गुरूवार, जून 12, 2025
Home Blog Page 541

मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क राहावे; मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

 

मुंबई, दि. २० : जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनेनुसार केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध व उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळे, बंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा समावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षण, प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे – आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक

मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क रहावे व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांनी केले आहे.

मंकीपॉक्स या आजाराविषयी काळजी घेण्यात येत असून जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आरोग्य उपसंचालक, आरोग्य अधिकारी, महापालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही आयुक्त श्री. नायक यांनी निर्देश दिले आहेत.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो. मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे की, थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबा वाटे संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

संशयित रुग्णाची लक्षणे

  • मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करुन राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे
  • सुजलेल्या लसिका ग्रंथी
  • ताप
  • डोकेदुखी
  • अंगदुखी
  • प्रचंड थकवा
  • घसा खवखवणे आणि खोकला

मंकीपॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी-

  • संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे.
  • रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुणा पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.
  • हातांची स्वच्छता ठेवणे.
  • आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.
  • नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे.

००००

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/Circular-Guidelines-for-management-of-Monkeypox-disease-compressed.pdf” title=”Circular – Guidelines for management of Monkeypox disease-compressed”]

निलेश तायडे/विसंअ

बांबू लागवडीसाठी मानवविरहित यंत्र विकसित करणार – मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल

मुंबई, दि.२० : बांबू लागवडीसाठी  खड्डे खोदणे व बांबू  कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे  कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. कृषिमंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सच्या बैठक झाली.

डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ इनव्हा ॲग्रो मेक प्रायव्हेट लिमिटेडचे वेंकट राव,ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे सरदार बलमल सिंह यावेळी उपस्थित होते.

अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले की, राज्यातील पडीक जमिनीवर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी भारतातील पहिली इलेक्ट्रीक टूल बार यंत्रणा वापरण्यात येणार आहे. एक एकर क्षेत्रात एक व्यक्ती दोन ते तीन दिवसात  फक्त १२ ते १३ खड्डे काढू शकतो. मात्र या इलेक्ट्रीक टूल बार या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ४५० बांबू लागडवडीसाठी खड्डे खोदता येतील. तसेच या यंत्रासोबत बांबू कापण्यासाठी मनुष्यबळाची देखील आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन यामध्ये डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत अधिक संशोधन करून बांबू कापण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे जेणेकरून कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात हे काम करता येणे शक्य होईल, अशा सूचनाही श्री.पटेल यांनी यावेळी केल्या.

००००

संध्या गरवारे/विसंअ

‘जलजीवन मिशन योजने’च्या कामांना अधिक गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २० :- ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात जलजीवन मिशन योजना महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. यामुळे या योजनेतील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी या कामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी जल जीवन मिशन योजना व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २.० चा आढावा घेतला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे कार्यकारी संचालक अभिषेक कृष्णा यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन योजनेतील कामांचा आढावा घेतल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशन योजनेतील कामे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येत आहेत. योजनेतील कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. तसेच योजनेतील ज्या कामांचे कार्यादेश प्रलंबित आहेत त्यांची पूर्तता करून करून ते तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ चा आढावा घेताना पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, सन २०२४-२५ पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त अधिक (ODF+) मॉडेल बनवणे हा मुख्य उद्देश आहे. स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम  यासह विविध कामे तातडीने पूर्ण करावीत व यादृष्टीने कार्यवाही केली जावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने सोडविण्यात याव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २० :- पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात. येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शहरातील साफ-सफाईबरोबरच हाताने मैला उचलण्याचे काम केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार नियुक्ती देण्यात यावी. त्यासंदर्भातील प्रलंबित वारसांच्या पात्रतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत वारसा हक्क कागदपत्रे तपासणीसाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना केल्या.

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नगरपरिषदेतील ३६२ पात्र सफाई कर्मचाऱ्यांना योग्य क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाच्या सचिवांनी संबंधित विषयाबाबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढावा. नागरी हिवताप प्रतिरोध योजनेतील कार्यरत अस्थायी पदे पुढे कार्यरत ठेवण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने करावी. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या १६ पात्र वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे. तथापि प्रलंबित ६६ वारसांना नियुक्ती प्रकरणी अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकली नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या ६६ वारसांबाबत पुन्हा निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष शिबिराचे आयोजन करुन वारसांकडील कागदपत्रे आणि नगरपालिकेकडील कागदपत्रे तपासण्यात यावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

——०००—–

लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २०:- पुणे जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. या शहराच्या भविष्यातील लोकसंख्येचा, पर्यटकांचा विचार करून खंडाळा भागाकरिता ५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळा शहरासाठी विविध ९ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. बैठकीस आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के.एच. गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुण्याचे नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक अविनाश पाटील आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम नगरपरिषद आणि रेल्वे प्राधिकरणाकडून तातडीने करण्यात यावे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता केल्याशिवाय या उड्डाणपुलाचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या कामाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनामार्फत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेच्या सहाय्याने तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, लोणावळा शहरातील दीर्घकालीन भाडेतत्त्वावर (लिजवर) दिलेल्या मालमत्तांची मुदत संपली आहे. मात्र, लिजधारकांनी परस्पर मालमत्ता विकल्याचे निर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर या मालमत्तांबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या धर्तीवर दंड आकारून त्या नियमित करण्याबाबत मार्ग काढण्यात यावा. शहरातील स्थानिक रिक्षा, टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही यादृष्टीने ओला, उबर यासारख्या ऑनलाईन कॅबचालक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. शहरातील पथविक्रेत्यांच्या समितीमध्ये स्थानिक पथविक्रेत्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात यावे. औद्योगिक वसाहतीमधील विजेची समस्या सोडविण्यासाठी एक्प्रेस फीडर देऊन प्रश्न मार्गी लावावा. अधिसंख्य पदांची निर्मिती करुन नगरपरिषदेच्या आस्थापनेवर सफाई कामगारांच्या वारसांना वर्ग चार च्या पदांवर नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

लोणावळा शहराचा विकास आराखडा अंतिम करताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांना वाढीव एफएसआय देण्याबाबत नगरविकास सचिवांनी संबंधितांची बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करावी. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळा शहरातील दोन किलोमीटर मार्गाचे नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावास रस्ते विकास महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. नगरपरिषदेला पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची ६.५ गुंठे जागा मिळण्यासाठी एकत्रित पाहणी करुन सध्याच्या टाकीलगतची जागा तातडीने देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

——०००—–

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मनाेगत

मुंबई, दि २० :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली आहे.

बुधवार, दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हे मनोगत प्रसारित होणार आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व विविध घटकांसाठीच्या विकास कामांचे नियोजन केले जाते, त्याची प्रभावी अंमलबजावणीही केली जाते. मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विकास कामांबाबत दिलखुलास कार्यक्रमात माहिती दिली आहे.

—-000—

केशव करंदीकर/व.स.सं

राजधानीत सद्भावना दिनानिमित्त शपथ

नवी दिल्ली, दि.20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी रुपिंदर सिंग यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व स्मिता शेलार इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या (प्रभारी) उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

0000

शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांची कार्यवाही तत्परतेने करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. २० : शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांच्या निविदा प्रक्रिया येत्या महिनाअखेर पूर्ण कराव्यात तसेच विहित कालमर्यादेत या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.

शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर आदींसह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी  अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, रत्नागिरी, कोकण, ठाणे, विक्रमगड, पेण या ठिकाणच्या मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकाम प्रस्तावांच्या संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेऊन मंत्री श्री. चव्हाण यांनी या महिनाखेर सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याबाबत पुढील कार्यवाही तत्परतेने करुन शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचित केले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतन मधील पदविकाधारक विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच बाहेरही मागणी वाढत असून रोजगाराच्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन मधून प्राप्त होणाऱ्‍या कौशल्याची  उपयुक्तता आणि महत्त्व  विशेष  उपक्रमाद्वारे उच्च शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतन इमारतीचे बांधकाम हे दर्जेदार करण्याची खबरदारी सर्व संबंधितांनी  घ्यावी, सुविधायुक्त तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या व्यापक उद्देशाने सर्वांनी कार्यवाही करावी, असे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ

लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 20 : लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

लोणारी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल व अखिल भारतीय लोणारी  समाज संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोणारी समाजातील बांधवाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक विकास महामंडळासोबत लोणारी समाजाच्या मुला-मुलींसाठी नवी मुंबई किंवा पुण्यामध्ये वसतिगृह सुरू करावे, लोणारी समाजाचे विष्णूपंत दादरे यांचे सांगोला तालुक्यात स्मारक उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या इतर विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

रामोशी, वडार, गुरव, लिंगायत, नाभिक, सुतार, विणकर या समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असून लोणारी समाजासाठीचे महामंडळ लवकरच होईल. राज्यातील इतर मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू केली असून या वसतिगृहाचा तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचाही लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ

राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ.आंबेडकर स्मारकाची पाहणी

मुंबई, दि. २० : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले. डॉ.आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक ही त्यांना यथोचित आदरांजली असून या स्मारकामुळे देश विदेशातील लोकांना डॉ.आंबेडकर यांच्या कार्याची महती कळेल, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ.आंबेडकर यांच्या भव्य स्मारकामुळे भारतीय समाज अधिक सशक्त व एकसंध होण्यास मदत होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.  सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणाच्या वेळी राज्यपालांनी स्मारकाच्या निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्मारकामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी करण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा तसेच स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

इंदू मिल येथील भव्य स्मारक हा संपूर्ण हरित परिसर असेल तसेच तेथे ७५० ते ८०० मोठी झाडे लावण्यात येणार आहे. या ठिकाणी १००० व्यक्तींची आसन क्षमता असलेले सभागृह, चवदार तळ्याचे प्रतिरूप तळे तसेच ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, भंते डॉ. राहुल बोधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे व विजय वाघमारे, वास्तुशिल्पकार शशी प्रभू, मूर्ती शिल्पकार अनिल सुतार आदी उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor reviews progress of Dr.Ambedkar Memorial at Indu Mill Compound

Mumbai Dated 20 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visited the Grand Memorial of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar at Indu Mills Compound in Mumbai and reviewed the progress of its construction on Tue (20 Aug).

Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale, Maharashtra’s Minister for Youth Affairs and Sports Sanjay Bansode, senior government officers, Nagsen Kamble, Bhante Dr Rahul Bodhi and others were present.

0000

ताज्या बातम्या

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १२ : मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरांवर बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत. अशा झोपडपट्ट्या पावसाळ्याच्या दिवसात भूस्खलन तसेच दरड कोसळल्यास धोकादायक ठरतात. डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी...

म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

0
मुंबई, दि. १२ : विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या...

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

0
मुंबई, दि. १२ :- गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना असल्याचे...

अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

0
मुंबई, दि. १२ : आज दुपारी गुजरातमध्ये घडलेला भीषण विमान अपघात अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघाताच्या दुर्घटनास्थळावरून जे दृश्य समोर येत आहे, ते...

अहमदाबाद-लंडन विमान अपघात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त

0
मुंबई, दि. १२ :- अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रति संवेदना प्रकट...