गुरूवार, ऑगस्ट 14, 2025
Home Blog Page 541

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू

मुंबई दि.१८: भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता दि.23 डिसेंबर, 2024 ते 11 जानेवारी, 2025 या कालावधीत प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात करावे, असे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ग. ल. तरतरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अर्ज करण्यासाठी www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://doaonline.Co.in/LDMIC/  या लिंकवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

संगीत महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता व उपयुक्तता उत्कृष्ट दर्जाची राखण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या सल्लागार मंडळावरती अध्यक्ष म्हणून उषा मंगेशकर, सदस्य म्हणून सुरेश वाडकर, आदिनाथ मंगेशकर तर मयुरेश पै समन्वयक म्हणून आणि कला संचालनालयाचे संचालक संतोष क्षीरसागर सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

महाविद्यालयात शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम,  भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, पियानो/कीबोर्ड प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच संगीत निर्मिती व ध्वनी अभियांत्रिकी प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 25 प्रवेश क्षमता आहे.अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असून वार्षिक शुल्क 5400 रुपये इतके आहे. तसेच सलिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिने कालावधीसाठी शनिवार – रविवार या दिवशी भावसंगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून वीस हजार रुपये प्रवेश शुल्क असणार आहे.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे अकादमी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी मुंबई येथे फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात येतील. प्रवेश प्रक्रिया तसेच ऑडिशन बाबत पुढील माहिती www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याने उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

०००

नागपूर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २१ डिसेंबरपर्यंत

नागपूर, दि. १८ :  नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवार, दि.२१ डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत चालणार असल्याचे निवेदन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केले.

०००

मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. १८: मुंबईत एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे निर्देश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली व बचावकार्याबाबत निर्देश दिले.

०००

वर्ष २०१७ ते २०२० पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू; ३० मार्च अंतिम मुदत

मुंबई, दि. 18 :-  महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 विधेयकातील कलम 73 अंतर्गत वर्ष 2017-18, 2018-19 आणि 2019-20 च्या कर मागण्यांशी  संबंधित  व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना (Amnesty Scheme)  राज्यात लागू करण्यात आली असून 31 मार्च 2025 ही देय कर रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होणार असल्याने संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केले.

या अभय योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांकडून साधारण एक लाख चौदा हजार अर्ज अपेक्षित आहेत. विवादित रक्कम 54 हजार कोटी रुपयांची आहे.  त्यापैकी विवादित कर 27 हजार कोटी रुपयांचा दंड तसेच शास्तीची रक्कम 27 हजार कोटी रुपयांची आहे. यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विवादित कराच्या सुमारे 20 टक्के रक्कम  योजनेमध्ये जमा होते. त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे 5 हजार 500 कोटी ते 6 हजार कोटी रुपये विवादित कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. यापैकी अर्धी रक्क्म म्हणजे 2 हजार 700 कोटी ते 3 हजार कोटी रुपये राज्य शासनास मिळतील व उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडे जमा होईल. या योजनेमुळे व्यापाऱ्यांना सुमारे 5 हजार 500 ते 6 हजार कोटी रुपयांच्या व्याज व दंडातून दिलासा मिळेल. या अभय योजनेची माहिती करदात्यांना, वकिलांना, चार्टर्ड अकाऊंटंट, नागरिकांना होण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी; दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 18 : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत.  त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

डॉ.सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, 18: मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2024 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 21 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली.

डॉ.सुधीर रसाळ यांच्याविषयी…

डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखन, समीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

ग्रंथसंपदा

डॉ.रसाळ यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये कविता आणि प्रतिमा, कविता निरूपणे, मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण, ना.घ. देशपांडे यांची कविता यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांचे लेखन वाङ्मयीन जाणिवा, शैली, आणि संस्कृती यावर विशेष प्रकाश टाकते.

पुरस्कार आणि मानसन्मान

डॉ. रसाळ यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये अशोक कीर्तकीर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार, गौरवमूर्ती पुरस्कार, आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. 2021 साली त्यांना अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

“विंदांचे गद्यरुप” या पुस्तकाविषयी…

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या ‘विंदाचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकाला प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात सैद्धांतिक समीक्षेचा अभाव अधोरेखित करणारे हे पुस्तक साहित्य आणि वाङ्मयविषयक अनेक प्रश्नांना समर्थ उत्तरे देते.

डॉ. सुधीर रसाळ यांनी त्यांच्या समीक्षेत वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा, तिच्या घटकांच्या परस्पर संबंधाचा आणि तिच्या मूल्यमापनासाठी योग्य निकष तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी समीक्षेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात काही निवडक समीक्षकांनीच अशा प्रकारचे सैद्धांतिक अभ्यास सादर केले आहेत. बा.सी मर्ढेकरांनी यांनी सर्व ललित कलांबाबत सिद्धांत मांडला, त्यानंतर विंदा करंदीकर यांनी वाङ्मयकलेच्या जीवनाविधी कलेवर आधारित वेगळा सिद्धांत मांडला.

परंतु करंदीकरांच्या या सिद्धांताला अपेक्षित मान्यता मिळाली नाही. त्यांच्या समीक्षेत केवळ सिद्धांत नव्हे, तर समग्र काव्यशास्त्र निर्माण करण्याची क्षमता होती.  डॉ.रसाळ यांनी  या पुस्तकातून पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैध्दांतिक समीक्षा मांडली आहे.

परीक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

श्री हरिश्चंद्र थोरट, श्री. वसंत आबाजी डहाके आणि डॉ. विद्या देवधर या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परीक्षक मंडळात समावेश होता.  साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा 8 मार्च 2025 रोजी कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित केल्याची माहिती, सचिव श्री के. श्रीनिवासराव यांनी दिली.

 

मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

नागपूर, दि. 18 : मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी  प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.

एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे अभिनंदन

नागपूर, दि. 18 :  साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे मराठी समीक्षा क्षेत्रातील एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय साहित्य संस्थेच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात डॉ. रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ रसाळ यांचे मराठी साहित्य विश्वातील योगदान अमूल्य असे आहे. मराठी भाषेचे अध्यापन, संशोधन, संपादन आणि समीक्षा असा त्यांचा चौफेर विहार राहिला आहे. विशेषतः त्यांचे मराठी काव्यविषयक संशोधनात्मक लेखन मौलिक असे आहे. समीक्षेतून कठीण विषय सहज-सुलभपणे समजावून देणारी त्यांची शैली नवोदितांना आश्वासक वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. मराठी भाषा जतन, संवर्धन तसेच साहित्य विषयक चळवळीतील संस्था, समित्यांवरही डॉ. रसाळ सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या समीक्षात्मक लेखनाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दाद नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. रसाळ आजही तितक्याच तडफेने लेखन, संशोधनात कार्यरत आहेत. त्यांच्या हातून यापुढेही मराठी साहित्याची अशीच अखंडित सेवा घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छांसह मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. रसाळ यांचे अभिनंदन केले आहे.

जीएसटी परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व; जीएसटीबाबत अधिकाऱ्यांकडून घेतला सविस्तर आढावा

SPK DGIPR Mantralay Mumbai

नागपूर, दि. १८ : राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर २०२४  च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु. तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये  अधिकाऱ्यांकडून जीएसटीबाबत सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, विक्रीकर सह आयुक्त किरण शिंदे, विक्रीकर उपायुक्त नंदकुमार दिघे आदी उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी यापूर्वी झालेल्या ‘जीएसटी’ परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याने सुचविलेल्या सुधारणा, नव्याने सुचवावयाच्या सुधारणा, करांमध्ये विविध उद्योग, घटक यांना द्यावयाची सूट तसेच कररचनेमध्ये सुलभता आणि करदात्यांच्या व्याख्या सुस्पष्ट असण्याबाबतची माहिती घेतली. इलेक्ट्रीक वाहने, विमा हप्ते, कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांना करांमध्ये सूट देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच काही क्षेत्रांमध्ये करावयाची करकपात आणि करवाढ, त्यामुळे महसुलामध्ये येणारा फरक याची माहितीही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी घेतली.

जैसलमेर येथे दि. २० व २१ डिसेंबर २०२४ असे दोन दिवस ही जीएसटी परिषद होणार आहे. तसेच या परिषदेवेळी अर्थसंकल्पाविषयीही बैठक होणार आहे. यामध्ये राज्यांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षांची चर्चा करण्यात येणार आहे. याविषयीही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर,दि. 18 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहितीसक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’  ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह  यांनी केले.

नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.

श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोकऱ्या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोकऱ्या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरताना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिद्ध करावे लागेल. ‘एआय’च्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रुटी दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजूला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पूर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून ‘एआय’मार्फत मिळणाऱ्या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारतविरोधी कृत्य करण्यासाठी ‘एआय’चा वापर होणार नाही, यासाठी ‘एआय’ची माहिती भारतीय पद्धतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुद्धा ‘एआय’शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र जोरे, भूपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.

ताज्या बातम्या

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. १४ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर...

मुंबईत १८ ऑगस्ट रोजी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’

0
मुंबई, दि. १४ : महिलांना आपले प्रश्न व तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यासाठी महिला व बाल विकास...

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १४ : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या  या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली...

सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार

0
मुंबई, दि. १४ : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येत असुन यास्तव १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपासून ते १७ ऑगस्ट २०२५...

पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

0
मुंबई, दि. १४ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला पारशी नूतन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज हा नूतन वर्षाचा पहिला दिवस उत्तम विचार,...