सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 417

आत्मनिर्भरतेसाठी शिक्षणासमवेत कौशल्याची जोड द्या –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध –  आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

नागपूर, दि. ०३: विविध आव्हानांवर मात करुन राज्याच्या आदिवासी भागात असूनही  तुम्ही गुणवत्ता व कौशल्याच्या बळावर या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. तुम्ही ज्या गुणवत्तेच्या आधारावर इथपर्यंत झेप घेतली आहे त्याला आता भविष्यात एखाद्या कौशल्याची जोड द्या. या कौशल्यातूनच तुमचे आत्मनिर्भरतेचे मार्ग अधिक समृद्ध होत जातील. आपल्या क्षेत्रात अधिक पारंगत होण्यासाठी तत्पर रहा, या आश्वासक शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदिवासी युवकांना यशाचा मंत्र दिला.

आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते, परिवहन, व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडले. या समारंभास आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, राज्याच्या आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, नागपूर विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी महापौर माया इनवाते, अमरावती विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी भागातील युवकांमध्ये, युवतींमध्ये एक सुप्त शक्ती दडलेली असते. या सुप्तशक्तीला, या असामान्य गुणवत्तेला त्यांच्या शालेय जीवनापासूनच पुढे आणण्याची जबाबदारी ही त्या-त्या शाळांमधील शिक्षकांवर आहे. या मुलामुलींमधून अभियंता, डॉक्टर, शिक्षण, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रातील गुणवंत घडू शकतात. आदिवासी विभागात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी मुलांच्या उज्ज्वल भवितव्याला साकार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. शिक्षणासमवेत स्पर्धा परीक्षा, उत्तम कौशल्य याची जोड कशी देता येईल यादृष्टीने आदिवासी विभागाने अधिक प्रभावी नियोजन करण्याची अपेक्षा केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.

राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या विविध शाळा, आश्रमशाळामधून सुमारे साडेचार लाख मुले व मुली शिक्षण घेत आहेत. यातील सर्वाधिक मुले ही वाड्यापाड्यावर, आदिवासी क्षेत्रात राहणारी मुले आहेत. यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने आश्रमशाळा, निवासीशाळा सुरु करुन त्यांना पुरेसा निधी दिला आहे. आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध असून या क्रीडा स्पर्धातून ही मुले नवी ऊर्जा घेतील, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभाग सिद्ध झाला असून या राज्य पातळीवरील स्पर्धेतून अनेक कुशल क्रीडापटूंच्या भविष्याला योग्य दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमरावती, ठाणे, नाशिक व नागपूर या चारही विभागातील ३० प्रकल्पातील १ हजार ८७० खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली.  नागपूर येथील सेंट उर्सुला हायस्कूलच्या विद्यार्थिनी गोंडी भाषेतील स्वागत गीत सादर केले. गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील मुला – मुलींनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनात १४,१७ व १९ वर्षे वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केले आहे.  राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या महासंग्रामात राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील 1 हजार 917 आदिवासी खेळाडू आपल्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य व नैपुण्य दाखविणार आहेत.

यावेळी नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या ब्राइटर माईंड उपक्रमांतर्गत डोळ्याला पट्टी बांधून रंग ओळखणे, पुस्तक वाचणे, मोबाईल वरील फोटो ओळखणे, व्यक्ती ओळखणे, डब्यात ठेवलेल्या बॉलचा आवाजावरून रंग ओळखणे याचे बिनचूक सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मलखांब कौशल्याने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन जवाहर गाढवे यांनी केले. अपर आयुक्त रविंद्र ठाकरे(भाप्रसे) यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

०००

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान

 नाशिक, दि. जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्तसेवा):  देशातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आज सकाळी किसान सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, खासदार भास्करराव भगरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार हिरामण खोसकर, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयसीआरचे संचालक डॉ. एस. के. रॉय, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. नितिन ठोके आदी उपस्थित होते. प्रारंभी मंत्री श्री. चौहान यांनी स्वयंसहायता बचत गटांच्या स्टॉलला भेट देत महिलांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री श्री. चौहान म्हणाले की, शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आपण देव पाहतो. शेतकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना  व उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पीक विमा योजनाचा लाभ  तत्काळ मिळण्यासाठी  गाव व पंचायत स्तरावर उपग्रह प्रणालीद्वारे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे केली जाणार आहेत. त्यामुळे अचूक प्रक्रिया होवून शेतकऱ्यांना देय भरपाई डी.बी.टी द्वारे त्वरीत प्रदान केली जाईल. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी लागणारी खते ही स्वस्त दरात उपलब्ध करण्यात देण्यात येत आहेत. यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादीत निर्यातक्षम मालाला योग्य मोबदला व बाजारपेठ  मिळण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी जास्त आहेत. शेतकऱ्यांना परदेशी द्राक्षांची नवनवीन वाणांची उपलब्धता कशी करता येईल यासाठी बैठकीचे आयोजन करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीय कृषी मंत्री श्री. चौहान यांनी योवळी सांगितले. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वीपणे राबविल्याबाबत केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी  राज्य सरकारचे अभिनंदन केले.

ॲड. कोकाटे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील शेतकरी आहे. येथील शेतकरी नेहमीच नाविन्याचा शोध घेतात, असे सांगत आगामी काळात कृषी विभागातर्फे ड्रोण वापराला प्राधान्य देण्यात येईल. राज्य सरकारतर्फे ऑनलाइन पोर्टल तयार करून ते महसूल विभागाशी जोडून शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानाची प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करण्यात येईल. असेही मंत्री श्री. कोकाटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी जळगाव, ता. निफाड येथील ‘नमो योजनेत’ ड्रोन प्राप्त प्रगतिशील शेतकरी दीपाली मोरे, मधुकर गवळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती मोरे, श्री. गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0000

एमपीएससीत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सातारा, दि. ०३: नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी महाज्योतीने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेच्या मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बहुजन कल्याण व स्त्रीशिक्षण या विचारांवर उभारण्यात आलेल्या ‘महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन हे यश प्राप्त केले आहे. या घवघवीत यशामुळे आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

०००

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा दि.०३ (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी प्रशासनाने १० एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त नायगाव, ता. खंडाळा येथे आयोजित सावित्रीमाई जयंती उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले,  ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे,  आमदार सर्वश्री छगन भुजबळ, अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे,  जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम करू, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवंत स्मारक म्हणजे सक्षम महिला होय. त्यांचा विचार समाजात तळागाळापर्यंत रुजवून स्वयंपूर्ण व स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभारणाऱ्या महिला घडविण्याचे कार्य शासन करेल. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्याने पुढील काळात निश्चितपणे महिलाराज येईल.  केंद्र सरकारच्या लखपतीदीदींसारख्या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या दोन तीन वर्षात 50 लाख महिलांना लखपती दीदी घडविण्याचे कार्य शासनाने हाती घेतले आहे.

या देशावर, महाराष्ट्रावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे उपकार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या काळात स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागणूक मिळत होती त्या काळात समाजातील विषमता दूर करून समतेचे बीजारोपण करण्याचे कार्य फुले दांपत्याने केले. शिव्या शाप, शेण गोळे खावे लागले तरी सावित्रीबाई फुले यांनी न डगमगता स्त्रियांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची ज्योत पेटवली. या कार्यात महात्मा फुले हे हिमालयाप्रमाणे त्यांच्या सोबत होते. त्यांनी विधवांच्या केशवपन, बालहत्या यासारख्या बाबींना कृतिशील विरोध केला. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळींचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले, याची कबुली स्वतः महात्मा फुले यांनी अनेकदा दिलेली आहे. थोर माणसांचे कार्य कधीही संपत नाही, त्यांचे स्मारक उभा करत असताना पुतळ्यासोबतच विचारांचेही स्मारक झाले पाहिजे, असेही मत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी योवळी व्यक्त केले.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले.  स्त्री शिक्षणाची सुरवात झाल्यामुळे आज महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेले हे गाव ग्रामविकास मंत्री म्हणून मी दत्तक घेत आहे. यापुढे कामासाठी निवेदने येणार नाहीत, या पद्धतीने नायगावचा विकास केला जाईल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव प्रेरणास्थान असून त्यांचे विचार उर्जा देणारे आहेत. त्यांच्या सन्मानाला साजेसे स्मारक उभारण्यासाठी दहा एकर जागा शासनाने खरेदी करावी व स्मारकासाठी 125 कोटी रुपये द्यावेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विकास आराखडा तातडीने मंजूर करावा. स्मारकाचे काम मंजूर झाल्यानंतर हे स्मारक दोन वर्षाच्या आत उभे राहील. या स्मारकामध्ये महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षणे देण्यात येतील. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करुन आर्थिक सक्षम केले जाईल, अशी ग्वाहीही मंत्री श्री. गोरे यांनी दिली.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की, १ जानेवारी १८४८ ला मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी वर्षानुवर्ष प्रगतीपासून दूर असणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. फुले दांपत्याने समाजाला दिशा दाखवण्याबरोबरच अंधकार व अंधश्रद्धेतून बाहेर काढले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत याचे श्रेय फुले दांपत्याचे आहे.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगावच्या विकासासाठी आतापर्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत, यापुढेही ते अखंड सुरू राहतील. नायगाव हे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील.

आमदार छगन भुजबळ यांनी फुले दांपत्याचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता, कोणत्या जातीपातीला नव्हता असे सांगून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या जीवनातील महत्त्वाची ठिकाणे जोडण्याचे काम मार्गी त्वरित लावावे, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार हा 3 जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमातच दिला जावा, फुले दांपत्याच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यांनतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचीही पाहणी केली. या ठिकाणी स्मारक उभारणी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ब वर्ग पर्यटन क्षेत्रांतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय प्रतिक्षालयाचे उद्घाटन, जलजीवन मिशन अंतर्गत वॉटर एटीएमचे उद्घाटन, महाज्योतीच्या विविध योजनांच्या प्रदर्शन दालनांचे उद्घाटन, महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन, जिल्हा परिषद शाळेतील निबंध चित्रकला व वकृत्त्व, स्पर्धेतील विजेते, विद्यार्थी यांच्या बक्षिस वितरण, यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, सरपंच स्वाती जमदाडे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, नितीन घुले यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

नवी दिल्ली, दि. ०३: पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनातील दर्शनी भागात आयोजित कार्यक्रमात बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग आप्पा सोनवणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार तसेच महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित अन्य कार्यक्रमात निवासी आयुक्त नीवा जैन यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

०००

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, दि.०३ :रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भारत गोगावले यांनी केले. रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री श्री. गोगावले यांनी मंत्रालयात विभागाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.

 

मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, रोजगार हमी कामांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तोच पॅटर्न राज्यात राबवून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलांची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. गोगावले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रोजगार हमी विभागातील व मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे अभिवादन

मुंबई, दि. ०३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच   राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

‘उजनी’तून जिल्ह्याला संपूर्ण उन्हाळ्यात पाणी मिळण्याचे नियोजन करणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दिनांक ३ (जिमाका):-उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९६.९२ टक्के इतका उपलब्ध आहे. मागील वर्षी ६६ टक्के पाणी उपलब्ध होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये. तसेच सोडलेल्या अवर्तनातून पाण्याची बचत करावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) श्री. विखे पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, राजू खरे, अभिजीत पाटील, नारायण पाटील, उत्तम जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, महापालिका आयुक्त शितल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव सु. सा. खांडेकर, अधीक्षक अभियंता धीरज साळी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन संतोषकुमार देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागाचे अन्य अधिकारी व कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवा कल्याण व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, उजनी प्रकल्पाच्या पाण्याचे सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी व शेतकरी, नागरिक यांच्या सहकार्यातून अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जलसंपदा विभागामार्फत ४ जानेवारी, १ मार्च व १ एप्रिल अशा एकूण ३ पाळ्या पाणी सिंचनासाठी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतु दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सिंचनासाठी पहिले आवर्तन उजनी धरणातून सोडल्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेऊन उपलब्ध पाण्यातून जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच प्रत्येक आवर्तनामधून शेतकरी व नागरिकांनी पाण्याची बचत करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

उजनी प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे यासाठी जलसंपदा विभागाने कालव्यामध्ये झालेली झाडेझुडपे काढून टाकावीत. कालव्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे काढावीत. कालव्यातून प्रवाह व्यवस्थितपणे शेवटच्या टोकापर्यंत जाईल यासाठी कालव्याची दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत. तसेच कालव्या वरील ब्रिजची दुरुस्ती करून घ्यावी. आवश्यक त्या ठिकाणी नवीन ब्रिज करावेत. यासाठी विभागाने विशेष मोहीम राबवावी. तर जलसंपदा विभागाने भीमा नदीवर ११ बॅरेजेस प्रस्तावित केलेले आहेत तसा प्रस्ताव शासनाकडे आलेला असून या बॅरिजेसचे महत्व लक्षात घेऊन यातील जास्तीत जास्त बॅरेजेस मंजूर करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

मागील वर्षभरापूर्वी उजनी डावा कालव्यातील अति पाणी प्रवाहामुळे पाटकुल तालुका मोहोळ येथे कालवा फुटून ३३० शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व शेतीचे नुकसान झालेले होते त्या सर्व शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आदेश श्री. विखे पाटील यांनी दिले. उजनी प्रकल्पाच्या विविध कालव्याच्या अनुषंगाने नागरिक, शेतकरी व कालवा समितीच्या सदस्यांच्या काही तक्रारी, प्रश्न व मागणी असतील तर त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचा निपटारा करावा. मागील काही वर्षांपूर्वी उजनी धरणातून दहा ते पंधरा टीएमसी गाळ काढण्याचे टेंडर झालेले होते परंतु ते काही कारणामुळे रद्द झालेल्या आहे त्या अनुषंगाने समितीने अहवाल शासनाला सादर केलेला आहे तो अहवाल पाहून त्याविषयी पुढील काळात निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.

राज्याचे युवा कल्याण व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी प्रकल्पातून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून त्याची अंमलबजावणी ही करावी. उजनी धरणात पावसाचे पाणी जुलै ऑगस्ट या कालावधीत येते त्यामुळे सध्या उजनी धरणात असलेल्या पाण्याचे वाटप सर्वांना सम प्रमाणात करून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनानाही पुरेसे पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली.

प्रारंभी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव श्री. खांडेकर यांनी सादरीकरणद्वारे जलसंपदा विभागाने उजनी प्रकल्पाच्या पाण्याचे मे २०२५ अखेरपर्यंत केलेल्या सूक्ष्म नियोजनाची माहिती बैठकीत सादर केली. या मध्ये लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडे सिंचन व्यवस्थापनासाठी उजनी, सीना माढा उपसा सिंचन योजना, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव उपसा सिंचन योजना असे चार मोठे प्रकल्प, सात मध्यम प्रकल्प, ५७ लघु प्रकल्प व ९० कोल्हापूर बंधारे असल्याचे सांगून उजनी प्रकल्पात २ जानेवारी २०२५ रोजी उपयुक्त पाणीसाठा ५१.९२ टीएमसी (टक्केवारी ९६.९२), अचल पाणीसाठा ६३.६६ टी एम सी तर एकूण पाणीसाठा ११५.५८ टीएमसी असल्याचे सांगितले. तसेच कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसुली, खरीप हंगाम २०२४-२५ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, आकस्मिक पाणी आरक्षण, रब्बी हंगाम २०२४-२५ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, रब्बी हंगाम २०२४-२५ मधील पूर पाणी वापर, रब्बी हंगाम २०२४-२५ चे प्रस्तावित पाणी नियोजन, उन्हाळा हंगाम पाणी नियोजन पाणीपुरवठा योजनेचे पाणी नियोजन आदीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ४ जानेवारी २०२५ रोजी उजनी प्रकल्पातून पहिले आवर्तन सोडण्यात येणारा असून दुसऱ्या आवर्तन एक मार्च व तिसऱ्या आवर्तन एक एप्रिल असे नियोजित असल्याचे श्री. खांडेकर यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी व अशासकीय सदस्यांनी बैठकीत मांडलेले विविध मुद्दे….

आमदार समाधान आवताडे यांनी मंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्याला या हंगामात पाण्याचे पाच आवर्तन सोडण्याची मागणी केली तसेच मागील दोन वर्षांपूर्वी पाण्याची पाच आवर्तने दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला व यावर्षीही पाच आवर्तने देण्याची मागणी केली. आमदार सुभाष देशमुख यांनी अभिनंदननाच्या अनुमोदन दिले व उजनी प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेण्या बरोबरच कालव्यातील झाडे झुडपे काढण्याची सूचना केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी उजनी धरणातील शेतकऱ्यांना अजून पर्यंत मोबदला मिळाला नाही त्या अनुषंगाने स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली तर खासदार धैर्यशील पाटील यांनीही शेतकऱ्यांना उजनी धरणातून पावसाळ्यापर्यंत पाणी मिळेल यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील एकरूख पाणीपुरवठा योजनेत पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी सिंचन आराखड्यातील तरतुदीप्रमाणे सर्वांना सम प्रमाणात पाणी देण्याची मागणी केली.

करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्याला पुरेसे पाणी मिळावे तसेच उजनी प्रकल्पातून पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी उचल म्हणून करमाळा तालुक्याला उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विचार करावा असे सांगितले. आमदार अभिजीत पाटील यांनी सीना माढा सिंचन योजनेअंतर्गत माढा तालुक्यातील चार गावांना पाणीपुरवठा करावा यासाठी प्रकल्पातून फक्त ८०० मीटर पाईपलाईनची आवश्यकता असून ती पाईपलाईन टाकून द्यावी अशी मागणी केली. तर समितीचे अशासकीय सदस्य यांनी भीमा नदीला कालव्याचा दर्जा द्यावा कारण सोलापूर महापालिकेचे पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर भीमा नदी प्रवाही राहील या दृष्टीने विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.

0000

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मंत्री संजय शिरसाट यांचे अभिवादन

मुंबई, दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३: पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनीही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी डॉ. कांबळे यांनी उपस्थित महिलांना पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अवर सचिव सचिन कावळे, एससी/ एसटी कर्मचारी संघटनेचे भारत वानखेडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

०००

श्रीमती श्रद्धा मेश्राम/स.सं.

 

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...