शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog Page 578

‘नवीन चंद्रपूर’मुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

‘बालेवाडी’च्या धर्तीवर चंद्रपुरात साकारणार अद्ययावत स्टेडियम

चंद्रपूर, दि. 14 : चंद्रपूर जिल्ह्याचा झपाट्याने होत असलेला विकास आणि शहराची वाढती लोकसंख्या बघता यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी इरई नदीच्या बाजूस होत असलेले ‘नवीन चंद्रपूर’ नक्कीच जिल्ह्याच्या वैभवात भर टाकेल. म्हाडाने यासाठी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमच्या धर्तीवर अद्ययावत  क्रीडा संकुल चंद्रपुरात करण्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल उज्ज्वल भविष्याची नांदी आहे, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नवीन चंद्रपूरच्या निर्मितीसाठी ‘म्हाडा’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाल्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुरू आहे; त्यांच्याच संकल्पनेतून विकासकांची, विविध संस्थाचालकांची, उद्योग व्यवसायातील गुंतवणूकदरांची एक दिवसीय बैठक नागपुरातील वनामती सभागृहात मंगळवारी पार पडली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वैविध्यपूर्णतेने संपन्न चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा गेल्या काही वर्षात वन अकादमी, सैनिकी शाळा, बोटेनीकल गार्डन, कॅन्सर हॉस्पिटल, एसएनडीटी महाविद्यालय यासारख्या वैशिष्टपूर्ण संस्था आणि पायाभूत सुविधांमुळे  देशाच्याच नव्हे तर  जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हा विकास होत असताना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या चंद्रपूर शहरात वाढते नागरिकीकरण लक्षात घेता परिसरातील जंगल क्षेत्राचा विचार करता शहराच्या विकासाला मर्यादा आहेत; म्हणूनच कमी दरात घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 10 हजार घरांची योजना महाप्रीत सोबत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यापैकी 3600 घरे करण्याबाबतची बैठक नुकतीच झाली असल्याचे सांगत इतर सर्व पायाभूत सोयी सुविधा, शासकीय कार्यालये, इमारती यासाठी आग्रह करत असताना या भागात 100 एकर मध्ये पुण्याच्या बालेवाडी स्टेडीयम प्रमाणेच अद्ययावत स्टेडीयम करण्याचा माझा संकल्प होता, तो म्हाडाने जागा उपलब्ध करून पूर्ण केला याचे विशेष समाधान आहे. नवीन चंद्रपूरचा प्रकल्प या “इन्व्हेस्टर समिट” मुळे वेगाने मार्गी लागेल. म्हाडाने यासाठी नव्याने आराखडा तयार केला असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली असल्याने गती प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

काय आहे नवीन चंद्रपूर ची संकल्पना? : साधारणत: 90 च्या दशकानंतर वाढती लोकसंख्या सामावून घेण्यासाठी चंद्रपूर शहराच्या आसपास जागाच नसल्याने व आसपासचा परिसर जंगलांनी व्यापल्याने सुविधांवर ताण पडू लागला. त्यामुळे 1998 साली नवीन चंद्रपूर वसविण्याचा निर्णय घेण्यात आला व सूत्रे म्हाडाकडे देण्यात आली. त्यासाठी 139.71  हेक्टर क्षेत्र आरक्षितही केले. शाळा, रुग्णालये, महाविद्यालये, क्रीडांगण, निवासी-अनिवासी संकुले अशा अनेक सुविधांसाठी भूखंड आरक्षित करून 7 लाख 13 कोटी निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र मात्र मधल्या काळात हा विषय प्रलंबित राहिला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यासाठी आग्रही असल्याने त्यांचे प्रयत्न मात्र सुरूच होते. अखेर  ‘म्हाडा’ ने  आराखडासाठी सल्लागाराची नियुक्ती करून कामाला गती दिली.

नवीन चंद्रपूर प्रकल्पासाठी मंगळवारी नागपुरात झालेल्या बैठकीत  ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधला व चर्चा केली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर, चंद्रपुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्थांचे प्रतिनिधी, काही नागरिक बैठकीला उपस्थित होते. यावेळी रस्ते, वीज, पाणी यासह अन्य सुविधा कशा विकसित करायच्या, नवीन चंद्रपुरात स्थानिकांना काय हवे आहे, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी गतीने करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा

अमरावती, दि. 14 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी केली जात आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांनी  मतदार साक्षरता व मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी योग्य समन्वय साधून अनुषंगिक कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन अमरावती विभाग मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. छायाचित्रासहित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (अर्हता दिनांक 1 जुलै 2024 वर आधारित) च्या अनुषंगाने आयोजित प्रथम भेट अंतर्गत या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, सर्व विधासनभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार नोंदणीबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण मतदाराची संख्या, केंद्रनिहाय सुरु असलेली मतदार नोंदणीची सद्यस्थिती, जिल्ह्यात नव्याने तयार झालेले मतदार केंद्र, प्रस्तावित विलीन होणारी मतदान केंद्र तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान बैठका आदींबाबत त्यांनी माहिती दिली.

डॉ. पाण्डेय यांनी मतदार नोंदणीच्या कामामध्ये राजकीय पक्षांना येत असलेल्या अडचणीं जाणून घेतल्या व त्या दूर करण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला आदेश दिले. राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी सहाय्यकाची नेमणूक करणे व प्रशासनाच्या समन्वयाने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदार संघांमध्ये कमी मतदान झाले आहे. तिथे मतदार नोंदणी व मतदान जनजागृती व्यापक प्रमाणात करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले. अशा क्षेत्रात ‘स्वीप’ मोहिम प्रभावीपणे राबविण्यात यावी. युवा मतदारांची मतदार म्हणून अधिकाधिक नोंदणी करावी. यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात यावे, असेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंदवावयाचा शिल्लक राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुधारित कार्यक्रमानुसार 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करता येणार आहे. प्राप्त दावे व हरकतींचे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे.

अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

 मुंबईदि. १४ : अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मंगळवारी (दि. 13 ऑगस्ट) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आर्थिक व राजकीय सहकार्य, व्यापार व गुंतवणूक, राज्यातील विद्यापीठांचे अमेरिकन विद्यापीठांशी सहकार्य तसेच कौशल्य विकास या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.

माईक हँकी यांनी राज्यपालांशी संभाषणाची सुरुवात तामिळ भाषेत करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांना सुखद धक्का दिला. विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 30 वर्षांपूर्वी आपण एक वर्ष तामिळनाडू येथे शिक्षण घेतले व तेथे आपण तामिळ भाषा शिकल्याचे माईक हँकी यांनी राज्यपालांना सांगितले.

अमेरिकेचा मुंबईतील वाणिज्य दूतावास हा आपल्या देशाचा जगातील सर्वात मोठ्या दूतावासांपैकी असून गेल्या वर्षी मुंबईने सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी कुलगुरू व अमेरिकेतील विद्यापीठांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते असे सांगून हे शैक्षणिक सहकार्य अधिक वाढावे या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास क्षेत्रात देखील अमेरिका राज्यातील आयटीआय व राज्य कौशल्य विद्यापीठासोबत कार्य करीत असल्याचे माईक हँकी यांनी सांगितले. यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अमेरिका भारतात महिला उद्यमशीलता, कृषी व अन्नप्रक्रिया, आरोग्य सेवा, स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणूक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या वाणिज्यदूतांचे स्वागत करताना राज्यातील विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमधील सहकार्य वाढविताना विद्यार्थी आदानप्रदान तसेच तज्ज्ञ व अध्यापक आदानप्रदान वाढविले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. अमेरिकेने भारताशी सौर ऊर्जा, औषध निर्माण व  वस्त्रोद्योग या क्षेत्रात देखील गुंतवणूक वाढवावी,अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी अमेरिकन वाणिज्य दूतावासातील राजकीय आर्थिक प्रमुख रिचा भला, राजकीय अधिकारी रायन म्यूलन व राजकीय सल्लागार प्रियंका विसरिया – नायक हे देखील उपस्थित होते.

०००

ई – पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणींवर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून उपाययोजना

ऑफलाईन पद्धतीने माहे जुलै व ऑगस्टच्या धान्य वितरणास मान्यता

मुंबई, दि. १४:  राज्यात ई – पॉस मशिनच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून ई – पॉस मशिनबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट मधील अन्नधान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे.

ई-पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसवण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत.  या तांत्रिक समस्या एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली, क्लाऊड सर्व्हर यांच्याशी संबधित आहेत. या समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना एनआयसी व क्लाऊड सर्व्हर सुविधा पुरवठादारांना शासनाकडून देण्यात आल्या आहे.

ई-पॉस मशीनमध्ये आलेल्या अडचणींमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना अन्नधान्याचा सुयोग्य पुरवठा व्हावा, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्यांकरिता अन्नधान्याचे वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिल्या आहेत.

०००

हेमंतकुमार चव्हाण/स.सं

स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ०९.०५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

मुंबई, दि. १४: गुरूवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी ०९.०५ वाजता आयोजित करण्यात येणार असून सकाळी ०८.३५ ते ०९.३५ या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या अनुषंगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ०९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. तर, पुणे येथे राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे संबंधित पालकमंत्री अथवा अन्य मंत्री यांच्यामार्फत ध्वजारोहण करण्यात येईल. काही अपरिहार्य कारणामुळे मंत्री उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाव्यतिरिक्त एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ०८.३५ पूर्वी किंवा ०९.३५ नंतर आयोजित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक : एफएलजी- 1091 / 30, दिनांक 20 मार्च, 1991 व क्रमांक एफएलजी-1091 (2)/30, दिनांक 5 डिसेंबर, 1991 आणि परिपत्रक क्रमांक : एफएलजी 1098/343/30, दिनांक 11 मार्च, 1998 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन राजशिष्टाचार विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/ वि.स.अ

टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबईकरांचे चैतन्य – दीपक केसरकर

मुंबई, दि.१३: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही मुंबईकरांचे खरे चैतन्य असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

 हाँटेल ट्रायडेट येथे टाटा मुंबई मॅरेथॉनमधील नोंदणीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजक उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले,मुंबई मॅरेथॉन ही दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी मुंबईत येथे आयोजित केलेली वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन आहे. टाटा समूहाच्या प्रायोजकत्वाच्या कारणास्तव ही टाटा मुंबई मॅरेथॉन म्हणून देखील ओळखली जाते. ही आशियातील सर्वात मोठी मॅरेथॉन तसेच खंडातील सर्वात मोठी जनसहभागी क्रीडा स्पर्धा आहे.

जागतिक स्तरावरील स्पर्धा  मुंबईत होत असल्याचा अभिमान आहे. मुंबईतील मोठ्या रस्त्यावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आता कोस्टल रोड झाला आहे. मुंबईचा विकास होत आहे.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. विविध क्षेत्रातील नामवंत कलाकार, खेळाडू, उद्योगपती यामध्ये सहभागी होतात. राज्य शासन, महानगरपालिका, पोलीस, सर्व यंत्रणा यामध्ये सहभागी होवून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात.

विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा आहे.मुंबई ही फक्त देशाची आर्थिक राजधानी नाही तर या ठिकाणी टाटा मुंबई मॅरेथॉन सारखे जागतिक उपक्रम राबविण्यात येतात. १९ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या या स्पर्धेत आमची मुंबई तयार आहे. आयोजकांचे अभिनंदन करुन सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आशियातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉनच्या प्रवर्तकांनी आज जाहीर केले की या स्पर्धेसाठी नोंदणी 14 ऑगस्ट 2024 पासून सकाळी 7 वाजता www.tatamumbaimarathon.procam.in वर   सुरू होईल.

०००

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SPK DGIPR Mantralay Mumbai

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्यसाठी आयोजित कार्यक्रम

मुंबई,  दि. १३ – महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हॉटेल ताज पॅलेस येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्य, मंत्रिमंडळ सदस्य व मान्यवरांसाठी आयोजित कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज शिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव इकबालसिंग चहल, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह विविध देशातील उच्चायुक्त  उपस्थित होते.

उपस्थित सर्वांना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण, पायाभूत सोयी सुविधा अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. राज्याची अर्थ व्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण आहे. तसेच राज्यात उद्योग उभारणी आणि वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक नेतृत्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात देश लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

०००००

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नूतन वास्तूचे मुंबईत उद्घाटन

नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे औषध व्यवसाय परिषदेची वेगळी ओळख – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

मुंबई, दि.१३ : फार्मासिस्ट आणि सामान्य नागरिकांसाठी नवनवीन उपक्रम हाती घेऊन औषध व्यवसाय परिषद एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या मुलुंड येथील नूतन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, परिषदेने मुलुंड येथे स्वमालकीची जागा खरेदी करुन यामध्ये अत्याधुनिक सेवा देणारे कार्यालय, जागतिक स्तराप्रमाणे विकसित औषध माहिती केंद्र  आणि फार्मासिस्टचे ज्ञान व कौशल्य याचे निरंतर प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले सभागृह बनविले आहे. हे राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. फार्मासिस्टचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी व जागतिक स्पर्धेला स्पर्धेनेच उत्तर देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची निर्मिती करून कार्यशाळा राज्याच्या तालुका, जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शकामार्फत आयोजित केल्या जातात हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे.कारण अपडेट असणे काळजी गरज आहे ते तुम्ही करता.यामुळे परिषद अधिक गुणवत्तापूर्ण काम करेल अशी  खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

आजअखेर महाराष्ट्र राज्यामध्ये ४७९ पदविका (Diploma) आणि ३१२ पदवी (Degree) व फार्म. डी. (Doctor of Pharmacy) ची ७ शासन मान्य फार्मसीची कॉलेज कार्यान्वित आहेत. कायद्याअंतर्गत फार्मसीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- विद्यार्थीनी फार्मसीचा व्यवसाय करणे, उत्पादन क्षेत्रामध्ये महत्वपुर्ण भुमिका बजावणे यासह सरकारी, निमसरकारी सेवा (फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मसी इन्स्पेक्टर) करण्यासाठी नियम व अटींच्या आधीन राहून पंजीकरण (नोंदणी) करणे अनिवार्य आहे. आज अखेर ४.३ लाख फार्मासिस्टची नोंदणी परिषदेकडे झाली आहे.

परिषदेचे मागील २५ वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजना कार्यान्वित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवली आहे.

१९९८ मध्ये परिषदेने संकेतस्थळाची निर्मिती करुन कालानुरुप परिषदेचे सर्व कामकाज नोंदणी, पुर्नर्नोदणी, नूतनीकरण, इ. कामकाज ऑन लाइन पद्धतीने करण्यात येते.

फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाइल (पी.पी.पी. कार्ड) ची नवीन संकल्पना अंमलात आणून त्याचे स्मार्टकार्डमध्ये रूपांतर केले आहे. यास अन्न आणि औषध प्रशासनाने देखील मान्यता दिली आहे. फार्मासिस्ट, औषध क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि नागरीकांना औषधाची माहिती, त्याचे शरीरावर होणारे अनुकूल व प्रतिकूल परिणाम, रासायनिक बदल बाबतची योग्य माहिती मिळू लागली आहे. यासाठी जगप्रसिद्ध Micromedex या डाटाबेस ची उपलब्धता केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000000000

राजू धोत्रे/विसंअ

 

खादी हे शाश्वत विकासाचे साधन – सभापती रविंद्र साठे

मुंबई, दि. 13 : खादी हे कापड नसून जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. खादी हे शाश्वत विकासाचे एक साधन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमांत देशातील जनतेने खादी वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील लघुउद्योजकांना सक्षम करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने मागील 64 वर्ष अविरतपणे काम केले आहे, असे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त सांगितले.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण सभागृह येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, अर्थसल्लागार स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, खादी आयोगाचे संचालक योगेश भामरे, नित्यांनद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच राज्यातील विविध भागातील यशस्वी उद्योजक उपस्थित होते.

सभापती श्री.साठे म्हणाले  की, पुरस्काराने ग्रामीण उद्योजकांना प्रेरणा मिळते. ग्रामीण रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मंडळ अनेक योजना राबवित आहे. मधाचे गाव ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मधमाशी पालन हा शेतीला पूरक असणारा व्यवसाय लोकाभिमुख होत आहे. मंडळ 64 वर्ष ग्रामीण जनतेसोबत असून त्यांच्याकरिता रोजगार निर्माण करून लोकांना अर्थसहाय्यासोबत अनुदान देखील मंडळाकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या, रोजगार, पर्यावरण आणि लोकाभिमुख काम करण्यासाठी मंडळाचे योगदान मोठे आहे आजअखेर हजारो लोकांना मंडळाने हाताला काम देऊन स्वावलंबी केले आहे. ग्रामीण उद्योजक खऱ्या अर्थाने समाजहिताचे काम करीत आहेत. वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुरस्कार कार्यक्रम अनेकांना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारामध्ये  सिंधुदुर्ग येथील कौसर खान यांना प्रथम, पुणे येथील प्रमोद रोमन यांना द्वितीय तर गोंदिया येथील श्रीकांत येरणे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार ठाणे येथील सुजाता पवार, नांदेडचे बालाजी काजलवाड अमरावतीच्या उज्वला गोपाळ चंदन यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमात बिपीन जगताप, योगेश भामरे, यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमात मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामोद्योग अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात पुरस्कार्थींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी म्हाम्बरे यांनी तर आभार रेश्मा माळी यांनी मानले.

000

संजय ओरके/विसंअ

 

 

 

 

जमीन अधिग्रहणासंदर्भातील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले नाहीत

‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात न्यायालयाने केलेले भाष्य, तो एक संवादाचा भाग

मुंबई दि.१३:– जमीन अधिग्रहणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील सुरू असलेली सुनावणी आणि ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुषंगाने विविध प्रसार माध्यमातून दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित झालेले असून याबाबत वस्तुस्थिती पुढील प्रमाणे आहे.

पुण्याच्या एका जमीन अधिग्रहणा संदर्भातील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारचे ताशेरे आदेशात ओढलेले नाहीत. हे प्रकरण उद्या सुनावणीसाठी ठेवलेले आहे. न्यायालयाने जे ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजने संदर्भात भाष्य केले तो एक संवादाचा भाग होता. न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आज कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल शेरे दिलेले नाहीत’, असा खुलासा राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने राज्य शासनाचे सर्वोच्च न्यायालयातील विशेष समुपदेशी (Special Counsel for Maharashtra Govt) यांनी केला आहे.

जमीन अधिग्रहण प्रकरणी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येत असून सदर याचिकाकर्त्यांची मोबदला रक्कम 37,42,50,000/- रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही याचिकाकर्त्याने अधिक रकमेची मागणी केल्याने उद्यापर्यंत वेळ मागितला आहे . आणि न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीसाठी उद्या ठेवलं आहे, असे विभागाने कळविले आहे.

00000

किरण वाघ/विसंअ

 

ताज्या बातम्या

जिल्ह्यात दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – पालक सचिव एकनाथ डवले

0
नाशिक, दि. १९ : राज्य शासनाने अलीकडेच दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे....

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार

0
सातारा दि. १९:  पाटण तालुक्यातील सळवे, ढेबेवाडी, पाटण मार्गावर जानुगडेवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी पाटण आगार बसचा अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी...

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी

0
मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) आज घेतलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश...

नोंदणी विधेयक मसुद्यात सुधारणेसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा

0
मुंबई, दि. १९ : नोंदणी विधेयक मसुदा २०२५ वर सुधारणा सुचविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यातील उपविभागीय...

निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा

0
मुंबई, दि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण...