, अध्यापकीय पदांची पदभरती, शिक्षकेत्तर  पदभरती, वसतिगृह,याबाबत सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅइक (विषाणूजन्य) रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. पिवळा मोझॅइक संदर्भातील लक्षणे व उपाय खालीलप्रमाणे :-

पिवळा मोझॅइकची लक्षणे (Yellow Mosaic Virus – YMV)

रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळया रंगाचे छोटे-छोटे चट्टे दिसतात, तद्नंतर पानावर चमकदार पिवळया हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे व दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होतो.

सोयाबीन मोझॅइक विषाणूची लक्षणे (Soybean Mosaic Virus – SMV):

या रोगाचा प्रादुर्भाव सद्यजरी दिसून आला नसला तरी भविष्यातील खबरदारी म्हणून या रोगाची लक्षणे व व्यवस्थापन-

रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखुड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानामध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलुन करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे होतो व दुय्यम प्रसार हा मावा किडीद्वारे होते.

प्रतिबंधात्मक उपाय:-

सुरूवातीसच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावीत. पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.

नियंत्रणाचे उपाय:-

माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ x ३० सेमी आकाराचे एकरी २०-२५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावेत.

रोग/किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पुढील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

इमीडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के डब्लुजी २ ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्युजी ३ ग्रॅम किंवा अॅसिटामिप्रिड २५ टक्के + बायफेन्थ्रीन  २५ डब्लुजी ५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करतांना किटकनाशके आलटून पालटून वापरावीत.

टिप: नियंत्रण उपायामधील रासायनिक किटकशाकांच्या शिफारसी या तदर्थ (Adhoc) स्वरुपाच्या आहेत.

(माहिती : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला)

00000

 

विदर्भ-मराठवाड्यात घडणार दुधक्रांती; सर्व १९ जिल्ह्यात शासनातर्फे राबविला जाणार दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २

मुंबई, दि. १३ :- मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला १४९.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले, विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा १ मध्ये मराठवाडा व विदर्भातील केवळ ११ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र  आता यामध्ये  आणखी ८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आज झालेल्या निर्णयामुळे  उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी / म्हशी तसेच उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे अनुदान तत्वावर वाटप केले जाणार आहे. तसेच या  प्रकल्पामुळे मराठवाडा आणि विदर्भात नवी दुधक्रांती होऊन शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल,  असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

दुग्ध व्यवसाय मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की,  प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख इतकी असून यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे.

हा प्रकल्प राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने राबविला जाणार आहे.  या प्रकल्पात उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप, गायी म्हशीं मधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम, उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे वाटप, पशुप्रजनन पुरक खाद्याचा पुरवठा, दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक खाद्य पूरकांचा पुरवठा, चारा-पिके घेण्यासाठी अनुदान, विद्युत चलित कडबाकुट्टी सयंत्रांचे वाटप, मुरघासासाठी अनुदान, आणि आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण अशा एकुण ९ घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पात विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम तर मराठवाड्यातील नांदेड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या  प्रकल्पाच्या ३ वर्षांच्या कालावधीत  १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ गाई आणि म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे.  या प्रकल्पाचे मुख्यालय नागपूर येथे राहणार असून जिल्हा प्रकल्प अधिकारी याची अंमलबजावणी करतील, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

००००

किरण वाघ/विसंअ

दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम राज्य सल्लागार मंडळाची बैठक

मुंबई, दि. १३:- दिव्यांग बांधव समाजाचा महत्वाचा घटक असून त्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अनुसार गठीत राज्य सल्लागार मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदर विकास मंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, की दिव्यांग बांधवांना सार्वजनिक ठिकाणी वावर सुकर होण्याकरिता कार्यालये, शाळा, रुग्णालये ही दिव्यांगसुगम तयार करावीत. यासाठी सर्व विभागांना पत्र पाठवून सूचीत करण्यात यावे. दिव्यांगासाठी शासन अनेक योजना राबवत आहेत. विविध विभागांच्या समन्वयातून या योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी अधिनियमाबाबत सादरीकरण केले.

00000

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना वित्त विभाग, शासन निर्णयानुसार विहित केलेल्या सर्व सेवा सुविधा अनुज्ञेय राहतील, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे एका ज्ञापनाद्वारे कळविण्यात आले आहे. डॉ. नीलम गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्या असून सध्या त्यांची सदस्यत्वाची ४ थी टर्म सुरू आहे. त्या सन २०१९ पासून विधानपरिषद सभागृहाच्या उपसभापतीपदी कार्यरत आहेत.

००००

इस्त्रो, मत्स्यव्यवसाय विभाग आणि केंद्रीय संस्थांच्या वतीने ‘राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस’ साजरा

अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ मच्छिमारांना होणार – डॉ. अतुल पाटणे

मुंबई, दि. 13 :  अंतराळ संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मासेमारी करताना मच्छिमारांना होणार आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाताना हवामान. समुद्राची खोली, वाऱ्याचा वेग, मासेमारीसाठी अनुकूल भाग, मच्छिमारांना संकटाच्या वेळी  सूचना आदी बाबींची माहिती त्यांना मिळणार आहे. त्यासाठी राज्यात कार्यरत मासेमारी नौकांवर 11 हजार 960 ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी दिली.

राष्ट्रीय अंतरिक्ष दिवसाच्या अनुषंगाने या दिवसाचे महत्व अधोरेखीत करण्यासाठी ससून गोदी फिशिंग हार्बर मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पाटणे बोलत होते. इस्त्रोचे शास्त्रज्ञ तथा संचालक (इंजि.) धरमविर सिंह, फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबईचे महानिदेशक डॉ. महेशकुमार फरेजिया, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार, इस्त्रो- स्पेस ॲप्लीकेशन सेंटरचे शास्त्रज्ञ अमित सिन्हा, मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त महेश देवरे आणि श्री. युवराज चौगुले यांच्यासह अशोक कदम आणि मान्यवरांची उपस्थिती होती. केंद्र शासनाच्या मत्स्यपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या निर्देशानुसार, देशातील सागरी राज्यांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

डॉ. पाटणे म्हणाले की,  भारताच्या अंतराळ क्षेत्रातील चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रवासाला सलाम करण्यासाठी दि.23 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आपल्या धाडस, मेहनत आणि नाविन्याच्या जोरावर अंतराळ संशोधन क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. “मंगलयान” यासारख्या महत्त्वाच्या यशस्वी मिशन्समुळे भारताने संपूर्ण जगाला आपल्या अपार क्षमतेचे दर्शन घडले. यावेळी त्यांनी मच्छिमारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन विविध माध्यमातून प्रयत्न करत  त्यांनी सांगितले.

भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या इतिहासातील हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी, अंतराळ विभाग ऑगस्ट, २०२४ मध्ये देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. देशातील  तरुणांना अंतराळ विज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांबद्दल प्रेरणा मिळावी, ही यामागील कल्पना आहे. यावर्षीचा विषय “चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे” हा आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यात कार्यरत मासेमारी नौकांवर 11,960 मंजुर ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येणार आहेत, त्यांचे प्रात्यक्षिक न्यू स्पेस इंडिया लि. (एनसील)चे प्रतिनिधी प्रेमनाथ पांडे यांनी दाखविले. ट्रान्सपॉन्डर्सच्या सहाय्याने मच्छिमारांच्या जीविताबाबत आवश्यक उपाययोजना करणे, हवामान विषयक माहिती देणे, सुनामी, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा इशारा, संभाव्य मासेमारी क्षेत्राबाबतची माहिती (PFZ), जिओ-फेन्स उल्लंघन व नियंत्रण, हाय-टाईड, नेविगेशनल माहिती,  मासेमारी सफरीची माहिती तसेच सुरुवात व अंतिम वेळ, खलाश्यांची माहिती घोषित करणे, नौका समुद्रात बंद पडल्यास त्या जागेची माहिती जेणेकरुन आवश्यक उपाय योजना करणे शक्य होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सागरी क्षेत्रातील अवैध मासेमारीवर आळा घालणे व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 (सु-2021)ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकरीता ड्रोनद्वारे देखरेख करण्याच्या दृष्टीने ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन राष्ट्रीय अंतराळ दिन या दिवशी घेण्यात आले.

यावेळी 200 मच्छिमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थेतील पीएचडीधारक विद्यार्थी, इस्त्रोचे शास्त्रज्ञ, त्यांचे सहकारी, फिशरीज सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी, ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशनच ऑफ इंडिया, भारत पेट्रोलीयम लिमिटेडचे प्रतिनिधी यांचीही यावेळी उपस्थिती होती.

000

दीपक चव्हाण/विसंअ

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

१७ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे

मुंबई, दि. 13 – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दि.31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते.

कु.तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत. जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार/आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे.

या योजनेत आतापर्यंत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना कु. तटकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दि. ३१ ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दि. ३१ ऑगस्ट़ नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. असेही कु. तटकरे यांनी सांगितले.

बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही कु. तटकरे यांनी यावेळी केले.

 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी दि. 1 ऑगस्ट़ नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

बीडच्या शेतकऱ्यांना पिक विमा ३१ ऑगस्टपूर्वी  वितरीत करावेत – कृषिमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्याच्या प्रलंबित पीक विम्यासंदर्भात बैठक

मुंबई दि. 13 – बीड जिल्ह्यात सन 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामात एकूण 400 कोटी 24 लाख रुपये पीकविमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून त्यापैकी आजपर्यंत 378 कोटी 21 लाख रुपयांचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आले आहे. तर उर्वरित 22 कोटी 3 लाख रुपयांचे वितरण विमा कंपनीने कोणतेही कारण न देता 31 ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीस दिले.

विमा कंपनीने अंबाजोगाई, परळीसह काही तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये कोणतेही कारण न देता काही शेतकऱ्यांचे विमा अर्ज नाकारल्याचे निदर्शनास आले असून, कोणतेही तांत्रिक कारण किंवा सबब न देता ते सर्व विमा अर्ज कंपनीने मंजूर करून त्या शेतकऱ्यांना देखील त्यांचा प्रलंबित पीकविमा 31 ऑगस्ट पूर्वी वितरित करावा, असेही निर्देश श्री. मुंडे यांनी आज दिले.

तसेच या दोन्हीही प्रक्रियांचा कृषी संचालक यांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घेवून अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री मंत्री श्री. मुंडे आजच्या बैठकीत दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील प्रलंबित पिकविम्याच्या संदर्भात आज कृषीमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकारी व भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीस कृषी संचालक विनयकुमार आवटे, उपसचिव  श्रीमती पाटील, भारतीय कृषी विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक श्री सावंत यांच्यासह अधिकारी आदी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळावा यासाठी कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मुंडे यांनी सातत्याने पीकविमा कंपनीसमवेत बैठका घेऊन वेळोवेळी विमा वितरणाची व्यवस्था केलेली आहे. पावसाचा खंड, दुष्काळाचे निकष अशा तांत्रिक बाबीत अडचणी येताच श्री.मुंडेंनी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांची मदत घेऊन विमा कंपनीस पीकविमा देण्यास भाग पाडले. दरम्यान कोणतेही कारण न देता नाकारलेले विमा अर्ज मंजूर करून त्या विमा रक्कमा सुद्धा कंपनीस शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी द्याव्या लागणार आहेत.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

ताज्या बातम्या

जिल्ह्यात दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – पालक सचिव एकनाथ डवले

0
नाशिक, दि. १९ : राज्य शासनाने अलीकडेच दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे....

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार

0
सातारा दि. १९:  पाटण तालुक्यातील सळवे, ढेबेवाडी, पाटण मार्गावर जानुगडेवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी पाटण आगार बसचा अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी...

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी

0
मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) आज घेतलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश...

नोंदणी विधेयक मसुद्यात सुधारणेसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा

0
मुंबई, दि. १९ : नोंदणी विधेयक मसुदा २०२५ वर सुधारणा सुचविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यातील उपविभागीय...

निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा

0
मुंबई, दि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण...