मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 477

मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी

मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन 

मुंबई,दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव न नोंदविलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी  संजय यादव यांनी केले आहे.

विशेष मोहिमेत  दि. 20 ऑगस्ट पर्यत नागरिकांनी मतदार नोंदणी करावी

दि. 1 जुलै 2024  या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (2) मुंबई शहर  जिल्ह्यातील  विधानसभा मतदारसंघात  विशेष मोहीमेव्दारे राबविण्यात  येत आहे. प्रारूप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील देखील अचूक असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे.

दि. 1 जुलै 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादी मध्ये नाहीत अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक 6 भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत.तसेच मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित यांची नाव वगळणी करिता नमुना -7,  पत्ता बदल करण्याकरिता नमुना 8 भरावा हे अर्ज आपल्या घराजवळील मतदार नोंदणी  अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात उपलब्ध आहेत.  त्याच कार्यालयात अर्ज भरून जमा करायचे आहेत.

तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, आणि अधिक माहितीसाठी  हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.असेही जिल्हाधिकारी संजय  यादव यांनी सांगितले.

ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि.१८ – आज ओबीसींसाठी वसतिगृह स्थापन होत आहेत. पण पूर्वी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी चर्चा झाली. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असायला हवे, यावर शिक्कामोर्तब झाले. फाईल स्वाक्षरीसाठी माझ्याकडे आली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता स्वाक्षरी केली. आणि ९ मार्च २०१७ ला महाराष्ट्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले. ओबीसींच्या कल्याणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहांचे उद्घाटन  श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दीड ते दोन वर्षांत अतिशय सुंदर ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वसतिगृह तयार होतील. नाशिकच्या धरतीवर डिझाईन तयार केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, सहायक आयुक्त आशा कवाडे, अॅड. पुरुषोत्तम सातपुते, राहुल पावडे, अरुण तिखे, विलास माथनकर, प्रा. अनिल डहाके, गोमती पाचभाई, डॉ. मंगेश गुलवाडे, रमेश राजूरकर, संदीप आवारी, पुरुषोत्तम सहारे, सुर्यकांत खनके, उमेश कोराम, सुभाष कासमगोट्टुवार, अजय सरकार, सविता कांबळे, श्रुती गवारे, शिला चव्हाण, शितल गुरनुले, वनिता डुकरे यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणणे, अफजलखानाच्या कबरीचे अतीक्रमण हटवणे किंवा भवानी मातेसाठी रत्नजडीत छत्र उभे करणे असेल, मला ही कामे करता आली, हे माझं भाग्य आहे. रायगडावर आता दरवर्षी राज्य सरकारच्याच वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव बदलण्याची इच्छा वारंवार मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून छत्रपती संभाजीनगर असे नाव केले. त्यात माझाही खारीचा वाटा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये लंडन येथे ज्या घरी शिक्षणासाठी मुक्कामाला होते, त्या घराला स्मारक करण्याची संकल्पना पुढे आली. त्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे भाग्य देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मलाही लाभले, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असा प्रयत्न आहे. मी १६ मार्च १९९५ मध्ये आमदार झाल्याबरोबर पहिली घोषणा वाचनालयाची केली होती. आज चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा येथील दिड हजार विद्यार्थी वाचनालयाचा लाभ घेत आहेत. स्व. बाबा आमटे यांच्या सेवाकार्याची दखल म्हणून शासनातर्फे डाक तिकीट प्रकाशित केले. पण त्यांच्या स्मृती जपण्यासाठी उत्तम अभ्यासिका आवश्यक आहे असे मला वाटले. आज स्व. बाबा आमटे अभ्यासिका अनेक विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत आहे. महाराष्ट्राचा आयपीएस-आयएएसचा टक्का वाढला पाहिजे, असे मला सातत्याने वाटायचे. मी याकडे सभागृहात लक्ष वेधले. त्यानंतर ठराव झाला आणि समिती तयार झाली. आता महाराष्ट्राचा टक्का वाढला. ट्रेनिंग सेंटर अत्याधुनिक झाले. अधिकाऱ्यांची संख्या वाढवली, हे सांगतानाच  श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात ३०० ओबीसी विद्यार्थ्यांना आणि ३०० ओबीसी विद्यार्थिनींना आधार योजना देण्याचा निर्णय केल्याची माहितीही दिली.

त्यांना तुरुंगात टाकू

व्यावसायिक शिक्षण घ्यायचे असेल तर ५० टक्के शुल्क सवलत होती. आता ओबीसी मुलींना १०० टक्के शुल्क सवलत केली. इडब्ल्यूएसमध्ये देखील १०० टक्के सवलत केली आहे. काही व्यवस्थापनांनी यात खोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा संस्थांच्या प्रमुखांना तुरुंगात टाकले पाहिजे. कारण ते राज्याच्या योजना बदनाम करत आहेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

आर्थिक स्थिती बळकट

बहिणींना विश्वासाने सांगितले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्याच्या तिजोरीवर या योजनेचा मुळीच भार नाही. मी अर्थमंत्री असताना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राज्याचा महसूल ११ हजार ९७५ कोटी रुपयांनी सरप्लस केला होता. आपली आर्थिक स्थिती बळकट आहे. आपण शेवटच्या व्यक्तीच्या प्रगतीसाठी काम करण्याचा उद्देश पुढे ठेवला आहे. कुणीही वंचित राहू नये असा आपला प्रयत्न आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूरच्या शैक्षणिक प्रगतीसाठी

चंद्रपूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात वेगाने पुढे जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. चंद्रपूर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये रतन टाटांकडून २६३ कोटी रुपये आणले आहेत. अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत अशी व्यवस्था असेल. एसएनडीटी विद्यापीठ परिसर तयार होत आहे. यात सर्व जातींच्या हजारो मुलींसाठी ६२ अभ्यासक्रम आणले आहेत. चंद्रपूरमधील मुलं देखील व्यावसायिक पायलटचं प्रशिक्षण घेऊ शकतील. मोरवा एअरपोर्टमध्ये फ्लाईंग क्लब लवकरच सुरू होणार आहे. ओबीसी, आदिवासी मुलामुलींना त्याचा लाभ मिळणार आहे, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

श्रुती गवारे विध्यार्थिंनीने मानले आभार

श्रुती गव्हारे विध्यार्थिंनीने आपले मनोगत व्यक्त करीत एक सुंदर कविता सादर केली. ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरु केल्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांचे कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले.

प्रो गोविंदाच्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १८ : – प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून १०० वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पूर्वेश सरनाईक आदींसह स्पर्धांचे आयोजक, संघ मालक, गोविंदा पथक उपस्थित होते.

खेळामध्ये स्पर्धा असली पाहिजे, पण ती जीवघेणी नसावी. त्यामुळे यंदा  आपण सर्वांनी अपघातमुक्त गोविंदा उत्सव साजरा करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ सुरू आहे. या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारामध्ये करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक गोविंदा उपस्थित आहेत. या गोविंदांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यंदाच्या वर्षी ७५ हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. भविष्यात हा खेळ ऑलिंपिकमध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा आपण ६० गोविंदांना स्पेनला पाठवतो आहोत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळेच आपण ऑलिंपिकमध्ये ६ पदक जिंकली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याचाही समावेश असल्याचा अभिमान आहे.

शासन युवक आणि युवतींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता लाडकी बहीण प्रमाणेच लाडका भाऊ योजना आणली आहे. कौशल्य विकासच्या माध्यमातून युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थींना मानधन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

या स्पर्धांमध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी १६ संघांनी आजच्या अंतिम फेरीत आपले कौशल्य सादर केले. यंदाच्या वर्षी सातारा सिंघम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

परळीत २१ ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव

कृषी, पशु प्रदर्शनासह शेतकरी उपयोगी अनेक उपक्रमांचे आयोजन – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 18 – राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध, विविध आधुनिक उपकरणे खरेदी करता यावे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती मिळावी या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या हस्ते होणार आहे.

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्र सामुग्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, नवनवीन संशोधन, चर्चासत्रे तसेच विविध उत्पादने, पशूंच्या विविध प्रजाती यांसह अनेक कृषी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्याकडून तयारीचा आढावा व पाहणी

मंत्री श्री. मुंडे यांनी  परळी येथील शासकीय विश्रामगृहात  कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, कृषी विभागाचे सह संचालक श्री. दिवेकर, श्री. मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे  , तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह कृषी, महसूल पोलीस अधिकारी उपस्थित होते.

परळी शहरातील बाजार समिती मैदानावर सुरु असलेल्या  कृषी महोत्सवाच्या तयारीची  मंत्री श्री. मुंडे यांनी पाहणी केली.  मुख्य कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेले शेकडो स्टॉल्स, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा आदी सर्व बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन चोखपणे करण्याचे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी  दिले .

मंत्री आदिती तटकरे यांना धाकटी बहीण म्हणून विभागातील महिलांनी बांधली आपुलकीची राखी

मुंबई, दि.18 : महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना राज्यात  प्रभावी राबविण्यात येत आहे.  महिला व बालविकास विभागातील महिलांनी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना धाकटी बहीण म्हणून आपुलकीची राखी बांधून अभिनंदन केले.

यावेळी मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, ही योजना लाडक्या बहिणींसाठी मला महिला व बाल विकास मंत्री म्हणून राबविण्याची संधी मिळाली याचा मला विशेष आनंद आहे. राज्यातील लहान, मोठ्या सर्व बहिणींसाठी त्यांच्या हक्काचा लाभ देता आला. एक महिला म्हणून मला अभिमान आणि आनंद आहे, असेही मंत्री  कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सौर ग्राम’ प्रकल्पाचे लोकार्पण; मान्याचीवाडी (ता.पाटण) राज्यातील पहिले सौरग्राम

सातारा, दि. १८: राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीजग्राहकांचे वीज बिलदेखील शून्यवत होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मान्याचीवाडी गावामध्ये ‘महावितरण’च्या वतीने १०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले ‘सौर ग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. वीजक्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मान्याचीवाडीचे सरपंच  रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प)  प्रसाद रेशमे उपस्थित होते.

मुख्यमंत्री  श्री. शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो. सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य होत आहे. तसेच राज्य शासनाने मागेल त्यांना सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के रक्कम तर अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप व सौर पॅनेल्स मिळणार आहे. उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री.  शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध होत आहे. तर येत्या दीड वर्षांमध्ये राज्यात सौर ऊर्जेद्वारे १२ हजार मेगावॅट वीजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही. राज्याने सौर ऊर्जेमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले सौर ग्राम म्हणून मान्याचीवाडीचे आज लोकार्पण झाले याचा आनंद आहे. या गावात पूर्वी ५ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल येत होते. ते सौर ग्राममुळे शून्य झाले आहे. आता राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यासाठी गावांची निवड झाल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे,  महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, पुणे प्रादेशिक संचालक  भुजंग खंदारे, मुख्य अभियंता  अंकुश नाळे यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन

सातारा, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी नवीन शासकीय विश्रामगृह सर्व सोयीसुविधांसह सज्ज ठेवावे, असे निर्देश दिले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नवीन विश्रामगृहाच्या इमारतीची पाहणी केली.  ते म्हणाले, सातारा शहरातील सदर बाजार येथे ही एक देखणी वास्तू निर्माण झाली आहे. या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि इमारतीची देखभाल योग्य करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

असे आहे नवीन शासकीय विश्रामगृह…

सातारा येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले असून या ठिकाणी नवीन विश्रामगृह बांधण्यात आले आहे. यासाठी १३ कोटी १२ लाख ७६ हजार १९४ रुपये खर्च आला. यामध्ये मल्टीपर्पज हॉल, साधारण कक्ष-५, डायनिंग व किचन, स्वागत व प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, पैंट्री, स्टोअर रुम, व्हीव्हीआयपी सुट-१ व्हीआयपी सुट २ कॉन्फरन्स रुम व स्टोअर रुमसह आकर्षक विद्युत रचना, प्रोजेक्टर, ऑडियो व्हिडिओ सिस्टीम, अद्ययावत फर्निचर, सर्व रुममध्ये टेलिव्हिजन आदी सुविधा उपलब्ध आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राखी बांधत लाडक्या बहिणींकडून कृतज्ञता व्यक्त

सातारा दि.18 (जिमाका):  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाले का? या योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे द्यायचे नाहीत.  हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. तुम्हाला आता हक्काचे भाऊ भेटले आहेत आणि आम्हाला हक्काच्या बहिणी भेटल्या आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित भगिनींशी संवाद साधला.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता.  दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतून महिला मोठ्या प्रमाणावर सैनिक स्कूलच्या मैदानाच्या दिशेने येत होत्या. यावेळी जवळपास 50 हजारांच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आपल्या बहिणींशी मुख्यमंत्री संवाद साधत त्यांनी तुमच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का?,  या पैशाचा उपयोग कसा करणार आहात? असे प्रश्न विचारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उत्स्फूर्त संवाद साधला.

यावर अनेक महिलांनी शिलाई मशीन घेणार आहोत,  मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरणार आहोत. आमच्या मुलांना शिकवून मोठे करणार आहोत, असे सांगून  कृतज्ञता व्यक्त केली.  लाडक्या बहिणींनी लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या बांधून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

यावेळी एका बहिणीने ज्या महिलांचे कधी खातेसुद्धा उघडले गेले नव्हते, अशा लाखो महिलांची खाती या योजनेमुळे बँकेत उघडली गेली आहेत, एवढेच नव्हे तर त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत. याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांना सलाम करते अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पन्नास हजारांच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिलांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मोबाईलचे टॉर्च दाखवून अभिवादन केले. याला तितक्याच उत्स्फूर्तपणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रतिसाद दिला. आगमनप्रसंगी महिलांनी फुलांची उधळण करत आपल्या लाडक्या भाऊरायांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या घरी परत जात असताना सुखरुप व सुरक्षित जा, आपल्या संपूर्ण परिवारासोबत राखी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करा अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिल्या.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

सातारा दि.18 (जिमाका):   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.  या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महिला जोपर्यंत सशक्त होत नाहीत, तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे चांगले कळते.  या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील.  राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही. दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढत जाऊन टप्प्याटप्प्याने 3 हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी मुख्यमंत्री भावनिक होत म्हणाले, माझी ताई कष्ट करते, शेतात राबते याची आम्हाला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.  शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.  महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे.  ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे.  लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना,  मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे.  विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

यावेळी त्यांनी 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करुया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया, असे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम करुन मुख्य प्रवाहात व अर्थकारणात आणावे लागेल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात.  त्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात शासन महिलाकेंद्रित योजना राबवित आहे.  एसटीच्या प्रवास भाडे शुल्कात महिलांना 50 टक्के सूट यासारख्या योजनेमुळे तोट्यात असलेले एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना याबरोबरच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना शासन राबवित आहे. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.  लवकरच आणखी 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

शेतकऱ्यांचे पुढील पाच वर्षाचे वीज बिल शासन भरणार आहे.  12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करत असून येत्या काळात 12 महिने दिवसा वीज देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यासाठी आदर्शवत ठरणारे उपक्रम राबविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे. पहिले पुस्तकाचे गाव सातारा जिल्ह्यातले, पहिले मधाचे गाव सातारा जिल्ह्यातले, आता पहिले सौर उर्जेचे गाव मान्याचीवाडी होत आहे.  या गावाला त्यामुळे मोफत वीज मिळणार आहे. मान्याचीवाडीप्रमाणे राज्यातील अन्य गावांनीही त्यांचा आदर्श घेऊन गावे सौर उर्जेवर चालणारी करावीत. यावेळी त्यांनी सातारा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात उपायोजनांबाबत कौतुक केले. भरोसा केंद्राचे भूमिपूजन, ऑटोरिक्षामध्ये क्यूआर कोड प्रणाली, बसेसमध्ये कॅमेरे, महिलांसाठी हेल्पलाईन या सर्व उपक्रमांबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन केले.

महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजारापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वांत जास्त ऑनलाईन नोंदणी गतिमान पद्धतीने झाली आहे. 90 टक्क्यांपेक्षा अधिक बहिणींना लाभ वितरित झाला आहे. ज्यांचे आधार लिंकिंग झाले नाहीत त्यांचे आधार लिकिंग करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होतील. या योजनेत अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

प्रास्ताविकात पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सातारा जिल्ह्यात 1 जुलैपासून सुरु झाले. पहिल्या पाच दिवसात बहुतांश सर्व अर्ज भरले गेले.  घरोघरी, शेतावर, बांधावर, कामाच्या ठिकाणी जाऊन महिलांकडून अर्ज भरुन घेण्याची संकल्पना प्रथम सातारा जिल्ह्याने सुरु केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी स्वत: लक्ष घालून या योजनेच्या कामाला अतिशय गती दिली.  अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर या सर्वांनीच यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. बहुतांश महिलांच्या खात्यावर योजनेचे दोन हप्ते जमा झाले आहेत. या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी समाधानी झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण गोड करण्याचे काम शासनाने केले आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  या कार्यक्रमास जिल्ह्याच्या विविध भागातून पन्नास हजारहून अधिक महिला उपस्थित होत्या.

विणकरांना शासकीय नोंदणीतून मिळणार नवीन ओळख व योजनांचा लाभ – मंत्री छगन भुजबळ

येवल्यात विणकर सर्वेक्षणास सुरुवात 

नाशिक, दिनांक : 18 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा):    येवला शहरात  विणकर सर्वेक्षणास सुरुवात झाली असून या सर्वेक्षणातून विणकरांची शासकीय नोंदणीद्वारे ओळखपत्र प्राप्त होणार  असून याद्वारे  सर्व घटकांतील विणकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. हे सर्वेक्षण करताना यातून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

आज येवला शहरात विणकर सर्वेक्षणबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यावेळी राजेश भांडगे, पप्पू सस्कर, मनोज दिवटे, शंभाशेठ लक्कडकोट, मयूर मेघराज, मकरंद सोनवणे, प्रवीण पहिलवान, अविनाश कुक्कर, केशव भांडगे, रमेश भावसार, गोविंदसा वाडेकर यांच्यासह विणकर बांधव उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, राज्यात शेती व्यवसायानंतर विणकर व्यवसाय हा दुसऱ्या स्थानावर आहे. येवल्यातील विणकरांच्या सर्वेक्षणास  ८ ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणातून सर्व विणकर बांधवांची नोंदणी होणार असून  शासकीय ओळखपत्र मिळणार आहे. आजपर्यत तालुक्यातील ३० ते ४० गावांतून जवळपास ३ हजार विणकरांची नोंदणी सर्वेक्षणातून झाली आहे. आजपासून येवला शहरातील विणकारांच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.सुरुवातीला एका पथकाच्या मार्फत नोंदणी चालू होती मात्र गणेशोत्सवाच्या आत नोंदणी होऊन विणकारांना लाभ मिळावा यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तांसोबत संपर्क साधून पाच पथकांमार्फत हे सर्वेक्षणाचे काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

येवल्यातील अनेक विणकर बांधवांकडे केंद्र शासनाचे ओळखपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी विणकर बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांची नोंदणी होऊन त्यांना ओळखपत्र मिळण्यासाठी राज्याचे वस्त्रउद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचेसोबत चर्चा केली होती तर वस्त्रउद्योग आयुक्तांना येवल्यातील विणकरांची नोंदणी आणि ओळखपत्राबाबत सूचना केल्या होत्या.त्यानुसार विणकर बांधवांच्या सर्वेक्षणासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

या सर्वेक्षणात विणकाम व्यतिरिक्त पैठणी साडी तयार करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करतात त्यात रेशीम कळ्या उखलन्याचे काम करणारे कारागीर,कांड्या, काकडे भरणारे, चिवट्या करणारे, सांधणी करणारे, रंगणी करणारे व त्या कामात मदत करणारे कारागीर या सर्वांची नोंदणी होऊन त्यांना देखील विणकर ओळख मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाकडे सुरू करण्यात आलेले विणकर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या विणकर बांधवांना शासकीय ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर विणकर बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २०० युनिट पर्यंत मोफत वीज, उत्सव भत्ता, रेशीम खरेदीवर १५ टक्के राज्य सरकार व १५ टक्के केंद्र सरकारकडून सूट यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.

लाडक्या बहिणींनी मंत्री छगन भुजबळ यांना बांधल्या राख्या

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा पहिले  दोन महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून येवला मतदारसंघांतील सुमारे ५३ हजार महिलांना लाभ मिळाला आहे. आज येवला दौऱ्यावर असताना विणकर सर्वेक्षण कार्यक्रम प्रसंगी महिलांनी मंत्री छगन भुजबळ यांना राखी बांधत आभार मानले.

ताज्या बातम्या

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके

0
नवी दिल्ली, दि. १३ :  खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये मुंबईच्या परिना राहुल मदान पोटरा हिने 3 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावून आपली क्षमता...

बालविवाह रोखण्यासाठी बालिका पंचायत सुरू करा – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १३ : स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्या समुहात बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. मजूर आणि कामगारांच्या बालकांना त्याच ठिकाणी...