शनिवार, जून 21, 2025
Home Blog Page 574

पर्यावरणपूरक महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५ :- ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचे असल्याने  यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे. आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरणपूरक महाराष्ट्र करावयाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘सेव्ह मुंबई’ (Save Mumbai) कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा व ‘द ॲड्रेस  सोसायटी’च्या वतीने अडीच एकर क्षेत्रफळावरील मानवनिर्मित जंगलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते  बोलत होते. कार्यक्रमास कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह द ॲड्रेस  सोसायटीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वातंत्र्य दिनी घाटकोपर येथील द ॲड्रेस हाऊसिंग सोसायटीने त्यांच्या सोसायटीच्या  परिसरात अर्बन फॉरेस्ट निर्माण करून पर्यावरण रक्षणात केलेले काम अतुलनीय आहे. या सोसायटीचा आदर्श मुंबईतील अन्य सोसायट्यांनी घ्यावा. मुंबईत ज्या सोसायटी त्यांच्या परिसरात अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम राबवतील, त्यांना  महापालिकेच्या सोसायटी करामध्ये सवलत देण्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान सुरू केले आहे. या अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन आपण सर्वांनी राज्यात वृक्ष लागवडीची जनचळवळ सुरू करूया. अर्बन फॉरेस्ट ऑक्सिजन पार्क असल्याने जिथे जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करून अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. यासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. बृहन्मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएनेही त्यांच्या रिकाम्या असणाऱ्या जागेत अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. प्रदूषणमुक्त  राज्य करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. राज्यात बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत असून जवळपास २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवले असल्याचे ते म्हणाले.

आपले राज्य विकासाच्या सर्व क्षेत्रांत आघाडीवर असून विकासाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरू ठेवायची असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त जबाबदारी आणि कर्तव्य निभावण्याचा संकल्प करू या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाचे उत्तम कार्य

२० फायर बाईक आणि रुग्णवाहिकांचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. 15 : आजपासून संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ होत आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक शहिदांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश आपल्या हाती दिला आहे. देश विकसीत व्हावा, हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. त्याच अनुषंगाने भारताचा वेगाने विकास होत असून या विकासात चंद्रपूरचेही योगदान असावे, यासाठी आपण सदैव तत्पर असायला हवे. स्वातंत्र दिन हा केवळ एक दिवस नव्हे तर या निमित्ताने प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य निभावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्रसंग्राम सैनिक, लोक प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात या योजनांची जिल्ह्यात अतिशय चांगली अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी सर्व जिल्हा प्रशासन कौतुकास पात्र आहे. चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. राज्य सरकारने धानाचा बोनस वाढवून हेक्टरी 15 हजारांच्या ऐवजी आता 20 हजार रुपये केला आहे. जिल्ह्यात धान खरेदी प्रोत्साहन पर राशी म्हणून 65,747 शेतकऱ्यांना 156 कोटी 44 लक्ष 50 हजार 640 रुपये अदा करण्यात आले आहे.

अजयपूर येथे अत्याधुनिक कृषी मार्गदर्शन तंत्रज्ञान केंद्र सुरू होत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेली विविध शेती उत्पादने, प्रदर्शन व विक्री करिता तसेच नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता सुसज्ज बाजारहाट हायटेक नर्सरी उभारण्यासाठी एकूण 64 कोटी 99 लक्ष रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, विकसित भारत @ 2047 अंतर्गत पुढील 25 वर्षांमध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचा पुढील 25 वर्षांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यात आरोग्य व शिक्षण सुविधा, पर्यावरण, अंगणवाडी, रस्ते आदींचा समावेश आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात गुरुवारपासून 3 हजार रुपये जमा होण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पात्र 2 लक्ष 81 हजार 588 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून 31 ऑगस्ट नंतरही माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 59765 शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 44 लक्ष 3 हजार शेतकऱ्यांना होणार असून शासनाकडून दरवर्षी 14760 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण (रिफिलिंग) मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री मोफत तीर्थदर्शन योजनेंतर्गत देशातील 139 तीर्थक्षेत्रामध्ये चंद्रपूर येथील प्रसिध्द महाकाली देवी मंदिराचाही समावेश करण्यात आला आहे. शासनाकडून पात्र व्यक्तिला प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी खर्चाकरीता जास्तीत जास्त 30 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर असावा, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या.

तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या व ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना आता शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 50 टक्के लाभाऐवजी 100 टक्के लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शासनाने 906 कोटींची तरतूद केली आहे. सोबतच जिल्ह्यात एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र गेमचेंजर ठरणार आहे. कॅन्सर हॉस्पीटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम शेवटच्या टप्प्यात असून त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे. ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर’ अंतर्गत जिल्ह्यात 75 हजार कोटींची गुंतवणूक येत आहे. यातून रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 20 फायर बाईक आणि ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.

उत्कृष्ट अधिकारी  कर्मचा-यांचा सत्कार : उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्‍यांचा यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन पाटील, रोहित शास्त्रकार, गोपाल निखुरे, टी.ए. चव्हाण, रमेश मोडक, नागसेन वाघमारे, योगेश लोंढे आणि सर्वोत्कृष्ठ पंचायत समितीचा पुरस्कार वरोरा पं.स. ला देण्यात आला.

0000000

सेंद्रीय शेतीमुळे शेतकरी व ग्राहक दोघांनाही लाभ – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

अमरावती, दि. 15 (जिमाका) : भारत हा कृषी प्रधान देश असून येथील आर्थिक विकास हा शेती व शेतीपूरक व्यवसायावर आजही अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीव्यवसायाला बळकट केल्याशिवाय सर्वांगीण आर्थिक विकास होणे शक्य नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेतामध्ये विविध वाण्याच्या व प्रजातीच्या पिकांचे प्रयोग करावे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सकस व पौष्टिक वाण ग्राहकांना पुरविल्यास शेतकरी व ग्राहक या दोघांनाही लाभ होईल. या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण बदलण्यास निश्चितच मदत होईल, अशा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

कृषी विभागाच्या कृषि, तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स महोत्सवा’चा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज वलगाव येथील सिकची सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्मा प्रकल्पाचे अध्यक्ष नरेंद्र शिंगणे, प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, वलगावचे सरपंच सुधीर उगले, बाळासाहेब यादव आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, उत्पादन वाढीसोबतच सुदृढ आरोग्यासाठी जैविक पिके व रानभाज्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. अलिकडच्या काळात वाढत चाललेल्या जंक फूडच्या सवयींमुळे प्रतिकारशक्ती कमी होत असून दुर्धर आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शहरातही कुपोषणाचे प्रमाणात वाढ होत आहे. आहारातील तृणधान्य व रानभाज्यांचे महत्त्व ओळखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सामूहिक शेती, आधुनिक पीक पद्धती व सेंद्रीय शेतीकडे वळावे. नव्या पिढीला मिलेट्स व रानभाज्यांची ओळख करून देणारा हा महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. हा महोत्सव मर्यादित कालावधीसाठी न ठेवता शहरातील नागरिकांना सहज उपलब्ध होईल, अशी बाजारपेठ निर्माण करावी. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन नागरिकांना आरोग्यवर्धक भाज्या व फळे सहज उपलब्ध होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

गोरगरीब व शेतकऱ्यांसाठी शासन अहोरात्र काम करित असून त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या ‘शेतकरी सन्मान योजने’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये सन्मान निधी दिला जात आहे. तसेच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बी-बियाणे, रासायनिक खते, युरिया शासनाच्या अनुदानातून कमी दरात उपलब्ध होत आहे. तसेच शेतकऱ्यांना जलयुक्त शिवारामुळे बारमाही पिक घेणे सोईचे झाले असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्ती प्रसंगी शासन शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी आहे. पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे. यासह ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत होणार असून येत्या काही दिवसात त्यांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये रक्कम जमा होणार आहे. अशा विविध योजनेच्या माध्यमातून गरजवंताना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होत असून त्यांच्या राहणीमानात सुधारणा होत आहे. मेळघाटाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून या भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राध्यान्य देऊन उत्पादित शेती मालाला ‘मेळघाट हाट’च्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. तसेच मेळघाटातील आयुर्वेदिक औषध निर्माण, सेंद्रीय शेती, बांबू वर्गीय शेती यांना प्रोत्साहन देण्यासाठी  विशेष मोहिम राबवून या भागाचा सर्वागीण विकास करण्याचा मानस पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, आधुनिक जीवनशैलीत आहारपद्धतीतून रानभाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सुदृढ शरीरासाठी ऋतुनिहाय भाज्या आहारात असाव्यात. गुळवेल या भाजीमध्ये अँटी ऑक्स्डिेंटस्, ॲटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म असून रक्तपेशी वाढविण्यास ही वनौषधी मदत करते. तसेच मधुमेह, त्वचेच्या समस्या या रोगांवर अतिशय उपयुक्त आहेत. प्रत्येक रानभाज्यांमध्ये औषधी व विविध घटकांनी परिपूर्ण असून कफ-पित्तदोष, रक्त विकार, खाज, कुष्ठरोग, पोटांचे विकार यासारख्या अनेक रोगांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे असे महोत्सव वेळोवेळी होणे आवश्यक आहे.  विविध संस्थेच्या माध्यमातून रानभाज्या विक्रीसाठी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्या. अशा महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विपणन साखळी निर्माण होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महोत्सवात मिलेट्स, पाककृती व रानभाज्यांचा समावेश

रानभाजी महोत्सवामध्ये मेळघाटसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बचत गट, शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉलवर नैसर्गिकरित्या रुजलेल्या मायाळू, मटारू, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, आघाडा, गुळवेल, ओवा, वावडिंग, शेवगा, तरोटा, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, करटुले, शतावरी, भुई आवळा, सुरण, अरबी, कमळकाकडी, कपाळफोडी, उंबर आदी 65 प्रकारचे रानभाज्यांसोबतच कडधान्याचे 30 पेक्षा जास्त प्रकार होते. तसेच बांबूपासून बनविलेले 16 प्रकारचे विविध साहित्यही या महोत्सवामध्ये ठेवण्यात आले होते. महोत्सवामध्ये आलेल्या खवय्यांसाठीही 25 प्रकारचे विविध पाककृतीचे स्टॉल्स महोत्सवात लावण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री यांनी महोत्सवात लावलेल्या विविध रानभाज्यांच्या व खाद्यपर्दाथांच्या स्टॉल्सला प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून रानभाज्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्र्यानी सावा खीर, अळूवळी अशा मिलेट्स व रानभाज्यांच्या खाद्यपदार्थांची चव चाखून खरेदीही केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रानभाजी व मिलेट्सची माहिती असलेली ‘ओळख रानभाज्यांची’ या घडीपत्रिका व संत्रा फळपिकांची संपूर्ण माहिती असलेले ‘संत्रा उत्पादनाचे गुरुकिल्ली’ या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यानंतर ‘जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स’ महोत्सवाच्या आयोजन उद्देशाबाबत आत्माच्या प्रकल्प संचालिका श्रीमती निस्ताने यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार पुरवठा व मुल्य साखळी तज्ज्ञ निलेश राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*****

कोराडी येथील क्रिडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिरंगा रॅलीद्वारे कोराडी येथे देशभक्तीचा जागर

नागपूर,दि. 15 :  क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी, त्यांना सरावासाठी चांगले क्रिडांगण मिळावेत, कुशल मार्गदर्शक मिळावेत यादृष्टीने आपण क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. यातूनच आपण अखिल भारतीय पातळीवर नावाजला जाईल व जागतिक पातळीवरची गुणवत्ता असेल अशा स्वरुपातील एक भक्कम क्रीडा संकुल मानकापूर येथे साकारले आहे. त्याच्या खालोखाल जिल्हा पातळीवरील क्रिडांगणाची गुणवत्ता व सेवासुविधा असलेले क्रिडांगण आपण कोराडीला साकारुन दाखविले आहे. येथील परिपूर्ण सुविधा खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोराडी येथील तालुका क्रीडा संकुल सुविधांचे लोकार्पण व ‘घरोघरी तिरंगा’ अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळयात ते बोलत होते. कोराडी येथील या तालुका क्रीडा संकुलाला वीरांगना राणी अवंतीबाई असे नामकरण या समारंभात करण्यात आले.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, बबनराव तायवाडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अमृत काळातील आपण तिसरा स्वातंत्र्य उत्सव साजरा करीत आहोत. या देशातील गोरगरीब, प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तींच्या विकासाची संकल्पना आपण स्वीकारली आहे. हा अमृत महोत्सव आपण अधिक भक्कमपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेच्या भक्कम पायावर साजरा करीत आहोत. आपल्या शेजारचे देश लडखडत असताना  आपली संयमी प्रगती आणि वाटचाल आपल्या राज्यघटनेने दिलेल्या मौलिक मूल्यांमुळेच सुरु असल्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोराडी येथील वीरांगना राणी अवंतीबाई तालुका क्रीडा संकुलात बॉक्सिंग, टेबल टेनिस, फेन्सिंग, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बॅलन्सिंग बिम, ट्रायो ॲक्रोबॅटिक्स, रोमन रिंग, योगा आदी विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत.

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री अतुल सावे

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जालना, दि. १५ (जिमाका):  जालना जिल्हा विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही गृहनिर्माण व इतर मागास बहुजण कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास खासदार कल्याण काळे, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायळ  तसेच स्वातंत्र्य सैनिक, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावटीवर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले.  त्यानंतर पालकमंत्र्यांनी शुभेच्छा संदेश दिला. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवित आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी शासनाने यावर्षीपासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषिविषयक, सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100 टक्के सवलत दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाणार आहे. त्यासाठी 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’  सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे  उमेदवारांना शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग या ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा. सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा पुरेशी माहिती नसल्याने तीर्थ यात्रा करण्याचे राहून जाते. ही बाब लक्षात घेऊन  राज्यातील 60 वर्ष व त्यावरील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील मोठ्या तीर्थ स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. वयोमानामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच आवश्यक साधने खरेदी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमार्फत शासनाकडून ३ हजार  रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहेत. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील उज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सर्व योजनांचा जनतेने आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी  केले.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, महसूल विभागाच्यावतीने महसूल पंधरवाड्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन या सर्व योजनांची जनजागृती तसेच स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, सैनिक हो तुमच्यासाठी, एक हात मदतीचा-दिव्यांग कल्याणाचा, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संवाद असे उपक्रम आणि महसूल विभागाशी संबंधित लोकाभिमुख घटक गाव पातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्याकरीता तालुकास्तरावर विशेष मोहिम राबविण्यात आली. याशिवाय जिल्हा प्रशासनाने महसुली वर्षात 4 लाख 16 हजार विविध प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. यात वय, अधिवास, शेती प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअरसह इतर प्रमाणपत्रांचा समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे प्रशासनाने जिल्ह्यात 122  तलाठी आणि 71 कोतवाल पदांची पदभरतीही केली आहे.

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजना सुरु करुन या योजनेतंर्गत जिल्हयातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सुमारे 7 हजार 286 लाभार्थींसाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजनेतंर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सुमारे 6 हजार 943 लाभार्थींसाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.  तर रमाई आवास योजनेतंर्गत ग्रामीण क्षेत्रासाठी  6 हजार 842 तर शहरी क्षेत्रासाठी 541 घरकुलांच्या उद्दिष्ट मंजुरीसाठी शासनास शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या जिल्ह्यात नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी व स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून सुमारे 39 उद्योगांसमवेत तब्बल एक हजार 316 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे सांगून  ते म्हणाले की, उद्योग विभागातंर्गत ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने’च्या माध्यमातून मागील वर्षी 358 नवीन उद्योग उभे राहिले असून याद्वारे अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेल्या कारागिरांपैकी 3 हजार 589 कारागिरांना मान्यता देण्यात आली आहे. तर 1 हजार 284 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पालकमंत्री श्री. सावे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेने सण उत्साहात साजरे करावेत यासाठी ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येतो. यावेळी देखील गौरी गणपती सणानिमित्त आपल्या जिल्ह्यातील तीन लाख 73 हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रातून या वर्षी जुलै अखेरपर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना 10 लाख 56 हजार एवढया थाळींचे वितरण करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार हजार 481 लाभार्थ्यांना बँक कर्ज मंजूर झाले आहे. सुमारे 518 कोटी रुपये इतके कर्ज वितरीत करण्यात आले असून महामंडळाकडून आजपर्यंत रुपये 37 कोटी इतका व्याज परतावा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर सातत्याने भर देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी  जिल्हा नियोजन समितीमधून 48 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तसेच निर्भया पथकास महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने 10 स्कुटर तर 5 मोटरसायकल खरेदी करण्यात आल्या आहेत. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल अद्यावतपणे विकसीत करण्यात येत आहे.   जिल्हा क्रीडा संकुलात सध्या सुरु असलेली कामे पूर्णत्वाकडे आहे.  लवकरच या कामांचा लोकार्पण सोहळा करण्यात येऊन सर्व क्रीडा सुविधा खेळाडुंना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

जालना जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत पावसाच प्रमाण चांगले आहे, असे सांगून ते म्हणाले की, चालू खरीप हंगामामध्ये 100 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.  पिकांची स्थितीही उत्तम आहे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना अंतर्गत नळ योजना दुरुस्तीच्या मंजूर करण्यात आलेल्या 102 उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. तसेच तात्पुरती पुरक नळ योजनेच्या मंजूर करण्यात आलेल्या 16 पैकी 15 उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपया विमा हप्ता भरुन विमा काढला जातो. या योजने अंतर्गत चालू खरीप हंगामात 9 लक्ष शेतकऱ्यांनी 5 लक्ष हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. मागील वर्षी पिक विमा अंतर्गत 5 लाख 88 हजार  शेतकऱ्यांना 247 कोटी रक्कम वितरीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिल्या जाते. जालना जिल्हयात सद्यस्थितीत एक हजार शेतकऱ्यांनी सुमारे एक हजार 88 एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केली आहे. चालू वर्षात जिल्ह्यात 56 हजार अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले असून 33 मेट्रीक टन रेशीम कोषांचे उत्पादन झाले आहे. जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲटोमॅटीक रिलींग मशीनची उभारणी करण्यात आली असून याद्वारे जागतिक स्तरावरील उत्कृष्ट दर्जाच्या रेशमाची निर्मिती जिल्ह्यात करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे रेशीम अंडीपुंज ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतची प्रक्रिया असलेला आपला जालना हा राज्यात एकमेव जिल्हा ठरला आहे.

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तींना व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, शहीदाच्या वीरपत्नी, आई-वडिलांचा सन्मान, उत्कृष्ट कार्याबद्दल पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

०००

पालकमंत्री अतुल सावे यांनी केली  जिल्हा क्रीडा संकुलातील कामांची पाहणी

जालना, दि. १५ (जिमाका) : राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील लॉन टेनिस मैदानासह इतर कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात येणाऱ्या मैदानाची कामे गुणवत्तापूर्ण तसेच लवकरात लवकर पूर्ण करावेत, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पालकमंत्री श्री. सावे यांना कामांच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००

पोलिस मुख्यालयातील कामांचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण

जालना, दि. १५ (जिमाका) : जालना पोलिस मुख्यालयाच्या आतील व कवायत  मैदान नुतनीकरण तसेच विद्युत पथदिवे या कामाचे लोकार्पण राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज पोलिस कवायत मैदानावर पार पडले.

यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००

 

 

 

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाधिक वेळ द्या – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

महसूल पंधरवड्याची सांगता; उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

नागपूर, दि. १५ –  सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल कार्यालयाशी नियमित संबंध येतो. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांसाठी ॲक्सेसिबल अर्थात अधिकाधिक उपलब्ध राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे केल्या.

दि. 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या महसूल पंधरवडा सांगता समारोप कार्यक्रमाचे आयोजन नवीन नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती बिदरी बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी, महसूल संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी गेल्या वर्षभरात महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.

समारोपप्रसंगी श्रीमती बिदरी पुढे म्हणाल्या की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. त्यामुळे या विभागाचे प्रशासनात अनन्यसाधारण महत्व आहे. नागरिक मोठ्या अपेक्षेने आपल्या समस्या सोडविण्यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे येतात. ही जबाबदारी ओळखून अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक कामकाज करीत सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिकाधिक उपलब्ध राहण्याची व गरजेनुसार तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. ई-पंचनामा हा प्रयोग विभाग स्तरावर यशस्वी ठरला असून राज्य स्तरावर या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परिणामकारक तंत्रज्ञानाचा वापर महसूल यंत्रणेत होण्याची गरज असल्याचे श्रीमती बिदरी म्हणाल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले की, महसूल पंधरवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री तीर्थदर्शन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अधिकाधिक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. येत्या काळातही नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा खनिकर्म विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

जिल्हा नियोजन विभागाच्या आयपास तंत्रज्ञानाच्या धर्तीवर खनिकर्म विभागासाठी महाराष्ट्रात प्रथमच नागपूर जिल्ह्यात I-DMFMS  प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीसोबतच जिल्हा खनिकर्म विभागाच्या स्वतंत्र वेबसाईटचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.  जिल्हा खनिज विभागाविषयीची अधिक माहिती WWW.DMFNAGPUR.IN या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

ई समाधान प्रणालीचे उद्घाटन

            विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी डॅा. विपीन इनटकर यांच्या हस्ते ई समाधान प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. व्हीएनआयटीसोबत मिळून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये ही प्रणाली बसविण्यात येणार येणार आहे. या माध्यमातून कार्यालयीन समन्वय साधत कामकाज सुकर होण्यास मदत होणार आहे

                                                                        *****

सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाची गती – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

अमरावती, दि. 15 (जिमाका) : स्वातंत्र्य व लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करतानाच समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे शासन, प्रशासनाचे कर्तव्य असते. त्यानुसार लोकाभिमुख योजना निर्माण करुन त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. शासन-प्रशासन, संस्था व नागरिकांच्या सर्वंकष प्रयत्नांनी आपण सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहोत. समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाने गती दिली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार, उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त भूसुधार श्यामकांत मस्के, सहायक आयुक्त वैशाली पाथरे आधी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर 77 वर्षाचा मोठा प्रवास देशाने केला आहे. स्वातंत्र्याबरोबरच या देशात राज्यघटनेव्दारा न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मुल्ये रुजून लोकशाही प्रस्थापित झाली आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ तसेच देशभक्तीचे जाज्वल्य तेवत ठेवण्यासाठी यंदाही देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान दि. 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात आले. यामुळे देशभक्तीपर आणि चैतन्यमय वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली असून, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य लाभणार आहे. राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांना योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी 24/7 तास मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये जवळपास 2 हजार महिलांच्या फोनव्दारे समस्या सोडविल्या. असा मदत कक्ष स्थापन करणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात आजपावेतो 4 लक्ष 150 महिलांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत सुमारे 3 लक्ष 80 हजार अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे. या भगिनींना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचा लाभ एकत्रितरित्या देण्यात येणार आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘लेक लाडकी’ या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत महिला बाल विकास विभागामार्फत सुमारे 1 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्य सुरु आहे.

युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या क्रांतीकारी निर्णयाची अंमलबजावणी चालू वर्ष सन 2024-25 पासून करण्यात येणार आहे.

तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ व ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची आणि दर्शनाची संधी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरु आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी सहाय्य करण्यात येत आहे. श्रवणयंत्र, चष्मा, ट्रायपॉट, स्टीक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची आदी उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यात तीन हजार रुपयापर्यंतचे डीबीटी प्रणालीव्दारे रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 408 अर्ज प्राप्त झाले असून लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी 24 तृतीयपंथीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे.

राज्य शासन एका क्रांतिकारी निर्णयाद्वारे ‘मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना’ या वर्षीपासून राबवित आहे. या योजनेंतर्गत मेडीकल, इंजिनिअरींगसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रक्कमेच्या 50 टक्के ऐवजी 100 टक्के शुल्क माफिचा लाभ मंजूर करण्यात येत आहे.

अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने बेलोरा विमानतळाचे काम गतीने सुरु असून विमानतळ इमारत, रनवेचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच रात्रीच्यावेळी विमाने उतरविण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहे. लवकरच अमरावतीकरांच्या सेवेमध्ये बेलोरा हे अत्याधुनिक विमानतळ सुरु होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य शासन आर्थिक सहकार्य करणार असून यामुळे मिलमधील कामगारांना लवकरच दिलासा मिळणार आहे. रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे काम गतीने सुरु आहे. अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील मंजूर नियतव्ययापैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यातील प्राधान्य क्षेत्रासाठी वापरावे यावर भर देण्यात येत आहे.

याशिवाय मेळघाट परिसरात निसर्ग पर्यटन, आयुर्वेदिक औषधनिर्माण व आरोग्य सुविधांचा विकास करणे आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा टक्का वाढवणे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विकास कामांवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन पर्यटनासाठी चिखलदरा, भीमकुंड जायंट स्वींग तसेच आमझरी येथे साहसी खेळांतर्गत स्काय सायकल, क्लायमिंग वॉल आदी सुरु करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये 79 कोटींची म्हणजेच 20 टक्क्यांची ज्यादा वाढ करण्यात आलेली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिध्दी करुन त्यांचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यात 50 हजार योजनादूत निवडण्याचे शासन धोरण आहे. तसेच जिल्ह्यात क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुलभ व्हावे व क्रीडापटुंना आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवीन क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. येथे सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक योजनेतील नाविण्यपूर्ण योजनेतून धर्नुविद्या, अत्याधुनिक जीम, कुस्ती, ज्युडो यासह ऑल ग्लास स्क्वॅश कोर्ट उभारण्यात आले आहे. नांदगाव पेठ येथे अतिरिक्त अमरावती एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यात आले असून तेथे भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सन 2023-24 मध्ये विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून मेंदूविकार शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक मशिनरी खरेदी करुन या शस्त्रक्रिया चालू करण्यात आल्या आहेत. 41 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रकाशित ‘जिल्हा विकास आराखडा पुस्तिके’चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी दुचाकी अग्नीशामक वाहनांना मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अंजनगाव आणि अचलपूर या तालुक्यांना प्रातिनिधीक स्वरुपात हस्तांतरीत करण्यात आले. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गजानन देशमुख व शिप्रा मानकर यांनी केले.

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार

उपायुक्त संजय पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज रोहीदास वाघमारे, सहायक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत नामदेवराव म्हस्के, उपजिल्हाधिकारी अनिल ज्योतिराम भटकर, तहसीलदार योगेश देशमुख, नायब तहसीलदार प्रशांत दत्तात्रय अडसुळे, मंडळ अधिकारी पी.एस. पांडे, तलाठी संजय डुकरे, नायब तहसीलदार रविंद्र गणपतराव राठोड, निम्न श्रेणी लघुलेखक अतुल वासुदेवराव लवणकर, निम्न श्रेणी लघुलेखक शंकर मरसकोल्हे, अव्वल कारकून भाग्यश्री महादेवराव थेर, अव्वल कारकून दिवाकर सत्यवान कठाणे, कु. उषा भाऊराव गवई, कु. बबीता श्रीकृष्णराव मेहत्रे, उध्दव प्रल्हादराव काळे, सतीश हिरामणजी पेशने, महसूल सहायक अश्विन ढाकरे, महसुल सहायक पंकज मारोतराव दरोळी, रोहीदास आप्पा पाटील, वाहन चालक विजय अमृतराव भाकरे, वाहन चालक प्रेमकिशोर सुरजबली यादव, शिपाई कामेश विनोद महाजन, शिपाई नरेंद्र विनायकराव इंगळे, शिपाई चंद्रगुप्त उकर्डा शिरसाट, पोलीस पाटील कु. संगिता पोहकार, कोतवाल सुदाम प्रभाकर जाधव

विशेष पुरस्काराने सन्मानित

उपायुक्त (विकास आस्था) संतोष विठ्ठलराव कवडे, उपायुक्त (पुरवठा) रमेश शेषराव आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू पुरुषोत्तम भगत, सहायक संचालक (माहिती) विजय वसंतराव राऊत, विधी अधिकारी ॲङ नरेंद्र बोहरा तसेच महापारेषणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता मंगेश अविनाश पाटील, पोलीस जमादार जावेद अहमद, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई रामेश्वर खुशालराव मुदगले यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हा क्रीडा पुरस्कार-सन 2020-21 चे मानकरी

        जिल्हा गुणवंत खेळाडू गिरिष रत्नाकर कुकडे (धर्नुविद्या), जिल्हा गुणवंत खेळाडू साक्षी विनोदराव तोटे (धर्नुविद्या), जिल्हा गुणवंत खेळाडू (दिव्यांग) धम्मपाल दादाआप्पा गावंडे (हॉलीबॉल), जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक डॉ. अभिजीत हेमंत इंगोले (सॉफ्टबॉल)

जिल्हा क्रीडा पुरस्कार-सन 2021-22 चे मानकरी

जिल्हा गुणवंत खेळाडू सर्वेश रवींद्र मेन (आट्यापाट्या), जिल्हा गुणवंत खेळाडू सानिका धर्मेंद्र चांदूरकर (धर्नुविद्या), जिल्हा गुणवंत खेळाडू (दिव्यांग) शेख अब्दुल शेख अवरार (पॉवरलिफ्टींग), जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गर्शक सतीश किसनराव टपके (खो-खो)

जिल्हा क्रीडा पुरस्कार-सन 2022-23 चे मानकरी

जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अमर सदानंद जाधव (धर्नुविद्या)

*****

महसूल कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणार- पालकमंत्री अब्दुल सत्तार

महसूल पंधरवाडा सांगता समारंभ

छत्रपती संभाजीनगर दि.१५ (जिमाका):  महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून शासनाच्या महत्त्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. जिल्ह्यात तहसिल, उपविभागीय कार्यालये, तलाठी कार्यालये येथे महसूल कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करणे सुकर व्हावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले.

महसूल पंधरवाड्याच्या समारोप आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आला. या सोहळ्यास विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपायुक्त जगदीश मिणियार, मंदार वैद्य, गव्हाणे, श्रीमती बोंदरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, महसूल कर्मचारी हे गाव ते जिल्हा विभाग पातळीपर्यंत काम करीत असतात. महसूल पंधरवाड्यात केलेल्या आरोग्य तपासणीत ज्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारांची गरज असेल त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. कर्मचारी शारिरीक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असायला हवे,असे ही त्यांनी सांगितले.

डॉ. अरविंद लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनीही उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित केले व त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

०००

सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री अब्दुल सत्तार

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर दि.१५(विमाका):  विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी साऱ्यांची साथ आवश्यक असून समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून आपण आपल्या प्रगतीचा वेग कायम राखू या, असे आवाहन पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला, पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार संदिपान भुमरे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, म.न.पा. आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रदीप पवार, उपायुक्त जगदिश मिनियार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे  तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

पालकमंत्र्यांनी उपस्थितांना शुभेच्छा संदेश दिला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेचे रक्षण करतांना प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले.

रोजगार निर्मितीला चालना

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला, रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, बिडकीन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहे. १२० एकर जागेत हा प्रकल्प येत असून या जागेचे वाटपपत्रही त्या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ९०० जणांना थेट रोजगार मिळेल. शिवाय अन्य लहान उद्योगही त्यामुळे कार्यान्वित होतील. त्याचप्रमाणे टोयोटा-किर्लोस्कर प्रकल्पाची २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होते आहे. मोटार वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामुळेही ८ हजार जणांना प्रत्यक्ष व ८ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. एथर एनर्जी हा प्रकल्प दुचाकी निर्मितीचा प्रकल्प असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

उपेक्षित घटकांच्या विकासासाठी योजना

समाजातील सर्वच उपेक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाने अनेक पावले उचलली आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरु करण्यात आली. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब माता भगिनींना या योजनेमुळे दरमहा १५००/- रुपये म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसाराला हातभार लागेल. जिल्ह्यात ५ लाख ३२ हजार ७६९ इतक्या बहिणींचे नावे या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाली असून राज्यात आपला जिल्हा अग्रेसर आहे. बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणाऱ्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गतही जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ८५८ महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात २३१८ रिक्तपदे विविध आस्थापनांनी नोंदविली असून २२२७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामुळे सहा महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल शिवाय त्यांना सहा महिन्याचे विद्यावेतनही मिळेल, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

अल्पसंख्याकांच्या विकासाला मिळेल चालना

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करुन कार्यान्वित केले आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्यातील दुग्धविकासाला चालना देण्यासाठी शासनाने ३२८ कोटी ४२ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार असून ३ वर्षाच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोपयोगी निर्णय

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानाच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा लाभदेखील लाखो नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री सत्तार म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई व शबरी या तिन्ही योजनेचे मिळून ७ हजार ७५८ घरकुले पूर्ण करण्यात आली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आर्थिक २५५.०८ टक्के साध्य करण्यात आले. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून ती प्रगती पथावर आहेत.

पाणीपुरवठा, क्रीडांगण विकास, स्वच्छतेस प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर शहरवासियांसाठी नळाला २४ तास पाणी आता स्वप्न नव्हे तर वास्तव होणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून महापालिकेच्या हिश्श्याचा ८२२ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. तसेच आमखास मैदान येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, गरवारे क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम साकारणार आहे. शहरातून जाणाऱ्या खाम नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पासाठी बक्षीस घोषित केले आहे. शहराला स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट करण्याचे दिशेने महानगरपालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्यात नागरिक सहभागही देत आहेत, याबाबत पालकमंत्री श्री. सत्तार यांनी समाधान व्यक्त केले.

देशाच्या एकतेचे प्रतिक तिरंगा

आपण सर्व हर घर तिरंगा/घरोघरी तिरंगा या अभियानात सहभागी झालात त्याबद्दल आपले अभिनंदन. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात संपूर्ण देश एकसंघ भावनेने जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता विसरुन सहभागी होतो. विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचे एकमेव उदाहरण असल्याचेही पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले.

प्रशासनाच्या विविध उपक्रमांचे कौतुक

पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनानेही जलसमृद्ध गाव अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत विहीर पुनर्भरणाची ५७० कामे तर रेनवॉटर हार्वेस्टिंगची १६७ कामे सुरु आहेत. वटवृक्ष लागवड अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ६०५ वटवृक्ष लागवड करण्यात आली आहे. या  अभियानांची सुरुवात करुन पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाकांक्षी काम सुरु केले आहे. पाणी टंचाईवर मात करण्याचा विचार यामागे आहे. प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या या उपक्रमांला त्यांनी शुभेच्छा दिल्या.  लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांची साथ असतेच. आपल्या समाजात एकोपा आणि शांतता कायम ठेवून आपल्या प्रगतीचा वेग राखता येईल. देशाची एकात्मता आणि शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना केले सन्मानित

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय खांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक द्वारकादास भांगे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल तर नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकारित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विहित कालावधी पूर्ण केल्यामुळे विशेष सेवा पदक देवून गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक परविन यादव, पोलीस उपनिरिक्षक अशोक माने, दिपक पारधे, राधा लाटे, उत्तम नागरगोजे, दिलीप जाधव, अनिल नाणेकर, नारायण राठोड, भारत निकाळजे यांना गौरविण्यात आले.

शिक्षण विभागाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल स्वराज्य अरुण मानधने, सारंग संतोष पवार, श्रेयस अजय निकम, यांना तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी राज्यस्तरीय यशाबद्दल अर्चित संतोष दखर, अर्यान सखाहरी नवले, अनुराग राजेंद्रकुमार पवार यांना गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी शासनाकडून सन २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या ॲटोमॅट इंडस्ट्रीज वाळूज व ओमकार इंडस्ट्रीज शेंद्रा या लघु उद्योजकांनाही गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवर एकूण १५३ पदांची तलाठी पदभरती प्रक्रिया घेण्यात आली त्यापैकी ५९ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित ९४नियुक्ती आदेशांपैकी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ५ नियुक्ती आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले.

श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचलन केले.

०००

सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

नागपूर,दि. 15 :  अनेकांच्या बलिदानातून, संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी अनेकांनी यातना सहन केल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आजवरच्या वाटचालीत आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून एक मैलाचा टप्पा गाठला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत हे ब्रीद घेऊन सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेवली आहे. प्रगतीचे विविध टप्पे गाठताना सामान्य माणसाच्या जीवनात परिर्वतन व्हावे यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरिक्त आयुक्त माधवी चवरे-खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस सहआयुक्त आश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाने केंद्र शासनासमवेत विविध उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला. या प्रयत्नातून महाराष्ट्राची वाटचाल आता ट्रिलियन डॉलरकडे झेपावली असून सबंध भारतात महाराष्ट्राने यात पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्याने साध्य केलेल्या प्रगतीची अनुभूती आपण सर्व घेत आहोत. हे विकासाचे पर्व आपण पाहत आहोत. येथील समृद्धी महामार्ग असेल, मेगा टेक्टाईल प्रोजेक्ट, मेट्रो आदींसह विविध सिंचन प्रकल्प महत्त्वाचे आहेत. सुमारे 88 हजार कोटीतून आपण वैनगंगा-नळगंगा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातून विदर्भातील दुष्काळ दूर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गत तीन वर्षात 5 हजार कोटींपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आणू शकलो याचे समाधान असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासनाने लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून चांगले निर्णय व उपक्रम हाती घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहा दीड हजार रुपये आपण देत आहोत. कालपासून याची प्रतिनिधीक सुरुवात केली आहे. येत्या 17 तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळेल. या एक कोटीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 5 लाख महिलांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही आपण सुरु केली आहे. सुमारे 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये असे विद्यावेतन आपण नोंदणीकृत युवकांना देत आहोत.  शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. मुलींसाठी 500 कोर्सेसच्या फिसची रक्कम शासन देत आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या घरावर सौर पॅनल बसविले त्यांना 300 युनिट मोफत वीज आपण देत आहोत. ज्यांची वीज 300 युनीटपेक्षा अधिक होत आहे. ती वीज आपले वीज महामंडळ विकत घेईल, असे त्यांनी सांगितले.

सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना एक रुपया विमाअंतर्गत 278 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेयो, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथील विविध विकास कामांसाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या निधीतून विविध वैद्यकीय सुविधा आपण निर्माण करीत आहोत. केंद्र सरकारकडून मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदीसाठी 550 कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळाला आहे. जिल्ह्यातील 35 हजार 750 लोकांना आपण प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मान्यता दिली आहे.  ओबीसींसाठी मोदी आवास योजनेत 6  हजार 747 घरांना मंजूरी देऊन यातील 1 हजार 54 घरे पूर्ण केली आहेत. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक योजनांसाठी आपण 1 हजार 219 कोटी रुपयांच्या निधीची नागपूर जिल्ह्यासाठी तरतूद केली आहे. देशातील अद्ययावत असे क्रिडा संकुल आपण साकारले आहे. जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासनाला भक्कम करण्यासाठी 272 कोटी रुपये खर्चून नवीन इमारत आपण उभी करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एक वृक्ष मातेच्या नावाने ही चळवळ आता अधिक प्रभावीपणे लोकसहभागातून राबविली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती पदक प्राप्त , विशेष सेवा पदक प्राप्त अधिकारी, अंमलदार, आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या दाखल्याचा त्वरीत निपटारा करणारे अधिकारी, अग्निवीर सैन्य भरती मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणार व महाआवास योजना अभियान 2023-24 मध्ये योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

ताज्या बातम्या

आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या

0
बुलडाणा, (जिमाका) दि. २०:  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२  व राज्य शासनाच्या आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 1 लाख 20 हजाराहून जास्त घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात...

उद्योगस्नेही वातावरणातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

0
छत्रपती संभाजीनगर दि. २०: राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी समन्वय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

0
पुणे दि.२१: आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवार (२०) रोजी दर्शन...

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान – केंद्रीय मंत्री अमित शाह

0
मुंबई, दि. २०: देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना व्यापार व उद्योगांचे...

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात विचारवंत दिले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २० : पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात थोर विचारवंत व क्रांतिकारक दिले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल - बाल - पाल या त्रयींसह...