शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 449

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी पदाचा निकाल जाहीर

मुंबई, दि. 05: महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील 283 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी बीएएमएस शैक्षणिक पात्रता प्राप्त  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.  याबाबत 31 जानेवारी 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून 283 उमेदवारांना ऑनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहेत.

या भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे अनुषंगाने बीएएमएस च्या 283 पदांसाठी एकूण 22981 अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले. पदभरतीला उमेदवारांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे उमेदवारांची निवड करण्यासाठी आयबीपीएस संस्थेमार्फत दि. 05 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली. सदर परिक्षेसाठी 18715 उमेदवार उपस्थित होते. ऑनलाईन परिक्षेचा 05 ऑक्टोंबर 2024रोजी निकाल जाहिर केला असुन निवड केलेल्या 283 उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत.

सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली.

जाहिरातीनुसार महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदावर निवडीसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते.  सदरचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि.01 फेब्रुवारी 2024  ते दि. 18  फेब्रुवारी 2024 पर्यंत देण्यात आलेली होती. या पदभरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ मेट्रो ३ च्या पहिल्‍या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई दि. 5:  कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन 3, या मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या च्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईच्या वाहतुकीला गती देणाऱ्या मेट्रो 3 च्या पहिला टप्प्याचे लोकार्पण झाले.तसेच मुंबई व ठाणे परिसरातील 32 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी बांद्रा-कुर्ला संकुल येथील मेट्रो स्टेशन येथे पहिल्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांनी बीकेसी ते सांताक्रुज असा मेट्रो प्रवास केला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी प्रवासादरम्यान मेट्रोमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी भगिनी आणि विद्यार्थी, मजूर यांच्याशी संवाद साधला.

यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो कनेक्ट- 3 या मेट्रो सेवेच्या ‘मोबाइल ॲप’चे ही लोकार्पण करण्यात आले. हे ॲप नवीन वैशिष्ट्यांसह प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी उपयुक्त असणार आहे. याचबरोबर मेट्रो 3 प्रकल्पावर आधारित ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरणही प्रधानमंत्री श्री. मोदी  हस्ते करण्यात आले. यामध्ये भूमिगत मेट्रो प्रवासाच्या नेत्रदीपक फोटोंचा संग्रह आहे. मेट्रो 3 (आरे- बिकेसी) हा मार्ग रविवार दि.5ऑक्टोबर 2024 रोजीपासून सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

मेट्रो 3 च्या पाहिल्या टप्प्याचे वैशिष्ट

हा प्रकल्प आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला- कॉम्लेक्स असा 12.69किलोमीटरचा आहे. यामध्ये एकूण 10 स्थानके (9 भूमिगत व एक 1 जमीन स्तरावरील स्थानक) असणार आहेत. याचा प्रकल्प खर्च (टप्पा-1)-  ₹14120 कोटी इतका आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार

मुंबई दि. 5 – भाषा ही फक्त बोलण्याचे माध्यम नसून आपली संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्याशी भाषेची जोडलेली नाळ असते. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध होते अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेचा गौरव केला.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यानिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह मान्यवर साहित्यिक आणि कलावंत उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. तर मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी यावेळी पंतप्रधानांना मराठी ग्रंथ भेट स्वरूपात दिले.

प्रधानमंत्री श्री मोदी म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्ण क्षण आहे. मराठीमधील ज्ञानाने अनेकांना  मार्गदर्शन केले आहे हे ज्ञान आजही तेवढेच उपयुक्त आहे असे सांगून महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढवणाऱ्या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा आदींच्या परंपरेला त्यांनी दंडवत केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मान मिळाला हा महाराजांना केलेला मानाचा मुजरा असल्याचे ते म्हणाले. अनेक मराठी क्रांतिकारी लोकांनी जनजागृतीचे काम केले. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले आदींनी स्वराज्य मिळविण्यासाठी मनामनात चेतना निर्माण केली. भारताच्या स्वतंत्रलढ्यात मराठी भाषेचे मोठे योगदान  असल्याचे सांगून मराठी भाषेने न्याय आणि समानता प्रस्थापित करण्यात मोलाचे योगदान दिल्याचे ते म्हणाले.

श्री मोदी म्हणाले, महाराष्ट्रात मराठी भाषेच्या माध्यमातून स्वराज्य, स्वसंस्कृती, स्वचेतनेचा विस्तार झाला आहे. महिला सशक्तीकरण अभियान, महाराष्ट्राचे औद्योगीकरण, कृषी क्षेत्राचा विकास या सर्वांच्या उत्कर्षाचे मूळ ही मराठी भाषा आहे. पोवाडा सारख्या लोकगीतांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज तसेच अनेक थोर पुरुषांची कीर्ती आणि गाथा जगासमोर मांडण्याचे काम आजही सुरू आहे. गणेशोत्सवातून जी भक्ती आपल्याला या भाषेच्या माध्यमातून पाहावयास मिळते ती संपूर्ण देशाला जोडण्याचे काम करते.

मराठी भाषेला हा गौरव मिळवून देण्यासाठी अनेक मोठे साहित्यिक, लेखक, कवी आणि असंख्य मराठी भाषिकांनी मोलाचे योगदान दिले आहे. मराठी साहित्याची परंपरा ही केवळ प्राचीन नाही तर ती बहूआयामी असल्याचे पंतप्रधान श्री मोदी यांनी नमूद केले. मराठी भाषेच्या उत्कर्षात सहभागी असलेल्या सर्व दिग्गज मराठी साहित्यिकांना त्यांनी वंदन केले. मराठी भाषेच्या विकासात मराठी चित्रपटांचे योगदानही मोठे आहे. मराठी रंगभूमीने समाजातील वंचित घटकांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

महाराष्ट्राने मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले असून वैद्यकीय  तसेच अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम देखील मराठी भाषेतून शिकविले जाणार आहेत, याचे पंतप्रधान श्री. मोदी यांनी कौतुक केले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे शिक्षण, संशोधन तसेच रोजगाराच्या क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त करून मराठीला पुढे नेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी 1 मे 1960 नंतर 3 ऑक्टोबर 2024 हा राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक नामदेव कांबळे यांनी मराठी भाषकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करून शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयकरण व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. ज्येष्ठ कलावंत सचिन पिळगावकर यांनी मराठीचा सन्मान हा आईचा सन्मान झाल्यासारखे वाटते अशी भावना व्यक्त करून प्रत्येकाने आपल्या मातृभाषेवर प्रेम करावे, असे सांगितले. तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे मराठी संस्कृती, परंपरा यांना अधिकृत मान्यता मिळाल्याचे सांगून भाषेचा प्रसार आणि विकास करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याची भावना व्यक्त केली.

प्रास्ताविकात मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, ही सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री मोदी यांचे आभार मानले. या गौरवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केल्याचे सांगून राज्य शासन राबवीत असलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. ३ ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषेचा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

आजचा दिवस महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करणारा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकास कामांमुळे मुंबई आणि ठाण्याची ओळख होणार आधुनिक

ठाणे, दि.05 (जिमाका) :- आज महायुती सरकारने मुंबई-एमएमआरमध्ये 33 हजार कोटींहून अधिकचे प्रकल्प सुरू केले आहेत. आज 12 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोची पायाभरणीही झाली आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र, नैना प्रकल्प, छेडानगर ते आनंदनगर असा उन्नत ईस्टर्न फ्री-वे, ठाणे महापालिकेचे नवीन मुख्यालय, अशा अनेक मोठ्या विकासकामांची पायाभरणीही आज करण्यात आली. या विकासकामांमुळे मुंबई आणि ठाण्याची आधुनिक ओळख होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे 33 हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व उद्घाटन तसेच “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो – कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मुंबई मेट्रो मार्गिका – 3 टप्पा-1 (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक) शुभारंभ, ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमीपूजन, पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे प्रकल्पाचे भूमीपूजन, नैना नगर रचना परियोजनांतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमीपूजन, ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार, असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,  महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ, विधानपरिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार गणेश नाईक, संजय केळकर, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, डॉ.बालाजी किणीकर, शांताराम मोरे, महेश चौघुले, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, तसेच आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान श्री.मोदी पुढे म्हणाले की, आज एक मोठी आनंदाची बातमी घेवून महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ज्या परंपरेने देशाला ज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती दिली आहे त्याचा हा सन्मान आहे. त्याबद्दल मी देशातील आणि जगातील सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन करतो.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेबद्दल बोलताना त्यांनी या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना महिना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत, ही योजना महाराष्ट्रात अत्यंत यशस्वी होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले, नवरात्रीच्या काळात एकापाठोपाठ एक अनेक विकास कामांची उद्घाटने आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला मिळत आहे. ठाण्याला पोहोचण्यापूर्वी मी वाशिमला होतो. तेथे मला देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी जाहीर करण्याची आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. आता महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचे अनेक मोठे विक्रम ठाण्यात निर्माण होत आहेत. मुंबई-एमएमआर आणि महाराष्ट्राच्या विकासाचा हा सुपरफास्ट वेग आज महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची झलक देत आहे. आजच आरे ते बीकेसी, मुंबई या ॲक्वा लाइन मेट्रोचेही उद्घाटन होत आहे. अनेक दिवसांपासून मुंबईतील लोक या लाईनची वाट पाहत होते. आज मला जपान सरकारचेही आभार व्यक्त करायचे आहेत. या प्रकल्पासाठी जपानने जपानी आंतरराष्ट्रीय सहकार्य एजन्सीमार्फत भरपूर सहकार्य केले आहे. त्यामुळे एक प्रकारे ही मेट्रो भारत-जपान मैत्रीचेही प्रतीक आहे.

आज प्रत्येक देशवासीयाचे एकच ध्येय आहे – विकसित भारत! त्यामुळे आपल्या सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक संकल्प, प्रत्येक स्वप्न विकसित भारताला समर्पित आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई-ठाण्यासारखी शहरे भविष्यात सज्ज करायची आहेत.

ते म्हणाले की, आज मुंबई महानगरात सुमारे 300 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार होत आहे. आज मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास कोस्टल रोडने 12 मिनिटांत पूर्ण होत आहे. अटल सेतूने दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतरही कमी केले आहे. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भूमिगत बोगद्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. असे अनेक प्रकल्प आहेत. वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतू प्रकल्प, ईस्टर्न फ्रीवे, ठाणे-बोरिवली बोगदा, ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प अशा प्रकल्पांमुळे या शहरांचा चेहरामोहरा बदलत आहे. मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील समस्या कमी होतील. येथे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, येथे उद्योगधंदे वाढतील.

महामार्ग, द्रुतगती मार्ग, रस्ते आणि विमानतळांच्या विकासातही आम्ही विक्रम केला आहे आणि 25 कोटी गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे, असे सांगून आता देशाला खूप पुढे न्यायचे आहे. सर्व मिळून महाराष्ट्राची स्वप्ने पूर्ण करू, या शब्दात सर्व विकास प्रकल्प आणि विकासकामांच्या पूर्णत्वासाठी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पैठणी शाल, महाराष्ट्राची ओळख असलेला पैठणी फेटा तसेच ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची प्रतिकृती व ठाण्याच्या दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा देवून स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदिका मानसी सोनटक्के यांनी केले.

महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंचनापासून ते पायाभूत सुविधापर्यंत, उद्योगापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत, तरुणापासून ते ज्येष्ठांपर्यंत, परदेशी गुंतवणूकीपासून ते झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंत अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,  महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ, विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार गणेश नाईक, संजय केळकर, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, तसेच आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, अमृताहूनही गोड असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत ते म्हणाले, आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे. प्रधानमंत्री श्री.मोदी हे विश्वास, गती आणि प्रगती या तत्त्वावर विश्वास ठेवतात, त्यामुळे आज विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असून आजच्या दिवशी इंटरनल मेट्रो 29 कि.मी. ची सेवा सुरु होणार आहे. ठाण्याची वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणी होत आहे. सध्याच्या फ्री वे ला छेडानगर ते ठाण्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे. ठाणे ते मुंबई प्रवास वेगवान होणार आहे. नवी मुंबई विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. सिडकोच्या नैना प्रकल्पात देखील मोठी पायाभूत सुरु आहे. सिडकोची ही टाऊनशिप मुंबईची शान वाढविणारी ठरणार आहे. प्रधानमंत्री यांच्या हस्ते ज्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन होते, ते सर्व प्रकल्प पूर्ण होतात. आज ज्या प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे, त्या सर्व प्रकल्पांचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मेट्रो 3 चा पहिला टप्पा तसेच इतर विकास प्रकल्प यापूर्वी थांबविण्यात आले होते. त्या सर्व प्रकल्पांना या सरकारने चालना दिलेली आहे. मेट्रो 3 चा बीकेसी ते कुलाबा हा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असून अटल सेतू, कोस्टल रोड असे मोठमोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. आज शुभारंभ झालेल्या मेट्रो 3 च्या माध्यमातून 20 लाख ठाणे व मुंबईकर प्रवास करणार आहेत असे सांगून या प्रकल्पाला अर्थसहाय्य दिलेल्या जपानच्या जायकाचे (Japanese International Co-opreration Agency) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.

माय मराठी भाषेला मोदींजींनी अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा जगभरातील मराठी माणासांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदींचे आभार मानतो. कारण आपल्या माय मराठी भाषेला मोदींजींनी अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. माय मराठीची पूजा मोदींजींच्या हातून झाली आहे.

एमएमआर रिजन मध्ये खूप मोठया प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. सगळ्यात महत्वाचे मुंबईची 40 कि.मी. लांबीची भूमिगत मेट्रो-3 ही आशियातील सर्वात मोठ्या मार्गिकेच्या आज पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदींजींच्या हस्ते होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, ही ग्रीन मेट्रो आहे. पर्यावरणाला साथ देणारी, पर्यावरणाचे संवर्धन करणारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाची मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत.

ठाण्यात अंतर्गत रिंग मेट्रो या कामाचा भूमिपूजन होत आहे. यामुळे ठाण्यातील वाहतूक सुरळीत होणार आहे. लोकांचे जीवन सुकर होणार आहे. सगळ्यात महत्वाचे ईस्टर्न फ्री वे आता थेट ठाण्यापर्यंत येणार आहे. नैना हे अटल सेतू आणि नवीन विमानतळ मधील भाग येथील कामाचा शुभारंभ आणि ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ होत आहे. छत्रपती शिवाजी  महाराजांचे नमन करून आपल्या कार्याची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

१०० दिवसांत सरकारने मोदींच्या नेतृत्त्वात विकासाची सेंच्युरी मारली – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रास्ताविक भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांच्या तिसऱ्या इनिंगची सुरुवात देखील दमदार झाली आहे. दि.18 सप्टेंबर रोजी मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील त्यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत.  या 100 दिवसांत सरकारने मोदींच्या नेतृत्त्वात विकासाची सेंच्युरी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पहिल्या दोन इनिंगमध्ये म्हणजे त्यांच्या पहिल्या दहा वर्षात भारताच्या विकासाचा पाया मजबूत केला आहे. महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात दमदार विकास कामे होत आहेत. मोदींच्या स्वप्नातला भारत घडताना दिसत आहे.

            पहिल्या 100 दिवसांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतले.  त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे वाढवण बंदर त्यासाठी जवळपास पाऊण लाख कोटी रुपयांचा निधी पंतप्रधानांनी दिला आहे. त्याचबरोबर अनेक वर्षापासून प्रत्येक मराठी माणसाची बहुप्रतिक्षित असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहे.  याचा अभिमान मला आणि माझ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आहे, असे बोलून महाराष्ट्रासाठी असा अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल श्री.पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पैठणी शाल, महाराष्ट्राची ओळख असलेला पैठणी फेटा तसेच ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची प्रतिकृती व ठाण्याच्या दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा देवून स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदिका मानसी सोनटक्के यांनी केले.

 

या प्रकल्पांचे झाले भूमीपूजन व उद्घाटन…

महाराष्ट्रासाठी ₹33,000 कोटींच्या वेगवान विकासाची भेट

  • सुमारे 12 लाख प्रवाशांची रोज वाहतूक.
  • आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स 12.69 किमी
  • एकूण 10 स्थानके (7 भूमिगत 1 जमीन स्तरावरील स्थानक)

महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो

  • कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मुंबई मेट्रो मार्गिका – 3 टप्पा-1 (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स स्थानक) शुभारंभ.

मुंबई प्रवासात… वेळ आणि इंधन कपात

  • पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे प्रकल्पाचे भूमिपूजन
  • दक्षिण मुंबई-ठाणे प्रवास वेगवान होणार
  • ठाणे, नवी मुंबई आणि पूर्व उपनगराला दक्षिण मुंबईशी जोडणारा उन्नत मार्ग
  • छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे दरम्यान 13.40 किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग विस्तार

सुनियोजित शहराची उभारणी, आरामदायी जीवनमानाची हमी!

  • नैना नगर रचना परियोजनेंतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन
  • जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाल्याने शहरांचा सुसज्ज विकास
  • प्रथम टप्प्या अंतर्गत 42 चौ. कि.मी. क्षेत्राचा विकास
  • 9 उड्डाणपूल, 12 लहान पूल, 26 पादचारी भुयारी मार्ग, 1 वाहन भुयारी मार्ग आणि एकूण 17.59 कि.मी. लांबीच्या रस्त्याचा समावेश

सक्षम महिला… विचार पहिला

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार
  • महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळाली गती
  • लाभार्थी महिलांना लाभाचे प्रातिनिधिक वितरण
  • आत्तापर्यंत 1.96 कोटी भगिनींना लाभाचे वितरण

प्रशस्त इमारत करेल नागरिकांचे स्वागत

  • ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
  • एकाच इमारतीत सर्व कार्यालय असल्याने नागरिकांना सुविधा मिळणार
  • किल्ल्याच्या स्वरूपात इमारतीची रचना
  • आधुनिक कार्यक्षमतेची 32 मजल्याची प्रशासकीय इमारत व महासभेची 5 मजली इमारत

00000

महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 पुणे, दि. 5 : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी असे निर्देश दिल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. गस्त घालते वेळी सायरनचा वापर करावा. निर्जन स्थळी असलेल्या पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रभावशील प्रकाश झोताची आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी. याबाबतची माहिती सुरक्षितेतेच्या दृष्टीने नागरिकांना होणे गरजेचे आहे. यासाठी पुरेशी प्रसिद्धी द्यावी अशी सूचना पुणे पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. यांचेवर विविध प्रकारे वचक ठेवणे आवश्यक आहे. महिला दक्षता समित्यांच्या बैठकांमधून फलनिष्पती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावी. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येवू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक कक्ष, जात पंचायत निर्मूलन कक्ष, अंध श्रद्धा निर्मूलन कक्ष  तसेच मानवी तस्करी संदर्भातील कक्ष स्थापन होणे आवश्यक आहे.

काही ठिकाणी घरातील व्यक्तिंकडूनच महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. अशा वेळी नातेवाईकांनी पुढे येवून पोलीसांकडे तक्रार देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या तसेच स्कूल बसचे वाहनचालक आणि वाहक यांची चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये गांभीर्यपूर्वक ‘बॅड टच गुड टच’ याची कार्यशाळा आणि मार्गदर्शन व्हावे. शहरात नवीन पोलीस ठाणे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टिने प्रयत्न सूरू आहेत.

पोलीसांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाई संदर्भातील यशकथा प्रसारमाध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. यामुळे समाजातील नागरिकांचा कायद्यावरील विश्वास वाढण्यास मदत होईल. पुणे शहर व परिसरातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी पोलीस विभागाने सदैव तत्पर राहण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत स्वागत

दि. 5:  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी   यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथे भारतीय वायूसेनेच्या विमानाने  दुपारी  3.45 मिनिटांनी आगमन झाले.

त्यांचे स्वागत  राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई शहरचे   पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

तेथून प्रधानमंत्री  यांनी ठाणे येथे पुढील  नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

पारदर्शी व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

सातारा दि.5:   भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे ततोतंत पालन  करुन लोकांचा लोकशाही मुल्यांवरील, निवडणूक प्रक्रीयेवरील विश्वास वृध्दींगत करावा, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. ज्या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा व मतदानाचा टक्का वाढवावा. मतदार यादीतून नावांची वगळणी करत असताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

विधानसभा निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व प्रांतअधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडणूक विषयक तयारीचा विधानसभानिहाय आढावा घेवून प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले,  सातारा जिल्ह्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये गत निवडणूकीतील मतदानाचा टक्का हा राज्याच्या निवडणूक मतदानाच्या टक्क्यापेक्षा कमी आहे.याची कारणे शोधून त्याठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी,यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांची मदत घेण्यात यावी.मतदान केंद्रांवर सर्व पायाभूत सुविधा सुव्यवस्थित राहतील याची खात्री करावी.प्रत्येक पात्र मतदाराला त्याचे मतदान ओळखपत्र मिळेल याबाबत दक्षता घ्यावी.  मतदारयादीतून नावांची वगळणी होत असताना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.  जास्त गर्दी होणा-या मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी बैठक व्यवस्था करावी, यासाठी टोकन पध्दती अंमलात आणावी.  मतदान कक्षामध्ये एकावेळी चार व्यक्तींना प्रवेश द्यावा, व्हीव्हीपॅट व पॉवर पॅक पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील हे कटाक्षाने पहावे.

महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून निवडणूकीमध्ये तपासणी पथकांकडून जप्त करण्यात येणाऱ्या मुद्देमालांची संख्या अत्यंत कमी असते असे सांगून एस चोक्कलिंगम म्हणाले, या निवडणूकीमध्ये एफएसटी, एसएसटी पथकांनी अत्यंत दक्ष राहून कारवाई करावी.  कोणत्याही पध्दतीने पैश्याचे अथवा अन्य बाबींचे प्रलोभन देवून मतदान प्रक्रीयेवर प्रभाव टाकला जाणार नाही याबाबत सर्वोतपरी काळजी घ्यावी, लोकांना पारदर्शी व भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

 कोणत्याही स्थितीत निवडणूक यंत्रसामुग्रीसाठी ताटकळत उभे रहावे लागू नये यासाठी सेक्टर अधिकारी नियुक्त करुन त्यांच्यामार्फत पोलिंग पार्टींना यंत्रसामुग्री देण्यात यावी व त्याच पध्दतीने जमाही करुन घेण्यात यावी.  निवडणूकीसाठी नियुक्त मनुष्यबळांना आवश्यक  प्रशिक्षण देण्यात यावे.

निवडणूक आयोगाला कळविण्यात येणारी विविध प्रकारची माहिती अत्यंत बिनचूक असावी,  तपासणी नाके कार्यरत करावेत.लक्झरी बसेस, खाजगी वाहने यांच्याबरोबरच हेलिकॉप्टर यांचीही काटेकोरपणे तपासणी व्हावी.  प्रचार कालावधीमध्ये सामाजिक सौदार्ह बिघडवणारी वक्तव्ये झाल्यास त्वरीत कारवाई करण्यात यावी.

 बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, बोगस मतदार नोंदणीसंदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपांचे विहीत मुदतीत निराकरण करण्यात येईल असे सांगून जिल्ह्यात करण्यात आलेल्या निवडणूक विषयक तयारीचा आढावा सादर केला.  पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनूषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभाग, आचारसंहिता, मनुष्यबळ, बॅलेटपेपर, दळणवळण, इव्हीएम, सामग्री, माध्यमप्रमाणीकरण व संनियंत्रण आदी सर्व विषयांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.

00000

प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ५ सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

वाशिम, दि. 5 :  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड व कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.

कृषी फीडर्सना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अर्थात पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून ते टप्प्या टप्प्याने सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यापैकी धोंदलगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), बामणी बुद्रक (जिल्हा नांदेड), हरोली (जिल्हा कोल्हापूर), जलालाबाद (जिल्हा अकोला), पलशी बुद्रुक (जिल्हा बुलढाणा) या एकूण १९ मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण झाले. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस मदत करणाऱ्या ४११ ग्राम पंचायतींना प्रधानमंत्र्ंयाच्या हस्ते २०.५५ कोटी रुपये विकासनिधी ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला.

शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी सध्या दिवसा व रात्री असा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा करण्यात येतो. केवळ दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करावा अशी त्यांची मागणी आहे. पीएम कुसुम अर्थात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. या योजनेत सौर ऊर्जा निर्मितीसाठी दरवर्षी सव्वा लाख रुपये प्रती हेक्टर दराने जमीन भाड्याने देण्याचीही सुविधा शेतकऱ्यांसाठी आहे.

0000

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

  • प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन
  • नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता
  • 23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ
  • कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित
  • पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ
  • राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण

वाशिम, दि.5 : –  बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन, किसान सन्मान संमेलन तथा विविध विकासकामांचे लोकार्पण, लाभाचे वितरण झाले. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंग चौहान, मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा.अनुप धोत्रे, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.निलय नाईक, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.लखन मलिक, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.

  

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले ,बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. उद्गाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो. संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचे कौतुक करतो. संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री म्हणाले.

बंजारा समाजातील महापुरुषांनी देशासाठी  खूप मोठे योगदान दिले. राजा लकी सिंग, संत सेवालाल महाराज, स्वामी हाती राम, संत रामराव बापू महाराजांसह अनेक संत, महंतांनी समाजाला निर्णायक नेतृत्व दिले व उत्तम मार्गदर्शन केले. केंद्र शासन या समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. राज्य शासनाने संत सेवालाल तांडा समृद्धी अभियान राबवून या समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्यादृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. आज शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण झाले हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

महाराष्ट्र सरकारने ५० हजार करोड रुपयांच्या वैनगंगा -नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. अमरावती येथील नुकतेच टेक्सटाईल पार्कचे उद्घाटन  झाले. राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्तीला सशक्त करणारी योजना असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.

संग्रहालयामुळे बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नगारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन हा ऐतिहासिक व सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. खऱ्या अर्थाने पोहरादेवी येथे काशी उभी राहिली असून बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन होणार आहे. जगण्यासाठी भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजाने आपली संस्कृती जपली. आता त्यांच्या या संस्कृतीचे जतन संग्रहालयाच्या माध्यमातून होणार आहे. संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 700 कोटीचा निधी वितरित केला आहे.

‘सबका साथ सबका विकास’  हे ब्रीद घेऊन चालणारे नरेंद्र मोदी यांनी संत सेवालाल महाराजांचे तत्व स्वीकारले आहे. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम  करण्याचे कार्य सुरू असून ही योजना बंद होऊ देणार नाही. या योजनेतून राज्यातील २ कोटी पेक्षा अधिक महिलांना तीन महिन्यांचे सहाय्य वितरण करण्यात आले आहे. राज्य सरकार समाजातील शेतकरी, कष्टकरी, युवक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे राज्य सरकार हे आता आपले लाडके सरकार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा कायापालट केला ते  आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरिता व त्याच्या उद्घाटनासाठी आले आहेत. मोदीजींचे बंजारा समाजाशी एक घट्ट नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे पोहरागडाला भेट देणारे पहिले प्रधानमंत्री आहेत.

राज्याचा मुख्यमंत्री असताना रामराव बापूंनी मला पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी दिली होती. या ठिकाणी आज बंजारा विरासत संग्रहालय उभे राहिले आहे. मंदिराचा विकास झाला आहे. पाहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण केले. मोदीजींनी किसान सन्मान योजना आणि राज्य शासनाने नमो किसान महासन्मान योजना आणली. या योजनांचे हप्ते प्रधानमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना  दिवसा वीज देण्याचे आश्वासन राज्य शासनाने पूर्ण केले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पाच सौर उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल श्री.फडणवीस यांनी देखील प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

विरासत संग्रहालय गौरवाचे प्रतिक – उपमुख्यमंत्री अजित पवार

बंजारा विरासत संग्रहालय हे बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा, वारसा, अस्मिता, इतिहास याचे गौरवशाली प्रतीक ठरेल. या संग्रहालयाच्या रूपाने एक वैभवशाली व भव्य वास्तू येथे उपलब्ध झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून निसर्गपूजक लढवय्या बंजारा समाजाच्या संस्कृती, परंपरांचे सर्वांना दर्शन घडेल असा मला विश्वास आहे.

या संग्रहालयासह विकास आराखड्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 25 कोटी रुपये देऊन केली होती. नंतर श्री.फडणवीस यांनी 100 कोटीचा निधी जाहीर केला. त्यानंतर आता 700 कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे  उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

बंजारा समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हावे – पालकमंत्री संजय राठोड

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पोहरादेवी येथे आगमन म्हणजे बंजारा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. देशातील या समाजाला राज्यघटनेच्या एका सूचित आणण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. देशभर बंजारा समाजाची संस्कृती व भाषा एकसारखी आहे. त्यामुळे बंजारा भाषेला संरक्षित करण्यासाठी तिचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा, असे पालकमंत्री म्हणाले.

बंजारा तांड्यांचा चतुरस्त्र विकास होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तांडा विकास महामंडळ स्थापन करण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. स्वदेश योजनेंतर्गत पोहरादेवीच्या विकासासाठी केंद्र शासनाची मदत आवश्यक आहे. यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटीसह अन्य करांमध्ये सूट मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासन सातत्याने शेतकरी हिताचे उपक्रम राबवत आहे. सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन तेलाच्या आयात निर्यातीच्या दरात आवश्यक बदल करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक दर देऊन किमान आधारभूत किंमत ठरविली जात आहे. युरीया आणि डीएपीचे दर शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत, त्यामुळे यावर शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देते, असे श्री.चौहान म्हणाले.

केंद्रीय मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंग म्हणाले, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा प्रधानमंत्र्यांच्याहस्ते आरंभ होत आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत लिंग वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. यामुळे वीर्याची मात्रा सुमारे २५० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप, गौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहे. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलांची कमी दरात निवड करणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

विविध उपक्रमांचा आरंभ, लोकार्पण व लाभाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीस बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण केले व पाहणी केली तसेच बंजारा बांधवांशी संग्रहालयात संवाद साधला. मुख्य समारंभात 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला. सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या 5 व्या हप्त्याचेही वितरण केले. सुमारे 23 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा आरंभ केला.

प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी निधी अंतर्गत 1 हजार 920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित केल्या. पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ  करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’ संग्रहालयाचे लोकार्पण

वाशिम, दि. 5 : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी, प्रधानमंत्री मोदी यांनी नगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले.

श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थश्रेत्र विकास आराखड्यांतर्गत 723 कोटी रुपये खर्चून या तीर्थश्रेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या संग्रहालयात बंजारा समाजातील रुढी-परंपरा, पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक इतिहास आदीबाबत विविध कलाकृतींच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबीत केली आहे. याप्रसंगी प्रधानमंत्री महोदयांनी बंजारा समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि संतमहंत यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांचे स्वागत

आज सकाळी प्रधानमंत्री महोदयांचे हेलिकॉप्टरने वाईगौळ येथील हेलिपॅडवर आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड तसेच अपर पोलीस महासंचालक नवल बजाज, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी पोहरादेवी येथील जगदंबा मातेचे तसेच संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधींचे दर्शन घेतले.

0000

ताज्या बातम्या

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

0
मुंबई, दि.5 :- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या...

श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस...

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल – मुख्यमंत्री...

0
ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि...

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि.5 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश...

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

0
मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहोचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची...