बुधवार, जून 11, 2025
Home Blog Page 542

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात द्वितीय – पालकमंत्री दादाजी भुसे

  •    याेजनेच्या शुभारंभाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न
  •    कार्यान्वयीन यंत्रणांचे केले अभिनंदन

नाशिक, दि. १७ (जिमाका ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य शासन महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत. जिल्ह्यात योजनेचे साधारण 7 लाख 20 हजार 844 अर्ज मंजूर झाले असून, या योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभाबरोबरच जिल्हास्तरावरही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महिला व बालविकास विभागाचे उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हाभरातून आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी करण्यात आले.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य शासन राज्यातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, महिला व बालविकास विभाग यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांचे यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे यावेळी अभिनंदन केले.

ज्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 नंतर अर्ज करतील, त्यांना देखील या योजनेचा सुरूवातीपासून लाभ मिळणार असल्याचे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्यापपर्यंत या योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांनी देखील योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यातील सद्यस्थितीदर्शक माहिती सादरीकरणातून माहिती दिली.

 

प्रारंभी पालकमंत्री व उपस्थित प्रातिनिधीक महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. यावेळी काही महिलांनी श्री. भुसे यांना राखी बांधली. शेवटी सर्व तालुक्यातील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते तुळशीचे रोप देवून सन्मानित करण्यात आले. तसेच लाडकी बहीण योजनेच्या सर्व तालुकास्तरीय समित्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

०००

 

 

 

जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ लाख ७७ हजार ३२३ अर्ज मंजूर  -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
  • राज्य शासन सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार

पालघर दि. १७ (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राज्य शासन लोकोपयोगी योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहचवत असून राज्य शासन सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन सभागृह पालघर येथे करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते (दुरदृष्य प्रणालीद्वारे) करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सावरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण भावसार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे तसेच लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

केंद्र व राज्य शासनाने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असे जवळपास 17 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 लाख 96 हजार 207 अर्ज प्राप्त झाले असून 2 लाख 77 हजार 323 अर्ज मंजूर झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 2 लाख 8 हजार महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसात पैसे जमा होतील. या योजनेमुळे जिल्ह्यातील भगीनींमध्ये आत्मविश्वास वाढला असून या रक्कमेतून त्यांना आपल्या आर्थिक अडचणी सोडविण्यास मदत मिळणार आहे. प्रत्येकांच्या हाताला काम देण्याच्या धोरणानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यामधील युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. नागरिकांसाठी मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र दर्शन योजनेअंतर्गत नागरिकांना आपल्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी शासन मदत करणार आहे.

ज्या भगिनीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नये, एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असे नियोजन राज्य शासनाने केले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उर्वरित भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. अशा महिलांना प्रतिनिधी स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

०००

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री संजय बनसोडे

  • पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार लाडक्या बहिणींना लाभ
  • लातूर येथे जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
  • पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार अर्ज ठरले पात्र
  • प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार लाभाची रक्कम
  • योजनेविषयी पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजावर विश्वास ठेवू नका

लातूर, दि. १७ :  राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतून दरमहा दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार असून महिला-भगिनींसाठी यामुळे मोठी मदत होईल. यासोबतच महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्यात आले असून या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ बालेवाडी-पुणे येथून झाला. यानिमित्ताने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमामध्ये मंत्री श्री. बनसोडे बोलत होते. यावेळी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, राजेश्वर निटूरे, योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष हृषीकेश कराड, प्रेरणा होनराव, बापूराव राठोड, व्यंकट बेंद्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांची यावेळी उपस्थिती होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काही गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित तीन हजार रुपये रक्कम गेल्या दोन-तीन दिवसांपासून पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाल्यानंतर उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरही रक्कम जमा होईल, असे ना. बनसोडे म्हणाले. तसेच ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे. त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहावे, असे त्यांनी सांगितले.

समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत असून युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. यामाध्यमातून इयत्ता बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना ६ ते १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. बनसोडे यांनी यावेळी केले.

प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी प्रास्तविकामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अंमलबजावणीची माहिती दिली. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच असून पहिल्या टप्प्यात २ लाख ६७ हजार ९५ अर्ज पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष हृषीकेश कराड, प्रेरणा होनराव यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना यावेळी मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच या योजनेसाठी महिलांच्या नाव नोंदणीत उकृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा सेविका यांचाही गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांचा शुभेच्छासंदेश यावेळी सभागृहात वाचून दाखविण्यात आला. या योजनेमुळे राज्यात आर्थिक सक्षमतेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. नारी शक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली  आहे. त्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्या स्वावलंबी होतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. महाजन यांनी आपल्या संदेशात व्यक्त केला. तसेच या योजनेचा लाभ मिळालेल्या सर्व बहिणीचे अभिनंदन केले.

महिलांनी मंत्री श्री. बनसोडे यांना राखी बांधून मानले शासनाचे आभार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा झाल्याबद्दल लाभार्थी महिलांनी आनंद व्यक्त केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात या महिलांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना राखी बांधून या योजनेबद्दल शासनाचे आभार मानले. आता आमची ओळख ‘मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण’ अशी झाली असून हे आमच्यासाठी सुखावह असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

०००

शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात – मंत्री गिरीश महाजन

  •  भोकर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ९२७ कोटींच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण

नांदेड दि. १७ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती, लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटनमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

 

 

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकरसारख्या शहरात आज मोठमोठे प्रकल्प उभे राहत असून राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी सुरू आहे. जो समाज, जो समाज घटक आणि जे नेतृत्व उपलब्ध योजनांचा योग्य वापर करेल त्यांच्या विकासाचा आलेख कायम उंच राहतो असेही, त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आज नगरपरिषदेच्या अंतर्गत श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना त्यांनी सरकारच्या सर्व योजना समाजाच्या उन्नतीसाठी वापरणे आणि त्या योग्य प्रकारे वापरल्या जात आहे अथवा नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला  पालकमंत्र्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, रोहिदास जाधव, अॅड. रामराव नाईक विनोद चीदगीरीकर धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज (संस्थान पोहरादेवी), दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली), श्री संत सेवालाल महाराज समितीचे अध्यक्ष डॉ. यु. एल. जाधव यांच्यासह बंजारा समाजातील समाजभूषण, ज्येष्ठ नेते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील संबोधित केले. भोकरचा अनुशेष पूर्ण केला जाईल. विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. अन्य मान्यवरांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.

तत्पूर्वी आज दिवसभरात 926.71 कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रामुख्याने पिंपळढव साठवण तलाव आणि रेणापूर-सुधा बृहद लघुपाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या कामाचा उल्लेख करावा लागेल. या प्रकल्पांमुळे भोकर तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार असून, भोकर शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

तत्पूर्वी आज सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे अस्तित्वातील विश्रामगृहावर समस्थर विस्तारीकरण करण्याच्या  6 कोटी 87 लाख रुपयाचे कामाचे लोकार्पण झाले. भोकर विश्रामगृहाचे रूप यामुळे पालटले आहे.

त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नांदा म.प. भोकर येथे  जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील राज्यमार्ग 251 धावरी-थेरबन-सोमठाणा-किनी-पाळज-दिवशी लगळुद राममा तुराटी-बोथी-बितनाळ-सोमठाणा-गोरठा-जामगाव-कुदळा-बोळसा-भायेगाव-अंतरगाव-सावरखेडा-कृष्णूर रामा-419 रस्त्याची हुडको अंतर्गत सुधारणा करण्याच्या व. कि.मी.0/00 ते 42/200 असे 550 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन झाले.

त्यानंतर परिसरातील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळढव साठवण तलाव ता. भोकर जि. नांदेड माती धरण सांडवा मुख्य विमोचक व मुख्य कालव्याचे काम व रेणापुर सुधा प्रकल्प बृ.ल.पा.प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या   येथे 116 कोटी 48 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

त्यानंतर हायब्रिड ॲन्युईटी कार्यक्रम टप्पा-2 ND –II 33 बी पिंपळढव, बल्लाळ तांडा, मोघाळी कामणगाव एमडीआर 97 किमी 0/000 ते 20/000 ता. भोकर जि. नांदेड रस्त्याची सुधारणा, भोकर येथील सा.बां. विभागीय कार्यालय इमारतीचे बांधकाम , उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांचे बांधकाम ,भोकर येथील 30 खाटाच्या रुग्णालयाचे 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम. भोकर शहरातील गावतलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभिकरण. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नगरपरिषद, भोकर अंतर्गत बालाजी मंदिर ते बोरगाव रस्त्याची सुधारणा, भोकर शहरासाठी वळण मार्गावरील बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.

०००

 

 

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन पाल्यांना सनदी अधिकारी बनवा -पालकमंत्री हसन मुश्रीफ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय महिला लाभार्थी सन्मान सोहळा संपन्न

 कोल्हापूर, दि.  १७ (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून या सर्व योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिक उन्नती साधावी तसेच आपल्या मुला, मुलींना उच्च शिक्षण देवून सनदी अधिकारी घडवावेत, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यस्तरीय महिला लाभार्थी सन्मान सोहळा पुण्यातील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या योजनेंतर्गत जिल्हास्तरीय सोहळा मार्केट यार्ड जवळील रामकृष्ण हॉलमध्ये हा सोहळा दूरदृश्य पद्धतीने पार पडला. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना अभिनंदन प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लाभार्थी महिलांनी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांना राख्या बांधून या योजने प्रति असणाऱ्या कृतज्ञता भावना व्यक्त केल्या.

यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मान्यवर तसेच लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गेल्या दोन दिवसांपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत. त्यांच्या संसाराला ही छोटीशी मदत आहे. अद्याप आधार लिंकींग न झालेल्या आपले आधार कार्ड लिंक करुन घ्यावे. ही योजना बंद होणार नसून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचा लाभही आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी खात्यात जमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शासनाच्यावतीने महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, गौरी गणपती सणामध्ये आनंदाचा शिधा, महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी तसेच सामुदायिक विवाह नोंदणीसाठी अनुदान, वर्षातून तीन सिलेंडर मोफत, महिला बचत गटांसाठी अनुदानात वाढ,  व्यवसाय करण्यास इच्छुक महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना अशा बऱ्याच योजना महिलांसाठी सुरु केल्या आहेत. शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असून या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन  सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, जिल्ह्यातील 7 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणेच रक्षाबंधनाआधीच ओवाळणी म्हणून प्रत्येक महिलेच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे. शासन महिलांच्या पाठीशी असून ही योजना निश्चितच सुरु राहणार असून या योजने पासून कोणीही वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व लाभार्थी महिलांचे स्वागत केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून ही योजना राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, सीआरपी, बचत गटाच्या महिला, ग्राम स्तरावरील यंत्रणेने खूप कष्ट घेतले आहेत. तसेच लाभार्थी महिलांनीही स्वतः नोंदणी केल्यामुळे यात आपला जिल्हा आघाडीवर होता. जिल्ह्यात 6 लाख 92 हजार 513 अर्ज मंजूर झाले असून बॅंकांमध्ये महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे, सर्व लाभार्थी महिला व नोंदणी होण्यासाठी काम केलेल्या यंत्रणेचे त्‍यांनी यावेळी आभार मानले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक बहीण माझी बहीण असा विचार करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी या योजनेची रक्कम आमच्या खात्यावर जमा झाली आहे. रक्षाबंधनाआधीच खात्यावर पैसे आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय.. भावानं जशी आम्हा बहिणींची आठवण ठेवली  तशीच आम्ही बहिणीही इथून पुढे साहेबांची आठवण ठेवणार.. , असा विश्वास या सोहळ्यात उपस्थित कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी व्यक्त केला.

०००

 

स्वप्नील कुसाळेच्या स्वागत समारंभाचे व्यवस्थित नियोजन करा -पालकमंत्री हसन मुश्रीफ

  • ऑलिम्‍पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची बुधवारी कोल्हापुरात भव्य मिरवणूक
  • प्रशासनाच्या वतीने दसरा चौकात होणार जंगी सत्कार
  • कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा येथून सकाळी नऊ वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ
  • कावळा नाका – महालक्ष्मी चेंबर -दाभोळकर कॉर्नर -व्हिनस कॉर्नर- दसरा चौक मार्गे निघणार मिरवणूक

कोल्हापूर दि.१७ (जिमाका): ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणारा कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर स्वप्नील कुसाळे पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वप्नील कुसाळे याची बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता स्वागत मिरवणूक व दसरा चौकात सत्कार  समारंभ होणार आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा ते दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीनंतर दसरा चौकात सन्मानपत्र देवून भव्य सत्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची रुपरेषा ठरवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत (दूरदृश्यप्रणालीद्वारे) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत तासगावकर, आमदार राजेश पाटील आदी मान्यवर बैठकीमध्ये ऑनलाईन सहभागी झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी अरुण पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की,कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळे याचे सुपुत्राचे जंगी स्वागत व्हायला हवे. मिरवणूक मार्ग तसेच सत्कार समारंभाचे प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करा. ही मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करा. तसेच आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवा. एलईडी स्क्रीन, फ्लेक्स, कमानी, मिरवणुकीचा रोड मॅप आदी सर्व विषयांबाबतचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जिल्ह्याचे नाव लौकीक करणाऱ्या स्वप्नील कुसाळे याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा येथून मिरवणुकीस सुरुवात होईल. यानंतर पुढे दाभोळकर कॉर्नर ते रेल्वे स्टेशन मार्गे दसरा चौकात मिरवणूक येऊन या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होईल. दसरा चौकात भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणूक व सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेल्या नियोजनातील  सर्व बाबींची माहिती त्यांनी दिली.

स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणूक प्रसंगी प्रमुख तीन चौकात हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करावी. स्वप्नील कुसाळे यांना बक्षीस जाहीर केलेल्या क्रीडाप्रेमी नागरिकांना त्याचा सत्कार करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या.

स्वप्नील कुसाळे यांचा सत्कार करावयाचा असणाऱ्या संस्था संघटना आणि नागरिकांनी करवीर  तहसील कार्यालयात सोमवार  19 ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गौरव सोहळा झाल्यानंतर शिवाजी पुतळा येथे अभिवादन, आंतरराष्ट्रीय कीर्ती स्तंभ भवानी मंडप येथे अभिवादन, यानंतर श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वप्नील कुसाळे कांबळवाडी कडे प्रयाण करेल, अशी माहिती क्रीडा विभागाने दिली.

०००

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ शासनाची महत्त्वाकांक्षी योजना – मंत्री दीपक केसरकर

  • योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण
  • नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा 
  • रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई, दि. १७:  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही योजना जाहीर केली. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास मुंबई शहर, उपनगर आणि मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे केसरकर बोलत होते.

या समारंभास मुंबई उपनगर चे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच आमदार यामिनी जाधव, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, तसेच मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेश क्षीरसागर, मुंबई उपनगर महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी शोभा शेलार, भायखळा समितीचे अध्यक्ष अतुल शहा, शिवडी समिती अध्यक्ष आशा मामेडी, उपजिल्हाधिकारी श्री. सुरवसे,  तहसीलदार दीपाली गवळी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, एकात्मिक बाल विकास योजनेचे उपायुक्त विजय सागर, मुंबई उपनगरचे नोडल अधिकारी अबुल चौधरी, मुंबई शहरचे नोडल अधिकारी  शशिकांत चौहान, तसेच जिल्हा  बाल विकास विभागातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, या सरकारने सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या माता-भगिनीसाठी दिवसरात्र काम करुन ही योजना त्यांच्यापर्यंत पोहचवली, त्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्वांचा सकारात्मक सहभाग राहिल्यामुळे ही योजना कमी वेळेत राबविता आली. महिला जर सक्षम असेल तर संपूर्ण कुटूंब सक्षम होते. यामध्ये महिलांना मिळणाऱ्या रकमेला महत्व नसून तिच्याप्रती कुटुंबप्रमुख म्हणून व्यक्त केलेली भावना महत्त्वाची आहे. यामुळे महिलांचा आत्मसन्मान वाढीस लागणार आहे, तसेच कुटुंबाचे उत्पन्नही वाढीस लागण्यास हातभार मिळणार आहे. या योजनेचा समाजातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा.

नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमाद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे. सर्वासाठी स्वयंरोजगार आणि रोजगार  मिळावा यासाठी  हे सरकार काम करत आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी  कौशल्या विभागाने एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. त्याद्वारे नोंदणी करून आपल्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती देता येणार आहे. यामध्ये आपला माल कसा तयार करायचा, कुठे विकायचा याचे प्रशिक्षण या ॲपद्वारे देण्यात येणार आहे.

यावेळी मुंबई शहर आणि उपनगरमधील लाभार्थी महिलांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुंबई उपनगर महिला व बालविकास अधिकारी, शरद कुऱ्हाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वाती गवाणकर यांनी केले. मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी,  शोभा शेलार यांनी आभार मानले

०००

 

 

 

 

 

 

शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तर भारतीय संघातर्फे रक्षाबंधनानिमित्त स्त्रीशक्ती सन्मानसोहळा

मुंबई दि.१७ : शासनाने ज्या ज्या योजना जाहीर केल्या त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे.आजच पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत एक कोटी पेक्षा अधिक बहिणीच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .

उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित रक्षाबंधन निमित्त स्त्रीशक्ती सन्मान सोहळा आणि पाच हजार बहीणींना साड्या भेट देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, उत्तर भारतीय संघाचे संतोष आरएन सिंह, उत्तर भारतीय संघाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

उत्तर भारतीय संघाचे सामाजिक क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. सरकार नेहमीच तुमच्या सोबत राहील. अयोध्या हे सर्वांसाठी पवित्र स्थळ आहे. तेथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. उतर भारतीय संघाने महिला भगिनींसाठी चांगला उपक्रम आयोजित केला आहे. तसेच येथील महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर ३१ ऑगस्टपर्यंत भरावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर भारतीय महिला, भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या. महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.

०००

कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

नाशिक, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

नाशिक जिल्ह्यात दि. १६ ऑगस्ट रोजी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (शहर) संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली.

जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने समन्वयाने जिल्ह्यात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती संयमाने व संवेदनशीलतेने हाताळल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, 16 ऑगस्ट रोजी नाशिक शहर येथे उद्भवलेल्या परिस्थितीवर नाशिक शहर पोलिसांनी वेळीच कार्यवाही करून शांतता प्रस्थापित केली आहे. परिस्थिती शांत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यानी यावेळी केले. तसेच, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी परिस्थितीवर सतर्कतेने नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट केली. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी तणावपूर्ण परिस्थिती वेळेत हाताळलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

०००

जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ

पुणे दि.१७: जवाहरलाल नेहरु विद्यापीठात माय मराठीच्या जागरासाठी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषेचे अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली येथे ७० वर्षानंतर होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांनी मिळून यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर, मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, माजी मंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूत भेट देण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिल्लीत साहित्य संमेलन होणे ही महाराष्ट्र, मराठी साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानाची बाब आहे. अशा संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे मोठेपण जगभरातील नागरिकांना कळायला हवे. साहित्यिकांचे समाजासाठी मोठे योगदान आहे, जीवनाचा अर्थ त्यांच्यामुळे कळतो, नवी पिढी घडविताना समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य साहित्यिक करतात. म्हणून अशा साहित्य संमेलनाचा समाज जागरणासाठी उपयोग होतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  देशाच्या राजधानीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या आयोजनाला विद्येच्या माहेरघरातून सुरूवात होत आहे. मराठी संस्कृतीच्या राजधानीपासून सत्तेच्या राजधानीपर्यंत मायमराठीचा डंका वाजतो आहे. संमेलनाच्या तयारीची सुरूवात चांगली झाली असून या संमेलनाला काही कमतरता भासणार नाही. जगातल्या १२ कोटी मराठी नागरिकांना जोडणारे हे संमेलन आहे. परदेशातही मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. प्रत्येक मराठी माणसांचा अभिमान असणारा हा भाषेचा उत्सव ७० वर्षानंतर दिल्लीत होत आहे.

संत नामदेवांनी भक्तीमार्गाने मराठीचा झेंडा पंजाबपर्यंत नेला होता. मराठी राज्यकर्त्यांनी देशभर पराक्रम गाजविला. मराठी माणसे जेथे गेली तिथे त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती रुजविण्याचे कार्य केले. इंदोर, ग्वाल्हेर, हैदराबाद, तंजावर आदी भागात मराठी संस्कृती रुजलेली दिसते. सरहद संस्थेच्या माध्यमातून राज्याची सरहद्द ओलांडून मायमराठी राष्ट्रीय पातळीवर जात आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दिल्लीसह उत्तर भारतात राहणाऱ्या मराठी भाषिकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी शासन संस्थेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येत आहे. विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. इतर योजनांसोबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा आपला अभिमान असल्याने त्यासाठी आवश्यक सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन ते प्रामाणिकपणे पार पाडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्र्यांनी सरहद संस्थेतर्फे जम्मू काश्मिरमध्ये करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा महाराष्ट्रात एकमताने मंजूर झाला. गेल्या दोन वर्षात ज्या शाळेमध्ये मराठी शिक्षक नसल्याने मराठी शिकवले जात नव्हते त्या शाळांमध्ये मुलांना मराठीचे अध्ययन करता यावे, यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. दुकानाच्या पाट्या मराठी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी साहित्य परिषद म्हणजे मराठी भाषा भवनच आहे. भारतातील मराठी प्रेमींना जोडून घेण्यासाठी सरहदचे कार्य मोलाचे आहे. त्यामुळे दिल्लीतील हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या स्थळ निवडीबाबत प्रक्रिया सांगून संमेलनाचा निधी ५० लाखाहून वाढवून २ कोटी केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. संजय नहार यांनी सरहद संस्थेच्या कार्याची माहिती देऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाला माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या हस्ते डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन

0
रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचारासाठी होईल मदत चंद्रपूर, दि. 10 जून : जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. अशोक...

पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्नशील – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

0
सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : पर्यावरणातील बदलामुळे व मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टी एकावेळी झाल्यामुळे 2019, 2021 मध्ये सांगली, कोल्हापूरमध्ये हजारो कोटींचे नुकसान सहन...

वरळी येथील शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. १० : मुंबई शहर जिल्ह्यात सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत वरळी येथील  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह व संत...

पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करा –  विधानपरिषदेचे...

0
मुंबई, दि. 10 :-  पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सन-2018 मध्ये 24x7 योजना आणून देखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत...

पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस

0
मुंबई, दि. १० : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि...